मंगळवार, १ मे, २०१२

कायबीइन लोकमत असे मी का म्हणतो?


  माझ्या लिखाणात निखिल संपादक असलेल्या वाहिनीचा उल्लेख मी कायबीइन लोकमत असा का करतो, अशी शंका काही वाचक मला फ़ोनवरून विचारत असतात. ज्यांनी आरंभापासून माझी लेखमाला वाचलेली नाही, त्यांना ती छपाईची चुक वाटते; तर काही लोकांना माझी ती लिहिण्यात राहून गेलेली चुक वाटते. पण तसे अजिबात नाही. त्या वाहिनीवर आणि निखिलच्या बोलण्यात. वडाची साल पिंपळाला लावण्याचा जो उद्योग चालतो, त्यासाठीच मी त्या वाहिनीचे माझ्यापुरते नाव बदलले आहे. जिथे वाटेल ते म्हणजे ग्रामीण भाषेत "कायबी" असु व दिसू शकते वा सांगितले जाऊ शकते, त्याला "कायबी इन" असे मी म्हणतो. आणि म्हणूनच नेहमी्च्या  लिखाणात मी त्यांचा उल्लेख कायबीइन लोकमत असाच करतो. प्रेक्षक जागरुक वा चाणाक्ष असेल, तर त्याच्याही अशा गोष्टी तात्काळ लक्षात येऊ शकतील. कधी कधी वाटते, की आपले अज्ञान उघडे पडू नये; म्हणून निखिल त्या त्या विषयातले अर्धवट वा अडाणी शोधून आमंत्रीत करतो की काय?

   मंगळवारी अक्षय तृतिया होती आणि त्याच दिवशी कायबीइन लोकमत वाहिनीवर अभिषेक मनु सिघवी यांच्या  सीडीबद्दल चर्चा ठेवली होती. त्यात कॉग्रेस प्रवक्ते म्हणुन अनंत गाडगिळ व राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका अरुणा पेंडसे यांना खास पाहुणे म्हणून आणलेले होते. त्या दोघांनी अशा लैंगिक अनैतिक संबंधाच्या भानगडी संदर्भात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचा अगत्याने उल्लेख केला. पण त्यात नेमकी चुकीची माहिती तेवढ्याच  अगत्यपुर्वक कथन केली. गाडगीळ यांनी त्या (मोनिका ल्युइंस्की) प्रकरणात क्लिंटन यांना राजिनामा द्यावा लागला असे दोनदा ठासू्न सांगितले. तर मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्र शिकवणार्‍या पेंडसे मॅडमनी क्लिंटन यांना त्याच प्रकरणामुळे दुसर्‍यांदा निवडणूक लढवता आली नाही असाही शोध लावला.

   वस्तुस्थिती अशी आहे, की क्लिंटन यांनी अजिबात राजिनामा दिलेला नव्हता. त्यांनी फ़क्त या प्रकरणी आधी खोटी जबानी दिल्याबद्दल माफ़ी मागितली होती. मग तेवढ्यावर त्यांची सुटका झाली होती. म्हणजेच गाडगिळ यांनी दोनदा जे "ठाम मत" दिले ते धादांत खोटे होते. पेंडसे मॅडम राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. त्यामुळे त्यांना निदान अमेरिकन निवडणूक प्रक्रिया, नियमावली व अधिकारपदांच्या मुदती, यांची ढोबळ माहिती असायला हवी. तिथे कुठल्याही सत्तापदावरील व्यक्तीला तिसर्‍यांदा त्याच पदावर दावा करता येत नाही. दोनदा लागोपाठ सत्ता भोगली, मग त्या पदाचा मोह कायद्यानेच सोडावा लागतो. त्याच पदावर तिसर्‍यांदा आरुढ व्हायला तिथला कायदाच मुभा देत नाही. मग क्लिंटन यांना मोनिका प्रकरणाने पुन्हा निवडणुक लढवण्याची संधी हुकण्याचा विषयच कुठे येतो? क्लिंटन हे १९९२ साली प्रथम निवडून आले व दुसर्‍यांदा १९९६ साली अध्यक्ष झाले. मोनिका प्रकरणच दुसर्‍या अध्यक्षिय कारकिर्दीतले असेल, तर पुढली निवडणुक हुकण्याचा प्रश्नच कुठे येईल? एवढे राज्यशास्त्र सामान्य पत्रकारालाही ठाऊक असते. पण निखिलच्या खास पाहुण्य़ांना इतक्या सामान्य गोष्टींचा गंध नसतो. त्यामुळे तिथे ’कायबी’ सांगितले जाते आणि तसेच, कायबी अर्धवट चुकीची माहिती "ठामपणे’ सांगण्याची कुवत असलेलेच आणावे लागतात. त्यांना नेमके शोधण्याची निखिलच्या टीमची गुणवत्ता खरोखरच वाखाणण्य़ासारखी आहे.    

   आता प्रत्येक वेळी व प्रत्येक बातमी, कार्यक्रमात लोकमत वाहिनीवर कायबी दाखवले व सांगितले जात असेल आणि त्याचे तपशील रोज द्यायचे; तर वेगळा स्तंभच चालू करावा लागेल. अर्थात तो मुर्खपणा करण्याचा खास अधिकार निखिलच्या अविष्कार स्वातंत्र्याचा भाग असल्याने, त्याच्या त्यातल्या अबाधित स्वातंत्र्याला मी बाधा आणु इच्छित नाही. मी फ़क्त एखादी बातमी चुकीची कशी देता येईल वा त्यात कोणता मुर्खपणा होऊ शकतो; हे जाणून घेण्यासाठीच नियमित नाही, तरी अधुनमधून कायबीइन लोकमत अगत्याने बघत असतो. तो माझा टीव्हीवरला सर्वोत्तम टाईमपास आहे. कारण तेवढा हमखास मुर्खपणा वा चुका अन्य मराठी वाहिन्या करू शकत नाहीत. कदाचित त्यांचे संपादक कॅमेरापुढे आपणच दिसण्यापेक्षा, आपला शहाणपणा मागे राहून संभाळत असावेत. किंवा आपल्या टीमकडून मुर्खपणा होऊ नये यासाठी वेळ देत असावेत.

   अनंत गाडगिळ यांनी दोनदा चुकीचे कथन केल्यावर संयोजकाने त्यांना निदान सुधारायला हवे होते. पण ते करायला संपादकाचे डोके ठिकाणावर असायला हवे. त्यांना सत्य सांगण्यापेक्षा ठामपणा दाखवण्याचा उत्साह असला, मग एकूणच मुर्खांचा बाजार होणार ना? आणि अशा प्रकरणात थेट अमेरिकेत तरी जायची गरज काय होती? इथे आपल्याकडे असे खुप प्रकार यापुर्वी घडले आहेत. जनता पक्षाच्या राजवटीत १९७८ साली जगजीवन राम यांना बदनाम करण्यासाठी तेव्हा त्यांच्या सुपुत्राची अशी छायाचित्रे पोलोराईड कॅमेराने काढून वाटण्याचा उद्योग राजनारायण यांच्या के.सी. त्यागी नावाच्या अनुयायाने केला होता. तेव्हा आजच्या सारखे डिजिटल कॅमेरे आलेले नव्हते वा मोबाईल कॅमेरे वापरात नव्हते. सध्या काही महिने गाजते आहे ते भंवरीदेवी हत्या प्रकरण कशातून आलेले आहे? सात वर्षापुर्वी भाजपाचे एक सरचिटणिस संजय जोशी यांची अशीच सीडी कोणी तरी प्रसारीत केली होती. त्यातून त्यांना भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजिनामा द्यावा लागला होता.

   सांगायचा मुद्दा इतकाच, की ज्यांना जाणकार म्हणून आणायचे त्यांची जाण तरी किती, हे कोणी तपासायचे? जगातल्या कुठल्याही विषयावर प्रकाश बाळ, हेमंत देसाई, अशी आपल्या पटःअडीतल्या सेवादलीय लोकांची गर्दी केली म्हणजे जाणकारांचे मत लोकांना मिळू शकत नाही. मग होते असे, की चर्चा एकीकडे तर लोकमत भलतीकडे अशी परिस्थिती निर्माण होते. रामदेव यांच्यासोबत गेल्याने अण्णांवरील लोकांचा उडाला काय, अशी चर्चा चालली होती. त्यात निखिलच्या पाहुण्य़ांचा अण्णांवरील विश्वास उडतो आहे काय, अशी चर्चा नव्हती. मग ती चर्चा करताना आपलेच प्रेक्षक काय मत व्यक्त करतात, याचेही भान ठेवायला नको काय? पण मुळातच बेभान होऊन चर्चेत उतरले, मग भान कसले उरणार? मध्ये ब्रेक घ्यायचा म्हणून मतांचे आकडे दाखवायचे. पण त्याचा बोध आपणच घ्यायचा नाही, मग भानावर येण्याचा ’सवाल’च कुठे येतो? त्या दिवशी पहिला ब्रेक घेतला तेव्हा अण्णांवर ६२ टक्के प्रेक्षकांनी विश्वास दाखवला. निखिलच्या पाहुण्यांचा अण्णांवरील विश्वास जसजसा उडत चालला होता, तसतसा प्रेक्षकांचा अण्णांवरील विश्वास मात्र वाढत होता. दुसर्‍या ब्रेकला ७२ टक्के तर कार्यक्रम संपताना ७६ टक्क्यांपर्यंत अण्णांवरील लोकांचा विश्वास वाढला होता. निखिलने चर्चा सुरू करून ती संपेपर्यंत अवघ्या एका तासात त्याच्याच प्रेक्षकांचा अण्णांवरील विश्वास १४ तक्क्यांनी वाढला. याला "लोकमत इंपॅक्ट" म्हणायचे काय? कारण लोकमत वा त्याची वाहिनी जे सांगते त्याच्या नेमके उलट जनतेचे लोकमत असते हा आता रोजचा खेळ झाला आहे.

   वाहिनीचे नाव लोकमत आणि त्यावरील चर्चा मात्र लोकमताच्या नेमकी विरुद्ध जाणारी, अशी एकूण स्थिती आहे. आपण इथे आपल्या मतांची चर्चा करत नसून, सामान्य माणसाच्या अण्णाविषयक मताबद्दल चर्चा करत आहोत याचे भान ज्यांना नसते, त्यांना जाणकार म्हणायचे की माथेफ़िरू म्हणायचे? त्या कौलावर विश्वास नसेल वा त्याची दखलच चर्चेत घ्यायची नसेल; तर त्यात लोकांचे मत मागण्याचा सवालच कुठे येतो? असे पाहुणे शहाणे जाणकार असणे सोडा, त्यांचे डोके तरी ठिकाणावर असते, काय याचीच मला शंका आहे. आसपासच्या घट्ना घडामोडींची दखल न घेता चर्चा कशी होऊ शकते? ज्या सामान्य माणसांबद्दल आपण चर्चा करत आहोत. तो आपले मत व्यक्त करतो आहे, तर त्याच्याचकडे काणाडोळा करून अशा चर्चा करणार्‍यांना आपण काय बोलतो आहोत त्याचे तरी भान असेल काय? डॉ. रामचंद्र रेड्डी नावाच्या एका जगद्विख्यात मेंदु विशारदाचा एक माहीतीपट डिस्कव्हरी वाहिनीवर बघितलेला आठवतो, त्यात त्यांनी मेंदू भरकटल्याचे जे प्रात्यक्षिक दाखवले होते त्याचाच अनुभव मला अशा चर्चा ऐकताना येत असतो. बहुधा युट्युबवर त्याचे चित्रण उपलब्ध असावे. ज्यांना रस असेल त्यांनी ते मुद्दाम बघावे, मग वाहिन्यांवरील अशा चर्चा का बेताल भरकटतात त्याची शास्त्रीय कारणे समजू शकतील. मी सवडीने त्यावर लिहिणारच आहे.  (क्रमश:)
 भाग    ( २५१ ) ३०/४/१२

७ टिप्पण्या:

  1. ibn लोकमत ला धार्मिक चर्चेत हिंदू जनजागृतीचे श्री रमेश शिंदे यांना बोलावले जाते पण त्यांना त्यांचे कोणतेही वाक्य पूर्ण बोलण्याआधीच वागळे स्वतःची बडबड मोठ्या आवाजात चालू करतात

    उत्तर द्याहटवा
  2. दर्दांचे नाव कोळसा घोटाळ्यात आल्यावर मी आवर्जून ibn लोकमत पहात होतो . पहिल्यांदा कोणत्यातरी फालतू विषयावर चर्चा करून १ दिवस वाग्लेंनी पुढे ढकलला . २ र्या दिवशी चर्चेच्या सुरवातीलाच भ्रष्टाचार हा १ का पक्षाचा किंवा व्यक्तीचा नसतो असे म्हणून सुरवात केली , नेहमीप्रमाणे आक्रमक नव्हते निखिलजी . किरीट सोमय्यांनी दर्डा नाव उच्चारले कि निखील नागपुरातील जय्स्वलांचे विमान गडकरींनी का वापरले ? हाच प्रश्न विचारत आणि त्यांचे बोलणे थांबवत ,9 vela vagle ni ha prshn vicharla .

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. निखिल वागळे हे दर्डा यांच्यासाठी काम करतात. त्यामुळे निखिलने आपल्या मालकाची बाजू लावून धरली यात काय चुक आहे? दर्डा कोळसा घोटाळयात अडकले असतांना त्यांना वाचवून, जनतेसमोर त्यांची प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न करून वागळे़ंनी ईमानी श्वानाप्रमाने आपले कर्त्तव्य बजावलेले आहे. या वागळे महोदय्यान्ना एकदा भाऊंच्या समोर उभे करा निखिल वागळेचे शेपुट त्यांच्याच .... मधे जाणार हे निश्चित. आरडा ओरडा करून जनतेला आपण मुर्ख बनवू शकतो असे त्यांना वाटते, पण "हा सूर्य अणि हा जयद्रथ" अशी वृत्ति ते लाचार पणामुळे बाळगू शकत नाही हे ते खाजगीत मान्यच करतील.

      हटवा
  3. सर तुम्ही ज्या पत्रकार किंवा नेत्यांचा इथे उल्लेख करताय, ते सरकारी कुत्रे आहेत त्यांना ठराविक पक्षांनी आपल्याच नुज चानेल वर नोकरीला ठेवले आहे. त्यामुळे पोटासाठी त्यांना मालक सांगतील त्यांच्यावरच भून्कावे लागते. आपल्या देशात लोकशाही नसून भांडवलशाही आहे व राजकारणी लोक भांडवलदार बनल्यामुळे त्यांचे नोकर असेच वागणार. IBN लोकमत कोन्ग्रेस, सकाळ -राष्ट्रवादी इ.

    उत्तर द्याहटवा
  4. atishay achuk.. ha lekh mhanje jantechech mat ahe. Ya jagat mothmothyane oradlyane khote hi vikle jate yachich prachiti IBN Lokmat ani Nikhil Vagle karun detat.

    उत्तर द्याहटवा