रविवार, १८ नोव्हेंबर, २०१२

इतिहाससुद्धा थबकला त्यांच्यासमोर




   कधीकधी इतिहास देखील थांबतो. अचंबित होऊन थबकतो. जगाच्या रहाटगाडग्यामध्ये एखादे व्यक्तीमत्व असे त्याच्या समोर येऊन उभे ठाकते, की इतिहासालाही वाटते याच्याकडून स्वत:ला घडवून घ्यावे. शनिवार रविवारी महाराष्ट्राने व मुंबईने तोच अनुभव घेतला. मुंबईत इतिहास घडत होता. शिवसेनाप्रमुख म्हणून गेली शेहेचाळिस वर्षे मुंबईसह देशाच्या राजकारणावर आपली छाप पाडणारा वाघ इहलोकीचा निरोप घेत होता. तशी घटना धक्कादायक नव्हती, की अनेपेक्षितही नव्हती. पण ती घडू नये अशीच सर्वांची अपेक्षा होती. किंबहूना लोकांच्या मनात पाल चुकचुकलेली होती, म्हणून तर ऐन दिवाळी चालू असताना बाळासाहेबांची प्रकृती बिघडली; तर घरातल्या सणसुदीकडे पाठ फ़िरवून हजारो लोक बुधवारी मातोश्रीकडे वळले होते. दिवसरात्र तिथेच ठाण मांडून बसले होते. पण अखेरीस व्हायचे तेच झाले. कदाचित त्याची पुर्वकल्पना स्वत: बाळासाहेबांना आलेली होती. म्हणून की काय, त्यांनी तीनच आठवड्यापुर्वी झालेल्या दसरा मेळाव्याला केलेल्या भाषणात निर्वाणीची भाषा वापरली होती. हा माणूस किती बेधडक होता, त्याची तीच मोठी साक्ष आहे. त्या चित्रित भाषणात त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या व अनेक शब्दही वापरले. पण मी शेवटचा जय महाराष्ट्र म्हणतोय; एवढेच ते बोलले नाहीत. पण भाषणाचा सुर व ओथंबलेल्या भावना पाहिल्या, तर त्यांचा तोच रोख नेमका होता. आपण आपल्या लाडक्या शिवसैनिकांना शेवटचा संदेश देतो आहोत; हे त्यांना पक्के ठाऊक होते. कदाचित म्हणून त्यांनी तब्येत खुपच खालावली असताना शिवाजी पार्कला जाण्याचा हट्ट चालविला होता. केवळ डॉक्टर अडवून बसले, म्हणून त्यांना तिकडे फ़िरकता आले नाही. अन्यथा तो जिद्दी माणूस तिथे येऊन पोहोचला असता. समोरच्या गर्दीला बघून त्याला स्फ़ुरण चढले असते आणि पुढे काय झाले असते ते सांगता येत नाही.

   कारण स्पष्टच आहे, गर्दी हे बाळासाहेबांसाठी टॉनिक होते. त्यांनी कधी तयारी करून भाषण केले नाही, किंवा मुद्दे ठरवून गर्दीसमोर ते बोलले नाहीत. गर्दीच त्यांना प्रेरणा द्यायची आणि विषय सुद्धा पुरवायची. गर्दीला नेमके काय हवे आणि गर्दीच्या मनात नेमके काय आहे, ते त्यांना कळत होते. मजेची गोष्ट म्हणजे, त्या गर्दीलाही त्यांचे म्हणणे नेमके कळत असे. परवा दसर्‍याच्या मे्ळाव्याला येऊ शकत नाही म्हणून त्यांनी जे चित्रित भाषण केले होते, त्यातल्या शब्द व मुद्दे यावर बरेच भाष्य़ झालेले आहे. ते भष्य व चर्चा करणार्‍यांना त्यातले सार कळले नाही, ते समोरच्या गर्दीला कळले होते. म्हणूनच विद्वान त्या भाषणाचे अर्थ लावत असताना ते शब्द ऐकणारा सामान्य शिवसैनिक मात्र रडू लागला होता. त्यांच्यावर प्रेम करणार्‍या प्रत्येकजणाच्या डोळ्याता अश्रू उभे राहिले होते. कारण साहेब काय बोलले, त्यापेक्षा आता यानंतर साहेबांचे भाषण ऐकायला मिळणार नाही, हे त्यांच्या चहात्यांना कळले होते. हेच आपले शेवटचे भाषण समजा, असा संकेत त्यात होता आणि त्याचा सुगावा लागलेल्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. ‘इतकी वर्षे तुम्ही मला संभळून घेतलेत आणि मी तुम्हाला संभाळले. आता तुम्ही उद्धव आणि आदित्यला संभाळा’, या वाक्यात त्या भाषणातले सगळे सार होते. तुम्ही संभाळा म्हणजे? स्वत: साहेब कुठे जाणार होते? आपला मुलगा व नातू यांना संभाळण्याची जबाबदारी शिवसैनिकांवर टाकायची भूमिका त्यांनी घ्यावीच कशाला? मग माझ्या मागे तुम्हीच यांना संभाळा, असे सुचवत नव्हते का साहेब? त्याचा अर्थच पुन्हा आपली भेट होणे नाही; असाच संदेश होता ना? तो त्यांच्या शिवसैनिकांना नेमका कळला होता. म्हणुनच बहुतेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

   याचा अर्थ इतकाच होता, की आपल्या समोर मृत्यू घोटाळतो आहे याची त्यांना जाणिव झाली होती. पण त्यांना मृत्यूचे भय नव्हते. त्याही क्षणी त्यांना हिंदूत्व आणि मराठी अस्मितेचीच चिंता होती. म्हणुन तर त्यांच्या त्या भाषणानंतर त्यांना भेटायला मोठ्या मान्यवरांची गर्दी झाल्यावरही त्यांची भाषा तेवढीच बेफ़िकीरीची होती. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटिल त्यांना भेटायला व प्रकृतीची चौकशी करायला आल्या, त्यांच्याशी ते काय बोलले असतील? तुम्हाला राष्ट्रपती बनवायला मदत केली आणि तुम्हीही अफ़जल गुरूला फ़ाशी देण्यात टाळाटाळ केली. माणसाची बेदरकार वृत्ती बघा किती दांडगी होती. त्या माजी राष्ट्रपती प्रकृतीची विचारपूस करायला आल्या होत्या. आणि हा माणूस त्यांच्याशी कुठल्या विषयावर बोलावा? जणू त्यांची प्रकृती ठणठणीत असावी आणि प्रतिभाताई पुन्हा मतेच मागायला त्यांच्याकडे आल्या असाव्यात, अशा थाटात ते त्यांच्याशी बोलले. अखेरच्या भाषणातही आता कसा थकलो हे सांगताना मुंबईतील रझा अकादमीची दंगल आणि आसाममध्ये पेटलेला हिंसाचार; यावर बोलायचा मोह त्यांना आवरता आला नाही. असे हे अजब रसायन होते. एकीकडे थकलेला माणूस, आपण दसर्‍याच्या मेळाव्यासाठी जाऊ शकत नाही म्हणून व्याकू्ळ झालेला माणूस, तब्येतीची तक्रार करणारा माणूस आणि तोच पुन्हा असे ज्वलंत विषय सहजगत्या बोलतो, याची सांगड तरी कशी घालायची? ज्यांनी त्यांच्यावर प्रेम केले त्यांच्यासाठी तीच बेदरकार वृत्ती आकर्षण होते. ज्यांनी त्यांच्यावर निष्ठा ठेवून जीव ओवाळून टाकला, त्यांच्यासाठी या माणसाने दिलेली आपुलकी सर्वस्व होते. ज्यांनी त्यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली, त्यांना नफ़ातोट्याचा विचारही न करता दिलेली मदत सगळ्यांसाठी रहस्य होते. पण ज्यांनी जाणून घेतले वा नाही घेतले, अशा सर्वांसाठी हा माणूस एक अजब दंतकथा होऊन राहिला होता. जेवढे त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा, तेवढा तो माणुस अधिकच गुंतागुंतीचे कोडे बनून जायचा.

   शरद पवारांसारखे राजकीय विरोधक त्याच्या प्रेमात पडलेले तसेच अमिताभ बच्चन सारखा नम्र माणुसही त्याला पित्यासमान मानायचा. विरोध करणारे, टिका करणारेही त्याला वचकून असायचे. तर कधी त्यातलेच त्यांच्याकडून अपेक्षाही बाळगायचे. महाराष्ट्र सोडाच देशाच्या व जगाच्या इतिहासातही इतकी वर्षे सलग प्रकाशझोतामध्ये राहिलेला दुसरा राजकारणी नसावा. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्याने कधी कुठले सत्तापद उपभोगले नाही, की अधिकारपद मिळावे म्हणून राजकीय तडजोडी केल्या नाहीत. काल मुंबईत जो जनसागर त्यांना निरोप द्यायला लोटला, त्यात त्यांचे चहाते, अनुयायी होते, तसेच त्यांचे विरोधक सुद्धा होते. पण त्यापैकी कित्येक असे होते, की ज्यांना या माणसाविषयीचे कुतूहल तिथे घेऊन आले होते. योगायोगाने मला त्या माणसाचा तब्बल तीन वर्षाचा सहवास लाभला. त्यामुळे त्यांना जवळून ओळखण्याची संधीही मिळाली. पण आज इतक्या वर्षांनी मी छाती ठोकून असे म्हणू शकणार नाही, की मी त्यांना ओळखू शकलो आहे. एका व्यक्तीमध्ये अनेक व्यक्तीमत्वे एकत्र नांदत होती, असेच म्हणता येईल. आणि त्या प्रत्येक व्यक्तीमत्वामध्ये एक निरागस मुल लपलेले होते. खोडकर मुलासारखा त्यांचा स्वभाव होता. वय कितीही वाढले तरी त्यांनी आपल्यातले हे मूल व निरागसता कधी मरू दिली नाही. ती आहे तशी जीवापाड जपली. पण म्हणुनच एकविसाव्या शतकातला चमत्कार आजच्या पिढीला बघायला मिळाला. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यांच्यासारखे अलौकीक नेते आजच्या पिढीने किंवा आधीच्या पिढीने बघितले नव्हते. जनमानसावर अधिराज्य गाजवणारा असामान्य नेता स्वातंत्र्योत्तर काळानंतरच्या जन्मलेल्या पिढीला बघायला मिळालेला नव्हता. त्याचा साक्षात्कार बाळासाएबांनी एकविसाव्या शतकात तरूण व प्रौढ झालेल्या पिढीला घडवला. म्हणून मी त्याला इतिहास म्हणतो.

   गेल्या चार दशकात हा माणूस इतिहास घडवत होता आणि आपल्याला घडवावे म्हणुन जणू इतिहास त्याच्यासमोर हात जोडून उभा असायचा, असेच मला वाटते. त्यांचा सार्वजनिक जीवनातील उदय आणि माझ्या पत्रकारितेची कारकिर्द समकालिन आहेत, त्यामुळे एकूणच घडमोडींचा आपोआप अभ्यास होत गेला. कारण मी त्या सर्व घटनांचा साक्षिदार आहे. योगायोगाने तीन वर्षे तेच संपादक असलेल्या त्यांच्या ‘मार्मिक’ साप्ताहिकाचा कार्यकारी संपादक म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. त्यामुळे त्यांना जवळून बघता आले, त्यांच्याशी बोलताच नव्हेतर वाद घालता आले. आणि म्हणून मी सांगू शकतो, की हा जीताजागता इतिहासपुरूष होता. तो इतिहास घडवत होता आणि इतिहासही त्याच्याकडून स्वत:ला घडवून घेत होता. मात्र तो इतिहास म्हणुन कधी मांडला गेला नाही, की समजावला गेला नाही. ह्या निमित्ताने तो मांडावा विचार आहे.  (क्रमश:)
भाग   ( १ ) १९/११/१२

३ टिप्पण्या: