रविवार, २९ डिसेंबर, २०१३

मोदींसाठी ‘आप’त्ती, की इष्टापत्ती?

==================================================
दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल (कंसात जिंकलेल्या जागा)
२००८:  कॉग्रेस ४०.३१% (४३), भाजपा ३६.३४% (२३), बसपा १४.०५ %(२),   
२०१३:  कॉग्रेस २५% (८),     भाजपा ३४% (३२),   आप ३०% (२८) 
==================================================


   नुकत्याच चार महत्वाच्या विधानसभा निवडणूका झाल्या आणि त्याचे निकालही आलेले आहेत. त्यात सर्वत्र कॉग्रेसचा सफ़ाया झाला आणि तीन राज्यात भाजपाने जबरदस्त मुसंडी मारलेली आहे. मात्र त्याचे प्रतिबिंब दिल्ली या शहरी राज्यात पडू शकले नाही. तरीही तिथे पहिल्या क्रमांकाच्या जागा व मते मिळवण्यापर्यंत भाजपाने मजल मारलेली आहे. येत्या म्हणजे २०१४ सालाच्या पुर्वार्धात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूकीची ही उपांत्य फ़ेरी असे वारंवार संबोधले जात होते. त्यामुळेच त्यात भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी अपुर्व मेहनत घेतली. त्याचा परिणाम तिथल्या मतदानाच्या टक्केवारीवर झालेला दिसला. राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यात पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक मतदानाचे विक्रम साजरे झाले आणि त्याच लाटेत कॉग्रेस पुरती वाहून गेली. दिल्लीतही कमी प्रमाणात, पण मतदानात वाढ झाली. ह्या मतदारांच्या उत्साहाचे कारण एका बाजूला नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेला आशावाद आहे; तसेच दुसरीकडे कॉग्रेसविषयी निर्माण झालेली कमालीची नाराजी आहे. हे उघड व स्पष्ट असताना मोदींच्या लोकप्रियतेची लाट नाकारण्यात धन्यता मानण्य़ाचा अट्टाहास माध्यमांपासून सेक्युलर अभ्यासकांपर्यंत पुर्वीसारखाच चालू आहे. आपले अंदाज व भाकिते साफ़ फ़सल्यावर याच लोकांनी मग बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, त्याप्रमाणे दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांनी नवखा असून मिळवलेल्या यशाचे देव्हारे माजवण्यात पुढाकार घेतला तर नवल नाही. त्यातला दुटप्पीपण लपूनही रहात नाही.

   एका बाजूला दिल्लीतल्या ‘आप’चे यश अनपेक्षित असेच आहे. पण ज्या कारणास्तव ते व तेवढे यश त्या पक्षाला मिळालेले आहे, त्याच निकषावर देशात मोदीही मोठे यश मिळवू शकतात, हे नाकारण्याचे तर्कट चालू आहे. दिल्लीत या पक्षाकडे पुर्वापार संघटनात्मक ढाचा नव्हता, की पुर्वपुण्याई नव्हती. तरीही त्या पक्षाकडे लोकप्रिय चेहर्‍याचा व जनमानसात आशेचा किरण जागवणारा नेता होता. केवळ तेवढ्याच बळावर त्याने इतके मोठे यश मिळवले आणि कॉग्रेसपेक्षा अधिक मते व जागा जिंकल्या. मग देशात आज जे मोदींच्या लोकप्रियतेचे वारे वहात आहेत; त्याचेच प्रतिबिंब तीन राज्यात पडून भाजपाला इतके मोठे यश मिळाले, हे निखळ सत्य आहे. किंबहूना त्याच निकषावर देशातल्या कॉग्रेसविरोधी प्रक्षोभाचे प्रतिक बनलेल्या मोदींना लोक पंतप्रधान करायला उतावळे झालेले आहेत. मग आजवर जिथे भाजपाचे संघटनात्मक बळ नव्हते; तिथेही त्या लाटेचा परिणाम दिसू शकतो. जो नियम संतप्त मतदार केजरीवाल यांना मते देण्यासाठी लावतो, त्याच निकषावर देशाच्या कानाकोपर्‍यातला मतदार भाजपाच्या संघटनात्मक बाजूची पर्वा न करता मोदींसाठी त्या पक्षाला बहूमत देऊ शकतो. कारण त्या मतदाराला मोदी जितके आवडतात व विश्वासार्ह वाटतात; त्यापेक्षाही कॉग्रेसच्या तावडीतून सुटायची घाई झालेली आहे. अशावेळी तो मतदार कॉग्रेसला नक्की पराभूत करणारा व पर्यायी सरकार देऊ शकेल, अशा नेत्याचा शोध मतदार घेत असतो. दिल्लीत भाजपाने असा नेता लोकांसमोर आणण्यात विलंब केला. त्यामुळे त्याचे बहूमत हुकले. देशाच्या पातळीवर तसे घडणे शक्य नाही. पण ज्यांना मोदी व भाजपाच्या नावाचेच वावडे आहे; त्यांना मोदी बहूमत मिळवून पंतप्रधान होऊ शकतात, हे मानायची सुद्धा भिती वाटते, त्यांना मग मोदींच्या अपयशासाठी नवनवे तर्क शोधावे लागणारच ना? त्यातूनच मग ही मंडळी केजरीवाल नावाच्या काडीला धरून आपले तर्क बुडणार नाहीत, अशी खुळी आशा बाळगत आहेत आणि त्यावर अतिशयोक्त युक्तीवादही करू लागली आहेत. वास्तवात केजरीवाल व त्यांच्या यशामुळे बदललेल्या राजकीय समिकरणाचे मांडले जाणारे युक्तीवाद, त्यांनाही पटलेले नाहीत. म्हणून तर वाहिन्यांवरल्या चर्चेतून भाजपाच्या गळी ते उतरवण्याचा उतावळेपणा सुरू झाला आहे. पण त्यातला फ़ोलपणा अजिबात लपत नाही.

   कुठलेही संघटन पाठीशी नसताना आम आदमी पक्षाला अनेक राज्यात अचानक जागा व यश मिळू शकतात. पण किमान चारशे मतदारसंघात भाजपाकडे लढण्याइतकी संघटना असूनही मोदींच्या लोकप्रियतेचा त्याला लाभ मिळू शकत नाही, हा कुठला युक्तीवाद आहे? पहिली गोष्ट म्हणजे दिल्लीतील ‘आप’च्या यशाचे नेमके विश्लेषण कोणीही केलेले नाही. बारकाईने बघितले, तर केजरीवाल यांच्या यशामागे जितके कॉग्रेसचे अपयश आहे; त्यापेक्षा अधिक नुकसान त्या पक्षाने मायावती यांच्या बसपाचे केले आहे. मागल्या निवडणूकीत तिसर्‍या क्रमांकाची मते व दोन आमदार असलेला बसपा, यावेळी पुरता नामशेष झालेला आहे. त्याची सर्वच मते ‘आप’ने खाल्लेली आहेत. कॉग्रेसचाही मोठा हिस्सा त्याने खाल्ला आहे. पण भाजपाच्या मताचा किंचित हिस्सा त्याला बळकावता आला. याचा अर्थच सरळ असा, की संसदेच्या निवडणूकीत ‘आप’वाले उतरले; तर ते कॉग्रेसची मते काही प्रमाणातखाऊ शकतील. पण भाजपाच्या विरोधात लढून कॉग्रेसच्या वळचणीला जाणार्‍या पक्षांचा सर्वाधिक लचका तोडणार आहेत. म्हणजे उत्तरप्रदेशात मायावती, मुलायम, बिहारमध्ये लालू, पास्वान, नितीश, तर कर्नाटकात देवेगौडा वा महाराष्ट्र व बंगालमध्ये डावे पक्ष आहेत; अशा सेक्युलर नाटके करणार्‍यांचे लचके ‘आप’ तोडणार आहे. त्या पक्षाच्या लोकसभा निवडणूकीत उतरण्याने भाजपाला मोठाच धक्का बसेल; असा दावा शुद्ध मुर्खपणाचा आहे. कारण दिल्लीतही त्याला तसे करता आलेले नाही. मग अन्य राज्यात तरी त्या पक्षाच्या मैदानात येण्याचा धोका भाजपाला कशाला असेल? तेच सत्य लपवण्यासाठी तथाकथित सेक्युलर पत्रकार, प्राध्यापक, विश्लेषकांनी दिल्लीच्या निकाल व आकडेवारीचे सत्यस्वरूप लपवण्याचा आटापिटा चालविला आहे. गेले पंधरा दिवस असे भासवले जात आहे, की केजरीवाल यांनी मोदींचा विजयरथ रोखला आहे. पण वास्तवात त्याच पक्षाने आपले बस्तान देशाच्या राजधानीत बसवताना (तिसर्‍या आघाडीत राहून कॉग्रेसशी चुंबाचुंबी करणार्‍या बहूजन समाज पक्षाला) मायावतींच्या सेक्युलर नाटकाला संपवले आहे. तेच हा पक्ष देशात जिथे जिथे निवडणूकीत उतरणार तिथे होणार आहे. त्यामुळेच भाजपा वा मोदींना रोखण्यासाठी सेक्युलरांनी केजरीवाल यांना घोड्यावर बसवले असेल; तर मोदींसारखा समाधानी माणुस दुसरा कोणी असू शकत नाही. कारण ‘आप’ सेक्युलर पक्ष व नेत्यांची मते खाऊन मोदींचे बहूमत मिळवण्याचे काम अधिक सोपे करणार आहे.

   २०१३ची अखेर मोदींच्या मोहिमेला प्रतिसाद देणारी झाली आहे आणि ज्याला गेले सहा महिने उपांत्य फ़ेरी संबोधले जात होते; ती मोदींनी जिंकली आहे. पण ते कबुल केल्यास मोदीच अंतिम फ़ेरी आगामी मे महिन्यात सहज जिंकतील, हेसुद्धा मान्य करावे लागेल. तेच टाळण्यासाठी मग तीन राज्यातील भाजपाच्या अपुर्व यशाला झाकायचे उद्योग सुरू झाले. त्यातूनच मग नवख्या ‘आप’ पक्षाच्या यशाचा डंका पिटला जात आहे. त्यामुळे मोदींचे काहीही बिघडत नाही. याच २०१३च्या आरंभी जयपूरमध्ये राहुल गांधी यांच्यासाठी कॉग्रेसमध्ये उपाध्यक्षपद निर्माण करून त्यांना पक्षाची धुरा तिथे सोपवण्यात आली. तेव्हा त्यांनी वाचून दाखवलेल्या भाषणाचे केजरीवाल यांच्याप्रमाणेच अतिशयोक्त कौतुक झाले होते. तेवढेच नाही तर राहुलच्या भाषणाच्या तुलनेत मोदींचे दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमधले भाषण फ़िके व अर्थहीन असल्याच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या. अकरा महिन्यानंतर ८ डिसेंबरला त्याचे परिणाम समोर आले. तसेच आजच्या केजरीवाल यांच्या कौतुकाचे परिणाम मे महिन्यात समोर येतील. ते काय असू शकतात, त्याचे उत्तर दिल्लीच्या निकालात दडलेले आहे. दिल्लीत केजरीवाल यांनी मोदींचा विजयरथ अडवलेला नाही किंवा त्यात किंचितही बाधा आणलेली नाही. तिथले केजरीवाल यांचे यश खरेतर मागल्या दोन वर्षात सातत्याने झालेल्या विविध आंदोलनांचा एकत्रित परिणाम आहे. त्यात मोदींचा अजिबात सहभाग नव्हता आणि स्थानिक भाजपा नेत्यांनी त्यात दाखवलेल्या उदासिनतेचा परिणाम होता. अखेरच्या क्षणी मोदींनी दिल्लीत जोर लावला नसता, तर केजरीवाल स्वत:चे बहूमत आणु शकले असते. इतकी त्यांची व्यक्तीगत लोकप्रियता दिल्लीत होती. त्यामुळे त्यांच्याच बहूमताला मोदींनी अपशकून केला, असे म्हणता येईल. मात्र आता केजरीवाल दिल्लीच्या यशावर स्वार होऊन देशाच्या अन्य भागात जाणार असतील; तर तिथे त्यांना कुठला मतदार मिळू शकतो, त्याचे चित्र दिल्लीने स्पष्टपणे समोर आणलेले आहे. दिल्लीत कॉग्रेसवर नाराज असलेला मतदार संपुर्णपणे केजरीवाल यांच्या वाट्याला आला. कारण भाजपा तिथल्या आंदोलनात मागे होता. देशाच्या अन्य भागात तशी स्थिती नाही. देशाच्या अन्य राज्यात कॉग्रेस विरोधी रोषाचे नेतृत्व भाजपाने समर्थपणे केलेले आहे. त्यामुळेच कॉग्रेसच्या विरुद्ध जाणारी मते पर्याय म्हणून भाजपा म्हणजे मोदींनाच मिळणार आहेत. मग केजरीवाल कुठली मते मिळवू शकतात?

 केजरीवाल हे कॉग्रेस इतकाच भाजपाला पर्याय म्हणून पुढे आलेले आहेत आणि त्यांनी जनमानसातील आपला तोच चेहरा जपण्याचा आटापिटा चालविला आहे. त्यामुळे अशी जी मते आहेत तीच त्यांच्या ‘आप’ पक्षाला मिळू शकतात. अशी भरपूर मते आपल्या देशाच्या विविध राज्यात आहेत, ज्यांचा तिसर्‍या आघाडीवाल्यांनी मोठाच भ्रमनिरास केलेला आहे. लालू, पासवान. नितीशकुमार, मायावती, मुलायम, देवेगौडा, डावे पक्ष, तेलगू देसम, अनेक प्रादेशिक पक्ष यांनी नेहमी कॉग्रेस विरोधी निवडणूका लढवल्या. पण प्रत्यक्षात त्यांनी आपला कॉग्रेस विरोध जपला नाही. सेक्युलर नाटक करून कसोटीच्या क्षणी त्यांनी कॉग्रेसच्या पारड्यात वजन टाकून आपल्या पाठीराख्या मतदाराचा विश्वासघात केलेला आहे. त्या मतदाराला त्यांनी त्यासाठी कधी विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळेच तो मतदार अशा कॉग्रेस व भाजपा विरोधी खर्‍या पर्यायाच्या शोधात कायम राहिला आहे. केजरीवाल यांचे सध्या तरी तेच लक्ष्य आहे. त्यामुळेच त्यांनी दिल्लीत सत्ता हाती घेताना कॉग्रेसचा उघड पाठींबा घेतला नाही किंवा तिच्याशी बोलणीही केलेली नाहीत. उलट पाठींबा दिला असतानाही कॉग्रेसवर विषारी टिका चालविली आहे. त्यामुळे त्यांचे खरे लक्ष त्याच तिसर्‍या आघाडी वा तिसर्‍या शक्तीची मते आपल्या खात्यात ओढण्याकडे आहे. जे त्यांनी दिल्लीत मायावतींचा बसपा संपवून साधले आहे. अशा पक्ष वा नेत्याच्या विजयाने मोदींचा रथ रोखला गेला, म्हणून तेच पक्ष खुश असतील; तर मोदींनी अस्वस्थ होण्याचे कारण काय? नेपोलीयन म्हणतो, ‘तुमचा शत्रू आत्महत्या करीत असेल तर त्यात हस्तक्षेप करू नका’. मोदी नेमके त्याचे पालन करीत आहेत. केजरीवाल यांना प्रोत्साहन देणार्‍या सेक्युलर पक्षांवर किंवा केजरीवाल यांनी भाजपावर केलेल्या टिकेची, म्हणूनच मोदी दखलही घेत नाहीत. कारण २०१४च्या लढाईत मोदींसाठी आम आदमी पक्ष ही ‘आप’त्ती नसून इष्टापत्तीच ठरणार आहे. जे सेक्युलर पक्ष उद्या कॉग्रेसच्या गोटात हमखास जाण्याची शक्यता होती, त्याची मते व जागा कमी होऊन मतविभागणीचा लाभ भाजपाला मिळू शकतो आणि पर्यायाने कॉग्रेसच्या युपीएची दुर्बळता त्यामुळे वाढणार आहे, त्याची चिंता मोदींनी कशाला करावी? उलट त्यामुळे एकट्या भाजपालाच थेट बहूमताचा पल्ला गाठायला केजरीवाल मोठा हातभार लावणार आहेत. २०१४ च्या मध्यास हा भारतीय राजकारणात घडणारा सर्वात मोठा चमत्कार असणार आहे. केजरीवाल हा ज्या बुडत्यांना काडीचा आधार वाटतो आहे, ती काडी बुडणार नाही. पण तिच्या आशेवर असलेल्यांना मात्र तीच काडी आगामी लोकसभा निवडणूकीत अलगद बुडवणार आहे.



शनिवार, २८ डिसेंबर, २०१३

कान उघडा ऐका नीट


  शनिवारी अखेरीस दिल्लीला ‘आप’ले सरकार मिळाले. अण्णांच्या लोकपाल आंदोलनातून उदयास आलेल्या अरविंद केजरीवाल व अन्य तरूण नेत्यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पार्टी या पक्षाने अवघ्या सव्वा वर्षात लोकात मिसळू्न काम केले आणि दुसर्‍या क्रमांकाची मते व जागा मिळवून सत्ताही काबीज केली. अर्थात त्यांच्या हाती आलेली सत्ता निर्विवाद नाही. कारण त्यांना बहूमत मिळालेले नाही आणि पहिल्या क्रमांकावरच्या भाजपालाही बहुमत हुकलेले आहे. पण परिस्थितीने केजरीवाल यांना पाठींबा द्यायची नामुष्की कॉग्रेस पक्षावर आली. परिणामी पाठींबा न घेताच केजरीवाल यांनी अल्पमताचे सरकार स्थापन केलेले आहे. मात्र संख्येसाठी त्यांनी कॉग्रेसवर दुगाण्या झाडायचे थांबवलेले नाही किंवा सरकार टिकवण्यासाठी आटापिटा चालविलेला नाही. सहाजिकच अनेक सेक्युलर विचारवंतांना आता केजरीवाल यांच्यात मोदी लाटेवर मात करू शकणारा महान पराक्रमी योद्धा दिसू लागला आहे. परिणामी त्याच केजरीवालाचे अतोनात कौतुक सुरू झाले आहे. शपथविधीनंतर सर्वच वाहिन्यांवर ‘आप’क्रांतीचे कौतुक दुथडी भरून वहात होते. त्यापासून मराठी वाहिन्यांना अलिप्त कसे रहाता येईल? त्यांनीही त्या वहात्या यमुनेत आपापल्या वाहिन्या धुवून पवित्र करून घेण्याची संधी साधली. पण चर्चा कुठलीही असली तरी पॅनेलचे कलाकार नेहमीचेच यशस्वी. त्यापैकी एबीपी माझा नावाच्या वाहिनीकडे बघताना नेहमी लोकांचे कान बंद असतात आणि डोळेही झाकलेले असतात. सहाजिकच तिथे काय होते, दाखवले जाते, बोलले जा्ते त्याचा ऐकणार्‍यांना थांगपत्ता नसतो. आयोजनच असे असल्यावर वाहिनीवर बोलणार्‍या व ते प्रक्षेपित करणार्‍यांना तरी त्यातले काही समजण्याचा संबंध कशाला येईल? त्यामुळेच मग अधूनमधून कोणीतरी संपादक राजीव खांडेकर व ‘नांगर’ प्रसन्ना जोशींना ‘उघडा कान एका नीट’ असे ओरडून सांगावे लागत असते. कारण त्यांच्या चर्चा बघण्यासाठी योजतात व ऐकायच्या नसतात, असेच वाटते. तसे नसते तर शनिवारी केजरीवालांच्या आरत्या ओवाळताना त्या दोघांनी आपल्या चर्चेत आमंत्रित केलेल्या डॉ. कुमार सप्तर्षी व प्रताप आसबे यांनी आजवर केजरीवालांच्या संघर्षाबद्दल जी मुक्ताफ़ळे उधळली होती; त्याचा निदान जाब तरी विचारला असता. नेमक्या दोन वर्षापुर्वी आम आदमी पक्षाची स्थापना झालेली नव्हती आणि केजरीवाल अण्णांच्या सोबत लोकपालचे आंदोलन चालवित होते, तेव्हा याच सेक्युलर ॠषीमुनींनी कोणती भाकिते केली होती?

   आज सप्तर्षी व आसबे यांना केजरीवाल व त्यांची सहकारी मंडळी मोदींची रथयात्रा कशी अडवणार, त्याचे कौतुक आहे आणि त्यामध्ये त्यांना १९७७च्या आणिबाणी विरोधात उठलेल्या वादळाची आठवण झालेली आहे. पण जेव्हा याच राजकारणाचा पाया केजरीवाल घालत होते, तेव्हा त्यांच्यावर हीच मंडळी काय काय आरोप करीत होती?  बरोबर दोन वर्षापुर्वी म्हणजे २०१२ च्या जानेवारी महिन्याच्या ‘सत्याग्रही विचारधारा’ नामक आपल्या मासिकात लिहिलेल्या संपादकीय लेखात समाजवादी विचारवंत ( त्यात कुमारचा काही दोष नाही. समाजवाद्यांमध्ये जो माणूस कामाचा राहिला नाही व अडगळीत फ़ेकून दिलेला असतो, त्याला ज्येष्ठ विचारवंत म्हणायची प्रथा परंपरा आहे. हल्ली भाजपाही त्याच परंपरेत जाऊन अडवाणींना ‘मार्गदर्शक’ म्हणत असतो) डॉ. कुमार सप्तर्षी काय म्हणत होते? आज ‘लोकपाल’ केजरीवाल आम आदमी पक्षाच्या माध्यमातून मोदींना अडचण होणार म्हणूनच सुखावलेले सप्तर्षी, दोन वर्षापुर्वी कोणती भिती व्यक्त करत होते? त्यांच्याच नेमक्या शब्दात बघा.....

 भाजप, व्यापारी व अण्णाः

   भाजप सातत्याने काहीतरी खुसपट काढून संसदेतून बाहेर निघून जातो. सतत सभात्याग करणे म्हणजे संसदेवर थुंकण्यासारखे आहे. संसदेविषयी इतकी तुच्छता यापूर्वी देशात कधीही दिसली नव्हती. ‘सत्तेवर आम्ही येवू शकलो नाही, तर आम्ही संसदीय लोकशाहीचा डावच मोडून टाकू‘ असा पण भाजपने केलेला दिसतो. विरोधी पक्षाने सरकारच्या चुकीच्या धोरणांना अवश्य विरोध करावा, ते त्यांचे कर्तव्यच आहे; पण संसदेमधील कामकाजात सतत अडथळे आणणे हे त्यांना शोभत नाही. अण्णांचे आंदोलन, किरकोळ व्यापारात परकीय गुंतवणूक करायला झालेला बनियांचा जबर विरोध आणि भाजपने संसदेला तमाशा बनवून टाकणे या तिन्ही बाबींमध्ये काहीतरी आंतरिक धागा आहे असा आम्हाला रास्त संशय येऊ लागला.

   भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाची तुतारी फुंकून हा योग्य विषय अण्णांनी हाती घेतला होता. त्यामुळे प्रारंभीच्या काळात आमचा त्यांच्या उद्दिष्टांना पाठिंबा होता. फक्त अण्णांच्या कार्यपध्दतीमध्ये सुधारणा झाली पाहिजे असे वाटत असे. ते मी वाहिन्यांवर जेव्हा संधी मिळेल तेव्हा बोलून दाखवत असे. उदा. ‘‘अण्णा, आपण सत्याग्रही आहोत. आपण कुणाशी वैरत्व राखू नये. आपल्या मनात क्रोध नसावा‘’ वगैरे गोष्टी बोललो. सत्याग्रही पध्दतीच्या जनआंदोलनात फक्त ‘प्रतिपक्षी’ असतो; वैरी कधीच नसतो हे सांगितले. सत्याग्रही जनआंदोलनात वैराला स्थान नाही ही आमची पक्की धारणा आहे. आयुष्यभर अनेक जनआंदोलने केल्यामुळे, तो अनुभव गाठीशी असल्यामुळे कोणत्याही जनआंदोलनाच्या नेत्याच्या वाणी व कृतीमधून जे व्यक्त होते, त्यावरून ते सत्याग्रही आंदोलन यशस्वी होणार की नाही; याचा अंदाज आम्हाला येतो. अण्णा हजारे यांच्या आंदोलनात मला काही दोष दिसू लागले. म्हणून मी जाहीररीत्या, हळुवारपणे काही सूचना केल्या. कशाचाही उपयोग झाला नाही. अण्णांच्या डोक्यातील भ्रमाचा फुगा हवेत उंच जाऊ लागला. अखेरीस आमची खात्री झाली की अण्णांना भ्रष्टाचार मुक्तीसाठी लोकपाल नकोय, तर कॉंग्रेसविरोधी जनमत तयार करण्याकरिता लोकपाल हे निमित्त त्यांना वापरायचे आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात काम करण्याचा प्रत्येकाला मुलभूत हक्क आहे. याबद्दल आमच्या मनात दुमत नाही. तथापि ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा प्रकार सत्याग्रही चारित्र्यात बसत नाही. नंतर एकेक गोष्टी उलगडू लागल्या.

   अण्णा-टीम प्रत्येक वेळी सरकारविषयी द्वेष पसरविण्याच्या हेतूने बोलणी फिसकटवित आहेत, हे लक्षात आले. अण्णा कॉंग्रेस पक्षावर व त्यांच्या नेत्यांवर खालच्या पातळीवरील टीका करून आपली प्रतिष्ठा कमी करून घेऊ लागले. कधी पंतप्रधानांवर टीकेचा आसूड ओढ, तर राहुल गांधींना शिव्या दे, तर कधी सोनिया गांधींना दूषण दे असा प्रकार त्यांनी सुरू केला. अण्णांजवळ वैचारिक श्रीमंती नसल्याने थोड्याच वेळात त्यांचे विचार संपतात. मग ते पुनरूक्ती करीत राहतात किंवा मूळ प्रकृतीनुसार एकेरीवर उतरतात. हे मला फार पूर्वीपासून ठाऊक होते. वयोमानानुसार त्यांच्यामध्ये मानसिक शांती आली असेल असा माझा उगाचच समज होता. भाजप केवळ परिस्थितीचा लाभ उठवित आहे. अण्णा नावाचे अस्त्र कॉंग्रेसवर फेकणे एवढाच त्यांचा हेतू दिसतो. त्यांना अँटीकॉंग्रेसिझम नावाच्या तत्त्वज्ञानाचे आदर्श (आयकॉन) म्हणून अण्णांचा हुतात्मा करावयाचा आहे, त्यांनतर अण्णांची जागोजागी देवळे बांधायची आणि तिथून हिंदूराष्ट्राचा प्रसाद वाटायचा हा भाजपचा डावपेच लक्षात येऊ लागला. अण्णांमध्ये ग्रामीण शहाणपण ओतप्रोत भरले आहे. त्यामुळे ते भाजपच्या अखेरच्या डावाला कधीच बळी पडणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. तथापि पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये अण्णांचा कॉंग्रेस विरोधासाठी मुक्त वापर करायचा भाजपचा डाव यशस्वी होत आहे हे लक्षात आले. अण्णांचे दोन दोष भाजपने नेमके हेरले आहेत. अण्णांच्या मनाची कवाडे त्यांच्या पायावर डोके ठेवले तरच खुली होतात, हा पहिला दोष. कॅमेरा पाहिला की अण्णा कितीही भडक विधान करू शकतात हा दुसरा दोष या दोन दोन दोषांवर भाजपचा खेळ उभा आहे.

   दोन वर्षापुर्वी या सेक्युलर समाजवादी डॉक्टरांचे निदान होते, की अण्णाटीमचे केजरीवाल हे भाजपाचे एजंट वा हस्तक आहेत आणि म्हणूनच त्यांच्यापासून भारताच्या संविधानाला व घटनात्मक राजकीय व्यवस्थेला धोका निर्माण झालेला आहे. आज दोन वर्षे पुर्ण होत असताना तेच डॉक्टर छातीठोकपणे देशाला भाजपाच्या जातीयवादाला मोदीप्रणीत भाजपाच्या जातियवादापासून वाचण्याचा ‘रामबाण’ उपाय म्हणून केजरीवालांची जडीबुट्टी उपयुक्त असल्याची ग्वाही देत आहेत. ह्याला समाजवाद्यांची सेक्युलर शोकांतिका म्हणायचे की दिवाळखोरी, हे ज्याचे त्याने ठरवावे. अर्थात सामान्य जनतेला अशा निर्बुद्धांच्या विद्वत्तेशी कधीच कर्तव्य नसते. सामान्य माणूस व्यवहारी जीवन जगत असतो आणि अनुभवाने आपले तत्वज्ञान निर्माण करीत असतो, वापरत असतो. विचारवंतांना मग सामान्य माणसाच्या कृतीशी आपले फ़सले्ले तत्त्वज्ञान जुळवून घ्यावे लागत असते. कारण आपण शहाणे आहोत व मुर्ख नाही; हेच बुद्धीमंतांना सतत सिद्ध करण्याची खाज असते. परिणामी लोकांच्या दुर्बळ स्मरणशक्तीचा लाभ उठवून हे बुद्धीमंत, आपलीच थुंकी गिळत असतात किंवा या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचा जादूटोणा करून आपल्या बुद्धीमत्तेचे प्रमाणपत्र पुन्हापुन्हा स्वत:लाच देत असतात. म्हणूनच शनिवारी आसबे, खांडेकर, सप्तर्षी यांच्या चर्चेची कींव करावीशी वाटली.

   दीड दोन वर्षापुर्वी आपापल्या लेखातून व वाहिन्यांच्या चर्चेतून हीच मंडळी किमान डझनभर वेळा तरी ‘अण्णा टिमची विश्वासार्हता घसरते आहे’ अशा विषयावर सांगोपांग चर्चा करून केजरीवाल व अण्णांच्या लोकपाल आंदोलनावर दुगाण्य़ा झाडत होती. जोपर्यंत केजरीवाल यांनी दिल्लीत सातत्याने चालविलेल्या लढे व आंदोलनातून तिथल्या निवडणुकीत यश मिळवून दाखवले नव्हते, तोपर्यंत यांना केजरीवालची महत्ता कळली नव्हती. आणि आजही कळलेली नाही. त्यामुळेच आपली आधीची फ़सलेली विधाने व निदाने झाकण्यासाठी आता त्याच दिल्लीपुरत्या केजरीवालांचे देशव्यापी चित्र रंगवण्याचा अतिरेक त्यांच्याकडून चाललेला आहे. केजरीवाल व ‘आप’चा देशाभरचा प्रभाव यांना आज दिसत असेल व जाणवत असेल; तर मग त्यांनाच गेल्या दोन वर्षात केजरीवाल यांच्या दिल्लीत वाढत गेलेल्या प्रभावाचा थांगपत्ता कशाला लागला नव्हता? त्यांनी सत्तेवर येण्याची गोष्ट सोडून द्या. पण दिल्लीतला केजरीवाल यांचा लढा जनतेचा लढा आहे, एवढेही या विद्वानांच्या लक्षात कशाला आलेले नव्हते? अण्णा वा केजरीवाल यांच्या विश्वासार्हतेवर हे शहाणे प्रश्नचिन्ह कशाला लावत होते? कारण अशा विद्वानांना कशातलेच काही कळत नसते आणि जनभावनेशी त्यांचा काडीमात्र संबंध नसतो. हाती प्रसार माध्यमे व साधने आहेत म्हणून रेटून व सातत्याने बिनबुडाचे खोटे बोलायचे आणि उलटले मग आपण त्या गावचेच नाही, असला शहाजोगपणा करण्याची आत्मसात केलेली कला, हेच त्याच्या विद्वत्तेचे एकमेव व्यवच्छेदक लक्षण मानता येईल.

(ज्यांना डॉ. सप्तर्षी यांच्या त्या प्रदिर्घ लेखाचे तेव्हाच मी केलेले पोस्टमार्टेम तपासण्याचे अगत्य असेल, त्यांनी मार्चे-एप्रिल २०१२ काळात माझ्या उलटतपासणी ब्लॉगवरील अर्धा डझन लेख बघावेत)
http://bhautorsekar.blogspot.in/

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१३

केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला ‘शुभेच्छा’



  नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणूकीत चारपैकी तीन विधानसभा निवडणूकीत भाजपाने मोठेच यश मिळवले, हे आकड्यातुनच आपण बघू शकतो. त्यापैकी सर्वात छोटे व एका महानगरापुरते मर्यादित राज्य असलेल्या राजधानी दिल्लीच्या विधानसभेत भाजपाचे बहूमत थोडक्यात हुकले. या सर्वच राज्यांमध्ये प्रचारासाठी भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला होता आणि आक्रमक प्रचार केला होता. तेव्हा मोदी भाजपाला कितपत यश मिळवून देतील, याची चर्चा चालली होती. प्रत्येक वाहिनी व माध्यमातून मोदींमुळे कदाचित तिथे भाजपाला अपयश मिळण्याची भाकितेही केली जात होती. पण चारपैकी तीन राज्यात भाजपाने नेत्रदीपक यश मिळवल्यानंतर श्रेयाची वेळ आल्यावर मात्र कुणालाच मोदी आठवलेला नाही. उलट यात मोदींचा करिष्मा नसून भाजपाचे स्थानिक नेते वा मुख्यमंत्री कसे प्रभावी होते; त्याचे विश्लेषण व कारणे शोधण्यात तमाम माध्यमे गर्क झाली. उलट दिल्लीत भाजपाचे बहूमत थोडक्यात हुकले, तर त्याचे खापर मात्र मोदींच्या माथ्यावर फ़ोडण्यासाठी पत्रकारांमध्ये शर्यत सुरू आहे. तेवढेच नाही, तर भाजपापेक्षाही कमी यश मिळवलेल्या नवख्या आम आदमी पक्ष व त्याचे नेते संस्थापक अरविंद केजरीवाल, यांचे कौतुक करताना अन्य तीन राज्यात भाजपाने प्रचंड यश मिळवल्याचे कोणालाही आठवेनासे झाले आहे. खरे तर त्याबद्दल तक्रार करण्याची गरज नाही. गेल्या दोन दशकात सेक्युलर पत्रकारीतेचा अनुभव घेणार्‍या लोकांना आता असल्या विश्लेषणाची व बातम्या चर्चेची सवय अंगवळणी पडलेली आहे. तेव्हा केजरीवाल यांचे अवास्तव कौतुक चालले आहे, असे मी अजिबात म्हणणार नाही. केजरीवाल हे आगामी लोकसभा निवडणूकीत मोदींना कसे झोपवतील, तेही ऐकायला मोठी मजा येते आहे. अवघ्या काही दिवसात केजरीवाल यांना घाबरून युरोप अमेरिकेतील भलेबुरे पक्षही तिथे केजरीवाल यांना वचकू लागल्याच्या बातम्या कानावर आल्या; तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. उलट एक मोदी समर्थक म्हणून मला तेच ऐकायला आवडते आहे. कारण अशा स्वप्नरंजनानेच मोदी यांना लढण्याची हिंमत मिळते आणि ते अधिक त्वेषाने कामाला लागतात, असा इतिहास आहे. त्यामुळेच मोदींच्या पराभवाचे असे माध्यमातील स्वप्नरंजन त्यांच्या यशासाठी अत्यावश्यक आहे, असे माझे अनुभवी मत आहे.

   माझे अनुभवी मत म्हणजे काय? तसे गेल्या दहा बारा वर्षातले असे अनुभव खुप आहेत. पण त्यातल्या त्यात अलिकडचा म्हणजे अवघ्या अकरा महिन्यापुर्वीचा एक अनुभव इथे पुराव्यासहित मांडतो. मोदींच्या विरोधातली कुठलीही खोटीनाटी वा नगण्य माहिती हाती लागली वा तशी नुसती आशा दिसली, तरी आपले सेक्युलर पत्रकार व माध्यमे किती भारावून वहावत जातात, ते वेगळे सांगायला नको. याच वर्षाच्या आरंभी १४ जानेवारी रोजी राजस्थानची राजधानी जयपूर येथे कॉग्रेस पक्षाचे चिंतन शिबीर झालेले होते. तिथे अधिकृतरित्या पक्षाची अधिकारसुत्रे मातेकडून पुत्राला सोपवण्याचा सोहळा पार पडला होता. त्याच चिंतन शिबीरात नवे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे भगव्या दहशतवादाचा आरोप करून तोंडघशी पडले होते, हे अनेकांना आठवत असेल. तिथेच राहुल गांधी यांनी आपले मन मोकळे करताना आपला कौटुबिक वारसा सांगण्यापासून भावनेला हात घालणारे प्रदिर्घ भाषण करून दाखवले होते. अर्थात तेही त्यांनी लिहून आणलेले वा कोणाकडून लिहून घेतलेले व वाचून दाखवलेले होते. पण त्या भाषणाने सभोवती जमलेले कार्यकर्ते व निष्ठावान कॉग्रेसजन भारावून गेलेले होते. बहुतेकांचे डोळे पाणावलेले होते. व्यासपिठावर बसलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासहीत बहुतेक ज्येष्ठ कॉग्रेस नेत्यांनी उभे राहून नव्या उपाध्यक्ष युवराजाना सलामी दिली होती. मुजरा नाही, तरी गळाभेट करून आपल्या निष्ठांचे जाहिर प्रदर्शन केलेले होते. ज्यांना गळाभेट करण्याइतके जवळपास फ़िरकता येत नाही, त्यांनी डोळे ओले करून आपल्या निष्ठा व्यक्त केल्या होत्या. त्यात केवळ घराण्याला निष्ठा वाहिलेले कॉग्रेसजन होते असे मानायचे कारण नाही. तितक्याच संख्येने तमाम सेक्युलर पत्रकार माध्यमेही भारावून गेलेली होती. त्या एका ‘वाचलेल्या’ भावनापुर्ण भाषणामुळे आता देशातली कॉग्रेसची सत्ताच नव्हे, तर मोदींनी बुडवू घातलेला सेक्युलॅरिझमही बुडताबुडता ‘वाचवला’ जाणार होता. यामुळे बहुतांश माध्यमे निश्चिंत होऊन गेली होती. आणि आपला जीव भांड्यात पडल्याचे जाहिरपणे सांगण्याची आपल्याला ‘लाज’ वाटत नाही अशी जाहिरात करायचीही त्यांना लाज वाटलेली नव्हती. यालाच भारावून जाणे म्हणतात. आणि एकदा भारावून गेले, मग सारासार बुद्धीला तिलांजली दिली जात असते. अशी बुद्धीला तिलांजली देणारे केवळ तिथे जमा झालेले कॉग्रेसजनच नव्हते. म्हणूनच आज अकरा महिन्यानंतर कोणी तेव्हा भारावलेल्या कॉग्रेसजनांना राहुलच्या अपयशासाठी जाब विचारणार असेल, त्याने आधी आपल्याही तशाच भारवण्याचा आधी जबाब दिला पाहिजे. कारण राहुलच्या व पर्यायाने कॉग्रेसच्या अशा दिवाळखोरीला तसे भारावणारे कॉग्रेस नेते जबाबदार असतील, तर तितकेच त्यांना अंधारात ठेवताना आपली बुद्धी गहाण टाकणारे पत्रकार व सेक्युलर बुद्धीमंतही त्या अपयशाचे भागिदार आहेत. त्यांनाही आजच्या कॉग्रेसी अपयशाची जबाबदारी उचलावीच लागेल.

   तुमच्यापैकी कोणी कायबीईन लोकमतची थोरली भगिनी सीएनएन कायबीईन बघत असेल तर त्यावरच्या दोन महान सेक्युलर महिला पल्लवी घोष व सागरिका घोष तुम्हाला नक्कीच ठाऊक असतील. या दोघी गेला आठवडाभर आपल्या वाहिनीवरून कुठल्याही कॉग्रेस नेत्याला राहुलच्या अपयशाची कारणे विचारत आहेत. त्याचवेळी राहुलच्या अपात्रतेचा जाब विचारत आहेत. तशीच एनडीटीव्हीची बरखा दत्त तेच करते आहे. पण अकरा महिन्यांपुर्वी या तिघीजणी काय अकलेचे तारे तोडत होत्या? आज कोणाला त्याची आठवण तरी आहे काय? आपापल्या वाहिन्यांवर राहुलच्या महान भाषणाचे गोडवे गावून झाल्यावरही त्यांच्या तोंडातली लाळ संपलेली नव्हती, म्हणून त्यांनी ती फ़ेसबुक आणि ट्विटरवर सांडून ठेवलेली होती. त्या लाळघोटेपणाचे अकरा महिन्यात सुककेले सांडगे कोणाला बघायचे असतील, तर त्यांनी याच लेखात टाकलेले त्याचे चित्ररूप बघा्वे आणि वाचावे.

   पल्लवी घोष: ‘राहुलचे हेलावून सोडणारे भाषण, विशेषत: त्याचा शेवटचा भाग अप्रतिम, हे कबूल करायची मला लाज वाटत नाही.’
   पल्लवी घोष: ‘(श्रीराम कॉलेजमधील) मोदींचे भाषण खुप राजकीय होते, (विद्यार्थ्यांसमोर) अशा भाषणासाठी ही जागा योग्य होती काय असा प्रश्न पडतो.’

   सागरिका घोष: ‘राहुलचे आजचे भाषण आजवरचे सर्वात उत्तम. व्यवस्था परिवर्तन, समावेशकता, त्याचा आवाज व त्यातील भावनिक स्पर्श छान. त्यामागे जयराम रमेश असतील का?’
   सागरिका घोष:  ‘श्रीराम कॉलेजमध्ये आपण मोदींना कापूस, मीठ, केळी, आयुर्वेद, शिक्षक यावर बोलताना ऐकले. पण देशासमोरच्या आव्हानांना सामोरे जाण्याविषयीच्या त्यांच्या कल्पना काय आहेत?’

   बरखा दत्त: ‘राहुल गांधींच्या भाषणातील भावनात्मक भाग मनाला खुप भावला. विशेषत सत्ता हे जहर असल्याचा संदर्भ हृदयस्पर्शी होता’
   बरखा दत्त: ‘श्रीराम कॉलेजातील मोदींचे भाषण म्हणजे त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केल्याची तुतारीच होती. प्रश्न इतकाच, की त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित करायला भाजपा इतका कशाला कचरतो आहे?

   आपणच अकरा महिन्यांपुर्वी उधळलेली मुक्ताफ़ळे किंवा गाळलेली लाळ या तीन विदुषींना आज आठवते तरी आहे काय? पण अशा लाळेचा पुर आणणार्‍यांनी बिचार्‍या राहुल गांधींना पुरते नाकातोंडात पाणी जाऊन बुडवले आहे. असल्या लाळघोट्यांच्या नादाला न लागता चौकात उभे राहून बोंबलणार्‍या केजरीवालांचे कान देऊन ऐकावे; असे राहुलना वाटू लागले आहे. आणि या विदूषी वा त्यांच्याप्रमाणेच अकरा महिन्यापुर्वी चाटूगिरी करण्यात गर्क असलेल्यांना आता राहुलकडे बघायचीही गरज वाटेनाशी झाली आहे. त्यांनी बुडवण्यासाठी नवी शिकार शोधली आहे. अकरा महिन्यापुर्वी जितके अवास्तव कौतुक, लाळघोटेगिरी राहुलच्या बाबतीत चालू होती, त्याहीपेक्षा अधिक आज केजरीवाल यांच्या बाबतीत चालू आहे. त्यामुळे अशा सेक्युलर माध्यमांचे व त्यातल्या पत्रकारांचे पुढले सावज, लक्ष्य कोण असणार आहे, ते वेगळे सांगायला हवे काय? त्यांनी असली चाटुकारी केली नसती, तर नुकत्याच संपलेल्या विधानसभांच्या प्रचारार राहुलने ‘मेरी दादीको मारा, मेरे पापाको मारा’ असली मुक्ताफ़ळे कशा उधळली असती? राहुलही जनसामान्यांना भेडसावणार्‍या समस्यांवर व त्याचे उपाय सांगण्याविषयीच बोलले असते आणि त्यांच्या पक्षाला निदान काही प्रमाणात जास्त जागा मिळू शकल्या असत्या. पण अशा चाटूकार भारावणार्‍या भाटांनी आजवर मोठमोठ्या सम्राटांना बघता बघता बुडवले आहे. तिथे राहुल गांधींची काय कथा? अशा परोपजिवी बांडगुळांना फ़स्त करण्यासाठी कुठले तरी एक सशक्त झाड आवश्यक असते. त्यामुळेच त्यांनी आता केजरीवाल यांच्यासह त्यांच्या आम आदमी पक्षाला हरभर्‍याच्या झाडावर चढवले, तर त्यांचे काहीच नुकसान होणार नाही. त्याचप्रमाणे त्यांनी मोदींचे दिल्ली वा इतरत्रचे लोकांच्या मनाला जाऊन भिडणारे भाषण नाकारण्याने वा त्याचे परिणाम झाकून ठेवल्याने चार विधानसभा निवडणूकीच्या निकालावर परिणाम झाला नाही. आताही तीन राज्यातले मोदींचे यश व मतदाना्वर पडलेला प्रभाव झाकून ठेवल्याने येत्या लोकसभा निवडणूकी्त मोदींचे कुठलेही नुकसान होण्याची अजिबात शक्यता नाही. चिंताच करायची असेल, तर अशी मंडळी आज ज्यांचे तोंड फ़ाटेस्तोवर कौतुक करीत आहेत, त्यांनी करावे. दिल्लीच्या निकालांनी भारावलेल्यांच्या गदारोळात केजरिवाल मग्न झालेले दिसतात आणि पुढल्या गर्जनाही करू लागले आहेत. त्यांना शुभेच्छा.