शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२

ओंबळेला शिव्या घालणारे बुद्धीवादी की निर्बुद्ध?




   कशी गंमत आहे बघा. कालचा लेख लिहून संपवला आणि दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर काळचक्राने मीच रात्री लिहिलेल्या शब्दांचा पुरावा मला सकाळी आणून हातात दिला. बुधवारची सकाळ उजाडली तीच मुळात अजमल कसाबला फ़ाशी दिल्याच्या बातमीने. ती बातमी काय सांगत होती? ती बातमी मला तुकाराम ओंबळेच्या मुलांची आठवण करून देणारी होती. वैशाली असे ओंबळेच्या मुलीचे नाव आहे. जेव्हा तिचा पिता अजमल कसाबला पकडताना पोटामध्ये गोळ्या खाऊन मृत्यूमुखी पडला, शहीद झाला; त्यानंतर शेकडो लोक या मुलीला व त्यांच्या कुटुंबाला मदत करायला धावले होते. कोणी गेटवे ऑफ़ इंडियाला जाऊन मेणबत्त्या पेटवत होता, कोणी नाक्यानाक्यावर मोठ मोठे फ़लक लावून त्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करत होता. कुठे शाळेत कॉलेजमध्ये वर्गण्या गोळा करुन निधी उभारले जात होते. त्यापैकीच एका संस्थेतल्या मुलांनी लाखो रूपयांचा निधी जमवून वैशाली ओंबळे हिला दिला, तर त्या मुलीने ती सगळी रक्कम गरीब मुलांच्या शिक्षणाला उपयोगी पडावी म्हणून तिथल्या तिथे दान केली होती. बापाची वा त्याने केलेल्या आत्मबलिदानाची किंमत पैशात मोजता येत नाही, एवढी तरी जाण तिला होती. आपल्या पित्याने करोडो भारतीयांच्या मनात अभिमानाचे स्थान मिळवले व भारतीय स्वातंत्र्याची जपणूक केली, हे तिला कळत होते. पित्याने व आपण स्वातंत्र्याची कोणती किंमत मोजली हे तिला कळत होते. स्वातंत्र्याबद्दल वाहिन्यांवर बकवास कळणार्‍यांना ती किंमत कधी कळली आहे काय? आपल्या पित्याने देशभरातल्या करोडो लोकांच्या सुरक्षित जगण्याच्या स्वातंत्र्यासाठी देह ठेवला आणि त्याच्याच बदल्यात आपले आयुष्य आता कायमचे ठ्प्प झाले आहे, बंद पडले आहे. कारण देशाच्या व जनतेच्या स्वातंत्र्याची जपणूक करण्याची किंमत अपत्यांच्या आयुष्यातला आनंद खर्चून तिच्या पित्याने चुकती केली; याची वैशालीला जाणिव होती. फ़ेसबुकवर थिल्लरपणा करणार्‍या शाहीन नावाच्या मुलीच्या स्वातंत्र्यासाठी वाहिन्यांवर अहमहमिका करीत बौद्धीक पोपटपंची करणार्‍या कुणाला तरी याच देशात आणि याच जगात वैशाली तुकाराम ओंबळे नावाची एक त्याच वयाची पिडीत तरूण मुलगी आहे, याची साधी आठवण तरी आज राहिली आहे काय? आपण ज्या स्वातंत्र्याच्या पोकळ वल्गना करीत आहोत; त्याच स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी ज्या मुलीने आपले तरूणपण व पित्याचे छत्र गमावले, याचे भान तरी या पोपटांना होते काय? कुठल्या स्वातंत्र्याबद्दल हे दिवाळखोर बकवास करीत होते? त्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी नेमकी किती, कधी व कोणती किंमत मोजली आहे? त्या शाहीन नावाच्या मुलीने असो किंवा तिच्या पिडेविषयी बकवास करणार्‍यांना स्वातंत्र्याची किंमत तरी माहीत आहे काय?

   मल्टीप्लेक्स चित्रपटगृहे, फ़ेसबुक, ट्विटर, मॉल किंवा कुठल्यातरी आलीशान रिझॉर्टमध्ये स्वातंत्र्य सवलतीच्या दरात मि्ळणारी वस्तू आहे, अशी त्यांची समजूत आहे काय? विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, मतदानाचे वा विचारस्वातंत्र्य असे बाजारात खरेदी करून आणायची विकावू वस्तू आहे; अशी त्यांची समजूत आहे काय? कोणी सरकार वा संसद स्वातंत्र्य देते; अशी त्यांची धारणा आहे काय? कुठल्या कायद्याच्या पुस्तकात स्वातंत्र्याच्या व्याख्या लिहिलेल्या असतात, म्हणून त्यांच्या वाट्याला स्वातंत्र्ये आलेली आहेत; अशा भ्रमात ही मंडळी जगत असतात काय? उत्तम सुपिक जमीनीत केलेल्या शेतीतून वा अत्याधुनिक कारखान्यात स्वयंचलित यंत्रामध्ये होणार्‍या उत्पादनातून स्वातंत्र्य तयार होते व मॉलमध्ये विकायला येते; अशी त्यांची समजूत आहे काय? कुठल्या स्वातंत्राबद्दल ती शाहीन वा तिचे वाहिन्यांवरचे पुरस्कर्ते बडबड करत होते? स्वातंत्र्य सत्तेने वा सरकारी कायद्याने दिवाळीसाठी दिलेली भेतवस्तू वा आहेर नाही. ते सरकारी अनुदान नाही. जे लोक कायदा व सुरक्षितता याच्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करायला आपले संसार उघड्याअर टाकून सज्ज असतात, तेच तुम्हाआम्हाला स्वातंत्र्य देत असतात. कारण आपल्या स्वतंत्रपणे व निर्भयपणे जगण्याच्या अधिकारा्ची सुरक्षा करायला ते कायम सज्ज असतात, म्हणून आपल्याला स्वातंत्र्य उपभोगता येत असते. शहिद भगतसिंग वा अन्य कित्येक स्वातंत्र्यवीरांनी आमच्यासाठी स्वातंत्र्य आणले हे निखळ सत्य आहे. पण ते टिकवण्यासाठी आजही शेकडो ओंबळे, करकरे, साळसकर व उन्नीकृष्णन सज्ज असतात आणि नियमित बलीदान करत असतात, म्हणून आपल्याला स्वातंत्र्य उपभोगण्याची मुभा मिळालेली असते. त्यासाठी, म्हणजे तुमच्याआमच्या स्वातंत्र्यासाठी अशी माणसे कोणती किंमत मोजतात, त्याकडे पोपटपंची करणारे एकदा तरी वळून बघायला तयार आहेत काय? मेला वा मारला गेला, म्हणून आम्ही त्या तुकाराम ओंबळेचे कौतुक करतो. पण तो सगळा प्रसंग तसा घडलाच नसता तर?

   समजा आजही तुकाराम ओंबळे जिवंत असता आणि कुठल्या तरी पोलिस ठाण्यात किंवा रस्त्यावर त्याला पोलिसी गणवेशात बघितला असता; तर मनातल्या मनात आपण काय बोललो असतो? त्याच्याकडेही हप्ता घेणारा लाचखोर म्हणूनच आपण बघितले नसते का? त्याच ओंबळेने कुणाला कुठल्या मोर्चात एखादी लाठी बेशिस्त वागण्यामुळे हाणली असती; तर आपण त्याचा गौरव केला असता काय? आज जितका धिक्कार हे भंपक विचारवंत व अविष्कार स्वातंत्र्याचे योद्धे पालघरच्या पोलिसांचा करत होते व त्यांच्यावर बेताल आरोप करत होते, तसेच आरोप त्यांनी ओंबळेवर केलेच असते. त्या दिवशी तिथे चौपाटीवर ओंबळे होता, त्याच्या जागी परवा पालघरमध्ये कारवाई करणारा कोणी पोलिस असता, तर त्यानेही कसाबला पकडण्यासाठी आपला जीव पणाला लावलाच असता. म्हणजे काय? जेव्हा तो पोलिस आमच्या स्वातंत्र्याच्या चैनीसाठी आपल्या जीवाची बाजी लावतो, तेव्हा तो महान आत्मा असतो. मेला वा मारला गेला म्हणुन आमच्यासाठी तो हुतात्मा होतो. बाकी आमच्या लेखी त्याचे आयुष्य व जीव कवडीमोल असते. याला बुद्धीवाद म्हणतात. त्याचा सरळसो्ट अर्थ काय होतो? ओंबळे किंवा त्याच्यासारखे पोलिस, सैनिक वा अन्य कोणी आमच्या स्वातंत्र्याची जपणूक करायला असतात, त्यांच्या जगण्यामरण्याला कवडीचे मोल नाही. जणू त्यांचा जन्मच आमच्या सुरक्षेत मरण्यासाठी झालेला आहे. आणि त्यांच्याकडुन आम्हाला चिमटा जरी घेतला गेला, तरी त्यांनी घोर पापकर्म केले आहे. त्यांना जणू देहदंडाचीच शिक्षा व्हायला हवी, असा आम्हा विचारवंतांचा आवेश असतो. आजचा बुद्धीवादी व अभिजन वर्ग किती अमानुष झाला आहे बघा. शाहीनच्या अटकेसाठी त्या दिवशी वाहिन्यांवरून वा वृत्तपत्रातून पोलिसांवर टिकेचे आसूड ओढणारे प्रत्यक्षात गणवेशातल्या पालघरच्या पाचपन्नास तुकाराम ओंबळ्यांनाच शिव्याशाप देत नव्हते काय?

   पालघरच्या त्या पोलिसांनी कायदे व नियमानुसार काम करायला हवे आणि नियमाच्या मर्यादा ओलांडल्या म्हणुन ते गुन्हेगार असतील. तर मग तुकाराम ओंबळेने तरी कुठले नियमांचे पालन केले होते? कामटे, साळसकर, करकरे यांच्यासारखे अधिकारी हाती अद्ययावत बंदूका असतानासुद्धा चिलखत घालून निघाले होते. तरीही त्यापैकी कोणी थेट कसाब टोळीतल्या कुणाला थेट सामोरे जाण्याचा आगावूपणा केला नव्हता. पण तुकाराम ओंबळेने हाती बंदूक पिस्तूल नसताना व चिलखत परिधान केले नसताना, आगावूपणा करून स्वत:चा जीव धोक्यात घातला, ते नियमात बसणारे होते काय? कुठला कायदा वा नियम सांगतो, की पोलिसाने अशा प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता मरणाला सामोरे जायचे असते? पण ओंबळेने कसाबवर झडप घातली. कसाब गोळ्या झाडतच राहिला. मात्र ओंबळे त्याच्या अंगावर पडून त्याला गच्च पकडून राहिला. मरेपर्यंत त्याने कसाबला सोडलेच नाही. हे त्याने कुठल्या नियमांच्या मर्यादेत राहून केलेले काम होते? तिथेही त्याने नियम धाब्यावरच बसवले होते. मग त्याला निलंबितच करायला हवे होते. त्याच्या त्या नियम मोडण्याविषयी वा मर्यादाभंगाविषयी तेव्हा चर्चा का रंगल्या नाहीत? ज्याने असे नियम मोडले त्याला पदके कशाला देता, असा सवाल वाहिन्यांच्या वातानुकुलित स्टुडीओत बसणार्‍यांनी, तेव्हा कशाला विचारला नव्हता? शाहीन व तिच्या मैत्रीणीला अटक करणार्‍या पोलिसांना नियम व मर्यादांचे पांडित्य शिकवणार्‍या शहाण्यांची बुद्धी; तेव्हा चार वर्षापुर्वी कुठे शेण खायला गेली होती? कारण विषय नियमभंग व मर्यादाभंगाचाच असेल तर ओंबळेनेही मर्यादाभंगच केला होता. पण हीच मंडळी त्याला शहीद म्हणुन गौरवत होती. त्याच्या नियम मोडणार्‍या कृतीचे हौतात्म्य म्हणून उदात्तीकरण चालले होते व आजही चालुच आहे. हा विरोधाभास आहे, की शुद्ध बदमाशी आहे? स्वातंत्र्य असो, की नियम व मर्यादा असोत; त्यांचेही अर्थ संदर्भ व प्रसंगानुसार बदलत असतात     ( क्रमश:)  
भाग   ( ५ ) २४/११/१२

४ टिप्पण्या:

  1. मूर्ख पनाचे विचार आहेत,त्याने नियम मोडले म्हणून तू आज एवेढा बुद्धिवाद दाखवून राहिला रे नाहीतर तू पण कुठे तरी कदाचित गोली खून पडला असता

    उत्तर द्याहटवा
  2. shashiksnt are you mad ? to whom you are abusing ? are you capable of understanding the post written by bhau ?

    उत्तर द्याहटवा