सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३

धर्मश्रद्धा मोडून टाकली तरच दहशत निर्माण होते


   सोवियत युनियनच्या आक्रमणाविरुद्ध जिहाद पुकारणार्‍या मुजाहिदीनांना जे प्रशिक्षण देण्यात आले, ते नुसते युद्धाचे वा शस्त्रास्त्रांचे नव्हते. त्यांच्या लढण्याची प्रेरणा अत्यंत महत्वाची होती. कुठल्याही सेनेतील, फ़ौजेतील सैनिक आपल्या जीवावर उदार होऊन लढतो, तेव्हा आपण प्राण गमावणार आहोत हे त्यालाही पक्के ठाऊक असते. आपण जर या संघर्षात काही मिळवण्यापेक्षा गमावणारच आहोत, तर माणूस मरायला पुढे सरसावेलच कशाला? माणसाची सगळी धडपड जगण्यासाठी असते. त्याचा उत्साह काहीतरी मिळवण्यासाठी असतो. तोच माणूस तेच जीवन उधळायला कशाला तयार होईल? मग बलिदान वा शहिद होणे वगैरे भंपक कल्पना नाहीत काय? पण अनेकदा असे जीवावर उदार झालेले व मरणाला हसतमुखाने सामोरे जाणारे लोक आपण पहातो, तेव्हा आपण भारावून जातो किंवा थक्क होतो. आपण थक्क होतो, जेव्हा कोणी इतर बाबतीत निष्कारण स्वत:च्या मरणाला सामोरा जाताना बघतो. म्हणजे कोणी काही अतर्क्य करताना दिसतो आणि त्या धाडसात त्याचा बळी पडतो, तेव्हा आपण थक्क होतो. कारण आपल्याला तो काही प्रमाणात धाडसापेक्षा निव्वळ मुर्खपणा वाटत असतो. म्हणूनच त्याला वेडे धाडस असेही म्हटले जात असते. पण फ़िदायिन म्हणजे स्वत:च्या अंगालाच स्फ़ोटके गुंडाळुन त्याचाच स्फ़ोट करणारे अनेकजण आता आपण ऐकलेले आहेत. राजीव गांधींची हत्या करण्यासाठी तोच प्रकार वापरण्यात आला होता किंवा अफ़गाण वा इराकच्या युद्धात असे नित्यनेमाने घडत आलेले आहे. ही माणसे अशी स्वत:लाच मारायला कशाला प्रवृत्त होतात, ते कोडे आपल्याला उलगडत नाही, म्हणूनच आपल्याला त्यांचे वागणे अतर्क्य वाटत असते. कारण आपण सतत जीवाला जपुन पाऊल टाकत असतो. दुसरीकडे कुठल्याही फ़ौजेतील सैनिक असतात, तेही काही प्रमाणात तसेच धाडस करणरे असतात. पण ते अकारण थेट मृत्यू ओढवून आणत नाहीत. ते सावधपणे शत्रूचा खात्मा करण्यासाठी चढाई करीत असतात आणि त्यात त्यांचाही बळी पडण्याची शक्यता गृहीत धरून सावध जुगार खेळतात, असे म्हणता येईल. असे सैनिक मरायला उतावळे नसतात, जसे फ़िदायिन मरायला उतावळे असतात. फ़िदायिन मरायच्या तयारीनेच पुढे सरसावत असतात. तसे सैनिकाचे नसते. तर सैनिक देश, समाज वा मातृभूमी असे कुणाचे संरक्षण करण्याच्या उदात्त हेतूने मृत्य़ूचा धोका पत्करणारे असतात. पण लढायला सज्ज असले तरी मरायला उतावळे नसतात. त्यांनाही जगायची इच्छा असते. पण कर्तव्य म्हणुन ते मृत्यूशी झुंज घ्यायला तयार असतात. हा सैनिक व फ़िदायिन यातला फ़रक असतो.

   पण दोन्हीकडे एक मुद्दा समान दिसेल, त्यांना म्रुत्यूचे भय रोखू शकत नसते. आपल्या शौर्य व कुठल्यातरी उदात्त हेतूसाठी बलीदान ही दोघांची प्रेरणा समान असते. आणि तीच प्रेरणा लढण्यासाठी अत्यंत निर्णायक असते. दोन देशाचे सैनिक लढाईत आमनेसामने असतात, तेव्हा त्याच्यात कुठे व्यक्तीगत वैर नसते. तर दोघांचे भांडण वा संघर्ष तत्वांचा व हेतूचा असतो. एकाला आक्रमक हटवायचा असतो तर दुसर्‍याला आक्रमण टिकवायचे असते. पण दोघेही  त्याला उदात्त वाटलेल्या हेतूसाठी आत्मबलिदानाला सिद्ध झालेले असतात. ती त्यांच्या जीवन उधळून टाकण्यामागची प्रेरणा असते. पण अफ़गाणिस्तान ह्या देशावर झालेले सोवियत आक्रमण ह्टवण्यासाठी पाकिस्तानी, सौदी वा मलेशियन, येमेनी मुस्लिमाने येऊन का लढावे? अफ़गाण ही काही त्याची जन्मभूमी, मातृभूमी नाही. त्याच्याकडे त्या देशाचे नागरिकत्वही नाही. मग अफ़गाण मुक्तीसाठी व ती भूमी बळकावणार्‍या सोवियत सेनेशी जगातल्या अन्य मुस्लिमाने कशासाठी लढायचे होते? अफ़गाणांनी लढावे हे ठिक होते. आणि म्हणूनच या जगभरच्या अन्य देशातील मुस्लिम तरुणांना अफ़गाणी जिहादसाठी तयार करताना निव्वळ शस्त्रास्त्रे देऊन भागणार नव्हते. त्यासाठी त्यांना जीव ओवाळून टाकण्यासाठी प्रेरणा देणे आवश्यक होते. ती प्रेरणा खुप महत्वाची होती. ती राष्ट्रवादी किंवा मातृभूमीच्या मुक्तीची नव्हती. ती प्रेरणा अफ़गाण बंडखोरांसाठी पुरेशी होती. पण जे बाहेरचे मुस्लिम तरूण त्यासाठी आले; त्यांना प्रशिक्षण देताना जो कुठला उदात्त हेतू समजावण्यात आला; तीच आधुनिक जिहादची खरी प्रेरणा आहे. त्यामुळेच मग सोवियत सेना माघारी जाऊनही जिहाद संपू शकलेला नाही. तो अफ़गाण भूमी सोवियत फ़ौजेच्या हातून मुक्त झाल्यावर अन्यत्र धुमाकुळ घालू लागला. आणि म्हणूनच सोवियत आक्रमणाला तोंड देणारी वा परतून लावणारी लढायची प्रेरणा समजून घ्यावीच लागेल. तरच मग श्रीनगरमध्ये वा भारतात अन्यत्र होणार्‍या हिंसाचाराचा उलगडा होऊ शकतो किंवा भारताच्या दुसर्‍या टोकाला जन्मलेला कोणी मुस्लिम तरूण पाकिस्तानी हेरसंस्था आयएसआय किंवा तिथल्या तोयबा, मुजाहिदीन संघटनांसाठी आपल्याच स्वकियांच्या विरोधात घातपाताला कशामुळे प्रवृत्त होतो; त्याचा अंदाज येऊ शकेल. आणि त्याचे तत्वज्ञान, त्याची प्रेरणा जिहादमध्ये सामावलेली आहे, जी व्याख्या पाकचे निवृत्त ब्रिगेडीयर एस. के मलिक यांनी मांडलेली आहे. युद्धाची त्यांनी पवित्र कुराणाच्या आधारावर मांडलेली संकल्पनाच आज जगभरच्या जिहादची मूळ प्रेरणा आहे. आणि तिच्याच शिकवणीतून अफ़गाण जिहाद व पुढे तालिबानी मानसिकता उदयास आलेली आहे. ते काय म्हणतात?

      ‘दहशत माजवा, पण दहशतीखाली दबू नका. जिहादी युद्धाची व्याप्ती अखेरीस मानवी हृदय, मन, आत्मा व श्रद्धा यांच्यापुरती असते. जर शत्रूची श्रद्धा ढासळून टाकली, तरच त्याच्या काळजात धडकी भरवता येते. म्हणजेच त्याला दहशतीच्या प्रभावाखाली आणता येतो. म्हणूनच अंतिमत: शत्रूची धर्मश्रद्धा डळमळीत करण्यालाच सर्वाधिक महत्व असते.’ 

   दहशत माजवायची असते, पण दहशतीखाली प्रभावित व्हायचे नसते. मलिक यांचे एक एक वाक्य काळजीपुर्वक वाचून समजून घेण्याची गरज आहे. कारण त्यांनी नुसताच दहशत माजवायचा मार्ग सुचवलेला नाही; तर दहशतीवर मात करण्याचाही मार्गही स्पष्टपणे सांगितलेला आहे. दहशत माजवणार्‍याने स्वत: मात्र दहशतीखाली येऊन चालणार नाही. आणि अशी ही दहशत कशी व कुठे निर्माण होऊ शकते? दहशत मानसिक असू शकत नाही आणि तशी दहशत निर्माण केली तरी ती फ़ारकाळ प्रभाव पाडू शकत नाही. काही काळाने अशी मानसिक दहशत ओसरू लागते. म्हणूनच दहशत ही काळजात भरवली पाहिजे. आणि ती काळजात कशी भरवता येते? तर आत्म्याची जी भक्कम श्रद्धा असते, ती सैल व निकामी झालेली असेल तरच काळजात दहशत माजवता येत असते. ही श्रद्धा काय भानगड आहे? ती श्रद्धा म्हणजे तुमची जी असेल ती धर्मश्रद्धा होय. ती पक्की असेल तर मग कितीही हल्ले व अत्याचार दहशत माजवू शकत नाहीत. असेही मलिक म्हणतात. म्हणजेच त्यांच्या शिकवणीचा मूळ गाभा काय आहे? दहशतीच्या युद्धात धर्मश्रद्धेला हत्यार व युद्धसाधनापेक्षा अधिक महत्व आहे. हत्यारे, स्फ़ोटके ही धर्मश्रद्धेचा भेद करू शकत नाहीत; असेच त्यांना सांगायचे नाही काय? ज्याची धर्मश्रद्धा पक्की व भक्कम असेल; त्याला दहशत म्हणजे हत्यारातून होणारी हिंसा भयभीत करू शकत नाही. आणि जिहादमध्ये सोवियत फ़ौजेचा पराभव नेमका तिथेच झालेला होता. त्यांना अफ़गाण भूमीवर राज्य करायचे होते, सत्ता राबवायची होती. पण कम्युनिस्ट फ़ौजेला धर्म नव्हता आणि युद्ध कधीतरी संपवून त्यांना आपली अधिसत्ता तिथे प्रस्थापित करायची होती. उलट जिहादी लढवय्यांची कहाणी होती. त्यांना विजय पराजयाशी कर्तव्यच नव्हते. अफ़गाणिस्तानवर सत्ता प्रस्थापित करणे असा कुठला हेतू जिहादींचा नव्हता. त्यांना आपल्या धर्माच्या अनुयायांची भूमी मोकळी, म्हणजे सोवियत फ़ौजेच्या कब्जातून मोकळी करायची होती. मुस्लिमेतर सेनेच्या कब्जातून इस्लामी भूमी मुक्त करायची होती.

   म्हणजेच जे योद्धे जिहादसाठी अमेरिकेच्या पैशावर तयार केले, ते सोवियत फ़ौजेच्या पराभवासाठी व गनिमी युद्धासाठी तयार होत आहेत; अशी अमेरिकेची समजूत होती. पण त्यांना जिहादी प्रशिक्षण देणार्‍या पाकिस्तानी सेनाधिकार्‍यांनी मात्र त्यातून जिहादी जन्माला घातले होते. त्यांना इस्लाम धर्माच्या विजय व दिग्विजयासाठी घडवलेले होते. सोवियत फ़ौज वा त्यांच्या पाडावासाठी पैसा ओतणार्‍या अमेरिकेसाठी ते फ़क्त अफ़गाण युद्ध होते. पण पाकिस्तानात प्रशिक्षित होणार्‍या जिहादींसाठी ती धर्माच्या जागतिक दिग्विजय मोहिमेसाठीची तयारी होती. म्हणूनच सोवियत फ़ौज मागे घेऊन जिहाद संपला नाही, की अमेरिकाही त्यातून सुटली नाही. उर्वरित जगाचीही त्यातून सुटका झाली नाही. मुस्लिम वा सेक्युलर विचारवंत अथवा भारतातील बावळट हिंदूत्ववादी काय बकवास करतात, त्याला काडीचा अर्थ नाही. इतकी ही बाब गुंतागुंतीची आहे. म्हणूनच आपण भारतीय वा अन्य अनेक देश त्या अफ़गाण जिहादचे दुष्परिणाम भोगत आहोत. त्यावरचे चुकीचे उपाय सोवियत फ़ौजेला वाचवू शकले नाहीत किंवा अमेरिकनांना दहा वर्षात त्या जिहादवर मात करता आलेली नाही. मग कायदा सुव्यवस्थेचा विषय म्हणून भारतात चाललेला मुर्खपणा आपल्याला कुठली सुरक्षितता देऊ शकतो? कारण मलिक सांगतात तोच उपाय आहे, पण तिकडे वळून बघायलाही आपल्याकडे कोणी तयार नाही. कुठला आहे तो उपाय?    ( क्रमश:)
 भाग   ( ९७ )    २६/२/१३

२ टिप्पण्या:

  1. कुठला आहे तो उपाय?
    भाऊ, हो सांगा व तो कसा राबवायचा ते ही सांगा. निदान आम्हाला परिस्थितीचे भान नव्हते, काय करायचे याची मानसिकता नव्हती असे आपल्याला वाटणार नाही. जोवर राजसत्तेला जाग येत नाही तोवर वाट पहाणे गरजेचे आहे पण ती बदलली किंवा त्यांच्या विचारसरणीत बदल घडवायची संधी असेल तर पुढे नक्की काय करायला हवे याचे इंगित समजेल.

    उत्तर द्याहटवा
  2. हे फिदायीन धर्मभोळे, अशिक्षित आहेत - त्यांची प्रेरणा काय हे समजले तर शिक्षित माणूस कदाचित हसेल, पण हीच प्रेरणा त्यांना जीवावर उदार होऊन जगात दु:ख पसरवायला मदत करते. कुराणातील आश्वासनाप्रमाणे जो इस्लामसाठी मरेल तो कयामत (प्रलय, जग नष्ट होण्याचा दिवस)च्या दिवशी कबरीतून उठून (इस्लामप्रमाणे देह म्हणजेच व्यक्ती असते. मेला तरी तो कबरीत पडून रहातो - आणि कयामतच्या दिवशी अल् लाह च्या इच्छेप्रमाणे बक्षीस / शिक्षा भोगायला उठतो) जन्नत (स्वर्ग) मध्ये जाईल - आणि केवळ त्याच्या सेवेसाठी, त्याला हवे ते करतील अशा सर्वात सुंदर ६४ कुमारिका (हूर) अशा प्रत्येकाला मिळतील. आपले जग कितीही शहाण्या - शिक्षित लोकांनी भरलेले असले तरी आपण या लोकांसमोर मूर्ख आहोत. कारण आपण अतिरेक्यांच्या मृतदेहांचे त्यांच्या धार्मिक विश्वासांप्रमाणे दफन करतो. शत्रू चा अभ्यास करून त्याच्यावर डावपेचांनी मात करावी लागते. भारतात मृतावस्थेत हाती लागलेल्या अतिरेक्यांचे देह डुकराच्या कातडीत शिवून जाळून टाकले जातात अशी बातमी फिदायीन शिबिरांत पसरली - तर बहुसंख्य अतिरेकी भारतात यायला तयार होणार नाहीत. आलेच तर मारले जाणार नाही याची काळजी घेतील. कारण देह संपला की त्यांचे अस्तित्व संपलेले असेल. त्यामुळे कयामतच्या दिवशी जन्नतमध्ये जायला ते शिल्लक असणार नाहीत - आणि ६४ सुंदर कुमारिकांच्या प्राप्तीचे स्वप्न संपून जाईल.

    उत्तर द्याहटवा