गुरुवार, १८ जुलै, २०१३

ममतावर अन्याय





   गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी कुठे गेले, कोणाला भेटले व काय बोलले, त्याची आपल्या देशात मोठी बातमी होते, नुसते बोलले नाही, तर त्यानी काय शब्द वापरले त्यावरही मोठा उहापोह चालत असतो. बाहेरच्या देशात कोणी आपल्या वाहिन्या बघत असेल वा वृत्तपत्रे वाचत असतील, तर त्यांना वाटेल भारतामध्ये गुजरात नावाचे एकच राज्य आहे आणि तिथे मोदी नावाचा एकमेव मुख्यमंत्री आहे. अन्यथा बाकी कुठली राज्ये नाहीत, की कुठला मुख्यमंत्री नाही. कदाचित भारताविषयी अनभिज्ञ परदेशी माणूस असेल तर त्याला वाटेल, की मुख्यमंत्री नरेंद्र मोदीच भारताचा एकमेव राष्ट्रीय नेता असावा. बाकी पंतप्रधान वा राष्ट्रपती अशा कोणत्याही व्यक्ती नसाव्यात. कारण देशात अडिच डझन मुख्यमंत्री आहेत आणि शेकडो नामवंत नेते आहेत. त्यापैकी कोणाला इतकी प्रसिद्धी मिळत नाही, की त्यांच्या हालचाली वा बोलणे वादग्रस्त होत नाही. खरे तर हा पंतप्रधानांसह बहुतांश नेत्यांवर मोठाच अन्याय आहे. एकवेळ पंतप्रधानांचे ठिक आहे. ते सहसा तोंडच उघडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावरून वाद झाला नाही, तर समजू शकते. पण त्याखेरीज निदान डझनभर तोंडाळ नेते आहेत, ज्यांची अनेक विधाने व बोलणे वादाचे असते. पण त्यांची कोणी दखलही घ्यायला राजी दिसत नाही. कदाचित मोदी यांच्या सोबत आपल्यालाही प्रसिद्धी मिळावी म्हणून हे अन्य काही नेते वादग्रस्त बोलत असतील. पण मग त्यांच्या तशा विवादास्पद बोलण्याची का दखल घेतली जात नाही? की त्यांना अनुल्लेखाने मारण्याचेच माध्यमांनी ठरवले आहे? उदहरणार्थ बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जी घ्या. गुजरातपेक्षा मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. पण त्यांना मोदींच्या तुलनेत इवलीही प्रसिद्धी मिळू नये?

   गुरूवारी ममता बानर्जी यांनी मोठेच वादग्रस्त विधान केले. मोदींच्या मुलाखतीमध्ये कुत्र्याचे पिल्लू आल्याने अस्वस्थ होऊन गेलेल्या लोकांसाठी ममताजींनी किती चांगली मेजवानीच मुर्शिदाबाद येथील भाषणातून दिली होती. पण कोणी पत्रकार त्या पंगतीला फ़िरकलाच नाही. ममता सध्या राज्यातील पंचायत निवडणूकीच्या प्रचारात गर्क आहेत. त्या निवडणुका त्यांना हव्या त्यावेळी आयोगाने घेतल्या नाहीत, म्हणुन ममता आधीच चिडल्या आहेत. त्यासाठी त्यांनी राज्य निवडणूक आयोगावर उघडपणे तोंडसुख घेतलेले आहे. खरे तर मोदींपेक्षा ममताची विधाने स्फ़ोटक होती. पण त्याची दखल घेऊन पाठ फ़िरवण्यात आली. त्यामुळे ममता अधिक खवळल्या आणि म्हणूनच त्यांनी त्याहीपेक्षा अधिक स्फ़ोटक विधान केले, ते समजण्यास मार्ग नाही. त्यांनी कॉग्रेसचे दिल्लीतील मंत्री आगामी लोकसभा निवडणुकीनंतर भिकारी होतील, असे जाहिर करून टाकलेले आहे. कारण आगामी लोकसभा निवडणुकीनंतर कॉग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याची तिळमात्र शक्यता नाही, असे ममतांचे भाकित आहे. आणि त्यामुळे सता गमावलेले कॉग्रेसचे मंत्री भिकेला लागतील असे त्यांना सुचवायचे आहे. निवडणुका हरणे समजू शकते. पण तेवढ्यामुळे कुठल्या मंत्र्यावर वा पुढार्‍यावर भिक मागण्याचा प्रसंग अलिकडल्या काळात तरी कोणाच्या बघण्यात नाही. मंत्रीच कशाला, सामान्य नगरसेवक वा आमदारही एका मुदतीत सात पिढ्यांना लागणारी संपत्ती गोळा करून घेतो अशी भारतीय लोकशाहीची ख्याती आहे. त्यामुळे निवडणूक हरल्याने कॉग्रेसमंत्री भिकेला लागतील, हा निष्कर्ष ममतांनी कुठून कशाच्या आधारे काढला, हे बघायला हवे. त्यावर सांगोपांग चर्चा व्हायला हवी. पण इतक्या मोठ्या भाकिताकडे माध्यमांनी साफ़ दुर्लक्ष केले आहे.

   हे बघितले मग मोदींना विपरित का होईना, मुद्दाम माध्यमे प्रसिद्धी देतात व इतरांवर जाणीवपुर्वक अन्याय करतात, असेच म्हणावे लागते. मोदींनी कुत्र्याचे नाव घेतले तरी प्राणिमात्राचा अपमान झाला म्हणून कल्लोळ करणार्‍या माध्यमांना काय म्हणायचे? कुत्र्याच्या पिल्लापेक्षा त्यांना कॉग्रेसचे केंद्रातील मंत्री नगण्य वाटतात काय? नसतील तर त्यांनी ममताच्या असल्या विधानाला भिक कशाला घालू नये? कदाचित मोदी जे बोलतील ते नक्की चुकच असते आणि आक्षेपार्हच असते; अस पत्रकारीतेचा एक पक्का धडा असावा. त्यामुळे प्रत्येक पत्रकार मोदींच्या शब्दाशब्दामध्ये खोड शोधत असावा. आणि त्याचाच दुसरा भाग म्हणजे मोदी वा भाजपाचा कुठला नेता सोडून अन्य कोणी कुठल्याही पक्षाचा नेता काहीही बरळला; तरी ते सभ्य व सुसंस्कृतच मानायचे असा पत्रकारितेचा आणखी एक धडा असावा. मोदी तरी कॉग्रेसवर नेमकी, मोजकी टिका करतात. ममतांनी त्याच्याही पुढे जाऊन कॉग्रेसवर बेताल व बेछूट आरोप केलेत. कॉग्रेस देशच विकायला निघाली आहे, गरीबाच्या जीवावर उठली आहे. गॅस महाग करून ठेवला आहे. मुस्लिमांचा सणाचा महिना असताना मुद्दाम पंचायत निवडणूका डाव्यांनी घ्यायला भाग पाडले, असे कित्येक आरोप ममतांनी केलेत, मोदींच्या तुलनेत ममतावर तर दोनचार तास सलग चर्चा व्हायला हव्यात. पण तिकडे कोणी ढुंकून बघायला तयार नाही. याचा अर्थच ममता बोलतात, ते योग्यच असले पाहिजे. खरेच असले पाहिजे. नसेल तर मग त्याला ममतांवरचा भयंकर अन्याय मानला पाहिजे. कारण इतकी गंभीर विधाने व आरोप करूनही त्याची कोणी दखल घेत नाही. मग कशाला न्याय आणि कोणावर अन्याय म्हणायचे?

=========
 नमो २४ घंटे
=========

   सध्या कुठल्याही वाहिनीवर बातम्या बघण्याची वा ऐकण्याची सोय राहिलेली नाही. कुठले वर्तमानपत्रही वाचायची गरज उरलेली नाही. त्यात ‘ओम नमो शिवाय’ दुसरे काहीच नसते. जणू या देशात गुजरातची दंगल घडल्यानंतर काहीच घडलेले नाही आणि घडलेच वा घडतच असेल; तर ते मोदी काही करतात तेवढेच. अन्यथा काही घडायला वावच उरलेला नाही. कारण बातम्या व चर्चेची अर्धीअधिक वेळ त्याच दोन घटनांनी व्यापलेली असते. नरेंद्र मोदी काही बोलले वा कुठे गेले, तर ती बातमी असते आणि अर्थातच तिथे जाऊन वा काही बोलून त्यांनी मोठेच काही पाप केलेले असते. बाकी भारतामध्ये काही घडत नाही. याच महिन्याच्या आरंभी बिहारच्या गया जिल्ह्यात महाबोधी मंदिरामध्ये एक मोठी घातपाताची घटना घडून गेली आहे. त्यात गुंतलेले कोणी संशयितही अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्याच संदर्भाने कोणीतरी मुंबईत असेच स्फ़ोट करण्याची धमकी दिलेली आहे. त्याबद्दलही कोणी पुढली बातमी वा माहिती देण्याचा विचार करत नाही. स्फ़ोटासारख्या घातपाती घटना व त्याचे परिणाम याकडे साफ़ डोळेझाक करून शुक्रवारी युरोपातल्या एका वृत्तसंस्थेला मोदी यांनी दिलेल्या मुलाखतीवरून काहूर सुरू झाले. त्यात मोदी यांनी गाडीखाली कुत्र्याचे पिल्लू सापडण्याबद्दल जे मतप्रदर्शन केले; त्याची सर्वांना इतकी फ़िकीर होती, की आजवर शेकडो स्फ़ोटात मृत्यूमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांच्या जीवाची काही किंमतच नसावी. मोदी यांनी कुत्र्याच्या पिल्लाचीच उपमा कशाला द्यावी; यावरून शब्दांचे मनोरे उभे केले जात होते आणि कोसळूनही पाडले जात होते. पण तसे बोलताना मोदी यांना काय म्हणायचे आहे वा सुचवायचे आहे त्याकडे कोणाचे लक्षही नव्हते.

   माणुस हा किती हळवा प्रांणी आहे ते समजावण्यासाठी मोदी यांनी म्हटले गाडीखाली कुत्र्याचे पिलू सापडले, तरी आपण हळहळतो. आपण दु:खी होतो. तेव्हा त्यांना माणसाच्या मृत्य़ुने किती दु;ख होत असेल, असेच सुचवायचे आहे. त्यात मारल्या जाणार्‍या वा मरणार्‍या माणसांना कुत्रा संबोधण्याचा त्यांचा हेतू नाही. पण ज्यांना कंड्याच पिकवायच्या असतात, त्यांच्यासाठी वडाची साल पिंपळाला लावणे आवश्यकच असते. तसेच झाले आणि त्या परदेशी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखती तपशीलाकडे साफ़ पाठ फ़िरवून कुत्र्याच्या पिल्लावर सगळे गिधाडाप्रमाणे तुटून पडले. ही आता एक फ़ॅशन झाली आहे. आणि त्यालाच कंटाळलेल्या मोदी यांनी गेल्या तीच चार वर्षापासून भारतीय माध्यमांशी बोलणेच बंद केले आहे. जे आपल्या शब्दाचा अनर्थच करण्याची खात्री आहे, त्यांना टाळणे हा उत्तम मार्ग मोदींनी चोखाळला आहे. पण माध्यमांचे दुर्दैव आता असे आले आहे, की त्यांना आपली लोकप्रियता टिकवण्यासाठी मोदींच्या नावाचा व चेहर्‍याचा वापर अगत्याचा झालेला आहे. हे रहस्य मोदींनाही उमगलेले आहे. त्यामुळेच त्यांनी भारतीय माध्यमांवर बहिष्कार घातला असून आपल्याला हवे ते अन्य माध्यमातून मोदी थेट लोकांपर्यंत पोहोचवू लागले आहेत आणि आपली टीआरपी वा खप राखण्यासाठी माध्यमांनाच मोदीबद्दल बरेवाईट छापावे वा सांगावे लागते आहे. तसे सांगण्याच्या शर्यतीमध्ये मग थापा मारण्यापर्यंत मजल गेली आहे. उत्तराखंडात ढगफ़ुटीनंतर पोहोचलेल्या मोदींनी काय काय केले, ते सांगताना टाईम्ससारख्या मान्यवर दैनिकाकडून अफ़वा पसरवली गेली आणि आता त्याला जाहिर माफ़ी मागण्याची वेळ आली. मात्र टाईम्सवर विसंबून बाकीच्यांनी केलेली बकवास तोंडघशी पाडणारी ठरली आहे.

   ढगफ़ुटी व नंतरचा महापूर आल्यावर तिथे मदतीला पोहोचलेल्या मोदींनी माध्यमांना वा पत्रकारांना काहीही सांगितले नव्हते. त्यांच्या पक्षातर्फ़े वा गुजरात सरकारनेही त्या मदत कार्याबद्दल कोणाला अधिकृत माहिती दिली नाही. पण मोदी तिथे चमकायला गेले अशी टिका मात्र सगळीकडून झाली. प्रत्यक्षात तिथे गेलेल्या मोदींनी आपल्या राज्याच्या सरकारी आपत्ती व्यवस्थापनाची टीम तिथे बोलावुन घेतली होती. त्यांच्यावर काम सोपवून मोदी उत्तराखंडातून निघाले. मग मोदी विषयक बातमीच्या मागे धावणार्‍या टाईम्सच्या पत्रकाराने स्थानिक भाजपाच्या कार्यकर्त्या विचारून माहिती गोळा केली व त्याने उत्साहाच्या भरात जे काही सांगितले त्याचा तारतम्याने विचारही न करता टाईम्समध्ये अतिरंजीत बातमी छापली गेली. मग तिची चिरफ़ाड सुरू झाली. मोदींनीच अशी खोटी माहिती दिली असे आरोप झाले, त्यांची टवाळी करण्यात आली. पण मोदींनी त्याचेही उत्तर दिले नाही, की खुलासे पाठवले नाहीत. शेवटी आपली बातमी खोटी व अतिरंजित असल्याचे त्याच पत्रकाराला व टाईम्सला खुलासा करून सांगायची वेळ आली. थोडक्यात आता मोदी या विषयात माध्यमांची विश्वासार्हता पुरती रसातळाला गेलेली आहे. त्यांनी कितीही विरुद्ध लिहिले व अफ़वा पसरवल्या; तरी मोदींना त्याचा खुलासाही करण्याची गरज वाटेनाशी झाली आहे. तर दुसरीकडे माध्यमांना मात्र मोदींच्या लोकप्रियतेचे लाभ हवे असल्याने रोजच्या रोज खरेखोटे काहीही सांगत मोदींचे नाव बातमीत आणायची नामुष्की आलेली आहे. त्यामुळेच मग उपग्रहवाहिन्यांची अवस्था मोदी २४ घंटे म्हणावी, तशी झालेली आहे. जणू क्रिकेटच्या सामन्याचे समालोचन करावे तसे मोदींच्या हालचाली व बोलीचे प्रसारण चालू असते.

1 टिप्पणी: