गुरुवार, २४ डिसेंबर, २०१५

संघासमोरचे ऐतिहासिक आव्हान

 

कुठलीही संस्था संघटना काही माणसे एकत्र येऊन स्थापन करतात, तेव्हा त्यामागे त्यांचे काही हेतू असतात. ते हेतू त्यांना कितीही उदात्त वाटत असले तरी इतर काहीजणांना तेच हेतू शंकास्पद वाटतात. सहाजिकच कुठलेही कार्य वा ते करणारी संस्था संघटना टिकेचे लक्ष्य होते असते. म्हणूनच नव्वद वर्षापुर्वी स्थापन झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज वा पुर्वी टिकेचे लक्ष्य झाला असल्यास नवल नाही. पण त्याचे काही लाभ ज्यांना मिळतात वा त्याविषयी आत्मियता असते, त्यांना त्याचे काम उदात्त व उपकारक वाटणे स्वाभाविक असते. संघ खुप साधी संघटना आहे. आजकाल जगात अनेक विध्वंसक हिंसक संस्था संघटना उदयास आलेल्या आहेत की त्यांची जाहिर भूमिकाच जगाला भेडसावते आहे. पण त्यात कार्यरत असलेल्यांना ते फ़ार मोठे पवित्र कार्य वाटत असतेच. मग संघासारख्या सेवाभावी व काही सांस्कृतिक उद्दीष्ट बाळगणार्‍या संस्थेच्या अनुयायांना आपल्या संघटनेकडे संशयाने बघितले गेल्यास राग येणेही स्वाभाविक आहे. अर्थात अशा संघटना काय काम करतात आणि त्यांच्यावर टिका कोणती होते, यापेक्षा त्याचे एकूणच मानवी जीवनावर कोणते परिणाम होतात, याला अधिक महत्व असते. खेरीज त्यांच्या संघटनेतून जी शक्ती निर्माण झालेली असते, त्यात अनेकांना आपले हितसंबंध साधण्याची प्रबळ इच्छाही होत असते. म्हणून मग अशा संस्था संघटनांवर होणारी टिका किंवा व्यक्त होणारी मते, विभिन्न स्वरूपाची असतात. म्हणजे कोणी त्यावर बंदी घालण्याची मागणी करतो तर कोणी त्यांच्या हेतूविषयी शंका घेत उद्दीष्टे बदलण्याचाही आग्रह धरतो. कोणी त्यांना अमूकतमूक करा असे सल्ले देतो, तर कोणी अन्य काही करायचे सोडून देण्याचाही आग्रह धरत असतो. मग त्यांनी नेमके काय करायला हवे? कोणाचे ऐकावे? कसे वागावे?

उद्या तोयबांना कोणी पुरग्रस्तांना मदत करायचा आग्रह धरला, तर कसे चालेल? विविध चर्च संघटनांना त्यांनी धर्मप्रसार बंद करण्याचा सल्ला दिल्यास चालेल काय? एका ठराविक उद्देशाने स्थापन झालेल्या संघटना त्याच हेतूपुर्तीसाठी काम करत असतात आणि मग तो हेतू साध्य करण्यासाठी आवश्यक असेल अशा मार्गाने काम करीत जातात. ते ज्यांना अमान्य असेल, अशा लोकांनी आपली संघटना बनवावी आणि त्या संस्थेतर्फ़े नकोशा संस्थेच्या कामाला बरकत येणार नाही, असे वातावरण निर्माण करावे. त्यांना कोणी रोखलेले नाही. पण आपल्या हेतूसाठी दुसर्‍यांनी त्याचे हेतू सोडून देण्याचा आग्रह संपुर्णपणे मुर्खपणाचा व गैरलागू असतो. त्याला नकारात्मक भूमिका असे म्हणता येईल. डॉ. केशवराव हेडगेवार यांनी नव्वद वर्षापुर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि काही विश्वासू सहकार्‍यांच्या मदतीने तरुणांना ठराविक उद्दीष्टासाठी संघटीत करण्याचा मनसुबा रचला होता. त्याचे कारण काय होते? डॉक्टरही मुळातच स्वातंत्र्य चळवळीत होते आणि तिथे काम करताना त्यांना कॉग्रेस नावाची संघटना मुस्लिमांना झुकते माप देते किंवा हिंदूंच्या बाबतीत अन्याय्य पक्षपात वागते असे वाटते. त्यामुळे त्यांनी कॉग्रेसमध्ये राहून त्यात बदल करायचा प्रयत्न केला. कॉग्रेसच्या भूमिका बदलू शकल्या नाहीत, तेव्हा डॉक्टरांनी कॉग्रेसच्या अशा हिंदूविरोधी धर्मनिरपेक्षतेला शह देण्याचा निर्धार केला. संघ त्यातूनच उदयास आलेला आहे. त्याचा जन्मच मुळात तोतया पक्षपाती धर्मनिरपेक्षतेला शह देण्यासाठी झालेला आहे. मग आज त्याच्या पाठीशी भक्कम पाठबळ उभे राहिल्यावर त्याने कॉग्रेस वा तथाकथित तोतया धर्मनिरपेक्षतेची कास धरावी काय? तसा संघाकडे आग्रह धरणेच मुर्खपणा नव्हे काय? पक्षपाती सेक्युलर विचार देशाला धोकादायक आहेत, अशा भूमिकेतून संघ जन्मला ही वस्तुस्थिती नाकारून त्याच्याकडे बघता येणार नाही.

अर्थात हा तात्विक विषय आहे आणि त्याच उहापोह सामाजिक वा राजकीय अभ्यासकांनी करावा. पण पत्रकार म्हणून जर नव्वदीच्या घरात पोहोचलेल्या व शंभरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या संघाचा विचार करायचा असेल, तर वर्तमानाचा विचार योग्य ठरेल. म्हणून आज इतिहासाने या संस्थेवर कोणती जबाबदारी टाकलेली आहे, त्याचा उहापोह करणे मला अगत्याचे वाटते. कारण नव्वद वर्षानंतर परिस्थिती खुप बदलली आहे. जग आणि देशच नव्हेतर जागतिक गुंतागुंतही आमुलाग्र बदलली आहे. त्या चक्रव्युहात जगातल्या प्रत्येक संस्था संघटनेला आपली अशी एक भूमिका घेणे भाग ठरणार आहे. कारण जग आता खुप जवळ आले आहे. म्हणूनच संघ जरी भारतापुरता विचार करत असला वा भूमिका घेत असला, तरी जागतिक संदर्भ बाजूला ठेवून त्याला वाटचाल करता येणार नाही. स्थापनेच्या वेळी भारतीय उपखंड वा कॉग्रेसची स्वातंत्र्य चळवळ अशी सीमा होती. पुढल्या काळात म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात देशांतर्गत राजकारण व त्याचे इथल्या बहुसंख्यांक हिंदूंना भोगावे लागणारे परिणाम, अशा चाकोरीत संघाला काम करावेच लागणार होते. पण एकविसाव्या शतकाने हे राष्ट्रीय व भौगोलिक संदर्भ विस्कटून टाकले आहेत. मध्य आशियात मुस्लिमच आपल्या धर्मबांधवांच्या जीवावर उठलेत आणि त्यामुळे पाश्चात्य देशांना निर्वासितांचा लोंढा भेडसावतो आहे. भारताच्या पश्चिमेला महायुद्धाच्या कडेलोटावर आणून उभे केले आहे. जगाची विभागणी धर्म व वांशिक गटांमध्ये होत चालली आहे. अशावेळी हिंदूंचे संघटन म्हणवणार्‍या संघाला नव्या जबाबदार्‍या ओळखता आल्या पाहिजेत आणि मूळच्या उद्देशाला पुरक अशा नव्या जबाबदार्‍यांना सामोरे जाणेही भाग आहे. पण त्याचा कितीसा विचार संघात चालू आहे वा त्याची जाणिव कितीशी झाली आहे, याची शंका येते. हिंदू आणि राष्ट्रीय अशा गुंत्यात कुठेतरी संघ घुटमळतो आहे काय, त्याचाही खुलासा होत नाही.

सध्या जगाअमोर काय स्थिती आहे आणि त्यात भारताचे उत्तरदायित्व काय आहे? संघ किंवा भाजपा यांना त्याचाही विचार करणे भाग आहे. नव्वद वर्षापूर्वी संघाची स्थापना झाली, तेव्हा या उपखंडाला हिंदू राष्ट्र बनवण्याचे उद्दीष्ट हेडगेवार यांनी मनाशी बाळगले असेल तर ते चुक म्हणता येत नाही. कारण त्याच्याही कित्येक शतके आधीपासून या उपखंडाला इस्लामिक भूमी बनवणे या हेतूने आक्रमणे झाली व तसे प्रयत्न आजही चालू आहेत. पण तेव्हा समोरचे आव्हान मुस्लिम लीग वा मुस्लिम संघटनांपुरते मर्यादित होते. अधिक सेक्युलर वा धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा परिधान केलेल्या राजकारण्यांचे आव्हान समोर होते. त्यांच्याशी संघाला एकाकी लढणे भाग होते. आज ते आव्हान जागतिक झालेले आहे. जगभर पसरलेल्या जिहादी संघटना व त्यांचे आश्रयदाते असलेले अनेक इस्लामी देशाचे सत्ताधारी, यांनी एकविसाव्या शतकातले सर्वात मोठे राजकीय आव्हान जगासमोर ठेवलेले आहे. त्याच्याशी देशांतर्गत भारत सरकार लढते आहे. आजवरच्या सेक्युलर राजकारणाने भारत सरकारला हतबल करून ठेवल्याने, इथे इस्लामिक दहशतवाद बोकाळला आहे. पण त्याच काळात जगभर इस्लामिक जिहादी हिंसाचाराने थैमान घातले आहे. म्हणजेच संघाच्या सामाजिक राजकीय भूमिकेच्या जवळ अवघ्या जगाला यावे लागते आहे. नव्वद वर्षापुर्वी जी समस्या संघाने वा हेडगेवार यांनी ओळखली होती, ती आता जागतिक प्रश्न बनली आहे. अवघे जगच त्याच विषयावर उत्तर शोधते आहे. कारण इस्लामिक आव्हानाने अवघ्या जगाला महायुद्धाच्या कडेलोटावर आणून उभे केलेले आहे. म्हणूनच भले आज संघाचा एक प्रचारक व स्वयंसेवक पंतप्रधानपदी विराजमान झालेला असला, तरी त्याला देश वा उपखंडापुरता मर्यादित विचार करण्याची मोकळीक राहिलेली नाही. त्याला जगाचा विचार करणे भाग आहे. कारण जग आणि संघाची भूमिका भिन्न उरलेली नाही.

सांगायचा मुद्दा इतकाच, की रशियाचे पुतीन वा फ़्रान्स जी लढाई लढत आहेत त्यापेक्षा संघाचे उद्दीष्ट किंचितही वेगळे राहिलेले नाही. भले आज भारत इसिसच्या जिहादी युद्धात सापडलेला नाही. पण ते संकट भारताचे दार ठोठावत उभे आहे. अफ़गाण व पाकिस्तानमार्गे ते संकट भारताच्या सीमेवर येऊन कधीही उभे राहू शकते. जगाला आज जिहादी हिंसाचार भेडसावतो म्हणजे तरी काय? तर जिहादी इस्लाम या चौदाशे वर्षे जुन्या मानसिकतेलाच उत्तम जीवनशैली ठरवून ती जगावर लादण्याचा संघर्ष छेडला गेलेला आहे. त्यामुळे कुठल्याही देशाला जिहादी इस्लामशी लढायचे असो किंवा नसो, त्याला त्यापासून पळण्याची मुभा उरलेली नाही. अमेरिकेपासून युरोपातील देशांनी त्यापासून पळ काढण्याचा खुप प्रयत्न करून बघितला. पण त्याचा उपयोग झाला नाही आणि त्यांना अघोषित युद्ध खेळावेच लागते आहे. जिहाद मोडीत काढणे म्हणजेच इस्लामिक आक्रमण मोडीत काढणे होय. कारण जिहाद हा इस्लामिक धर्माची जीवनशैली उर्वरीत जगावर लादण्याचा संघर्ष आहे. त्याचाच दुसरा अर्थ तुमची जी कुठली बिगर इस्लामिक जीवनशैली असेल, ती समूळ नष्ट करण्याचा हा संघर्ष आहे. त्याला शरण जाणे किंवा त्याच्याशी दोन हात करून आपापली जीवनशैली सुरक्षित राखणे, इतकाच पर्याय बिगर इस्लामिक लोकसंख्येपुढे शिल्लक आहे. मग तो उद्देश घेऊन उदयास आलेल्या संघाची भूमिका व रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन वा फ़्रान्सचे अध्यक्ष ओलेंदे यांच्या भूमिकेत कितीसा फ़रक उरतो. अर्धवट बुद्धीचे पुरोगामी त्याला इस्लामोफ़ोबिया असे खुळचट नाव देतात. पण हा वास्तविक मुस्लिमद्वेष नव्हे. तर भेडसावणार्‍या संकटाविषयी फ़ोडला जाणारा टाहो आहे. त्यातून आपापली जीवनशैली वाचवण्यासाठी एकेकटे लढायचे, की सामुहिक आव्हान ओळखून संयुक्तपणे त्याला सामोरे जायचे, हे सर्वच देशांना ठरवावे लागणार आहे.

यात मग भारताची भूमिका काय असणार आहे? असा प्रश्न विचारला, मग ती भूमिका भारत सरकार ठरवू शकते, संघाचे ते काम नाही, असे बोलणे गैरलागू आहे. कारण हा लढा कुणा एका देशाशी दुसर्‍या देशाची लढाई नाही. तर बिगर इस्लामिक जीवनशैली विरुद्ध असंहिष्णू इस्लामिक जीवनशैलीचे आक्रमण, असा आहे. त्यात अवघा समाज ओढला जाणे अपरिहार्य आहे. त्या परिस्थितीत भारताचे भौगोलिक स्थान महत्वाचे आहे. इस्लामिक आव्हान उभे आहे ते आशिया व त्याच्याशी संलग्न अशा युरोपिय व आफ़्रिकन भूमीत उभे आहे. त्यामुळे़च येऊ घातलेले महायुद्ध हे आशियात उफ़ाळत चालले आहे. त्यात चीन, रशिया व भारत यांना निर्णायक भूमिका पार पाडावी लागणार आहे. इस्लामिक देशांचे शेजारी असलेले हेच तीन मोठे देश आहेत आणि त्यांना आपापल्या जीवनशैलीचा बचाव करणे भाग आहे. याखेरीज अन्यत्र असलेल्या देशांच्याही जीवनशैलीला आक्रमक इस्लामचा धोका आहे. पण त्यांच्या भूमीवर युद्ध होण्यापर्यंत मजल जाणार नाही. युद्धाचा भडका आशिया, आफ़्रिका व पुर्व युरोप असाच होणे अपरिहार्य आहे. त्यासाठी पुतीन यांनी रशियाच्या वतीने पुढाकार घेतला आहे आणि आक्रमक इस्लामच्या विरोधात शियापंथीय मुस्लिमांना वेगळे काढण्यात यश मिळवले आहे. दुसरीकडे सौदी अरेबियानेही ३४ इस्लामिक देशांची आघाडी उभी करण्याची जमवाजमव केलेली आहे. त्यात अजून अमेरिका व युरोपियन महासंघाची भूमिका स्पष्ट होऊ शकलेली नाही. पण त्यांनाही क्रमाक्रमाने पुतीन यांच्यासोबत जाणेच भाग पडणार आहे. मग यात भारत कोणती भूमिका घेऊ शकतो? भारताला अलिप्त राहून पळ काढता येईल काय? जगातील दुसर्‍या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भारताला यापासून पळणे शक्य नाही. म्हणूनच सरकारला काही ठाम भूमिका घ्यावी लागेल आणि अशा वेळी संघाला त्यात पुढाकार घ्यावाच लागणार आहे.



कारण संघ ही हिंदूंची वा भारतीय जीवनशैली जपण्यासाठी उदयास आलेली संघटना आहे. दुसर्‍या महायुद्धाने अवघा युरोप बेचिराख केला होता. हिटलर वा त्याच्या कडव्या समर्थकांनी त्यातून काय मिळवले? त्यांनी जे मिळवले त्यापेक्षा जिहादी मानसिकतेला अन्य काहीही जास्त मिळवायचे नाही. कारण जिहादसाठी भारावलेले जे योद्धे लढवय्ये आहेत, त्यांना कुठला देश, भूमी वा साधनसंपत्ती याच्याशी काडीचे कर्तव्य नाही. त्यांना अल्लाहने मृत्यूनंतर देवू केलेल्या जन्नत म्हणजे नंदनवनात जायचे आहे. त्यामुळे इथे किती व कोणती नासधुस होते, याची त्यांना फ़िकीर नाही. ही लढाई दोन विभिन्न मानसिकतेची आहे. जगण्यासाठी लढणारे विरुद्ध मरण्यासाठीच उतावळे झालेले, अशी चमत्कारिक लढाई होऊ घातली आहे. त्यापासून भारताला पळ काढता येत नाही. म्हणूनच संघालाही त्याचे उत्तरदायित्व पार पाडणे भाग पडणार आहे. ते उत्तरदायित्व त्यांचा प्रचारक असलेल्या एकट्या पंतप्रधानाचे नाही, तर बिगर इस्लामिक जीवनशैली जपण्यासाठी कटीबद्ध असलेल्या प्रत्येकाचे ते कर्तव्य आहे. त्याचा अर्थ असा, की भारताला आता हिंदूराष्ट्र बनवण्याची गरज नसून मुळात अवघ्या जगालाच इस्लामी जीवनशैलीच्या कचाट्यात जाण्यापासून रोखण्याची जबाबदारी संघाला पार पाडावी लागणार आहे. म्हणजे संघाच्या स्वयंसेवकांनी युद्धभूमीवर जाऊन वा घातपाताच्या प्रसंगी लढायला धावून जाणे, असा अर्थ होत नाही. तर येणार्‍या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जी भारतीय मानसिकता इथल्या कोट्यवधी जनतेमध्ये सज्ज असायला हवी, ती तयार करण्याची कामगिरी मोलाची आहे. पंतप्रधान वा सरकार हे काम करू शकत नाही. तर सामान्य जनतेमध्ये मिसळून असलेल्या स्वयंसेवक वा कार्यकर्त्याने ही जबाबदारी उचलायची असते. त्यासाठी अधिकाधिक समाजघटक व बिगरजिहादी मानसिकतेच्या लोकांची एकजुट बांधण्याला प्राधान्य असायला हवे आहे.  

ज्याप्रकारे नरेंद्र मोदी यांनी मागल्या दिडवर्षात जगभर फ़िरण्याचा सपाटा लावला आणि त्यातून देशाची समर्थ प्रतिमा जागतिक नेत्यांसमोर उभी केली, त्यामागचे हेतू अनेक भाजपा नेत्यांनाही उमजलेले दिसत नाहीत. कॉग्रेसची दिर्घकालीन सत्ता संपवून आपल्या हातात सत्तासुत्रे आलीत, म्हणजे आता आपण सत्ता उपभोगायला मोकळे झालो, अशा काहीशा समजुतीत भाजपाचे विविध पातळीवरचे नेते मोकाट बोलत असतात वा बेताल वागत असतात. त्यांना कानपिचक्या देवून व्यापक राजकीय व ऐतिहासिक उद्देशाच्या दिशेने वळवण्याची कामगिरी संघाने पितृत्वाच्या नात्याने पार पाडायला पुढे आले पाहिजे. आपला भाजपाच्या राजकारणाशी संबंध नाही, असे म्हणून भागणार नाही. कारण त्यात तथ्य असो किंवा नसो, मोदी वा भाजपाच्या यशापयशाचे खापर नेहमी संघाच्याच डोक्यावर फ़ोडले जाते. तेव्हा त्यापासून पळण्यात अर्थ नाही. त्याला सामोरे जाणे हीच आज संघाची ऐतिहासिक जबाबदारी आहे. कारण येऊ घातलेले महायुद्ध भारताला टाळता येणार नाही की भारतीयांची त्यापासून सुटका नाही. इसिस वा विविध जिहादी संघटनांनी तशी व्युहरचना दिर्घकाळात केलेली आहे. ती नाकारणे वा तशी समस्या नसल्याचे समजून बसणे ही इतरांची चुक आहे. म्हणून तो धोका टळलेला नाही, तर अधिकच सोकावला आहे. त्यात भारतातूनही अनेक मुस्लिम तरूण आयुष्य झोकून द्यायला सरसावलेले आहेत. म्हणूनच तो धोका नाकारून वा त्याकदे पाठ फ़िरवून भारत नावाच्या देशाला वाचवता येणार नाही. अशावेळी ज्यांना भारतीय राष्ट्र, त्याची संस्कृती वा जीवनशैली जगवण्याची इच्छा आहे त्यांनीच मार्ग शोधायला हवेत आणि उपाय योजायला हवेत. ते उपाय कोणते आणि कोणकोण त्यात सहभागी होऊ शकतो, त्याची चाचपणी करून तशी जमवाजमव करणे भाग आहे. म्हणूनच ते काम आजच्या संघाचे उद्दीष्ट असू शकते.    

जिहादी इस्लाम म्हणजे तमाम मुस्लिम, त्याचे पुरस्कर्ते असतात असे नाही. तर कट्टर इस्लामिक कालबाह्य जीवनशैली जगावर लादू बघणारे आणि त्यांच्याशी सहमत नसलेले मुस्लिम अशी मुस्लिमातही विभागणी आहे. त्या भिन्न मुस्लिमांना सोबत घेवून त्यांच्यावरही असे संकट आले असल्याचे, त्यांना समजावणे भाग आहे. कारण जिहादी मानसिकता ही कडव्या इस्लामची पुरस्कर्ती आहे. त्यात किंचीतही तडजोड त्यांना मान्य नाही. म्हणजेच बहुतांश मुस्लिमही जिहादचे विरोधक असू शकतात. दुसरीकडे जिहादी हिंसेविषयी उदास असलेल्या, राजकारणाच्या आहारी गेलेल्या लोकसंख्येला त्याविषयी जागरूक करणे, ही जटील कामगिरी आहे. अवघा युरोप आज त्यात फ़सलेला आहे. तिथे ज्यांनी पुरोगामी नशेतून बाहेर पडायचा प्रयास व संघर्ष चालविला आहे, त्यांनाही हाताशी धरणे या लढाईचा भाग आहे. कारण तुर्कस्थान, पाकिस्तान वा सौदी अरेबियासारख्या देशांनी दुटप्पी भूमिका घेऊन हा भस्मासूर उभा केलेला आहे. त्यापासून जगाला वाचवणे, जशी अन्य देशांची जबाबदारी आहे तशीच त्यांच्यासह या लढाईत भारतीय समाजाने पुर्ण शक्तीनिशी उतरण्याची गरज आहे. जितक्या एकदिलाने अ एकजुटीने रशिया पुतीन यांच्यामागे एकवटला आहे, तितके नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याची जबाबदारी संघाची नसेल तर कोणाची असेल? ती जबाबदारी विसरून पुरोगामी पोरकटपणाला उत्तरे देत बसणे, किंवा हिंदूराष्ट्र किंवा हिंदूत्ववाद म्हणून खेळत बसणे, संघाला उपकारक ठरणार नाही. याचे एकमेव कारण म्हणजे येऊ घातलेल्या जिहादी महायुद्धात चहूकडून इस्लामिक देशांनी घेरलेली मोठी बिगरमुस्लिम लोकसंख्या भारतात हिंदूंची आहे आणि त्याचे नेतृत्व संघाला करणे भाग आहे. त्याचे भान सुटलेल्या भाजपातील सत्तालोलूप नेत्यांचे कान उपटण्याचे काम संघ नाही, तर कोण करू शकेल? याचा अर्थ भारतात हिंदू-मुस्लिम असा संघर्ष उभा करणे असा होत नाही.

महापूर, भूकंप वा कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी संघाचे स्वयंसेवक धावून जातात किंवा संस्कृती वा धार्मिक हक्कांसाठी हिंदूंच्या बाजूने उभे रहातात. त्यात गैर काहीच नाही. पण इतकी मोठी संघटना एकूण देश व समाजाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी कटीबद्ध असायला हवी. कुठल्याही ऐतिहासिक जबाबदारीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असायला हवी. किंबहूना कुठल्याही संघटनेचा हेतू असाच दिर्घकालीन असतो. आपल्याविषयी लोक काय म्हणतात वा लोकांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत, त्याची चिंता संघटनेने करून चालत नाही. तर आपले मुळचे उद्देश व हेतू; यांच्याशी प्रामाणिक राहून कालपरत्वे त्यात आवश्यक बदल करून इतिहास आपल्यावर टाकेल ती जबाबदारी पार पाडण्यासाठीच संघटना आवश्यक असते. जिहाद ही रानटी आक्रमक मानसिकता आहे. जेव्हा ती उग्र रुप धारण करून समोर येईल, त्यावेळी तिच्याशी दोन हात करण्य़ाच्या तयारीत भारतीय समाज असणे अगत्याचे आहे. त्यात हिंदू लोकसंख्या उतरण्याला पर्याय नसेल. पण ज्यांना रानटी जिहादी मनोवृत्ती मान्य नाही, अशाही बिगरहिंदू वा बिगरवहाबी मुस्लिमांना सामावून घ्यावे लागणार आहे. त्याचा पाया सरकार घालू शकत नाही, तर संघासारख्यांना त्यात पुढाकार घेणे भाग आहे. वास्तविक तेच काम धर्मनिरपेक्ष वा पुरोगामी संघटनांनी करायला हवे. पण तेच जिहादी मानसिकतेला शरण गेलेले असल्याने संघासारख्या संस्थांची जबाबदारी वाढलेली आहे. जिहादी इस्लाम व त्यातून जगभरच्या नागरी समाजाच्या अस्तित्वाला येऊ घातलेला धोका, लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे काम संघाकडून व्हायला हवे आहे. पण त्याचा कुठेही मागमूस दिसत नाही. म्हणून मग आपल्या ऐतिहासिक कर्तव्याचे भान संघाला आहे किंवा नाही, याची शंका येते. नागरी समाज या पृथ्वीतलावर शाबुत राहिला, तर त्याला हिंदू वा ख्रिश्चन वा आपापल्या जीवनशैलीत जगणे शक्य होणार आहे.

मुस्लिमांविषयी संशय वा इस्लामविषयी आक्षेप, हा संघावर कायम होणारा आरोप आहे. पण संघातील कितीजणांना खरोखरच इस्लामचे आव्हान ठाऊक आहे? किंबहूना इस्लामविषयी संघातील बहुतेकांचे अज्ञान हा चिंतेचा विषय आहे. कारण जिहादी इस्लाम आणि बाकीचे इस्लामिक पंथ यात मोठा फ़रक आहे. जिहादी इस्लाम हे हिंदूच नव्हेतर कुठल्याही नागर समाजासाठी मोठे संकट असते आणि आहे. पण त्यावर मात करण्यासाठी त्याची माहितीही पुरेशी असायला हवी. त्यात फ़सलेल्यांना बाहेर काढून संकटाची शक्ती कमी करता येते. तरच त्यावर मात करण्याची लढाई सोपी होत असते. एकविसाव्या शतकात संघाने भारतीय जीवनशैली सुरक्षित राखण्यासाठी तेच काम प्राधान्याने हाती घ्यायला हवे आहे. इस्लामविषयी सार्वत्रिक अज्ञान, हे जिहादी व त्यांच्या पुरस्कर्त्यांचे सर्वात विध्वंसक हत्यार झालेले आहे. त्याचा भयानक चेहरा व वस्तुस्थिती सामान्य माणसासमोर आणून अधिकाधिक लोकांना जिहादविषयी सजग व सतर्क करणे, ही मोठी लढाई आहे. हिंसाचारापेक्षा वा घातपातातील विध्वंसापेक्षा त्यामागची भयंकर मनोवृत्ती लोक समजून घेतील, तितकी ही लढाई सोपी होत जाईल. ते काम सरकार नव्हेतर संघाने हाती घ्यायला हवे आहे. अशा सजग लोकसंख्या व समाजाची सतर्कताच जिहादींसाठी दहशत बनू शकते. पर्यायाने त्यांची दहशत निकालात निघण्याला हातभार लावला जाऊ शकतो. तेच काम संघाने युद्धपातळीवर हाती घ्यायला हवे आहे. कारण जिहादी अमानुषतेने लादलेले महायुद्ध दार ठोठावते आहे आणि त्याच्याशी सामना करताना भारतीयांचे सामाजिक व सांकृतिक नेतृत्व करणारी देशव्यापी निष्ठावान संघटना आवश्यक आहे. सध्या तरी रा. स्व. संघ वगळता तशी कुठलीच संघटना दृष्टीपथात नाही. म्हणून इतिहासाने घातलेली हाक संघ जितक्या लौकर ऐकू शकेल, तितके शंभरी गाठताना त्याला उद्दीष्टाप्रत पोहोचण्याचे समाधान मिळवणे शक्य होईल.

(रा. स्व. संघाच्या नव्वदी निमीत्त लिहीलेला प्रदिर्घ लेख)
दुवा- http://manthan.evivek.com/Encyc/2015/12/23/historic-challenge-rss-torsekar.aspx

बुधवार, २ डिसेंबर, २०१५

पुरोगामी पत्रकारितेची दोन तोंडे

दोन्ही लेख लोकमत’मधले आणि विजय दर्डा यांचेच आहेत. फ़रक आहे संदर्भाचा आणि त्यात गुंतलेल्या लोकांचा!




http://www.lokmat.com/storypage.php?catid=297&newsid=9788429

आमीर, आम्हीही तुझ्याप्रमाणे चिंतित आहोत
First Published :30-November-2015 : 03:36:31

विजय दर्डा, (लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)

आमीर खान हा बॉलिवूडचा एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. तो एक विचार करणाराही अभिनेता असून, त्याचे सर्वच चित्रपट नायक-नायिकेने गाणी म्हणत झाडाभोवती गिरक्या घालण्याच्या घिश्यापिट्या चाकोरीहून वेगळे आहेत. कयामत से कयामत तक या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवून देणाऱ्या पहिल्या चित्रपटापासून तर सरफरोश, गुलाम, लगान, मंगल पांडे, रंग दे बसंती, तारे जमीं पे, थ्री इडियट््स आणि पीके इत्यादि आजवरच्या चित्रपटांतून व सत्यमेव जयते या टेलिव्हिजनवरील कार्यक्रमातून त्याने सर्वसामान्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे. आमीरने रुपेरी पडद्यावर साकार केलेली पात्रे पाहताना आणि त्याच्या कलेचा आनंद घेताना तो एक मुस्लीम आहे असा कोणी विचार केला असेल, असे मला वाटत नाही. रोजच्या व्यवहारात आपल्या संपर्कात येणारी व्यक्ती अमुक एका धर्माचे प्रतिनिधित्व करणारी आहे, असा विचार करण्याची आपणा भारतीयांना सवय नाही. खरे तर असा प्रश्नच निर्माण होत नाही.

गेल्या आठवड्यात दिल्लीत रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात व्यक्त केलेल्या सडेतोड मतांबद्दल आमीरच्या देशभक्तीबद्दल शंका घेतली जाणे व एकूणच त्याच्याविरुद्ध ओरड होणे क्लेषदायी होते. त्यावेळी आमिरने काय म्हटले होते ते जसेच्या तसे उद््धृत करणे येथे अधिक श्रेयस्कर ठरेल: ‘सध्या आधीपेक्षा जास्त भीतीची भावना आहे, हे माझे उत्तर मी पूर्ण करू इच्छितो. मला असे नक्की वाटते की, देशवासीयांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. मी घरी किरणशी (पत्नी) बोलतो तेव्हाही हे जाणवते. मी आणि किरण संपूर्ण आयुष्य भारतात राहिलेलो आहोत. आपण भारत सोडून जाऊ या का, असे किरणने प्रथमच विचारले. किरणने मला असे विचारणे हे खूप मोठे व धोक्याचे होते. तिला तिच्या मुलाविषयी भीती वाटते. रोज वर्तमानपत्र उघडताना ती घाबरते. यावरून वाढती असमाधानाची, वाढत्या निराशेची भावना असल्याचे दिसते. तुम्हाला नैराश्य आल्यासारखे वाटते... असे का बरं होत आहे?’

अनंत गोएंका यांनी विचारलेल्या प्रश्नाला आमीरने दिलेल्या प्रदीर्घ उत्तराचा हा भाग होता. त्यात पुरस्कार वापसी, साहित्यिकांचे निषेध व वाढती असहिष्णुता याचीही चर्चा झाली. पण आपण किंवा आपली पत्नी देश सोडून जात असल्याचे किंवा तसा विचार असल्याचे आमीरने कुठेही म्हटले नव्हते. या विधानावरून राजकीय वादळ उठल्यानंतर आमीरने आणखी एक निवेदन प्रसिद्ध करून आपल्या आधीच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला व आपण भारत सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही, आणि आपल्याला आपल्या देशातून कुणीही काढू शकत नाही, असेही त्याने ठामपणे सांगितले. आमीरच्या या विधानाची चिकित्सा करायची झाले तर त्यास एका भारतीय मातेला आपल्या मुलाविषयी वाटणारी चिंता असे म्हणता येईल. पण हल्लीचे वातावरणच असे आहे की या विधानावरूनही ज्याने त्याने आपला फुटपाडू अजेंडा पुढे रेटला. वास्तवात स्वत:ला भाजपा आणि संघाचे कथित हितचिंतक म्हणवून घेणाऱ्यांनीच आमीरविरुद्ध मोहीम चालविली. या टीकेचा रोख आणि भाषा पाहिली असता ती धाकदपटशा करण्याच्या उद्देशाने केलेली होती याविषयी काही शंका राहत नाही. ही भीती व्यापारी बहिष्काराची होती व एका हिंदू देशाने तु्म्हाला ‘किंग खान’ केले आहे याची बॉलिवूडमधील तीन खानांना आठवण करून देण्यासाठी होती. हे केवळ मौखिक पातळीपुरते मर्यादित राहिले नाही, ही आणखी एक चिंतेची बाब आहे. याचे कारण असे की जो कोणी आमीरच्या श्रीमुखात भडकवेल त्याला एक लाख रुपयांचे बक्षिस देण्याचे आव्हानही पंजाबमधील शिवसेनेच्या एका स्थानिक नेत्याने दिले. अर्थात, ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही, असा खुलासा शिवसेनेने केला. तरीही एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने असे हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे विधान करावे का, हा प्रश्न शिल्लक राहतोच.

मला असे वाटते की, आमीरच्या वक्तव्यावरून उमटलेल्या प्रतिक्रिया आपणा सर्वांनाच चिंता वाटावी अशा आहेत. सरकारच्या बाजूने असलेल्या लोकांनी आमीरसारख्या संवेदनशील अभिनेत्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासही आक्षेप घ्यावा आणि लोकांना त्यांच्या धर्माच्या आधारे धमक्या दिल्या जाव्या अशा भारताची आम्हाला चिंता वाटते. आमीरसारख्या समाजात प्रतिष्ठा असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत असे घडत असेल तर सामान्यांची काय अवस्था होईल, याची सहज कल्पना येऊ शकते. देश आणि एखाद्या वेळी सत्तेवर असलेले सरकार यातील फरक आपण ओळखायला हवा. माझ्या देशभक्तीविषयी शंका घेतली न जाता मी सरकारवर केव्हाही टीका करू शकतो. तो माझा मूलभूत अधिकार आहे. हा जसा आमीरचा मूलभूत हक्क आहे तसा तुम्हा-आम्हा सर्वांचा आहे. राज्यघटना हाच देशाचा एकमेव धर्मग्रंथ असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिलेली असताना, राज्यघटनेने दिलेला हा मूलभूत हक्क बजावल्याबद्दल कोणालाही टीकेचे लक्ष्य केले जाऊ शकत नाही किंवा त्यास त्रास दिला जाऊ शकत नाही.

भारतासारख्या विविधांगी संस्कृतींच्या, धर्मांच्या व भाषांच्या देशाच्या मूलगामी स्वरूपास धक्का लावण्याचा काही असामाजिक घटकांचा डाव आहे. साक्षी महाराज, योगी आदित्यनाथ, साध्वी प्राची, गिरिराज सिंह यांच्यासारखे लोक अशी प्रक्षोभक विधाने करू शकतात, याची लोकांना खरी चिंता वाटते आहे. यापूर्वीही अनेकांनी वैयक्तिक पातळीवर अशी बेजबाबदार विधाने नेहमीच केली आहेत व समाजानेही फारशा गांभीर्याने न घेता ती पचविली आहेत. पण यावेळी फरक असा आहे की, यावेळी सरकार भाजपाचे आहे व पंतप्रधान मोदी आहेत. अशी वाह्यात बडबड करणाऱ्या स्वपक्षीय खासदारांना आणि मंत्र्यांना पंतप्रधानांनी रोखले पाहिजे जेणेकरून लोकांना विश्वास होईल की, ‘सबका साथ, सबका विकास’ हाच त्यांचा अजेंडा आहे आणि तो मागे पडणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौरवार्थ राज्यघटनेशी देशाची प्रतिबद्धता व्यक्त करण्यासाठी लोकसभेत झालेल्या दोन दिवसांच्या चर्चेला उत्तर देताना मोदी यांनी सर्व आवश्यक अशी आश्वासने दिली. पण या ‘असहिष्णुतेच्या दूतां’ना मोंदींनी जाहीरपणे खडसावले पाहिजे आणि काही ठोस कारवाई केली पाहिजे जेणेकरून यादिशेने भविष्यात गुन्हे घडणार नाहीत. एक पक्ष या नात्याने भाजपाने असहिष्णुता निर्माण करणाऱ्यांचा बचाव करता कामा नये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम राहील याची काळजी घेतली पाहिजे. लोकसभेत दिलेल्या आश्वासनांचे पालन करून त्यांच्या पक्षाचे लोक भविष्यात असे प्रमाद पुन्हा करायला धजावणार नाहीत, यासाठी पंतप्रधान कठोर पावले कधी उचलतात आणि देशाला मजबूत करण्यासाठी सर्व धर्मांत भयमुक्त वातावरण कधी निर्माण करतात याची भारतवासीयांना प्रतीक्षा आहे.

हे लिखाण संपविण्यापूर्वी...

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नागपूरला एक आगळे वेगळे स्थान आहे. या शहरात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर निर्णायक विजय मिळवून भारताने मालिका २-० अशी जिंकल्याने नागपूरच्या क्रिकेट इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला. भारताच्या या विजयाने दक्षिण आफ्रिकेची नऊ वर्षांची विजयाची अखंड परंपरा खंडित झाली. पाहुण्यांनी याआधी पदेशातील १५ मालिका सतत जिंकल्या होत्या. ही परंपरा भारतीय संघाने खंडित केली. याचे श्रेय रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा व अमित मिश्रा या भारतीय फिरकी गोलंदाजांना द्यायला हवे.

==============   आणि आता तीन वर्षापुर्वीचे तत्वज्ञान वाचा   ==============
गंगा गये गंगादास, जमना गये जमनादास
तेव्हा विजय दर्डांनी लिहीलेला लोकमतमधला लेख आहे. मूळ लिन्क सापडली नाही.

https://www.facebook.com/krantikari.rashtrasant.tarunsagarji/posts/439840326060881

Tarunsagarji Maharaj
August 10, 2012 ·
मोदी, माध्यमे आणि मी..
विजय दर्डा
मी मोदींना राष्ट्रीय संत म्हणालो नाही आणि तसे कधी म्हणणारही नाही. त्यांनी केलेले विकासाचे दावे मला तेव्हाही खोटे वाटले आणि आजही मी माझ्या त्या मतावर कायम आहे. ली अनेक वर्षे मी सक्रिय राजकारणात व प्रभावी वृत्तकारणात आघाडीवर राहिलेला कार्यकर्ता आहे. संसदेच्या कामकाजाची १४ तर वृत्तपत्रीय नेतृत्वाची ४0 वर्षे माझ्या उपलब्धीत जमा आहेत. यातल्या प्रत्येकच क्षेत्रातील अनवधानाने घडलेल्या लहानशाही चुकीसाठी, मग ती प्रामाणिक का असेना, फारशी दयामाया कोणी दाखवीत नाही आणि तिचा जेवढा म्हणून राजकीय वापर करता येईल तेवढा केल्यावाचून कोणी थांबत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. आपल्या भक्ष्यावर क्रूरपणे तुटून पडणे हा राजकारण आणि वृत्तकारण या दोहोंचाही आताचा व्यवसायधर्म आहे.
या पार्श्‍वभूमीवर विचार करताना दि. २९ जुलैला अहमदाबादेत तरुण अवॉर्ड कौन्सिलने दिलेला 'तरुण क्रांती पुरस्कार-२0१२' हा स्वीकारणे मी टाळायला हवे होते, असे आता माझ्या मनात येते. हा पुरस्कार मला योगगुरू बाबा रामदेव आणि जैन आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटना (जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन) या दोहोंसोबत दिला गेला. मला दिलेला पुरस्कार मी माध्यमांद्वारे केलेल्या समाज व देशाच्या सेवेसाठी मला व्यक्तिश: दिला गेला होता. हा काळ माझ्या प्रिय मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या निधनाच्या दु:खातून बाहेर पडण्याचा होता. ते दु:ख विसरण्याच्या माझ्या प्रयत्नात राष्ट्रसंत श्री तरुणसागरजी महाराज यांनी मला साथ दिली. त्यांच्यासारख्या संतश्रेष्ठाला नकार देणे मला जमणारेही नव्हते. त्यांच्याच आग्रहावरून त्याही अवस्थेत हा पुरस्कार घ्यायला मी होकार दिला. तरुणसागरजींच्या मते हा पुरस्कार व त्याच्या वितरणाचा सोहळा या दोहोंचे स्वरूप अराजकीय व धार्मिक स्वरूपाचे होते. या सोहळ्याला हजर राहून व तेथे जमणार्‍या संतपुरुषांचे आशीर्वाद प्राप्त करून मी माझे दु:ख काहीसे हलके करू शकेन, असेही तेव्हा माझ्या मनात आले.
अशा अराजकीय सोहळ्यात तो आयोजित करणार्‍यांविषयी व त्यात सहभागी होणार्‍यांविषयी प्रशंसोद्गार काढणे हा एक शिष्टाचार आहे. ते उद्गार शाब्दिक अर्थाने घ्यायचे नसतात. एक प्रासंगिक उपचार म्हणूनच त्याकडे पाहायचे असते. माझ्या भाषणात व्यासपीठावर उपस्थित असलेले आचार्य तरुणसागरजी, रामदेवबाबा, मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि स्वत: मी या सार्‍यांनाच उद्देशून मी संत म्हणालो. त्याचे स्पष्टीकरणही मी त्याच वेळी दिले. तरुणसागरजींना मी धार्मिक संत म्हणालो. रामदेवबाबांना योगाचे संत तर नरेंद्र मोदींना राजकीय (राष्ट्रीय नव्हे) संत म्हटले. ही सारी प्रशंसा प्रासंगिक व एका धार्मिक सोहळ्याला साजेशी आहे व तशीच ती सारे घेतील, असे मला प्रामाणिकपणे वाटले. नरेंद्र मोदी यांचे राजकारण, त्यांची राजकीय निष्ठा व पक्ष या सार्‍यांविषयी माझ्या धारणा स्पष्ट आहेत. मोदींचे राजकारण नुसते धर्मश्रद्धेचेच नाही तर धर्मांध स्वरूपाचे आहे. मी लहानपणापासून एका धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाच्या संस्कारात वाढलेला कार्यकर्ता आहे. गुजरातेत झालेल्या २00२ च्या धार्मिक दंगलीत मोदींनी घेतलेली भूमिका व पुढाकार या दोहोंवरही मी संसदेत पंतप्रधान वाजपेयी यांच्या देखत कठोर टीका केली आहे. त्यांनी गुजरातच्या प्रगतीविषयी केलेले दावेही मला नेहमीच फसवे वाटत आले असून त्याविषयी मी वेळोवेळी जाहीररीत्या बोललो व लिहिलेही आहे. हा सारा इतिहास एका क्षणात विसरून माझ्या साध्या शब्दांचा माध्यमांनी केलेला विपर्यास एक वाचक, नागरिक, राजकीय कार्यकर्ता आणि वृत्तसमूहाचा प्रमुख म्हणूनही मला कमालीचा व्यथित करून गेला आहे. मी मोदींना तेथे वाघ म्हणालो. गुजरात हे गीरच्या सिंहांसाठी प्रसिद्ध असलेले राज्य आहे. एखाद्या वाघाची धास्ती वाटावी तशी स्वत:विषयीची भीती मोदींनी भाजपा व एकूणच संघ परिवारात निर्माण केली आहे. माझ्या विधानाचा अर्थ उघड होता व तो मोदींसकट सार्‍यांना समजणाराही होता. हे बोलत असताना आपण एका अराजकीय व काहीशा धार्मिक व्यासपीठावरून बोलत आहोत याचे भान मला होते. हे भान इतरही राखतील, अशीच माझी साधी अपेक्षाही होती.
राजकारणातल्या माणसाने अशा अपेक्षा बाळगू नयेत हे माझ्या उद्गारांच्या उमटलेल्या प्रतिक्रियांनी लागलीच माझ्या लक्षात आणून दिले. वृत्तपत्रीय माध्यमांना सामाजिक प्रश्नांची जेवढी ओढ असावी त्याहून मोठी ओढ सनसनाटीपणाची व अधिकात अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची असते हे त्या क्षेत्रातील एक म्हणून मला कळते. मात्र, त्यासाठी सरळसाध्या गोष्टी एवढय़ा ताणून व रंग देऊन मांडल्या जाऊ शकतात हा अनुभव दु:खद होता. २४ तास आणि सातही दिवस बातम्यांचा रतीब पुरवायचा तर प्रसारमाध्यमांना ज्या व्यवहाराचा अवलंब करावा लागतो तो मी या निमित्ताने अनुभवला. - विजय दर्डा

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५

जनतेपासून नाळ तुटलेले राजकारण

ध्येय अमुचे हे ठरले
कार्य दुसरे ना उरले




  (लेखांक  चौथा)


 पुरोगामी र्‍हासामागची मूळ संकल्पना लक्षात घ्यायला हवी. १९८० नंतरच्या काळात कॉग्रेस विरोधी राजकारणाला जनता पक्षातील काही मुठभर समाजवाद्यांनी संघविरोधाचा नवा कंगोरा निर्माण करून दिला. मात्र त्यापासून डावे पक्ष व कॉग्रेस अलिप्त होती. पण समाजवाद्यांच्या या विघातक राजकीय दिवाळखोरीचा कॉग्रेसला लाभ होणार असल्याने कॉग्रेसी नेते राजकारणी त्याला खतपाणी घालत राहिले. १९७७ च्या निवडणूकीत सेन्सॉरशीप उठल्याने माध्यमे मोकाट झाली होती. त्याचा मोठा लाभ जनता पक्ष मिळवू शकला. पण त्याचवेळी माध्यम हे राजकारणातले मोठे प्रभावी हत्यार असल्याचा शोध चौथा खांब म्हणून मिरवणार्‍यांना लागला होता. तिथून मग राजकारणात थेट ढवळाढवळ करण्याची पत्रकारांनी सुरूवात केली. काही पत्रकार उघड राजकारणात हस्तक्षेप करू लागले, तर काहीजण नेत्यांची वा पक्षांची सुपारीबाजी करू लागले होते. याखेरीज काही प्रमाणात तटस्थ पत्रकारितेला शह देवून संपादक व पत्रकार खुलेआम आपला राजकीय अजेंडा म्हणून माध्यमांनाच राजकीय हत्यार म्हणून वापरू लागले होते. अशावेळी पुन्हा सत्तेत आलेल्या कॉग्रेसने पत्रकारांना आपल्या राजकारणाचे दलाल व भागिदार बनवण्याचे पाऊल टाकले. सभा संमेलने वा मोर्चे-धरणे यातून जी मजल मारता येत नाही, त्याहून अधिक मोठी झेप प्रभावी माध्यम हाती असेल तर नुसत्या निवेदन वा लक्ष्यवेधी वाक्याने मारता येते, असे लक्षात येऊ लागले होते. सहाजिकच नामवंत संपादक व पत्रकारांचे स्तंभ राजकारणाची हत्यारे होऊ लागली. जनता पक्षाच्या सत्ताकाळात बिहारच्या बेलची गावात दलितांची वस्ती जाळली गेली. तर तिथे भेट देण्याच्या निमीत्ताने इंदिराजींनी वापरलेले माध्यम कुठल्याही भेदक हत्यारापेक्षा परिणामकारक होते. इंदिराजी तिथे गेल्या व नदीला पुर आल्याने पलिकडे जाणे शक्य नव्हते. तर त्यांनी हत्ती मागवला आणि इतक्या भीषण पुरातही दलित उध्वस्त गावाला भेट दिली. तेव्हा कॅमेरे नव्हते की थेट प्रक्षेपणाची सुविधाही नव्हती. तर निव्वळ तिथल्या स्थानिक बातमीदाराकडून आरंभीच्या बातम्या आल्या. मग तिकडे प्रमुख वर्तमानपत्रे व साप्ताहिकाच्या प्रतिनिधींनी धाव घेतली. परिणामी बेलची गावचा प्रचंड गाजावाजा सुरू झाला. मोरारजी सरकार व बिहार सरकारची तारांबळ उडाली. पण त्या एक घटनेचा इतका चतुराईने इंदिराजींनी वापर केला, की तिथून त्यांच्या पुनरागमनाला चालना मिळाली. 

इंदिराजींचा दौरा म्हणजे सनसनाटी बातमी हे गृहीत होऊन पत्रकार बातमीदार त्यांच्या मागे धावू लागले. त्याही अशा जागा व प्रसंग शोधायच्या, की त्याची सनसनाटी व्हायला हवी आणि प्रत्येक बाबतीत मोरारजींच्या जनता पक्षाला खुलासे देत बसायला लागावे. माजी पंतप्रधान व नेहरूंची कन्या इतक्या कुठल्याही खबदाडीत पोहोचते, ही बातमी होऊ लागली. पर्यायाने आणिबाणीच्या अन्याय अत्याचाराच्या बातम्या शिळ्या होऊन जनता सरकारच्या व पक्षाच्या चुकांकडे लक्ष वेधले जाऊ लागले. सतत आणिबाणीवर केंद्रित झालेला माध्यमाचा रोख मग जनता पक्षाकडे वळला आणि माध्यमातल्या जुन्या इंदिरा नेहरूनिष्ठांनी त्यात पुढाकार घेतला. त्याला अर्थातच शह देणारे इंदिरा विरोधकही माध्यमात होते. पण दरम्यान इंदिरा विरोधक व जनता समर्थकात जनसंघीय व समाजवादी असा बेबनाव माध्यमातही सुरू झाला होता त्याचाही लाभ इंदिरानिष्ठांनी उठवला. जनता पक्षात फ़ुट पडून पुन्हा इंदिराजी सत्तेत आल्या, त्या थेट घराणेशाही घेऊनच! आपल्या सोबत त्यांनी संजय गांधींना निवडून आणलेच. पण त्यांना सत्तेच्या बाहेर ठेवूनही मोठे अधिकार दिलेले होते. दुर्दैवाने संजयचे अपघाती निधन झाले आणि त्यांची जागा राजीव गांधींनी घेतली. पुढे इंदिरा हत्या झाली आणि तिच्या सहानुभूतीच्या लाटेत सर्वच पुरोगामी प्रतिगामी वाहून गेले. म्हणजेच १९७० ची स्थिती पुन्हा आली. कारण राजीवना इतके अफ़ाट बहुमत मिळाले होते, की आता पुरोगामी डावपेच खेळायची कॉग्रेसला गरज उरली नव्हती. मग त्यातून सावरण्यासाठी पुन्हा तथाकथित पुरोगाम्यांना त्याच भाजपाला सोबत घ्यावे लागले. राजीव गांधी यांना रोखण्याची कुवत पुरोगामी म्हणून मिरवणार्‍यांमध्ये उरली नव्हती. सहाजिकच प्रतिगामी भाजपाला सोबत घ्यावे लागले. राजीव यांचा उजवा हात असलेल्या विश्वनाथ प्रताप सिंग यांनी बोफ़ोर्सची तोफ़ डागली असतानाही पुरोगाम्यांना स्वबळावर उभे रहाण्याचे धाडस नव्हते. म्हणून भाजपाशी आघाडी नाही तरी जागावाटपाचा सौदा करावा लागला. आज जे कोणी मोदींना रोखायला कॉग्रेसच्या गळ्यात गळे घालत पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवत असतात, त्यांनाच तेव्हा २५ वर्षापुर्वी कॉग्रेसला रोखण्यासाठी प्रतिगामी भाजपाची साथ हवी होती. ही पुरोगामी म्हणवणार्‍यांची शोकांतिका आहे. ज्या प्रतिगामी भाजपाला वा संघनिष्ठांना संपवण्यासाठी त्यांनी दहा वर्षे आधी कॉग्रेसला नवे जीवदान दिले, त्यांनीच नंतर आपले अस्तित्व टिकवण्यासाठी त्याच प्रतिगाम्यांची कुबडी घेतली. 


या सर्व काळात पुरोगाम्यांना कॉग्रेस पुरोगामी असल्याचा थांगपत्ता लागला नव्हता. म्हणुन ते कॉग्रेसचा पाडाव करण्यासाठी प्रतिगाम्यांना सोबत घ्यायचे आणि कॉग्रेस पराभूत झाली, मग पुन्हा कॉग्रेसला नवे जीवदान द्यायचे. मात्र अशा प्रदिर्घ पाच दशकात कॉग्रेसला पर्याय व्हायचा कुठलाही प्रयास या लोकांनी केला नाही. मतदाराला प्रतिगामी-पुरोगामी यात स्वारस्य नव्हते. त्याला कॉग्रेससाठी पर्याय हवा होता आणि त्याचा झेंडा कुठला वा धर्म कुठला, याच्याशी लोकांना कर्तव्य नव्हते. पुरोगामी वा पुर्वाश्रमीच्या समाजवाद्यांनी त्या लोकभावनेशी नेहमीच खेळ केला. पण तीच लोकभावना ओळखून भाजपाने पावले उचलली होती. त्यांनी १९८९ सालात जनता दलाशी जागावाटप केले आणि पुढे सत्तेतही जनता दलाला बाहेरून पाठींबा दिला. म्हणजेच आपण कॉग्रेस विरोधातले असल्याची लोकभावना जोपासण्य़ाची रणनिती भाजपाने राबवली होती. तिला हळुहळू यश मिळत होते. म्हणून १९९८ सालात एनडीए सरकार होऊ शकले आणि त्यात बिगर कॉग्रेस पक्ष सहभागी झाले. तेव्हा मग कॉग्रेसला स्वबळावर पुन्हा सत्ता मिळवण्याची शाश्वती वाटेनाशी झाली होती. तिथून मग कॉग्रेसने माध्यमातील स्वयंसेवी पुरोगामी सिद्धांत स्विकारला. भाजपा विरोधी डावपेच घेऊन सोनियांनी तमाम बिगरभाजपा पक्षांची मोट बांधण्याचा खेळ केला. त्याची परिणती महाराष्ट्रात झाली तशीच दिल्लीत झाली. पारंपारिक बिगर कॉग्रेसी मतांवर पोसलेले पुरोगामी पक्ष आपली उरलीसुरली विश्वासार्हता गमावून बसले. कॉग्रेसची मस्ती व भ्रष्टाचार यांना कंटाळलेला मतदार पर्याय बघत असताना, त्याच्यापुढे पुन्हा कॉग्रेसच पेश करण्याचा पुरोगामी पर्याय पुस्तकी होता. त्यात फ़सून लालू, मुलायम, मायवती, जनता दलाचे बहुतेक गट व डावी आघाडी आपले वेगळेपण हरवून बसले आहेत. या पक्षांना आपली अशी काही ओळखच उरलेली नाही. पुरोगामी शकती वा सेक्युलर फ़ोर्सेस असे एक सरसकट नावाने त्यांचा उल्लेख होत असतो. सुदैवाने त्यापासून बाजूला राहिले, त्यांना आपले अस्तित्व टिकवता आले किंवा त्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाला शिरकाव करता आलेला नाही. याचे उदाहरण म्हणून आपण ओडिशाकडे बघू शकतो. भाजपाशी पटले नाहीतर बाजूला झालेल्या नविन पटनाईक यांनी आपले वेगळेपण जपताना कॉग्रेसच्या दावणीला बांधून घ्यायचे नाकारले, तर मोदी लाटेचा त्यांना कुठला फ़टका बसला नाही. त्यापासून अलिप्त राहून ममतांनी आपली ओळख जपली, तर बंगालमध्ये त्यांना भाजपा दणका देऊ शकला नाही. उलट बंगालच्या भूमीत मार्क्सवाद्यांची जागा भाजपा घेऊ लागला आहे. महाराष्ट्रात वा अन्य प्रांतात जिथे भाजपा विस्तारला तिथे तिथे पुरोगामी पक्षांनी कॉग्रेस सोबत जाऊन आपणच आत्महत्या केल्याचे लक्षात येऊ शकेल. त्यासाठी भाजपाला गुन्हेगार कशाला मानता येईल? 


पुरोगामी चळवळ किंवा राजकारणाच्या या र्‍हासाला हेच भ्रामक राजकारण बाधले आहे. माध्यमातील उपटसुंभ पुरोगामी, राजकारणबाह्य पुरोगामी विचारवंत, स्वयंसेवी नावाचा कार्यकर्ता नष्ट करणारा भस्मासूर; यांनी क्रमाक्रमाने पुरोगामी राजकारणाचा पाया उखडून टाकला आहे. चळवळ व जनआंदोलन हा पुरोगामीत्वाचा पाया होता व असलाही पाहिजे. ज्याची प्रेरणा लोकांमधून येते आणि लोकांच्या संख्याशक्तीतून ज्याचा राजकीय प्रभाव पडतो, त्यापासूनच पुरोगामी संस्था संघटनांना तोडण्याचे डाव ज्यांनी यशस्वी केले, त्यांनी पुरोगामी चळवळ मारली आहे. चळवळीचा देखावा व बातम्या बनवून जनतेला अन्यत्र जायला भाग पाडणारे हेच लोक, खर्‍या पुरोगामीत्वाचे मारेकरी आहेत. कारण त्यांनी विचार, तत्वज्ञान व भूमिकेला तिलांजली देऊन पुरोगामी राजकारणाचा पुरता खेळखंडोबा करून टाकला. कारण त्यांचा खर्‍या चळवळीशी वा पुरोगामीत्वाशी कुठलाही संबंध नव्हता व नाही. त्यांच्यासाठी पुस्तकी पांडित्य खरे असते आणि वास्तवातील चळवळ त्यानुसार चालायला हवी. नसेल तर चळवळ मेली तरी बेहत्तर! दुर्दैव असे, की आता पुरोगामी पक्ष व संघटनाही इतक्या पांगळ्या झाल्या आहेत. त्या स्वत: विचार करून उपाय शोधू शकत नाहीत. त्यांचे दुखणे वा समस्या माध्यमे ठरवतात आणि तिथे शोधले जाणारे उपाय योजताना पुरोगामी चळवळ आणखी खच्ची होत गेली आहे. मागल्या विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्र वा अनेक राज्यातून पुरोगामी पक्ष नामशेष झालेत. मात्र त्याचा अर्थ पुरोगामीत्व संपलेले नाही. ज्या संस्था संघटना वा पक्ष देखाव्यापुरते पुरोगामी आहेत, वास्तवात त्यांच्यामध्ये कुठलेही पुरोगामीत्व उरलेले नाही, त्यांना मतदाराने झिडकारले आहे. विचार तत्वज्ञान लोक नाकारत नसतात. पण कोणी त्याचे थोतांड करून दिशाभूल करणार असेल, तर लोक त्याच्याकडे पाठ फ़िरवतात. इथेही वेगळे काही झालेले नाही. पुरोगामी लेबल लावून जो बोगस माल मतदाराच्या गळी मारण्याच्या अट्टाहास झाला, त्याला लोकांनी झिडकारले आहे. त्यातून सामान्य जनता व मतदार एक संदेश देतो आहे, तो प्रामाणिकपणे समजून घेतला तर पुन्हा पुरोगामी राजकारणाचे उत्थान व्हायला अडचण असणार नाही. भाजपा किंवा संघाचा कोणत्याही बाबतीत मुर्खासारखा विरोध म्हणजे पुरोगामीत्व नाही, की सेक्युलॅरीझम नाही. पुरोगामी किंवा समाजवादी म्हणून एक विचार आहे, तत्वज्ञान आहे, त्याला अनुसरून भूमिका घेणाला पुरोगामीत्व म्हणतात. ती कॉग्रेस घेत नाही किंवा अन्य कोणी पुरोगामी म्हणून मिरवणारा पक्ष घेत नाही. त्याला लोक कंटाळले आहेत. त्यावरचा पर्याय म्हणून सुटसुटीत कारभार करणारा वा निदान लोकमताचा आदर करून सरकार चालवणारा पक्ष ही भाजपाची पुंजी आहे. त्याला हिंदूत्व किंवा जातियवादाचा विजय ठरवून मतदाराला अपमानित करण्याने लोक आणखी दुखावतात, दुरावतात. 


यातूनही नव्याने पुरोगामीत्व किंवा वैचारिक सेक्युलर चळवळ उभी रहाणे शक्य आहे. पण त्यासाठी त्यातली तोतयेगिरी निपटून बाजूला करावी लागेल. निभेळ विचारांवर आधारीत राजकारण व भूमिका घ्याव्या लागतील. कुठल्या तरी निधीसाठी आंदोलने करणार्‍यांना हाताशी धरून पुरोगामीत्व पुढे जाऊ शकणार नाही. तर खर्‍याखुर्‍या लोकांच्या समस्या वा प्रश्नांना हात घालावा लागेल. लोकांमध्ये जावे लागेल. तिथे जाऊन समस्या समजून घ्याव्या लागतील. सर्व्हे घेऊन वा कुठल्या तरी अभ्यासातून समस्या शोधायची आणि मग ती लोकांच्या गळी उतरवायची, हा पुरोगामी बाणा नव्हे. जोगेश्वरी ते दहिसर हा परिसर मुंबई महापालिका क्षेत्रात आणला गेला, तेव्हा तिथे प्रथमच निवडणूक लढवणार्‍या मृणालताईंसाठी डॉ. राममनोहर लोहिया प्रचाराला आलेले होते. सभा रात्री उशिरा उरकून ते निघाले असताना इतक्या अवेळी एका भागात हंड्यांची लांबच लांब रांग व जागत बसलेल्या महिलांचा जमाव त्यांना दिसला. त्याबद्दल चौकशी केल्यावर पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याचे लक्षात आले. लोहियांनी मृणालताईंना गोरेगावमध्ये पाण्याचे आंदोलन आरंभण्याचा सल्ला दिला होता. तोच मग तिथला पक्षाचा कार्यक्रम झाला आणि दोन दशकांनंतर मृणालताई यांना पाणीवाली बाई म्हणून जग ओळखू लागले. अशी पुरोगामी चळवळ गोरेगाव मालाड परिसरात उभी राहिली. कारण पाण्याची समस्या कुणाच्या प्रबंधातून शोधलेली नव्हती. खरी वास्तविक समस्या होती. तिची तीव्रता लोकांना भेडसावत होती आणि तिला हात घातला तर लोक आपोआप चळवळीचा भाग होतील ही दृष्टी डॉ. लोहियांकडे होती. आजच्या कुठल्या पुरोगामी म्हणून मिरवणार्‍या नेते कार्यकर्त्यांमध्ये हा द्रष्टेपणा दिसतो काय? तिथेच लक्षात येते, की आज ज्यांना पुरोगामी म्हणतात ते लोक वास्तवात तोतया सेक्युलर वा बोगस पुरोगामी आहेत. त्यांनी पुरोगामीत्व बदनाम करून टाकले आहे. त्यात खर्‍याखुर्‍या पुरोगामीत्वाचा लवलेश उरलेला नाही. म्हणूनच मोदींनी पुरोगामी सेक्युलर राजकारणाला पराभूत केलेले नाही, की देशातली जनता प्रतिगामी वगैरे झालेली नाही. पुरोगामीत्वाचा नावावर जो पोरकटपणा चालतो, त्याला लोकांनी झिडकारले आहे. 


नेताजींच्या निमीत्ताने पुरोगामीत्वाची निरर्थकता नुकतीच समोर आलेली आहे. पुरोगामीत्व म्हणजे आता नेहरूंच्या चुका वा गफ़लतीचेही समर्थन करण्यापर्यंत घसरगुंडी झालेली आहे. राहुल गांधींचा पोरकटपणा वा सोनिया गांधींच्या मनमानीचे समर्थन इतके पुरोगामीत्व संकुचित होऊन गेले आहे. हिंदूंच्या विरोधात बोलणे वा त्यांच्या धर्मभावना दुखावणे, म्हणजे पुरोगामीत्व इतका थिल्ल्ररपणा आणला गेल्यावर लोकांनी पुरोगामीत्वाकडे पाठ फ़िरवली आहे. तो तोतयेगिरीचा पराभव आहे. माध्यमातल्या अर्धवटांनी त्याला चालना दिली आणि त्यातून पुरोगामी म्हणवणारे पक्ष रसातळाला गेले. त्यांचा पाया उखडला गेला. आता त्यांच्या संगतीने कॉग्रेसलाही त्याचीच बाधा झालेली आहे. आजकाल राहुल गांधींची भाषा तशीच असते. आपण कुठे वा कशाला पराभूत झालो, त्याचे आत्मपरिक्षण करण्याची इच्छाही कोणाला उरलेली नाही. कारण संघटना व त्यासाठी लोकांमध्ये जाऊन मेहनत घेण्याची इच्छाच (तोतयेगिरीला सवकलेले) पुरोगामी गमावून बसले आहेत. मग आपल्या नाकर्तेपणाचे वा अपयशाचे खापर अन्य कोणाच्या डोक्यावर फ़ोडून पळवाटा शोधल्या जातात. खर्‍याखुर्‍या कार्यकर्त्यांनी अपार कष्टातून जी पुरोगामी चळवळ भारतीय समाजात रुजवली व विस्तारली, तिलाच स्वयंसेवी भडभुंजे व माध्यमातील उपटसुंभांनी सुरूंग लावला. पुरोगामी विचारवंत म्हणून जे तोतये दिर्घकाळ मिरवले आहेत, हेच खरे पुरोगामी चळवळीचे खरे मारेकरी झाले आहेत. कुठल्या तरी काळ्यापैशाच्या बळावर चालणारी माध्यमे पुरोगामी अजेंडा रंगवण्यासाठी वापरली आहेत आणि किंवा अशाच पैशाच्या देणग्यांवर स्वयंसेवी तमाशे नाचवले आहेत. हे बुद्धीमंतांना कबुल करणे अवघड असले तरी सामान्य माणसाला ते दिसते, बघता येते आणि अति झाल्यावर झिडकारण्याचे धाडस त्याच सामान्य माणसात असते. मोदींना त्याचाच लाभ मिळाला. तो तोतया पुरोगाम्यांनी खर्‍या पुरोगामीत्वाचा केलेला दारूण पराभव आहे.   


१९५० च्या दशकात नव्याने स्थापन झालेल्या जनसंघ (ज्याला आज भाजपा म्हणून ओळखले जाते) त्याचा मतांच्या टक्केवारीतला हिस्सा तेव्हा एक दिड टक्का होता. तिथून २०१४ मध्ये तो ३१ टक्क्यापर्यंत गेला. त्याच आरंभ काळात आज पुरोगामी म्हणवणार्‍या पक्षांचा एकत्रित मतांचा हिस्सा दहा टक्क्यांच्या आसपास होता. तो आज सहा दशकानंतर त्याच्याही खाली घसरला आहे. याचे एकमेव कारण कॉग्रेसची घसरण होत जाईल तो अवकाश व्यापण्याचे १९८० पर्यंतचे पुरोगाम्यांचे प्रयास त्यात घुसलेल्या तोतया पुरोगाम्यांनी हाणुन पाडले व चळवळ कागदी व दिखावू बनवत नेली. नुसते शब्दांचे बुडबुडे उडवायचे आणि कामाच्या नावाने शून्य, अशी स्थिती आणली. पुरोगामीत्वाचे पोवाडे सतत गाण्यामध्ये पुर्वाश्रमीचे राष्ट्र सेवा दलीय आघाडीवर असतात. त्याच सेवा दलाच्या एका सुंदर गीताच्या शब्दात त्याचे वर्णन करता येईल. कारण त्यातच आजच्या पुरोगामी र्‍हासाचे सार सामावले आहे.


ध्येय आमचे हे ठरले, कार्य दुसरे ना उरले!

(समाप्त)


पुरोगामी चळवळीचे स्वयंसेवी अपहरण

ध्येय अमुचे हे ठरले
कार्य दुसरे ना उरले

 

(लेखांक तिसरा)

१९८० च्या जनता पक्षाच्या पराभवानंतर पुर्वाश्रमीच्या जनसंघीयात चुळबुळ सुरू झाली होती. तशीच कुठल्याही राजकीय ‘वंशातून’ न आलेल्या जनता पक्षातील तरूणांमध्येही अस्वस्थता होती. ते बिगर कॉग्रेसी राजकारणासाठी जनता पक्षाकडे ओढले गेले होते. त्यांना सोबत घेऊन जनता पक्षाचा वारसा पुढे न्यायचा चंग पुर्वाश्रमीच्या जनसंघीयांनी बांधला. त्यातून मग भारतीय जनता पक्ष स्थापन झाला. त्याचे नेतृत्व पुर्वाश्रमीच्या जनसंघीयांकडे असले तरी त्यात नवे रक्त भरपूर आलेले होते. दिल्लीचे सिकंदर बख्त पुर्वीचे कॉग्रेसजन होते, तर सुषमा स्वराज जुन्या समाजवादी! अशा लोकांना बिगर कॉग्रेसी राजकारणात स्वारस्य होते आणि त्यांना सोबत घेण्याचे भान जुन्या समाजवाद्यांना उरले नाही. त्याचा लाभ भाजपाने उठवला. त्यासाठीच त्यांनी गांधीवादी समाजवाद स्विकारला होता. पण इंदिरा हत्या व राजीव लाटेने राजकारणच उलटले आणि पहिल्या प्रयत्नात भाजपा १९८४ सालात भूईसपाट झाला. तिथून मग संघाने नव्याने राजकीय उभारणीचा पवित्रा घेतला आणि त्यात बंदिस्त संघटनात्मक पक्ष मोडून लोकांचा पक्ष व्हायचे ठरवले. शेठजी भटजींचा चेहरा सोडून सर्वसामान्य तळागाळातल्या समाजघटकांचा पक्ष व्हायचे प्रयत्न सुरू केले. आजवर असा पिछडा वर्ग ही पुरोगाम्यांची मक्तेदारी होती. योगायोग असा, की आपला हा मतदारसंघ वा प्रभावक्षेत्र जपण्यापेक्षा पुरोगाम्यांनी त्याच वर्गाकडे याच काळात पाठ फ़िरवली होती. किंबहूना १९८० पर्यंतचे राजकारण बघितले तर पुरोगामी पक्षातले दुय्यम नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचा भरणा तळागाळातून आलेला दिसेल. पण पुढल्या काळात डाव्या पक्ष चळवळी व संघटना, यात सुशिक्षित व सुखवस्तू घटकातून आलेल्यांचा भरणा दिसतो. उलट संघाने पद्धतशीरपणे आपल्या विविध संघटनातून मागास व पिछडे नेतृत्व पुढे आणायचा वसा घेतला. गोपिनाथ मुंडे, प्रमोद महाजन, सुर्यभान वहाडणे असे नवे नेतृत्व याच काळात उभे करण्यात आले. उलट पुरोगाम्यांकडे तसे लोकांना जाऊन भिडणारे नेतृत्व संपत होते आणि नवे सुखवस्तु पुस्तकी नेतृत्व सुत्रे हाती घेत चालले होते. प्रामुख्याने याच काळात लोकांची आंदोलने, चळवळी वा लढे याकडे पुरोगामी पाठ फ़िरवत गेले. खरे लढे उभारण्याचे कष्ट उपसण्यापेक्षा माध्यमातून अफ़ाट प्रसिद्दी मिळवून लढ्याचा देखावा उभा करण्याकडे पुरोगाम्यांचा कल झुकलेला दिसेल. परिणामी झुंजार लढाऊ तरूण पुरोगामी चळवळीपासून दुरावत गेला आणि त्याच दरम्यान झुंजण्याची संधी देणार्‍या आक्रमक होऊ लागलेल्या (शिवसेना व) भाजपाने ती संधी तरूणांना उपलब्ध करून दिली. १९८०-९० हा काळ बघितला, तर त्यात आज नावाजलेले अनेक पुरोगामी चेहरे उदयास येताना दिसतील. परिवर्तनाच्या चळवळी म्हणून त्यांचा प्रचंड बोलबाला माध्यमातून होत राहिला. पण प्रत्यक्षात जनतेच्या समस्या, प्रश्न व त्याचे उपाय यांना जाऊन भिडणारे लढे किंवा त्यातील सामान्य लोकांचा सहभाग संपत चाललेला दिसेल. मागल्या दोन दशकात तर पुरोगामी चळवळ ही निव्वळ माध्यमांच्या लेख, बातम्या व चर्चेत शिल्लक उरलेली दिसेल. बाकी प्रत्यक्ष जमिनीवर पुरोगामी नामोनिशाण उरलेले नाही. 

शरद पवार हे १९७८ नंतर पुरोगामी राजकारणाचे महाराष्ट्रातील एकमुखी नेतृत्व झाले होते आणि त्यांच्यामागून धावणार्‍या बाकीच्या पक्षांचे वेगळे अस्तित्व असले तरी त्यांची ओळखच संपत चालली होती. मात्र त्याच काळात एकामागून एक माध्यमे ही पुरोगामी चळवळीचे आखाडे बनत गेली. १९८० नंतरच्या काळात पुरोगामी विचारांच्या काही लोकांनी मोहिम उघडल्याप्रमाणे माध्यमात शिरकाव करून घेतला आणि तो पुरोगामी राजकारणाचा आखडा बनवून टाकला. दुसरीकडे एका पुरोगामी गटाने राजकीय संघटना व लढ्यांकडे पाठ फ़िरवून एनजीओ म्हणजे स्वयंसेवी संघटनाचा मार्ग चोखाळला आणि देश-परदेशातून मिळणार्‍या निधीवर लोक आंदोलनाचे नवे दालन उघडले. मग त्यांची एक संयुक्त आघाडी पुरोगामी लढा पुढे नेऊ लागली. म्हणजे पुरोगामी स्वयंसेवी संघटनेने आंदोलन उभे करायचे आणि त्याचा पसारा माध्यमातल्या पुरोगाम्यांनी भ्रामक स्वरूपात उभा करायचा. नर्मदा बचाव किंवा निर्भय बनो, अशा आंदोलनाचे स्वरूप तपासून बघितले, तर त्याची प्रचिती येऊ शकेल. परदेशी निधी मिळवणे व त्यासाठी पोषक अशा विषयांपुरते पुरोगामी आंदोलन संकुचित होत गेले. कम्युनिस्ट वा समाजवाद्यांची १९५० नंतरची आंदोलने बघितली तर ती लोकांच्या जीवनातील थेट समस्येला भिडणारी होती. त्याचा पसाराही प्रचंड होता. पण त्यांना जितकी प्रसिद्दी मिळाली नसेल, तितकी निर्भय बनो किंवा नर्मदा बचाव आंदोलनाला मिळाली. पण फ़लित काय आहे? म्होरके होते त्यांच्या नावाचा गाजावाजा होण्यापेक्षा त्यातून पुरोगामी विचार वा आंदोलन किती पुढे सरकू शकले? कामगार, कष्टकरी वा शेतकरी अशा समाज घटकांपासून पुरोगाम्यांची याच काळात नाळ तुटत गेली. दुसरीकडे भाजपा वा संघाच्या मंडळींनी अत्यंत कष्टप्रद मार्गाने अशा नवनव्या समाजघटकात आपले बस्तान बसवण्याचे प्रयत्न केले. विखूरलेले समाज घटक गोळा करून त्यांच्या आर्थिक व सामाजिक न्यायाची लढाई त्याच भाजपाच्या नव्या नेतृत्वाने हाती घेण्याचा सपाटा लावला होता. थोडक्यात पुरोगामी मंडळी आपला पारंपारिक परिसर सोडत चालली होती आणि भाजपा तीच पोकळी भरून काढणारे संघटन करण्यासाठी कष्ट उपसत होता. पण कोणाला पर्वा होती? माध्यमातून भाजपाशी वा तथाकथित प्रतिगामी राजकारणाची लढाई तुंबळ चाललेली होती. भाजपाने हिंदूत्व किंवा आणखी कुठलाही विषय घेवो, त्याच्या विरोधात जबरदस्त आघाडी माध्यमे लढवत होती. पण जमिनीवर पुरोगामी राजकारणाचे नामोनिशाण पुसले जात होते आणि त्याची कोणाला फ़िकीर नव्हती. कुठलेही मोठे वर्तमानपत्र वा आजच्या जमान्यात वृत्तवाहिनी घ्या, त्याच्याकडे पुरोगामी प्रवक्तेपण असल्याचा भास होईल. 

गुजरात दंगलीनंतर अन्य काय झाले वा मोदी पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले हा विषय बाजूला ठेवला, तर आणखी काय त्यातून साध्य झाले? तीस्ता सेटलवाड नावाची एक महिला मुस्लिमांना न्याय देणारी म्हणून जगापुढे आली. करोडो रुपये तिला जगातून मिळवता आले. त्यात अफ़रातफ़र केली म्हणून आता तिच्यामागे ससेमिरा लागला आहे. पण त्यातले सत्यही तपासण्याची तसदी कुठल्या माध्यमाने पत्रकाराने घेतलेली नाही. अटकेच्या भयाने कोर्टाच्या पायर्‍या झिजवणार्‍या तीस्ताला सवाल कोणी विचारायचे? जिने केलेला कुठलाही आरोप विनापुरावा पत्रकार छापत होते व प्रक्षेपित करत होते, तिच्या विरोधातले पुरावे समोर आले असताना, एकाही माध्यमात त्याची साधी चर्चा होऊ शकत नाही, ही आजच्या पुरोगामी चळवळीची शोकांतिका आहे. कोणीही गुन्हे करावेत, लूटमार करावी. त्याच्या छातीवर पुरोगामीत्वाचा बिल्ला असला, मग त्याच्याविषयी माध्यमे चिडीचूप होऊन जातात. कारण आता माध्यमेच पुरोगामी झालीत आणि पुरोगामी म्हणवून घेणार्‍याने काहीही गुन्हा केला तरी त्या पापावर पांघरूण घालणे, हेच पुरोगामी कार्य शिल्लक उरले आहे. अर्थात तो विषय भिन्न आहे. मुद्दा असा, की तीस्ता वा मेधा पाटकर यांनी पुरोगामी म्हणून मिरवताना त्या चळवळीला काय योगदान दिले? पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या रुपाने जी एनजीओ नावाची चळवळ उभी राहिली, तिने पुरोगामी चळवळीतला कार्यकर्ताच संपवून टाकला. आता पुरोगामी म्हणून मिरवणार्‍या संघटना या मुळात कुठल्या तरी परदेशी वा देशी निधीच्या आश्रयाने चालणारी दुकाने होऊन बसली आहेत. तिथे काम करणारा कार्यकर्ता स्वयंसेवक म्हटला जातो. पण व्यवहारात तो संस्थेचा वा संघटनेचा पगारी सेवक झालेला आहे. वैचारिक पोपटपंची कार्यकर्त्यासारखी करणारा हा पगारी सेवक विचारांनी भारावून आंदोलनात आलेला नाही किंवा त्यासाठी पदरमोड करणारा राहिलेला नाही. अशा शेकडो एनजीओ मागल्या दोनतीन दशकात पुढे आल्या व त्यांनी अवघी पुरोगामी चळवळ पोखरून टाकली आहे. नोकरी करून, घरचे खाऊन संघटनेसाठी राबणारा ध्येयवादी कार्यकर्ता, ही पुरोगामी चळवळीची खरीखुरी शक्ती होती. तीच आता नष्टप्राय झाली आहे. तिचा जीवनरस अशा स्वयंसेवी संघटनांनी शोषून घेतला आहे. हे घडत असतानाच्याच काळात प्रासंगिक राजकारण आणि जनतेशी पुरोगामी संघटनांचा असलेला संबंध क्षीण होत गेला. अर्थात पुरोगामी हाताशी नसले म्हणून लोकांना आपल्या समस्या दुर्लक्षित करता येत नाहीत. सोडवणारा कुठल्या पक्ष विचारसरणीचा आहे, याच्याशी सामान्य माणसाला कर्तव्य नसते. त्याला भेडसावणार्‍या प्रश्नाची उकल हवी असते. ती करू शकणार्‍याचे स्वागत सामान्य जनता करीत असते. इथे तेच झाले, पुरोगामी चळवळी व संघटनांनी वार्‍यावर सोडलेल्या सामान्य जनतेला व तिच्या समस्यांना भाजपा वा शिवसेना अशांनी साथ दिली. पुरोगाम्यांनी मोकळी केलेली जागा असे तथाकथित ‘प्रतिगामी’ व्यापत गेले.

थोडक्यात वा स्पष्टच शब्दात सांगायचे तर तळागाळातून आलेल्या कार्यकर्त्यांतून उभ्या राहिलेल्या पुरोगामी चळवळीला उच्चभ्रू व सुखवस्तु वर्गातून आलेल्यांनी व्यापले आणि तिचे कुपोषण करत संपवून टाकले, असे म्हणता येईल. कारण पुरोगामी आंदोलन व चळवळ अथवा त्यांच्या संघटना हे खर्‍याखुर्‍या जीवनात भेडसावणार्‍या समस्या व प्रश्नातून उभ्या राहिलेल्या होत्या. गिरणी कामगार वा कष्टकरी विभागातून या संघटनांचा उदय होत गेला आणि तिथेच त्यांचा पाया विस्तारत गेला. पण १९८० नंतरच्या काळात तिथले मुळचे निष्ठावान कार्यकर्ते विचारांची बांधिलकी म्हणून वरून येणार्‍या आदेशाचे पालन करत होते. पण जे काही करायचे त्याचा त्यांच्याच परिसराशी अजिबात संबंध राहिला नव्हता. नर्मदा आंदोलन हे त्या परिसरातील होते, पण त्याला तिथलाच मतदार साथ देत नव्हता. त्याची परिक्षाही घ्यायचा विचार कोणी केला नाही. चाचपणीही झाली नाही. कारण आंदोलनाच्या म्होरक्यांना ठाऊक होते, की आपले आंदोलन जनतेतून आलेले नाही, तर माध्यमकेंद्री आहे. तसेच निर्भय बनो आंदोलनाचे म्हणता येईल. काल्पनिक विषय व प्रश्न घेऊन पुरोगामी चळवळ त्यात इतकी गुरफ़टत गेली, की तिला चेहराच उरला नाही. मात्र दुष्काळ, पाणीप्रश्न, नागरी प्रश्न, सामाजिक विषमता असले खरे भेडसावणारे प्रश्न प्रतिगामी म्हटले जाणारे भाजपा शिवसेना उचलून धरत होते. पर्यायाने त्यांचा लोकसंपर्क वाढत विस्तारत होता. दुसरीकडे लोकजीवनापासून दुरावत चाललेली पुरोगामी चळवळ आपलाच अवकाश संकुचित करून घेत होती. त्याला कोण जबाबदार होता? भाजपा वा अन्य कुणावर तुमच्या नालायकीचे खापर फ़ोडता येणार नाही. दुसरीकडे तीस्ता सेटलवाड यांच्या उचापती बघता येतील. त्यांना वारेमाप प्रसिद्धी मिळाली व त्यांनीही आपल्या नाटकासाठी पुरोगामी म्हणवणार्‍यांना ओलिस ठेवले होते. पण त्यांच्या प्रत्येक उचापतीतून अधिकाधिक हिंदू लोकसंख्या दुखावत दुरावत चालली होती. दोन समाजातले वितुष्ट संपवण्यात आणि सौहार्द निर्माण करण्यात पुरोगाम्यांनी पुढाकार घ्यायला हवा होता. पण पदोपदी असे दिसेल, की हिंदू मुस्लिमातील तेढ वाढेल व त्यातून हिंदू समाजात पुरोगाम्यांविषयी तिरस्काराची भावना प्रबळ होईल, असेच तीस्ताचे डावपेच चालू होते. यामागून पुरोगामी म्हणवून घेणारे फ़रफ़टत होते. जणू त्यांचा अजेंडा असे स्वयंसेवी म्हणून काम करणारेच ठरवित होते. कम्युनिस्ट सोशलीस्ट वा तत्सम पक्षांचा आपला असा काही अजेंडाच उरला नव्हता. त्याचेच प्रतिबिंब मग राजकीय बलाबलात पडत गेले. क्रमाक्रमाने पुरोगामी म्हणवणार्‍या पक्षांचे नामोनिशाण राजकीय अवकाशातून पुसट होत गेले. या स्वयंसेवी म्हणवणार्‍या संघटना वा पुरोगामी पत्रकारांनी राजकीय पक्ष व गटांवर आपला अजेंडा लादून आत्मघात करायला भाग पाडत नेले. 

१९९९ सालात महाराष्ट्रात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली. तेव्हा कॉग्रेस व राष्ट्रवादी यांच्यातून विस्तव जात नव्हता. त्यांना एकत्र आणून त्याच्या भरीला पुरोगामी पक्षांना बसवण्याचे काम इथल्या पत्रकारांनी केले नाही काय? युतीला लोकांनी बहुमत दिलेले नसेल, पण एकत्रित लढलेल्या शिवसेना भाजपाला सर्वाधिक जागा मिळालेल्या होत्या आणि त्यांनाच सत्तेपासून वंचित ठेवताना सेक्युलर मते अधिक व जागाही अधिक, असा अजब सिद्धांत पत्रकार संपादकांनी आणला. त्यामध्ये परस्पर विरोधात लढलेल्या पक्षांना सत्तेसाठी एकत्र बसवायचे काम याच राजकारणबाह्य पुरोगाम्यांनी केले आणि तिथून मग पुरोगामी पक्षच नष्टप्राय होत गेले. तेव्हा कॉग्रेस राष्ट्रवादी यांना पुरोगामी पक्ष ठरवून त्यांना जीवदान पुरोगामी पक्षांच्या मोजक्या आमदारांमुळे मिळाले. पण त्याला दुष्परिणाम पुढल्या पाच वर्षांनी दिसला, राज्याच्या कुठल्या तरी कोपर्‍यात बिगर कॉग्रेसी राजकारणाचा झेंडा घेऊन टिकलेले हेच पुरोगामी पक्ष पुरते नामोहरम होऊन गेले. जनता दल, रिपब्लिकन, कम्युनिस्ट वा शेकाप यांचे आज काय शिल्लक उरले आहे? मुळात तेच बिगरकॉग्रेसी राजकारणाचे अध्वर्यु होते. ती जागा त्यांनी सोडली वा त्यांना माध्यमातले पुरोगामी व स्वयंसेवी लोकांनी सोडायला भाग पाडले आणि कॉग्रेसच्या दावणीला आणुन बांधले. मग स्थानिक पातळीवर त्यांची मतदाराला गरज उरली नाही. तिथे खरा कॉग्रेस विरोधक म्हणून भाजपा शिवसेना जागा व्यापत गेले. तर कित्येक वर्षे तिथे पुरोगामी झेंडा घेऊन पाय रोवून उभे असलेले पुरोगामी कार्यकर्ते उध्वस्त होऊन गेले. पर्यायाने त्यांचे पक्ष व राजकारण उध्वस्त होऊन गेले. त्याचे खापर भाजपावर फ़ोडता येणार नाही, तर उच्चभ्रू व पुस्तकी पुरोगाम्यांवर फ़ोडावे लागेल. ज्यांनी आपल्या पोथीनिष्ठेसाठी खर्‍या पुरोगामी कार्यकर्ता व संघटनांचा हकनाक बळी दिला. त्यांचा खरा लोकाभिमुख अजेंडा हिरवून घेतला आणि आपला काल्पनिक भ्रामक सेक्युलर अजेंडा त्यांच्या माथी मारून स्थानिक पातळीवर पुरोगामी संघटनांचे निर्दालन करून टाकले. माध्यमातील पुरोगामी व बाहेरचे विचारवंत पुरोगामी यांनी आखाड्यातले व मैदानातले खरे पुरोगामी कार्यकर्ते यांना असे निकामी करून टाकले, की पुरोगामी शब्दाकडे सामान्य जनता चमत्कारीक नजरेने बघू लागली. 


थोडक्यात १९८० नंतरच्या काळात स्वयंसेवी संस्था-संघटना व माध्यमातले छुपे पुरोगामी यांनी एकूणच पुरोगामी राजकारणाचे अपहरण केले म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मग कॉग्रेस वा अन्य कोणी माध्यमाचा वा स्वयंसेवी संघटनांचा छुपा वापर करून पुरोगाम्यांना कळसुत्री बाहुल्यांप्रमाणे खेळवू लागले. प्रदिर्घकाळ ठामपणे कॉग्रेस विरोधात आपले अस्तित्व टिकवून असलेल्या मार्क्सवादी व त्यांच्या डाव्या आघाडीला २००४ सालात अशाच पद्धतीने राजकारणबाह्य पुरोगाम्यांनी कॉग्रेसच्या दावणीला आणुन बांधले. त्यातून नामशेष होऊ घातलेल्या कॉग्रेसला नव्याने जीवदान मिळाले. पण तीच डावी आघाडी बंगालचा आपला बालेकिल्ला गमावून बसली. १९६७ पासून बंगालमध्ये डाव्यांनी आपले पक्के बस्तान बसवले. त्याला २००९ व पुढे २०१४ मध्ये इतका मोठा हादरा कशामुळे बसला? ममताचा करिष्मा हे सोपे उत्तर आहे. भाजपा विरोधासाठी काहीही करणे म्हणजे पुरोगामी हा निरर्थक सिद्धांत डाव्यांच्या पराभवाचे खरे कारण आहे. यातली शोकांतिकाही समजून घ्यावी लागेल. २००४ सालात डावी आघाडी ज्या मनमोहन सरकारच्या समर्थनाला उभी राहिली, त्यात तस्लिमुद्दीन नावाचा एक मंत्री लालुंच्या राष्ट्रीय जनता दलाचा होता आणि त्याच्यावर मार्क्सवादी नेत्याच्या खुनाचा आरोप होता. पण तरीही पुरोगामी सरकार म्हणून त्याच्या पाठीशी डाव्यांनी उभे रहाणे हा किती हास्यास्पद पकार असेल? तिथल्या स्थानिक डाव्या कार्यकर्त्यांना आपल्या परिसरात तोंड दाखवायला जागा राहिल काय? यातूनच मग बिहारमध्ये कम्युनिस्ट पक्ष पुरता नामशेष होऊन गेला. ज्यांची मू्ळ ओळख कॉग्रेसचे विरोधक अशी होती व बिगरकॉग्रेसी मतदार त्यांच्या पाठीशी होता, त्याला अन्य पर्याय शोधायला अशा राजकारणाने भाग पाडले आणि तीच जागा व्यापत व तीच मते बळकावत भाजपा विस्तारत गेला. त्याला प्रामुख्याने जबाबदार असेल तर पुरोगामी पक्ष व संघटनांमधील पुस्तकी नेतृत्व, संघटनाबाह्य हस्तक्षेप व माध्यमातल्या तोतया पुरोगाम्यांनी मोडून काढलेले आंदोलनात्मक डाव्या पुरोगामी चळवळीचे स्वरूप!  (अपुर्ण)

पुरोगामी चळवळीचा र्‍हासारंभ

ध्येय अमुचे हे ठरले
कार्य दुसरे ना उरले

 (लेखांक दुसरा)

स्वातंत्र्य चळवळीच्या काळात बहुतेक राजकीय प्रवाह कॉग्रेस या छत्राखाली काम करत होते. पण पुढल्या काळात म्हणजे जसजसे स्वातंत्र्य दृष्टीपथात येत गेले, तसतसे हे प्रवाह बाजूला स्वतंत्र राजकीय संघटना वा पक्ष म्हणून समोर येत गेले. त्यातला हिंदूसभा हाच एक वेगळा मतप्रवाह होता. स्वातंत्र्यपूर्व काळात राजकारणापासून अलिप्त असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही मग जनसंघ नावाची आपली राजकीय आघाडी उभी केली. पण हा पक्ष कोणाच्या खिजगणतीत नव्हता. सहाजिकच कॉग्रेस म्हणून उरलेली संघटना हाच देशातला प्रमुख मध्यवर्ति पक्ष ठरला आणि बाजूला झालेल्या विविध राजकीय गटांना आपले बस्तान बसवताना वेळ लागत गेला. पण ती संधीही कॉग्रेसच्या नेतृत्वाने दिली नाही. वेळोवेळी अन्य पक्षातले पुरोगामीत्व मानणारे नेते फ़ोडून वा त्यातले हुशार गुणी नेते आपल्याकडे ओढून कॉग्रेस आपले अस्तित्व टिकवीत राहिली. हिंदूसभा संपत होती आणि तिची जागा जनसंघ घेत होता. कारण त्याच्या पाठीशी संघाचे संघटित पाठबळ होते. त्याच्याही पलिकडे माजी संस्थानिक व उद्योगपतींचा मानला जाणारा एक पक्ष स्वातंत्र्योत्तर काळात उदयास आलेला होता. स्वतंत्र पक्ष असे त्याचे नाव होते आणि तो उजवा पक्ष मानला जात असे. कारण तो समाजवाद वा साम्यवादाचा कडवा विरोधक होता. मात्र १९६७ पर्यंत त्याचे लोकसभेतील स्थान लक्षणिय होते. कारण माजी संस्थानिकांना आपापल्या जुन्या संस्थानातील रयतेची मते मिळवणे सहजशक्य होते. पुढे इंदिरा गांधी यांनी घटनादुरूस्ती करून प्रत्येक राजकीय पक्षाला सेक्युलर व समाजवादी असण्याची सक्ती केली, तेव्हा स्वतंत्र पक्षाने आपला गाशा गुंडाळला. त्याचे बरेचसे नेते व पाठीराखे नंतर जनसंघाच्या गोटात येत गेले. पण या सर्व काळात भारतीय विरोधी राजकारण पुरोगामी व सेक्युलर पक्षांच्या भोवती घोटाळत राहिले होते. कम्युनिस्ट, सोशलिस्ट वा तत्सम राजकीय विचारसरणीच्या पक्षांचा बोलबाला होता. लोकसभेतही त्याचे प्रतिबिंब पडलेले दिसायचे. देशातील राजकारण उजवा कॉग्रेस पक्ष व डावे राजकीय गट अशी झुंज होती. आज जसे विविध पक्ष भाजपाला वा मोदींना संपवायला एकत्र येतात, तसेच तेव्हा कॉग्रेस विरोधात एकत्र यायचे राजकारण चालू होते. सेक्युलर विरुद्ध जातियवादी वा पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असे त्याचे स्वरूप नव्हते. कारण तेव्हा भाजपा किंवा जनसंघ यांची राजकीय शक्ती तितकी मोठी नव्हती. हळुहळू आपले बस्तान बसवण्यातच जनसंघाची दमछाक व्हायची. 

१९५७ सालात देशात पहिली निवडणूक व्यापक आघाडी करून लढवली गेली, ती महाराष्ट्रात! मराठी राज्याच्या मागणीसाठी कॉग्रेसला धडा शिकवायला तेव्हा जनसंघच नव्हेतर हिंदू महासभेलाही सोबत घेऊन समाजवादी व कम्युनिस्टांनी एकदिलाने लढत दिली होती. त्यात कुठे पुरोगामी वा प्रतिगामी असा संघर्ष उदभवला नव्हता. ज्यांचा आज देशाला वा राष्ट्रीय एकात्मतेला धोका असल्याचे सांगत प्रत्येक पुरोगामी घसा कोरडा करीत असतो, तेच समाजवादी कम्युनिस्ट संघप्रणित जनसंघाच्या मांडीला मांडी लावून बसत उठत होते. मजेची गोष्ट म्हणजे आज जे लोक पुरोगामी म्हणून एकत्र एकाच भाषेत बोलतात, त्यांचे तेच राजकीय गट तेव्हा एकमेकांवर खुनाचे हिंसेचे आरोप सर्रास करीत होते. संयुक्त महाराष्ट्र समितीत पहिला वाद उफ़ाळला तो कम्युनिस्ट व सोशलिस्ट यांच्यात! त्याचे कारण इथले नव्हते तर दूरच्या युरोपातील होते. तिथे सोवियत गटात असलेल्या हंगेरीचा पंतप्रधान इंम्रे नाझ याने लोकशाही आणायची ठरवली तर वार्सा करारानुसार सोवियत कम्युनिस्ट सेनांनी त्या देशात घुसून नाझ याला नुसते सत्ताभ्रष्ट केले नाही तर ठार मारले. त्याच्या निषेधाचा प्रस्ताव सोशलिस्ट पक्षाने मुद्दाम मुंबई महापालिकेत आणला आणि कम्युनिस्ट पक्षाला डिवचण्याचा उद्योग केला होता. त्यातून समितीमध्ये वादंग उसळून आला. त्यावेळी समाजवाद्यांचे सौम्य स्वभावाचे नेते बॅ. नाथ पै म्हणालेले वाक्य किती बोचरे असावे? ‘आम्ही यशवंतरावांचा केरेन्स्की होऊ देणार नाही’ असे नाथ पै म्हणाले. त्याचा अर्थ असा, की सोवियत कम्युनिस्ट पक्षाचाच हा नेता स्टालिनच्या विरोधात गेल्यावर त्याला संपवण्यासाठी प्राणघातक कारवाया झालेल्या होत्या. थोडक्यात आज जितक्या आवेशात आपण दाभोळकर पानसरे यांच्या हत्येसंबंधी हिंदूत्व मानणार्‍यांवर आरोप होताना ऐकतो, तशीच भाषा तेव्हाचे समाजवादी इथल्या कम्युनिस्टांच्या बाबतीत वापरत होते. आज मात्र दोघेही एकाच सुरात तीच भाषा हिंदूत्ववाद्यांच्या बाबतीत वापरतात. विचारांची लढाई विचारांनीच होते बंदूकीच्या गोळीने नाही, ही भाषा कम्युनिस्टांना कधी उमजली? सोवियत युनियन कोसळल्यानंतरचा हा साक्षात्कार आहे काय? असो, पण त्याचेही भान वा ज्ञान नसलेले डॉ. कुमार सप्तर्षी लेख लिहून विचारतात, कुठल्या पुरोगाम्याने कधी कुठल्या प्रतिगाम्याची हत्या केली आहे? प्रतिगाम्याची नसेल, पण पुरोगाम्यानेच पुरोगाम्याची हत्या विचार संपवण्यासाठी केल्याचा पुरोगामी इतिहास जागतिक आहे ना? त्याचे काय करायचे? त्याचे तीळमात्र ज्ञान नसलेले विचारवंत आजकाल पुरोगामी जाणते म्हणून उदयास आलेले आहेत आणि त्याचा आरंभ १९७० च्या दशकात झाला. 

आज ज्याला भारतीय जनता पक्ष म्हणून आपण ओळखतो, त्याचा जन्म जनता पक्ष फ़ुटण्यातून झाला. तो जनता पक्ष कुठल्या एका विचारसरणीचा पक्ष नव्हता. तर इंदिरा गांधींनी तमाम विरोधकांना आपल्या विरोधात एकत्र आल्यामुळे आणिबाणी लादून गजाआड फ़ेकले, त्याच्या परिणामी एक राजकीय आघा्डी अशा स्वरुपात ज्याचा जन्म झाला, त्याला जनता पक्ष म्हणून ओळखले गेले. त्यात मुळचे समाजवादी होते तसेच इंदिरालाटेने बाजूला फ़ेकले गेलेल्या जुन्या कॉग्रेसजनांची संघटना कॉग्रेस होती. अधिक आणिबाणी उठल्यावर त्यातले भागिदार असलेल्या जगजीवनराम यांच्या नेतृत्वाखाली वेगळे झाले्ल्या काही कॉग्रेसजनांचा सीएफ़डी नामक गटही होता. त्याखेरीज खुप आधीच कॉग्रेस सोडून शेतकरी जाटांचा पक्ष चालवलेले व पुढे समाजवादी राजनारायण यांना सोबत घेऊन भालोद नावाचा पक्ष चालविलेले चौधरी चरणसिंग होते. कमीअधिक प्रमाणात त्यांच्यात वैचारिक साम्य साधर्म्य तरी होते. त्यात विचित्र वाटणारा एकच गट होता तो संघाशी संबंधित अशा जनसंघाचा! जनता पक्ष एकजीव असावा यासाठी सर्वांनी एकदिलाने जयप्रकाशांचा शब्द मानून आपापले पक्ष विसर्जित केले आणि जनता पक्ष ऐन निवडणूकीच्या तोंडावर स्थापन केला. त्याची रितसर पक्ष म्हणून नोंदणीही होऊ शकलेली नव्हती. मग तात्कालीन व्यवस्था म्हणून सर्व उमेदवार भालोदच्या चिन्हावर लढले आणि जनता पक्ष सत्तेवर आला. त्यात मार्क्सवादी सहभागी झाले नाहीत तरी त्यांनी जनता पक्षाशी दोस्ती केली व जागावाटपही केलेले होते. तर दुसरा कम्युनिस्ट पक्ष तेव्हा कॉग्रेसचा समर्थक म्हणून अगदी आणिबाणीतही इंदिरा गांधींच्या पाठीशी उभा राहिला होता. अशा जनता पक्षाला सत्ता मिळाली व खुद्द इंदिराजीही रायबरेलीत पराभूत झाल्याने कॉग्रेसचा विषय बाजूला पडला आणि जनता पक्षातच बेबनाव सुरू झाला. कॉग्रेसमध्येही दुफ़ळी माजली होतीच. संजय गांधी व इंदिराजींच्या विरोधातल्या चौकशीचे बालंट पक्षावर नको म्हणून यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी इंदिराजींचा बाजुला काढले होते. मग इंदिरानिष्ठांनी वेगळी चुल मांडली होती. थोडक्यात कॉग्रेस नामोहरम झाली अशा समजूतीमध्ये जनता पक्षातील मुळचा समाजवादी गट पुन्हा गोंधळ घालू लागला. त्यातले मुळचे समाजवादी राजनारायण यांनी चौधरी चरणसिंग यांना घोड्यावर बसवले आणि संघविरोधी कारवाया सुरू केल्या. म्हणजे असे, की जनता पक्षात असलेल्यांनी कुठल्याही प्रकारचे संबंध संघाशी ठेवू नयेत असा आग्रह सुरू केला. सघाशी संबंध म्हणजे दुहेरी निष्ठा असा सिद्धांत राजनारायण यांनी मांडला आणि पक्षात कुरबुरी सुरू केल्या. 

दिल्लीत हे नाटक चालू असताना इथे मुंबईत रावसाहेब कसबे या दलित विचारवंताने लिहीलेले ‘झोत’ नावाचे छोटे पुस्तक राष्ट्र सेवा दल विरुद्ध रा. स्व, संघ यांच्या जनता पक्षीय विवादाचे एक मोठे कारण झाले. त्या पुस्तिकेच्या प्रकाशन व परिसंवादाचे कारण होऊन गोरेगावच्या केशव गोरे स्मारक ट्रस्ट हॉलमध्ये धुमश्चक्री उडालेली होती. तिथून मग दिवसेदिवस इथल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या समाजवादी व जनसंघियात हाणामारीचे प्रसंग येऊ लागले. जनता पक्ष म्हणुन त्यांचे नेते एकत्र वावरत होते आणि कार्यकर्ते परस्परांना पाण्यात बघू लागले होते. दिल्लीचे सरकार त्यातून लयाला गेले. औपचारिकता म्हणून विरोधी नेते यशवंतराव चव्हाण यांनी लोकसभेत अविश्वासाचा प्रस्ताव आणला होता, त्याचे निमीत्त करून जनता पक्षातले दोन गट हमरातुमरीवर आले. त्यातले जुने संसोपा व प्रसोपाचे गटही परस्परांशी पटवून घेत नव्हते. जुने संसोपावाले राजनारायण सोबत चरणसिंगाच्या गोटात गेले, तर प्रसोपावाले मोरारजींच्या गटात राहिले. पण तो ठराव संमत व्हायची पाळी आली आणि मोरारजींनी राजिनामा टाकला. मग कोणापाशी बहुमत नव्हते म्हणून राष्ट्रपतींचीच चाचपणी केली आणि चरणसिंग यांचे नवे संयुक्त सरकार सत्तेत आले. त्याला इंदिराजींनी बाहेरून पाठींबा दिलेला होता. यशवंतराव चव्हाण त्यात उपपंतप्रधान झाले. कसे छानपैकी पुरोगामी सरकार स्थापन झाले होते. जुने जनसंघिय व जुने प्रसोपावाले जगजीवनराम यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षात बसले होते. मात्र त्या सरकारला सहा महिन्यात विश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याची वेळ आली आणि इंदिराजींनी अजब पवित्रा घेतला. आपण सरकार बनवायला पाठींबा दिला होता, पण चालवायला पाठींबा दिलेला नाही, असे वक्तव्य इंदिराजींनी केले आणि चरणसिंग यांना राजिनामा देण्याखेरीज पर्याय उरला नाही. मग अन्य पर्याय नसल्याने लोकसभा बरखास्त झाली आणि मध्यावधी निवडणूका घेतल्या गेल्या. त्यात जनता पक्षाचा धुव्वा उडवित इंदिराजी पुन्हा देशाच्या पंतप्रधान झाल्या आणि आणिबाणी लादणार्‍या इंदिराजींना देशाने पुन्हा स्विकारले. त्याचे श्रेय खरे म्हणजे नसलेला प्रतिगामी-पुरोगामी वाद उकरून काढणार्‍या व जनभावनेची पायमल्ली करणार्‍या राजनारायण व तत्सम समाजवाद्यांनाच द्यावे लागेल. पण तिथून मग संघ हा पुरोगामी राजकारणातला एक महत्वाचा शब्द बनत गेला. पुर्वाश्रमीचे समाजवादी व संघनिष्ठ जनसंघवाले यांच्यात संघ हा वितुष्टाचा विषय होऊन गेला. एकवेळ आणिबाणी लादून गजाआड फ़ेकणार्‍या इंदिराजी चालतील, पण संघाशी संबंधित कोणाशी सलगी नाही, हे तत्व पुर्वाश्रमीच्या समाजवाद्यांनी आपली विचारसरणी बनवली म्हणायला हरकत नाही. त्याचे परिणाम मग लौकरच दिसून आले. 

समाजवाद्यांचा एक गट जनता पक्षातून बाजुला झालाच होता. तरी १९८० च्या लोकसभेत उर्वरीत जनता पक्ष एकदिलाने लढला आणि पराभूत झाला. पण त्यात कायम रहाण्याने काहीही साधणार नव्हते, म्हणुन पुर्वाश्रमीच्या जनसंघीयांनी वेगळी चुल मांडण्याचा पवित्रा घेतला. डिसेंबर १९८० मध्ये त्यांनी मुंबईतच अधिवेशन भरवून भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. त्यालाच आज आपण भाजपा म्हणून ओळखतो. उरलेला जनता पक्ष क्रमाक्रमाने विस्मृतीत गेला, त्याचे पुन्हा विश्वनाथ प्रताप सिंग याच्या नेतृत्वाखाली जनता दलात रुपांतर झाले व आणखी तुकडे पडत गेले. पण नंतरच्या साडेतीन दशकात प्रयत्नपुर्वक पुर्वीच्या जनसंघीय वा नंतरच्या भाजपावाल्या नेत्या कार्यकर्त्यांनी १९७७ सालचा बिगर कॉग्रसी राजकारणाचा ‘जनता’ वारसा बळाकावण्याचा प्रयास केला. त्यांच्या पाठीशी अर्थातच संघाची भक्कम संघटना उभी असल्याने त्यात यश मिळत गेले. पण दरम्यान ज्या पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी राजकारणाचा आरंभ १९७८ सालात झाला, त्यात पुर्वाश्रमीच्या समाजवाद्यांखेरीज अन्य पक्ष सहभागी होत गेले. त्यांना आज आपण पुरोगामी म्हणून ओळखतो. या पुरोगाम्यांची नेमकी ओळख काय? अर्थात विविध विचारवंत नवनव्या व्याख्या देत असतात. पण अत्यंत सोपी व्याख्या कुठली असेल, तर जो कोणी हिदूत्व किंवा संघाच्या विरोधात कडाडून बोलेल, त्याला आज पुरोगामी म्हणून ओळखले जाते. त्यांचा कार्यक्रम कोणता? याही प्रश्नाचे उत्तर त्यांना देता येणार नाही. जे काही संघ वा त्याच्याशी संबंधित ठरवतील, त्याच्या विरोधात दंड थोपटून उभे रहाणे, हा आता पुरोगाम्यांसाठी एक कलमी कार्यक्रम होऊन गेला आहे. त्याचा पाठपुरावा करताना हे पक्ष व विविध पुरोगामी गट क्रमाक्रमाने लयास गेलेले आपल्याला दिसतील. आपली विचारसरणी, आपला अजेंडा याच्याशी त्यापैकी कोणाला कसले कर्तव्य नाही. आपल्या विचारांची संघटना असावी, त्याची शक्ती व प्रभाव जनमानसावर पडावा, यासाठी पुरोगामी म्हणवणार्‍या नेते गटांनी मागल्या दोनतीन दशकात नेमके काय केले, ते भिंग घेऊन शोधले तरी सापडणार नाही. त्यापेक्षा भाजपा किंवा संघाने काहीही करायचे म्हटले, की त्याला अपशकून करण्याला सतत प्राधान्य देण्यात आलेले दिसेल. नेमके त्याच्या उलट त्याच दोनतीन दशकात संघाने व भाजपाच्या नेत्यांनी कॉग्रेसी राजकारणाला पर्याय म्हणून जनमानसात आपली प्रतिमा उभी करण्याचा पद्धतशीर प्रयास केलेला दिसेल.

संघ वा भाजपाच्या आजच्या यशाला जसे त्यांचे दिर्घकालीन प्रयास कारणीभूत आहेत, तसेच पुरोगाम्यांच्या आजच्या केविलवाण्या अपयशाला त्यांचा नाकर्तेपणा कारण झाला आहे. खरे तर वेगळा झालेल्या भाजपालाही आपला खरा संघीय चेहरा घेऊन पुढे येण्याची हिंमत नव्हती. वेगळा झालेल्या भाजपाचाही अजेंडा गांधीवाद आणि समाजवाद असाच होता. त्यात कुठे हिंदूत्वाचा लवलेश नव्हता. कारण आपला पुरोगामी चेहरा दाखवूनच आपण कॉग्रेसी राजकारणाला पर्याय होऊ शकतो, अशी भाजपा नेत्यांचीही धारणा होती. बर्‍याच प्रमाणात संघापेक्षा वेगळा अजेंडा घेऊन भाजपा चालतही होता. १९८७ सालात मुंबईच्या उपनगरात पार्ल्याची पोटनिवडणूक झाली. त्यात शिवसेना खुले हिंदूत्वाचे आवाहन करीत उतरली होती. तर तेव्हा भाजपाने आपला उमेदवार मागे घेऊन जनता पक्षीय प्राणलाल व्होरा या उमेदवाराचे समर्थन व सेनेच्या हिंदूत्वाला विरोध केला होता. पण गंमत म्हणजे त्याच निवडणुकीत संघाने मात्र सेनेच्या बाजूने उतरून भाजपाची भूमिका फ़ेटाळली होती. पण याचा अर्थ असा होतो की भाजपा वा पुर्वाश्रमीच्या जनसंघीयात न्युनगंड जोपासून त्यांना पुरोगामी बनवण्यात पुरोगामी मंडळी मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेली होती. किंबहूना संघापासून भाजपाला वेगळे काढण्यात पुरोगामी यशस्वी झाले, अशी १९८७ पर्यंतची अवस्था होती. त्याचेही कारण होते, १९८४ च्या निवडणूकीत भाजपाचा उडालेला धुव्वा होय. इंदिराजींची खलिस्तानी अतिरेक्यांनी हत्या केली आणि त्यातून उठलेल्या सहानुभूतीच्या अगडबंब लाटेत सर्वच पक्ष वाहून गेले. भाजपाला पहिली निवडणूक स्वबळावर लढताना अवघ्या दोन जागा लो्कसभेत जिंकता आलेल्या होत्या. त्याचे वैफ़ल्य मोठे होते. कारण वाजपेयी यांच्यासारखे दिग्गजही पराभूत झाले होते. बालेकिल्ले म्हणावे अशाही जागा गमावल्या होत्या. फ़क्त भाजपाच संपला नव्हता, तर अन्य पक्षही विस्कटून गेले होते. पण मग तिथून नव्याने पक्षाची व नेतृत्वाची उभारणी भाजपाने वा संघाने सुरू केली, असे म्हणायला हरकत नाही. पुरोगाम्यांची दिवाळखोरी आणि संघ व भाजपातील नव्या उभारणीचा काळ एकच असावा याला निव्वळ योगायोग म्हणता येईल. आज दिसतात ते त्याचेच परिणाम होत. कारण याच कालखंडात भाजपाने नवे समाज घटक आपल्यात आणायचा व नवनेतृत्व उभे करण्याचा चंग बांधला होता, तर पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पक्षात, चळवळीत व संघटनात खरे हाडाचे कार्यकर्ते बाजूला पडत चालले होते आणि त्यांची जागा बोलघेवडे, कागदी घोडे घेऊ लागले होते. संघटनात्मक काम लयास जाऊन माध्यमे व प्रसिद्धीच्या बळावर पुरोगामी चळवळ चालवण्याचे नवे तंत्र विकसित होऊ लागले होते. त्याचा एकत्रित परिणाम आज आपल्याला दिसतो आहे. (अपुर्ण)

पुरोगामी चळवळीचे मारेकरी

ध्येय अमुचे हे ठरले
कार्य दुसरे ना उरले

(लेखांक पहिला)

लोकसभा निवडणूका संपून आता दिड वर्षाचा कालावधी उलटला आहे आणि त्यात नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे नेतृत्व करताना कॉग्रेसचा ऐतिहासिक पराभव घडवून आणला. नुसता त्या पक्षाचा तो पराभव नव्हता तर स्वातंत्र्य चळवळ व स्वातंत्र्योत्तर काळातील राजकीय क्षितीजावर तळपत असलेल्या नेहरू-गांधी प्रणित तथाकथित सेक्युलर वा पुरोगामी विचारसरणीचा तो दारूण पराभव होता. मात्र इतके होऊनही अजून कोणी त्याचा गंभीरपणे अभ्यास केलेला नाही. किंबहूना त्या निकालांची गंभीर दखल सुद्धा घेतली गेलेली नाही. उलट जुनेपाने संदर्भ देवून अशा पराभवातून कॉग्रेस अनेकदा कशी सावरली आहे, त्याचे दाखले देण्याची पळवाट शोधण्यात जाणत्यांनी धन्यता मानलेली आहे. इथे जाणते म्हणजे फ़क्त कॉग्रेस पक्षातले जाणते व अभ्यासू नेते असेच म्हणायचे नाही. तर स्वत:ला राजकीय विश्लेषक वा पुरोगामी विचारांचे समर्थक मानल्या जाणार्‍या पत्रकार-संपादक व लेखकांचाही त्यामध्ये समावेश आहेच. पण त्याच्याही पलिकडे जे अन्य पुरोगामी पक्ष वा संघटनेशी संबंधित आहेत, त्यांचाही याच जाणत्यांमध्ये समावेश होतो. अशा तथाकथित तमाम पुरोगाम्यांनी मोदींचा विजय केवळ निवडणूकीतला विजय मानून त्याकडे केलेला काणाडोळा त्यांच्या बेफ़िकीरीचे लक्षण नाही, तर बौद्धिक दिवाळखोरीची साक्ष आहे. याचे पहिले कारण म्हणजे लौकिकार्थाने वा निवडणूकीच्या मैदानात मोदींनी कॉग्रेस व अन्य पुरोगाम्यांचा पराभव केला आहेच. पण त्याच्यापलिकडे तो पुरोगामी म्हणून मिरवणार्‍या प्रत्येकाचा पराभव आहे. मात्र त्याचे सर्वच श्रेय मोदींना देता येणार नाही. कारण पुरोगाम्यांच्या सहकार्याशिवाय कोणीही त्यांचा इतका दारूण पराभव घडवू शकला नसता. मग त्यातून सावरायचे असेल आणि नव्याने पुन्हा पुरोगामी विचारसरणीला उभारी आणायची असेल, तर मुळात कुठे व काय चुका झाल्या, त्याचा आढावा घ्यावा लागेल. झाल्या त्या चुकांची पुनरावृत्ती टाळावी लागेल आणि मोदींना आपल्या कुठल्या वागण्याचा सर्वाधिक लाभ झाला, त्याची अत्यंत डोळसपणे कारणमिमांसा करावी लागेल. पण दिड वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी त्या दिशेने एकही पाऊल पडताना दिसलेले नाही. उलट ज्या चुका झाल्या व मोदींना लाभदायक ठरल्या, त्याच अधिक आक्रमकरित्या करण्याकडेच पुरोगाम्यांचा आजही कल आहे. म्हणून पुरोगाम्यांचा पराभव किंवा दिवाळखोरी हा तपशीलवार अभ्यास करून मांडणे अगत्याचे झाले आहे. 

लोकसभा निवडणूका ऐन रंगात आल्या असताना नरेंद्र मोदी यांच्याविषयीचे लोकांचे आकर्षण इतके शिगेला पोहोचले होते, की देशाच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात मोदींची सभा असेल तर त्याचे थेट प्रक्षेपण वाहिन्या करू लागल्या होत्या. आणि त्याचा खरोखरच अतिरेक झालेला होता. कुठल्याही वाहिनीवर गेलात, तर मोदीच दिसत असायचे. त्याच काळात विविध मतचाचण्या घेऊन त्याचे विश्लेषणही चालू होते. अशाच एका विश्लेषणाच्या कार्यक्रमात व्यासंगी संपादक कुमार केतकर यांनी केलेली एक टिप्पणी लक्षात राहिली. ते म्हणाले होते, की प्रचाराचा अतिरेक मोदींना बहुधा त्रासदायक होईल. इंग्रजीमध्ये त्यांनी ‘ओव्हर किल’ असा शब्दप्रयोग केला होता. मराठीत आपण अति तिथे माती असे शब्द वापरतो. त्यात तथ्य होते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला, मग लोकांना तिचा वीट येतो आणि लोक त्याकडे पाठ फ़िरवतात. मोदींना आपल्या वाहिनीवर दाखवून त्यांच्या लोकप्रिय छबीचा वापर अधिक प्रेक्षक मिळवण्यासाठी वाहिन्या करीत होत्या. आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणे अपरिहार्य होते. पण आपली छबी दाखवण्याची मोदींनी कुठल्या वाहिनीवर सक्ती केलेली नव्हती. ते लोकांनाही कळत होते. म्हणूनच लोकांनी त्या वाहिन्यांकडे पाठ फ़िरवून अन्य वाहिन्यांवरचे कार्यक्रम बघणे पसंत केले. म्हणून लोक मोदींकडे पाठ फ़िरवतील असा निष्कर्ष काढणे ही चुक होती. पण त्यानिमीत्ताने केतकरांनी मांडलेला निष्कर्ष वा निकष चुकीचा म्हणता येणार नाही. मोदी हा विषय किंबहूना ‘ओव्हर किल’ याच निकषावर समजून घेण्याची गरज आहे. कारण कुठल्या तरी अतिरेकानेच मोदींना इतके देशव्यापी नेतृत्व म्हणून पुढे आणले. माध्यमांनी व पुरोगामी अतिरेकाने देशाला मोदी नावाचा पर्याय दिला. म्हणूनच केतकरांचा ओव्हर किल सिद्धांत मोदींच्या संदर्भात समजून घेतला, तर पुरोगामी विचारांचा ऐतिहासिक पराभवाचे विश्लेषण करणे सोपे होऊ शकेल. 

मोदी हे २००१ नंतर निवडणूकीच्या राजकारणात आले. संघाचा प्रचारक म्हणून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरूवात करणार्‍या या कार्यकर्त्याने संघटनात्मक कामात स्वत:ला इतके मग्न करून ठेवले होते, की कधी कुठल्या सत्तापदाची अभिलाषा धरली नव्हती. म्हणून भाजपातही दोन दशके कार्यरत असताना त्यांनी कुठली निवडणूक लढवली नाही, की सत्तापद उपभोगले नाही. पण अकस्मात गुजरातच्या राजकारणात निर्माण झालेल्या पोकळीने त्यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरावे लागले आणि थेट मुख्यमंत्री पदावर आरुढ व्हावे लागले. तसा आपल्याही राज्यात लोकप्रिय वा जनमत जिंकण्याची प्रतिमा नसलेला हा नेता एका दशकात थेट देशाचा लोकप्रिय नेता म्हणून पुढे येऊ शकला, हाच चमत्कार आहे. मात्र त्यासाठी त्याने प्रयत्न केले, असेही म्हणता येणार नाही. पण आलेल्या संधी सोडण्याचा मुर्खपणाही केला नाही. मोदी हे देशातल्या अतिरेकी पुरोगामी षडयंत्राची अशी शिकार झाले, की त्यातून सुटण्याच्या धडपडीने त्यांना थेट देशाचा अपुर्व नेता म्हणून राजकीय क्षितीजावर आणुन उभे केले. तेव्हा देशात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार होते आणि त्यांना आव्हान निर्माण करण्यात कॉग्रेस अपेशी झाली होती. अन्य पुरोगामी पक्षही विस्कटलेले होते. अशा वेळी गुजरातमध्ये भाजपा पक्षांतर्गत वादाने आपली भूमी गमावत होता. त्यातून पक्ष संघटना सावरण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून मोदींना मुख्यमंत्रीपदी आणले गेले. पण योगायोगाने त्याच दरम्यान गोध्रा येथे कारसेवकांचा रेल्वेडबा मुस्लिम जमावाने जाळला आणि गुजरातमध्ये आगडोंब उसळला. अशावेळी नवखा मुख्यमंत्री कितीही प्रामाणिक असला तरी परिस्थिती आवरू शकणार नव्हता. मोदींना तर सत्तेत येऊन सहा महिनेही मिळाले नव्हते आणि त्यांच्यापाशी प्रशासन राबवण्याचा अनुभवही जवळपास नव्हता. सहाजिकच दंगल हाताबाहेर गेली आणि त्याचे खापर मोदींच्या डोक्यावर फ़ोडण्याची जणू पुरोगामी स्पर्धाच सुरू झाली. आजवर देशात शंभरावर मोठ्या हिंदू-मुस्लिम दंगली झाल्या आहेत आणि प्रत्येकवेळी अधिक मुस्लिमच त्याचे बळी झाले आहेत. पण त्याचे भानही न ठेवता मुख्यमंत्र्यालाच या दंगलीचा सुत्रधार ठरवण्यापर्यंत अतिरेक झाला आणि तो मागली लोकसभा संपेपर्यंत बिलकुल थांबला नाही. कुमार केतकर ज्याला अतिरेक वा ओव्हर किल म्हणतात, तो हाच प्रकार होता. 

महाराष्ट्रात व मुंबईत १९९२ व ९३ अशा दोन मोठ्या दंगली पेटल्या आणि त्यातही शेकडो लोकांचा बळी गेला. पण तेव्हाचे मुखयमंत्री सुधाकरराव नाईक यांना कोणी दंगलीचा सुत्रधार मानले नाही. खुद्द गुजरातमध्ये दर दीडदोन वर्षांनी हिंदू-मुस्लिम दंगलीचा इतिहास आहे. पण तेव्हाच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यावर दंगलीचा सुत्रधार म्हणायची कोणी हिंमत केली नाही. नाकर्तेपणाचा आरोप झाला असेल, पण दंगलीचा सुत्रधार आणि सरकारच मुस्लिमांचे मारेकरी, इतक्या टोकाची भाषा कधीच कुठेही झालेली नव्हती. तिथून या पुरोगामी अतिरेकाला सुरूवात झाली. भाजपाचे कोणी श्रेष्ठी वा दिल्लीतील बडे नेते त्याला समर्थपणे उत्तर देवू शकले नाहीत. तर आपल्या उदात्त प्रतिमेच्या चिंतेत असलेले वाजपेयी सुद्धा आपल्या या दुय्यम नेत्याच्या पाठीशी समर्थपणे उभे राहिले नाहीत. म्हणजेच मोदींना आपला बचाव स्वत:च उभा करावा लागला. पण त्यांचे कोण ऐकून घेत होता? इंग्रजी वृत्तपत्रे व वाहिन्यांनी जो मोदी विरोधाचा सपाटा लावला, त्याची अन्य भाषात नुसती पुनरावृत्ती होत राहिली. सोनिया गांधी नव्याने राजकारणात आलेल्या होत्या आणि त्यांना वाजपेयींशी टक्कर देणे शक्य नव्हते. सहाजिकच वाजपेयी विरोधात छडी प्रमाणे गुजरात दंगल व मोदी विरोधाचा वापर सरसकट होऊ लागला. आरंभी मोदींनी त्याला उत्तरे दिली व खुलासेही करून बघितले. पण त्याचा उपयोग नव्हता. त्यांच्या प्रत्येक बोलणे विधानाचा विपर्यास करून बातम्या झळकत होत्या. मात्र त्यातून गुजरातच्या बहुसंख्य अशा हिंदू समाजालाही दुखावले जाते आहे, याचे भान यापैकी कोणाही पुरोगाम्याला राहिलेले नव्हते. दुखावणारा प्रत्येक हिंदू आपोआप मोदी समर्थक होत चालला होता. कारण गोध्रा जळित कांडानंतर जी संतप्त प्रतिक्रिया उमटली, ती तर्काला धरून होती. म्हणूनच त्यात हिंदू समाजाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे, म्हणजे त्याला मोदी समर्थक बनवणे होते. देशभरातील पुरोगामी नेते, पक्ष, संघटना, त्यांचे समाजसेवक अधिक माध्यमे तीच कामगिरी बजावत होत्या. त्याचा गुजराती जनमानसावर होणारा परिणाम मोदींसारखा लोकांमध्ये अखंड वावरलेला माणूस सहज ओळखू शकत होता. मग त्यांनी माध्यमात आपली जितकी हिंदूत्ववादी कडवी प्रतिमा उभी केली जाईल, त्याला सहकार्य देण्याचाच पवित्रा घेतला. एका बाजूला हिंदू व दुसर्‍या बाजूला गुजराती, अशा दोन अस्मिता मोदींनी हाताशी धरून आपली नवी प्रतिमा गुजरातमध्ये उभी करणे त्यातून सोपे होऊन गेले. २००२ पासून २०१२ पर्यंतच्या दहा वर्षात गुजरातचा एकमेव अनभिषिक्त नेता अशी मोदींची प्रतिमा पुरोगाम्यांनी उभी केली आणि त्याला लागणारे साहित्य व माल मोदी मोठ्या अगत्याने पुरवत गेले.  
मोदींना कोपर्‍यात घेण्याची ही पुरोगामी चाल त्या कार्यकर्त्याला झुंजायला उर्जा देणारी ठरली. कारण उभा गुजरात किंवा तिथला बहुसंख्य हिंदू आपल्या पाठिशी एकदिलाने उभा असल्याची खात्री मोदींना झालेली होती. हिंदु-मुस्लिम असे धृवीकरण एकतर्फ़ी अपप्रचाराने पुरोगाम्यांनी घडवून आणले होते आणि त्याचा राजकीय लाभ उठवणे इतकेच काम मोदींना करायचे होते. किंबहूना त्याचा भरपूर लाभ होणार याची मोदींना खात्री होती. म्हणूनच त्यांनी राजिनामा देण्याचा प्रस्ताव पक्षापुढे मांडला आणि तो फ़ेटाळला जाईल अशीही चाल खेळली. मग विधानसभा बरखास्त करून पुरोगाम्यांना अधिकाधिक खेळवण्यात मोदी गर्क झाले. माध्यमातले पुरोगामी शहाणे व राजकारणातले अर्धवट पुरोगामी मोदींच्या खेळीत स्वेच्छेने सहभागी होत गेले. त्याचाच परिपाक मग पुढल्या दहा वर्षांनी समोर आला. मोदींना थेट पंतप्रधान पदाचे उमेदवार बनवण्यापर्यंत हा मुर्खपणा अविरत चालू राहिला. अर्थात मोदी व गुजरात दंगलीचा लाभ पुरोगामी वा कॉग्रेसला मिळाला हे नाकारता येत नाही. दोनच वर्षात लोकसभेच्या निवडणूका आल्या आणि त्यात दंगलीचा देशव्यापी वापर झाला. भाजपाला त्याचा फ़टका बसला. शिवाय पक्षाचा मोठेपणा गुंडाळून सोनियांनी अन्य पुरोगामी पक्षांना सोबत घेण्याची चलाखी केली आणि सत्ताही मिळवली. पण तिथेच गुजरात व मोदी विषय निकालात काढून पुरोगाम्यांनी आपापले सकारात्मक कामकाज सुरू केले असते, तर मोदी हे पुरोगाम्यांसाठी देशव्यापी आव्हान होऊ शकले नसते. पण सत्तालोलूप कॉग्रेसने पुरोगामी खुळेपणाचा धुर्तपणे वापर करून घेताना सर्वच पुरोगाम्यांची पत धुळीस मिळवली. गुजरात, मोदी व हिंदूत्व यांचे भय घालून जो सावळागोंधळ पुढल्या दहा वर्षात चालू राहिला, त्याने कॉग्रेस आणि पुरोगामीत्व यांच्यातला भेद पुसट होत गेला. किंबहूना मोदी वा भाजपा सोडून सर्वकाही पुरोगामी अशी एक व्याख्या तयार होत गेली. मात्र त्याला आव्हान देण्याची कुवत दिल्लीच्या कुणा भाजपा नेत्यामध्ये नव्हती. म्हणूनच २००९ च्या निवडणूकात भाजपाची अवस्था आणखी दारूण झाली. पण त्याचवेळी कॉग्रेस़चे पुनरुज्जीवन होताना आजवरच्या प्रस्थापित पुरोगामी डाव्या मानल्या जाणार्‍या पक्षाचे पावित्र्य संपुष्टात आले होते. बंगालमध्ये डावे, उत्तर प्रदेशात मुलायम, बिहारमध्ये लालू यांना स्वत:ची ओळखही वेगळी ठेवता आलेली नव्हती. 

एकूण मागल्या दहा वर्षात अशी स्थिती आलेली होती, की देशात पुरोगामी सरकार व राजकारण हवे असेल, तर कॉग्रेस वा तत्सम लोकांचा भ्रष्टाचार अनागोंदी निमूट सहन करावी लागेल. दुर्दैव असे, की हे पुरोगामीत्व नव्हे आणि भ्रष्टाचाराला पुरोगामी राजकारणात स्थान नाही, हे सांगायला तेव्हा विचारवंत वा पत्रकार संपादकांनी पुढे यायला हवे होते. निदान जे स्वत:ला पुरोगामी मानतात वा बांधिल मानतात, त्यांनी कॉग्रेस वा त्यांच्या मित्रपक्षांना जाब विचारण्यात पुढाकार घ्यायला हवा होता. पण मजेची गोष्ट अशी, की समाजातील पुरोगामी विचारवंत व संपादक पत्रकारांनी तसा जाब विचारू बघणार्‍या भाजपा वा इतरांची मुस्कटदाबी करण्यात धन्यता मानली. पर्यायाने माध्यमातील पुरोगामी लोकांची विश्वासार्हता जनमानसात घसरत गेली. नेमक्या त्याच काळात भाजपामध्ये मोदींची उंची वाढत होती आणि नव्याने वापरात आलेल्या सोशल माध्यमांचा मोदींनी अतिशय धुर्तपणे वापर सुरू केला होता. त्यातून मग भाजपापेक्षा देशभर नरेंद्र मोदी यांचे चहाते तयार होऊ लागले आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांना या नव्या माध्यमातून आव्हान उभे रहात गेले. मोदींची नकारात्मक प्रतिमा सातत्याने रंगवलेल्या माध्यमांना एका दिवसात माघार घेऊन मोदींचा नवा चेहरा उभा करणे अशक्य होते. पण सोशल माध्यमातून मोदींची जी फ़ौज त्यांच्याविषयी नवनवी माहिती जगभर पाठवू लागली होती, तिच्याशी सामना करण्यात भारतातील पुरोगामी माध्यमे लंगडी पडू लागली. किंबहूना माध्यमातील नामवंत सेक्युलर वा पुरोगामी म्हणून बदनाम होत गेले. ते सत्य सांगणार नाहीत आणि मोदी विषयक असत्यच सांगतील, असे चित्र उभे करण्यात मोदी यशस्वी झाले. त्यातून मग माध्यमातील मोडकळीस आलेल्या पुरोगामी नामवंतांना संपवण्याची अखेरची निर्णायक लढाई मोदींनी खेळणे तेवढे बाकी होते. आपल्याच कर्तबगारीने आपली आपलीच विश्वासार्हता धुळीस मिळवलेल्यांना शेवटचा धक्का देण्यापेक्षा मोदींना कुठलेच मोठे काम उरलेले नव्हते. तो धक्का त्यांनी लोकसभा प्रचाराच्या रणधुमाळीतून दिला. मतदानाचा अखेरचा महिना येऊन ठेपला, तरी हा देशातला सर्वाधिक लोकप्रिय माणूस कुठल्याही वाहिनीला मुलाखतही देत नव्हता. पण त्याच्या सभांचे थेट प्रक्षेपण करून त्यावर चर्चा करण्याची अगतिक भूमिका माध्यमांना पार पाडावी लागत होती. त्या अखेरच्या दिवसात मोदींनी एका एका नगण्य वाहिन्यांना प्राधान्याने मुलाखती देवून नावाजलेल्या वाहिन्या व पत्रकार संपादकांना खड्यासारखे बाजूला ठेवले. शेवटी दिवस संपत आले आता तरी ‘मोठ्या जाणत्या पत्रकारांना मुलाखती द्याना’, अशी केविलवाणी विनंती सागरिका घोष नामक पत्रकार विदूषीला करावी लागली. राजदीप सरदेसाईची ही पत्नी असल्याचे लक्षात घेतले, तर एकूण माध्यमातील पुरोगाम्यांना मोदींनी कसे नामोहरम करून टाकले त्याचा अंदाज येईल. पुढे निकाल लागले त्यात कॉग्रेससह तमाम पुरोगामी पक्षही धाराशाही झाले. त्याला मोदींचे कर्तृत्व उपयुक्त ठरण्यापेक्षा आधीच्या बारा वर्षातल्या ‘ओव्हर किल’ म्हणजे मोदी विरोधी अपप्रचाराच्या अतिरेकाचा तो परिपाक होता. मात्र इतक्याने देशातील पुरोगामी राजकारण वा चळवळी उध्वस्त झाल्या वा मोडकळीस आल्या असे म्हणता येणार नाही. त्याची सुरूवात खुप आधी म्हणजे साडेतीन दशकापुर्वी झालेली होती.   (अपुर्ण)

रविवार, १३ सप्टेंबर, २०१५

‘भाकड’ पुराणकथा आणि सत्यकथा



पन्नाससाठ वर्षापुर्वी कॉलेजला जाईपर्यंत अगदी मुंबईसारख्या महानगरातील शाळकरी मुलांनाही चित्रपट बघायला मिळत नसायचे. मात्र आपल्यापेक्षा थोराड वा कॉलेजात जाणार्‍याने कुठला सिनेमा बघितला तर त्यात काय होते, त्याचा तपशील अशा ‘वडीलधार्‍या’कडून ऐकून थक्क होणे, एवढाच शाळकरी वयातला थरार होता. अशा वयात  इंग्रजी चित्रपट तर दूरची गोष्ट होती. पण आमच्या टोळीला एकाकडून तेव्हा खुप गाजलेल्या ‘सायको’ नामक परदेशी चित्रपटाची कहाणी ऐकायला मिळाली होती. म्हणूनच संधी मिळेल तेव्हा हिचकॉकचा तो चित्रपट बघायचाच, अशी एक महत्वाकांक्षा त्या कोवळ्या वयात बाळगली होती. पुढे जेव्हा संधी मिळाली आणि ‘सायको’ बघितला, त्याचा प्रभाव अजूनही मनावर आहे. इतक्या मोठ्या त्या पटगृहाच्या पडद्यावर एक तरूणी पाठमोरी उभी आहे आणि एकूणच शंकास्पद वातावरण आहे. अशावेळी एकदम संपुर्ण पडदा व्यापणारा हात तिला झाकत पुढे सरकतो आणि तिच्या मानेकडे जातो. तत्क्षणी अंगावर शहारे यायचे आणि पटगृहात सुस्कारे सुटायचे. कितीदा तरी तो चित्रपट पुढल्या काळात बघितला. पण प्रत्येकवेळी त्याचा तोच प्रभाव राहिला. हिचकॉक या दिग्दर्शकाची तीच खासियत होती. प्रेक्षकाच्या मनातल्या भितीचा तो थेट ताबा घ्यायचा आणि मग तुमच्या मनाशी खेळ करायचा. तुम्हाला तो खेळ आवडायचाही. त्या थक्क चकीत होण्यात वा शहारण्यात एक अजब अनुभव असायचा. आजच्या पिढीला त्याचा किती आनंद लूटता येईल याची शंका आहे. कारण आता आपले नित्यजीवनच सतत थरारक होऊन गेले आहे. घराघरात येऊन पोहोचलेल्या वाहिन्या व उथळ नाट्यमय बातमीदारीने थराराची इतकी सवय अंगवळणी पडली आहे, की जे अनुभवले ते विसरून पुढल्या थराराला कायम सज्ज रहावे लागते. गेल्या आठवड्यात तुर्कस्थानच्या समुद्र किनार्‍यावर पडलेल्या एका कोवळ्या बालकाचे उपडे शव बघून त्याचा नवा अनुभव आला. हिचकॉक आठवला. कारण ते चित्र टिपणार्‍या व प्रदर्शित करणार्‍याचा हेतू हिचकॉकपेक्षा किंचितही वेगळा नव्हता. त्यातून प्रेक्षकाच्या मनात भय व सहानुभुती अशा संमिश्र भावना एकाचवेळी जाग्या करायचाच हेतू त्यामागे होता. हे आता नेहमीचेच झालेले नाही काय?

त्यात हे बालक हकनाक मृत्यूमुखी पडले वा अन्य कुणाच्या राजकीय वा भलत्या महत्वाकांक्षेने त्याचा बळी घेतला, याची कुठलीही वेदना यातना ते चित्र पेश करणार्‍या पत्रकार वा वाहिनीकडे नव्हती. त्यातून एक ठराविक राजकीय परिणाम साधण्यासाठीच हे प्रदर्शन योजनापुर्वक करण्यात आलेले होते, त्यातून सिरिया-इराक येथून युरोप खंडातील पुढारलेल्या देशात घुसू बघणार्‍या तथाकथित निर्वासितांविषयी जगभर सहानुभूती निर्माण करणे आणि पर्यायाने त्यात अडसर झालेल्या युरोपियन देशातल्या राज्यकर्त्यांबद्दल चीड निर्माण करणे, इतकाच उद्देश त्यामागे होता. तसे झाले मग सुखवस्तु युरोपियन नागरिकांमध्ये आपल्या सुखवस्तु जगण्याविषयी अपराधगंड निर्माण झाला पाहिजे आणि त्याखाली त्यांचे राज्यकर्ते दबले पाहिजेत. यासाठीच हे सर्व नाटक होते. त्यातली माणुसकी वा भावना खरी असती, तर मागली दोनतीन वर्षे याच प्रदेशात जे काही मृत्यूचे अमानुष तांडव चालू आहे आणि जिवंतपणे हजारो मुले महिला नरकवास भोगत आहेत, त्याविषयी चीड निर्माण करणार्‍या कथानकाचा समावेश झाला असता. तशा डझनावारी हृदयद्रावक कहाण्या त्याच परिसरात घडत आहेत आणि त्याविषयी फ़ारसा कुठे गाजावाजा होऊ दिला जात नाही. किंबहूना होत असेल तर त्यावर पांघरूण घालणार्‍या इतर काही गोष्टींचा गवगवा केला जातो. त्यातून मग त्या खर्‍या सहानुभूतीला पात्र असलेल्या बातम्या व कहाण्या दडपल्या जात असतात. दाखवले असे जाते आहे, की सिरीया-इराक येथे जे युद्ध व यादवी चालू आहे, त्याच्या परिणामी लक्षावधी लोकांना घरदार सोडून देशोधडीला लागायची पाळी आली आहे आणि माणुसकी म्हणून त्यांना युरोपियन राष्ट्रे आश्रयही देताना हात आखडता घेत आहेत. पण म्हणून वस्तुस्थिती तशीच आहे काय? बारकाईने त्या निर्वासित म्हटल्या जाणार्‍या लोकांकडे बघितले तर त्यातला कोणी कुपोषित वा उध्वस्त जीवनाचे चटके सोसलेला दिसत नाही. चांगले स्वच्छ कपडे परिधान केलेले हे जमाव कुठल्याही कागदपत्राशिवाय तुर्कस्थान वा ग्रीसच्या सीमेवर येऊन थडकले आहेत. हा प्रकार आजचा वा तिथल्या यादवीचा परिणाम आहे काय?

मागल्या काही वर्षात मध्य आशियातील मुस्लिम अरब देशातून शेकड्यांनी लोक असेच अवैध मार्गाने युरोपियन देशांमध्ये घुसखोरी करीत राहिले आहेत. कधी नौकेत बसून तर कधी कुठल्या कंटेनर ट्रेलरच्या बंदिस्त खोक्यातून, त्यांनी या देशात घुसण्याचे सतत प्रयत्न केलेले आहेत. इकडे युरोपापासून तिकडे दक्षिण गोलार्धातील ऑस्ट्रेलियापर्यंत हजारोच्या संख्येने मुस्लिम अरबी लोकांनी घुसखोरी केलेली आहे. अर्थात पकडले जाण्याचे भय त्यांना अजिबात नाही. पकडले गेलो तरी बेहत्तर! तिथे आपली खाण्यापिण्याची सोय संबंधित पुढारलेल्या देशाला करावी लागेल, अशी त्यांना पुर्ण खात्री आहे. म्हणजेच कुठलाही कायदा मोडल्याचा गुन्हा केला तरी जीवावर बेतणार नाही, याची हमीच त्यांना तसे करायला प्रोत्साहित करते आहे. आता दुसरी बाजू बघा. जिथून हे हजारो लोक जीव मूठीत धरून पळत असल्याचा गवगवा केला जातो, तिथून अशी माणसे सर्वात प्रथम युद्धक्षेत्र नसलेल्या जवळच्या प्रदेशात जाण्याचा प्रयत्न करतील ना? म्हणजे सौदी अरेबिया, कुवेत, ओमान वा दुबई, कतार अशा अरबी व ओळखीच्या प्रदेशात कुठेही युद्धाची सावली नाही आणि परिचयाचा प्रदेश आहे. संस्कृती व धर्मानेही जवळीक सांगता येणारे हे देश हाकेच्या अंतरावर म्हणावेत असे आहेत. पण या लक्षावधी मुस्लिम अरबांची नजरही तिकडे नाही. त्यांना हजारो मैल दूर असलेल्या युरोपातच जायचे आहे. कारण संस्कृती व धर्माच्याही नात्याने जवळचे असलेले तितकेच श्रीमंत अरबी देश त्यांना दारातही उभे करणार नाहीत, याची पुरेपुर खात्री आहे. शिवाय नुसतेच पकडून हाकलून देतील असे नाही. कायदा मोडला वा बिना कागदपत्रे तिथे घुसण्याचा प्रयत्न केला तरी जीवाशी गाठ आहे. हातपाय तोडले जातील वा थेट गोळ्या घालूनही मारले जाण्याची शक्यता आहे. थोडक्यात कायदा मोडण्याची मुभा नसलेले श्रीमंत देश जवळ असले तरी नको आहेत आणि जिथे कायदा धाब्यावर बसवून धुमाकुळ घालायची मोकळीक असेल, तिथेच यांना आश्रीत व निर्वासित म्हणून जायचे आहे.

अर्थात हा नुसता संशय मानायचे कारण नाही. त्याची अनुभूती कायम येते आणि आताही येत आहे. तुर्कस्थानच्या किनार्‍यावर त्या बालकाचे शव दाखवले गेल्यावर युरोपियन देश दबावाखाली आले आणि त्यांच्या सीमेवर रोखून धरलेल्या या निर्वासितांनी पोलिस बंदुकांना झुगारून घुसखोरी सुरू केली. शेकडो व हजारोच्या संख्येने घुसणार्‍यांना पोलिस वा बंदुका रोखूही शकल्या नाहीत. पण अशा रितीने जर्मनीच्या एका निर्वासित छावणीत काय घडले? तिथे इराकी सिरीयन व अफ़गाण निर्वासित आहेत. त्यातल्या कुणा एकाने पवित्र ग्रंथ कुराणाची पाने फ़ाडली व शौचालयात फ़ेकली. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने मग त्याचा पाठलाग केला. छावणीचे पोलिस त्याला वाचवायला गेल्यावर दगड व सळयांनी पोलिसांवरच निर्वासित जमावाने हल्ला केला. छावणीतले मदतकार्य संभाळणारे कार्यालयच फ़ोडून टाकले. ह्यांना निर्वासित ठरवले जात आहे. ज्यांच्या अंगात इतकी खुमखुमी आहे, की खाण्यापिण्याची सोय नसताना धर्मग्रंथाचा अपमान झाला म्हणून परक्या देशातही दंगल केली जाते. खरेच इतकी खुमखुमी होती, तर त्यांनी मूळ देशातील घरदार सोडून येण्य़ाचे कारणच काय? धर्मग्रंथाच्या नुसत्या अवमानाने ज्यांच्यात इतकी विरश्री संचारते, त्यांना मुळच्या देशातल्या अतिरेक्यांशी दोन हात करताना भिती कसली वाटत असते? युरोपियन देशातील पोलिस वा त्यांच्या हातातल्या बंदुका ज्यांना घाबरवू शकत नाहीत, त्यांनाच इसिस वा अन्य कुणा घातपात्याच्या हातातली हत्यारे भयभीत करू शकतात काय? कोण कोणाच्या डोळ्यात धुळफ़ेक करतो आहे? हा सगळा मामला काय आहे? जी मस्ती निर्वासित छावणीत दाखवली जाते, तिथे मानवाधिकार नावाच्या वेसणीने पोलिसांच्या मुसक्या बांधलेल्या आहेत. म्हणून त्याच्यावर हल्ला करण्यापर्यंत परागंदा झालेल्यांमध्ये विरश्री संचारते. पण त्यांच्याच मायदेशी इसिसचे लढवय्ये किंवा शेजारच्या अरबी श्रीमंत देशात कुठल्याही मानवी अधिकारांना स्थान नाही. तिथे याच धर्मप्रेमी निर्वासितांची विरश्री गर्भगळित होते.

कुठल्या धर्माच्या व त्यातील कुठल्या पवित्र गोष्टीच्या विटंबनेसाठी हे निर्वासित इतका धुमाकुळ घालू शकतात? ज्या धर्माच्या नावाने इसिस नावाची संघटना त्यांच्याच मायदेशात राजरोस बलात्कार करते आहे, त्याचेच पावित्र्य जपण्यासाठी जर्मनीत दंगल? एका बाजूला यांना आपल्या पवित्र ग्रंथाची पानेही फ़ाडली तर सहन होत नाही. पण दुसरीकडे त्यांच्याच मायभूमीत यझदी वा अन्यधर्मिय मुली महिलांना गुलाम बनवून धर्माच्या नावाने बलात्कार केले जात आहेत. एका बारा वर्षाच्या किशोरवयीन मुलीची भयंकर कहाणी याच दरम्यान उघड झाली आहे. एक जिहादी लढवय्या रोज तिच्याकडे येऊन धर्मकार्य व अल्लाशी जवळीक साधण्यासाठी तिच्यावर बलात्कार करायचा. तिचे हातपाय बांधून प्रार्थना करायचा आणि मग बलात्कार उरकून पुन्हा प्रार्थना करायचा. हा धर्माचा सन्मान आहे काय? ज्यांनी कोणी तिथे जर्मनीत धर्माच्या प्रतिष्ठेचे कारण दाखवून दंगल केली, त्यांना मायभूमीत फ़ैलावलेला इस्लाम धर्माचीच विटंबना असल्याचे तरी वाटते काय? असेल तर त्याविषयी त्यांना संताप कशाला येत नाही? जिथे बेछूट गोळ्या झाडल्या जातील याची खात्री आहे. तिथल्या धर्माच्या पावित्र्य वा विटंबनेची त्यांना फ़िकीर नाही. तिथला धर्म विटंबनेसाठी सोडून त्यांनी युरोपकडे धाव घेण्याचे कारणच काय? एक तर त्यांचे जीव मुठीत धरून युरोपकडे पळ काढणे हे निव्वळ नाटक आहे किंवा तिथे पोहोचल्यावर धर्माच्या पावित्र्यासाठी दंगलीची खुमखुमी दाखवणे तरी खोटे आहे. पण यातले काही दाखवले जाणार नाही, सांगितले वा समजावले जाणार नाही. दाखवले जाईल फ़क्त आयलान कुर्दी नामक त्या बालकाचे उपडे निपचित पडलेले शव! जेणे करून तुमच्या मनात अपराधगंड तयार व्हावा. याला रणनिती म्हणता येईल. एका बाजूला आपल्याच धर्मबांधवांनी इतरांवर अन्याय अत्याचार करावेत आणि अत्याचारितांच्या धर्मबांधवांनीच पुन्हा आपल्याला आश्रय देवून आपला बोजा उचलला पाहिजे. जुन्या किंवा कुराणाच्या भाषेत त्याचे उत्तर धिम्मीट्युड असे आहे. म्हणजे तुम्ही मुस्लिम नाही म्हणूनच सर्व बोजा तुमच्यावर! भारतीयांना समजण्यासाठी आपण त्याला जिझीया कर म्हणू.

जगातल्या लिबरल म्हणजे उदारमतवादी वा सेक्युलर असलेल्या बुद्धीमंतांचे युक्तीवाद कसे बघा. त्यांना इराकमध्ये यझदी लोकांची शेकड्यांनी कत्तल झाली किंवा त्यांच्या पळवलेल्या मुली महिलांना गुलाम म्हणून विकण्याचा प्रकार चालू आहे, त्याची अजिबात फ़िकीर नाही. एकाच वेळी शेकड्यांनी बिगर मुस्लिमांची इराक-सिरीया प्रदेशात कत्तल चाललेली आहे. त्यांचेही शेकड्यांनी निर्वासित कुठे ना कुठे मिळतील. त्यापैकी कोणी दंगल माजवली असे दिसले आहे काय? काश्मिरातून जीव मूठीत धरून पळून आलेले पंडित दिल्लीच्या रस्त्यावर निर्वासित म्हणून तीन दशके पडलेत. त्यांनी कधी दंगल केली आहे काय? अरबी मुस्लिम देशातून पळालेले बिगर मुस्लिम लाखोच्या संख्येने अन्यत्र निर्वासित म्हणुन पडलेत. त्यांच्या दंगलीची बातमी कुठे कानावर येत नाही. पण जे लोक काल जीव मुठीत धरून जर्मनीत आश्रय घ्यायला आलेत, ते दोन दिवसात तिथे धर्माच्या नावाने दंगल माजवतात. ही युरोपमध्ये येऊ घातलेल्या संकटाची नांदी आहे. ज्या युरोपच्या पुराणकथा वा ऐतिहासिक कथांमध्ये टोजन हॉर्सची गोष्ट कित्येक पिढ्या सांगितली गेली व जगभर ऐकवली गेली, त्याची पुनरावृत्ती होऊ घातली आहे काय? कुठल्या युरोपिय देशाच्या राज्यकर्त्या नेत्याला तरी ती कथा आठवते काय? अभेद्य किल्ला वा तटबंदीमुळे जे राज्य अजिंक्य होते, त्याला ट्रोजन हॉर्स नामक रणनितीने भुस्कटासारखे पराभूत करण्याची किमया घडवणारी ती गोष्ट आहे. इतिहास विसरलेल्यांची वा नाकारणार्‍यांमुळे इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते ना?

दिर्धकाळ अनिर्णित असलेल्या त्या युद्धात एके सकाळी किल्ल्याच्या भव्य दारात एक प्रचंड लाकडी घोडा उभा दिसतो. बाकी कोणी शत्रूसैन्य नसते. दिवसभर बुरूज व तटबंदीवरून त्या घोड्याचे निरिक्षण चालू असते आणि संध्याकाळ होताना दरवाजा उघडून तो निर्जीव घोडा किल्ल्यात ओढून पुन्हा दरवाजा कडेकोट बंद केला जातो. मग अपरात्री त्या लाकडी घोड्यात लपलेले शत्रूसैनिक बाहेर पडतात आणि किल्ल्याची दारे उघडून दडी मारून बसलेल्या आपल्या बाकीच्या सेनेला रस्ता मोकळा करून देतात. किल्ल्याच्या झोपलेल्या सैनिकांना गाफ़ील धरून मारले जाते आणि ते साम्राज्य धुळीला मिळवले जाते, अशी ती कहाणी आहे. इथे आज आपण बघतो आहोत त्यात काय वेगळे घडते आहे?

मागल्या दशकात युरोपच्या विविध लहानमोठ्या देशात दोन ते दहा टक्के असलेल्या मुस्लिम संख्येने तिथल्या कायदा व्यवस्थेला ओलिस ठेवले आहे. जर्मनी, फ़्रान्स वा स्वीडन, नॉर्वे अशा देशातही इस्लामची सत्ता हवी म्हणून धुमाकुळ घातला आहे. काही महिन्यापुर्वीच फ़्रान्सच्या ख्यातनाम शार्ली हेब्दो नामक नियतकालिकाच्या कार्यालयावर ‘अल्ला हो अकबर’ अशा घोषणा देत हल्ला झाला आणि संपादकासह अनेकाची राजरोस कत्तल झाली. पॅरीसमध्ये महिनाभर अल्जिरीयन आश्रीत मुस्लिमांनी मोटारींची जाळपोळ चालविली होती. नेदरलॅन्ड देशात ‘व्हेल’ म्हणजे बुरखा नावाचा चित्रपट काढला त्यात इस्लामवर टिका होती, म्हणून मोरक्कन आश्रित मुस्लिमाने त्या दिग्दर्शकाची हत्या केली. स्वित्झर्लंड येथे सर्वात उंच मशिदीचा मिनार उभा करण्यावरून सार्वमत घेण्याची पाळी आणली गेली. हा सगळा प्रकार आश्रित निर्वासित असल्याचा पुरावा असतो काय? पाच दहा टक्के लोकसंख्या असताना जर इतके भयंकर प्रकार होत असतील, तर त्यात दुपटीने भर पडली मग उद्या युरोपचा पश्चिम आशिया व्हायला कितीसा वेळ लागणार आहे? दुसर्‍या महायुद्धानंतर लेबानॉनच्या बहुसंख्य ख्रिश्चनांना मायदेश सोडून पळ काढावा लागला आणि आता तर इस्लामी देश अशीच त्याची ओळख राहिली आहे. इजिप्तमध्ये कॉप्टिक ख्रिश्चन नामशेष होत चालले आहेत. हा इतिहास आहे आणि त्याची पुनरावृत्ती लोकसंख्येच्या फ़ेरबदलाने युरोपातही होऊ शकते. हे स्पष्ट दिसत असताना बाहु पसरून युरोपियन राज्यकर्ते चाळीस लाख निर्वासित म्हणून सिरीयन इराकींना सामावून घेण्याची भाषा करणार असतील तर ते विनाशाला आमंत्रण देत आहेत असेच म्हणावे लागते.

मात्र त्यासाठी अरबी देशातल्या त्या इसिस वा अन्य कुठल्या जिहादी संघटनेला वा अरबी राज्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवता येणार नाही. कारण त्यापैकी कोणी युरोपला वा त्या खंडातील देशांना निर्वासित घेण्याची सक्ती केलेली नाही. तो मध्य पश्चिम आशियातील विविध मुस्लिम देशातील अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यात हस्तक्षेपच करायचा तर अमानुष वागणार्‍यांना क्रुरपणे संपवण्याची मदत पुढारलेले युरोपियन देश करू शकत होते. यातले कोणी आपल्या देशात आले, तरी हाच घिंगाणा करतील म्हणून सौदी, दुबई, कुवेत असा कोणीही निर्वासितांना आपल्याकडे घ्यायला तयार नाही, की त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारीही घ्यायला राजी नाही. ह्यात जिहादी घुसखोरी करून येतील असे कारण देवून त्यांना आश्रित म्हणूनही घ्यायला आखाती देशांनी साफ़ नकार दिला आहे. मग उदारमतवादाचे नाटक रंगवून युरोपने हे संकट आपल्या गळ्यात घेण्याचे कारणच काय? तर त्याचे कारण आपण इथे भारतातही शोधू शकतो. याकुब मेमनसाठी गळा काढणारे वा काश्मिरी लोकांच्या हक्कासाठी मातम करणारे आपल्याकडेही नाहीत काय? पण त्यांना काश्मिरी पंडितांचे हाल दिसत नाहीत. बघता येत नाहीत. त्यांचेच भाईबंद युरोपातही तेच उद्योग करत आहेत. ज्यांना सामुहिक जबाबदारी म्हणून ग्रीससारख्या छोट्या देशाची दिवाळखोरी भरून काढताना नाकीनऊ आलेत, त्यांनी चाळीस लाख अरबी निर्वासितांच्या पुनर्वसनाचा बोजा उचलण्याचा दावा करण्यात कितीसा अर्थ आहे? कारण हा लोंढा इथेच थांबणारा नाही, की जे येत आहेत त्यांना आवरणेही युरोपच्या कायदा व राज्यकर्त्यांच्या आवाक्यातली गोष्ट नाही. त्यांना लिबीयाचा हुकूमशहा कर्नल गडाफ़ीचे शाप भोवत आहेत म्हणावे काय?

चार वर्षापुर्वी ट्युनीशिया व तहरीर चौकतील इजिप्शियन क्रांतीनंतर तेच अरब क्रांतीचे लोण लिबीयात पोहोचले. तेव्हा गडाफ़ीने ते चिरडण्याचा पवित्रा घेतला होता. पण तेव्हा मानवतेच्या युरोपियन पुरस्कर्त्यांनी गडाफ़ीला शह देण्यासाठी बंडखोरांना मदत केली. गडाफ़ीचा महाल व सैनिकी तळावर नाटोने हल्ले चढवून गडाफ़ीला पुरता नामोहरम करण्याची रणनिती राबवली होती. तेव्हाच गडाफ़ीने इशारा दिला होता. मला संपवून युरोप पन्नास लाख निर्वासितांना आमंत्रण देत आहे. याचा अर्थ अगदी स्पष्ट होता. ज्यांच्यावर मी पाशवी हुकूमतीने राज्य करतो आहे, त्यांना तुमच्या सभ्य नागरी जीवनाची सवय नाही आणि माझी सद्दी संपली, तर हे लोक तुमच्याच उरावर बसतील. असेच गडाफ़ीला म्हणायचे होते. युरोपियन राज्यकर्ते उदारहस्ते निर्वासितांना दरवाजे मोकळे करून गडाफ़ीचे शब्द खरे करीत आहेत. मात्र त्याचे परिणाम इतक्यात दिसणारे नाहीत. कारण जेव्हा इतक्या सहजतेने घुसता येते असे दिसेल, तेव्हा निर्वासित म्हणून अरबी प्रदेशातून युरोपात त्सुनामीसारख्या लाटा येतच रहाणार आहेत आणि मग बंदुकीच्या गोळ्याही त्या लोंढ्याला रोखू शकणार नाहीत. कारण मग बंदुकधारी युरोपियन पोलिस व लष्कराला आतले घरभेदी आणि बाहेरचे घुसखोर अशा दोन्ही बाजूने लढावे लागणार आहे.

यापासून घ्यायचा धडा सोपा साधा आहे. साधू भिक्षेकर्‍याचे रूप घेऊन येणारा मायावी रावण किंवा श्रीरामाचा आवाज काढून लक्ष्मणाला हाका मारणारा मायावी मारीच नुसत्याच भाकड वा पुराणकथा नसतात. त्यात काही बोध सांगितलेला असतो. ज्यांना घ्यायचा त्यांनी घ्यावा. नाहीतर प्रभूचा अवतर असून रामचंद्रालाही त्याच्या परिणामांपासून सुटका नसते. आपण तर सामान्य माणसे आहोत ना?

पूर्वप्रसिद्धी:  तरूण भारत (नागपूर) रविवार, १३ सप्टेंबर २०१५