मंगळवार, १८ डिसेंबर, २०१२

‘वागळेच्या दुनिये’तील कसरती आणि मर्कटलिला



   खरे तर माझ्यावरच्या शिवसैनिकांच्या हल्ल्याबद्दल मी कधीच लिहिले नाही. त्याला आता ३८ वर्षे होऊन गेली. पण इतक्या वर्षात माझी भूमिका अजिबात बदललेली नाही. नंतरही अनेक वृत्तपत्रात होतो आणि बेधडक लिहित आलो. पण मला कोणाची भिती वाटली नाही. वाटायची गरजही नसते. पण दुसरीकडे ज्यांच्यावर हल्ले झाले आणि ज्यांनी शिवसेनेसकट इतरांवरही अविष्कार स्वातंत्र्याच्या गळचेपीचा आरोप केला; त्यांच्या बातम्या किंवा त्यांचे लेख तपासून बघा. बहुतेक वेळी असेच हल्ले दिसतील, की त्यातून जाणीवपुर्वक त्या व्यक्ती वा राजकीय पक्षाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न झालेला आहे. निखिल वागळे याने महानगर नावाचे वर्तमानपत्र काढून अशा बदनामीच्या मोहिमा व राजकीय विरोधाची सुपारीबाजी सुरू केली, तिथून हे हल्ले वाढलेले दिसतील. हा माझा आरोप नाही, तर निखिल सोबत महानगरच्या ‘धंद्यात’ सहभागी असलेल्या कपिल पाटिल या तात्कालीन सहकारी पत्रकाराची ती साक्ष आहे. त्यामुळे निखिलवर शिवसेनेचे हल्ले का व्हायचे; त्याचे सोपे उत्तर मिळू शकते. हा विषय मध्येच येण्याचे कारण म्हणजे निखिलचा ताजा ब्लॉग होय. त्यात निखिल लिहितो,......

‘कोण होते बाळासाहेब ठाकरे ? मराठी समाजाला भूरळ घालणारे लोकप्रिय नेते की भारतीय समाजात फूट पाडणारे हिंदुहृदयसम्राट? बाळासाहेब एक व्यंगचित्रकार होते की व्यंगचित्रातून बोलणारे राजकीय नेते? विरोधी विचारांची माध्यमं बंद पाडणारे ते हुकूमशहा होते का? ते बॉलिवूडचे गॉडफादर होते की खरेखुरे आश्रयदाते? अडल्या नडलेल्याला मदतीचा हात देणारे ते रॉबिनहूड होते की श्रीकृष्ण आयोगात म्हटल्याप्रमाणे सेनापती? बाळासाहेब ठाकरे दोस्तांचे दोस्त आणि दुष्मनांचेही दोस्तच होते का? 
असे असंख्य प्रश्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युनंतर विचारता येतील. माझ्या मते, बाळासाहेब ठाकरे नावाच्या एका व्यक्तिमत्त्वात अनेक परस्पर विरोधी रूपं दडलेली होती. प्रस्थापित राजकीय आणि सामाजिक नियमांच्या चौकटीत न बसणारा असा हा कलंदर नेता होता. स्वतःच्या शैलीत, स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या तंद्रीत आणि स्वतःच्या आवेगात त्यांनी राजकारण केलं. त्यातून महाराष्ट्राच्या गेल्या ५२ वर्षांच्या राजकारणातला ‘ठाकरे इफेक्ट’ उभा राहिला. या इफेक्टमुळे अनेक संसार उभे राहिले आणि काही उद्ध्वस्त झाले. एक अत्यंत वलयांकित आणि वादग्रस्त नेता असं बाळासाहेबांचं वर्णन करता येईल. माझ्या वाट्याला आलेले पहिले ठाकरे हिंसक होते. त्यांनी घटनेने मला दिलेला आविष्कार स्वातंत्र्याचा आणि जगण्याचा अधिकार नाकारला. १९७९ पासून आजपर्यंत पाच वेळा शिवसैनिकांनी माझ्यावर किंवा माझ्या कार्यालयावर जीवघेणे हल्ले केले. आधी ‘साप्ताहिक दिनांक’, मग ‘महानगर’ आणि २०१० साली ‘आयबीएन लोकमत’. या सर्व हल्ल्यांना माझ्या सहकार्‍यांनी जिद्दीने तोंड दिलं. ‘महानगर’च्या अंकावर बहिष्कार टाकण्याचा बाळासाहेबांनी दिलेला आदेश मुंबईतल्या मराठी जनतेनेच नाकारला. ठाकरेशाही पुढे आम्ही झुकणार नाही, हे माझ्या सहकार्‍यांनी दाखवून दिलं.’   

   निखिलच्या वाट्याला आलेले बाळासाहेब हिंसक होते असा त्याचा दावा आहे. आणि त्यासाठी त्याने दिलेला हवाला कुठला; तर त्याच्यावर झालेले हल्ले होत. नेमका हाच प्रश्न मला अनेक व्याख्यानात श्रोते पत्रकारांनीव विचारलेला आहे. पण माझ्या एका प्रतिप्रश्नाने त्या प्रत्येकाला निरूत्तर केलेले आहे. आणि आज मी इथे तोच प्रश्न वाचकांसमोरही विचारतो आहे. शिवसेनेचा निखिल वा अविष्कार स्वातंत्र्यावरचा हल्ला; हे तुम्ही अनेकदा बातम्यातून ऐकलेले थोतांड आहे, असे म्हटले मग आश्चर्य व्यक्त होणे स्वाभाविकच आहे. पण मी अशी शंका घेणार्‍या पत्रकार श्रोत्यांना विचारतो, की हल्ला या शब्दाचा अर्थ काय? ज्याच्यावर हल्ला होतो, त्याच्या जखमी अवस्थेतील एखादे तरी छायाचित्र तुम्ही कुठल्या बातमीत बघितले आहे काय? या प्रश्नावर हे शंका विचारणारे निरुत्तर होतात. कारण निखिल हा जगातला एकमेव असा माणूस व पत्रकार आहे, की त्याच्यावर शिवसैनिकांनी अनंत हल्ले चढवले; पण त्याला एकदाही जखमी करण्यात कोणाला यश मिळालेले नाही. बहुधा महाभारतातल्या कर्णानंतर कवचकुंडले जन्मजात मिळालेला इतिहासातील निखिल हा दुसराच महापुरूष असावा. कारण आजवर डझनावारी प्राणघातक हल्ल्यात त्याला एकही जखम होऊ शकलेली नाही. आणि ज्याला साधी जखमसुद्धा होत नाही, त्याच्यावर इतके हल्ले होतात; म्हणजे नेमके काय होते, याचे मला जबरदस्त कुतूहल आहे. बोलाची कढी आणि बोलाचा भात ना सगळा? पण मग हा तमाशा इतके दिवस का व कसा चालू शकला? 

   माझ्या वाट्याला आलेले पहिले ठाकरे हिंसक होते. त्यांनी घटनेने मला दिलेला आविष्कार स्वातंत्र्याचा आणि जगण्याचा अधिकार नाकारला. असे निखिल लिहितो. पण घटनेने निखिलला कुठलाही खास अधिकार दिलेला नाही. ज्यांनी ज्यांनी राज्यघटना वाचलेली आहे, त्यांना माहित आहे, की त्यात निखिल वागळेसाठी बाबासाहेबांनी कुठलीही खास तरतूद केलेली नाही. जी नागरी स्वातंत्र्ये आहेत, ती तमाम भारतीय नागरिकांसाठी आहेत. तेव्हा घटनेने मला दिलेले स्वातंत्र्य हा निखिलचा दावा तद्दन भंपकबाजी आहे. दुसरा दावा त्याला जगण्याचा अधिकार हिंसक ठाकरे यांनी नाकारला, ही आणखी एक मस्त लोणकढी थाप. कारण जगायचा अधिकार नाकारलेला माणूस हे लिहायला जिंवंत कसा? आणि ज्याने तो अधिकार नाकारल्याचा दावा करतो आहे, त्याच व्यक्तीच्या मृत्यूनंतर निखिल हा लेख लिहितो असाही निखिलचा दावा आहे. निखिलला जगायचा अधिकार नाकारल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्यावर बाळासाहेब हा लेख लिहित नसून; त्यांच्या मृत्यूनंतर निखिल हा लेख लिहितो आहे. म्हणजे तो अजून जिवंत नक्कीच आहे. मग जगायचा अधिकार ठाकरे यांनी नाकारला म्हणजे नेमके काय? हा माणूस तुमच्याआमच्या वास्तव जगत जगतो, की आपल्याच भ्रामक जगाच्या कल्पनाविश्वात जगतो, याचीच मला अनेकदा शंका येते. की याच्याच कल्पनाविश्वाची चोरी करून आर.के. लक्ष्मण या व्यंगचित्रकाराला ‘वागळे की दुनिया’ नावाची कथा सुचली? ज्याच्यावर पुढे गाजलेली दुरदर्शन मालिका तयार झाली व गाजली? वरच्या एका वाक्यात त्याने जे काही सांगायचा प्रयत्न केला आहे, ते कोणी कधी गंभीरपणे वाचतो काय याचीही शंका येते. 

   ज्याने जगायचा अधिकार नाकारला असा दावा आहे, त्याचीच मुलाखत घेतली व ती झकास रंगली; असाही निखिलचा दावा आहे. जणू मांजराने शिकार करून खाल्लेल्या उंदराचे आत्मकथन बालपणी बालसाहित्यात वाचले आणि त्यातून निखिल अजून बाहेरच पडलेला नाही, असे मानायचे काय? आणि तसे नसेल तर मग इतक्या अतर्क्य तर्कहीन गोष्टी तो इतक्या सहजपणे कशा सांगू शकतो? तर त्याचेही कारण समजून घेण्याची गरज आहे. निखिलची पत्रकारीता ही डाव्या चळवळीतली एक विकृती होती. आज जसा निखिल टीआरपीसाठी वाटेल तशा कोलांट्या उड्या मारतो; तशाच त्याने महानगर नावाचे दैनिक चालवताना मर्कटलिला केलेल्या होत्या. शिवसेनेचे हल्ले ओढवून आणणे; हा त्यातला व्यापारी हेतू होता. शिवसैनिक येऊन थोडी मोडतोड करतील, पण त्यातून मिळणारी अफ़ाट प्रसिद्धी व झोत यासाठीचे ते पद्धतशीर चालविलेले नाटक होते. त्याचाही एक वाचकवर्ग होता. शिवसेनेमुळे नामोहरम झालेल्या डाव्यांना शिवसेनेशी रस्त्यावर उतरून लढायची कुवत नव्हती, पण गलितगात्र चळवळीमध्ये खुमखुमी होती. लैंगिक चाळे असलेले चित्रपट गलितगात्र झालेले आंबटशौकीन म्हाराते जास्त बघतात, कारण ते सुख भोगायची कुवत उरलेली नसते. त्या विकृतांसाठीच असे चित्रपट काढले जातात; तसे महानगर हे थकलेल्या डाव्यांना गुदगुल्या करणारे वृत्तपत्र होते. शिवसेनेला डिवचून अंगावर घेतल्याचे समाधान डाव्यांना निखिल देऊ शकत होता आणि त्याने नेमका त्याचाच धंदा यशस्वी रितीने करून दाखवला. त्यातून त्याच्या मागे डाव्यांची पराभूत मानसिकता येऊन उभी राहिली. त्यातला लढाऊ बाणा हे निव्वळ ढोंग होते असा माझा आरोप नाही, निखिलचा त्यातला भागिदारच तसे सांगतो. कोण तो त्याचा भागिदार?      ( क्रमश:)  
भाग   ( ३० )    १९/१२/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा