शनिवार, २७ एप्रिल, २०१३

मोदींचा दंगलीत हात? हे तर तीस्ताचे कुभांड


   कुठल्याही सेक्युलर, पुरोगामी नेता किंवा विचारवंताच्या तोंडी आपण हिटलर किंवा त्याचा प्रचारमंत्री गोबेल्सचे नाव नित्यनेमाने ऐकत असतो. गोबेल्स म्हणायचा सतत खोटे लोकांच्या कानीकपाळी मारावे. मग हळूहळू त्यांना तेच खरे वाटू लागते. आणि एकदा अशा खोट्यावर विश्वास बसला, की बुद्धी चालेनाशी होते व खरे ऐकायचीही भिती वाटू लागते. असा हा हिटलर ज्य़ु धर्मियांची कत्तल करण्यासाठी इतिहास प्रसिद्ध झाला. परंतू ज्यूधर्मियांचा समूळ नाश करायचे त्याचे उद्दीष्ट होते काय? शत्रूला संपवण्याचे उद्दीष्ट म्हणजे नेमके काय असते, त्याबद्दल हिटलरचे मत जाणून घेण्य़ासारखे आहे, मग त्याचे किती काटेकोर पालन आपल्याकडले सेक्युलर व पुरोगामी करतात, त्याचा अंदाज येऊ शकेल. एकदा कोणीतरी हिटलरला विचारले, ज्यूधर्मियांचा संपुर्ण निर्वंश करावा असे तुझे मत आहे काय? त्यावर हिटलर उत्तरला-

   छे छे, ज्य़ू नावाचा कोणी अस्तित्वात नसेल तर तो अस्तित्वात आहे असे दाखवावे लागेल. खरा ज्यू नसेल तर काल्पनिक ज्य़ु तरी हवाच. चळवळ उभी करायची असेल तर ज्याचा द्वेष करावासा वाटेल, ज्याच्या नावाने द्वेषाची चिथावणी देता येईल असा कोणीतरी हाडामासाचा खराखुरा शत्रू आवश्यक असतो. असा खरा शत्रू नसेल तर लोकांना चिथावता येत नाही. केव्ळ अमूर्त कल्पना पुढे करून ती गोष्ट साध्य होत नाही. (हर्मान रॉशनिंग यांच्या ‘हिटलर स्पिक्स’ पुस्तकातून)

   ज्यांना समाजात दुफ़्ळी माजवून लोकांना चिथावण्या द्यायच्या असतात; त्यांना कोणीतरी खरा खोटा शत्रू दाखवून लोकांमध्ये आधी भिती निर्माण करावीच लागते. मग त्या भितीच्या पोटी लोकांना चिथावण्या देऊन आपल्याला हवे तसे झुंजवता येत असते. पण त्यासाठी लोकांना भयभीत करील असा शत्रू लोकांच्या डोक्यात भरवावा लागतो, त्याचे अक्राळविक्राळ रूप लोकांसमोर मांडावे लागते. तसा कोणी खराच नसला तरी बिघडत नाही. पण तो आहे व अत्यंत भयावह आहे, असे लोकांच्या डोक्यात भरवावे लागते. मुस्लिमांची मते मिळवायची तर असा कोणीतरी शत्रू त्यांच्या डोक्यात भरवायला हवा होता आणि म्हणूनच गुजरातच्या दंगलीचे निमित्त करून असा चेहरा लोकांसमोर आणायची संधी आयती एनडीएच्या काळात हतबल सेक्युलर पक्ष व विचारवंतांना मिळाली. कारण अगदी हिंदूत्वाचा अजेंडा भाजपाने सोडला होता. अयोध्येतील मंदिराचा मुद्दा गुंडाळून ठेवला होता. त्यामुळे कॉग्रेसला भाजपावर मात करणे राजकीय दृष्टीने शक्य नव्हते. अशावेळी मग गुजरातची दंगल झाली आणि त्यात नवे काही नसले, तरी ती मुख्यमंत्री मोदींच्याच इशार्‍यावर झाली अशी एक आवई उठवण्यात आली. नेमका त्यावेळी हा मुख्यमंत्री नवखा होता. त्याला प्रशासनाचा किंवा सरकार चालवण्याचा अनुभव अजिबात नव्हता. त्यामुळेच अशा प्रसंगी लोकमताला किंवा माध्यमांना कसे सामोरे जावे, त्याविषयी अनभिज्ञ होता. त्याचा फ़ायदा उठवून माध्यमे व स्वयंसेवी संस्थांना पुढे करून त्याची मुस्लिमांचा खाटीक अशी प्रतिमा रंगवण्याचे कारस्थान शिजवण्यात आले. तसे पाहिल्यास त्यात काडीचेही तथ्य वा सत्य नव्हते. गुजरातमध्ये अशा दंगलीचा इतिहास जुनाच होता आणि तिथले प्रशानस जुन्या अनुभवानुसारच मुस्लिमांच्या बाबतीत तटस्थपणे वागत होते. त्याला नरेंद्र मोदी हा नवखा मुख्यमंत्री अजिबात जबाबदार नव्हता. त्याचा थोडाफ़ार हात असेल तर तो जुन्या परंपरेला छेद देऊन दंगल आटोक्यात आणायचा प्रयत्न करीत होता. पण अनुभवात कमी पडत होता. आणि म्हणूनच अकरा वर्षे होऊन गेली, तरी त्याच्या विरोधात एकही पुरावा समोर येऊ शकलेला नाही. नुसते आरोप व बिनबुडाचे आक्षेप यापेक्षा काही सिद्ध होऊ शकलेले नाही. उलट आजवर कधी झाले नाही, इतके दंगलखोरांवर गुन्हे नोंदले गेले, खटले भरले गेले व अनेकजण शिक्षाही भोगायला गेले. यापुर्वी कधी असे गुजरातमध्ये झालेले नाही. पण तरीही मोदींना मुस्लिमांचा शत्रू म्हणून रंगवण्याचे काम अव्याहत चालू आहे. यालाच हिटलरचा सिद्धांत म्हणतात. मात्र आता त्या गैरसमजातून गुजरातचा मुस्लिम बाहेर पडला आहे. कारण त्याचा अनुभवच त्याला सत्यापर्यंत घेऊन गेला आहे. पण देशातल्या मुस्लिमांना त्या सत्याला अजून सामोरे जायला वेळ लागणार आहे.

   आता कारस्थान असे विधान मी केले, मग अनेकांना मी सुद्धा बिनबुडाचा आरोप करतो असेच वाटेल. पण तो माझा स्वभाव नाही आणि मी पुरोगामी सेक्युलर सुद्धा नाही. त्यामुळे खोटे बोलण्या-लिहिण्याचे स्वातंत्र्य मला घेता येत नाही. मोदी यांना मुस्लिमांचा शत्रू व कत्तलखोर असे आरोप करून त्यांचे तसे भयावह रूप उभे करण्याला मी कारस्थान का म्हणतो? तर तसे सुप्रिम कोर्टातल्या एका वकीलानेच म्हटले आहे. मोदी यांनीच दंगली घडवून आणल्या व मुस्लिमांच्या कत्तलीला प्रोत्साहन दिले; असा त्यांच्यावर सतत आरोप झालेला आहे आणि तसा आरोप करण्यात मुंबईच्या स्वयंसेवी संस्थाचालक तीस्ता सेटलवाड यांचाच पुढाकार राहिला आहे. त्यांच्याच पुढाकाराने तीनदा मोदींच्या विरोधात सुप्रिम कोर्टाने विशेष तापस पथक नेमलेले आहे आणि प्रत्येकवेळी तपास केल्यावर त्या पथकाने मोदी निर्दोष असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. आधी हायकोर्टाने व दोनदा सुप्रिम कोर्टाने अशी पथके; ज्याला एस आय टी असे म्हटले जाते, त्यांची नेमणूक केली होती. शिवाय त्यात मोदी सरकारने हस्तक्षेप करू नये, असाही दंडक घातला होता. अखेर नेमलेल्या पथकामध्ये मुद्दाम कधीही गुजरातमध्ये काम न केलेल्या निवृत्त माजी पोलिस अधिकार्‍यांचा समावेश केलेला होता. त्यांनीही कसून तपास केला व खुद्द मुख्यमंत्री मोदी यांचीही जबानी घेतली होती. त्यानंतर त्यांनी दिलेल्या अहवालात तीस्ता सेटलवाड यांनी हे सर्व कुभांड रचल्याप्रमाणे कारस्थान घडवून आणल्याचा अहवाल दिलेला आहे. म्हणूनच मूळ अर्जदार झकीया जाफ़री यांना त्या अहवालाची प्रत देताना, त्याची प्रत तीस्ता सेटलवाड यांना देऊ नये असे बंधन सुप्रिम कोर्टाने घातले होते. आता त्यावर फ़ेरविचार व्हावा असा अर्ज झाकीया जाफ़री यांच्या वतीने पुन्हा तीस्ताच्या पुढाकारने सुप्रिम कोर्टात सादर करण्यात आलेला आहे. त्यात त्यांनी खुद्द तपास पथकाच्या अधिकार्‍यांवरच संशय घेतला आहे. म्हणजे तीन तीन खास पथके नेमली, तपास केला, पण कुठलाही पुरावा मिळु शकलेला नाही किंवा तीस्ताही कुठला पुरावा देऊ शकलेली नाही. नसेल तर पुरावा मिळणारच कसा?

   याचा अर्थ इतकाच, की पोलिस वा तपास पथकाने कोणता तरी खोटा पुरावा मोदी विरोधात निर्माण करावा आणि त्यात मोदी यांना गुंतवावे; असाच एकूण आग्रह आहे. कायदा पुराव्यानुसार वाटचाल करतो. तुम्हाला काय वाटते वा तुमच्या मनात शंका व संशय आहे, म्हणून कोणाला गुन्हेगार ठरवता येत नसते, दोषी मानता येत नसते. तीस्ता यांना नुसते आरोप करता आले, पण पुरावे देता आलेले नाहीत. कारण जे घडलेच नाही, त्याचे पुरावे मिळणार तरी कुठून? आणि आता चौथ्यांदा कोर्टात पुन्हा तेच नाटक करायला गेलेल्या तीस्ताचा मुखवटा पुरता फ़ाटला आहे. कारण शेवटचा तपास ज्या पथकाने केला; त्या पथकाच्या वकीलांनी आता थेट तीस्तावरच खोटेपणाचा व कोर्टासह लोकांची दिशाभूल करण्याचा आरोप कोर्टातच केला आहे. गेल्या गुरूवारी सुप्रिम कोर्टाच्या खंडपीठासमोर चौथ्यांदा चौकशीच्या मा्गणीसाठी सुरू असलेल्या फ़ेरसुनावणीच्या वेळी जामौर हे एस आय टीचे वकील म्हणाले, झाकीयाच नव्हेतर अनेक प्रकरणात तीस्ताने पुरावे व निवेदनांसह कबूली जबाबात खोटेपणा केलेला आहे. त्यांनी मोदी विरोधात निव्वळ कुभांड रचून हा खेळ चालविला आहे. मोदी यांनी कधीही दंगल करा व माणसांना बेधडक मारायचे आदेश दिले नाहीत. दंगल करणार्‍या लोकांना अडवू नका असे पोलिसांना आदेश दिले नाहीत, कारण तसे ठामपणे सांगणारा व त्याला पुरक पुरावा देणारा एकही साक्षीदार नाही, असे या वकीलाने कोर्टात सांगितले.

   वकीलाच्या या आरोपाला महत्व एवढ्यासाठीच आहे, की तो वकील मोदी सरकारने नेमलेला नाही. ती एस आय टी मोदी सरकारने नेमलेली नाही आणि तशी मागणीही मोदी सरकारची नाही. ती मागणी तीस्ताच्याच आग्रहाने वा अर्जावर सुप्रिम कोर्टाने केलेली होती. म्हणजेच हे लोक तीस्ताच्याच विश्वासाचे आहेत. इतकेच नाही, तर या पथकाने मोदींना साक्ष वा जबानी द्यायला बोलावले म्हणजेच मोदी कसे गुन्हेगार आहेत, असे सांगण्यात तीस्ताने दाताच्या कण्या केल्या होत्या आणि तमाम सेक्युलर माध्यमांनी आठ तास मोदींवर प्रश्नांचा कसा भडीमार झाला, त्याची रसभरीत वर्णने प्रक्षेपित केलेली होती. पण त्यातून मोदीना अडकवता येत नाही, म्हटल्यावर आता त्याच पथकावर तीस्ताने आरोप सुरू केले आहेत. म्हणजे जणू गुजरातच्या दंगलीविषयी त्यातल्या पिडीत वा बळी असणार्‍यांपासून कोर्ट व तपासकाम करणार्‍यांपर्यंत सगळे खोटे आहेत आणि कसलाही पुरावा देऊ न शकणार्‍या तीस्ताचा शब्द त्यात पुरावा आहे. हा निव्वळ बनाव झाला ना? त्यांच्याच विश्वासातला एक वकील आता तीस्तावर मोदी विरोधात कुभांड रचल्याचा आरोप करतो आहे. आणि हा पहिलाच माणुस नाही. यापुर्वी तीस्तावर बदमाशी व खोटेपणाचे आरोप तिच्या अनेक सहकार्‍यांनी केलेले आहेत. पण अशा बातम्या आपल्याला मुख्यप्रवाहातील वाहिन्या व वृत्तपत्रात वाचायला ऐकायला मिळणार नाहीत. तीस्ताने केलेल्या खोट्या आरोपांना वारेमाप प्रसिद्धी मिळते. पण तीस्तावरच खोटेपणा केल्याचा सुप्रिम कोर्टात आरोप झाला; त्याची बातमी दोन दिवसात कुठे आली का? का येऊ नये? सेक्युलर पुरोगामी माध्यमे व पत्रकार तीस्ता इतकेच खोटारडे असल्याचा यापेक्षा वेगळा पुरावा आवश्यक आने काय? हीच नाही, झाकीया जाफ़रीच्या गुलमर्ग सोसायटीतून तीस्ताला मुस्लिम रहिवाश्यांनी हाकलून लावल्याची बातमी तरी कुठल्या पुरोगामी माध्यामने दिली होती? त्यांना सत्याचेच वावडे आहे ना? अशा माध्यमांकडून गुजरातविषयी सत्य समोर येऊ शकेल काय?   ( क्रमश:)
 भाग   ( १५५ )    २८/४/१३

२ टिप्पण्या:

  1. भाऊ,
    कृतीशील विचारवंत प्रा. फ ह बेन्नूरांचे 'भारतीय मुसलमानांची समाजरचना आणि मानसिकता' हे पुस्तक सध्या वाचत आहे. त्यात त्यांनी मांडणी करताना तबलिगी व वाहबी मुसलमान ऐतिहासिक काळापासून वर्चस्ववादी व मुलतत्ववादी विचारधारेचे समर्थक आहेत. हा विचार पुर्वीच्या नबाब, सरदार व जामीनदारी करणारा वर्गाचे प्रतिनिधित्व करत होता, असे म्हटले गेले. त्यामुळे गुजरात वा अन्य राज्यांतील सर्वसामान्य मुस्लिम समाज त्यांच्या राज व धर्मकारणाबरोबर फरकटत जातात व सर्व मुस्लिमांवर अतिरेकींचा धर्म असा शिक्का बसतो.
    असो.
    प्रामुख्याने महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवरील मुस्लिमांच्या वैचारिकतेचा घेतला गेलेला आढावा वाचनीय आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. कसे कसे लोक आमच्याकडे नायक नायाकिनी बनतात पहा..हि तिस्ता सेटलवाड नावाची बाई गेल्या अनेक वर्षांपासून डोक्यात जात आहे पण कुणीही हिला कायमची थंड करू शकत नाही, म्हणजे मोदी आणि हिंदूंच्या बाबतीत हिची आग किती प्रचंड आहे.. तिला कुणी सुपारी दिली आहे व तिचे गोड्फादर कोण आहेत हे सांगायला काही एस.आय.टी. ची गरज नाही. बाई माणूस नसती तर भाषा आणि शब्द काही नियंत्रणात राहिले असते असे वाटत नाही....

    उत्तर द्याहटवा