सोमवार, २८ मे, २०१२

डॉक्टर सुदाम मुंडे पोलिसांकडे कशाला धावले?


  कालपरवाची तर गोष्ट आहे. परळी वैजनाथ या शहरात एका गर्भपाताने खळबळ उडवून दिली आहे. तसे त्या शहराला गर्भपात नवे नाहीत. त्या शहरातच नव्हेतर बीड जिल्ह्यात व मराठवाड्या पलिकडे या शहराची गर्भपाताचे सुरक्षित केंद्र, अशी ख्याती झालेली आहे. तिथे मुंडे हॉस्पिटल नावाचे एक खास केंद्र फ़क्त गर्भपातासाठीच चालवले जाते. दिवसाला पन्नासहून अधिक महिला तिथे गर्भलिंग तपासणी करीता येतात किंवा गर्भपात करून घ्यायला येतात. हे सर्वश्रृत आहे. पण कोणी त्याबद्दल काही बोलत नाही. गेल्या आठवड्यात तिथे गर्भपात करून घेणार्‍या महिलेचा मृत्यू झाला आणि खळबळ उडाली. मग त्या महिलेचे संतप्त नातेवाईक तिथे जमा होऊ लागले आणि डॉ. सुदाम मुंडे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. कुठेही हल्ली रोग्याला इजा पोहोचली, मग त्याचे नातलग डॉक्टरवर आपला राग काढतात. अशावेळी पोलिसांनी त्या डॉक्टरला संरक्षण द्यायलाच हवे. तेव्हा संतप्त नागरिक जमायला लागल्यावर, डॉ. सुदाम मुंडे यांनी पोलिसांकडे धाव घेतल्यास काही चुकीचे म्हणता येणार नाही. पण इथे आपण मार खाणार्‍या अन्य डॉक्टर मंडळींशी मुंडे यांची तुलना करणे योग्य होणार नाही. तो त्यांच्याप्रमाणेच अन्य मार खाणा‍र्‍या डॉक्टरांवर अन्याय होईल. कारण डॉ. मुंडे हे तसे लेचेपेचे गृहस्थ नाहीत. त्यांना परळीमध्ये हात लावण्याची कुणाची हिंमत होणार नाही. अगदी गुंडच काय पोलिसही त्यांना वचकून असतात. मग त्याच डॉ. मुंडे यांनी पोलिसांकडे धाव घेण्याचे कारण काय? त्याने रोग्याच्या नातेवाईकांना घाबरून पळ काढला, यावर कुणाचा विश्वास बसेल काय? पण तसे झाले आहे. आणि त्याचे कारण नातेवाईक एवढेच नसून नातेवाईकांचा जमाव हेच कारण आहे. डॉ. मुंडे जमावाला घाबरले व पोलिसांकडे धावले आहेत.

   जमाव नसता तर ते कुणाच्या बापाला घाबरत नव्हते. अगदी कायदा, सरकार वा न्यायालय वा पोलिसांनाही ते घाबरत नव्हते. कायद्याच्या व सरकारी  यंत्रणेच्या छातीवर बसून ते कायदा मोडत होते, कायदा पायदळी तुडवत होते. म्हणजे असे, की स्त्रीलिंगी गर्भाचा पात करणे हा कायद्याने गुन्हा आहे. दुसरी गोष्ट यंत्राद्वारे लिंगतपास करणेही गुन्हा आहे. पण या दोन्ही गोष्टी डॉ. मुंडे व त्यांच्या पत्नी मिळून करत होते. त्याचा खुप गवगवा झालेला होता. त्यांच्या विरोधा्त गुन्हेही दाखाल करण्यात आलेले होते. पण नागपुरच्या अक्कू यादवप्रमाणेच कायदा यांच्यापुढेही हतबल झालेला होता. पोलिस तक्रार नोंदवत नसत, नोंदली तरी दाखलपात्र गुन्हा नोंदवत नसत. तसा नोंदवला तर जामीनपात्र कलम लावून त्यांची तात्काळ सुटका होईल, याची पुरेपुर काळजी पोलिसच घेत असत. पुढे कोणी सरकार दरबारी धाव घेतली आणि परळी बाहेरून पथक आले; तर भाडोत्री गुंड त्यांना पळवून लावत असत. कुणा स्थानीक अधिकारी वा अगदी न्यायदंडाधिकार्‍याने हिंमत केलीच, तर त्याची चोविस तासात बदली होत असे. थोडक्यात कायद्याचे राज्य डॉ. मुंडे यांचे पाय चाटत होते. पाळीव कुत्रा जेवढा मालकाशी इमानदार नसेल, तेवढे कायद्याचे अंमलदार डॉ. मुंडे याच्या पायाशी घोटाळत असायचे. असा माणुस त्या गर्भपाताच्या वेळी महिलेचा मृत्यू झाल्यावर पोलिसांकडे धावला. कारण त्याला जमावापासून कायद्याचे संरक्षण हवे होते. आणि ते मिळाले. लक्षात घ्या, ज्या इसमाला कायद्याने कचाट्यात पकडून गजाआड पाठवायला हवे आणि त्याने चालविलेल्या गुन्ह्यांना पायबंद घालायला हवा, तोच कायदा व कायद्याचे प्रशासन; त्यालाच जमावापासून संरक्षण द्यायला पुढे सरसावले होते.

   तसे झाले नसते तर? तर त्याच इस्पितळात, त्याच डॉ. मुंडे यांच्यावर उपचार करण्याची पाळी जमावाने आणली असती. कारण त्यांनीच केलेल्या निष्काळजीपणाच्या शस्त्रक्रियेमुळे त्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला, अशी धारणा तिच्या नातेवाईकांची झाली होती. त्याच्याहीपेक्षा इतके होऊनही त्याच्यावर पोलिस काहीही कारवाई करणार नाहीत, याची त्या जमावाला खात्री होती. त्यामुळेच आपण पुढे होऊन काही करायला हवे; असे त्यांना वाटले होते. त्यासाठीच तिथे जमाव जमत होता. पण त्याचा सुगावा लागताच डॉ. मुंडे यांनी सुरक्षित आश्रय मिळवला. ते कायद्याला शरण गेले. ज्यांनी अशा बेकायदा गर्भपाताला थांबवून, त्या महिलेला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढायला हवे होते व त्यासाठी अशा डॉक्टरला आधीच पकडायला हवे होते; ते पोलिस काय करत होते? तर गर्भपात करून त्या महिलेचा जीव घेणार्‍या डॉक्टरला जमावापासून वाचवायला पुढे सरसावले होते. ही आज आपल्या देशातील कायद्याची ओळख झाली आहे. जो दुबळ्यांना गुंड मुजोरांपासून वाचवत नाही, पण त्याच मुजोर गुंडाना मात्र संतप्त जमावापासून संरक्षण देतो, त्याला कायदा म्हणतात आजकाल. ज्याचा उल्लेख मी वा माध्यमे इथे डॉ. मुंडे असा करत आहेत, तो कृतीने सैतानालाही लाजवणारे काम करत होता. गर्भातील स्त्रिलिंगी अर्भकांची हत्या करीत होता. त्यासाठी प्रचंड पैसे घेत होता. तिथेच त्याचे पाशवी कृत्य थांबत नाही. असे मारलेले गर्भ कोल्ह्याकुत्र्यांना खायला कुठेही फ़ेकून देत होता. त्याचा गवगवा झाला, म्हणून त्याने मग असे गर्भ खावून फ़स्त करण्यासाठी कुत्रीच पाळली होती. अंगावर शहारे आणणारी ही कहाणी आहे. पण हे गुपित नव्हते. अवघ्या मराठवाड्यात व महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातली ही जगजाहिर गोष्ट होती. त्यामुळेच त्याच हॉस्पिटलमध्ये दुरदुरचे लोक येत होते. गर्भलिंग तपासणी करून गर्भपात करून घेत होते.

   काही लोकांनी या प्रकरणाचा पिच्छा पुरवला होता. चोरट्या कॅमेराने त्याचे चित्रण केले होते. त्याच्या आधारे तक्रार केली होती, गुन्हे दाखल करून घेतले होते. पण काहीच का होऊ शकले नाही? तिथेच आपल्याला कायद्याचा दुबळेपणा स्पष्ट होतो. कायदा कुणाला संरक्षण देऊ शकत नाही. ज्याच्या हाती कायदा राबवणे आहे, त्याच्याच मर्जीवर कायद्याची परिणामकारकता अवलंबून असते. पैसा, सत्ता व गुंडगिरी याच्यासमोर कायदा दुबळा असतो, हेच डॉ. मुंडे यानी दाखवून दिले आहे. पण दुसरीकडे त्यांनीच आणखी एक गोष्ट आपल्याला दाखवून दिली आहे. त्याकडे माध्यमे वा कार्यकर्ते दुर्लक्ष करतात, ती गोष्ट आहे जमावाच्या ताकदीची. जेव्हा जमाव म्हणजे मोठी लोकसंख्या अशा घटना व प्रसंगाच्या समोर उभी ठाकते, तेव्हा असे तमाम शिरजोर भयभीत होऊन जातात. मग तो नागपूरचा बलात्कारी अक्कू यादव असो, की परळीचा डॉ मुंडे असो. कायदा व सरकार यांना खिशात घालून मस्तवालपणा करणारे असे लोक सामान्य माणसाच्या सामुहिक ताकदीला मात्र घाबरून असतात. त्या जमावाच्या हाती लागलो तर आपली खैर नाही; हे त्यांना चांगले कळत असते. म्हणुनच जेव्हा जमाव संघटित होऊ लागतो, तेव्हा असे गुंड, गुन्हेगार, समाजकंटक कायद्याचे संरक्षण मागायला धाव घेतात. कसा विरोधाभास आहे बघा. जो कायदा समाजातील दुबळ्यादुर्बलांना मुजोरांपासून संरक्षण देण्यासाठी निर्माण झाला आहे, तोच अशा मस्तवालांना सामान्य माणसाच्या रोषापासून संरक्षण द्यायला मात्र तत्पर असतो. तो अक्कू यादवला जमावापासून वाचवू बघतो, तोच डॉ. मुंडेना जमावाच्या प्रक्षोभा्पासून संरक्षण देतो. पण त्यांनी चालविलेल्या गुन्हे वा बेकायदा गोष्टीपासून सामान्य मानसाला अजिबात सुरक्षा देत नाही. कितीही दार ठोठावले तरी सामान्य माणसासाठी कायद्याचे दार उघडत नसते. किती चमत्कारिक गोष्ट आहे ना?

   आपण अफ़जल गुरूला अजून फ़ाशी का दिली जात नाही, यावर मोठ्या आवेशात बोलत असतो. पण दुसर्‍या कुठल्या आरोपी व गुन्हेगाराला इथे सहजगत्या कायदा रोखत असतो? कुणाला शिक्षा होत असतात? ज्यांना मोठे दाखलेबाज ठरवले जाते अशा दाऊद वा शकील, राजन वगैरे यांना कुठल्या खटल्यात शिक्षा झाली आहे? कायदा गुन्हेगारांना धाक घालू शकतो, असे उदाहरण कुठे आहे काय? पण त्याच्या नेमके उलट गुन्हेगारांना कायदा संरक्षण देतो आहे. पण जिथे जमाव एकत्र येतो वा कायदा हाती घेतो; तिथे मात्र गुन्हेगारी व गुंडगिरीला पायबंद बसतो; हाच आपला अनुभव नाही काय? मग सत्यमेव जयते कशाला म्हणायचे? आमिरखान कुणाला पत्र लिहून वा अर्ज पाठवून आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतो का? त्याने स्त्रीभृणुहत्येवर इतका लक्ष्यवेधी कार्यक्रम केला म्हणून डॉ. मुंडे यांचे उद्योग थांबले होते का? पण तिथे जमाव एकत्र आल्यावर मात्र त्यांना पाळ काढावा लागला. कारण गुंड गुन्हेगार कायद्याला नव्हेतर जमावाला व सामान्य जनतेच्या संख्येला घाबरत असतात. सामुहिक पुरूषार्थच गुन्हेगारी थांबवू शकतो. ते कसे साध्य करायचे? (क्रमश:)
भाग   ( २७६ )   २६/५/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा