मंगळवार, २१ मे, २०१३

‘डोळे उघडा, बघा नीट’........ देशाची मनस्थिती




     उद्या निवडणुका झाल्या तर काय होईल? सर्वसामान्य माणुस असा विचार करीत नाही. जेव्हा निवडणुक येईल तेव्हा तो मत देऊन मोकळा होतो. मात्र दोन मतदानाच्या दरम्यान तो आपले मत बनवत असतो आणि त्याचे मत अनुभव, उपलब्ध पर्याय, तात्कालीन गरज व परिस्थितीनुसार सतत बदलत असतो. अगदी एकाच वेळी माणूस लोकसभा विधानसभेसाठी मत देणार असेल; तरी तो दोन्ही जागी एकाच पक्षाला मत देईल अशी को्णी शाश्वती देऊ शकणार नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे १९९९ साली महाराष्ट्रात झालेल्या दोन्ही निवडणुकांसाठीचे एकत्र मतदान. त्यात विधानसभेला सेना भाजपा युतीला ३१ टक्के मते होती, पण त्याचवेळी मतदाराने लोकसभेचा उमेदवार निवडताना वेगळी पसंत दाखवत युतीला ३८ टक्के मते दिली होती. अवघ्या एक मिनीटाच्या फ़रकाने बटन दाबताना किंवा मतपत्रिकेवर शिक्का मारताना; सात टक्के लोकांनी आपली निवड बदलली होती. म्हणजे आधी लोकसभेला मत देताना युतीला मत दिले असेल तर सात टक्के मतदाराने विधानसभेला युतीला मत दिले नव्हते. जर अवघ्या एका मिनीटाने व वेगळ्या निवडीसाठी मतदार असा बदलू शकतो; तर वर्षभराने व्हायच्या मतांचा कल आजच घेता येईल काय? नसेल तर मग अशा मध्यंतरी मतचाचण्या घेतल्या जातात; त्या किती विश्वासार्ह मानायच्या? याच आठवड्यात रविवार सोमवारी एबीपी वाहिनीने ए. सी. निल्सन कंपनीच्या मदतीने एका चाचणीचे निष्कर्ष लोकांसमोर मांडले आहेत. मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात देशातल्या ३३ हजार मतदारांच्या मनाचा कानोसा घेऊन त्यांनी ही चाचणी केली. त्यातून पुढल्या लोकसभेसाठी मतदार कशी निवड करील; त्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. त्या अंदाजानुसार कॉग्रेस व युपीएचा सफ़ाया उडणार आहे. मात्र त्याच्या जागी पर्याय असलेल्या भाजपा किंवा एनडीए आघाडीला सत्ता संपादन करता येईल, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता त्यांना वाटलेली नाही. त्यामुळेच मग त्रिशंकू लोकसभा, अशी स्थिती होण्याचे भाकित या वाहिनीने केलेले आहे.

   अर्थात त्याला अंदाजच म्हणायला हवेत. कारण उद्या निवडणूका होऊ घातलेल्या नाहीत आणि अजून निवडणुकांची घोषणाही झालेली नाही. म्हणूनच त्या वाहिनीने त्या चाचणीच्या निष्कर्षाला ‘मूड ऑफ़ द नेशन’ म्हणजे देशातील आजची मनस्थिती असे नाव दिले आहे आणि ते योग्यच आहे. मात्र त्यासाठी त्यांनी विचारलेले प्रश्न, घेतलेले मुद्दे व काढलेले निष्कर्ष कितपत योग्य व रास्त आहेत; याकडे बारकाईने बघावे लागेल. त्याच्याही पलिकडे त्यासंबंधात त्या वाहिनीने योजलेल्या जाणकारांच्या प्रतिक्रियाही तपासून बघण्यासारख्या आहेत. म्हणूनच हा विषय सविस्तर लिहायची मला गरज वाटली. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे वाहिनीच्या संपादकाने ज्यांना कोणाला पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले असतात, त्यांची जाण किती व अभ्यास किती; हा गंभीर मुद्दा आहे. म्हणजे असे, की घरात माणूस आजारी असेल म्हणून आपण कुठलाही ‘नावाचा डॉक्टर’ आणत नाही. वैद्यक क्षेत्रातला आणि पुन्हा मानवी रोगांचा जाणकार डॉक्टर आणत असतो. तिथे जनावरांचा डॉक्टर आणून चालत नाही, तसे केल्यास रोगावरील उपचार बाजूला राहून रोग्याचाच निकाल लागण्याचे भय असते. परवा एबीपी माझा या मराठी वाहिनीवर चर्चेसाठी आणलेले जाणकार तसेच गुरांचे डॉक्टर असल्याप्रमाणे बोलत व मतप्रदर्शन करत होते. त्यामुळेच चाचणीच्या आकडे व निष्कर्षाकडे वळण्यापुर्वी त्या अभ्यासक विश्लेषकांची झाडाझडती घेणे अगत्याचे ठरावे. त्या आमंत्रितांमध्ये त्यातल्या त्यात व्यासंगी व अभ्यासू असा एकमेव कुमार केतकर होता. बाकीचे नुसतेच टोळभैरव म्हणावेत; इतके उपटसुंभ होते. विशेषत: डॉ रत्नाकर महाजन यांना आपणच विरोधाभासी बोलतोय याचाही थांगपत्ता लागत नव्हता. त्यांच्या नजरेस ते आणून देण्याचा प्रयास बिचार्‍या प्रसन्ना जोशीने केला; तरी त्यांना काही कळलेच नाही. त्यामुळे बाकीचे सहभागी जाणकार फ़िदीफ़िदी हसत होते. ही एकूण ‘अभ्यासपुर्ण’ चर्चेची अवस्था होती. त्यामुळेच निष्कर्ष व अभ्यास लोकांना समजून देण्याचा विषय दूर राहिला. त्या चर्चेने अधिकच गोंधळ मात्र माजवला.

   यातला खरा व्यासंगी जाणकार कुमार केतकर होता. फ़टाफ़ट नुसत्या स्मरणातून जुने संदर्भ देण्याची त्याची प्रसंगावधानता कौतुकाचीच आहे. पण बाकीचे विद्यार्थी ‘ढ’ असले आणि खुद्द मास्तरांनाच विषयाची जाण नसली; मग हुशार विधार्थी म्हणेल तेच खरे मानले जात असते. कुमारची स्थिती नेमकी तशीच असते. कधीकधी मुद्दाम वा अनवधानाने कुमार केतकर बेधडक खोटे किंवा बेताल बिनबुडाचे बोलून टाकतो. सोमवारी त्यांनी तेच केले आणि मागे काही महिन्यांपुर्वी अशाच एका कार्यक्रमात त्यांनी तशीच थापेबाजी करून टाकली होती. तेव्हा त्यांनी १९७१ सालात इंदिरा गांधींना लोकांनी दिलेला निर्णायक कौल कथन करताना तमाम अंदाज व ओपिनियन पोल इंदिराजींनी उध्वस्त केल्याची लोणकढी थाप ठोकून दिली होती. त्याला थाप एवढ्यासाठी म्हणायचे, की १९७१ सालात भारतामध्ये ‘ओपिनियन पोल’ हा शब्दच प्रचलीत नव्हता. पण कुमार केतकरांना इंदिराजींची आरती ओवाळायची असल्याने; त्यांनी त्या सालात ओपिनियन पोल ‘पुर्वलक्षी’ घडवून आणले व उध्वस्तही करून टाकले. नेमकी तशीच चुक कुमारने परवा सोमवारी पुन्हा ‘माझा’च्या चर्चेत केली. १९८४ सालात राजीव गांधी नवखे असताना त्यांना अफ़ाट बहूमत लोकसभेत मिळाले, ते मातेच्या भीषण हत्याकांडाने निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळेच होते. पण कुमारला ते राजीव गांधींचे कर्तृत्व सिद्ध करायचे असल्याने त्यांनी पुन्हा कारण नसताना ओपिनियन पोलचा विषय त्यात आणला. इंदिरा हत्येच्या सहानुभूतीची लाट होती; तर ती पत्रकार वा ओपिनियन पोलवाल्यांना आधी का दिसली नाही; असा सवाल कुमारने ‘माझा’च्या पॅनेलवरील तमाम लोकांना केला आणि सगळे गप्प बसले. कारण त्यापैकी कोणालाच ओपिनियन पोल भारतात कधीपासून सुरू झाले व त्याचा पाया कोणी कधी घातला, हेच माहित नाही. आणि गंमत बघा असे अडाणी लोक ओपिनियन पोल याच विषयाचे जाणकार अभ्यासक म्हणून बोलावले होते. त्यापैकी कोणाला जरी त्यातली जाण असती; तर त्याने तिथल्या तिथे कुमारला गप्प करायला हवे होते. पण सगळेच अर्धवटराव असल्यावर कुमारने मनसोक्त थापेबाजी केल्यास नवल ते काय? त्या ख्रिस गेल समोर राहुल द्रविड किंवा लक्ष्मणला गोलंदाजीला आणल्यास त्याने दहा षटकात पन्नास छक्के मारले तर नवल कसले? तेच ‘माझा’च्या चर्चेत चालले होते. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. आणि कुमार केतकर त्यात ख्रिस गेल होऊन धमाल उडवत होता.

   ए. सी. नील्सन ही संस्था प्रतिष्ठीत व जाणकार असेल आणि त्यांनी केलेल्या चाचण्या बरोबर असतील. पण त्यांनी जे आकडे आणून दिले त्यावर निष्कर्ष काढणार्‍यांचा अभ्यास व बुद्धी यावरच पुढल्या गोष्टी अवलंबून असतात. ते निष्कर्ष काढायला बसलेले व त्यावर मतप्रदर्शनाला बसलेले; त्या विषयातले अत्यंत नामवंत अर्धवट असतील, तर मग चाचण्या योग्य असून काय उपयोग? उदाहरणार्थ ओपिनियन पोल म्हणजे मतचाचण्या भारतात कधीपासून सुरू झाल्या व कोणी त्या प्रकाराला विश्वासार्हता कशी मिळवून दिली,; याचाच ज्यांना पत्ता नाही, त्यांच्याकडून अशा चर्चा होणार असतील, तर लोकांना त्यातून काय समजू शकेल? राजीव गांधी यांनी पंतप्रधान झाल्यावर आपल्या आईच्या हत्येचे भांडवल करून मोठे बहूमत मिळवण्यासाठीच १९८४ अखेर लोकसभेच्या निवडणूका घेतल्या होत्या आणि त्याचाच त्यांना इतका प्रचंड लाभ मिळाला. तसे होणार हे भाकित ‘इंडीया टुडे’ पाक्षिकासाठी मतचाचणी घेऊन प्रणय रॉय यांनी वर्तविले होते. तेव्हा तमाम जाणकार पत्रकारांनी रॉय यांची खिल्ली उडवली होती. पण तेच भाकीत खरे झाले आणि भारतात मतचाचण्या म्हणजेच ओपिनियन पोल प्रतिष्ठीत झाला. हे कुमार केतकर याच्यासारख्य जुन्याजाणत्या अभ्यासू पत्रकाराला आठवत नसेल. तर त्या कालखंडात पाळण्यात पाय हलवणार्‍या प्रसन्ना वा राजू खांडेकर व आसबे यांना त्यातले काही आठवण्याची शक्यताच नाही. म्हणूनच तिथे कुमारने थाप मारली आणि ती पचून गेली. मग विचार करा उर्वरितांनी काय काय अकलेचे तारे तोडले असतील? सांगायचा मुद्दा इतकाच, की देशातील मनस्थिती काय आहे, असे दाखवण्यासाठी चाचणी घेण्यात आली. पण ‘माझा’ वाहिनीवरून जे काही दोन दिवस प्रसारीत झाले, तो तिथे जमवलेल्या अडाण्यांच्या मनस्थितीचाच तो आढावा होता. समोर आलेल्या आकड्यांचा अर्थच ज्यांना लागत नव्हता आणि ज्यांना निवडणुकांचे जुने संदर्भच माहित नाहीत; त्यांच्याकडुन त्या मतचाचणीचे विवेचन विश्लेषण व्हायचे कसे? पण म्हणून चाचणीतून निल्सन संस्थेने समोर आणलेले आकडे चुकीचे म्हणता येणार नाहीत. त्यांची उपयुक्तता आपण समजून घेतली पाहिजे.  म्हणूनच मी आजकालच्या माध्यमांना वा वाहिन्यांना उकिरडा समजतो आणि स्वत:ला उकिरडा फ़ुंकणारा म्हणवून घेतो. (क्रमश:)
----------------------------------------

१९८० साली पहिला मतचाचणी (ओपिनियन पोल) ‘इंडिया टुडे’ पाक्षिकाने केली व तेव्हा त्याबद्दल त्यांच्याही मनात किती शंका होत्या व भिती होती, त्याची ही साक्ष

http://indiatoday.intoday.in/video/india-today-memorable-covers-exclusive-opinion-poll/1/164339.html


२ टिप्पण्या:

  1. प्रसन्न जोशी म्हणत होते कि मोदींना जरी ३६% लोकांनी पाठींबा दिला असला तरी राहुल गांधी मनमोहन आणि सोनिया यांची एकूण टक्केवारीची बेरीज केली तर ती मोदींना टक्कर देवू शकेल (एकूण बेरीज ३६ पेक्षा कमी असली तरी) म्हणजे हि काट्याची टक्कर आहे असे ते सुचवत होते. म्हणजे एकटे मोदि विरुद्ध पूर्ण कॉंग्रेस असे तर्कट ते मांडत होते का? कारण तुलना करायची असल्यास मोदी + अडवानी + सुषमा स्वराज विरुद्ध राहुल + मनमोहन + सोनिया अशी करायला हवी होती. पण तिअक्दे कोणी लक्ष देत नव्हते.

    उत्तर द्याहटवा
  2. sir, आपला ब्लोग खरेच वाचनीय आहे. आपली मते आणि निरीक्षणे अत्यंत अभ्यासू आणि डोळे उघडणारी असतात.
    आय बीन लोकमत वर परवा पाहिलेली चर्चा आठवली. यांचे संपादक जसे आपला मुद्दा रेटतात तसेच काहीसे जाणकार हे मुद्दाम चर्चेला बोलावतात.
    काही दिवसा पूर्वी बेंगलोर आणि बोस्टन इथे स्फोट झाले तेव्हा आय बीन लोकमत वर चर्चा चालली होती. त्यामध्ये असेच एक जाणकार निवृत्त पोलिस अधिकारी शिरीष इनामदार मोठ्या आत्मविश्वासाने थाप ठोकून गेले कि बोस्टन आणि बेंगलोर या दोन्ही स्फोटांमध्ये इस्लामी फंडामेंटालिस्ट नाहीत ही माझी पक्की माहिती आहे. नंतर दोन्ही ठिकाणी तेच लोक आहेत हे उघड झाले तरी देखील हे जाणकार कधी पुढे येवून आपण दिशाभूल करणारी माहिती दिली हे मान्य करत नाहित. उलट परत कधी चर्चा झाली तर हा मुद्दा विसरून ते आणखी कुठली तरी नवीन थाप ठोकून देतिल. इनामदार हे अनुभवी आणि जाणकार आहेत मात्र चर्चेच्या ओघात धक्का देण्या साठी किंवा आपले इम्प्रेशन जमवण्यासाठी किंवा आपला अजेंडा नेण्या साठी असे काही लोक ४ गोष्टी बरोबर सांगताना एखादी गोष्ट चुकीची सांगून लोकांची दिशाभूल करतात आणि चर्चा दुसरी कडे नेत अस्तात. केतकर पण त्यातले आहेत. कुठलाही मुद्दा आला तरी कॉंग्रेस आणि नेहरू घराणे किती थोर /बरोबर आहेत ही गोष्ट ते कशीही करून सिद्ध करू पाह्तात.

    उत्तर द्याहटवा