बुधवार, ८ मे, २०१३

कर्नाटकातील भाजपाच्या पराभवाच्या निमित्ताने





   कर्नाटकातील भाजपाचा पराभव ही अपेक्षित गोष्ट होती. पहिली बाब म्हणजे मतचाचण्यांनी त्याचे भाकित केलेले होते. हल्ली आपल्याकडे चाचण्यांचे तंत्र खुप पुढारले आहे. त्यामुळे नेमके आकडे सांगता येत नसले, तरी अशा चाचण्या घेणार्‍यांचे सरसकट अंदाज चुकत नाहीत. बहूमत मिळते वा थोडक्यात चुकते. पण पराभवाच्या छायेत असलेल्यांना मोठे यश मिळणे, किंवा विजयाची खात्री दिलेल्याचा दारूण पराभव होणे; असे सहसा घडत नाही. सहाजिकच भाजपाचा पराभव व्हायचा, हे आधीच ठरलेले होते. पण कुठलाच पक्ष आधीपासून पराभव मान्य करून निवडणूका लढवू शकत नसतो. म्हणूनच पराभवाची खात्री असून्ही मोठे दावे केले जातात. तेच भाजपाचे नेते करीत होते. पण चाचण्य़ामुळे त्यांना पक्षाचा पराभव होणार हे कळले; असेही मानायचे कारण नाही. गेल्या पाच वर्षात भाजपाची व त्यांच्या नेत्यांची कर्नाटकातील कामगिरी पाहिल्यास, त्यांनी पराभवाचीच तयारी केली होती; हेसुद्धा कोणी नाकारू शकत नाही. सत्ता मिळाल्यापासून त्याची सुरूवात झाली होती. मात्र तेव्हा लोकांनी दिलेल्या संधीची आपण माती करतोय, याचे आरंभी भान नव्हते आणि जेव्हा भान येऊ लागले, तेव्हा सावरण्याची वेळ टळून गेली होती. आता तेच भाजपा नेते आत्मपरिक्षण करणार असेही सांगत आहेत. पण गंमत अशी असते, की अपयश मिळाल्यावरच आत्मपरिक्षण करायचे नसते. तर विजय मिळाला तरी आत्मपरिक्षणाची अतिशय आवश्यकता असते, याचे भान ठेवले गेले नाही. आज कॉग्रेस पक्षाची नेमकी तशीच अवस्था असणार. भाजपा का हरला वा आपण का जिंकलो, त्याचा विजयी कॉग्रेसमध्ये विचार होण्याची शक्यता कमीच आहे. कारण यशाखाली सर्वकाही झाकले जात असते. तेच पाच वर्षापुर्वी भाजपाचे झाले होते व आज कॉग्रेसचे होणार आहे.

   भाजपाच्या आजच्या पराभवाचे विश्लेषण करण्यापेक्षा, आधी भाजपाच्या पाच वर्षापुर्वीच्या विजयाचे विश्लेषण करणे अगत्याचे ठरेल. कारण त्या दक्षिण दिग्विजयातच आजच्या पराभवाची बीजे पेरली गेली होती. कोणत्या कारणासाठी व कोणत्या परिस्थितीत भाजपाला लोकांनीस सत्ता बहाल केली होती? कॉग्रेस वा सेक्युलर जनता दलाच्या नेत्यांचे चेहरे वा वस्त्रे-प्रावरणे लोकांना आवडत नव्हती; म्हणून लोकांनी भाजपाला इतक्या जागा देऊन सत्तेवर बसवले होते काय? की त्या अन्य पक्षाच्या नेत्यांची नावे लोकांना पसंत नव्हती? सामान्य जनतेला तुमच्या पक्षाची नावे, धोरणे वा विचारधारा यांच्याशी कर्तव्य नसते. ही सगळी माध्यमांची पोपटपंची असते. लोकांना कर्तव्य असते ते सरकारचा कारभार व नित्यजीवनातील स्थैर्याशी. सामान्य जनतेला भेडसावणारे असे प्रश्न व समस्या असतात, त्या बाबतीत सरकार काय करते याच्याशी जनतेला कर्तव्य असते. सामान्य माणसाच्या गरजा खुप कमी असतात. तेवढया भागल्या, तरी जनतेचे जीवन सुसह्य व सुखकर होता असते. बाकी मोठमोठ्या योजना व आमिषे जनतेला नको असतात व त्यासाठी मतेही मिळत नसतात. आधी जे कोणी सत्तेवर आहेत, त्यांच्या कारभाराने जीव मेटाकुटीला आला, म्हणून लोक सरकार बदलण्याचा विचार करत असतात. उलट तो सत्ताधारी जर सुसह्य जीवनाची हमी देत असेल, तर लोक बदल करायला राजी नसतात. त्याचप्रमाणे कितीही नालायक राज्यकर्ता असला, तरी त्यावर सुटसुटीत पर्याय नसेल, तरी लोक त्या नालायकाला बदलायला तयार नसतात. म्हणूनच लोक जेव्हा सत्तांतर घडवतात, तेव्हा पराभूत होणार्‍याने आत्मपरिक्षण करायला हवे. पण त्याचवेळी आपल्याला लोकांनी सत्तेवर कशाला बसवले, ते जाणून घेण्यासाठी नव्या सत्ताधार्‍यांनीही विजयाचे नेमके परिशीलन करायला हवे असते. याचे कारण असे असते, की लोकांनी सत्ता व बहूमतासाठी मते दिली, तर त्यामागे अपेक्षा असतात. त्या अपेक्षा कोणत्या व कारणे कुठली, ते ओळखून मगच त्या पुर्ण करता येऊ शकतील ना?

    हे कशाला जाणून घ्यायला हवे? तुम्हाला लोक कोणत्या कारणासाठी मते देतात? ते आधीच्या राज्यकर्त्यावर रागावलेले असतात, त्याला कंटाळलेले असतात. ती कारणे म्हणजे त्यांच्या चुका ओळखल्या, तरच त्या चुका होणार नाहीत, याची काळजी घेता येत असते. अन्यथा आधीच्या राज्यकर्त्याने केल्या, त्याच चुका तुमच्याकडूनही तशाच्या तशा होऊ शकतात. पर्यायाने लोकांचा हळूहळू तुमच्याविषयी देखिल भ्रमनिरास होऊ लागतो. तो व्हायला नको असेल तर आधीच्या राज्यकर्त्याच्या चुका ओळखून आपण कामाला लागायला हवे. दुसरी गोष्ट बदल करताना लोकांनी आपल्यावर का विश्वास दाखवला, त्याचाही अभ्यास आवश्यक असतो. कारण त्या अपेक्षा कळल्या, तरच पुर्ण करता येणे शक्य असते. म्हणूनच पराभूता इतकेच विजयी पक्षाने निवडणूक विजयाचे आकलन व आत्मपरिक्षण करणे अगत्याचे असते. भाजपाने पाच वर्षापुर्वी ते अजिबात केले नाही. आणि अशी चुक भाजपाने केवळ कर्नाटकातच केली नाही; तर तीच चुक वारंवार अनेक राज्यात केलेली आहे. कर्नाटक बाजूला ठेवून एनडीए बनवणार्‍या भाजपाचा नऊ वर्षापुर्वी लोक्सभा निवडणुकीत पराभव कुठे व कसा झाला, त्याचेही विश्लेषण झालेले नाही. भाजपा सत्तेच्या जवळ गेला तो त्याच्या बिहार व उत्तरप्रदेशातील मोठ्या यशाने. पण त्याच उत्तरप्रदेशात त्याने गोंधळ घालून ठेवला. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि आता कर्नाटकात भाजपाने आपल्याच पक्षाच्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली होती. कर्नाटकात वेगळे काही केले नाही. भाजपाची १९८५ नंतर झालेली उभारणी व विस्तार स्थानिक नेत्यांनी केलेला आहे. त्यांनीच मिळवून दिलेल्या यशावर स्वार होऊन आजचे पक्षश्रेष्ठी नावारुपास आलेले आहेत. त्या स्थानिक नेत्यांना ताकद व स्वातंत्र्य देण्यापेक्षा त्यांच्यावर दिल्लीत बसून हुकूमत गाजवण्याने खरे संकट भाजपाने ओढवून आणलेले आहे. त्याचाच प्रयोग त्या दिल्लीश्वरांनी कर्नाटकात यशस्वी केला.

   कॉग्रेस पक्षातील सत्तेच्या साठमारीला कर्नाटकातले लोक कंटाळले होते, त्यातून ते पर्याय शोधत होते. प्रथम तो पर्याय लोकानी तीन दशकापुर्वी निवडला होता. तेव्हा त्याचे नाव जनता पार्टी असे होते. रामकृष्ण हेगडे यांच्या नेतृत्वाखाली १९८३ सालात लोकांनी पहिले सत्तांतर घडवले होते. तिथेच नव्हेतर बाजूच्या आंध्रप्रदेशातही तेलगू देसम नावाचा नवा पक्ष थेट् सत्तेवर येऊन बसला होता. त्या काळात त्या दोन्ही राज्यात भाजपाला कोणी खिजगणतीत पकडत नव्हते. चार पाच आमदारापलिकडे भाजपाची झेप जात नव्हती. पुर्वाश्रमीचे समाजवादी व संघटना कॉग्रेसवाले अशा लोकांची जनता पार्टी कॉग्रेसला पर्याय म्हणून लोकांनी कर्नाटकात सत्तांतर घडवले होते. कारण तिथे सत्तास्पर्धा व एकमेकांच्या जीवावर उठलेले कॉग्रेस नेते आणि त्यांच्या झोंबाझोंबीत सामान्य माणसाचे भिजत घोंगडे पडलेले प्रश्न, यांना लोक वैतागलेले होते. देवराज अर्स, गुंडूराव असे मुख्यमंत्री बदलत चाललेल्या कारभारात सावळागोंधळ बघून कंटाळलेल्या कानडी जनतेने जनता पार्टीला कौल दिला होता. तेव्हा काठावरचे बहूमत घेऊन भाजपाच्या पाठींब्याने रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा नव्याने राजकारणात आलेल्या राजीव गांधींनी हेगडे सरकार राज्यपालांमार्फ़त पाडायचे खुप प्रयास केले. पण उपयोग झाला नव्हता. जनता सरकारला दिल्लीच्या कॉग्रेस सरकारने सुखाने कारभार करू दिला नाही. तेव्हा तसे दोनच पक्ष कर्नाटकात होते. येदीयुरप्पांचे नावही कोणी ऐकले नव्हते. बी सुबय्या नावाचे भाजपाचे विधानसभेतील नेते होते. तिथून भाजपा पंचवीस वर्षे वाटचाल करीत २००८ सालात स्वत:चे सरकार बनवण्यापर्यंत बहूमत गाठू शकला, तर त्या कानडी जनतेने पर्याय कसा निवडला व कसा पुढे आणला, याचा विचार नको व्हायला?

   कर्नाटकपासून उत्तरप्रदेश, गुजरातपर्यंत सत्ता मिळवणार्‍या भाजपाने कधीतरी आपल्याला लोकांनी सत्ता कशाला दिली वा कॉग्रेससह अन्य पक्षांना नाकारून सत्ता का दिली; याचे एकदा तरी आत्मपरिक्षण केले आहे काय? ते केले असते, तर एकाही राज्यात त्याला सत्ता गमावण्याची पाळी आलीच नसती. पराभव झाल्यावर आत्मपरिक्षण म्हणजे निवडणूकीत आपल्या कोणत्या चुका झाल्या त्याचाच अभ्यास होतो. पण विषय केवळ निवडणूक लढवण्यातल्या चुकांचा नसतो, तर एकूण केलेल्या कारभाराचा व जनतेच्या अपेक्षाभंगाचा असतो. त्यामुळेच पराभवानंतरचे आत्मपरिक्षण अपुरे असते. त्यापासून कुठला धडा घेतला जात नाही, की चुका समजूनच घेतल्या जात नाहीत. त्यामुळेच त्याच त्याच चुका बहूतेक पक्षांकडून नित्यनेमाने होत असतात. भाजपाही त्याला अपवाद नाही. म्हणूनच त्याला उत्तरप्रदेश वा उत्तराखंड वा हिमाचलच्या पराभवापासून काही शिकता आले नाही. तिथे योग्य आत्मपरिक्षण झाले असते, तर कर्नाटकात त्याच चुका झाल्या नसत्या. राजस्थानात सत्ता गमावण्याची पाळी आली नसती. आता देखिल भाजपा प्रवक्त्याची आत्मपरिक्षणाची भाषा चुकीची आहे. त्यामुळेच त्यापासून धडा शिकण्याची भाषा फ़सवी आहे. ज्यांना लोकांनी आपल्याला सत्तेवर का आणले वा अन्य कोणाला का नाकारले, हेच कळलेले नाही, त्यांच्याकडून नवनव्या चुका होतच रहाणार आहेत. त्यांच्याकडून जनतेचा भ्रमनिरास होतच रहाणार आहे. मग या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी हाच अपवाद का ठरला, तेही तपासून बघावे लागेल. नुसतेच जिंकलेल्या जागा, पडलेल्या मतांची टक्केवारी व जातीपातींचे समिकरण मांडून कर्नाटकच्या भाजपा पराभवाचे विश्लेषण होऊ शकत नाही, की कॉग्रेसच्या विजयाची मिमांसा होऊ शकत नाही. सेक्युलर बाजू जिंकली व जातीयवादाचा पराभव हे सोपे उत्तर ज्यांना आवडते वा हवे असते, त्यांच्यासाठी ही प्रदिर्घ मिमांसा मी करत नाही. ज्यांना निवडणुकीचे राजकारण व त्यातले बारकावे समजून घ्यायचे असतील, त्यांच्यासाठी हा प्रयास आहे. तेव्हा भाजपा व कॉग्रेसने आत्मपरिक्षण करो किंवा ना करो. ज्यांना हे राजकारण समजून घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी मी सगळा हापोह करणार आहे. (क्रमश:)

२ टिप्पण्या:

  1. … तर भाजपला ९७ + ९ = १०६ अन काँग्रेसला 82 जागा
    येडि्डंनी असे झोपवले भाजपला-
    कर्नाटकात भाजपने 40 जागा जिंकल्या. भाजपमधून बाहेर चूल मांडलेल्या येड्डींच्या केजेपीला 6 जागा मिळाल्या. मात्र, 51 जागांवर भाजप-केजेपीला (एकत्रित) विजयी उमेदवारांपेक्षा अधिक मते मिळाली. यात 39 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला, तर 10 जागी जेडीएस आणि 2 जागांवर अपक्ष विजयी झाले. येड्डी वेगळे नसते तर भाजपला 40+6+51 = 97 जागा मिळाल्या असत्या. यात कमी फरकाने जिंकलेल्या काँग्रेसच्या 39 जागा कमी झाल्या असत्या तर काँग्रेसची 121 वरून ही संख्या 82 जागावर आली असती. म्हणजेच गेल्या वेळेपेक्षा फक्त 2 जागा अधिक. त्यातच खाणसम्राट रेड्डी बंधूंचे साथीदार व माजी आमदार श्रीरामुलू यांनीही भाजपला 9 जागांवर फटका दिला. त्यांचे चार उमेदवार विजयी झाले तर 5 जागांवर दुसर्‍या स्थानी राहिले.
    सभार - दिव्य मराठी http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-OTS-why-bs-yeddyurappas-birthday-party-cancelled-4259103-NOR.html?HT2=

    उत्तर द्याहटवा
  2. भाऊंनी वरील आकडे मोडी वर भाष्य केलेले आहे. प्रष्न चुका काय झाल्या. यावर त्यांचे विश्लेषण आता वाचायला मिळेल. मग च्रचा होत राहतील.

    उत्तर द्याहटवा