बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१२

जे जगाला घडवतात, त्यांच्यासाठी जग थबकते


   ‘जगात रोज अनेक माणसे मरत असतात, तरीही जग चालुच रहाते’. अशी सरसकट प्रतिक्रिया देणारी ही मुलगी दुसरीकडे भगतसिंग, राजगुरू यांच्या आत्मबलिदानाचाही हवाला देते. त्यांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असे सांगताना त्यांच्यासा्ठी अवघी दोनच मिनीटे शांतता पाळली गेली असाही हवाला देते. याचा अर्थच ही मुलगी बालीश वा अजाण नाही. आपल्याला कुणाच्यातरी बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले हा इतिहास तिला ठाऊक आहे व कळतोही आहे. पण कुणाच्या तरी बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याचे मोल व महत्ता तिला उमगली आहे काय? सुखदेव, भगतसिंग यांनी स्वातंत्र्यासाठी आत्मबलिदान केले, ते अशा स्वैराचारी स्वातंत्र्यासाठी होते काय? तिची अक्कल फ़क्त त्या बलिदानातून काय मिळाले, त्यांच्या नोटा मोजते आहे. बापाने वा पुर्वजांनी अपार कष्ट करून मोठी मालमत्ता जमवावी आणि त्यांच्या बेताल, मस्तवाल वारसाच्या हाती ती आयती पडावी, त्यापेक्षा या मुलीची मानसिकता किंचित तरी वेगळी आहे काय? जसे त्या वारसाला बापजाद्यांचे कष्ट माहित नसतात, की त्याची कदर नसावी; तशीच या मुलीची भाषा नाही काय? त्या महान स्वातंत्र्यवीरांसाठी दोन मिनिटे शांतता पाळली गेली, असे ती सांगते; तेव्हा किंवा त्यांना नैसर्गिक मृत्यू आला नव्हता असेही सुचवते, तेव्हा तिला नेमके काय म्हणायचे आहे? अगदी त्यांना फ़ाशी झाली तरी दोनच मिनीटे शांतता पाळून समाज कामाला लागला. त्यांच्या बलिदानाचे अवडंबर माजवले गेले नाही, असे तिला सुचवायचे आहे. पण तेव्हा देशातल्या जनतेला त्यांच्या बलिदानाचे महात्म्य सिद्ध करण्याची मुभा नव्हती, गौरव करण्याची मुभा नव्हती, हा इतिहास हिला माहित नाही काय? ब्रिटिशांचे राज्य होते आणि त्यांच्याच कायद्याने त्यांना फ़ाशी दिल्याने; त्यांचे उदात्तीकरण करण्यालाही कायद्याने गुन्हा मानले होते, याची माहिती या मुलीला नसेल; तर तिला कुठला इतिहास शिकवला गेला आहे? जसे दोन दिवस माध्यमे तिच्या प्रतिक्रियेतला कळीचा भाग लपवून सोयीचा तेवढाच भाग वाचक वा प्रेक्षकांसमोर मांडत आहेत, तसा अपुरा इतिहास त्या मुलीला व तिच्या पिढीला शिकवला गेला आहे काय?

   ती ज्या सहजतेने भगतसिंग, राजगुरूंच्या मृत्यूबद्दल बोलते आहे, त्याचा अर्थ त्यांना ब्रिटीश सत्तेने गुन्हेगार ठरवून फ़ाशी दिल्याचे तिच्या गावीही नसावे असेच लक्षात येते. तिला जगात रोज मरणार्‍या हजारो लोकांच्या तुलनेत राजगुरू, सुखदेव व भगतसिंग यांचे काही मोलच वाटत नसल्याचे स्पष्टपणे दिसते. आणि तोच भाग चर्चेचा आहे, तिच्या प्रतिक्रियेतला तोच अत्यंत महत्वाचा भाग आहे. तेवढा लपवून वा वगळून त्यावर चर्चा व्हावी; हेच मुळात आक्षेपार्ह आहे. जणू तिने बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पाळल्या गेलेल्या बंद पुरतीच प्रतिक्रिया दिली; असे भासवले जाते हीच शुद्ध बनवाबनवी आहे. तिने जेवढी बाळासाहेबांच्या बाबतीत लोकभावनेची पायमल्ली केली आहे, त्यापेक्षा अधिक देशासाठी हसतहसत फ़ाशीवर गेलेल्या शहिद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचीही अवहेलना केलेली आहे. आणि ज्याअर्थी तिने अगत्याने त्यांची नावे त्यात घातली आहेत; त्याअर्थी तिने विचारपुर्वक त्या देशभक्तांच्या आत्मबलिदानाचा अवमान केलेला आहे. ती वस्तुस्थिती लपवून हा विषय केवळ ठाकरे यांच्या देहांताच्या बंदपुरता मर्यादित असल्याचा डांगोरा पिटणे, शुद्ध फ़सवेगिरीच नाही काय? रोज हजारो लोक मरतात आणि त्यापैकीच शहिद भगतसिंग वगैरे होते, असे ती सुचवते आहे ना? आणि त्यांच्यासाठीही दोन मिनिटे शांतता पाळली गेली, असे सांगताना भारतीयांच्या तात्कालिन भावनाही तिला ओळखता आलेल्या नाहीत. आजच्यासारखी मोकळीक असती; तर त्या शहिदांच्या अंत्ययात्रा किती प्रचंड झाल्या असत्या? त्यांच्यासाठी बंद पाळला गेला नसता काय? पण तेव्हा तसे होऊ शकले नाही. कारण पारतंत्र्यातली भारतीय जनता अगतिक व असहाय होती. आपल्या भावनांचा कोंडमारा सोसत त्या जनतेने जो लढा दिला; त्यामुळे आज या मुलीला स्वातंत्र्य मिळाले आहे, ते तिला कळते. मग त्यामागच्या यातना, वेदना व भावना का कळत नाहीत? की असे लोक आपल्या स्वातंत्र्यासाठी मरायलाच जन्म घेतात आणि किडामुंगीसारखे मरायचीच त्यांची लायकी असते. त्यांच्यासाठी अश्रू ढाळत बसण्याची गरज नाही, असेच ही मुलगी सुचवते आहे. ही बाब सर्वात गंभीर आहे. कारण अशी एकच मुलगी वा मुलगा आजच्या भारतीय लोकसंख्येमध्ये नाहीत.

   आपण जे स्वातंत्र्य व संपन्नता अनुभवतो आहोत, त्यामागे अनेकांचे बलिदान आहे व त्यांनी सोसलेल्या यातना, वेदनांची किंमत म्हणून आपल्या वाट्याला आजचे दिवस आलेले आहेत, याची जाणिव संपल्याचे हे लक्षण आहे. तिच्यापेक्षा स्वातंत्र्याचे झेंडे खांद्यावर घेऊन वाहिन्यांच्या चर्चेत आपले शहाणपण पाजळणार्‍या अर्धवटरावांची मला कींव आली. कारण आपण कशाबद्दल व काय बोलतो आहोत; त्याचेही भान या शहाण्य़ांना नव्हते. अवघ्या पाच दिवसांनी कसाब टोळीने मुंबईत धुडगुस घातला, त्याला चार वर्षे पुर्ण होत आहेत. त्यात आपला बाप, आई, भाऊ वा आप्तस्वकीय गमावणार्‍यांसाठी श्रद्धांजली दिली जाईल, त्याबद्दल ही मुलगी वा तिच्यासारखे दिवटे काय बोलणार आहेत? तिच्याच वयाची एक मुलगी आहे, जिने एकुलता कमावता बाप त्या कसाबला पकडताना गमावला. जगाने तेव्हा तुकाराम ओंबळेचे कौतुक खुप केले. पण कोणाला त्याच्या उघड्या पडलेल्या संसाराची, कुटुंबाची आठवण तरी आहे काय? त्या मुलीला व तिच्या भावंडांना आपला बाप आपल्या सोबत असायचे, स्वातंत्र्य या देशात नाही काय? कोणासाठी तुकाराम ओंबळे, कामथे, साळसकर व करकरे, उन्नीकृष्णन इत्यादींनी आपले प्राण पणास लावले होते? ते सुद्धा त्या दिवशी म्हणजे २६ नोव्हेंबर २००८ रोजी मरण पावलेल्या हजारो लोकांपैकी एक होते. जगात त्या दिवशी तेवढीच माणसे मेली नाहीत. दहापट माणसे त्याही दिवशी जगात मृत्यूमुखी पडली. आणि त्याही दिवशी जग चालूच होते. मग ही अविष्कार स्वातंत्र्याची देवता पालघरहून मुंबईत येऊन कसाबला सामोरी का गेली नाही? तिची पालखी खांद्यावर घेऊन मिरवणारे जे कोणी वाहिन्यांवर दोन दिवस नाचत आहेत, त्यांनी ओंबळे-करकरे यांना बाजूला सारून कसाबचा सामना तेव्हा का केला नव्हता? पुढे सरसावून त्यांनाही कसाब टोळीशी दोन हात करता आलेच असते. ओंबळेच्या हाती तरी कुठे हत्यार वा बंदूक वगैरे होती? त्याच्या जागी हे तमाम अविष्कार स्वातंत्र्याचे सैनिक मारले गेले असते, तर जगाचे काही बिघडले नसते. जग चालुच राहिले असते. पण तेव्हा जग थबकले होते, अचंबित होऊन तो रक्तपात बघत होते, ते मृत्यूचे तांडव बघत होते, तेव्हा हे सर्व विचारस्वातंत्र्य सैनिक व त्यांची पालघरची स्वातंत्र्यदेवता कुठे लपून बसले होते? त्यांना कसाव बरोबर दोन हात करण्यापासून कोणी अडवले होते काय?

   पण नाही. त्यातला कुणीच पुढे आला नव्हता. आज स्वातंत्र्याच्या फ़ुसक्या मारणारे तमाम शूरवीर; तेव्हा शेपूट घालून पळत होते, ज्या स्वातंत्र्याच्या आज वाहिन्यांवरून फ़ुशारक्या मारल्या जात आहेत, त्यासाठी प्राण पणाला लावण्याची वेळ येते; तेव्हा यांना पळता भुई थोडी होत असते. आणि जे कोणी यांच्या स्वातंत्र्याच्या चैनीसाठी आत्मबलिदान करून आपले संसार व जीवन उध्वस्त करून घेतात; त्यांच्यासाठी मात्र यांना चैन थांबवायला सवड नसते. राजगुरू वा भगतसिंग यांच्या मृत्य़ुचे हवाले देणार्‍या या मुलीला तुकाराम ओंबळे का आठवला नाही? पुढले तीनचार दिवस मुंबई व जग थबकले होते, ते का आठवत नाही? तिच्या बचावासाठी वकिलपत्र घेऊन आलेल्यांना दंगली पेटतात, तेव्हा आपल्या स्वातंत्र्याची आठवण का नसते? तेव्हा बंद पडलेले जग चालू करायला, त्यांनी कधीच का पुढाकार घेतलेला नाही? माणसे मरतात म्हणुन जग बंद पडत नाही व चालूच रहाते, यात शंकाच नाही. पण ती माणसे कोण असतात, तेही बघायला हवे. अशी जी चैन करतात व लोकोपयोगी नव्हेतर निरूपयोगी असतात, त्यांच्या मरणाने जगाचे काहीच बिघडत नाही. त्यांच्या मरणाने जगाचे व्यवहार बंद पडत नाहीत. कारण ही माणसे जगासाठी निकामी असतात, धरणीला भार असतात. त्यांच्यासाठी जग थांबेलच कशाला? जगाला घडवायला व इतिहास घडवायला जे लोक या पृथ्वीतलावत जन्माला आलेले असतात, त्यांचा मृत्यू झाला तर जग थांबतेच; पण इतिहासही काही क्षण थांबतो. पण ते कळण्यासाठी मुळात आपण माणूस असायला हवे. आणि समाज माणसांचा बनतो. जे मनाने व बुद्धीने मानवी देहधारी पशूप्राणी असतात, त्यांना यातले काही कळत नाही, की समजू शकत नाही. त्यांची दखलही जग घेत नाही. त्यांच्यासाठी समाज जगाचे व्यवहार थांबवतो आणि त्यांनाच सन्मानपूर्वक निरोप देतो. जे जगासाठी उपयोगी असतात. पण ते फ़क्त माणसांना कळते. मानवी देहात जगणार्‍या पशूप्राण्यांना त्यातले काही कळणेच अशक्य आहे.    ( क्रमश:)
भाग  ( ४ )   २२/११/१२

२ टिप्पण्या:

  1. चैतन्यपूर्ण जीवन आणि चैतन्यहिन् जीवन जगणे का्य तर पैसा,गाड़ी,बंगल्यासरख्या सुखसोयी? असं सुखसमाधान...का याच्या पलिकडे काही आहे?? ते शहीद झाले माझ का्य जाणार अशी संकुचित व्रतिचे लोक या भारत देशात आहेत! या मुलीला फ़क्त एवढ समजतय क़ि दोन मिंटे वेळ द्याचा! जेव्हा तिच्या आप्त स्वकियांवर ही वेळ येइल तेव्हा तिला समजेल क़ि तो श्कन किती दुखचा असतो. समाजातील विविधता बाजूला सारून केवळ माणूस म्हणून जेव्हा त्या व्यक्तिच्या जीवनाकडे पहिलं जात तेव्हा हेच समजू शकते क़ी आपण का्य आहोत... ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬●ஜ
    (¯*•๑۩۞۩:♥♥:||अखिल भारत वर्षीय युवा नाथ(जोगी)योगी समाज||♥♥:۩۞۩๑•*¯)
    ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬●ஜ
    { बालू कुमार कासार, मोबाइल.८९५६५६८४८२)

    उत्तर द्याहटवा
  2. ......../--)
    ....../..../
    ..../ .....(_____ _
    []............. .......((_|_))
    []...LIKE.....( (_|__))
    [].PLEASE.(_|__ ))
    []............. ...((_|__))
    ☺LIKE☺LIKE☺LIKE ..☺♥

    उत्तर द्याहटवा