रविवार, २७ जानेवारी, २०१३

भगव्या दहशतवादाचा निव्वळ बागुलबुवा


    सुशिलकुमार शिंदे खरे बोलले असतील तर पाकिस्तानने उगाच आरोप अंगावर घेतला म्हणायचा का? संयुक्त राष्ट्रसंघाचा प्रस्ताव पण खोटा आहे का? तो प्रस्ताव काय म्हणतो? ‘लष्करे तोयबाचा अन्य सघटनांशी संबंध ठेवणारा प्रमुख संपर्काधिकारी कस्मानी आरिफ़ याने फ़ेब्रुवारी २००७ मध्ये भारतातील पानिपत येथे झालेल्या समझोता एक्सप्रेसच्या बॉम्बस्फ़ोटात महत्वाची भूमिका बजावली. त्याला व अलकायदाला निधी उभारणीसाठी दाऊद इब्राहिमने मदत केली. अन्यत्र आपल्या कृत्याला सहाय्य देण्य़ाच्या बदल्यात अलकायदाने तोयबाला समझौता स्फ़ोटात मदत केली.’ (प्रस्ताव क्रमांक १२६७) हा प्रस्ताव राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने २९ जुन २००९ रोजी संमत केलेला आहे. दोनच दिवसांनी १ जुलै २००९ रोजी आरिफ़सह अन्य तीन पाकिस्तान्यांची नावे घेऊन अमेरिकेच्या अर्थखात्याने (आदेश क्रमांक १३२२४ अन्वये) त्या चौघांनाही दहशतवादी म्हणून घो्षित केले होते. तरी पाकिस्तानने त्याची कबुली द्यायचे नाकारले होते. पुढे सहा महिन्यांनी पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी २४ जानेवारी २०१० रोजी कोड्यात टाकणारे विधान करत त्याची कबुली दिली. ज्यांना अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केले त्या पाकिस्तान्यांचा समझौता स्फ़ोटात हात असल्याचे मान्य केले. पण तसे कस्मानी वगैरेंनी स्वेच्छेने केले नाही. त्यांना कर्नल पुरोहीतने भाडोत्री हल्लेखोर म्हणून सुपारी दिली असा रेहमान यांचा दावा होता.

   मग मालेगाव प्रकरणी पकडण्यात आलेल्या कर्नल पुरोहित व साध्वी प्रज्ञा सिंग यांचा समझौता स्फ़ोटाशी संबंध कसा जोडण्यात आला? तर १४ नोव्हेंबर २००८ रोजी महाराष्ट्र एटीएसने मालेगाव आरोपीच्या विरोधात कोर्टामध्ये नवेच निवेदन सादर केले आणि त्यांचा समझौता स्फ़ोटाशी संबंध जोडला. समझौता स्फ़ोटासाठी कर्नल पुरोहित यांनीच आरडीएक्स पुरवले, असे ते एटीएसचे निवेदन होते. पण हे निवेदन किती खरे मानायचे? कारण तोपर्यंत समझौता तपास पुर्ण झाला होता आणि त्यात पकडलेल्या आरोपींनी गुन्हा मान्यही केला होता. त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे समझौता स्फ़ोटासाठी आरडीएक्सचा वापरच झालेला नव्हता. मग महाराष्ट्र एटीएसने (ज्याचे प्रमुख तेव्हा हेमंत करकरे होते) त्या स्फ़ोटासाठी आरडीएक्स पुरोहितने पुरवल्याचा शोध कुठून लावला? कारण ज्या दिवशी समझौता स्फ़ोट झाला, त्याच्या दुसर्‍याच दिवशी तेव्हाचे मराठी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटिल यांनी त्या स्फ़ोटासाठी आरडीएक्सचा वापर झालेला नाही, अशी ग्वाही दिलेली होती. पुढे हरयाणा पोलिसांनी केलेल्या तपासात त्या स्फ़ोटासाठी पोटॅशियम क्लोरेट वापरण्यात आल्याचे सिद्ध झाले होते आणि तसा दावा कोणा मंत्र्याने नव्हे तर फ़ोरेन्सिक प्रयोगशाळेने केला होता, ज्यांना त्या विषयातले जाणकार मानले जाते. पुढे २० जानेवारी २००९ रोजी महाराष्ट्र एटीएसने अधिकृतरित्या समझौता स्फ़ोटासाठी पुरोहितने आरडीएक्स पुरवले नसल्याचे कोर्टात मान्य केले. म्हणजेच राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या झाला. पण जसजसा तपास पुढे सरकत गेला, तसतसा मुळात राईच नाही असे उघडकीस आले. पण नवे गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे मात्र आभासातल्या पर्वतावर स्वार झालेले आहेत आणि तिथून उतरायलाच तयार नाहीत. ते एकटेही नाहीत. त्यांच्यासह तमाम सेक्युलर अर्धवटरावही त्याच राईच्या पर्वतावर आरुढ होऊन भगव्या दहशतवादाच्या नावाने आरोळ्या ठोकत आहेत. जो पर्वत सोडा जिथे राईसुद्धा अस्तित्वात नाही. 

   जयपूरमध्ये शिंदे यांनी जे राणा भीमदेवी थाटातले भाषण केले; त्यातही त्यांनी पुन्हा समझौता स्फ़ोटाचा दाखला दिलेला आहे. तो कसा धडधडीत खोटा आहे, त्याचे हे पुरावे आहेत. पण त्याचा उपयोग काय? ज्यांना पुराव्याच्या आधारे गुन्हा किंवा निरपराधीत्व सिद्ध करायचे असते त्यांच्यासाठी पुरावे कामाचे असतात. ज्यांनी आपल्या संशयिताला आधीच दोषी मानलेले असते, त्यांच्यासाठी पुरावे समोर असून उपयोग कुठला? या बाबतीत आपल्या देशातील सेक्युलर नेते, माध्यमे व विचारवंतांमध्ये एक कमालीचे साम्य आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्याचे शेकडो पुरावे भारताने आजवर पाकिस्तानला दिलेले आहेत. पण त्यांनी एकतरी पुरावा मानला आहे काय? उलट तोंडाने पाकिस्तान म्हणत असतो, पुरावा तर द्या; हफ़िज़ सईदच्या विरोधात. आता इथे वर दिलेली माहिती ही अमेरिका, राष्ट्रसंघ, भारत सरकार, महाराष्ट्र पोलिस, व तात्कालीन वृत्तपत्रात आलेली आहे, बघणार्‍यासाठी उपलब्ध आहे. पण घट्ट डोळे मिटुन बसलेल्यांना दाखवायचे कसे आणि कोणी?

   नसलेले काल्पनिक पुरावे निर्माण करायचे आणि त्याचा गवगवा करायचा. त्याच्या अतिरंजित बातम्या रंगवायच्या. मग ते पुरावे कोर्टात वा प्रयोगशाळेत खोटे पडले; तरी जुन्या खोट्या बातम्यांचा आधार घेऊन तेच तेच खोटे आरोप करतच रहायचे; ह्याला हल्ली सेक्युलर बुद्धीवाद व युक्तीवाद समजले जाते आहे. आणि खोटे पुरावे कसे निर्माण करतात वा करावेत त्याचा पाठ शरद पवारांनी घालून दिलेलाच आहे. मुंबईत १९९३ सालात झालेल्या स्फ़ोटात पाकिस्तान व मुस्लिमांकडे संशयाचा रोख जाऊ नये म्हणून त्यांनी एअर इंडीयाच्या इमारतीमध्ये झालेल्या स्फ़ोटात दक्षिणेकडुन आलेली स्फ़ोटके असावीत असे खोटेच सांगुन टाकले होते. त्यातून मुजाहिदीन वा तोयबाऐवजी तामिळी वाघ मुंबई स्फ़ोटातले आरोपी असावेत; असा खोटाच संशय लोकांच्या मनात भरवण्याचा आपण प्रयत्न केला, अशी कबुली पवारांनी इंडीयन एक्सप्रेसचे संपादक शेखर गुप्ता यांना कॅमेरासमोर दिलेली आहेच. त्यांच्या वृत्तपत्रात तशी बातमीही त्यांनी छापलेली होतीच. तेव्हा शिंदे आज जो अहवाल सांगत आहेत व मालेगावपासून अन्य कुठल्याही स्फ़ोटामध्ये पुरोहित वा साध्वी यांच्या विरोधातले किंवा अन्य कुणा हिंदू दहशतवाद्याच्या विरोधातले ‘सज्जड व भक्कम’ पुरावे; सापडतात कुठे व असतात कुठे त्याचा पत्ता मिळाला? हे सगळे पुरावे काल्पनिक असतात व सेक्युलर सुपीक डोक्यातून निघालेले असतात. त्यामुळेच ते खर्‍याखुर्‍या न्यायालयात आणता येत नाहीत किंवा सिद्ध करता येत नाहीत. म्हणूनच कर्नल पुरोहितने समझौता स्फ़ोटासाठी आरडीएक्स पुरवल्याचा आरोप व पुरावा न्यायालयात तोंडावर आदळला तेव्हा माघार घेण्यात आली होती. तसा पुरावा नसल्याची एटीएसने कबूली दिली होती. पवारांनीही आपल्या खोटेपणाची स्वत:च कबुली दिलेली आहे. 

   पण सुशिलकुमार किंवा कॉग्रेसवाल्यांची अवस्था ‘थोर’ विचारवंत कुमार केतकर म्हणतात तशी असते. ‘सत्तातुराणां न भयं न लज्जा’. जे लोक सत्तेसाठी लंपट व हपापलेले असतात. त्यांना कसलीच लाज नसते, की फ़िकीर नसते. त्यामुळे ते खोटे बोलू शकतात व सतत खोटे बोलत राहू शकतात. किंबहूना आता सेक्युलर म्हणवणार्‍यांचे तेच व्यवच्छेदक लक्षण बनत चालले आहेत. त्यांना खोटे बोलल्याची लाज उरलेली नाही, की खोटे पकडले गेल्याची शरम वाटेनाशी झाली आहे. उलट खोटे कुठे दिसले, की मिटक्या मारीत ते त्यावर ताव मारताना दिसतात. त्यामुळेच अशा वखवखलेल्यांसाठी शिंदे यांनी जयपुरात पंगत वाढली आणि तमाम सेक्युलर त्यावर तुटून पडले. सोकावलेल्या बिबट्याला गावात धुमाकळ घालू लागला, मग पकडायला सापळा लावावा आणि त्यात तो सापडावा, तशीच सेक्युलर शहाण्यांची आज अवस्था झाली आहे. त्या सापळ्य़ात एका बाजूला शेळी बांधतात व अर्ध्या भागात सापळा असतो. कुठूनही शेळीपर्यंत पोहोचण्याचा हव्यासात उतावळा झालेला बिबट्या शेवटी सापळ्याच्या बाजू्ने पिंजर्‍यात शिरतो आणि जेरबंद होतो. तशीच अवस्था आता भगव्या दहशतवादाच्या सापळ्यात अडकलेल्या सेक्युलरांची होऊन गेली आहे. कारण हे तमाम मुर्ख शिंदे नावाच्या शेळीच्या मागे धावले आणि खोट्या पिंजर्‍यात आयते येऊन अडकले आहेत, दिवसेदिवस त्यांचे हे नाटक लांडगा आलारे आला सारखे होत चालले असून त्यातून सामान्य नागरिकांचा जो भ्रमनिरास होत आहे; तो त्याला मतदार म्हणून नरेंद्र मोदींकडे घेऊन जाणार आहे. जातो आहे. गुरूवारी एबीई व हेड्लाईन्स टुडे नावाच्या वाहिन्यांनी मतदाराचा कल घेऊन प्रेक्षकांना सादर केला. त्यात कॉग्रेसची, पंतप्रधा्नांची लोकप्रियता रसातळाला गेल्याचे स्पष्ट दिसते आहे. दुसरीकडे मोदींची लोकप्रियता वाढताना दिसते आहे. खरे तर ती मोदींची लोकप्रियता असण्यापेक्षा कॉग्रेस व सेक्युलर नाटकाला कंटाळलेल्या लोकांची प्रक्षुब्ध प्रतिक्रिया आहे. निकामी, खोटारड्या व घातक सेक्युलर सत्तेपेक्षा खमक्या व धाडसी नेत्याच्या शोधात लोक आहेत. आणि जितका सेक्युलर खोटेपणा वाढत जाणार आहे; तितका अधिक लोकसमुदाय पक्ष वा विचार नव्हेतर धाडसी व खंबीर नेत्याकडे आकर्षित होणार आहे. मोदींना वाढता पाठींबा प्रत्यक्षात सेक्युलर थोतांडाला झिडकारण्याकडला वाढता कौल आहे. पण ते खोट्या भ्रामक जगात जगणार्‍यांना सांगायचे कोणी व दाखवायचे कोणी?    ( क्रमश:)
 भाग   ( ६८)    २८/१/१३

४ टिप्पण्या:

  1. श्री भाऊ तोरसेकरजी, आपला लेख अप्रतिम आहे. प्रत्येक भारतीयाला हे वास्तव माहित होणे गरजेचे आहे. यामुळे भगव्या दहशतवादातील हवाच निघून जाईल व सरकार आणि निधर्मी (अधर्मी) प्रसार माध्यमांचे पितळ उघडे पडेल. आपल्याला विनंती करते की, आपण या लेखाचे इंग्रजीत भाषांतर करून ते सोशल मिडिया वर प्रकाशित करावे.

    धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  2. भगवा दहशतवाद हि एक खोडसाळ आणि असत्य कल्पना आहे. फक्त मुसलमानांना दोष देवू नका, हिंदू सुद्धा दहशतवादी आहेत हे सिद्ध करण्याची कोन्ग्रेस आणि त्यांचे सेक्युलर बगलबच्चे ह्यांचे भयंकर षड्यंत्र आहे. हिंदुनी आजवर फक्त उत्तर देण्याचे आणि प्रतिकार व स्वसंरक्षण करण्याचे काम केले आहे. आणि हा काही गुन्हा होऊ शकत नाही. त्यांनी दंगली करायच्या, घरे जाळ्याची, बोब्मस्फोट करून मालमत्ता-जीवित हानी करायची, माणसे मारायची आणि दुसऱ्यांनी काय फक्त तोंडे पहायची? सहनशक्तीला काही मर्यादा असतात. हिंदू जर धर्मवेडे दहशतवादी असते तर खरच हि वेळ आली असती का?

    उत्तर द्याहटवा
  3. भारततिल हिंदू दहशतवादी असू शकत नाही आणि भगवा दहशतवाद ही टर्म काॅईन करुन देशाचे खूप नुकसान

    उत्तर द्याहटवा