बुधवार, १९ डिसेंबर, २०१२

चांगुलपणावर पोसलेले गुन्हेगारीचे बांडगुळ


   परवा दिल्लीत जी बलात्काराची मोठी भीषण घटना घडली, त्यासंदर्भात सध्या महिलाविषयक गुन्ह्यांची व्यापक चर्चा चालू आहे. त्यात भाग घेणारे व सभ्य मुखवट्यात अव्वाच्या सव्वा व्याख्यानबाजी करणारे तरी कितीसे सभ्य सुसंस्कृत आहेत? कसल्या त्या चर्चा होत्या आणि त्यात कसल्या गोष्टींचे संदर्भ दिले जात होते? एका चर्चेतील माहितीनुसार शंभर बलात्कार वा लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांपैकी फ़ार तर दहा तक्रारी होतात. म्हणजे नोंदल्या जातात, उरलेले नव्वद गुन्हे झाकले वा लपवले जातात. याचा अर्थ असा नाही, की त्या गुन्ह्यातले जे कोणी गुन्हेगार असतात, ते आपल्या मनातल्या अपराधी भावनेमुळे गुन्ह्याची लपवाछपवी करतात. त्यांची लपवाछपवी तर असतेच. पण अशा गुन्ह्याचे जे बळी असतात, ते बहुतांशी आपल्या अब्रू व सभ्यतेचे कवच सुरक्षित ठेवायला; त्या घटनांबद्दल गप्प बसतात किंवा कुठे वाच्यता करीत नाहीत. आणि जो कोणी त्यातला गुन्हेगार असतो, त्याच्याशी संबंधित लोकही ‘आपला’ म्हणून त्या गुन्ह्यावर पांघरुण घालत रहातात. याच लपवाछपवीने गुन्हेगारांना मोठे संरक्षण व प्रोत्साहन मिळत असते. त्यातून गुन्हेगारी इतकी सोकावत जाते, की असे सराईत गुन्हेगार मोठे प्रतिष्ठीत म्हणून ‘उजळमाथ्याने’ समाजात वावरत असतात. आणि त्याच्याही पुढे जाऊन उलट इतरांवर चिखलफ़ेक करण्याची मुजोरीसुद्धा करीत असतात. असे आरोप मी हवेत करत नाही. त्याचे एक सुप्रसिद्ध उदाहरण मी आज वाचकांसमोर पेश करणार आहे. म्हणजे त्यातल्या सराईत गुन्हेगाराचे व त्याच्या गुन्हेगारीवर पांघरूण घालून त्याला सोकावण्यात हातभार लावणार्‍या शेकडो इतर तथाकथित सुसंस्कृत सभ्य गृहस्थांचे चेहरे समोर आणणार आहे. पुढील एक जुन्या लेखातील उतारा वाचा मग अंदाज येईल.

   "वागळे स्वत:च एक मोठा फ़्रॉड आहे. षटकार प्रकाशनातल्या आपल्या भागिदारांना त्यांनी कसं फ़सवलं ते द्वारकानाथ संझगिरी, उमेश आठल्येकर आणि हेमंत देसाई यांना विचारा. आपल्या भागिदारांना फ़सवून ‘षटकार’च्या गठ्ठ्य़ांची चोरी कोण, कशी करत होतं; तो किस्सा धमाल आहे. कोर्टकचेरी आणि पोलिसात गेल्यानंतरच संझगिरी-आठल्येकर यांना त्यांचा कायदेशीर वाटा वागळेकडून वसूल करता आला."

   "वाद अंगावर ओढून घेण्यात वागळेंना मजा येते. त्यातला नितीमूल्यांसाठी झगडण्याचा आव धादांत खोटा असतो, हे सांगितलंच पाहिजे. सोनिया गांधी आणि आर. के. धवन यांचे संबंध असल्याचा मजकूर ‘महानगर’मधल्या राजीव गांधींच्या मृत्यूच्या बातमीतच होता. सहाजिकच कॉग्रेस कार्यकर्ते तेव्हा आले होते, ते काही हल्ला करण्यासाठी नाही. अत्यंत सभ्यपणे, ‘तुम्ही छापलं ते बरोबर नाही, अनुचित आहे’ असं ते सांगत होते. पण आपण लिहितो तेच बरोबर अशी हवा डोक्यात गेलेले वागळे त्यांना हाकलून मोकळे झाले. मग कॉग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आणि निदर्शने सुरू झाली. मला नीना कर्णिकांचा फ़ोन आला. ‘तू लगेच ये, निखिलला काही कळत नाही. तूच संभाळू शकशील.’ मी तेव्हा ‘महानगर’चा मुख्य वार्ताहर होतो. पांडुरंगशास्त्रीदादांचे शेकडो कार्यकर्ते असेच एकदा चिडून आले होते. तेव्हा त्यांना मीच सामोरा गेलो होतो. वागळेंची हिंमत सुद्धा झाली नव्हती. म्हणून मीना कर्णिकांनी मला बोलावलं असावं. मी त्या कॉग्रेस कार्यकर्त्यांना शांत केलं आणि चहा घेता घेता बोलू अशी विनंती केली. कार्यकर्ते शांत झाले. मग मात्र वागळेंनी पोलिस स्टेशनात जाऊन चक्क माफ़ी मागितली." (दै. सांज दिनांक, अबीर-गुलाल, दि.९ नोव्हेंबर १९९६)

   हा उतारा सध्याचे राजकीय नेते व आमदार कपील पाटिल यांच्या एका जुन्या लेखातला आहे. तेव्हा कपील पाटिलही अविष्कार स्वातंत्र्याचे एक खंदे लढवय्या होते आणि कफ़न डोक्याला बांधून आवेशात लिहित बोलत असत. त्यांचे एक ‘आज दिनांक’ नावाचे दैनिक बंद पडले. तेव्हा आपल्याला न जुमानता वागणार्‍या कपीलच्या अपयशावर चोची मारणारा लेख निखिलने ‘महानगर’मध्ये लिहिला होता. ‘एका सांजदैनिकाचा मृत्यू’ असे त्याचे शिर्षक होते. दिवाळखोरीमुळे ते कसे बंद पडले; त्याचे पोस्टमार्टेम निखिलने त्यातून केले होते. तेव्हा खवळलेल्या कपीलने (आजकालच्या भाषेत निखिलवर) पलटवार करायला नव्या ‘सांज दिनांक’ या सांजदैनिकात मुहतोड जबाब दिला होता. त्याचे शिर्षक होते, ‘ठाकरे आणि वागळे: एकाच नाण्य़ाच्या दोन बाजू’. त्यामधला हा उतारा आहे. त्या लेखाची सुरूवातच कपीलने मोठी मजेशीर केली होती. ‘निखिल वागळेंच्या तोंडाला तोंड लावणं म्हणजे स्वत:ला एड्स लावून घेणं. म्हणून वागळेंच्या तोंडाला कोणी लागत नाही असं म्हणतात.’ इथून कपीलच्या लेखाला सुरूवात झाली होती. असो. त्याचा तो इशारा कोणी फ़ारसा मानलेला दिसत नाही. अन्यथा आज कायबीइन लोकमत वाहिनीवर असे जाहिररित्या एड्स लावून घेण्याचे कार्यक्रम कशाला झाले असते? पण हा वरचा उतारा कपीलच्या त्या लेखातला आहे आणि आजच्या पुरता तेवढाच एड्स पुरेसा आहे. तेवढ्यापुरते आपण सत्य तपासून बघू.

   यात कपीलने काही घटना, मुद्दे आणि काही नावे दिलेली आहेत. जे निखिलच्या अपराधाने बळी आहेत, असा दावा केलेला आहे. त्यातले दोन चेहरे तुम्हाला बघून माहित आहेत. एबीपी माझा वाहिनीवर क्रिकेट व क्रिडा विषयाचे समिक्षक म्हणून दिसणारे द्वारकानाथ संझगिरी आणि निखिलच्याच बाजूला एड्सची भिती न बाळगता नित्यनेमाने दिसणारे हेमंत देसाई. त्यांचा उल्लेख कपीलने सोळा वर्षापुर्वी आपल्या ‘सांज दिनांक’ दैनिकातल्या उपरोक्त लेखात केलेला आहे. त्यांची निखि्लने फ़सवणूक केली आणि त्यासा्ठी पोलिस व कोर्टबाजी करूनच न्याय मिळवावा लागला; असा त्यात स्पष्टपणे उल्लेख आहे. आपल्याला व अन्य कित्येकांना फ़सवणार्‍या या फ़्रॉड निखिल वागळेबद्दल उपरोक्त दोघा मान्यवरांनी कधी जाहिरपणे वाच्यता केली आहे काय? आपल्या लेखातून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना ‘लाज असेल तर राजीनामा द्या’ असे आवाहन करणार्‍या हेमंत देसाई यांच्या लाजेचे काय? त्यांनी कधी कपील म्हणतो त्या फ़्रॉड प्रकरणात आपले थोबाड उघडले आहे काय? उलट निखिलच्या ‘सवालाची’ उत्तरे द्यायला हे गृहस्थ मिरवत येत असतात. विलासरावांना लाज असायला हवी, तर हेमट देसाईंना लाजबिज बाळगण्याची गरज वाटत नाही काय? मग त्यांनी आजवर कधी निखिलच्या फ़्रॉडबद्दल मौन कशाला पाळले आहे? त्याची वाच्यता कुठेच का केलेली नाही? कपील तर म्हणतो, की तो किस्सा खुपच धमाल आहे. मग देसाई गप्प कशाला? स्वत:ची वा आपल्या मित्रांची धडधडीत फ़सवणूक झाल्यावरही देसाई गप्प कशाला बसतात? अब्रूसाठी? कुणाच्या अब्रूसाठी? निखिलच्या खोट्या अब्रूसाठी का? गुन्हेगारांना पाठीशी कसे घातले जाते; त्याचे हे प्रतिष्ठीत उदाहरण आहे. आणि हेच असे भामटे वाहिन्यांवर बसून पिडीत मुली व तरूणींच्या कुटुंबियांनी अब्रूचे थोतांड न माजवता तक्रारी करायला पुढे आले पाहिजे अशी आवाहने करणार. पण प्रत्यक्षात मात्र आपल्या निकटवर्ती वा गोतावळ्यातल्या गुन्हेगाराला अब्रुदार बनवायला, त्याच्या गुन्ह्यांवर दाबून पांघरूण घालणार. आपण एका फ़्रॉड सोबत मांडीला मांडी लावून बसतो आणि जगाला पोकळ सुसंस्कृतपणा शिकवतो, याची देसाई महोदयांना कधी शरम वाटली आहे काय? नसेल तर त्यांचे शहाणे बुद्धीवादी बोल किती पोकळ असतील त्याची आपण कल्पना केलेली बरी.

   सांगायचा मुद्दा इतकाच, की निखिल आणि अन्य कोणी गुन्हेगार सारखेच असतात. त्यांची खरी ताकद तुमच्या आमच्या अब्रुदारपणात सामावलेली असते. त्यांच्या बेशरमपणात त्यांची खरी शक्ती असते. आणि त्यांच्या त्या बेशरमपणाला देसाईसारखे लोक खतपाणी घालत असतात. अन्य पत्रकार संघटना किंवा लेखक कलावंतांच्या संस्था; त्या गुन्हेगारीला प्रोत्साहन देत असतात. संझगिरी मात्र खरा सभ्य माणूस आहे. त्याला दुसर्‍यांच्या उखाळ्यापाखाळ्य़ा काढायच्या नसतात, म्हणून तो गप्प बसतो. पण त्यामुळेच निखिलसारखे बदमाश प्रतिष्ठीत व्हायला हातभार लागत असतो, हे विसरता कामा नये. आपण आज दिल्लीत बलात्कार झाले वा डोंबीवलीत कुणा रोडरोमियोने केलेल्या हल्ल्यात कुणाचा बळी गेल्यावर आक्रोश करतो, तेव्हा त्यांना कोणी पोसले वा प्रोत्साहन दिले, त्याकडे बघायचे विसरतो किंवा काणाडोळा करतो. मग असेच बदमाश शिरजोर होऊन उलट्या बोंबा मारू लागतात. बाळासाहेबांच्या निधनानंतर महिन्याभराने लिहिलेला निखिलचा ब्लॉग त्याचा अस्सल पुरावा आहे. त्याचा आणखी एक पुरावा म्हणजे त्याने निधनाच्या दुसर्‍या दिवशी ट्विटरवर ओकलेले गरळ होय. त्यातून बदमाश कसे शिरजोर होतात आणि गुन्हेगारी कशी प्रतिष्ठीत होते, त्याचीच प्रचिती येते. जेव्हा आपण असे बदमाश सहन करतो किंवा त्यांच्याकडे काणाडोळा करतो; तेव्हाच गुन्हेगारीला मोकाट रान मिळत असते. कारण गुन्हेगारी नेहमी चांगुलपणाच्या सभ्यतेवर पोसले जाणारे बांडगुळच असते. त्याचा आणखी एक सज्जड पुरावा उद्या तपासू या.    ( क्रमश:)
भाग   ( ३१ )  २०/१२/१२

1 टिप्पणी:

  1. Thanks for exposing very conceited perdon like Mr. Nikhil Wagle. On IBN Lokmat he always behaves as if he is very principled and value-abider.
    Let people know truth about him and also about Mr. Hemant Desai.

    उत्तर द्याहटवा