रविवार, २९ डिसेंबर, २०१३

मोदींसाठी ‘आप’त्ती, की इष्टापत्ती?

==================================================
दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल (कंसात जिंकलेल्या जागा)
२००८:  कॉग्रेस ४०.३१% (४३), भाजपा ३६.३४% (२३), बसपा १४.०५ %(२),   
२०१३:  कॉग्रेस २५% (८),     भाजपा ३४% (३२),   आप ३०% (२८) 
==================================================


   नुकत्याच चार महत्वाच्या विधानसभा निवडणूका झाल्या आणि त्याचे निकालही आलेले आहेत. त्यात सर्वत्र कॉग्रेसचा सफ़ाया झाला आणि तीन राज्यात भाजपाने जबरदस्त मुसंडी मारलेली आहे. मात्र त्याचे प्रतिबिंब दिल्ली या शहरी राज्यात पडू शकले नाही. तरीही तिथे पहिल्या क्रमांकाच्या जागा व मते मिळवण्यापर्यंत भाजपाने मजल मारलेली आहे. येत्या म्हणजे २०१४ सालाच्या पुर्वार्धात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूकीची ही उपांत्य फ़ेरी असे वारंवार संबोधले जात होते. त्यामुळेच त्यात भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी अपुर्व मेहनत घेतली. त्याचा परिणाम तिथल्या मतदानाच्या टक्केवारीवर झालेला दिसला. राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यात पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक मतदानाचे विक्रम साजरे झाले आणि त्याच लाटेत कॉग्रेस पुरती वाहून गेली. दिल्लीतही कमी प्रमाणात, पण मतदानात वाढ झाली. ह्या मतदारांच्या उत्साहाचे कारण एका बाजूला नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेला आशावाद आहे; तसेच दुसरीकडे कॉग्रेसविषयी निर्माण झालेली कमालीची नाराजी आहे. हे उघड व स्पष्ट असताना मोदींच्या लोकप्रियतेची लाट नाकारण्यात धन्यता मानण्य़ाचा अट्टाहास माध्यमांपासून सेक्युलर अभ्यासकांपर्यंत पुर्वीसारखाच चालू आहे. आपले अंदाज व भाकिते साफ़ फ़सल्यावर याच लोकांनी मग बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, त्याप्रमाणे दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांनी नवखा असून मिळवलेल्या यशाचे देव्हारे माजवण्यात पुढाकार घेतला तर नवल नाही. त्यातला दुटप्पीपण लपूनही रहात नाही.

   एका बाजूला दिल्लीतल्या ‘आप’चे यश अनपेक्षित असेच आहे. पण ज्या कारणास्तव ते व तेवढे यश त्या पक्षाला मिळालेले आहे, त्याच निकषावर देशात मोदीही मोठे यश मिळवू शकतात, हे नाकारण्याचे तर्कट चालू आहे. दिल्लीत या पक्षाकडे पुर्वापार संघटनात्मक ढाचा नव्हता, की पुर्वपुण्याई नव्हती. तरीही त्या पक्षाकडे लोकप्रिय चेहर्‍याचा व जनमानसात आशेचा किरण जागवणारा नेता होता. केवळ तेवढ्याच बळावर त्याने इतके मोठे यश मिळवले आणि कॉग्रेसपेक्षा अधिक मते व जागा जिंकल्या. मग देशात आज जे मोदींच्या लोकप्रियतेचे वारे वहात आहेत; त्याचेच प्रतिबिंब तीन राज्यात पडून भाजपाला इतके मोठे यश मिळाले, हे निखळ सत्य आहे. किंबहूना त्याच निकषावर देशातल्या कॉग्रेसविरोधी प्रक्षोभाचे प्रतिक बनलेल्या मोदींना लोक पंतप्रधान करायला उतावळे झालेले आहेत. मग आजवर जिथे भाजपाचे संघटनात्मक बळ नव्हते; तिथेही त्या लाटेचा परिणाम दिसू शकतो. जो नियम संतप्त मतदार केजरीवाल यांना मते देण्यासाठी लावतो, त्याच निकषावर देशाच्या कानाकोपर्‍यातला मतदार भाजपाच्या संघटनात्मक बाजूची पर्वा न करता मोदींसाठी त्या पक्षाला बहूमत देऊ शकतो. कारण त्या मतदाराला मोदी जितके आवडतात व विश्वासार्ह वाटतात; त्यापेक्षाही कॉग्रेसच्या तावडीतून सुटायची घाई झालेली आहे. अशावेळी तो मतदार कॉग्रेसला नक्की पराभूत करणारा व पर्यायी सरकार देऊ शकेल, अशा नेत्याचा शोध मतदार घेत असतो. दिल्लीत भाजपाने असा नेता लोकांसमोर आणण्यात विलंब केला. त्यामुळे त्याचे बहूमत हुकले. देशाच्या पातळीवर तसे घडणे शक्य नाही. पण ज्यांना मोदी व भाजपाच्या नावाचेच वावडे आहे; त्यांना मोदी बहूमत मिळवून पंतप्रधान होऊ शकतात, हे मानायची सुद्धा भिती वाटते, त्यांना मग मोदींच्या अपयशासाठी नवनवे तर्क शोधावे लागणारच ना? त्यातूनच मग ही मंडळी केजरीवाल नावाच्या काडीला धरून आपले तर्क बुडणार नाहीत, अशी खुळी आशा बाळगत आहेत आणि त्यावर अतिशयोक्त युक्तीवादही करू लागली आहेत. वास्तवात केजरीवाल व त्यांच्या यशामुळे बदललेल्या राजकीय समिकरणाचे मांडले जाणारे युक्तीवाद, त्यांनाही पटलेले नाहीत. म्हणून तर वाहिन्यांवरल्या चर्चेतून भाजपाच्या गळी ते उतरवण्याचा उतावळेपणा सुरू झाला आहे. पण त्यातला फ़ोलपणा अजिबात लपत नाही.

   कुठलेही संघटन पाठीशी नसताना आम आदमी पक्षाला अनेक राज्यात अचानक जागा व यश मिळू शकतात. पण किमान चारशे मतदारसंघात भाजपाकडे लढण्याइतकी संघटना असूनही मोदींच्या लोकप्रियतेचा त्याला लाभ मिळू शकत नाही, हा कुठला युक्तीवाद आहे? पहिली गोष्ट म्हणजे दिल्लीतील ‘आप’च्या यशाचे नेमके विश्लेषण कोणीही केलेले नाही. बारकाईने बघितले, तर केजरीवाल यांच्या यशामागे जितके कॉग्रेसचे अपयश आहे; त्यापेक्षा अधिक नुकसान त्या पक्षाने मायावती यांच्या बसपाचे केले आहे. मागल्या निवडणूकीत तिसर्‍या क्रमांकाची मते व दोन आमदार असलेला बसपा, यावेळी पुरता नामशेष झालेला आहे. त्याची सर्वच मते ‘आप’ने खाल्लेली आहेत. कॉग्रेसचाही मोठा हिस्सा त्याने खाल्ला आहे. पण भाजपाच्या मताचा किंचित हिस्सा त्याला बळकावता आला. याचा अर्थच सरळ असा, की संसदेच्या निवडणूकीत ‘आप’वाले उतरले; तर ते कॉग्रेसची मते काही प्रमाणातखाऊ शकतील. पण भाजपाच्या विरोधात लढून कॉग्रेसच्या वळचणीला जाणार्‍या पक्षांचा सर्वाधिक लचका तोडणार आहेत. म्हणजे उत्तरप्रदेशात मायावती, मुलायम, बिहारमध्ये लालू, पास्वान, नितीश, तर कर्नाटकात देवेगौडा वा महाराष्ट्र व बंगालमध्ये डावे पक्ष आहेत; अशा सेक्युलर नाटके करणार्‍यांचे लचके ‘आप’ तोडणार आहे. त्या पक्षाच्या लोकसभा निवडणूकीत उतरण्याने भाजपाला मोठाच धक्का बसेल; असा दावा शुद्ध मुर्खपणाचा आहे. कारण दिल्लीतही त्याला तसे करता आलेले नाही. मग अन्य राज्यात तरी त्या पक्षाच्या मैदानात येण्याचा धोका भाजपाला कशाला असेल? तेच सत्य लपवण्यासाठी तथाकथित सेक्युलर पत्रकार, प्राध्यापक, विश्लेषकांनी दिल्लीच्या निकाल व आकडेवारीचे सत्यस्वरूप लपवण्याचा आटापिटा चालविला आहे. गेले पंधरा दिवस असे भासवले जात आहे, की केजरीवाल यांनी मोदींचा विजयरथ रोखला आहे. पण वास्तवात त्याच पक्षाने आपले बस्तान देशाच्या राजधानीत बसवताना (तिसर्‍या आघाडीत राहून कॉग्रेसशी चुंबाचुंबी करणार्‍या बहूजन समाज पक्षाला) मायावतींच्या सेक्युलर नाटकाला संपवले आहे. तेच हा पक्ष देशात जिथे जिथे निवडणूकीत उतरणार तिथे होणार आहे. त्यामुळेच भाजपा वा मोदींना रोखण्यासाठी सेक्युलरांनी केजरीवाल यांना घोड्यावर बसवले असेल; तर मोदींसारखा समाधानी माणुस दुसरा कोणी असू शकत नाही. कारण ‘आप’ सेक्युलर पक्ष व नेत्यांची मते खाऊन मोदींचे बहूमत मिळवण्याचे काम अधिक सोपे करणार आहे.

   २०१३ची अखेर मोदींच्या मोहिमेला प्रतिसाद देणारी झाली आहे आणि ज्याला गेले सहा महिने उपांत्य फ़ेरी संबोधले जात होते; ती मोदींनी जिंकली आहे. पण ते कबुल केल्यास मोदीच अंतिम फ़ेरी आगामी मे महिन्यात सहज जिंकतील, हेसुद्धा मान्य करावे लागेल. तेच टाळण्यासाठी मग तीन राज्यातील भाजपाच्या अपुर्व यशाला झाकायचे उद्योग सुरू झाले. त्यातूनच मग नवख्या ‘आप’ पक्षाच्या यशाचा डंका पिटला जात आहे. त्यामुळे मोदींचे काहीही बिघडत नाही. याच २०१३च्या आरंभी जयपूरमध्ये राहुल गांधी यांच्यासाठी कॉग्रेसमध्ये उपाध्यक्षपद निर्माण करून त्यांना पक्षाची धुरा तिथे सोपवण्यात आली. तेव्हा त्यांनी वाचून दाखवलेल्या भाषणाचे केजरीवाल यांच्याप्रमाणेच अतिशयोक्त कौतुक झाले होते. तेवढेच नाही तर राहुलच्या भाषणाच्या तुलनेत मोदींचे दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमधले भाषण फ़िके व अर्थहीन असल्याच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या. अकरा महिन्यानंतर ८ डिसेंबरला त्याचे परिणाम समोर आले. तसेच आजच्या केजरीवाल यांच्या कौतुकाचे परिणाम मे महिन्यात समोर येतील. ते काय असू शकतात, त्याचे उत्तर दिल्लीच्या निकालात दडलेले आहे. दिल्लीत केजरीवाल यांनी मोदींचा विजयरथ अडवलेला नाही किंवा त्यात किंचितही बाधा आणलेली नाही. तिथले केजरीवाल यांचे यश खरेतर मागल्या दोन वर्षात सातत्याने झालेल्या विविध आंदोलनांचा एकत्रित परिणाम आहे. त्यात मोदींचा अजिबात सहभाग नव्हता आणि स्थानिक भाजपा नेत्यांनी त्यात दाखवलेल्या उदासिनतेचा परिणाम होता. अखेरच्या क्षणी मोदींनी दिल्लीत जोर लावला नसता, तर केजरीवाल स्वत:चे बहूमत आणु शकले असते. इतकी त्यांची व्यक्तीगत लोकप्रियता दिल्लीत होती. त्यामुळे त्यांच्याच बहूमताला मोदींनी अपशकून केला, असे म्हणता येईल. मात्र आता केजरीवाल दिल्लीच्या यशावर स्वार होऊन देशाच्या अन्य भागात जाणार असतील; तर तिथे त्यांना कुठला मतदार मिळू शकतो, त्याचे चित्र दिल्लीने स्पष्टपणे समोर आणलेले आहे. दिल्लीत कॉग्रेसवर नाराज असलेला मतदार संपुर्णपणे केजरीवाल यांच्या वाट्याला आला. कारण भाजपा तिथल्या आंदोलनात मागे होता. देशाच्या अन्य भागात तशी स्थिती नाही. देशाच्या अन्य राज्यात कॉग्रेस विरोधी रोषाचे नेतृत्व भाजपाने समर्थपणे केलेले आहे. त्यामुळेच कॉग्रेसच्या विरुद्ध जाणारी मते पर्याय म्हणून भाजपा म्हणजे मोदींनाच मिळणार आहेत. मग केजरीवाल कुठली मते मिळवू शकतात?

 केजरीवाल हे कॉग्रेस इतकाच भाजपाला पर्याय म्हणून पुढे आलेले आहेत आणि त्यांनी जनमानसातील आपला तोच चेहरा जपण्याचा आटापिटा चालविला आहे. त्यामुळे अशी जी मते आहेत तीच त्यांच्या ‘आप’ पक्षाला मिळू शकतात. अशी भरपूर मते आपल्या देशाच्या विविध राज्यात आहेत, ज्यांचा तिसर्‍या आघाडीवाल्यांनी मोठाच भ्रमनिरास केलेला आहे. लालू, पासवान. नितीशकुमार, मायावती, मुलायम, देवेगौडा, डावे पक्ष, तेलगू देसम, अनेक प्रादेशिक पक्ष यांनी नेहमी कॉग्रेस विरोधी निवडणूका लढवल्या. पण प्रत्यक्षात त्यांनी आपला कॉग्रेस विरोध जपला नाही. सेक्युलर नाटक करून कसोटीच्या क्षणी त्यांनी कॉग्रेसच्या पारड्यात वजन टाकून आपल्या पाठीराख्या मतदाराचा विश्वासघात केलेला आहे. त्या मतदाराला त्यांनी त्यासाठी कधी विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळेच तो मतदार अशा कॉग्रेस व भाजपा विरोधी खर्‍या पर्यायाच्या शोधात कायम राहिला आहे. केजरीवाल यांचे सध्या तरी तेच लक्ष्य आहे. त्यामुळेच त्यांनी दिल्लीत सत्ता हाती घेताना कॉग्रेसचा उघड पाठींबा घेतला नाही किंवा तिच्याशी बोलणीही केलेली नाहीत. उलट पाठींबा दिला असतानाही कॉग्रेसवर विषारी टिका चालविली आहे. त्यामुळे त्यांचे खरे लक्ष त्याच तिसर्‍या आघाडी वा तिसर्‍या शक्तीची मते आपल्या खात्यात ओढण्याकडे आहे. जे त्यांनी दिल्लीत मायावतींचा बसपा संपवून साधले आहे. अशा पक्ष वा नेत्याच्या विजयाने मोदींचा रथ रोखला गेला, म्हणून तेच पक्ष खुश असतील; तर मोदींनी अस्वस्थ होण्याचे कारण काय? नेपोलीयन म्हणतो, ‘तुमचा शत्रू आत्महत्या करीत असेल तर त्यात हस्तक्षेप करू नका’. मोदी नेमके त्याचे पालन करीत आहेत. केजरीवाल यांना प्रोत्साहन देणार्‍या सेक्युलर पक्षांवर किंवा केजरीवाल यांनी भाजपावर केलेल्या टिकेची, म्हणूनच मोदी दखलही घेत नाहीत. कारण २०१४च्या लढाईत मोदींसाठी आम आदमी पक्ष ही ‘आप’त्ती नसून इष्टापत्तीच ठरणार आहे. जे सेक्युलर पक्ष उद्या कॉग्रेसच्या गोटात हमखास जाण्याची शक्यता होती, त्याची मते व जागा कमी होऊन मतविभागणीचा लाभ भाजपाला मिळू शकतो आणि पर्यायाने कॉग्रेसच्या युपीएची दुर्बळता त्यामुळे वाढणार आहे, त्याची चिंता मोदींनी कशाला करावी? उलट त्यामुळे एकट्या भाजपालाच थेट बहूमताचा पल्ला गाठायला केजरीवाल मोठा हातभार लावणार आहेत. २०१४ च्या मध्यास हा भारतीय राजकारणात घडणारा सर्वात मोठा चमत्कार असणार आहे. केजरीवाल हा ज्या बुडत्यांना काडीचा आधार वाटतो आहे, ती काडी बुडणार नाही. पण तिच्या आशेवर असलेल्यांना मात्र तीच काडी आगामी लोकसभा निवडणूकीत अलगद बुडवणार आहे.



शनिवार, २८ डिसेंबर, २०१३

कान उघडा ऐका नीट


  शनिवारी अखेरीस दिल्लीला ‘आप’ले सरकार मिळाले. अण्णांच्या लोकपाल आंदोलनातून उदयास आलेल्या अरविंद केजरीवाल व अन्य तरूण नेत्यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पार्टी या पक्षाने अवघ्या सव्वा वर्षात लोकात मिसळू्न काम केले आणि दुसर्‍या क्रमांकाची मते व जागा मिळवून सत्ताही काबीज केली. अर्थात त्यांच्या हाती आलेली सत्ता निर्विवाद नाही. कारण त्यांना बहूमत मिळालेले नाही आणि पहिल्या क्रमांकावरच्या भाजपालाही बहुमत हुकलेले आहे. पण परिस्थितीने केजरीवाल यांना पाठींबा द्यायची नामुष्की कॉग्रेस पक्षावर आली. परिणामी पाठींबा न घेताच केजरीवाल यांनी अल्पमताचे सरकार स्थापन केलेले आहे. मात्र संख्येसाठी त्यांनी कॉग्रेसवर दुगाण्या झाडायचे थांबवलेले नाही किंवा सरकार टिकवण्यासाठी आटापिटा चालविलेला नाही. सहाजिकच अनेक सेक्युलर विचारवंतांना आता केजरीवाल यांच्यात मोदी लाटेवर मात करू शकणारा महान पराक्रमी योद्धा दिसू लागला आहे. परिणामी त्याच केजरीवालाचे अतोनात कौतुक सुरू झाले आहे. शपथविधीनंतर सर्वच वाहिन्यांवर ‘आप’क्रांतीचे कौतुक दुथडी भरून वहात होते. त्यापासून मराठी वाहिन्यांना अलिप्त कसे रहाता येईल? त्यांनीही त्या वहात्या यमुनेत आपापल्या वाहिन्या धुवून पवित्र करून घेण्याची संधी साधली. पण चर्चा कुठलीही असली तरी पॅनेलचे कलाकार नेहमीचेच यशस्वी. त्यापैकी एबीपी माझा नावाच्या वाहिनीकडे बघताना नेहमी लोकांचे कान बंद असतात आणि डोळेही झाकलेले असतात. सहाजिकच तिथे काय होते, दाखवले जाते, बोलले जा्ते त्याचा ऐकणार्‍यांना थांगपत्ता नसतो. आयोजनच असे असल्यावर वाहिनीवर बोलणार्‍या व ते प्रक्षेपित करणार्‍यांना तरी त्यातले काही समजण्याचा संबंध कशाला येईल? त्यामुळेच मग अधूनमधून कोणीतरी संपादक राजीव खांडेकर व ‘नांगर’ प्रसन्ना जोशींना ‘उघडा कान एका नीट’ असे ओरडून सांगावे लागत असते. कारण त्यांच्या चर्चा बघण्यासाठी योजतात व ऐकायच्या नसतात, असेच वाटते. तसे नसते तर शनिवारी केजरीवालांच्या आरत्या ओवाळताना त्या दोघांनी आपल्या चर्चेत आमंत्रित केलेल्या डॉ. कुमार सप्तर्षी व प्रताप आसबे यांनी आजवर केजरीवालांच्या संघर्षाबद्दल जी मुक्ताफ़ळे उधळली होती; त्याचा निदान जाब तरी विचारला असता. नेमक्या दोन वर्षापुर्वी आम आदमी पक्षाची स्थापना झालेली नव्हती आणि केजरीवाल अण्णांच्या सोबत लोकपालचे आंदोलन चालवित होते, तेव्हा याच सेक्युलर ॠषीमुनींनी कोणती भाकिते केली होती?

   आज सप्तर्षी व आसबे यांना केजरीवाल व त्यांची सहकारी मंडळी मोदींची रथयात्रा कशी अडवणार, त्याचे कौतुक आहे आणि त्यामध्ये त्यांना १९७७च्या आणिबाणी विरोधात उठलेल्या वादळाची आठवण झालेली आहे. पण जेव्हा याच राजकारणाचा पाया केजरीवाल घालत होते, तेव्हा त्यांच्यावर हीच मंडळी काय काय आरोप करीत होती?  बरोबर दोन वर्षापुर्वी म्हणजे २०१२ च्या जानेवारी महिन्याच्या ‘सत्याग्रही विचारधारा’ नामक आपल्या मासिकात लिहिलेल्या संपादकीय लेखात समाजवादी विचारवंत ( त्यात कुमारचा काही दोष नाही. समाजवाद्यांमध्ये जो माणूस कामाचा राहिला नाही व अडगळीत फ़ेकून दिलेला असतो, त्याला ज्येष्ठ विचारवंत म्हणायची प्रथा परंपरा आहे. हल्ली भाजपाही त्याच परंपरेत जाऊन अडवाणींना ‘मार्गदर्शक’ म्हणत असतो) डॉ. कुमार सप्तर्षी काय म्हणत होते? आज ‘लोकपाल’ केजरीवाल आम आदमी पक्षाच्या माध्यमातून मोदींना अडचण होणार म्हणूनच सुखावलेले सप्तर्षी, दोन वर्षापुर्वी कोणती भिती व्यक्त करत होते? त्यांच्याच नेमक्या शब्दात बघा.....

 भाजप, व्यापारी व अण्णाः

   भाजप सातत्याने काहीतरी खुसपट काढून संसदेतून बाहेर निघून जातो. सतत सभात्याग करणे म्हणजे संसदेवर थुंकण्यासारखे आहे. संसदेविषयी इतकी तुच्छता यापूर्वी देशात कधीही दिसली नव्हती. ‘सत्तेवर आम्ही येवू शकलो नाही, तर आम्ही संसदीय लोकशाहीचा डावच मोडून टाकू‘ असा पण भाजपने केलेला दिसतो. विरोधी पक्षाने सरकारच्या चुकीच्या धोरणांना अवश्य विरोध करावा, ते त्यांचे कर्तव्यच आहे; पण संसदेमधील कामकाजात सतत अडथळे आणणे हे त्यांना शोभत नाही. अण्णांचे आंदोलन, किरकोळ व्यापारात परकीय गुंतवणूक करायला झालेला बनियांचा जबर विरोध आणि भाजपने संसदेला तमाशा बनवून टाकणे या तिन्ही बाबींमध्ये काहीतरी आंतरिक धागा आहे असा आम्हाला रास्त संशय येऊ लागला.

   भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाची तुतारी फुंकून हा योग्य विषय अण्णांनी हाती घेतला होता. त्यामुळे प्रारंभीच्या काळात आमचा त्यांच्या उद्दिष्टांना पाठिंबा होता. फक्त अण्णांच्या कार्यपध्दतीमध्ये सुधारणा झाली पाहिजे असे वाटत असे. ते मी वाहिन्यांवर जेव्हा संधी मिळेल तेव्हा बोलून दाखवत असे. उदा. ‘‘अण्णा, आपण सत्याग्रही आहोत. आपण कुणाशी वैरत्व राखू नये. आपल्या मनात क्रोध नसावा‘’ वगैरे गोष्टी बोललो. सत्याग्रही पध्दतीच्या जनआंदोलनात फक्त ‘प्रतिपक्षी’ असतो; वैरी कधीच नसतो हे सांगितले. सत्याग्रही जनआंदोलनात वैराला स्थान नाही ही आमची पक्की धारणा आहे. आयुष्यभर अनेक जनआंदोलने केल्यामुळे, तो अनुभव गाठीशी असल्यामुळे कोणत्याही जनआंदोलनाच्या नेत्याच्या वाणी व कृतीमधून जे व्यक्त होते, त्यावरून ते सत्याग्रही आंदोलन यशस्वी होणार की नाही; याचा अंदाज आम्हाला येतो. अण्णा हजारे यांच्या आंदोलनात मला काही दोष दिसू लागले. म्हणून मी जाहीररीत्या, हळुवारपणे काही सूचना केल्या. कशाचाही उपयोग झाला नाही. अण्णांच्या डोक्यातील भ्रमाचा फुगा हवेत उंच जाऊ लागला. अखेरीस आमची खात्री झाली की अण्णांना भ्रष्टाचार मुक्तीसाठी लोकपाल नकोय, तर कॉंग्रेसविरोधी जनमत तयार करण्याकरिता लोकपाल हे निमित्त त्यांना वापरायचे आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात काम करण्याचा प्रत्येकाला मुलभूत हक्क आहे. याबद्दल आमच्या मनात दुमत नाही. तथापि ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा प्रकार सत्याग्रही चारित्र्यात बसत नाही. नंतर एकेक गोष्टी उलगडू लागल्या.

   अण्णा-टीम प्रत्येक वेळी सरकारविषयी द्वेष पसरविण्याच्या हेतूने बोलणी फिसकटवित आहेत, हे लक्षात आले. अण्णा कॉंग्रेस पक्षावर व त्यांच्या नेत्यांवर खालच्या पातळीवरील टीका करून आपली प्रतिष्ठा कमी करून घेऊ लागले. कधी पंतप्रधानांवर टीकेचा आसूड ओढ, तर राहुल गांधींना शिव्या दे, तर कधी सोनिया गांधींना दूषण दे असा प्रकार त्यांनी सुरू केला. अण्णांजवळ वैचारिक श्रीमंती नसल्याने थोड्याच वेळात त्यांचे विचार संपतात. मग ते पुनरूक्ती करीत राहतात किंवा मूळ प्रकृतीनुसार एकेरीवर उतरतात. हे मला फार पूर्वीपासून ठाऊक होते. वयोमानानुसार त्यांच्यामध्ये मानसिक शांती आली असेल असा माझा उगाचच समज होता. भाजप केवळ परिस्थितीचा लाभ उठवित आहे. अण्णा नावाचे अस्त्र कॉंग्रेसवर फेकणे एवढाच त्यांचा हेतू दिसतो. त्यांना अँटीकॉंग्रेसिझम नावाच्या तत्त्वज्ञानाचे आदर्श (आयकॉन) म्हणून अण्णांचा हुतात्मा करावयाचा आहे, त्यांनतर अण्णांची जागोजागी देवळे बांधायची आणि तिथून हिंदूराष्ट्राचा प्रसाद वाटायचा हा भाजपचा डावपेच लक्षात येऊ लागला. अण्णांमध्ये ग्रामीण शहाणपण ओतप्रोत भरले आहे. त्यामुळे ते भाजपच्या अखेरच्या डावाला कधीच बळी पडणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. तथापि पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये अण्णांचा कॉंग्रेस विरोधासाठी मुक्त वापर करायचा भाजपचा डाव यशस्वी होत आहे हे लक्षात आले. अण्णांचे दोन दोष भाजपने नेमके हेरले आहेत. अण्णांच्या मनाची कवाडे त्यांच्या पायावर डोके ठेवले तरच खुली होतात, हा पहिला दोष. कॅमेरा पाहिला की अण्णा कितीही भडक विधान करू शकतात हा दुसरा दोष या दोन दोन दोषांवर भाजपचा खेळ उभा आहे.

   दोन वर्षापुर्वी या सेक्युलर समाजवादी डॉक्टरांचे निदान होते, की अण्णाटीमचे केजरीवाल हे भाजपाचे एजंट वा हस्तक आहेत आणि म्हणूनच त्यांच्यापासून भारताच्या संविधानाला व घटनात्मक राजकीय व्यवस्थेला धोका निर्माण झालेला आहे. आज दोन वर्षे पुर्ण होत असताना तेच डॉक्टर छातीठोकपणे देशाला भाजपाच्या जातीयवादाला मोदीप्रणीत भाजपाच्या जातियवादापासून वाचण्याचा ‘रामबाण’ उपाय म्हणून केजरीवालांची जडीबुट्टी उपयुक्त असल्याची ग्वाही देत आहेत. ह्याला समाजवाद्यांची सेक्युलर शोकांतिका म्हणायचे की दिवाळखोरी, हे ज्याचे त्याने ठरवावे. अर्थात सामान्य जनतेला अशा निर्बुद्धांच्या विद्वत्तेशी कधीच कर्तव्य नसते. सामान्य माणूस व्यवहारी जीवन जगत असतो आणि अनुभवाने आपले तत्वज्ञान निर्माण करीत असतो, वापरत असतो. विचारवंतांना मग सामान्य माणसाच्या कृतीशी आपले फ़सले्ले तत्त्वज्ञान जुळवून घ्यावे लागत असते. कारण आपण शहाणे आहोत व मुर्ख नाही; हेच बुद्धीमंतांना सतत सिद्ध करण्याची खाज असते. परिणामी लोकांच्या दुर्बळ स्मरणशक्तीचा लाभ उठवून हे बुद्धीमंत, आपलीच थुंकी गिळत असतात किंवा या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचा जादूटोणा करून आपल्या बुद्धीमत्तेचे प्रमाणपत्र पुन्हापुन्हा स्वत:लाच देत असतात. म्हणूनच शनिवारी आसबे, खांडेकर, सप्तर्षी यांच्या चर्चेची कींव करावीशी वाटली.

   दीड दोन वर्षापुर्वी आपापल्या लेखातून व वाहिन्यांच्या चर्चेतून हीच मंडळी किमान डझनभर वेळा तरी ‘अण्णा टिमची विश्वासार्हता घसरते आहे’ अशा विषयावर सांगोपांग चर्चा करून केजरीवाल व अण्णांच्या लोकपाल आंदोलनावर दुगाण्य़ा झाडत होती. जोपर्यंत केजरीवाल यांनी दिल्लीत सातत्याने चालविलेल्या लढे व आंदोलनातून तिथल्या निवडणुकीत यश मिळवून दाखवले नव्हते, तोपर्यंत यांना केजरीवालची महत्ता कळली नव्हती. आणि आजही कळलेली नाही. त्यामुळेच आपली आधीची फ़सलेली विधाने व निदाने झाकण्यासाठी आता त्याच दिल्लीपुरत्या केजरीवालांचे देशव्यापी चित्र रंगवण्याचा अतिरेक त्यांच्याकडून चाललेला आहे. केजरीवाल व ‘आप’चा देशाभरचा प्रभाव यांना आज दिसत असेल व जाणवत असेल; तर मग त्यांनाच गेल्या दोन वर्षात केजरीवाल यांच्या दिल्लीत वाढत गेलेल्या प्रभावाचा थांगपत्ता कशाला लागला नव्हता? त्यांनी सत्तेवर येण्याची गोष्ट सोडून द्या. पण दिल्लीतला केजरीवाल यांचा लढा जनतेचा लढा आहे, एवढेही या विद्वानांच्या लक्षात कशाला आलेले नव्हते? अण्णा वा केजरीवाल यांच्या विश्वासार्हतेवर हे शहाणे प्रश्नचिन्ह कशाला लावत होते? कारण अशा विद्वानांना कशातलेच काही कळत नसते आणि जनभावनेशी त्यांचा काडीमात्र संबंध नसतो. हाती प्रसार माध्यमे व साधने आहेत म्हणून रेटून व सातत्याने बिनबुडाचे खोटे बोलायचे आणि उलटले मग आपण त्या गावचेच नाही, असला शहाजोगपणा करण्याची आत्मसात केलेली कला, हेच त्याच्या विद्वत्तेचे एकमेव व्यवच्छेदक लक्षण मानता येईल.

(ज्यांना डॉ. सप्तर्षी यांच्या त्या प्रदिर्घ लेखाचे तेव्हाच मी केलेले पोस्टमार्टेम तपासण्याचे अगत्य असेल, त्यांनी मार्चे-एप्रिल २०१२ काळात माझ्या उलटतपासणी ब्लॉगवरील अर्धा डझन लेख बघावेत)
http://bhautorsekar.blogspot.in/

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१३

केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला ‘शुभेच्छा’



  नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणूकीत चारपैकी तीन विधानसभा निवडणूकीत भाजपाने मोठेच यश मिळवले, हे आकड्यातुनच आपण बघू शकतो. त्यापैकी सर्वात छोटे व एका महानगरापुरते मर्यादित राज्य असलेल्या राजधानी दिल्लीच्या विधानसभेत भाजपाचे बहूमत थोडक्यात हुकले. या सर्वच राज्यांमध्ये प्रचारासाठी भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला होता आणि आक्रमक प्रचार केला होता. तेव्हा मोदी भाजपाला कितपत यश मिळवून देतील, याची चर्चा चालली होती. प्रत्येक वाहिनी व माध्यमातून मोदींमुळे कदाचित तिथे भाजपाला अपयश मिळण्याची भाकितेही केली जात होती. पण चारपैकी तीन राज्यात भाजपाने नेत्रदीपक यश मिळवल्यानंतर श्रेयाची वेळ आल्यावर मात्र कुणालाच मोदी आठवलेला नाही. उलट यात मोदींचा करिष्मा नसून भाजपाचे स्थानिक नेते वा मुख्यमंत्री कसे प्रभावी होते; त्याचे विश्लेषण व कारणे शोधण्यात तमाम माध्यमे गर्क झाली. उलट दिल्लीत भाजपाचे बहूमत थोडक्यात हुकले, तर त्याचे खापर मात्र मोदींच्या माथ्यावर फ़ोडण्यासाठी पत्रकारांमध्ये शर्यत सुरू आहे. तेवढेच नाही, तर भाजपापेक्षाही कमी यश मिळवलेल्या नवख्या आम आदमी पक्ष व त्याचे नेते संस्थापक अरविंद केजरीवाल, यांचे कौतुक करताना अन्य तीन राज्यात भाजपाने प्रचंड यश मिळवल्याचे कोणालाही आठवेनासे झाले आहे. खरे तर त्याबद्दल तक्रार करण्याची गरज नाही. गेल्या दोन दशकात सेक्युलर पत्रकारीतेचा अनुभव घेणार्‍या लोकांना आता असल्या विश्लेषणाची व बातम्या चर्चेची सवय अंगवळणी पडलेली आहे. तेव्हा केजरीवाल यांचे अवास्तव कौतुक चालले आहे, असे मी अजिबात म्हणणार नाही. केजरीवाल हे आगामी लोकसभा निवडणूकीत मोदींना कसे झोपवतील, तेही ऐकायला मोठी मजा येते आहे. अवघ्या काही दिवसात केजरीवाल यांना घाबरून युरोप अमेरिकेतील भलेबुरे पक्षही तिथे केजरीवाल यांना वचकू लागल्याच्या बातम्या कानावर आल्या; तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. उलट एक मोदी समर्थक म्हणून मला तेच ऐकायला आवडते आहे. कारण अशा स्वप्नरंजनानेच मोदी यांना लढण्याची हिंमत मिळते आणि ते अधिक त्वेषाने कामाला लागतात, असा इतिहास आहे. त्यामुळेच मोदींच्या पराभवाचे असे माध्यमातील स्वप्नरंजन त्यांच्या यशासाठी अत्यावश्यक आहे, असे माझे अनुभवी मत आहे.

   माझे अनुभवी मत म्हणजे काय? तसे गेल्या दहा बारा वर्षातले असे अनुभव खुप आहेत. पण त्यातल्या त्यात अलिकडचा म्हणजे अवघ्या अकरा महिन्यापुर्वीचा एक अनुभव इथे पुराव्यासहित मांडतो. मोदींच्या विरोधातली कुठलीही खोटीनाटी वा नगण्य माहिती हाती लागली वा तशी नुसती आशा दिसली, तरी आपले सेक्युलर पत्रकार व माध्यमे किती भारावून वहावत जातात, ते वेगळे सांगायला नको. याच वर्षाच्या आरंभी १४ जानेवारी रोजी राजस्थानची राजधानी जयपूर येथे कॉग्रेस पक्षाचे चिंतन शिबीर झालेले होते. तिथे अधिकृतरित्या पक्षाची अधिकारसुत्रे मातेकडून पुत्राला सोपवण्याचा सोहळा पार पडला होता. त्याच चिंतन शिबीरात नवे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे भगव्या दहशतवादाचा आरोप करून तोंडघशी पडले होते, हे अनेकांना आठवत असेल. तिथेच राहुल गांधी यांनी आपले मन मोकळे करताना आपला कौटुबिक वारसा सांगण्यापासून भावनेला हात घालणारे प्रदिर्घ भाषण करून दाखवले होते. अर्थात तेही त्यांनी लिहून आणलेले वा कोणाकडून लिहून घेतलेले व वाचून दाखवलेले होते. पण त्या भाषणाने सभोवती जमलेले कार्यकर्ते व निष्ठावान कॉग्रेसजन भारावून गेलेले होते. बहुतेकांचे डोळे पाणावलेले होते. व्यासपिठावर बसलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासहीत बहुतेक ज्येष्ठ कॉग्रेस नेत्यांनी उभे राहून नव्या उपाध्यक्ष युवराजाना सलामी दिली होती. मुजरा नाही, तरी गळाभेट करून आपल्या निष्ठांचे जाहिर प्रदर्शन केलेले होते. ज्यांना गळाभेट करण्याइतके जवळपास फ़िरकता येत नाही, त्यांनी डोळे ओले करून आपल्या निष्ठा व्यक्त केल्या होत्या. त्यात केवळ घराण्याला निष्ठा वाहिलेले कॉग्रेसजन होते असे मानायचे कारण नाही. तितक्याच संख्येने तमाम सेक्युलर पत्रकार माध्यमेही भारावून गेलेली होती. त्या एका ‘वाचलेल्या’ भावनापुर्ण भाषणामुळे आता देशातली कॉग्रेसची सत्ताच नव्हे, तर मोदींनी बुडवू घातलेला सेक्युलॅरिझमही बुडताबुडता ‘वाचवला’ जाणार होता. यामुळे बहुतांश माध्यमे निश्चिंत होऊन गेली होती. आणि आपला जीव भांड्यात पडल्याचे जाहिरपणे सांगण्याची आपल्याला ‘लाज’ वाटत नाही अशी जाहिरात करायचीही त्यांना लाज वाटलेली नव्हती. यालाच भारावून जाणे म्हणतात. आणि एकदा भारावून गेले, मग सारासार बुद्धीला तिलांजली दिली जात असते. अशी बुद्धीला तिलांजली देणारे केवळ तिथे जमा झालेले कॉग्रेसजनच नव्हते. म्हणूनच आज अकरा महिन्यानंतर कोणी तेव्हा भारावलेल्या कॉग्रेसजनांना राहुलच्या अपयशासाठी जाब विचारणार असेल, त्याने आधी आपल्याही तशाच भारवण्याचा आधी जबाब दिला पाहिजे. कारण राहुलच्या व पर्यायाने कॉग्रेसच्या अशा दिवाळखोरीला तसे भारावणारे कॉग्रेस नेते जबाबदार असतील, तर तितकेच त्यांना अंधारात ठेवताना आपली बुद्धी गहाण टाकणारे पत्रकार व सेक्युलर बुद्धीमंतही त्या अपयशाचे भागिदार आहेत. त्यांनाही आजच्या कॉग्रेसी अपयशाची जबाबदारी उचलावीच लागेल.

   तुमच्यापैकी कोणी कायबीईन लोकमतची थोरली भगिनी सीएनएन कायबीईन बघत असेल तर त्यावरच्या दोन महान सेक्युलर महिला पल्लवी घोष व सागरिका घोष तुम्हाला नक्कीच ठाऊक असतील. या दोघी गेला आठवडाभर आपल्या वाहिनीवरून कुठल्याही कॉग्रेस नेत्याला राहुलच्या अपयशाची कारणे विचारत आहेत. त्याचवेळी राहुलच्या अपात्रतेचा जाब विचारत आहेत. तशीच एनडीटीव्हीची बरखा दत्त तेच करते आहे. पण अकरा महिन्यांपुर्वी या तिघीजणी काय अकलेचे तारे तोडत होत्या? आज कोणाला त्याची आठवण तरी आहे काय? आपापल्या वाहिन्यांवर राहुलच्या महान भाषणाचे गोडवे गावून झाल्यावरही त्यांच्या तोंडातली लाळ संपलेली नव्हती, म्हणून त्यांनी ती फ़ेसबुक आणि ट्विटरवर सांडून ठेवलेली होती. त्या लाळघोटेपणाचे अकरा महिन्यात सुककेले सांडगे कोणाला बघायचे असतील, तर त्यांनी याच लेखात टाकलेले त्याचे चित्ररूप बघा्वे आणि वाचावे.

   पल्लवी घोष: ‘राहुलचे हेलावून सोडणारे भाषण, विशेषत: त्याचा शेवटचा भाग अप्रतिम, हे कबूल करायची मला लाज वाटत नाही.’
   पल्लवी घोष: ‘(श्रीराम कॉलेजमधील) मोदींचे भाषण खुप राजकीय होते, (विद्यार्थ्यांसमोर) अशा भाषणासाठी ही जागा योग्य होती काय असा प्रश्न पडतो.’

   सागरिका घोष: ‘राहुलचे आजचे भाषण आजवरचे सर्वात उत्तम. व्यवस्था परिवर्तन, समावेशकता, त्याचा आवाज व त्यातील भावनिक स्पर्श छान. त्यामागे जयराम रमेश असतील का?’
   सागरिका घोष:  ‘श्रीराम कॉलेजमध्ये आपण मोदींना कापूस, मीठ, केळी, आयुर्वेद, शिक्षक यावर बोलताना ऐकले. पण देशासमोरच्या आव्हानांना सामोरे जाण्याविषयीच्या त्यांच्या कल्पना काय आहेत?’

   बरखा दत्त: ‘राहुल गांधींच्या भाषणातील भावनात्मक भाग मनाला खुप भावला. विशेषत सत्ता हे जहर असल्याचा संदर्भ हृदयस्पर्शी होता’
   बरखा दत्त: ‘श्रीराम कॉलेजातील मोदींचे भाषण म्हणजे त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केल्याची तुतारीच होती. प्रश्न इतकाच, की त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित करायला भाजपा इतका कशाला कचरतो आहे?

   आपणच अकरा महिन्यांपुर्वी उधळलेली मुक्ताफ़ळे किंवा गाळलेली लाळ या तीन विदुषींना आज आठवते तरी आहे काय? पण अशा लाळेचा पुर आणणार्‍यांनी बिचार्‍या राहुल गांधींना पुरते नाकातोंडात पाणी जाऊन बुडवले आहे. असल्या लाळघोट्यांच्या नादाला न लागता चौकात उभे राहून बोंबलणार्‍या केजरीवालांचे कान देऊन ऐकावे; असे राहुलना वाटू लागले आहे. आणि या विदूषी वा त्यांच्याप्रमाणेच अकरा महिन्यापुर्वी चाटूगिरी करण्यात गर्क असलेल्यांना आता राहुलकडे बघायचीही गरज वाटेनाशी झाली आहे. त्यांनी बुडवण्यासाठी नवी शिकार शोधली आहे. अकरा महिन्यापुर्वी जितके अवास्तव कौतुक, लाळघोटेगिरी राहुलच्या बाबतीत चालू होती, त्याहीपेक्षा अधिक आज केजरीवाल यांच्या बाबतीत चालू आहे. त्यामुळे अशा सेक्युलर माध्यमांचे व त्यातल्या पत्रकारांचे पुढले सावज, लक्ष्य कोण असणार आहे, ते वेगळे सांगायला हवे काय? त्यांनी असली चाटुकारी केली नसती, तर नुकत्याच संपलेल्या विधानसभांच्या प्रचारार राहुलने ‘मेरी दादीको मारा, मेरे पापाको मारा’ असली मुक्ताफ़ळे कशा उधळली असती? राहुलही जनसामान्यांना भेडसावणार्‍या समस्यांवर व त्याचे उपाय सांगण्याविषयीच बोलले असते आणि त्यांच्या पक्षाला निदान काही प्रमाणात जास्त जागा मिळू शकल्या असत्या. पण अशा चाटूकार भारावणार्‍या भाटांनी आजवर मोठमोठ्या सम्राटांना बघता बघता बुडवले आहे. तिथे राहुल गांधींची काय कथा? अशा परोपजिवी बांडगुळांना फ़स्त करण्यासाठी कुठले तरी एक सशक्त झाड आवश्यक असते. त्यामुळेच त्यांनी आता केजरीवाल यांच्यासह त्यांच्या आम आदमी पक्षाला हरभर्‍याच्या झाडावर चढवले, तर त्यांचे काहीच नुकसान होणार नाही. त्याचप्रमाणे त्यांनी मोदींचे दिल्ली वा इतरत्रचे लोकांच्या मनाला जाऊन भिडणारे भाषण नाकारण्याने वा त्याचे परिणाम झाकून ठेवल्याने चार विधानसभा निवडणूकीच्या निकालावर परिणाम झाला नाही. आताही तीन राज्यातले मोदींचे यश व मतदाना्वर पडलेला प्रभाव झाकून ठेवल्याने येत्या लोकसभा निवडणूकी्त मोदींचे कुठलेही नुकसान होण्याची अजिबात शक्यता नाही. चिंताच करायची असेल, तर अशी मंडळी आज ज्यांचे तोंड फ़ाटेस्तोवर कौतुक करीत आहेत, त्यांनी करावे. दिल्लीच्या निकालांनी भारावलेल्यांच्या गदारोळात केजरिवाल मग्न झालेले दिसतात आणि पुढल्या गर्जनाही करू लागले आहेत. त्यांना शुभेच्छा. 

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१३

महापुरूष इतके क्षुल्लक नसतात

सामर्थ्य आहे चळवळीचे (४)

  समर्थ रामदासांनी पुन्हा मुर्तीपूजेचे थोतांड सुरू केले, असाही एक आक्षेप असू शकतो. पण त्यात तथ्य नाही. सवाल देवळातल्या देवाचा वा त्यातल्या मुर्तीचा नाही. गावोगावी अशा देवळांची स्थापना ही प्रतिकात्मक होती. त्यातून त्या त्या गावात वस्तीमध्ये अस्मितेची प्रतिके त्यांना उभारायची होती. त्यामागे त्या मुर्तीचे थोतांड उभे करण्यापेक्षा तिला अस्मितेचे प्रतिक बनवून तिच्या संरक्षणार्थ उभे ठाकण्याची प्रेरणा स्थानिक पातळीवर रुजवण्याचा हेतू महत्वाचा होता. माणूस कुठल्या तरी अभिमान स्वाभिमानासाठीच लढायला उभा रहातो आणि त्यासाठी अशी प्रतिके मोलाची कामगिरी बजावत असतात. आजही आपल्या देशाच्या सीमेवर थंडीवारा सोसत उभा असलेला जवान सैनिक तिरंगा नावाच्या एका प्रतिकासाठीच लढत असतो आणि आपले प्राण ओवाळून टाकत असतो. तेव्हा तेही एक कापडच असते. त्या झेंड्याला आपला बचाव करता येत नसेल, तर त्याची महत्ता ती काय; असे आपण म्हणत नाही. कारण ते हिदूस्तानच्या अस्मितेचे प्रतिक असते. तसेच धर्मस्थान वा श्रद्धास्थान हे निव्वळ प्रतिक असते. कधी सजीव तर कधी निर्जीव असते. त्याच्यात कुठली चमत्कारी शक्ती नसते. त्यातला चमत्कार त्याच्यासाठी लढायला उभ्या ठाकणार्‍या समाज समुहामध्ये दडलेला असतो. म्हणूनच धर्मस्थान वा देवळाची महत्ता सामुहिक जीवनात मोठी असते. दोन दशके उलटून गेल्यावरही अयोध्येत उध्वस्त करण्यात आलेल्या निरूपयोगी अवशेषरुपी बाबरी मशीदीचे तेच कौतुक आहे. आजही मुस्लिम त्यासाठी अश्रू ढाळत असतात व कुठल्याही स्तराला जाऊन आक्रोश करीत असतात. कारण त्या स्थानाला अस्मितेचे रुप आहे. समर्थांनी नव्याने देवळांच्या उभारणीची मोहिम हाती घेतली, कारण त्यांच्याच समकालीन शिवरायांनी धर्मासह भारतीय संस्कृतीच्या संरक्षणाचे कंकण हाती बांधले होते. त्या संस्कृतीच्या अस्मितेची प्रतिके जागोजागी उभी करून समाजातला स्वरंरक्षणाचा पुरूषार्थ जागवणे; हा त्याचा एक हेतू होता. तसाच एकूण हिंदू समाजातील क्षात्रवृत्तीचे पुनरुत्थान हा दुसरा हेतू त्यामागे होता. अशा रितीने आपल्या वस्तीतले गावातले अस्मितेचे प्रतिक जपायला पुढे येण्यातून जी लढावूवृत्ती जोपासली जाणार होती, तीच पुढे सैनिक होऊन शिवरायांच्या सैन्यात भरती व्हायला हातभार लावणार होती.

   थोडक्यात समर्थांनी आपली अध्यात्मिक चाकोरी सोडून राजकीय, सामाजिक वाट चोखाळली होती, तर शिवरायांनी राजकीय सत्तेत राहुन परमार्थाची सामाजिक जबाबदारी उचलली होती. दोघेही चाकोरी सोडून एकाच कालखंडात राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या कामाला लागले होते. या दोघांनी परस्पर पुरक कार्य आरंभले होते आणि त्यांच्या कुठल्याही काम वा कृतीने एकमेकांच्या उद्दीष्टाला छेद दिला नाही. त्यांचे मार्ग एकमेकांना छेदून जाऊ शकले नाहीत. म्हणूनच महाराष्ट्राचाच नव्हेतर भारतवर्षाचा इतिहास बदलून गेला. सभोवारचे अनेक देश व राष्ट्रे, समाज आपली परंपरा, वारसा व इतिहास गमावून बसले; त्याच काळात हिंदूस्तानला मात्र आपली ओळख व वारसा टिकवता आलेला आहे. आफ़्रिकेपासून मलेशियापर्यंत सभोवारच्या भूगोलाचा ऐतिहासिक चेहरामोहराच बदलून गेला. आज तिथल्या समाजाला आपलीच पूर्वपुण्याई आठवू शकत नाही, अशा प्रदिर्घ कालखंडात भारताचा चेहरामोहरा कायम राहू शकला. त्यामागे महाराष्ट्रातील या दोघा महापुरूषांची दूरदृष्टी व दुर्दम्य इच्छाशक्तीच कारणीभूत झाली आहे. मग ते परस्परांशी संबंधित होते, गुरूशिष्य़ होते किंवा सहकारी होते, असल्या वादाला अर्थच उरत नाही. दोघांनी साधलेले परिणाम अभूतपुर्व आणि कौतुकास्पद आहेत. त्यांच्यातले वाद व वितुष्ट शोधणार्‍यांना आज इतिहासाचा अभ्यास वा छाननी करता येते; त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांनी भारतीय अस्मितेला सुखरूप राखण्यासाठी केलेले परस्पर पुरक व संयुक्त प्रयास हेच आहे. दोघेही परस्परांच्या शत्रूसारखे वागले वा जगले असते; तर आपलीही अवस्था पाकिस्तान वा इराण, इजिप्तसारखी होऊन आपण ऐतिहासिक वारशाबद्दल बोलूही शकलो नसतो. उलट शेकडो वर्षापुर्वी कधीकाळी अरबी प्रदेशात इस्लामच्या आरंभ काळात जे पंथ निर्माण झाले, त्याच्या अभिमानाने प्रेरित होऊन शिया-सुन्नी अशा वैरासाठी एकमेकांच्या उरावर बसलो असतो. समर्थ रामदास ब्राह्मण होते किंवा शिवराय मराठा होते, त्यामुळे त्यांच्या जातीची अस्मिता घेऊन आपण भांडूही शकलो नसतो. कारण आपली तशी जातीची वा वारशाची ओळखही आपण केव्हाच विसरून गेलो असतो.

   ज्या जातीय भेदभाव वा पक्षपाताच्या भूमिकेत आजचे काही विद्वान वा या महापुरूषांचे पाठीराखे एकमेकांची उणीदुणी काढत असतात आणि त्यासाठी त्याच महात्म्यांची नावे घेत असतात; त्यांना त्या थोरपुरूषांच्या जीवनाचे उद्दीष्ट व सार कितपत कळले आहे, याचीच मग शंका येते. हे त्यांचे भक्त वा अनुयायी ज्या आवेशात एकमेकांच्या अंगावर जात असतात व परस्परांना नामोहरम करीत असतात, तसेच तेव्हा त्या दोघांनी केले असते; तर आज समर्थ रामदास किंवा शिवराय असली नावेही आपल्याला आठवली नसती. ती आपल्याला आठवतात, स्मरणात आहेत, कारण त्यांनी आपल्या कार्यकाळात परस्परांना पुरक असे समाज जोडायचे व समाज उभा करण्याचे संयुक्त कार्य पार पाडलेले आहे. आजच्या जातीय अस्मितेचीच कास धरत त्यांनीही परस्परांच्या विरोधातली लढाई केली असती; तर कोणी मराठा राहिला नसता किंवा कोणी ब्राह्मणही राहिला नसता. इथेही शिया-सुन्नी असल्या रक्तरंजित संघर्षात आपणही अस्मिता गमावल्यासारखे भरकटत गेलो असतो. शिवराय, समर्थ रामदास किंवा ज्ञानेश्वर-तुकोबा ही इतकी प्रचंड व्यक्तीमत्व असतात, की त्यांचे आकलन होण्यापुर्वीच आपले आयुष्य़ संपून जाऊ शकेल. अमावस्येचा चंद्र किंवा पौर्णिमेचा चंद्र जसे भिन्न दिसतात, तसे आपण या महापुरूषांना भिन्न स्वरुपात पाहून त्यावरूनच भांडत बसतो. पण त्यांच्या कार्याची महती वा त्यांनी घडवलेल्या इतिहासाचा थांग आपल्याला लागलेला नसतो. म्हणूनच त्यांच्यातले गुण व त्यांची शिकवण आत्मसात करण्यापेक्षा आपण त्यांच्यात काय नव्हते, याचा शोध घेऊन चिखलफ़ेक करण्यात धन्यता मानू लागतो. तिथेच मग आपण त्यांचाच पराभव करीत असतो. त्यांच्याच महान कार्याची व इतिहासाची विटंबना करीत असतो. लेखाच्या आरंभी म्हटल्याप्रमाणे आपण आपल्या कुपमंडूक प्रवृत्तीने सागराला घागरीचे क्षुल्लक रूप देत असतो. शिवराय किंवा समर्थ रामदास यांचे ऐतिहासिक कर्तृत्व सागरासारखे अथांग अफ़ाट असते, तो महासागर उपसण्यापेक्षा त्यातली रत्ने माणके शोधावीत. इतक्या पराक्रमी व कर्तबगार थोरपुरूषांच्या संरक्षण वा समर्थनासाठी आपल्यासारख्या क्षुल्लक लोकांनी धावावे; इतके ते छोटे नसतात. आपणही आपल्या मोठेपणासाठी त्यांना छोटे करू नये, इतकेच सांगावेसे वाटते. (समाप्त)

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१३

इतिहास घडवतात ते महापुरूष

सामर्थ्य आहे चळवळीचे (३)

   इतिहास घडत असतो, तसाच घडवला जात असतो. बहुतांश लोक इतिहास घडेल तसे बघत बसतात आणि त्याला शरण जातात. पण मोजकेच लोक असे असतात, जे इतिहासाची मनमानी स्विकारत नाहीत. ते इतिहासाला वळण देऊ बघतात, त्यासाठी झुंजतात. शिवराय आणि समर्थ रामदासांचा कालखंड बघितला तर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मोठ्या प्रमाणात इतिहासाला शरण गेलेल्या समाजात इतिहासाशी झुगारणारे तरूण उदयास आले. शिवरायांच्या समकालीन अनेक मराठे व हिंदू राजांपाशी शौर्य होते. पण इतिहासाला गवसणी घालून त्याला वेगळा आकार देण्य़ाच्या इच्छेचा त्यांच्यामध्ये अभाव होता. जी सरंजामशाहीची चाकोरी अनेक पिढ्यांपासून तयार झालेली होती, ती सोडण्याची इच्छाच तेव्हाचे अनेक सरदार जहागिरदार गमावून बसले होते. अशावेळी शिवराय त्या ऐषारामी जीवनाला झुगारण्यास पुढे सरसावले. त्यांनी चाकोरी सोडून बलाढ्य वाटणार्‍या बादशहा, सुलतानांच्या सत्तेला आव्हान देण्याचा निर्धार केला. त्यासाठी प्रस्थापित सरदारांची मदत मागण्यापेक्षा त्यांनी नव्या दमाच्या तरूणांना हाताशी धरले आणि त्यातूनच नवे सरदार लढवय्ये उभे केले. पारंपारिक युद्धाची निती ही सत्ता किंवा संपत्ती, धनदौलत संपादन करण्याची होती. पण शिवरायांची निती त्यापासून अगदीच भिन्न म्हणजे चाकोरीला छेद देणारी अशी आढळते. त्यांनी उभे केलेल्या सामाजिक नेतृत्वामध्ये अस्मितेची धार दिसते. तशी धार तात्कालीन अन्य कुठल्या राजा, सरदाराच्या सेनेत किंवा सहकार्‍यांमध्ये आढळून येत नाही. आपले राज्य स्थापन करावे आणि आपण राजा व्हावे म्हणून त्यांनी लोकांना लढायला आमंत्रित केले नाही. सामुहिक अस्मितेसाठी व तिच्या संरक्षणासाठी लढणारे तरूण शिवरायांनी उभे केले. त्यांच्या सवंगड्यांच्या कथा त्याची साक्ष देतात.

   लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशींदा जगला पाहिजे, असे म्हणणारा बाजीप्रभू देशपांडे किंवा आधी लगीन कोंडाण्य़ाचे, असे बोलून गेलेला तानाजी मालुसरे, निव्वळ टाळ्या मिळवणारी चमकदार वाक्ये बोललेले नाहीत. त्यातून त्यांनी शिवरायांच्या राजनितीचेच पाठ सांगितले आहेत. लाख मेले तरी चालतील, म्हणजे सामान्य सैनिकापेक्षा राजवंशाची महत्ता बाजीप्रभू सांगत नव्हता. तर शिवरायांसारखा दुर्मिळ नेता हरपला तर अवघी स्वराज्याची चळवळच संपुष्टात येईल, असेच त्याला म्हणायचे होते. आपल्यासारखे लढणारे शेकडो मिळतील, निर्माण होतील, पण शिवरायांसारखा प्रेरणादायी नेता क्वचितच कुणा समाजाला मिळतो, तो गमावून चालणार नाही; असेच त्याला म्हणायचे होते. इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. शिवराय त्याला सुखरूप सोबतच घेऊन जायला उत्सुक आहेत व तसे सांगत आहेत. पण खुद्द राजाच्या आदेशाची बाजीप्रभू एकप्रकारे अवज्ञाच करतो आहे. कारण त्याच्यासारख्या सहकार्‍याला गमावण्याच्या चिंतेने राजा भावुक झालेला होता. तो आपली अवज्ञा करीत नसून आपल्याला कर्तव्याची जाणिव करून देतो, हे समजण्याइतके शिवराय प्रगल्भ होते. तर आधी लगीन कोंडाण्याचे म्हणणारा तानाजीही महाराजांना स्वराज्याच्या चळवळीतील प्राधान्याची आठवण करून देतो आहे. खुद्द महाराज रायबाच्या लग्नसोहळ्यानंतर कोंडाण्याच्या मोहिमेचे बोलतात. पण तानाजी त्यांना नकार देतो आणि महाराजही ते मान्य करतात? राजाची अवज्ञा वाटण्यासारखी तीसुद्धा घटना आहे. पण त्यातून स्वराज्याची लढाई, ही तात्कालीन राजकीय सामाजिक उत्थानाची कशी प्रभावी चळवळ होती, त्याचीच साक्ष मिळते. जेव्हा असे सहकारी महाराज शोधतात व निवडतात, तेव्हा त्यामागची प्रेरणा किती संन्यस्त होती, याचेच दाखले मिळतात. असे सरदार, सहकारी शिवरायांचे साम्राज्य निर्माण करण्यासाठी लढत नव्हते, तर एका समाजाच्या अस्मितेचे पुनरुत्थान करण्यासाठी कंबर कसून उभे राहिलेले होते. एकूणच त्या कालखंडाचे परिशीलन केल्यास जाणवते, की तो इतिहास एका चळवळीचा होता. त्यात लढाईचे वा मनगटाचे, तलवारीचे सामर्थ्य काम करीत नव्हते; तर चळवळीचेच सामर्थ्य ओळखून स्वराज्याची मुहूर्तमेढे रोवली गेली होती. त्याच कालखंडातले संन्यासी समर्थ रामदासही स्वराज्याचा मंत्र देत फ़िरतात आणि अध्यात्मातून तीच ज्योत पेटवत जातात, हा योगायोग नसतो.

सामर्थ्य आहे चळवळीचे
जो जो करील तयाचे
परंतु तेथे भगवंताचे
अधिष्ठान पाहिजे

   हे समर्थांचे शब्द नेमके त्या घडामोडींशी जुळणारे का असावेत? मग त्यांच्याकडून घेतलेल्या अनुग्रहानंतर शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती काय? मुळात महाराजांनी समर्थांना गुरू तरी मानले होते काय? असले वाद आता खेळण्यात अर्थ नाही. कारण त्यातला बारीकसारीक तपशील इतिहासजमा झालेला आहे. महत्वाचे आहे, ते त्यातून साधले गेलेले ऐतिहासिक परिणाम. कारण या दोघा महापुरूषांनी केलेले परस्पर पुरक कार्य मराठी व हिदूस्तानी समाजाचे अपुर्व असे पुनरुत्थान करून गेलेले आहे. जेव्हा समस्त हिंदुस्तानातील बिगर इस्लामी स्थानिक राजसत्ता मोडकळीस आलेल्या होत्या आणि लढण्याची कुवत हरवून बसल्या होत्या;  त्याच कालखंडात या दोघा महापुरूषांनी या खंडपाय देशाची अस्मिता सामर्थ्याने प्रतिकारासाठी उभी करण्याचे महान कार्य केलेले आहे. सातव्या शतकानंतर जेव्हा इस्लामी फ़ौजा धर्मप्रसारासाठी हाती शस्त्र घेऊन चौफ़ेर उधळल्या; तेव्हा त्यांच्या टाचेखाली जगातल्या अनेक समाज-संस्कृती पुरत्या जमीनदोस्त होऊन गेल्या. आज त्यांचे नामोनिशाण शिल्लक उरलेले नाही. अनेक समाज व राष्ट्रे आपला वारसाच गमावून बसली आहेत. अस्मिताही हरवून गेली आहेत. कधीकाळी आपापल्या उत्क्रांत धर्म संस्कृती परंपरांमध्ये उन्नत झालेल्या शेकडो लहानमोठ्या समाजांच्या खाणाखुणा आज आशियासह आफ़्रिका खंडातून बेपत्ता होऊन गेल्या आहेत. सुमेरियन वा बायझंटाईन, पर्शियन संस्कृती उध्वस्त होऊन गेल्या आहेत. जगातले अदभूत रहस्य मानल्या जाणार्‍या पिरॅमिडसारख्या उन्नत संस्कृतीचा वारसा इजिप्शियनांना आठवत सुद्धा नाही. इराण्यांना आपली भरभराटलेली पर्शियन संस्कृती माहितही नाही. अफ़गाणिस्तानची उदात्त बौद्ध संस्कृती नामशेष होऊन गेली. हा सर्व विध्वंस होत असतानाच्या काळातच भारतीय व हिंदू संस्कृतीलाही ग्रहण लागलेले होते. पण तिच्या संरक्षणाचे कर्तव्य पार पाडायला कुणी सामर्थ्यवान या उपखंडातून पुढे यायला राजी नव्हता. पण तरीही आज ती कित्येक शतकांचा वारसा सांगणारी भारतीय संस्कृती टिकून राहिली, त्याचे श्रेय महाराष्ट्राच्या भूमीत उदयास आलेल्या दोन महापुरूषांचे आहे आणि त्यांच्या परस्पर पुरक सामाजिक आध्यात्मिक कार्यालाच आहे. ते समकालीन शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासच होत. कारण त्यांनी अन्य पौर्वात्य देशांप्रमाणे इस्लामी आक्रमणाला शरण जाऊन नष्ट होण्यास नकार दिला आणि प्रतिकाराची चळवळ इथे रुजवली व जोपासलेली होती. त्यातून त्यांनी इतिहासाला वेगळे वळण देण्याचे ऐतिहासिक कार्य केले.

   तसे संत परंपरेतूनही याच धार्मिक व सांस्कृतिक आक्रमणाला सशस्त्र नव्हेतर सामुहिक प्रतिकार करण्याचे आंदोलन त्याच आधीच्या कालखंडात सुरू होते. मुस्लिम नसणे वा इस्लामचा स्विकार केला नाही, तर नागरिकांना आपल्याच जन्मभूमीत दुय्यम व पक्षपाती वागणूक देण्याचा जो अन्याय सुरू झाला होता, त्याला तोंड द्यायला संतांनी कंबर कसली होती. एकेकट्या पडलेल्या समाजाला त्यांनी वारकरी बनवून धर्मापेक्षाही आपला सांस्कृतिक ठेवा जतन करण्याच्या मोहिमा चालविल्या. एक जमाव आपल्या देवधर्माचा जयघोष करीत उजळमाथ्याने घराबाहेर पडून मैलोगणती यात्रा करीत पंढरपुराला जाऊ लागला. मग जिथे म्हणून त्याचा मुक्काम पडायचा, तिथे गावातले लोक वारकर्‍यांची सेवा पाहुणचार म्हणून शेवटी आपल्या धर्माची व संस्कृतीचीच पाठराखण करायला निर्भयपणे घराबाहेर पडू लागले. थोडक्यात देवळातला देव धोक्यात आला, तेव्हा याच संत परंपरेने मनातली धर्माची व संस्कृतीची अस्मिता जपण्याची सामुहिक मोहिम चालविली होती. ती सुद्धा चळवळच होती. भारतातले धर्म मुळातच संघटित स्वरूपातले नव्हते आणि आक्रमक परके तर संघटित धर्माची व धर्मप्रसाराचीच मोहिम घेऊन अंगावर आलेले. त्यातून धर्म व संस्कृती जगवण्याचा प्राथमिक प्रयास केला, तो संत परंपरेने. पुढे त्या जगवलेल्या संस्कृती व धर्माच्या अस्मितेतून क्षात्रधर्माचे स्फ़ुल्लींग पेटवण्याचे काम शिवाजी महाराज व समर्थांनी शिरावर घेतले. तिथून संत परंपरा खंडीत झाल्यासारखी दिसते. म्हणजे वारकरी संप्रदायाचे सामुहिक चळवळीचे इतिकर्तव्य तिथे थांबले. कारण देवळांचे संरक्षण करणारा समर्थ राजा व योद्धा उदयास आला होता. म्हणून की काय, त्याच संत परंपरेची धुरा पुढल्या काळात देवळांची नव्याने उभारणी करणार्‍या समर्थांकडे आलेली दिसते. गावोगावी त्यांनी नव्याने देवळांची, देवस्थानांची उभारणी करण्याची मोहिम हाती घेतली. (अपुर्ण)

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

इतिहासातले ते अजोड उदाहरण

सामर्थ्य आहे चळवळीचे (२)

  महाराष्ट्रामध्ये संत परंपरा खुप जुनी आहे आणि त्या परंपरेने या देशाची व समाजाची अस्मिता जागवण्याचे सातत्याने काम केलेले आहे. विशेषत: ज्या ज्या कालखंडात स्थानिक समाजामध्ये निराशा व दुबळेपणाची भावना सोकावली आणि परचक्र आले, तेव्हा सामाजिक पुरूषार्थाला ग्लानी आलेली होती. त्यावेळी हा समाज लढण्याची वा प्रतिकाराची कुवत गमावून बसला होता. त्या त्या काळात संतांनी अध्यात्माच्या मार्गाने अस्मिता जगवण्याचे बहूमोलाचे काम केलेले आहे. सातव्या शतकात इस्लामचा उदय झाला आणि प्रेषित महंमदाच्या निर्वाणानंतर इस्लामी धर्मप्रसारकांच्या झुंडीच्या झुंडी हातात तलवार घेऊन शस्त्रबळाने अनेक धर्मसंस्कृती जमीनदोस्त करीत सरसावल्या, त्याच काळात हिंदुस्तान वगळता अन्य देश इस्लामी आक्रमणाला शरण गेले. आपले अस्तित्व व अस्मिता हरवून बसले. त्याच काळात इस्लामसह ख्रिस्ती आक्रमणाला समर्थपणे तोंड देऊन आपली अस्मिता व संस्कृती जपू शकलेला जगाच्या पाठीवरचा एकच समाज आहे, त्याचे नाव हिदूधर्म आणि एकच देश आहे त्याचे नाव हिंदूस्तान. त्याच श्रेय प्रामुख्याने सामाजिक पुरूषार्थ किवा लढवय्येपणापेक्षाही जास्त, इथल्या संत परंपरेला आहे. कारण राजकीय सत्ता व त्यांचा पुरूषार्थ धर्म रक्षणात तोकडे पडले; तेव्हा ती जबाबदारी हत्याराशिवाय समर्थपणे पार पाडली, ती इथल्या संतांनी. मुर्तीपूजेच्या संस्कृतीमध्ये देवळांचे व मंदिरांचे महत्व इतके मोठे असताना आणि तीच धर्मस्थाने सत्तेच्या व तलवारीच्या बळावर जमीनदोस्त केली जात असताना, त्याच भोवती केंद्रीत झालेली धर्माची अस्मिता वेगळी संतांनीच अबाधित राखली. जे काम तेव्हा पराभूत मनोवृत्तीच्या लढवय्यांना करता आले नाही आणि धर्मसंस्कृतीला वाचवता आले नाही, त्या कालखंडात हिंदूस्तानी समाजाच्या श्रद्धा व अस्मिता मंदिराच्या बाहेर सुरक्षित व अभेद्य राखण्याचे काम संतांनी केले. अशी ही तेरा चौदा शतकांची संत परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. त्याच संत परंपरेतून प्रामुख्याने महाराष्ट्रातच अध्यात्माच्या मार्गाने नव्या भारतीय अस्मितेचा स्फ़ुल्लींग फ़ुलला. त्यांनीच अध्यात्मातून अस्मिता, अभिमान व झुंजार वृत्तीला जिवित ठेवले आणि पुनरुज्जीवित केले. त्या परंपरेतला शेवटचा दुवा समर्थ रामदास स्वामी असावेत हा योगायोग म्हणता येणार नाही.

   एका बाजूला संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम इत्यादींची सोशिक व सहिष्णूतेचे पाठ देणारी संत परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. जिने वारकरी संप्रदाय निर्माण केला. जेव्हा आपला पिढीजात धर्म परकीय सत्ताधार्‍यांच्या जुलूमामुळे उघडपणे पाळण्याचे भय होते, तेव्हा नुसत्या वार्‍या व भजन प्रवचनाने या संतांनी आपल्या धर्माचे सामुहिकीकरण करण्याचे संघटनात्मक कार्य हाती घेतले होते. एकप्रकारे तेच सामाजिक व तितकेच राजकीय कार्य होते. कारण परचक्रामुळे आपल्याच धर्म संस्कृतीला राजाश्रय सोडाच संरक्षण मिळेनासे झाले होते आणि पुजारी वर्गाने समाजाचे सांस्कृतिक धार्मिक नेतृत्व करण्याकडे पाठ फ़िरवली होती. पर्यायाने समाजाच्या विविध घटकांमध्ये जातीपातीच्या वितुष्टातून विस्कळीतपणा येऊन, त्याच्या एकजीव असण्यालाच सुरुंग लागला होता. अशा विस्कळीत सांस्कृतिक समाजाचे लचके तोडले जात होते. त्याला उत्तर द्यायला ही संतांची परंपरा सामाजिक गरज म्हणून निर्माण झाली. पण त्या वारकरी संप्रदायातील संत आणि समर्थ रामदास स्वामी यात मोठाच फ़रक आहे. वारकरी संप्रदायात समर्थ रामदास आढळत नाहीत. ते संन्याशी व शस्त्रबळाचे उपासक असल्यासारखे दिसतात. त्यांनी अध्यात्माचे धडे दिलेले असले तरी त्यातली राजकीय व लढावू शिकवण मोलाची होती, आधीच्या संतांनी आणि वारकरी संप्रदायाने जगवलेल्या अस्मितेला जोजावत सामर्थ्यशाली बनवण्याचे पाठ समर्थांच्या शिकवणीत दिसतात. त्याच कालखंडात नव्याने क्षात्रधर्माचा व लढवय्या वर्गाचा उदय होऊ लागला होता. शिवरायांच्या रुपाने जाणता राजा व श्रीमान योगी उदयास येत होता. व्यक्तीगत महत्वाकांक्षा व राजलालसा याच्या पलिकडे जाऊन समाज व राष्ट्रधर्माचा विचार करू शकणारा राजा उदयास येत होता. सत्ता व धनदौलत मिळवण्यात बाकीचे राजे सरदार गर्क असताना राष्ट्राचा उद्धार करायला कटीबद्ध झालेला नवा राजा नवे साम्राज्य निर्माण करायला पुढे सरसावला होता. असे दोन महात्मे महापुरूष नेमक्या एकाच काळात महाराष्ट्राने बघितले. त्यांनी परस्पर पुरक काम करताना बघितले. त्यांच्या त्याच कामातून परचक्राला थोपवणारी पहिली ताकद अवघ्या हिंदूस्तानात फ़क्त महाराष्ट्राय्त उदयास आली. शेकडो वर्षे राजयोग भोगणारे व पिढीजात सत्ता भोगून आळसावलेले अमीरउमराव, सरदार राजे परचक्राला शरण जात असताना शिवरायांनी हिंदुस्तानचे नवे सामाज्य उभारण्याचे स्वप्न बघितले आणि त्याचा पायासुद्धा घातला. तोच नेमका समर्थ रामदास स्वामींचा कालखंड असावा हा योगायोग मानता येणार नाही. दोघांच्या कार्यातला समान दुवाही समजून घेण्यासारखा आहे. पण दुर्दैव असे, की त्यांच्यातले संबंध व नाते शोधण्याचेच वादविवाद रंगवले जातात.

   एका बाजूला समर्थ रामदास स्वामी जन्माने ब्राह्मण असल्याने त्यांचीच थोरवी हिरीरीने मांडणारे असतात आणि दुसर्‍या बाजूने आपल्या जातीचा म्हणूनच शिवरायांना बघणारे जन्माने त्यांना मराठा म्हणून त्यांच्या ऐतिहासिक अपूर्व कार्याचा संकोच जातीपुरता मर्यादित करू बघतात. त्यातून समर्थ हे शिवरायांचे गुरू होते किंवा नव्हते, यावरून विवाद रंगवला जातो. तर दुसरीकडे त्याच दोघांना एकमेकांचे शत्रू म्हणूनही पेश करण्याचा आक्रस्ताळेपणा रंगतो. दोघांनी केलेले काम देशाच्या व समाजाच्या पुनरुत्थानाचे आहे, याकडे मग सोयीस्कर दुर्लक्ष होते. एक आपल्या अध्यात्मिक बुद्धीमत्तेतून भारतीय समाजातील पुरूषार्थ जागवण्याचे अविरत कार्य करीत होता आणि दुसर्‍याच्या राष्ट्र उभारणीच्या स्वप्नाला पुरक अशी कामगिरी बजावत होता. शिवराय संसारी जीवनात व राजकीय सत्तेच्या क्षेत्रात असूनही अध्यात्मिक होते आणि समर्थ रामदास अध्यात्माच्या क्षेत्रात असूनही राजकीय लढ्याला प्रोत्साहन उत्तेजन देण्याच्या कामात गर्क होते. हे दोघे कधी कुठे भेटले किंवा त्यांचे परस्परांशी कसे संबंध होते; हा इतिहास संशोधनाचा विषय आहे. असायलाही हरकत नाही. पण त्या दोघाचे मार्ग व काम परस्परांना छेद देणारे अजिबात नव्हते, ही महत्वाची बाब आहे. त्याकडे पाठ फ़िरवून इतिहासाचेही खरे व योग्य आकलन होऊ शकणार नाही. कारण दोघांनाही एका विशिष्ठ परिस्थितीने जन्माला घातले होते आणि घडवले होते. त्यांचे जीवनकार्यच परस्पर पुरक होते, ही वस्तुस्थिती कुठलाही इतिहास नाकारू शकणार नाही. मग त्यातल्या एकाने दुसर्‍याला गुरू मानलेला असो किंवा दुसर्‍याने पहिल्याला अनुग्रह दिलेला असो वा नसो. दोघांची भेटही झालेली नसेल, म्हणून बिघडत नाही. पण त्यांनी महाराष्ट्र व भारतीय इतिहासामध्ये बजावलेली कामगिरी विलक्षण परस्पर पुरक आहे. म्हणूनच इतिहासातले ते अजोड उदाहरण मानावे लागेल. मग ते सत्य कोणाला आवडणारे असो किंवा नसो.

   दोघांमधले विलक्षण साम्य नजरेत भरणारे आहे. कारण दोघांनीही आधीच्या संत वा राजकीय परंपरांना छेद देऊन आपला मार्ग चोखाळला आहे, शिवाजी राजांकडे सरदारी वा सरंजामी होती. पिढीजात चालत आलेली चाकरी झुगारण्याचा मार्ग त्यांनी चोखाळला. आयती मिळालेली जहागिरी उपभोगण्यापेक्षा त्यांनी स्वयंभू स्वतंत्र अस्मितेचा आणि रयतेचा राजा होऊन त्यांनी रयतेला तिच्या अस्मितेसाठी लढायला उभे केले. सामान्य घरातून तळागाळातून लढवय्ये उभे करून त्यांना स्वातंत्र्याची चव चाखवली. म्हणजेच जहागिरीची मळलेली वाट सोडून शिवराय वेगळी वाट चालत गेले. दुसरीकडे समर्थ रामदास यांनी गोसावी किंवा संत म्हणून राजकारणाकडे पाठ फ़िरवली नाही. संत असून वारकरी संप्रदायाचा भजन पूजनाचा मंत्र लोकांना देण्यापेक्षा परकीय सत्तेला डिवचणार्‍या धार्मिक स्वयंभूत्वाची शिकवण अध्यात्मातून देण्याचा नवाच मार्ग चोखळला. देव देव्हार्‍यात नाही, अशी शिकवण देऊन हिंदू अस्मिता जगवणार्‍या संतांच्या परंपरेतल्या समाजाला त्यांनी देवळे उभारण्याकडे वळवले. त्यातून उजळमाथ्याने व अभिमानाने आपल्या धर्माचा हुंकार करण्यास उभे करण्याचा पवित्रा घेतला, समाजाला आपल्या धर्मासाठी व अस्मितेसाठी लढायची उमेद व प्रेरणा रहात्या गावात मिळावी, म्हणून गावागावात मंदिरे उभारण्याचा सपाटा लावला. आपली अस्मिता देवळात म्हणजे आपल्या अस्मितेचे प्रतिक गावागावात उभे करून त्याच्या संरक्षणार्थ उभे रहाण्याचे आवाहनच समर्थांनी चालविले होते. त्यातून जी लढण्याची व प्रतिकाराला पुढे येण्याची चालना निर्माण झाली, ती स्वराज्याच्या उभारणीसाठी लढवय्ये निर्माण व्हायला हातभार लावणारी होती. थोडक्यात आपापल्या भिन्न मार्गाने दोघे महापुरूष भारतीय समाजाची व अस्मितेची नव्याने उभारणी करायचे परस्पर पुरक काम एकाच वेळी करताना दिसतात. त्यांच्या कामात परस्पर विरोध नव्हता किंवा विरोधाभासही दिसत नाही. (अपूर्ण)

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

महापुरूषांचे परस्पर पुरक कार्य

  महाराष्ट्रामध्ये संत परंपरा खुप जुनी आहे आणि त्या परंपरेने या देशाची व समाजाची अस्मिता जागवण्याचे सातत्याने काम केलेले आहे. विशेषत: ज्या ज्या कालखंडात स्थानिक समाजामध्ये निराशा व दुबळेपणाची भावना सोकावली आणि परचक्र आले, तेव्हा सामाजिक पुरूषार्थाला ग्लानी आलेली होती. त्यावेळी हा समाज लढण्याची वा प्रतिकाराची कुवत गमावून बसला होता. त्या त्या काळात संतांनी अध्यात्माच्या मार्गाने अस्मिता जगवण्याचे बहूमोलाचे काम केलेले आहे. सातव्या शतकात इस्लामचा उदय झाला आणि प्रेषित महंमदाच्या निर्वाणानंतर इस्लामी धर्मप्रसारकांच्या झुंडीच्या झुंडी हातात तलवार घेऊन शस्त्रबळाने अनेक धर्मसंस्कृती जमीनदोस्त करीत सरसावल्या, त्याच काळात हिंदुस्तान वगळता अन्य देश इस्लामी आक्रमणाला शरण गेले. आपले अस्तित्व व अस्मिता हरवून बसले. त्याच काळात इस्लामसह ख्रिस्ती आक्रमणाला समर्थपणे तोंड देऊन आपली अस्मिता व संस्कृती जपू शकलेला जगाच्या पाठीवरचा एकच समाज आहे, त्याचे नाव हिदूधर्म आणि एकच देश आहे त्याचे नाव हिंदूस्तान. त्याच श्रेय प्रामुख्याने सामाजिक पुरूषार्थ किवा लढवय्येपणापेक्षाही जास्त, इथल्या संत परंपरेला आहे. कारण राजकीय सत्ता व त्यांचा पुरूषार्थ धर्म रक्षणात तोकडे पडले; तेव्हा ती जबाबदारी हत्याराशिवाय समर्थपणे पार पाडली, ती इथल्या संतांनी. मुर्तीपूजेच्या संस्कृतीमध्ये देवळांचे व मंदिरांचे महत्व इतके मोठे असताना आणि तीच धर्मस्थाने सत्तेच्या व तलवारीच्या बळावर जमीनदोस्त केली जात असताना, त्याच भोवती केंद्रीत झालेली धर्माची अस्मिता वेगळी संतांनीच अबाधित राखली. जे काम तेव्हा पराभूत मनोवृत्तीच्या लढवय्यांना करता आले नाही आणि धर्मसंस्कृतीला वाचवता आले नाही, त्या कालखंडात हिंदूस्तानी समाजाच्या श्रद्धा व अस्मिता मंदिराच्या बाहेर सुरक्षित व अभेद्य राखण्याचे काम संतांनी केले. अशी ही तेरा चौदा शतकांची संत परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. त्याच संत परंपरेतून प्रामुख्याने महाराष्ट्रातच अध्यात्माच्या मार्गाने नव्या भारतीय अस्मितेचा स्फ़ुल्लींग फ़ुलला. त्यांनीच अध्यात्मातून अस्मिता, अभिमान व झुंजार वृत्तीला जिवित ठेवले आणि पुनरुज्जीवित केले. त्या परंपरेतला शेवटचा दुवा समर्थ रामदास स्वामी असावेत हा योगायोग म्हणता येणार नाही.

   एका बाजूला संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम इत्यादींची सोशिक व सहिष्णूतेचे पाठ देणारी संत परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. जिने वारकरी संप्रदाय निर्माण केला. जेव्हा आपला पिढीजात धर्म परकीय सत्ताधार्‍यांच्या जुलूमामुळे उघडपणे पाळण्याचे भय होते, तेव्हा नुसत्या वार्‍या व भजन प्रवचनाने या संतांनी आपल्या धर्माचे सामुहिकीकरण करण्याचे संघटनात्मक कार्य हाती घेतले होते. एकप्रकारे तेच सामाजिक व तितकेच राजकीय कार्य होते. कारण परचक्रामुळे आपल्याच धर्म संस्कृतीला राजाश्रय सोडाच संरक्षण मिळेनासे झाले होते आणि पुजारी वर्गाने समाजाचे सांस्कृतिक धार्मिक नेतृत्व करण्याकडे पाठ फ़िरवली होती. पर्यायाने समाजाच्या विविध घटकांमध्ये जातीपातीच्या वितुष्टातून विस्कळीतपणा येऊन, त्याच्या एकजीव असण्यालाच सुरुंग लागला होता. अशा विस्कळीत सांस्कृतिक समाजाचे लचके तोडले जात होते. त्याला उत्तर द्यायला ही संतांची परंपरा सामाजिक गरज म्हणून निर्माण झाली. पण त्या वारकरी संप्रदायातील संत आणि समर्थ रामदास स्वामी यात मोठाच फ़रक आहे. वारकरी संप्रदायात समर्थ रामदास आढळत नाहीत. ते संन्याशी व शस्त्रबळाचे उपासक असल्यासारखे दिसतात. त्यांनी अध्यात्माचे धडे दिलेले असले तरी त्यातली राजकीय व लढावू शिकवण मोलाची होती, आधीच्या संतांनी आणि वारकरी संप्रदायाने जगवलेल्या अस्मितेला जोजावत सामर्थ्यशाली बनवण्याचे पाठ समर्थांच्या शिकवणीत दिसतात. त्याच कालखंडात नव्याने क्षात्रधर्माचा व लढवय्या वर्गाचा उदय होऊ लागला होता. शिवरायांच्या रुपाने जाणता राजा व श्रीमान योगी उदयास येत होता. व्यक्तीगत महत्वाकांक्षा व राजलालसा याच्या पलिकडे जाऊन समाज व राष्ट्रधर्माचा विचार करू शकणारा राजा उदयास येत होता. सत्ता व धनदौलत मिळवण्यात बाकीचे राजे सरदार गर्क असताना राष्ट्राचा उद्धार करायला कटीबद्ध झालेला नवा राजा नवे साम्राज्य निर्माण करायला पुढे सरसावला होता. असे दोन महात्मे महापुरूष नेमक्या एकाच काळात महाराष्ट्राने बघितले. त्यांनी परस्पर पुरक काम करताना बघितले. त्यांच्या त्याच कामातून परचक्राला थोपवणारी पहिली ताकद अवघ्या हिंदूस्तानात फ़क्त महाराष्ट्राय्त उदयास आली. शेकडो वर्षे राजयोग भोगणारे व पिढीजात सत्ता भोगून आळसावलेले अमीरउमराव, सरदार राजे परचक्राला शरण जात असताना शिवरायांनी हिंदुस्तानचे नवे सामाज्य उभारण्याचे स्वप्न बघितले आणि त्याचा पायासुद्धा घातला. तोच नेमका समर्थ रामदास स्वामींचा कालखंड असावा हा योगायोग मानता येणार नाही. दोघांच्या कार्यातला समान दुवाही समजून घेण्यासारखा आहे. पण दुर्दैव असे, की त्यांच्यातले संबंध व नाते शोधण्याचेच वादविवाद रंगवले जातात.

   एका बाजूला समर्थ रामदास स्वामी जन्माने ब्राह्मण असल्याने त्यांचीच थोरवी हिरीरीने मांडणारे असतात आणि दुसर्‍या बाजूने आपल्या जातीचा म्हणूनच शिवरायांना बघणारे जन्माने त्यांना मराठा म्हणून त्यांच्या ऐतिहासिक अपूर्व कार्याचा संकोच जातीपुरता मर्यादित करू बघतात. त्यातून समर्थ हे शिवरायांचे गुरू होते किंवा नव्हते, यावरून विवाद रंगवला जातो. तर दुसरीकडे त्याच दोघांना एकमेकांचे शत्रू म्हणूनही पेश करण्याचा आक्रस्ताळेपणा रंगतो. दोघांनी केलेले काम देशाच्या व समाजाच्या पुनरुत्थानाचे आहे, याकडे मग सोयीस्कर दुर्लक्ष होते. एक आपल्या अध्यात्मिक बुद्धीमत्तेतून भारतीय समाजातील पुरूषार्थ जागवण्याचे अविरत कार्य करीत होता आणि दुसर्‍याच्या राष्ट्र उभारणीच्या स्वप्नाला पुरक अशी कामगिरी बजावत होता. शिवराय संसारी जीवनात व राजकीय सत्तेच्या क्षेत्रात असूनही अध्यात्मिक होते आणि समर्थ रामदास अध्यात्माच्या क्षेत्रात असूनही राजकीय लढ्याला प्रोत्साहन उत्तेजन देण्याच्या कामात गर्क होते. हे दोघे कधी कुठे भेटले किंवा त्यांचे परस्परांशी कसे संबंध होते; हा इतिहास संशोधनाचा विषय आहे. असायलाही हरकत नाही. पण त्या दोघाचे मार्ग व काम परस्परांना छेद देणारे अजिबात नव्हते, ही महत्वाची बाब आहे. त्याकडे पाठ फ़िरवून इतिहासाचेही खरे व योग्य आकलन होऊ शकणार नाही. कारण दोघांनाही एका विशिष्ठ परिस्थितीने जन्माला घातले होते आणि घडवले होते. त्यांचे जीवनकार्यच परस्पर पुरक होते, ही वस्तुस्थिती कुठलाही इतिहास नाकारू शकणार नाही. मग त्यातल्या एकाने दुसर्‍याला गुरू मानलेला असो किंवा दुसर्‍याने पहिल्याला अनुग्रह दिलेला असो वा नसो. दोघांची भेटही झालेली नसेल, म्हणून बिघडत नाही. पण त्यांनी महाराष्ट्र व भारतीय इतिहासामध्ये बजावलेली कामगिरी विलक्षण परस्पर पुरक आहे. म्हणूनच इतिहासातले ते अजोड उदाहरण मानावे लागेल. मग ते सत्य कोणाला आवडणारे असो किंवा नसो.

   दोघांमधले विलक्षण साम्य नजरेत भरणारे आहे. कारण दोघांनीही आधीच्या संत वा राजकीय परंपरांना छेद देऊन आपला मार्ग चोखाळला आहे, शिवाजी राजांकडे सरदारी वा सरंजामी होती. पिढीजात चालत आलेली चाकरी झुगारण्याचा मार्ग त्यांनी चोखाळला. आयती मिळालेली जहागिरी उपभोगण्यापेक्षा त्यांनी स्वयंभू स्वतंत्र अस्मितेचा आणि रयतेचा राजा होऊन त्यांनी रयतेला तिच्या अस्मितेसाठी लढायला उभे केले. सामान्य घरातून तळागाळातून लढवय्ये उभे करून त्यांना स्वातंत्र्याची चव चाखवली. म्हणजेच जहागिरीची मळलेली वाट सोडून शिवराय वेगळी वाट चालत गेले. दुसरीकडे समर्थ रामदास यांनी गोसावी किंवा संत म्हणून राजकारणाकडे पाठ फ़िरवली नाही. संत असून वारकरी संप्रदायाचा भजन पूजनाचा मंत्र लोकांना देण्यापेक्षा परकीय सत्तेला डिवचणार्‍या धार्मिक स्वयंभूत्वाची शिकवण अध्यात्मातून देण्याचा नवाच मार्ग चोखळला. देव देव्हार्‍यात नाही, अशी शिकवण देऊन हिंदू अस्मिता जगवणार्‍या संतांच्या परंपरेतल्या समाजाला त्यांनी देवळे उभारण्याकडे वळवले. त्यातून उजळमाथ्याने व अभिमानाने आपल्या धर्माचा हुंकार करण्यास उभे करण्याचा पवित्रा घेतला, समाजाला आपल्या धर्मासाठी व अस्मितेसाठी लढायची उमेद व प्रेरणा रहात्या गावात मिळावी, म्हणून गावागावात मंदिरे उभारण्याचा सपाटा लावला. आपली अस्मिता देवळात म्हणजे आपल्या अस्मितेचे प्रतिक गावागावात उभे करून त्याच्या संरक्षणार्थ उभे रहाण्याचे आवाहनच समर्थांनी चालविले होते. त्यातून जी लढण्याची व प्रतिकाराला पुढे येण्याची चालना निर्माण झाली, ती स्वराज्याच्या उभारणीसाठी लढवय्ये निर्माण व्हायला हातभार लावणारी होती. थोडक्यात आपापल्या भिन्न मार्गाने दोघे महापुरूष भारतीय समाजाची व अस्मितेची नव्याने उभारणी करायचे परस्पर पुरक काम एकाच वेळी करताना दिसतात. त्यांच्या कामात परस्पर विरोध नव्हता किंवा विरोधाभासही दिसत नाही. (अपूर्ण)

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

महापुरूषांची शोकांतिका

ज्ञान की जैसे सीमा ज्ञानी
गागर मे सागर का पानी

   ‘आम्रपाली’ नावाचा सम्राट अशोकाच्या जीवनावर आधारीत एक हिंदी चित्रपट चार दशकांपुर्वी येऊन गेला. त्यामध्ये लतादिर्दींच्या स्वरातील एका गीतामधल्या या ओळी आहेत. कवीचे हे बोल अतिशय उदबोधक आहेत. विद्वान किंवा बुद्धीमंत स्वत:ला सर्वज्ञानी समजत असतो. त्याला अवघ्या जगाचे ज्ञान प्राप्त झाले अशीच त्याची समजूत असते. म्हणूनच आपणच ज्ञानाची सीमा किंवा हद्द आहोत; अशी त्याची ठाम समजूत असते. आपल्याला जेवढे उमगले आहे, त्यापेक्षा विश्वात आणखी काहीच ज्ञान नाही; म्हणूनच आपण ज्ञानाची परीसीमा आहोत, अशी त्याची धारणा असते. पण ती कितपत सत्य व वास्तव असते? विशाल सागराचे पाणी घागरीत भरून घ्यावे आणि त्यालाच सागर समजावे, असेच ते अ‘ज्ञान’ असते. कारण घागरीतल्या पाण्याच्या अनंत पटीने सागर शिल्लक असतो आणि कुठल्याही घागरीत वा पात्रामध्ये मावणार नाही; असे त्याचे अथांग आकारमान असते. पण त्याचे भान सुटले, मग व्यक्ती स्वत:ला ज्ञानाची परीसीमा मानू लागते. ज्ञानाचा विद्वत्तेचा अहंकार चढलेल्या बुद्धीमंताची ही स्थिती असेल, तर मग त्याच्या अनुयायाची किंवा भक्ताची अवस्था काय असू शकते? त्याला तर आपला गुरू वा बुद्धीमंत स्वामीच सर्वव्यापी व जगाचा नियंता वाटू लागतो. पण प्रत्यक्षात त्याच्या गुरूचे ज्ञानच घागरीत मावेल, इतक्या सागराच्या पाण्यासारखे क्षुल्लक असते. पण स्वामी वा गुरूपेक्षा त्या अनुयायी भक्ताचा अहंकार अधिक मोठा असतो. त्याला तर अवघ्या जगाचे ज्ञानच आपल्या मुठीत बंद झाल्यासारखे वाटत असते. त्याबद्दल चर्चा वा चिकित्साही करायची त्या भक्ताची तयारी नसते. आणि असे कोणी सामान्य बुद्धीचे भक्तगण असतात असेही मानायचे कारण नाही. त्या भक्ताला साक्षात त्याच्या गुरू वा स्वामीनेही सत्य सांगायचा प्रयास केला, तरी भक्त त्यावर विश्वास ठेवू शकत नाही. गुरूला मान्य असलेली स्वत:मधली त्रुटीही, त्याच्या भक्ताला मान्य होऊ शकत नाही. ही जगातील वास्तविकता आहे. ख्रिश्चन धर्माच्या प्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक सेन्ट मार्टीन ल्युथर त्याचीच साक्ष देतो. तो म्हणतो,

    ‘ख्रिस्ताच्या शिकवणूकीतून जे जग आमच्या समोर मांडले गेले आहे, त्यावर माझा इतका दृढ विश्वास आहे, की त्यातील शब्द न शब्दाला आपण धट्ट धरून रहायला हवे असे मी म्हणेन. त्यामुळे उद्या स्वर्गातील सर्वच्या सर्व देवदूत जरी स्वर्गातून खाली उतरून नव्या कराराच्या विरुद्ध मला काही सांगू लागले, तरी मी त्यातील एकाही अक्षराचा विश्वास धरणार नाही. उलट त्यांचे शब्द कानांनी ऐकावे लागू नयेत, म्हणून मी कान आणि डोळे बंद करून घेईन’. असे म्हणणारा सेन्ट मार्टीन ल्युथर कोण आहे आणि कोणाची शिकवण तो सांगतो आहे? ख्रिस्ताची शिकवण म्हणजे त्या प्रेषीताला स्वर्गातल्या देवदूतांनी दिलेले संदेशच होत. म्हणजे ख्रिस्ताला देवदूतांनी जे सांगितले असे त्यानेच नव्या करारातून सांगितले आहे; त्यात देवदूतालाही दुरुस्ती करण्याची मोकळीक हा ख्रिस्ताचा अनुयायी द्यायला तयार नाही. कुठल्याही अनुयायाची व भक्ताची हीच अवस्था असते. त्याला उमगलेले ज्ञान वास्तवाशी निगडीत असायचे कारण नसते. आणि कुठल्याही महापुरूष व महात्म्याची अवस्था नेमकी अशीच असते. त्याच्या अनुयायांना तो जसा व जितका आकलन झाला आहे, त्यापेक्षा वेगळा असायची मुभा भक्तही त्या स्वामी, परमेश्वर किंवा गुरूला, महापुरूषाला देत नसतात. तिथे आपल्यासारख्या सामान्यजनांची काय कथा?


   विचार तत्वज्ञानाची ही़च तर शोकांतिका असते. त्यामागे ताकद नसते, तेव्हा ते निर्जीव निष्क्रिय दुर्लक्षित पडून रहाते. त्याच्या मागे ताकद उभी राहिल्याशिवाय त्याची परिणामकारक सिद्ध होत नाही. पण ती ताकद म्हणून जी झुंड उभी रहाते, त्या झुंडीच्या आकलनानुसार त्या विचार किंवा तत्वज्ञानाचा व्यवहारी अविष्कार होत जातो. त्यात पहिला बळी पडत असतो, तो ज्याने विचार मांडले खुद्द त्याच विद्वानाचा. कारण त्याचे अनुयायी म्हणवणारे त्या थोरपुरूषाच्या नावावर स्वत:चे आकलनच सक्तीने लोकांच्या गळी मारायचा उद्योग भरभराटीस आणतात. अशा आक्रमक शक्तीशाली आकलनाखाली वास्तविक मुळचा विचार गाडला जात असतो. म्हणूनच मानवी इतिहासात बहुधा कुठलाही विचारवंत वा महापुरूष, महात्मा आपल्याच अनुयायांच्या तावडीतून सुटू शकलेला नाही. इतिहास त्याचा साक्षीदार आहे. आज विविध पातळीवर होणार्‍या चर्चा, वादविवाद किंवा आंदोलने व संमेलने, यातला विसंवाद त्यातूनच आलेला दिसेल. अगदी एकाच विचारधारेचे पाईक एकमेकांवर धावून जाण्याइतके परस्पर विरोधी दावे करीत असतात. समान विचारधारेचा वारसा सांगणारेच एकमेकांचे असे शत्रू का होतात; असा आपल्याला अनेकदा संभ्रम होतो. त्याचे हेच कारण आहे. त्या विचारांचे भिन्न आकलन त्या अनुयायांना एकमेकांच्या विरोधात उभे करत असते. जसे एकाच घरातले भाऊबंद पराकोटीचे दुष्मन व्हावेत, पण एकाच मूळपुरूषाचा वारसा सांगत त्याच्या मालमत्तेवरचा मक्तेदार हक्क सांगत भांडावेत, तसे हे एकाच विचारधारेचे अनुयायी भाऊबंदकी करताना दिसतात. त्याला विचारातील विरोधाभास नव्हे, तर आकलनातला विरोधाभास कारण होत असतो. असे अनुयायी मूळपुरूषाचा वारसा सांगणारे असतात, तरी दुसर्‍या तिसर्‍या पिढीतल्या आपल्या अत्यंत निकटच्या जन्मदात्याचाच वारसा घेऊन लढायला उभे ठाकलेले असतात. इथे विचारधारेचे अनुयायी सुद्धा तसेच समोरासमोर उभे ठाकलेले दिसतील. ते मूळ विचारवंत महापुरूषाचा वारसा तोंडाने सांगत असले, तरी ज्याचे आकलन स्विकारलेले असते, त्याच्या बाजूने लढायला उभे राहिलेले असतात. म्हणूनच मग समान विचारधारेचे अनुयायीच परस्पर विरोधी दावे करीत हमरातुमरीला आलेले दिसतात. त्यातून त्याच विचारधारा किंवा परंपरेचे धिंडवडे काढण्यात पुढाकार घेत असतात. त्याच विचारांची व तत्वांची अक्तरे करीत असतात.

   भारताच्याच नव्हेतर जगाच्या इतिहासात त्याची शेकडो उदाहरणे सापडतील. भारताला हजारो वर्षाचा इतिहास आहे. त्या इतिहासात शेकडो महात्मे उदयास आले आणि त्यांनी आपापल्या परीने चिंतन करून या समाजाला उन्नत करण्याचा आपापल्या मार्गाने प्रयास केलेला आहे. कोणी निव्वळ चिंतन, तत्वज्ञानाने तर कोणी हाती शस्त्र घेऊन अस्मितेच्या रुपाने, कोणी विविध प्रकारचे संशोधन व अभ्यासातून समाजाची उन्नती घडवली, तर कोणी वैचारिक सामाजिक उत्थानातून देशाला घडवण्याचा प्रयास केलेला आहे. त्या त्या कालखंडातील परिस्थिती व साधनांच्या उपलब्धतेनुसार त्यांनी कार्य तडीस नेण्याचा प्रयत्न केला. पण ज्यांना आपण महात्मे, महापुरूष, चिंतक म्हणून ओळखतो, अशा प्रत्येकाचा प्रयास समाज व देशाला उन्नतीकडेच घेऊन जाण्याचा होता. दुर्दैवाने त्यांच्या अनुयायांनी, भक्तांनी, पाठीराख्यांनी किंवा शिष्यांनीच त्यांचा पराभव केलेला दिसतो. ज्या जंजाळातून समाजाला मुक्त करण्याचे प्रयास त्या महात्म्यांनी केलेले असतात व त्यासाठीच आपले जीवन समर्पित केलेले असते; त्यांच्याच विचार व उत्थानाच्या तत्वांचा उपयोग पुन्हा त्या समाजाला प्रथा परंपरांच्या जंजाळात गुरफ़टून टाकण्यासाठी होत असतो. मात्र त्यासाठी त्या महात्म्यांच्या विचार व चिंतनाचे जसे ज्याला आकलन झाले, त्याचाच अशी वारस व्यक्ती एक जंजाळ बनवते आणि त्यालाच प्रतिक बनवून त्याचा मायाबाजार बनवत असते. अशारितीने मग त्या महात्म्याला बाजूला टाकून अनुयायीच स्वत:चे महात्म्य निर्माण करीत असतात. त्यासाठी मग दुसर्‍या कुणा महात्म्याची खिल्ली उडवली जाते. दोन वा अधिक महापुरूषांमध्ये भिंती उभारल्या जातात. त्यांचे विचार परस्पर विरोधी वा एकमेकांसमोर युद्धाच्या तयारीत उभे केले जातात. असे महापुरूष एकमेकांचे शत्रू होते किंवा त्यांच्यात वैरभावना होती, असे आभास निर्माण केले जातात. पण वास्तवात पाहिल्यास सर्वच महात्म्यांनी परस्पर विच्छेदक भूमिका न घेता, परस्पर पुरक समाज उत्थानाचेच कार्य केलेले दिसते. त्यांच्या दिशा भिन्न वा छटा वेगवेगळ्याही दिसतात. पण एकूणच मानव जात किंवा समाजाच्या उन्नती वा भल्यासाठीच त्यांनी कार्य केलेले दिसते. मात्र ते सत्य मानले व त्यानुसार वाटचाल केली, तर त्याच तत्वांचे व विचारांचे मायाबाजार उभे करणार्‍यांची दुकाने बंद होण्याचा धोका असतो. म्हणूनच या दुकानदारांना महात्मे व महापुरूष एकमेकांच्या विरोधात युद्धसज्ज अवस्थेत आणून उभे करावे लागतात. ज्यांनी समाज जोडायचे काम केले, त्यांनाच समाज तोडण्याचे हत्यार म्हणून उभे धार लावली जाते. (अपुर्ण) 

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१३

मोदींपेक्षा राहुल ‘भारी’



  अलिकडल्या काही दिवसात राहुल गांधींनी जाहिरसभा घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यातून त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जबरदस्त धक्का दिल्याच्या फ़ेसबुकवरील प्रतिक्रिया आणि एकूणच वाहिन्यांवरील चर्चा ऐकल्यावर मनापासून हसू आले. पहिली गोष्ट अशी, की समोर दिसते म्हणून आपण बघतोच असे नसते आणि कानावर पडलेला प्रत्येक आवाज आपण ऐकतोच असेही अजिबात नसते. त्यातले आपल्याला हवे तेच आपण बघत असतो आणि हवे तेच ऐकत असतो. पुन्हा त्यातून आपल्याला हवे तसेच अर्थ लावत असतो. राहुलने आपल्या आक्रमक भाषणातून मोदींना दणका दिल्याची प्रतिक्रिया म्हणूनच नवलाईची आहे. काहीजणांना तर मनमोहन देसाईच्या ‘अमर अकबर अंथोनी’ चित्रपटातला अमिताभही आठवला. त्यात विनोद खन्नाकडून जबर मार खाल्ल्यावर पोलिस कोठडीत जाऊन पडलेला अमिताभ उर्फ़ अंथोनी म्हणतो, ‘तुमने हमको बहुत मारा. हमने तुमको एकही मारा. लेकीन सॉलिड मारा; है की नही?’ लोकांच्या लक्षात राहिलेले ते वाक्य जरूर आहे. पण त्यानंतर अंथोनी गजाआड जाऊन पडलेला असतो. तर त्याला गजाआड टाकणारा विनोद खन्ना उर्फ़ अमर शिरजोर ठरलेला असतो. तेव्हा त्यातला अंथोनी विनोदी नव्हेतर निर्लज्ज व हास्यास्पद ठरलेला असतो. मग अशा उदाहरणातून आपण राहुल गांधींचे कौतुक करतोय, की टवाळी करतोय; हे त्यांच्या चहात्यांच्या लक्षात कधी यायचे? कसे येणार? त्यांना समोर दिसते आहे, त्यापेक्षा भलतेच बघायचे व ऐकायचे असेल, तर सत्य दाखवणार तरी कसे? अलिकडल्या काळात अंथोनीचे हे वाक्य अनेक राजकीय अभ्यासकांच्या लक्षात राहिले, कारण मागल्या लोकसभा निवडणूकांचे निकाल लागल्यावर साडेचार वर्षापुर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यातले व्यंग दाखवण्यासाठी ते उच्चारले होते. ते शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना खिजवण्यासाठी. त्यात विजयी सूर नव्हता, तर आपण आपटलो, तरी तुम्हाला भूईसपाट करीत आपटलो; असा त्याचा मतितार्थ होता. त्याही अर्थाने राहुलच्या हल्लीच्या सभेचे वर्णन वा विश्लेषण होऊ शकते काय? होणार असेल तर मोदींना संपवताना राहुल कॉग्रेसच संपवायला निघालेत असा घ्यायचा काय?

   मागल्या काही महिन्यांपासून मोदी देशाच्या विविध राज्यामध्ये जाहिरसभा घेत आहेत. भव्यदिव्य विराट सभा बघून खुद्द भाजपातल्याच जाणत्यांना नवल वाटत असेल, तर मोदी व भाजपा विरोधकांच्या पोटात गोळा येणे स्वाभाविकच आहे. कारण मोदींना गुजरातबाहेर कोणी ओळखतसुद्धा नाही, असाच त्यांच्या विरोधकांना मागली दोनतीन वर्षे दावा राहिलेला आहे. मोदींच्या पंतप्रधानकीच्या दाव्याची गोष्ट निघाल्यावर, त्यामुळे भाजपाचे नुकसान होईल; असेही वारंवार सांगितले जात होते. पण आपल्या नावाची पंतप्रधान पदासाठी घोषणा झाल्यापासून मोदींनी देशाच्या कानाकोपर्‍यात सभांचा सपाटा लावला आहे. त्यासाठी जमणारी गर्दी अचंबित करणारी असली, तरी त्या गर्दीकडून मोदींच्या विधाने व वक्तव्यांना मिळणारा प्रतिसाद विरोधकांना अस्वस्थ करून सोडणारा असल्यास नवल नाही. ज्याच्या विरोधात अखंड अकरा वर्षे बदनामीच्या मोहिमा चालवल्या गेल्या; तोच देशातला सर्वाधिक लोकप्रिय नेता होताना बघायला कुठल्या बुद्धीमंताला आवडू शकेल? आपले सिद्धांत व आग्रह खोटे पडताना बघणे, कुणाही विद्वानाला आवडणे शक्यच नसते. सहाजिकच मोदींच्या गाजणार्‍या मोठमोठ्या सभा सेक्युलर लोकांना पोटदुखी झाल्यास नवल नव्हते. अशावेळी मग मोदींच्या या घोडदौडीला कोणी रोखू पहात असेल किंवा त्यात पुढाकार घेत असेल; तर त्याचे मोदी विरोधकांना कौतुक नक्कीच वाटणार आणि त्यात गैर काहीच नाही. त्यामुळेच मागल्या काही दिवसात कॉग्रेसचे अननुभवी उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लागोपाठ सभा घेऊन भाजपाच्या नावाने व मोदींचे नाव न घेताच केलेल्या हल्ल्याने अशी माणसे सुखावली तर आश्चर्य नाही. बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, तशीच ही स्थिती असते. बुडणार्‍याला काडी कधीच वाचवू शकत नाही, हे सत्यच आहे. पण तरंगणारी काडी बुडणार्‍याला आशा तर दाखवते ना? त्यापेक्षा राहुलची भाषणे फ़ारशी उपयोगी वा परिणामकारक नाहीत.

   सभेत आवेशपुर्ण व चढ्या आवाजात बोलले, मग भाषण आक्रमक झाले; अशी अनेकांची समजूत आहे. खुद्द राहुलचीही अशीच कोणीतरी समजूत करून दिलेली दिसते. अन्यथा त्यांनी कुठल्याही अनावश्यक शब्दांवर जोर देत असा आक्रस्ताळेपणा केला नसता. आपल्या आजी व पित्याची दहशतवादी हल्ल्यात हत्या झाली आणि आपल्याला त्याचा घुस्सा येतो; असे राहुलनी म्हणायला काहीच हरकत नाही. पण जो आवेश त्यांनी इतक्या वर्षांनी दाखवला, तो नाट्यमय होता. त्याच्या बुमरॅंग होण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. अन्य कोणी त्यांना त्यातले धोके दाखवण्याचे धाडसही केले नाही. त्यापेक्षा त्यांच्या चहात्यांनी टाळ्या पिटून कौतुकच केल्यावर राहुल भरकटत गेल्यास नवल नव्हते. शेफ़ारलेल्या पोराप्रमाणे त्यांनी मुक्ताफ़ळे अधिकच उधळण्यास सुरूवात केली आणि त्यांची अवस्था मग खरोखरच सिनेमातल्या त्या अंथोनी सारखी होऊन गेली. राजस्थानातील सभेत ‘दादी को मारा, पापा को मारा’ असल्या पोरकटपणाचे पुढले पाऊल मग इंदूरच्या सभेत पडले. आधीच्या सभेत भाजपा जातीय धार्मिक द्वेष फ़ैलावतो आणि ती आग आम्हाला विझवावी लागते, असे सांगितले होते. इतकेच नव्हेतर आग लागली तेव्हा भाजपावाले कुठे होते; असाही सवाल केला होता. पंतप्रधानांसमवेत गेल्याने मुझफ़्फ़रनगरच्या दंगलग्रस्त परिसराला भेट द्यायला गेलेल्या मम्मी पप्पूला तिथे प्रवेश मिळाला. पण त्याच परिसराला भेट द्यायला राहुलच्याही आधी भाजपाचे राज्यसभेतील उपनेते व अध्यक्ष गेलेले असताना, त्यांना मात्र राज्य पोलिसांनी विमानतळावरूनच परत पाठवले होते. म्हणजेच भाजपाच्या नेत्यांची मम्मी युपीएची अध्यक्ष नाही आणि तिच्याच रिमोटवर चालणारा पंतप्रधान नाही; तो भाजपावाल्यांचा गुन्हा असतो काय? गेलेल्यांना रोखायचे आणि मग वर तोंड करून विचारायचे, हे भाजपावाले आग लागली तेव्हा मुझफ़्फ़रनगरात का गेले नाहीत? याला सत्यवचन म्हणतात? इतके असत्य बोलू शकत नसेल तो फ़ेकू असतो. यात फ़ेकू कोण, ते सामान्य जनतेला नेमके कळते. पण बुद्धीमंत सेक्युलर असल्यावर ते कळू शकत नाही. मग मोदीला कसे घेरले, याचा आनंदोत्सव सुरू व्हायचाच. व्हायलाही हरकत नसावी. कोणाला मुर्खाच्या नंदनवनातून बाहेर खेचायला अधिकार आपल्याला राज्यघटना देत नाही ना?

   पण अशा चहात्यांच्या टाळ्या गुंजत असतील व कडकडाट करीत असतील; तर हा आधुनिक राजकारणातला अंथोनी आपल्या हास्यास्पद मुर्खपणाच्या कृती लगेच कशाला थांबवणार? तो अधिकच पोरकटपणा करणार ना? मुझफ़्फ़रनगरच्या स्थानिक पोलिसांनी दंगल कोणी पेटवली, त्यात पोलिसांना काम करण्यात कोणी अडथळे आणले, त्याचे छुपे चित्रण वाहिन्यांवरून लोकांनी बघितले आहे. त्यांना सत्य चांगले ठाऊक आहे. तरीही राहुल गांधी बेधडक खोटे बोलणार असतील; तर त्यांचे तोंड कोणी बांधायचे? ते मोकाटच सुटणार ना? त्यामुळेच मग राहुलनी इंदूरच्या सभेत आणखी एक लोणकढी थाप हाणली. म्हणे त्यांना कुणा गुप्तचर अधिकार्‍याने येऊन सांगितले, की मुझफ़्फ़रनगर दंगलीतल्या पिडीत मुस्लिम तरूणांना पाकिस्तानी गुप्तहेरसंस्था हाताशी धरते आहे. थोडक्यात आता दंगलीनंतर तिथले पिडीत मुस्लिम पाकिस्तानचे हस्तक बनू लागले आहेत, असाच आरोप राहुलने केला. म्हणजे ज्यांचे आप्तस्वकीय त्या दंगलीत मारले गेले, त्यांच्या जखमांवर फ़ुंकर घालणे दुर राहिले. त्यांचे पुनर्वसन मागे पडले. त्याच मुस्लिमांना पाकिस्तानचे हस्तक ठरवण्याचा अव्यापारेषू व्यापार आधुनिक अंथोनी करून बसले. प्रत्येक दंगल व घातपातानंतर आपल्या देशात पालिस्तानी हस्तक व आयएसआय यांच्यावर संशय घेतला जातो. मग त्यांचे हस्तक म्हणून काही मुस्लिम संशयितही पकडले जातात. त्यामुळे सर्वच मुस्लिमांकडे पाकिस्तानचे हस्तक म्हणून बघितले जाते, असा मुस्लिम समाज व नेत्यांचा आक्षेप आहे. त्यावर फ़ुंकर घालण्याचे प्रयास कॉग्रेस व अन्य सेक्युलर पक्ष नित्यनेमाने करीत असतात. इतकेच नव्हेतर मुस्लिमांविषयी असला संशय भाजपावालेच पसरवतात, हा सेक्युलर लोकांचा व मोदीविरोधकांचा कायमचा आक्षेप राहिला आहे. पण नेमका तोच बिनबुडाचा आरोप आता त्याच गोटातील हिरो असलेल्या राहुल गांधींनी उत्साहाच्या भरात केलेला आहे. त्यांचा हेतू तसा नाही, हे मान्यच करायला लागेल.

   मुझफ़्फ़रनगरचे मुस्लिम पाकिस्तानचे हस्तक आहेत किंवा तिथले तरूण पाकिस्तानला फ़ितूर आहेत; असे राहुलना अजिबात म्हणायचे नव्हते. उलट भाजपाने पेटवलेल्या दंगलीतून दुखावलेले मुस्लिम तरूण पाकिस्तानच्या आहारी जातात व तिथल्या गुप्तहेर खात्याच्या जाळ्यात अडकतात; असेच सुचवून राहुल यांना भाजपाविषयी मुस्लिमात द्वेष निर्माण करायचा होता. पण शब्द किंवा मुद्दे कसे योजावेत, केव्हा फ़िरवावेत आणि कुठे कशावर भर द्यावा; याचे कुठलेही भान नाही की जाण नाही. त्यामुळेच त्यांनी एकामागून एका सभेत तावातावाने आवेशपुर्ण बोलताना स्वपक्षाला अधिकाधिक अडचणीत आणण्याचा सपाटा लावलेला आहे. पण त्यांचा आवेश बघूनच खुश झालेल्यांना त्यातून बुडत्याला काडीचा आधार मिळावा, तसा आनंद झालेला आहे. आता इंदुरच्या भाषणानंतर राहुलना मुस्लिमांवर आळ घ्यायचा नव्हता किंवा त्यांचा मुद्दा वेगळाच होता; असले खुलासे देत बसायची वेळ पक्ष प्रक्त्यांवर आलेली आहे. दुसरीकडे भाजपा सोडून अन्य सेक्युलर पक्षांनाही राहुलवर टिकेचे आसूड ओढण्याची पाळी आली आहे. तिकडे कॉग्रेसच्याच गृहमंत्र्याला मुझफ़्फ़रनगरात पाक हेरसंस्थेचे जाळे असल्यास कुठे व कसे; त्याचे स्पष्टीकरण देण्याची नामुष्की आलेली आहे. तेवढेच नाही तर भारत सरकारच्या गुप्तचर विभागाचे नाक कापले गेले आहे. ज्याने राहुलना अशी माहिती दिली, त्या अधिकार्‍याला समोर आणायची मागणी पुढे आली आहे. थोडक्यात एकाच दगडात राहुलनी स्वपक्षाच्या अनेक हितसंबंधांचा फ़टाफ़ट बळी घेऊन चमत्कारच घडवला आहे. त्यामुळे एक गोष्ट नक्कीच मान्य करावी लागेल. मोदींनी जे काम आरंभले किंवा हाती घेतले आहे, त्यातही राहुलच मोदींना ‘भारी’ पडले आहेत. मोदींनी कॉग्रेसला देशाभर पराभूत करण्याचे आव्हान स्विकारले आहे, त्याच कॉग्रेसला नामोहरम व नामशेष करण्याच्या कामात मोदींपेक्षा राहुलचे प्रयास अधिक परिणामकारक ठरत असतील, तर मोदींपेक्षा राहुलच ‘भारी’ काम करतात हे नाकारता येईल काय?

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१३

मतचाचण्यांचा थोडासा इतिहास



  आता देशात मतचाचण्य़ांचे जणू पेवच फ़ुटले आहे. पण विविध संस्थांच्या मदतीने जनमताची चाचणी घेऊन त्यावर कुठला पक्ष जिंकणार किंवा कोणा मित्रपक्षाला सोबत घेऊन सरकार बनवणार; अशा चर्चा रंगवणार्‍यांना त्यातले शास्त्र कितीसे कळते, याची मला दाट शंका आहे. कारण जेव्हा ह्या तंत्राचा भारतात प्रथमच अवलंब झाला, तेव्हा तमाम वृत्तपत्रे व पत्रकार आणि राजकीय अभ्यासक त्याविषयी कमालीचे साशंक होते. नुसते साशंकच नव्हते तर अशा अंदाजांची खिल्ली उडवण्यातही आघाडीवर होते. कारण जनमानस आपल्यालाच नेमके कळते, असा एक टोकाचा अहंकार भारतीय पत्रकारांमध्ये होता. सहाजिकच त्यांच्या अभ्यास व अनुभवाच्या पलिकडला कोणी त्याविषयी भाष्य करीत असेल; तर या ढुढ्ढाचार्यांना ते रुचणार तरी कसे? पण आज त्यांचेच वंशज किंवा वारस त्याच शास्त्राचा किंवा चाचणी अहवालाचा आधार घेऊन, असे काही छातीठोक राजकीय भाष्य करीत असतात, की त्या तंत्राचा भारतातील आद्यपुरूष मानला जाणारा डॉ. प्रणय रॉय सुद्धा त्यापासून चार हात दूर राहू लागला आहे. अर्थात ते स्वाभाविकही आहे. कारण जेव्हा अशा मतचाचण्या घेऊन निवडणूकीचे अंदाज वर्तवण्याचा उद्योग इथे भारतात सुरू झाला; तेव्हा आजच्या वाहिन्यांवरील बहुतांश पत्रकारांपासून वृत्तपत्रांचे बहुतांश संपादक नाकाचा शेंबुडही पुसायच्या अकलेचे नव्हते. तर त्यांच्याकडून ते शास्त्र समजून बोलण्याची वा त्याचे नेमके आकलन करण्याची तरी अपेक्षा कशी बाळगता येईल. त्यामुळेच सर्व्हे म्हणजे नमुना मतचाचण्या करून घेतल्या जातात आणि मग महागड्या खेळण्याचा लाडावलेल्या पोराने चुराडा करावा; तसा त्या आकड्यांचा विचका केला जातो. म्हणूनच अशा मतचाचण्यांचा थोडा इतिहास मांडणे मला आवश्यक वाटते. विशेषत: आज गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची लोकात दिसणारी व आकड्यातही आढळणारी लोकप्रियता, माध्यमातील मुखंडांना उलगडता येत नसल्याने; तो इतिहास समजून घेणे अगत्याचे आहे. गुजरातच्या दहाबारा वर्षापुर्वीच्या दंगलीच्या कलंकातून बाहेर पडून मोदींना देशभर आवश्यक तेवढी बहुमतापर्यंत पोहोचणारी मते मिळतील किंवा नाही; त्याचे उत्तर त्याच इतिहासात दडलेले आहे. म्हणूनच त्या इतिहासाच्या आठवणी थोड्या चाळवणे मला अगत्याचे वाटते.

   मतचाचण्यांचा भारतातील इतिहास वा कालखंड अवघा तेहतीस वर्षांचा आहे. त्याच्याआधी भारतात कधी मतचाचण्य़ा घेतल्या जात नव्हत्या. अर्थात भारतात नाही म्हणून जगातही होत नव्हत्या, असे अजिबात नाही. पुढारलेल्या पाश्चात्य जगात तर निवडणूकच नव्हेतर सातत्याने अशा नेत्यांच्या व राजकीय पक्षाच्या लोकप्रियतेचे अंदाज व्यक्त केले जात होते. पण तसा प्रयोग भारतात करायला कोणी धजावत नव्हता. कारण पाश्चात्य देशाप्रमाणे इथेही लोकशाही व संसदीय लोकशाहीची प्रणाली असली तरी; तिथल्याप्रमाणे इथे द्विपक्षीय लोकशाही लढत नव्हती. देशव्यापी एकमेव कॉग्रेस पक्ष आणि लहानमोठ्या अन्य पक्षांच्या सोबत प्रभावी प्रादेशिक पक्षांचे कडबोळे असल्याने; जनमत कौल शोधणे जिकीरीचे काम होते. त्यामुळेच १९८० पुर्वीच्या काळात निवडणूका असल्या मग गुप्तचर खात्याचा अंदाज बहुतेक वृत्तपत्रात ग्राह्य मानला जायचा. तो क्वचितच खरा ठरायचा. उदाहरणार्थ १९७५ सालात आणिबाणी लादून देशातल्या लोकशाहीचा गळा घोटलेल्या इंदिराजींनी अकस्मात आणिबाणी उठवून १९७७ सालात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका जाहिर केल्या; त्याच मुळात गुप्तचर खात्याच्या खास अंदाजावर. तेव्हा लोकांमध्ये इंदिराजींची लोकप्रियता प्रचंड असल्याने त्या नक्कीच मोठे यश मिळवतील, असा तो अंदाज होता. म्हणून त्यांनी निवडणूकांची अकस्मात घोषणा केली आणि तुरूंगात डांबून ठेवलेल्या विरोधी राजकीय नेत्यांची सुटका करून राजकीय आव्हान स्विकारले. पण दबलेल्या जनमताचा अंदाज गुप्तचर खात्याला आला नव्हता आणि त्याच निवडणुकीत इंदिराजींसह त्यांच्या सत्ताधारी पक्षाचा इतिहासातील सर्वात दारूण पराभव झाला. राजस्थान पंजाबपासून बंगालपर्यंतच्या गंगाप्रदेशात म्हणजे संपुर्ण उत्तर भारतात कॉग्रेसचे नामोनिशाण शिल्लक उरले नाही, इतका तो नामुष्कीचा पराभव होता. चार प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन घाईगर्दीने स्थापन केलेल्या जनता पक्षाला मतदाराने बहुमत दिले होते. आधी त्या पक्षाने निवडणूका जिंकल्या आणि पुढे त्या पक्षाची औपचारिक स्थापना झाली होती. असे गुप्तचर खात्याचे निवडणूक अंदाज बेभरवशी असायचे. बाकी मग राजकीय अभ्यासक आपापल्या वार्ताहर व पत्रकारांच्या मदतीने हवेतले अंदाज बांधायचे, किंवा भविष्यवेत्ते आपल्या ग्रहमानाचे समिकरण मांडून अंदाज व्यक्त करायचे. त्यापैकी कुठलाच अंदाज खरा ठरण्याची कुठलीही हमी नसायची.

   पण त्या निवडणूकीनंतर तसा पहिला प्रयोग तेव्हा पाक्षिक स्वरूपात प्रसिद्ध होणार्‍या ‘इंडीयाटुडे’च्या संपादकांनी केला होता. प्रणय रॉय नामक एका होतकरू आकडेशास्त्रज्ञाने त्यात पुढाकार घेतला होता. त्याने भारतीय निवडणूकांचेही शास्त्रीय पद्धतीने अंदाज चाचणीतून बांधता येतील, असा दावा करीत ठोकताळे तयार केले. त्याला ‘इंडीयाटुडे’ने सहकार्य केले तरी त्यावर अजिबात विश्वास दाखवला नव्हता. कारण प्रणय रॉयने आपल्या पद्धतीने नमूना मतांची चाचणी घेऊन जे अंदाज तयार केले. त्याला ‘इंडियाटुडे’ने प्रसिद्धी जरूर दिली. पण तिथेच संपादकांनी पुस्तीही जोडली होती. या चाचणी व अंदाजाची संपुर्ण जबाबदारी लेखकाची व चाचणीकर्त्याची आहे आणि त्याविषयी खुद्द संपादकही साशंक असल्याचे स्पष्ट केलेले होते. कारण त्या पहिल्यावहिल्या मतचाचणीने काढलेले अंदाज कुठल्याही पत्रपंडीत, संपादक, राजकीय अभ्यासकाला चक्रावून सोडणारे होते. आज ‘दंगलखोर’ नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचे आकडे बघून जसे राजकीय अभ्यासक, जाणकार संपादक अविश्वास दाखवतात, तितकाच अविश्वास तेव्हा प्रणय रॉयच्या त्या पहिल्या निवडणूक अंदाजावर नेमका त्याच कारणास्तव दाखवला गेला होता. कारण अडीच वर्षापुर्वी ज्या इंदिरा गांधींना त्यांचा सुपुत्र संजय गांधी याच्यासह आपापल्या मतदारसंघात पराभूत करून मतदाराने नवा इतिहास घडवला होता; तोच मतदार इतक्या अल्पावधीत इंदिराजींचे आणिबाणीतले गुन्हे माफ़ करून त्यांना प्रचंड बहूमताने सत्ता देईल, असा रॉयचा अंदाज होता. म्हणजे त्याची मतचाचणी त्याला तसे सांगत होती. त्यावर अभ्यासक पत्रकारांनी अविश्वास दाखवण्याला आणखी एक कारणही होते. आधीच्या निवडणूकीत कॉग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर इंदिराजींनी त्या पराभूत कॉग्रेस पक्षातही फ़ुट पाडली होती आणि त्यांच्या जोडीला कोणी मान्यवर कॉग्रेस नेते शिल्लक उरलेले नव्हते. पक्षाची संघटना नेत्यांच्या हाती आणि कार्यकर्ते व लोकप्रियता इंदिराजींच्या हाती. इतक्याच बळावर आणिबाणीच्या अत्याचारांनी बदनाम असलेल्या इंदिराजी १९८०च्या मध्यावधी निवडणुकीला सामोर्‍या गेलेल्या होत्या. विस्कळीत दुबळी पक्ष संघटना व कलंकित इतिहास, यामुळे इंदिराजींना पुन्हा मतदार कौल देईल; यावर कुठला राजकीय अभ्यासक विश्वास ठेवणार? दंगलीनंतरही गुजरातच्या मतदाराने तिसर्‍यांदा मोदींना मोठे बहूमत दिले; म्हणून आजच्या राजकीय अभ्यासक पत्रकारांना तो मोदींचा विजय वाटला आहे काय? नेमकी तीच मानसिकता तेव्हाच्या पत्रकार अभ्यासकांनी दाखवलेली होती. मग त्यांना नव्याने निवडणूक अंदाजशास्त्र प्रस्तुत करणारा प्रणय रॉय मुर्ख वाटला, तर नवल कुठले? अगदी त्याचे अंदाज छापणार्‍या ‘इंडियाटुडे’च्या संपादक मंडळानेही त्याच्यावर विश्वास दाखवला नव्हता. मग बाकीच्या वृत्तपत्रे वा पत्रकारांनी त्याची दखल घेण्याचा विषयच कुठे येतो?

   पण या तमाम राजकीय पंडितांना निवडणूक निकाल लागले, तेव्हा तोंडात बोट घालायची पाळी आली. कारण प्रणय रॉयचे अंदाज नुसते बरोबर ठरले नाहीत; तर अगदी तंतोतंत खरे ठरले. ज्या इंदिरा गांधी आणिबाणीने बदनाम झाल्या होत्या आणि तोच ठपका ठेवून त्यांच्याच कॉग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्याच्यासह संजय गांधींची पक्षातून हाकालपट्टी केली होती; त्यालाच सोबत घेऊन इंदिराजी लोकांना सामोर्‍या गेल्या होत्या. तरीही त्यांना नुसते बहूमत नव्हेतर दोन तृतियांश बहूमत मिळण्याचा अंदाज रॉयने व्यक्त केला होता. आणि झालेही नेमके तसेच. अडिच वर्षे आधी ज्या जनता पक्षाला लोकांनी भरपूर मते देऊन डोक्यावर घेतले होते; त्याच्यासह इंदिराजींना हाकलणार्‍या कॉग्रेस पक्षाची धुळधाण मतदाराने उडवली होती. इंदिराजींनी ज्याला कोणाला आपल्या पक्षाचा उमेदवार म्हणून समोर उभे केले; त्याला लोकांनी भरभरून मते दिली होती. त्यांचे निवडणूक चिन्हही बदलले होते. गायवासरू निशाणी बाजूला पडून हाताचा पंजा ही नवी निशाणी घेऊन इंदिराजी जनतेसमोर गेल्या होत्या. त्यासाठी एक आटोपशीर घोषणाही तेव्हा लोकप्रिय ठरली होती. ‘ना जातपर ना पातपर, इंदिराजीकी बातपर, मुहर लगावो हातपर’. आणि लोकांनी खरोखरच हातावर पसंतीची मोहर उठवून इंदिराजींना लोकसभेत अफ़ाट बहुमताने सत्ता बहाल केली. त्यामागचे राजकारण नंतर बघता येईल. मुद्दा आहे, तो देशातल्या पहिल्यावहिल्या मतचाचणीचा अंदाज खरा ठरण्याचा. मात्र त्याची दखल कोणी फ़ारशी घेतली नाही. प्रणय रॉयचे अंदाज नशीबाने खरे ठरले, म्हणून राजकीय पंडीतांनी त्याकडे साफ़ काणाडोळा केला होता. त्याने हे अंदाज कसे काढले किंवा त्यामागचे तंत्र काय आहे, याचाही कोणी उहापोह केला नाही, की कुठे दखलपात्र चर्चाही झाल्या नाहीत. अशी ती पहिली मतचाचणी ‘इंडियाटुडे’च्या त्या अंकातच दफ़न केली गेली. पण ज्यांना इंदिराजी इतके मोठे यश मिळवू शकणार नाहीतच अशी ठाम खात्री होती; तेच राजकीय पंडीत अभ्यासक निकालानंतर त्याची मिमांसा मात्र करीत होते. आपल्या दिवाळखोर राजकीय भाकितावर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयास तावातावाने करीत होते. पण लोकमताचा अंदाज काढण्यासाठी हाताशी एक नवे विश्वासार्ह तंत्र आले आहे; त्याची दखल घ्यायची बुद्धी त्यापैकी कोणा शहाण्याला झाली नाही. हीच आपल्या देशातील राजकीय अभ्यासक, जाणकार, पत्रकार वा संपादक विश्लेषकांची दुर्दैवी शोकांतिका आहे. त्यांना आपल्या पुर्वग्रहातून बाहेर पडून सत्य दिसत असले, तरी बघता येत नाही, की समजून घेता येत नाही. वास्तवापेक्षा आपल्या मनातल्या समजुतीला व भ्रमाला घट्ट चिकटून रहाण्याची मनोवृत्ती त्याला कारण आहे. आणि आज इतक्या वर्षानंतरही त्यातून नव्या पिढीचे पत्रकार अभ्यासक मुक्त झालेले दिसत नाहीत. कालपरवाच्या मतचाचणीवरील चर्चेत त्याचीच प्रचिती येत होती. म्हणूनच हा इतिहास नव्याने व थोडा सविस्तर सांगणे अगत्याचे झाले आहे. (क्रमश:)

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

कुंभकर्ण जागवायचा कसा?

   दिल्लीच्या घटनेनंतर देशभर प्रक्षोभ उसळला होता. सरकारने नवा कायदा केला. म्हणून मुंबईत झालेला सामुहिक बलात्कार थांबू शकला नाही. त्यानंतरही देशाच्या विविध शहरात, वस्त्यांमध्ये होणारे बलात्कार थांबलेले नाहीत. बलात्कार करणार्‍यांना कायद्याचे किंवा शिक्षेचे भय उरलेले नाही. कारण बलात्कार करणार्‍यांना आपण काही अमानुष कृत्य करतोय असे वाटलेलेच नाही. इतर कुठला सामान्य गुन्हा करावा किंवा कायदा मोडावा, इतक्या सहजतेने आजकाल आपल्या देशात बलात्काराच्या घटना घडत असतात. दिवसेदिवस ती अमानुष प्रवृत्ती बळावतेच आहे. अर्थात त्याला कायदा किंवा सामाजिक या बाबतीतले गैरसमज कारणीभूत आहेत. मानवी संबंधांमधली ही एक भीषण विकृती आहे आणि म्हणूनच त्याकडे गुन्हा म्हणून बघण्यानेच अधिक नुकसान केले आहे. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा महिलांचे अधिकार, स्वातंत्र्य किंवा पुरूषी अहंकार अशा विविध पैलूंवर उहापोह केला जातो. पण त्यामागची वर्चस्ववादी विकृत मानसिकता उलगडण्याचा प्रयासच होत नाही. म्हणूनच त्यावरचा नेमका उपाय कुठेच सापडू शकलेला नाही. महिलांना अबला किंवा दुर्बळ दुय्यम मानण्य़ाच्या मानसिकतेचा हा एक दुष्परिणाम आहे. महिलेकडे मालमत्ता किंवा प्रतिष्ठेचे प्रतिक म्हणून बघण्यातल्या पुरूषी वर्चस्ववादातून ही विकृती उदयास आलेली आहे. तिचे नेमके योग्य विश्लेषण होऊ शकलेले नाही. दोनतीन वर्षापुर्वी सुदान या देशातील डारफ़ोर प्रदेशामध्ये बलात्काराचा हत्याराप्रमाणे वापर झालेला होता. त्याकडे मानवी संकट म्हणून बघितले गेले. पण ती वास्तविकता नव्हती. जगातल्या रानटीपणाचा पुर्वेतिहास बघितला, तर जेत्याने पराभूत समाजातील महिलांना पळवून नेणे किंवा त्यांच्यावर बलात्कार करण्य़ाच्या घटनांचे शेकडो दाखले मिळतील. अगदी काही वर्षापुर्वी बिहारसारख्या अराजक माजलेल्या राज्यात एखाद्या वस्तीवर हल्ला करून महिलांवर सामुहिक बलात्काराचे प्रकार घडलेले आहेत. त्यापेक्षा नेहमीच्या बलात्कारामागची मानसिकता वेगळी नसते. दोन्हीकडे आपले वर्चस्व किंवा प्राबल्य सिद्ध करण्यासाठी केलेला तो लैंगिक अत्याचार असल्याचे दिसून येईल.

   बलात्कार म्हणजे नेमके काय असते? तो एक शारिरीक अत्याचार असतो. पण तो निव्वळ लैंगिक गुन्हा नसतो. त्यात त्या महिलेच्या माणूस असण्याला नाकारून तिच्या देहाचा तिच्या इच्छेविरुद्ध एखाद्या उपभोग्य वस्तूप्रमाणे सक्तीने केलेला वापर असतो. म्हणजेच तिच्या एक स्वतंत्र माणूस म्हणून असलेल्या व्यक्तीमत्वावरचा प्राणघातक हल्लाच असतो. तिच्यातल्या स्वाभिमान वा अस्मितेची ती हत्याच असते. त्यातल्या शारिरीक जखमा जितक्या यातनामय नसतात, तितका तिच्या अस्मिता, स्वाभिमान व व्यक्तीमत्व मानल्या जाणार्‍या मनाला होणार्‍या जखमा खोल व जिव्हारी लागणार्‍या असतात. शरीरावरच्या जखमा उपचाराने भरून येणार्‍या असतात. पण मनाला, समजुतीला व अभिमानाला झालेल्या जखमा कधीच भरून येणार्‍या नसतात. कारण व्यक्ती म्हणून ज्या देहाचा ती अभिमान बाळगत असते; त्याविषयीच तिच्या मनात कमालीची घृणाच त्या अनुभवातून निर्माण होत असते. आपण स्त्री आहोत म्हणून खुप सुंदर आहोत, असा जो स्त्रीला उपजत अभिमान असतो; त्यालाच अशा प्रसंगातून पायदळी तुडवले जात असते, ठार मारले जात असते. आपला देह एक वापरायची बाजारू वस्तू आहे, अशी हीन धारणा त्यातून तिच्या मनात रुजवली जात असते. ती उपटून टाकणेही तिच्या हाती मग उरत नाही. तिला स्वत:चाच तिरस्कार वाटावा अशी जी स्थिती त्या पिडीतेमध्ये त्या एकाच प्रसंगातून बाणवली जाते; तिथे तिच्या स्वयंभू व्यक्तीमत्वाचीच हत्या केली जात असते. मजेसाठी वापरून फ़ेकून द्यायची वस्तू; इतकेच तिच्या देहाचे मूल्यमापन त्या अनुभवातून येते आणि ते झटकूनही टाकता येत नाही, ही कधीही भरून न येणारी हानी एका बलात्काराने होत असते. हे त्यातले गांभिर्य आहे. म्हणूनच तो खुनापेक्षाही भीषण स्वरूपाचा गुन्हा असतो. कारण त्यात व्यक्ती जिवंत असते; पण तिच्यातली जगण्याची जी इच्छाशक्ती असते, तीच मारून टाकली जात असते. आपल्या अस्तित्वाविषयीच तिच्यावर न्युनगंड लादला जात असतो. म्हणूनच बलात्कार हा सामान्य फ़ौजदारी गुन्हा नव्हे; तर तो हत्याकांडापेक्षाही भयंकर अमानुष गुन्हा असतो. कारण तो जीव न घेणारा खुन असतो. ज्याला नरभक्षकी कृत्य म्हणावे, इतके ते अमानवी कृत्य असते. कारण त्यातला गुन्हेगार समोरच्या महिलेचे अस्तित्वच खावून फ़स्त करीत असतो.

   एका बाजूला ती त्या महिलेच्या अस्तित्वाची व स्वाभिमानाची हत्या असते आणि दुसरीकडे तिने ज्यांच्याकडे सहानुभूतीच्या अपेक्षेने बघावे; त्यांच्या नजराही त्या घटनेतून मारून टाकल्या जातात. बलात्कारिता ही गुन्ह्याची बळी असते आणि तरीही तीच नकळत गुन्हेगारही मानली जात असते. म्हणजे तिच्याकडे बघणार्‍या नजरा तिला जगणे अशक्य करून सोडत असतात. अगदी सहानुभूतीच्या नजराही धीर देण्यापेक्षा कींव करणार्‍या असतात. ही तीच आपली परिचित महिला असते. पण कालपर्यंत होती, त्यापेक्षा आपली तिच्याकडे बघणारी नजर बदलून गेलेली असते. ती आपली नजर तिला अधिक बेजार करत असते. तिच्या जखमांवरची खपली काढत असते. तू वापरली गेलीस, अशा जाणीवा तिच्यात निष्पन्न व्हाव्यात, अशी आपली सहानुभूती त्या बलात्काराच्या वेदना अधिक जिव्हारी झोंबणार्‍या करीत असतात. एखाद्या बलात्कारी गुन्हेगाराचे आप्तस्वकीय त्याच्याशी जितके अलिप्तपणे वागणार नाहीत, त्यापेक्षा बलात्कारितेचे परिचित या बळी महिलेशी अत्यंत चमत्कातिक वर्तन करीत असतात. म्हणजेच ती दोन्हीकडून बळीच होत असते. म्हणूनही असा गुन्हा सामान्य नाही तर असामान्य असतो. खुनापेक्षा भीषण असतो. ज्या देहाला व्यक्ती म्हणून जग ओळखत असते, त्याच आपल्या देहाविषयी किळस निर्माण झाल्यावर त्याच देहात वास्तव्य करणे किती यातनामय असेल; याची कल्पना एक पिडीताच करू शकते. म्हणूनच अगदी दोषी गुन्हेगाराला फ़ाशी देऊन त्या वेदनांची यातनांची भरपाई होऊ शकणार नाही. अशा गुन्ह्यासाठी कठोर कायदा वा शिक्षा पुरेशी नाही. असा गुन्हा होताच कामा नये, यासाठीची पावले उचलणे अगत्याचे व आवश्यक आहे. कारण त्याची भरपाई कशानेच होऊ शकत नसते. दुसर्‍याच्या गुन्ह्याची शिक्षा नकोशा झालेल्या देहात वास्तव्य करून त्या महिलेने उर्वरित जीवनात भोगायची असते. त्याची भरपाई फ़ाशीने होऊ शकत नाही.

   कितीही कठोर कायदे केले वा शिक्षा कठोर केल्या, म्हणून शेकडो वर्षे बलात्काराच्या कल्पनेमुळे पिडीत महिलेला आपल्याच देहाविषयी जाणवणार्‍या तिटकारा वा किळसातून तिची मुक्तता शक्य नसेल, तर मग बलात्काराची शक्यता संपवणेच अपरिहार्य आहे. कायद्याने महिलांना समान हक्क, अधिकार देऊन किंवा विविध प्रकारचे संरक्षण, आरक्षण देऊन भागणार नाही. महिलाविषयक पुरूषी मानसिकता आमुलाग्र बदलावी लागेल. भाषेपासून वर्तनापर्यंत अनेक बाबतीत असे बदल प्रयत्नपुर्वक घडवून आणावे लागतील. त्यासाठी महिलाविषयक गुन्हे करणार्‍यांना तुरुंगात कठोर शिक्षा देण्यापेक्षा त्यांना समाजाने बहिष्कृत केल्याचे लाजिरवाणे जीवन सक्तीने कंठण्याची शिक्षा द्यायला हवी. ज्या पुरूषार्थाचा किंवा नरवृत्तीचा अवास्तव गर्व अशा गुन्ह्याला चिथावणी देत असतो; त्याची पदोपदी हेटाळणी होईल, असे काही उपाय व शिक्षा असायला हवी. जेणे करून बलात्काराच्या नुसत्या कल्पनेनेच पुरूषाच्या मनाचा थरकाप उडाला पाहिजे. असे काही केल्यास आपल्या पौरुष्याची सार्वत्रिक होणारी अवहेलना किंवा पायमल्ली बघून माणसाच्या मनात भयगंड निर्माण करणे; हाच त्यावरचा सर्वोत्तम परिणामकारक उपाय असू शकतो. विनयभंग, छेडछाड याप्रकारचे गुन्हे करणार्‍यांना नंपुसक बनवणारे वैद्यकीय उपाय योजल्यास, ती दहशत निर्माण करता येईल. कारण जेव्हा समाजात असे मोजकेच दोषी दिसतील; तेव्हा त्यांची हेटाळणी व टवाळी होईल आणि नुसत्या त्या दृष्यानेच हजारो लाखो टपोरी शहाणे होऊ शकतील. शिक्षा जितकी भयकारी नसते, त्यापेक्षा अधिक शिक्षेची नुसती कल्पना परिणामकारक असते. ती दहशत निर्माण केली तरच अशा गुन्ह्याला पायबंद घालता येईल. बलात्कारामागच्या अमानुष वृत्तीला वेसण घालण्यासाठी तितक्याच अमानुष शिक्षेचे भय असायला हवे. एक महिला जसे बलात्काराच्या अनुभवानंतर आपले व्यक्तीमत्व गमावून बसते; तसा त्या स्वरूपाचे गुन्हे करणार्‍याला वा तसे विचार करणार्‍यांना अनुभव येऊ लागला, तरच बलात्काराला रोखता येईल.

   अमुक एक गोष्ट वा कृती पाप आहे आणि त्याची भीषण फ़ळे आपल्याला चाखायला लागतील, याचे भयच त्या अमानुषतेतून समाजाला मुक्ती देऊ शकेल. मानवी समाजात अमानुषतेला जर माणूसकीने आपण वागवू लागलो, तर माणूसकीवर अमानुषता शिरजोर होणारच. आज नेमके तेच झालेले आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. शेवटी कायद्यापेक्षा समाजात रुजवलेली नितीमूल्ये व जीवनमूल्येच प्रभावी ठरताना दिसतात. हजारो वर्षे विविध समाजात असलेली बंधने जितकी काटेकोरपणे पाळली जातात, तितके कायद्याचे पालन होताना दिसत नाही. जातपंचायती वा खापपंचायतीवर बुद्धीमंतांकडुन खुप टिका होते. पण ज्याला कायद्याचे बळ नाही, अशा त्याच पंचायतींच्या आदेश व फ़तव्याला त्यांचे अनुयायी वचकून असतात. कारण त्यांनी फ़तवे काढल्यावर आपले आप्तस्वकीयही पाठीशी उभे रहात नाहीत; असा धाक असतो. कायद्याच्या राज्यात तोच धाक उरलेला नाही. सामाजिक बहिष्काराचे हत्यार जितके प्रभावी आहे व असते; तितके कायदे प्रभावी नाहीत. पंचायतीचे कालबाह्य निवाडे जरूर नाकारावेत. पण त्यांच्या आदेशातील परिणामकारकता उचलायला काय हरकत आहे? कालपरवा उत्तरप्रदेशच्या मुझफ़्फ़रपुर येथील दंगलीचे कारण काय होते? मुलीची छेड काढल्यावर हिंसेपर्यंत मामला गेला आणि एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत प्रसंग ओढवला. त्यात आसपासची गावे, वस्त्या ओढल्या गेल्या. एका मुलीची छेड काढण्याच्या गुन्ह्याचे गांभिर्य पोलिस व कायद्याने वेळीच ओळखले असते व हातपाय हलवले असते; तर पुढली भीषण दंगल टाळता आली असती. पण आजचा कायदा मुली व स्त्रीयांच्या प्रतिष्ठेसाठी उभा रहात नाही; अशा धारणेने लोकांनी कायदा आपल्या हाती घेऊन थेट न्यायनिवाडा करण्यापर्यंत मजल मारली. पंचायतीचा धाक आहे तेवढा कायद्याने व शासनाने आपला धाक निर्माण केला तरी खुप होईल. आपल्या घरातील, जाती वा वस्तीतील मुलीची छेड काढली जाते, विनयभंग होतो, त्यासाठी तिथल्या लोकांनी जी संवेदनशीलता दाखवली, ती आपले शासन व कायदा दाखवू शकला तरी खुप मोठी मजल मारता येईल. पण कुंभकर्ण होऊन घोरत पडलेल्या शासनाला जागे करायचे कोणी? आपापल्या तात्विक व बौद्धिक विवेचनाच्या धुंदीत मशगुल असलेल्या विचारवंताना त्यांच्या भ्रामक जगातून जागवायचे कोणी व कसे? हे कुंभकर्ण जागे होत नाहीत, तोपर्यंत बलात्कारापासून महिलांची मुक्ती अशक्य आहे. दीडशे वर्षे मागल्या कालखंडात झोपी गेलेल्या कायदा नावाच्या कुंभकर्णाची झोपमोड कशी करणार बोला?

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१३

डॉ. दाभोळकर, त्या पुरोगाम्यांना माफ़ करा



   गुरूवारची संध्याकाळ दवाखान्यातच गेली. आपण एकदा डॉक्टरांच्या तावडीत सापडलो, की त्यांनी मोकळीक करण्यापर्यंत आपल्याला निघता येत नाही. सहाजिकच त्या दिवशी विविध वाहिन्यांवरचे प्राईमटाईम वा चर्चा हुकल्या. मग जेवण वगैरे उरकून बातम्या बघितल्या; त्यात एका बातमीने लक्ष वेधून घेतले. डॉ. दाभोळकरांच्या हत्येला महिना पुर्ण होत आला आणि अजून कोणा संशयितालाही अटक झालेली नाही, अशी ती तक्रारवजा बातमी होती. तेच निमित्त साधून पत्रकार युवराज मोहिते यांच्या पुढाकाराने जादूटोणा कायद्याचे सोपे चित्रात्मक पुस्तक प्रसिद्ध झाल्याची बातमी त्याच्या सोबतच सांगितली गेली. ह्या पुस्तकाचे प्रकाशन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झालेले चित्रणही दाखवले गेले. त्यात राजसोबत दाभोळकरांची कन्या मुक्ता व युवराज दिसत होते. नंतर त्यासंबंधाने राज ठाकरे यांची खोचक प्रतिक्रियाही दाखवण्यात आली. तसे पाहिल्यास त्यात नवे असे काहीच नव्हते. दाभोळकर यांच्या हत्येनंतर तात्काळ दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये राज यांनी जो संशय व्यक्त केला होता, त्याचीच त्यांनी महिनाभराने पुनरुक्ती केलेली होती. अन्य कुठल्याही गुन्ह्याचे आरोपी व पुरावे सापडतात, मग दाभोळकरांचेच मारेकरी का सापडत नाहीत; असा सवाल राजनी एका. ही हत्या सरकार प्रायोजित तर नाही ना; असा खुला आरोप राजने केला. महिनाभर आधी त्यांनी संशयाची सुई सत्ताधार्‍यांकडेही जाते; असे म्हटलेलेच होते. आता अशा राजकीय आरोपाकडे सत्ताधारी पक्षाने काणाडोळा करणेही शक्य नव्हते. सहाजिकच त्यावर सत्ताधारी, म्हणजे कॉग्रेस व राष्ट्रवादी यांच्याकडून अत्यंत संतप्त बोचर्‍या प्रतिक्रिया आल्या. त्याही सदरहू मराठी वाहिन्यांनी अगत्यपुर्वक दाखवल्या. त्यापैकी राष्ट्रवादीचे माजी मंत्री व आजकालचे प्रवक्ते नबाब मलिक, यांनी दुखण्यावरच बोट ठेवले. अर्थात ते तसे राज ठाकरे यांचे दुखणे म्हणता येणार नाही. तर माध्यमांचे वा सेक्युलर दुखणे म्हणता येईल. म्हणूनच त्याची योग्य दखल माध्यमे वा सेक्युलर मंडळींनी कशी घेतली नाही; याचे मला खास आश्चर्य वाटले. मग तो विषय तसाच मनात घोळत राहिला.

   नबाब मलिक म्हणाले, युतीची सत्ता असताना, असेच एक हत्याकांड अनुत्तरीत राहिलेले आहे. ज्याचे दुवे व धागेदोरे आजवर सापडलेले नाहीत आणि त्यातला अनुभव दांडगा असल्यानेच राज ठाकरे असा संशय घेत असावेत. त्यांचा रोख युतीची सत्ता असतानाच्या गाजलेल्या रमेश किणी मृत्यूशी होता. मुंबईचा एक रहिवासी हा किणी पुण्याच्या अलका टॉकीजमध्ये संशयास्पद रितीने मृतावस्थेत सापडला होता. त्यानंतर दिर्घकाळ त्या मृत्यूसाठी शिवसेनेचे तेव्हा नेता असलेले राज ठाकरे यांच्यावर आरोप झाले होते. त्यांच्या निकटवर्तियांना त्यात गुंतवून रोजच्या रोज आरोपांच्या फ़ैरी उडवल्या जात होत्या. अखेरीस दोनतीन लोकांना अटक झाली. सीबीआयची चौकशी झाली. पण प्रत्येक चौकशीत आरोप निष्फ़ळ ठरले. कोणी साक्षीदार वा कुठला पुरावा समोर आणला गेला नाही. पुढे त्यात आरोपी केलेल्यांचीही कोर्टात निर्दोष मुक्तता झाली. पण आज नबाब मलिक व गेल्या वर्षापुर्वी नाशिकच्या महापालिका निवडणूकीत छगन भुजबळ, यांनी पुन्हा किणी हत्याकांडाचा उल्लेख केला होताच. महिनाभरापुर्वी जसा दाभोळकर प्रकरणात सनातन वा त्याचे कोणी म्होरके आहेत, त्यांच्यावर छातीठोकपणे आरोप चालले होते, तसेच तेव्हा किणी प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर बेताल आरोप चालू होते. तीन चौकश्या होऊनही साधा एफ़ आय आर दाखल व्हावा इतकाही दुवा सापडला नव्हता. तरी भुजबळांपासून पुष्पा भावे यांच्यापर्यंत तमाम लोक कंबर कसून राज ठाकरे यांच्या अटकेसाठी अहोरात्र झटत होते. त्यासाठी किणी यांची पत्नी शीला किणी यांना प्रेक्षणीय व्यक्ती असल्यासारखे सहानुभूती जमवायला पेश केले जात होते.  किमान वर्ष दिड वर्ष हा खेळ चालला. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. दोन वर्ष त्या ‘बहिणी’कडून भुजबळांनी राखीही बांधून घेतली होती. परंतू आज मृत रमेश वा त्याची पिडीत पत्नी शीला किणी कोणालाही आठवत नाही. किंबहूना तेव्हा वरातीतल्या वर्‍हाड्यांसारखे नाचणारे कपील पाटिल, निखिल वागळे, युवराज मोहिते, पुष्पा भावे, छगन भुजबळ सगळेच किणीला विसरून गेलेत. याचा अर्थ, त्याच्या मारेकर्‍यांचा शोध लागला व त्यांना कठोर शिक्षा झाली अशी समजूत करून घेण्याचे काही कारण नाही. त्यात पकडलेल्या संशयितांवर खटले झाले व सुनावण्य़ाही झाल्या. पण दोनपाच वर्षे चाललेल्या त्याच खटल्याच्या कुठे बातम्याही आल्या नाहीत, की त्या सहानुभूतीदारांपैकी कोणी त्याबद्दल शीला किणींकडे विचारपूसही करायला फ़िरकला नाही.

   म्हणूनच मला नवल वाटले. गुरूवारी रात्री राज ठाकरे यांच्या हस्ते दाभोळकरांच्या स्मृत्यर्थ काढलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करताना त्यांच्याच बाजूला मिरवणारे युवराज मोहिते बघून मला नवल वाटले. ते चित्र शीला किणी यांनी बघितले असेल; तर त्यांना काय वाटले असेल? कारण हेच युवराज मोहिते तेव्हा सतरा वर्षापुर्वी किणी हत्याकांडातला आरोपी म्हणून राज ठाकरे यांच्यावर चिखलफ़ेक करण्यात गर्क होते. आज ज्याप्रकारे त्यांनी आपल्या माध्यमातून दाभोळकर यांच्या संशयास्पद हत्येबद्दल सहानुभूतीचा धंदा मांडला आहे; तसाच तेव्हा त्यांनी निखिलच्या ‘महानगरी’ दुकानातला एक साधा विक्रेता म्हणून रमेश किणी यांच्या मृत्यूचा बाजार मांडला होता. त्यासाठीच्या सहानुभूतीचा वाडगा फ़िरवलेला होता. त्यासाठी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर हत्यारा म्हणून शरसंधान चालविले होते. ज्या तडफ़ेने व आवेशात आज युवराज व त्यांचे पुरोगामी सेक्युलर साथीदार सनातनच्या विरोधात गदारोळ करतात; तेच तेव्हा राज ठाकरेच्या विरोधात चाललेले होते. तुलनेने सनातन विरुद्धचा गाजावाजा महिन्याभरात कमी झाला वा ओसरला आहे. राज विरुद्धचा तमाशा वर्षभर तरी जोमात चालू होता. त्याबद्दलही माझी तक्रार नाही. आज दाभोळकरांच्य मारेकर्‍यांना पकडण्यासाठी टाहो फ़ोडत असताना; आपण राज ठाकरेच्याच बाजूलाच उभे आहोत व त्याच्याच ‘शुभहस्ते’ दाभोळकरी पुस्तकाचे थाटामाटाने प्रकाशन करून घेत आहोत, हे समजण्या इतकीही युवराजला शुद्ध नसावी? कारण अजून तरी त्याने किंवा त्यांच्या सेक्युलर गोतावळ्यातील कोणी; किणी प्रकरणात राज ठाकरे निर्दोष असल्याचे जाहिरपणे मान्य केल्याचे माझ्या ऐकीवात नाही. किंवा सतरा वर्षापुर्वी आपण किणी प्रकरणात अकारण राजला गोवण्याचे पाप केल्याची कबुली त्यांनी कुठे दिलेली माझ्यातरी वाचनात नाही. म्हणजेच आजही राज ठाकरे त्यांच्यासाठी किणी मृत्यूमधला संशयितच असतो ना? मग त्याच्याच हस्ते दाभोळकरी विचारांचे पुस्तक प्रकाशन? की धंदा व फ़ायदा असेल तेव्हा मरणारा निव्वळ विकावू वस्तू समजण्याला सेक्युलर पुरोगामी कळवळा म्हणतात?

   एका बाजूला राष्ट्रवादी पक्षाचा प्रवक्ता नबाब मलिक, किणी प्रकरणाची राज ठाकरे यांना आठवण करून देतो आणि दुसरीकडे त्याच किणीच्या सुतकातला एक प्रमुख सुतकी युवराज त्याच राज ठाकरे यांच्या हस्ते त्याच दाभोळकरी पुस्तकाचा सोहळा साजरा करतो. काय सांगावे? उद्या काही वर्षांनी हेच युवराज व त्याचे सेक्युलर साथीदार अन्य कुणा सेक्युलर पुरोगाम्याच्या विचारांच्या पुस्तकाचे प्रकाशन सनातनच्या आठवल्यांच्या हस्ते सुद्धा करू शकतील. त्यांना कोण मेला अथवा मारला गेला, याच्याशी काहीही कर्तव्य नसते.  त्याच्या मरणातून आपल्याला काय साध्य करून घेता येते; त्यावर त्यांचा डोळा असतो. म्हणून तर किणीच्या प्रकरणात राज ठाकरे व त्याच्या माध्यमातून सेना भाजपाच्या युती सरकारला गोत्यात घालण्यासाठी त्या मृत्यूचा वापर झाला आणि जेव्हा त्यामध्ये राजला गुंतवता येत नाही असे दिसून आले; तेव्हा शीला किणी यांना वार्‍यावर सोडून तमाम सेक्युलर चळवळ्ये फ़रारी झाले होते. आजही फ़रारी आहेत. पण डॉ. दाभोळकर तर त्यांचे आपले, म्हणजे चळवळीतले आहेत ना? त्यांच्याविषयीची सहानुभूती किती खरी मानायची? माझा तरी तसा गैरसमज होता. पण गेल्या महिन्याभरात तोही संपला. कारण एका महिन्याच्या आत २०-२१ ऑगस्टला गळा काढून टाहो फ़ोडणार्‍या तमाम रुदाल्या आज बेपत्ता आहेत. पंधरा दिवस सनातनच्या कुणा म्होरक्याला झोडण्यासाठी निमित्त म्हणून दाभोळकरांच्या हत्याकांडाचे चक्क भांडवल करण्यात आले. मग गोव्यात कोणी सनातनचा साधक पकडल्याचे ढोल पिटून झाले. पण त्यानंतर यात सनातनला गोवता येत नसल्याचे जाणवताच, तमाम सेक्युलर पुरोगामी फ़रारी झालेत आणि हमीद वा मुक्ता ही दाभोळकरांची मुले आपल्यापरीने न्यायासाठी प्रयत्नशील आहेत. याचा अर्थ काय घ्यायचा? महिनाभरापुर्वी टाहो फ़ोडत गल्ली ते दिल्लीपर्यंत आक्रोश करणार्‍यांना दाभोळकरांबद्दल आत्मियता होती? त्यांना न्याय मिळावा म्हणून ओरडा चालला होता? की बहुतेक पुरोगामी आपला सनातन विरुद्धचा कंडू शमवून घेण्यासाठी एका निरपराधाच्या हत्याकांडाचे बेशरम राजकीय भांडवल करीत होते? जितक्या सराईतपणे किणी हत्याकांड वार्‍यावर सोडून पुरोगामी राजकारण खेळले गेले, तितक्याच व्यापारी दिखावू मानसिकतेने दाभोळकरांच्या हत्याकांडाचे राजकारणच केले गेले नाही काय? सनातनला गोत्यात आणण्यापलिकडे त्यांचे सेक्युलर पुरोगामी अश्रू किती दिखावू व खोटे होते त्याचा यापेक्षा अधिक पुरावा कुठला हवा? सनातन संस्था अडकणार नसेल; तर यातल्या किती लोकांना दाभोळकरांचे खरे खुनी व हल्लेखोर पकडले जाण्यात स्वारस्य आहे? असेल तर त्याविषयीचा आवाज का थंडवला आहे? जितका सनातनवाल्यांना पकडण्य़ासाठी दबाव आणला जात होता, तितका खरे गुन्हेगार पकडण्यासाठी जोर का लावला जाताना दिसत नाही?

   यासाठीच मी पुरोगामी व सेक्युलर हे शब्द शिवीसारखे वापरतो किंवा अपशब्द मानतो. इतकी या मतलबी लोकांनी त्या शब्दांची रया रसातळाला नेऊन ठेवली आहे. गुन्हेगार व हल्लेखोर देखील अशा व्यापारी मतलबी पुरोगाम्यांपेक्षा अधिक प्रामाणिक असू शकतील. म्हणून मला कोणी प्रतिगामी, पुराणमतवादी म्हटले तरी चालते. पण पुरोगामी म्हटले तरी अंगावर झुरळ पडल्यासारखे शहारे येतात. आपणही त्या पुरोगामी बदमाशांकडून गुराढोरासारखे वापरले जाऊ, अशी भिती सतावते. सर्व आयुष्य चळवळीसाठी देणार्‍या दाभोळकराची ही स्थिती असेल, तर सामान्य पुरोगामी कार्यकर्त्याचे किती भयंकर शोषण व फ़सवणूक दिशाभूल होत असेल याची नुसती कल्पनाच केलेली बरी.