सोमवार, २१ मे, २०१२

राईचा पर्वत करायला राई तर हवी ना?


   मध्यंतरी कधी एका मुलाखतीमध्ये निखिलने अण्णा हजारे यांना एक प्रश्न विचारलेला आठवतो. तो प्रश्न नेमका व्यंगचित्राबद्दल होता. पुर्वी म्हणजे पंधरा वर्षापुर्वी महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युतीचे सरकार असतानाची गोष्ट आहे. अण्णांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलन पुकारले होते. त्यात त्यांनी (आज ते सोनिया, राहुल विरुद्ध तोफ़ा डागतात त्याचप्रमाणे शिवसेना व तिचे प्रमुख) बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कठोर शब्दात आरोप केले होते, टिका केली होती. त्यावर अण्णांना चोख उत्तर देतांना, ठाकरे यांनीही अण्णांना आपल्या ठाकरी भाषेत प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी अण्णांची "वाकड्य़ा तोंडाचा गांधी" अशी संभावना केली होती. ठाकरे हे मूलत: व्यंगचित्रकार आहेत. त्यांची भाषा व बोलणे व्यंगात्मक असते आणि अनेकदा व्यंगचित्राला पुरक ओळी लिहाव्या, तसे असते. मग त्यातली खोच समजून घ्यायची, की त्यातल्या शब्दकोषातील अर्थानुसार अन्वय करायचा? पण त्यावेळी अण्णांना वाकड्या तोंडाचा गांधी म्हटले म्हणजे अण्णांसारख्या समाजसेवकाचा घोर अवमान ठाकरे यांनी केला; अशी बोंब तमाम संपादक व शहाण्यांनी केली होती. मग त्यांना व्यंगचित्र वा त्यातील गर्भितार्थ कळत नाही, असेच म्हणायचे काय? ठाकरे यांच्यासारखा व्यंगचित्रकार शारिरीक व्यंग दाखवत नसून अण्णांच्या वागण्यातील राजकीय व्यंगावर बोट ठेवतो आहे, हे त्यावेळच्या संपादकांना कळले नव्हते. अन्यथा त्यांनी त्याच शब्दांबद्दल ठाकरे विरोधात इतके काहुर माजवले नसते. तेव्हाच कशाला आजही अनेक संपादकांना व्यंगचित्रातील किंवा व्यंगात्मक भाषेतील खोच कळत नाही. म्हणून तर परवा पुन्हा अण्णांची मुलाखत घेताना निखिलने अगत्यपुर्वक अण्णांना त्याच वाकड्या तोंडाच्या गांधीबद्दल प्रश्न विचारलाच.

   इतकी वर्षे उलटून गेल्यावर जर निखिलसारख्या संपा्दकाला त्यातले व्यंग वा उपहास कळत नसेल, तर व्यंगचित्र कळणे किती अवघड आहे, तेच लक्षात येते ना? की निखिलची अक्कल अजून अकरावीच्या मुलांपेक्षा कमी आहे म्हणायची? कारण सध्या ज्या व्यंगचित्रावरून वाद उसळला आहे ते अकरावीच्या वर्गातील मुलांसाठी प्रकाशीत करण्यात आलेले आहे. ज्या  देशातल्या संपादकांना व्यंगचित्रे वाचता व समजून घेता येते नाहीत, त्या देशात अकरावीच्या मुलांना व्यंगचित्र समजणे अशक्यच नाही का? मग त्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात बाबासाहेबांच्या व्यंगचित्राचा समावेश करणे चुकीचे नाही का? अण्णांना एका व्यंगचित्रकाराने वाकड्या तोंडाचा गांधी म्हटले, तर तो त्यांचा अवमान वा अवहेलना नाही तर त्यांच्या वागण्यावरचे व तात्कालीन राजकीय घडामोडींवरचे भाष्य़ होते. त्याच्यावर आक्षेप घेणार्‍यांनी आज बाबासाहेबांचे व्यंगचित्र प्रकाशीत करण्याचा आग्रह धरावा, हा विरोधाभास नाही काय? त्यांचा आजचा आग्रह खरा असेल, तर त्यांनी तेव्हा ठाकरे यांनी केलेल्या भाष्यावर आपणच घेतलेला आक्षेप मुर्खपणाचा होता अशी निदान प्रामाणिक कबूली द्यायला हवी ना? तसे नसेल आणि त्यांना आजही अण्णांवर ठाकरे यांनी केलेले त्यावेळचे व्यंगात्मक भाष्य चुकीचेच वाटत असेल, तर त्यांनीही सचिन खरात व अन्य आंबेडकरवाद्यांच्या सुरात सुर मिसळून पळशीकर यांचा निषेधच करायला हवा ना?

   पण यातले काहीही होणार नाही. दोन्ही वेळी आपल्याकडचे तथाकथित सेक्युकर शहाणे दुटप्पी वागत असतात. सत्य सांगण्यापेक्षा आपल्या सोयीनुसार प्रत्येक गोष्टीचे अर्थ लावून सामान्य माणसाच्या मनात गोंधळ माजवणे हाच त्यांचा उद्योग चालतो. त्यामुळे तेव्हा त्यांनी एका व्यंगात्मक भाषेतला गर्भितार्थ समजून घेण्याऐवजी काहुर माजवले होते आणि आज एका व्यंगचित्राला अविष्कार स्वातंत्र्याचे प्रतिक बनवायचे नाटक केले आहे. त्यातुन एकच गोष्ट स्पष्ट होते. या सेक्युलर शहाण्यांना व्यंगचित्रातले गर्भितार्थ कळत नाहीत, की आविष्कार स्वातंत्र्याशी कर्तव्य नाही. त्यांना प्रत्येक बाबतीत आपले राजकीय मतलब साधून घ्यायचे असतात. मग त्यासाठी अर्थाचा अनर्थ केला जात असतो. वडाची साल पिंपळाला लावली जात असते. राईचा पर्वत केला जात असतो. ठाकरे विरोधात काहूर माजवायचे असते, तेव्हा व्यंगचित्र वा त्यातील गर्भितार्थाला काडीची किंमत नसते. पण त्यांच्याच सेक्युलर टोळीतल्या पळशीकरांना त्याच गुन्ह्यातून वाचवायचे असले, मग व्यंगचित्रातला नसलेला गर्भितार्थ शोधून सांगितला जात असतो. त्यासाठी अविष्कार स्वातंत्र्याचे भजन चालू होते. ह्या सगळ्या वादात व्यंगचित्रकारांचा संबंधच काय? कुणाच्या व्यंगचित्राला दलित संघटना वा नेत्यांनी आक्षेप घेतलेला नाही. की कुणाचे व्यंगचित्र त्यांनी जाळलेले वगैरे नाही. मग तमाम व्यंगचित्रकार या वादात उतरले तरी कशाला? त्यापैकी एकालाही या सेक्युलर बदमाशीतले व्यंग ओळखता येऊ नये हे दुर्दैवच नाही काय?

   त्या व्यंगचित्राला एकाही आंबेडकरवाद्याने आक्षेप घेतलेला नाही. ज्याने ते काढले वा जेव्हा केव्हा प्रकाशित केले, त्यावरही आक्षेप नाही. आक्षेप आहे तो  पाठ्यपुस्तकातील प्रकाशनाला. शालेय वा सरकारी पाठ्यपुस्तकात त्याचा समावेश असावा काय, यावरून वाद झाला आहे. असे व्यंगचित्रच काढता कामा नये, बाबासाहेबांचे व्यंगचित्रच काढू नये; असे कोणीही म्हटलेले नाही. मग हा वाद व्यंगचित्रकला विरुद्ध आंबेडकरवादी असा नाहीच. पण तो तसा आहे, असा गैरसमज माध्यमांनी दोन्ही बाजूंचा करून दिला आहे. त्यांच्यात जाणीवपुर्वक भांडण लावण्याचा उद्योग केला आहे. त्यांनी एकमेकांच्या अंगावर धावून जावे, असाच संपादक व माध्यमांचा प्रयत्न दिसतो आहे. मूळ आक्षेप व्यंगचित्राला नसून त्याच्या पाठ्यपुस्तकातील समावेशाला आहे. ते सत्य लपवण्यासाठी मग अकारण व्यंगचित्रकारांना यात ओढले गेले. त्यासाठी मग आजचे विद्यार्थी कसे प्रगल्भ बुद्धीचे आहेत व त्यांना व्यंगचित्रेही कळतात अशी मखलाशी केली गेली. पण त्या प्रगल्भतेचे प्रमाणपत्र देणार्‍यांना आजच्या काळातील ठाकरे या व्यंगचित्रकाराच्या भाषेतील व्यंग समजू शकत नसेल, तर त्यांच्या प्रमाणपत्राची किंमत ती काय? एखाद्या बोगस विद्यापीठाने दिलेल्या खोट्या पदवीपेक्षा या संपादकांच्या प्रमा्णपत्राची लायकी अधिक आहे काय?

   तर या वादात व्यंगचित्रकारांनी उतरण्याचे काहीही कारण नव्हते आणि कोणी त्यांना त्यात ओढत असेल, तर त्याला नकार देण्याची गरज होती. त्यात विवेक मेहेत्रे या व्यंगचित्रकाराने एक सत्य सांगितले. पण त्याकडे कोणी लक्षच दिले नाही. आम्ही व्यंगचित्रकार कुणाला घाबरत नाही व धाडसी चित्रे काढू शकतो. पण हल्ली संपादकच काही धाडसी छापायला धजावत नाहीत. किंबहूना संपादकांनाच आक्रमक काहीही छापायचे नसते, असे मेहेत्रे यांनी सवालाचे उत्तर देतांना सांगितले. त्याचा अर्थ काय? तर व्यंगचित्रकलेची गळचेपी कुणी राजकीय गुंड वा नेते करीत नसून, खुद्द माध्यमांचे संपादकच ती गळचेपी करीत असतात. मग चर्चाच करायची असेल तर आजच्या संपादकीय हुकूमशाही व दडपशाहीची करायला हवी होती. पण निखिलच्याच कार्यक्रमात मेहेत्रे यांनी हा गंभीर आरोप केला असतानाही, त्याने त्याकडे साफ़ दुर्लक्षेच केले. कारण उघड आहे. त्याला वा त्याच्यासारख्या संपादक सेक्युलर पत्रकारांना सत्याचे वावडे आहे. त्यांना सत्य किंवा अविष्कार स्वातंत्र्याशी कर्तव्य नाही, की व्यंगचित्रकलेबद्दल आस्था नाही. त्यांना आंबेडकर व्यंगचित्रासंबंधी पळशीकर यांच्या चुकांवर पांधरूण घालायचे होते. आणि तसे करताना पाहुण्यांच्या काठीने साप मारायचा होता. तेवढ्यासाठीच या वादात व्यंगचित्रकारांना बेसावधपणे ओढण्यात आले.

   निखिल किंवा तत्सम अविष्कार स्वातंत्र्यवादी आज शंकरच्या त्या व्यंगचित्राचे व ते पाठ्यपुस्तकात प्रसिद्ध करणार्‍या पळशीकरांचे प्रामाणिकपणे समर्थन करीत असतील तर त्यांनी तेवढ्याच उत्साहात अण्णांना वाकड्या तोंडाचा गांधी म्हणणार्‍या ठाकरे यांच्या विधानाचे समर्थन तेव्हा करायला हवे होते व आजही करायला हवे. पण तसे होत नाही. यांचे निकष व मोजपट्ट्य़ा माणूस व त्याच्या राजकीय भूमिकेनुसार बदलत असतात. कॉग्रेसने वा कोणा तथाकथित सेक्युलराने पाप केले तरी ते पुण्य असते आणि कुणा पुण्यवंताने सदहेतूने चांगले काम केले, पण तो या सेक्युलर मंडळींच्या पठडीतला नसेल, तर ते पुण्यही पाप ठरवण्यासाठी बौद्धिक कसरती सुरू होतात. आज पळशीकरांचे समर्थन चालू आहे, ती अशीच एक केविलवाणी बौद्धिक कसरत आहे. त्यात कुठे प्रामाणिकपणा नाही की वैचारिक न्यायबुद्धी नाही. त्यामुळेच राईचा पर्वत केला जात असतो. पण निदान पर्वत करायला राई तरी हवी ना? आजच्या वादात व्यंगचित्रकलेला विरोध वा अविष्कार स्वातंत्र्यावर गदा आल्याची ती राई कुठे आहे ते कोणी दाखवून देईल का?   (क्रमश:)
भाग   ( २७० ) २०/५/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा