गुरुवार, २० डिसेंबर, २०१२

निखिल हा दर्डांच्या खाणीतला कोळसा आहे का?


   "वाद अंगावर ओढून घेण्यात वागळेंना मजा येते. त्यातला नितीमूल्यांसाठी झगडण्याचा आव धादांत खोटा असतो, हे सांगितलंच पाहिजे. सोनिया गांधी आणि आर. के. धवन यांचे संबंध असल्याचा मजकूर ‘महानगर’मधल्या राजीव गांधींच्या मृत्यूच्या बातमीतच होता. सहाजिकच कॉग्रेस कार्यकर्ते तेव्हा आले होते, ते काही हल्ला करण्यासाठी नाही. अत्यंत सभ्यपणे, ‘तुम्ही छापलं ते बरोबर नाही, अनुचित आहे’ असं ते सांगत होते. पण आपण लिहितो तेच बरोबर अशी हवा डोक्यात गेलेले वागळे त्यांना हाकलून मोकळे झाले. मग कॉग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आणि निदर्शने सुरू झाली."

   हा निखिलच्या अविष्कार स्वातंत्र्याचा पुरावा आहे. तो पुरावा सोळा वर्षापुर्वी कपील पाटिल यानी लिहिलेल्या लेखातला आहे. निखिलला कुणाची तरी अकारण कळ काढून वाद अंगावर ओढवून घेण्याची मजा वाटते, असेच कपीलने म्हटले आहे ना? म्हणजे त्याचा जो काही सत्यकथनाचा आव असतो ते निव्वळ ढोंग असते. कपील त्याचीही ग्वाही देऊन म्हणतो, ‘त्यातला नितीमूल्यांसाठी झगडण्याचा आव धादांत खोटा असतो, हे सांगितलंच पाहिजे.’ यापेक्षा आणखी निखिलच्या बदमाशी व भामटेगिरीचा पुरावा कुठला हवा आहे? अर्थात ही जुनी गोष्ट झाली. पण सुंभ जळले तरी पिळ जात नाही म्हणतात ना, त्यातली बाब आहे. अगदी अलिकडे निखिलने तोच उद्योग करून बघितला. पण त्यात ‘मजा आली नाही’. बाळासाहेबांच्या निधनानंतर त्याने कायबीइन लोकमत या वाहिनीवर दिवसभर लाळ गाळून झाल्यावर ट्विटरवर गरळ ओकली. जे वाहिनीवर गुलामी करत असल्याने बोलता आले नव्हते; ते मनातले निखिलने ट्विटरवर लिहिले. ‘बाळासहेब ठाकरे हे भारतीय लोकशाही व्यवस्थेचे अनौरस अपत्य होते, ज्याने त्या लोकशाहीचा आपल्या तथाकथित हुकूमशाहीच्या प्रयोगासाठी वापर करून घेतला.’ हे जर निखिलचे खरे मत असेल, तर त्याने वाहिनीवर लाळ गाळत बसायची काय गरज होती? तिथेही तेच बोलायची हिंमत दाखवायला हवी होती. पण तेवढी हिंमत त्याच्यापाशी नव्हती. असेही म्हणायला जागा नाही. कारण त्याने मनातले ट्विटरवर लिहिले. सवाल आहे, की तेच वाहिनीवर बोलताना हिंमत कुठे गेली होती? तेव्हा याच्या तथाकथित अविष्कार स्वातंत्र्याच्या गळ्य़ात कोणाचा पट्टा बांधलेला होता? कोणी निखिलची गळचेपी केली होती? आणि केली असेल तर निखिल त्याबद्दल अवाक्षर का बोलत नाही?

   असे काही अविष्कार स्वातंत्र्य म्हणून त्या दिवशी व वाहिनीवरून बोलले तर मोडतोड होईल; याची भिती दुय्यम होती. त्या मोडतोडीला गुलाम निखिलचे मालक घाबरत नाहीत. तेवढी भरपाई करायला त्यांच्याकडे बख्खळ पैसा आहे. पण अशी काही मुक्ताफ़ळे वाहिनीवरून उधळली असती, तर त्या वाहिनीची टीआरपी एका तासात रसातळाला गेली असती, आणि निखिलला ढुंगणावर लाथ मारून हाकलायची वेळ दर्डांवर आली असती. त्याचे पुर्ण भान असल्यानेच निखिल वाहिनीवर ठाकरे यांच्या कौतुकाची लाळ गाळत होता आणि मालकांच्या इशार्‍यावर त्याचे आविष्कार स्वातंत्र्य शेपूट हलवित होते. कारण कळ काढली तर निखिलला मजा आली असती. पण दर्डांचे दिवाळे वाजले असते. म्हणूनच अविष्कार स्वातंत्र्यासह मजा गुंडाळून निखिल बाळासाहेबांच्या आरत्या ओवाळत बसला होता. यालाच मी ढोंगीपणा म्हणतो. जे बोलायची हिंमत नोकरी वा पगाराचा गळ्यातला पट्टा ओढल्यावर निमूट गप्प बसते आणि शेपूट हलवते, त्याला अविष्कार स्वातंत्र्य म्हणतात काय? तर मुद्दा इतकाच, की हा माणुस निव्वळ ढोंगी आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टी व कृतीसह बोलण्यातही फ़क्त लबाडी असते. खरे तर त्या तथाकथित स्वातंत्र्याचा आडोसा घेऊन निखिलला वाद उकरून काढायचे असतात आणि त्यातून आपल्याकडे लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे असते. आजवर त्याने जी काही अशी स्वातंत्र्याची लढाई करायचे नाटक चालविले आहे, त्याचा हेतू कायम समान राहिलेला आहे. उपरोक्त कपीलच्या विधानात कॉग्रेस कार्यकर्त्यांचा व पांडूरंगशास्त्री आठवले यांच्या अनुयायांचा उल्लेख आलेला आहे. त्यांना दुखावण्यार्‍या गोष्टींचा अविष्कार स्वातंत्र्याशी काय संबंध आहे? आणि जर इतकाच मोठा लढवय्या आहे निखिल; तर त्याने कपील म्हणतो तशी माहिम पोलिस ठाण्यात जाऊन सोनिया गांधी प्रकरणात माफ़ी का मागितली? त्याचे उत्तर निखिल कधी देतो काय?

   कपीलच्या त्या लेखाला उत्तर देताना, निखिल म्हणतो, ‘सोनिया गांधींचा उगाळून फ़ेकून दिलेला कोळसाही त्यांनी (कपील पाटलांनी) पुन्हा शोधला आहे. या सगळ्याबद्दल आणखी काही स्पष्टीकरण देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही.’ असे निखिलचे तेव्हा ‘महानगर’मधून दिलेले उत्तर आहे. म्हणजे यांच्या पापाबद्दल जाब विचारला, मग तो उगाळून फ़ेकून दिलेला कोळसा असतो. की तेव्हापासूनच निखिलला कोळसा या विषयावर कुठले स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नसल्याने दर्डा ही मालक मंडळी कोळसा खाणीत अडकल्याचे आढळून आल्यावर निखिलने कायबीइन लोकमत वाहिनीवर त्याची चर्चा टाळली होती? की निखिलने उगाळून फ़ेकून दिलेला कोळसा घेऊनच दर्डांनी कोळसा खाणीचा कारभार सुरू केला आणि त्यासाठीच निखिलला घेऊन मुद्दाम वाहिनीचा व्यवहार सुरू केला होता? कोळसा आणि निखिलचे इतके जुने नाते आहे.

   रस्त्यातून चाललेल्या एखाद्या मुलीची छेड काढायची आणि तिने चप्पल मारल्यावर, हल्ला झाला म्हणून बोंबा मारायच्या; याला निखिल अविष्कार स्वातंत्र्याची लढाई म्हणत असतो. तो त्याची मजा घेत असतो. बाकीचे जे कोणी मुर्ख पत्रकार संपादक त्याच्यामागे त्यासाठी भाबडेपणाने उभे रहातात, त्यांचा निखिल मोठ्या धुर्तपणे वापर करत असतो. त्यात हेमंत देसाई इत्यादिंचा समावेश होतो. असे भाबडे किंवा वैचरिक गुलामीने अगतिक झालेले; मग निखिलच्या पापावर पांघरूण घालायला अगत्याने पुढे येत असतात. खरे तर निखिलचा बुरखा फ़ाडणारा कपीलचा तो लेख अत्यंत महत्वाचाआसा अविष्कार स्वातंत्र्याच्या खोट्या लढाईचा दस्तावेजच आहे. कारण त्याच कपीलने ‘महानगर’च्या भंपकपणाचे वाभाडे मी ‘मार्मिक’मधून काढले; तेव्हा निखिलच्या अशाच भाषेत खुलासा पाठवला होता. मात्र काही वर्षातच त्याने ‘महानगर’ व निखिल अशा दोघांवर माझेच जुने आरोप करणारा उपरोक्त लेख लिहिला. त्यात निखिल एकटाच उघडा पडलेला नाही. कारण कपीलच्या लेखाला उत्तर देताना निखिलने कपीललाही उघडानागडा करून टाकला होता. त्यातून आजकालची लेखन स्वातंत्र्य व अविष्कार स्वातंत्र्याची लढाई हे कसे ढोंग आहे; त्याचीच दोघांनी परस्परांच्या विरोधात दिलेली साक्ष, असे हे तीन लेख आहेत. मला अशी घाण जपून ठेवायची वाईट सवय आहे. पण ह्यांनी इतकी राजरोस चव्हाट्यावर घाण केली असली व एकमेकांच्या पापाचा जाहिर पाढा वाचलेला असला; तरी कोणा अन्य अविष्कार स्वातंत्र्यवीराने त्यावर भाष्य केलेले नाही. यालाच म्हणतात जातीसाठी खावी माती. त्यालाच मी सेक्युलर ढोंगबाजी किंवा पुरोगामी भामटेगिरी म्हणतो.

   यातून एक गोष्ट लक्षात येईल, की शिवसेनेने आपल्यावर हल्ले करावेत म्हणुन निखिल जाणिवपुर्वक कळ काढणार्‍या बिनबुडाच्या बातम्या देणार आणि हल्ला झाला मग अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी म्हणून गळाही काढणार. मग त्याविरुद्ध मोजके डावे निदर्शने व धरणी असले ढोंग करायला हजर होणार. हा परिपाठ झालेला होता. म्हणूनच त्या लेखात कपील म्हणतो, ‘वागळे डाव्यांना फ़ार प्रिय आहेत’. ते का प्रिय आहेत वा होते? तर त्यांना शिवसेनेशी दोन हात करण्याची कुवत राहिलेली नव्हती. अशावेळी शिवसेनेची कळ काढणार्‍यावर ते फ़िदा होणे स्वाभाविकच असते. सुंदर मदालसा कटरिना वा करीना कपूरला मिठीत घेणार्‍या सलमान वा शाहरुखला बघून थेटरात शिट्ट्या फ़ुंकणारे आंबटशौकीन असतात, तशीच ही मानसिकता असते. आपण अशा सुंदर मुलीच्या जवळही जाऊ शकत नसतो, तेव्हा तसे काही पडद्यावर बघण्यातला एक आभासही खुश करणारा असतो. तोच आनंद निखिलने ‘महानगर’ दैनिकातून डाव्यांना मिळवून दिलेला होता. म्हणूनच ‘वागळे डाव्यांना प्रिय होते.’ पण मुळात तो ढोंगी माणुस आहे. माणुस बेअक्कल असतो किंवा बदमाश असतो. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतील तर धोका कमी असतो. पण दोन्ही एकत्र असतील तर अधिक घातक रसायन तयार होते. निखिल हे तसेच घातक रसायन आहे. तेव्हा त्याने जो ब्लॉग लिहून पुन्हा ठाकरे यांच्या निधनानंतर मुक्ताफ़ळे उधळली आहेत, तेवढ्यापुरती त्याची हजेरी इथे तातडीने घ्यावी लागली. बाकी सवडीने पुढे बघू. मुद्दा इतकाच, की त्याच्यासह त्याच्या भोवतालच्या विद्वानांच्या अकलेची कींव करावीशी वाटते. कारण ते एका गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत. आणि समाजात असेच पोकळ सभ्य लोक गुन्हेगारीला पोसत असतात हे सांगणे भाग होते.    ( क्रमश:)
भाग   ( ३२ )    २१/१२/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा