मंगळवार, २३ जुलै, २०१३

इतक्या शतकांनंतर गॅलिलीओला माफ़ी कशाला?



  अलिकडेच काही वर्षापुर्वी व्हॅटीकन या ख्रिस्ती धर्माच्या जगातील सर्वोच्च पीठाचे प्रमुख पोप महोदयांनी गॅलिलीओ याची शिक्षा माफ़ केली. जो माणूस कित्येक शतकापुर्वी मरून गेला आहे, त्याला आता शिक्षा माफ़ करून काय उपयोग? पण त्याने असा कोणता गुन्हा केला होता आणि त्याला ख्रिस्ती धर्ममार्तंडांनी शिक्षा कशाला दिलेली होती? आणि अशा त्या एका माणसाच्या शिक्षेची ती महत्ता इतकी काय असावी, की कित्येक शतकांनंतर विसाव्या एकविसाव्या शतकातील पोपनी कागदोपत्री गॅलिलीओची शिक्षा माफ़ करावी व तशी नोंद करावी? तर तो इतिहास सुधारण्याचा तो प्रयत्न असतो. गॅलिलीओ हा कित्येक शतके जुना वैज्ञानिक होता आणि त्याने सूर्य पृथ्वी भोवती फ़िरत नसून पृथ्वीच सूर्याभोवती फ़िरते; असा शोध लावला होता. पण त्याचा हा सिद्धांत ख्रिश्चन धर्मग्रंथ बायबल वा पुराणकथांतील समजूतींना छेद देणारा होता. तिथे धर्मसत्ता व राजसत्ता एकत्र गुण्यागोविंदाने नांदत होते. एकाने दुसर्‍याच्या नावे बोटे मोडत राजकीय सत्ता राबवली जात नव्हती. त्यामुळेच धर्मसत्तेच्या तत्वांना व समजूतींना आव्हान देणार्‍याला बहिष्कृत करून कठोर शिक्षाही फ़र्मावल्या जात होत्या. आज आपण गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत सेक्युलर विद्वान बोलताना ऐकतो, नेमकी तशीच तेव्हाच्या ख्रिश्चन जगातील धर्माचार्यांची भाषा असायची आणि राजेही त्यांच्या इच्छेनुसारच कायद्यांचे ‘राज्य’ चालवित असत. सहाजिकच ख्रिश्चन पुराणातील समजूतींना तडा जाईल, असे काही विधान करणे वा सिद्धांत मांडणे म्हण्जे धर्मबुडवेगिरीच होती. म्हणूनच असे काही करणारा म्हणजे एकूणच समाजासाठी धोका मानला जायचा. मग सूर्याभोवती पृथ्वी फ़िरते हे भले वैज्ञानिक सत्य असेल, पण ते तात्कालीन राजकीय समजूती म्हणजे तत्वज्ञानात बसणारे नव्हते. उलट त्याला छेद देणारे असेल तर त्याला गुन्हाच मानले जाणार ना? सहाजिकच गॅलिलीओ सामाजिक गुन्हेगार होता. त्यामुळेच त्याच्या सिद्धांताला आक्षेप घेण्यात आला आणि त्याला विनाविलंब माफ़ी मागायचे व धर्मपीठाच्या समोर हजर होण्याचे आदेश देण्यात आले. सत्तेपुढे शहाणपण नाही, म्हणत गॅलिलीओ तिथे हजर झाला आणि झटपट माफ़ी मागून मोकळाही झाला. असा तो कित्येक शतकापुर्वीचा इतिहास आहे.

   अकरा वर्षाचा काळ उलटून गेला आणि गुजरातच्या दंगल प्रकरणात एकही आरोप वा गुन्हा साबीत करणारा पुरावा मोदी यांच्या विरोधात समोर कोणी आणू शकलेला नाही. म्हणून आपल्याकडल्या सेक्युलर धर्माचार्यांच्या समजूतीचे तत्वज्ञान बदलले आहे काय? ते त्याचा आवेशात गेली अकरा वर्षे मोदी यांच्याकडे दंगलीबद्दल माफ़ी मागण्याचा हट्ट कायम करीत आहेत. सुदैवाने गॅलिलीओच्या काळात धार्मिक सत्ता जितकी बळकट होती, तितकी सर्वंकश सत्ता आजच्या सेक्युलरांकडे नाही. अन्यथा इतक्यात गॅलिलीओप्रमाणे मोदींना माफ़ी मागावीच लागली असती. पण आज राजसत्ता सेक्युलर धर्ममार्तंडंच्या इशार्‍याने चालत असली, तरी न्यायसंस्था त्यापासून विभक्त असल्याने मोदी सेक्युलर धर्माचार्यांना झुगारण्याची हिंमत करू शकले आहेत. गॅलिलीओला तो पर्याय नव्हता, की पुरावे मागायची मुभा नव्हती, इतकी तात्कालीन धर्माचार्यांनी निरंकुश सत्ता होती. सुदैवाने आज तसे वास्तव नाही. सेक्युलर धर्माचायांना अधिकार नसल्याने मोदी माफ़ी मागण्याऐवजी पुरावे मागत आहेत. तसे नसते तर सेक्युलरांचे अर्धसत्य साईबाबा विजय तेंडूलकरांनी मोदींना थेट गोळ्याच घातल्या असत्या आणि तमाम सेक्युलर भोवती टाळ्या पिटताना दिसले असते. तर अशीच कुठल्याही ‘समजुत’दार विद्वानांची प्रत्येक युगातली कहाणी असते. काळ बदलतो, बौद्धिक विकास होतो, तशा व्यवस्था बदलतात आणि श्रद्धाही बदलतात. पण ‘समजूत’दार कायम असतात. कालच्या समजूतीला आज अंधश्रद्धा म्हणत व त्यांची निंदानालस्ती करत हे ‘समजूत’दार नव्या समजूतीच्या श्रद्धांचे दुकान थाटत असतात. आज सेक्युलॅरिझम अशीच एक पाखंडी कल्पना व अंधश्रद्धा बनून गेली आहे. तिला कुठला वैज्ञानिक आधार नाही, तर त्याचे जे कोणी धर्माचार्य व अंधभक्त आहेत, त्यांची समजूत म्हणजे सेक्युलॅरिझम अशी स्थिती आलेली आहे. म्हणूनच तेव्हा गॅलिलीओकडे माफ़ी मागणार्‍यांना जसा पृथ्वीभोवतीच सूर्य फ़िरतो, याचा कुठला पुरावा देता येत नव्हता; पण ते सक्तीने आपल्या इच्छा त्याच्यावर बळजोरीने लादत होते, त्यापेक्षा आजच्य सेक्युलरांची अवस्था वेगळी आढळणार नाही. अर्थात त्यामध्ये त्यांचा दोष नाही. बुद्धीमान असल्याचा एकदा पक्का भ्रम झाला आणि आपल्या समजूतीबद्दल ठाम मत पक्के झाले; मग माणुस आपोआपच त्याच अवस्थेत जातो. त्यासाठी सेक्युलरांना दोष देता येणार नाही. तो काळाचा महिमा आहे.

   पण आज इथे इतक्या जुन्या कहाणीचा उल्लेख मी कशाला करावा? मोदी आणि गॅलिलीओ अत्यंत भिन्न काळातली व्यक्तीमत्वे आहेत. पण त्या दोघांमध्ये एक हे माफ़ी वगळता आणखी एक साम्य आहे. आपल्या संशोधनात व अभ्यासात व्यत्यय नको, म्हणून गॅलिलीओने विनाविलंब माफ़ी मागून टाकली होती, म्हणजे त्याने आपण काही गुन्हा केल्याचे मानले नव्हते. मुर्खांच्या नादी लागून आपला मूल्यवान वेळ वाया दवडण्यापेक्षा त्याने त्यांना आवडणारे व मान्य होणारे उत्तर देऊन खुश केले होते. त्यामुळे वस्तुस्थिती बदलणार नव्हती, की गॅलिलीओचा सिद्धांत खोटा पडणार नव्हता. पण अशा मुर्खांच्या नादी लागला, तर अधिक संशोधन करण्याचा त्याचा वेळ मात्र बरबाद झाला असता. तो बहुमोल वेळ वाचवण्यासाठी त्यांना माफ़ीने खुश करून गॅलिलीओने आपले संशोधन पुढे चालू ठेवले. इतकेच नव्हेतर माफ़ी मागून झाल्यावर तो मित्रांना म्हणालाही, माझे मत व सिद्धांत कायम आहे. त्याच्या म्हणण्याचा अर्थ इतकाच होता, की काळच या मुर्खांना मुर्ख सिद्ध करील. ते काम आपण आताच करण्याचे कारण नाही. नरेंद्र मोदी यांनी आरंभीच्या पाच सहा वर्षात मुर्खांच्या नादी लागण्याचा व त्यांना ‘शहाणे’ करण्याचा प्रयासही केला. पण जेव्हा आपल्या कामाचा वेळ मुर्खांसाठी वाया जातोय, हे कळल्यावर त्यांनी गॅलिलीओप्रमाणे या सेक्युलर मुर्खांकडे साफ़ काणाडोळा करण्याचा पवित्रा घेतला. निदान मागल्या चार पाच वर्षात तरी त्यांनी कोणालाही मुलाखत देण्याचे कटाक्षाने टाळले आहे, तो त्याचा पुरावा म्हणता येईल. ज्याला समजूनच घ्यायचे नसते, त्याच्यासाठी आपला वेळ समजावण्यात घालवणे म्हणजे मुर्खपणाच असतो, त्याचेच प्रात्यक्षिक मोदी यांनी दिले आहे. त्यामुळेच आज त्यांनी केलेल्या कामाची जी उलटसुलट चर्चा होत असते, ती मजल मोदी मारू शकले आहेत. समजा तेही काम न करता मोदी या सेक्युलर शहाण्यांची ‘समजूत’ काढत बसले असते; तर त्यांना पुढले काम करता आलेच नसते किंवा आज राष्ट्रीय नेता होण्यापर्यंत मजलही मारता आली नसती. दहा अकरा वर्षे मोदींवर आरोपांची सरबत्ती चालू आहे आणि प्रत्येकवेळी आता मोदी अडकलाच म्हणून आवया ऊठवणारे खोटेच पडले आहेत. पण म्हणून त्यांचा ‘समजूत’दारपणा कमी झाला आहे काय बघा? आपल्या कामातूनच मोदी म्हणजे विध्वंस व दंगली ही ‘समजूत’ मोदींनी खोटी पाडली आहे. पण हे समजायला व उमजायला धर्माचार्य असतात, त्यांना कित्येक शतके व अनेक पिढ्या खर्ची घालाव्या लागतात. मग त्यातून या सेक्युलर धर्माचार्यांची सुटका कशी असेल?

   आपला एकही आरोप सिद्ध होत नाही, आपला एकही आडाखा खरा ठरत नाही, तरी आपणच खरे व योग्य असल्याचा दावा करणार्‍यांबद्दल काय बोलायचे? त्यांना त्यांच्याच ‘नंदनवनात’ बागडायला सोडून देणे योग्य नाही काय? मोदींनी नेमके त्याच बाबतीत गॅलिलीओचे योग्य अनुकरण केलेले आहे. त्यामुळेच ज्यांना मोदींची बदनामी व अपप्रचार करायचा असेल, त्यांना आपण त्यात सहकार्य करावे असे माझे मत आहे. कारण त्यांना समजून घ्यायचेच नसेल आणि असे लोक ‘समजूती’मध्ये खुश असतील; तर त्यांची खुशी हि्रावून घेण्याचा आपल्याला अधिकार नाही, असे मला वाटते. म्हणजे काय करायचे? तर अशा मोदी विरोधकांना त्यांनी पसरवलेल्या अफ़वा, थापा, अपप्रचार, दिशाभूल करण्यास आपण अधिकाधिक प्रोत्साहन दिले पाहिजे. कारण मोदींना यातूनच अधिक ताकद मिळत राहिली आहे. ज्यांना खरेच मोदी पंतप्रधान व्हावेत असे वाटते, त्यांनी आपल्या परीने मोदी विरोधकांना प्रोत्साहन दिल्याने काय होईल? तर प्रत्यक्ष निवडणुका येईपर्यंत ते सातत्याने मोदी विरोधी आघाडी तशी जोमाने लढवतील आणि मोदी यांच्यासाठी असा कडवा विरोध अत्यंत पोषक व आवश्यक आहे. आव्हानाला सामोरे जाणे मोदींना आवडते आणि तितके समर्थ आव्हान व अडचणी समोर नसतील; तर मोदी ढिले पडतात, असेच गेल्या दहा वर्षात सिद्ध झालेले आहे. जर त्यांचे विरोधक ढिले पडले व आव्हान सोपे झाले, तर मोदी गाफ़ील होण्याचा धोका आहे. आणि असे माझे मत नाही, तर एका अभ्यासू कट्टर मोदी विरोधकाचा निष्कर्ष आहे. ज्येष्ठ उर्दू पत्रकार व समाजवादी पक्षाचे माजी खासदार शाहीद सिद्दीकी यांनी वृत्तवाहिनीच्या एका चर्चेत सहभागी होताना, ही बाब नेमकी लक्षात आणून दिली. त्यांचे एक वाक्य मला खुपच आवडले. ते म्हणाले, आपल्या दहा वर्षातील टिका व आरोप यांनी मोदींना मोठेच बळ मिळाले आहे. मोदी हे आपल्या शत्रू व विरोधकांच्या आव्हानातून बळ मिळवतात. तेव्हा त्यांच्यावरील बदनामीच्या हल्ल्यापासून परावृत्त व्हावे लागेल. त्यापेक्षा मोदींसमोर खरेखुरे राजकीय कृतीशील आव्हान उभे करावे लागेल. कारण आरोप व बदनामीनेच मोदींना इतकी मजल मारता आलेली आहे. काहीसे चक्रावून सोडणारे असे सिद्दीकी यांचे विरोधाभासी विधान आहे. ते मोदींना शिव्याशाप देत बसलेल्यांना समजले नाही, समजून घेण्याची गरजही वाटलेली नाही. पण मोदी समर्थकांनी सिद्दीकींचे विधान काळजीपुर्वक समजून घ्यायला हवे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा