रविवार, ९ जून, २०१३

अवघी चार टक्के मते चमत्कार घडवतात (इंदिराजी ते नरेंद्र मोदी -१३)

  पुन्हा जे राजकारण व परिस्थिती आली, त्याचा राजकीय डावपेचांसाठी इंदिराजींनी कसा वापर केला ते आपण बघितलेच. पण त्यामुळे कॉग्रेस पक्षाचे पुनरुत्थान इंदिराजींच्या गरीबी हटाव धोषणेने झाले; म्हणजे नेमके काय झाले? पहिल्या तीन निवडणूकीत नेहरूंच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस जितक्या जागा किंवा यश मिळवत होता, तिथपर्यंत इंदिरा गटाने पाचव्या लोकसभेत मजल मारली होती. म्हणजेच इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली जो पक्ष वा गट आहे, त्यालाच लोकांनी खरी कॉग्रेस म्हणून मान्यता दिलेली होती. पण हे आकडे नेहमी फ़सवे असतात. ते संदर्भाने समजून घ्यावे लागतात. १९६६ सालात इंदिरा गांधी स्वत:चे खास देशव्यापी व्यक्तीमत्व नसलेल्या नेत्या पंतप्रधान होत्या. त्याचा फ़टका कॉग्रेसला बसला होता. पण मध्यंतरीच्या चार वर्षात इंदिराजींनी डावपेच खेळून आपली जी समाजवादी व उद्धारकाची प्रतिमा बनवून घेतली; तिचा प्रभाव असतानाच मध्यावधी निवडणूका घेण्याचा जुगार खेळला होता आणि तो कमा्लीचा यशस्वी झाला. कारण त्यात इंदिराजींनी जुन्या कोग्रेस नेत्यांचे जोखड झुगारून दिले व पक्षाला पुर्वीप्रमाणे निर्विवाद बहूमतावर आणून बसवले. पक्षात आता त्यांच्या शब्दाला आव्हान देणारा कोणी अन्य नेता उरलेला नव्हता आणि दुसरीकडे तमाम विरोधी पक्ष पुन्हा किरकोळ प्रकृतीचे दुबळे होऊन गेले होते. इतके दुबळे होते, की इंदिराजी मनमानी व हुकूमशाही करण्याइतक्या मजबूत होऊन गेल्या होत्या. फ़ुटलेल्या कॉग्रेस पक्षाचा दुबळा संघटनात्मक ढाचा व कमालीची लोकप्रिय जनभावना पाठीशी असलेल्या इंदिराजींना, त्या बदलत्या व उदासिन मतदाराने केवढे मोठे यश मिळवून दिले. त्याचे हे आकडे थक्क करून सोडणारे आहेत. त्यामुळेच त्या काळात इंदिरा लाट आली व त्यात बाकीचे सगळे पक्ष व इंदिरा विरोधक वाहून गेले; अशीच निकालाची वर्णने झाली होती. ती लाट म्हणजे अवघी चार टक्के मते होती. बहूतांशी कॉग्रेस मतदार इंदिराजींच्या पाठीशी होता आणि त्याने इंदिराजी असतील तीच कॉग्रेस; असा कौल दिला होता. बाकीचे नेते ज्या भागातले होते, त्यांच्या भागात त्यांनी आपापला हिस्सा मिळवला. पण जो कॉग्रेसचा राष्ट्रीय एकनिष्ठ मतदार होता त्याच्या सोबतीला उदासीन व बदलता मतदार आणून इंदिरा गांधींनी तो चमत्कार घडवला होता. तेव्हा ज्याला इंदिरा लाट संबोधले गेले; ती लाट किती टक्के मतांची होती? १९६६ सालपेक्षा अवघी चार टक्के मते वाढली होती. पण जागांमध्ये किती फ़रक पडला होता? तब्बल सत्तर जागा वाढल्या होत्या. म्हणूनच लाट म्हटले जाते तेव्हा अशा बदलत्या वा उदासिन मतांची किमया समजून घेण्याची गरज आहे. फ़क्त आकडे, जागा वा मतचाचण्यातली टक्केवारी. राजकीय भाकिते करायला उपयोगाची नसतात. त्यातून आकलन होत नाही, की राजकीय अन्वयार्थ लावता येऊ शकत नाही. लाटेचे हे राजकारण पुढल्या तीन निवडणूकांमध्ये चालू राहिले आणि त्याचे एकमेव केंद्र होते इंदिरा गांधी. म्हणूनच मी त्यांचा उल्लेख व्यक्तीकेंद्री व लाटेच्या निवडणूका असा करतो.

   १९७१ ची मध्यावधी निवडणूक इंदिराजींनी आपल्या लोकप्रियतेचा लाभ उठवण्यासाठी घेतली होती, तशीच ती त्यांनी पक्षातले व बाहेरच्या विरोधकांना पुरते नामोहरम करण्यासाठी घेतली होती. पण त्यातून जे राजकारणाचे व्यक्तीनिष्ठ धृवीकरण होऊन गेले; ते इंदिराजी जिवंत असेपर्यंत संपू शकले नाही. पुढली जवळपास तेरा चौदा वर्षे देशातले राजकारण इंदिरावादी व इंदिरा विरोधी असेच घुमत होते. त्याला वेगळी दिशाच मिळू शकली नाही. याचे कारण इंदिराजी इतक्या कुवतीचा दुसरा नेता त्या काळात वा नंतरही उदयास आला नाही. आणि त्यांच्या अस्तानंतरही आलेला नव्हता. सहाजिकच त्यांच्या निधनानंतर पुन्हा देशाचे एकूण राजकारण विस्कटत गेले. त्याला एक केंद्रबिंदू उरला नाही. अनेक राष्ट्रीय वा प्रादेशिक व्यक्तीमत्वाच्या भोवती घुटमळणारे राजकीय भोवरे; असेच भारतीय राजकारणाचे स्वरूप होऊन गेले. ज्या व्यक्तीच्या बाजूने वा विरुद्ध संपुर्ण देशाचे लोकमत घुमत जाते, विभागले जाते, असे इंदिरा गांधी हे व्यक्तीमत्व होते. आज काहीशी तशीच स्थिती नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत दिसू लागली आहे. याचा अर्थ इंदिराजींच्या नंतर तोच देशातला तितका प्रभावी नेता किवा व्यक्तीमत्व आहे; असे मी आज तरी म्हणणार नाही. पण तशी शक्यता असलेले तेच एक व्यक्तीमत्व तीन दशकानंतर पुन्हा भारताच्या राजकीय क्षितीजावर उगवले आहे. ती पातळी वा उंची मोदी गाठू शकतील किंवा नाही; ते काळच ठरवील. पण ज्यांना मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेचे कोडे सुटत नाही वा ज्यांची मती गुंगवून सोडते; त्यांनी मोदींना समजून घेण्यासाठी म्हणूनच इंदिरा गांधी हे व्यक्तीमत्व किंवा त्यांच्या व्यक्तीमत्वामुळे झाले्ल्या चार लाटेच्या निवडणूका समजून घ्याव्या लागतील. १९६६पासून १९७०पर्यंत जशा स्थितीतून इंदिराजी गेल्या व देशाची जनता जात होती; नेमकी तशीच स्थिती आज देशाची व मोदी यांची असावी, हा योगायोग आहे. पुन्हा त्या दोन व्यक्तीमत्वामध्ये अनेक साम्यस्थळेही आढळतात. मात्र तशी तुलना करण्याची आताच घाई नको, आधी इंदिरा गांधी व त्यांच्या का्ळातले राजकारण व लाटेच्या निवडणूका समजून घ्यायला हव्यात. मगच त्यात मोदी नावाचे नवे राजकीय पात्र कितपत बसू शकते, त्याचा विचार करता येईल. त्या कालखंडातील पहिली निवडणूक होती १९७१ सालची मध्यावधी लोकसभा निवडणुक.

   व्ही व्ही गिरी यांच्या विरुद्ध मतदान करण्यात यशवंतराव चव्हाण हे आघाडीचे नेते होते. त्यांच्यासह त्यांनी महाराष्ट्रातला कॉग्रेस पक्षश्रेष्ठींच्या मागे खंबीरपणे उभा करून संजीव रेड्डी यांच्या पारड्यात सर्व मते पडतील याची काळजी घेतली होती. पण गिरी विजयी झाल्यावर काळाची पावले ओळखून यशवंतराव स्वत: इंदिरा गोटात दाखल झाले. जेव्हा पक्षात फ़ुट पडली, तेव्हा वार्‍याची दिशा ओळखून ते इंदिरा गटात सामील झाले. तर मुंबई कॉग्रेसचे स, का पाटिल गेले मोरारजी गटात. त्याचवेळी कॉग्रेस काबीज करून त्याला डावा पक्ष बनवण्याचे मनसुबे रचणारे अनेक छुपे कम्युनिस्टही इंदिरा गोटात दाखल झाले. त्यात बॅरिस्टर रजनी पटेल, कुमारमंगलम, माजी न्यायमुर्ती हरीभाऊ गोखले अशा कित्येकांचा समावेश होऊ शकतो. त्या काळात रजनी पटेल यांचा इतका दबदबा होता, की यशवंतराव यांच्यापेक्षा मुंबईचे पक्षाध्यक्ष पटेल हुकूमत गाजवत होते. खरे तर त्यामुळेच यशवंतराव आपल्या सर्व गोतावळ्यासह इंदिरा गोटात सहभागी झाले. तसेच जगजीवनराम, सी. सुब्रमण्यम असे अनेक नेते होते. त्यापैकी सुब्रमण्यम यांची इंदिरा कॉग्रेसचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. त्याचे भव्य अधिवेशन झाले आणि दुय्यम फ़ळीतले अनेक नेते मग पुढे आले. नरसिंहराव, सिद्धार्थ शंकर राय, कमलापती त्रिपाठी, हेमवतीनंदन बहूगुणा, ललित नारायण मिश्रा, चिमणभाई पटेल, बरकतुल्ला खान, नंदिनी सत्पथी, झैलसिंग, बन्सीलाल, विद्याचरण शुक्ला. ओम मेहता, प्रणबकुमार मुखर्जी, त्यापैकीच होत. १९७१ नंतर कॉग्रेस पक्षात नावारूपाला आलेले हे लोक. त्यातले काही पुढे १९९०च्या कालखंडात ज्येष्ठ नेते बनून गेले. पण १९७१ मधले ते तरूण व उदयोन्मुख नेते होते. अशा तरूणांना आपले निष्ठावान म्हणून इंदिरा गांधींनी पुढे आणले. त्यातच मोहन धारिया, चंद्रजीत यादव, शशीभुषण बाजपेयी, कृष्णकांत, चंद्रशेखर अशी मंडळी तरूण तुर्क म्हणून नावारूपाला आलेली होती. इंदिरा विरोधी शब्दही बोलेल त्याच्यावर तुटून पडणे; हे त्यांचे प्रमुख काम असायचे. त्यांना जनमानसात स्थान असायची अजिबात गरज नव्हती. मते मिळवण्यासाठी स्थानिक प्रादेशिक भक्कम नेत्यांची गरज उरलेली नव्हती. ज्या दगडाला इंदिराजी शेंदूर फ़ासतील त्याला मत मिळणार; हे सोपे गणित होते आणि तेव्हा निवडून आलेले लोकसभेचे अनेक सदस्य किंवा त्यांच्या समोर पराभूत झालेले दिग्गज बिगरकॉग्रेस नेते बघितले; तरी त्याची खात्री पटू शकते. वाजपेयी यांच्यासारखा दांडगा नेता हुकमी मतदारसंघात पराभूत झाला होता.

   लाट म्हणजे काय असते त्याचा अंदाज आजच्या पत्रकार व अभ्यासकांना नसावा; असेच कधीकधी वाटते. त्या १९७१ च्या निवडणूकीतली काही उदाहरणे म्हणूनच बघण्यासारखी आहेत. १९६७च्या निवडणुकीत दक्षिण मुंबईत जॉर्ज फ़र्नांडिस ह्या समाजवादी कामगार नेता व नगरसेवकाने इतकी धमाल उडवली होती, की त्याच्या झंजावातासमोर स. का. पाटिल हा कॉग्रेसचा मोठा दिग्गज नेता पराभूत झाला होता. त्यामुळे फ़र्नांडिसना ‘जायंट किलर’ अशी उपाधी मिळाली होती. पुढे त्यांनीही गिरींची निवडणूक वा बॅन्कांच्या राष्ट्रीयीकरणात इंदिराजींचे समर्थनच केले होते. पण अशा त्या दांडग्या समाजवादी नेत्याची १९७१ सालात काय दुर्दशा व्हावी? त्याच दक्षिण मुंबईत पुन्हा चार वर्षांनी इंदिरा लाटेच्या विरोधात फ़र्नांडिस उभे राहिले; तर त्यांना डॉ. एन. एन. कैलास नावाच्या नगण्य उमेदवाराने सह्ज पराभूत केले होते. नुसता पराभवच नव्हेतर जॉर्जची अनामत रक्कम जप्त झाली होती. इकडे मध्य दक्षिण मुंबईत नेहमी कम्युनिस्टांचा वरचष्मा असायचा, तिथे सालेभाय अब्दुल कादर नावाचा कोणी असामी इंदिरा लाटेवर स्वार होऊन लोकसभेत पोहोचला. मध्य उत्तर म्हणजे शिवसेनेचा तेव्हा बालेकिल्ला होता. तिथे तीसपैकी अठरा नगरसेवक सेनेचे होते आणि सेना तेव्हा जोशात होती. तिचे उमेदवार मनोहर जोशी तर निवडून आलो, अशाच थाटात फ़िरत होते. मतदानापुर्वी त्यांनी ‘मनोहर जोशी निवडून आले’ अशी पोस्टरही छापली होती. पण प्रत्यक्ष मतमोजणी झाली, तेव्हा त्यांचा तब्बल एक लाख मतांनी पराभव झाला. त्या लाटेत देशभरात मोठमोठ्या बिगर कॉग्रेस नेत्यांची अशीच धुळधाण उडाली होती. आणि निवडून आलेले बहूतांश कॉग्रेस उमेदवार हे इंदि्रा कृपाप्रसादानेच लोकसभेत पोहोचले होते. आपण कोणाला मते देतोय, याचा विचारच लोकांनी केला नव्हता. ज्याला इंदिरा गांधींनी उभा केला, त्याला मते द्यायची. कशासाठी व त्याचे नाव काय; याच्याशी कर्तव्यच नव्हते. ज्याच्या पोस्टरवर इंदिराजींचे छायाचित्र होते, ज्याची निशाणी गायवासरू होती, तिथे लोकांनी भरभरून शिक्के मारले होते. असे मतदान लोकांनी कशासाठी केले होते? लोकांना त्यातून काय साधायचे होते? आपण ज्याला मत देतोय, तो आपल्या मतदारसंघातला आहे काय? त्याची गुणवत्ता व लायकी काय, याचाही विचार झाला नव्हता. तो इंदिराजींचे हात मजबूत करील व त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल; इतकाच विचार त्यामागे होता. निर्विवाद सत्ता व अधिकार इंदिरा गांधींना द्यायचे, इतकाच त्यामागचा हेतू होता. त्यामुळे उमेदवार व त्याच्या मागच्या संघटनात्मक ताकदीला काहीही अर्थ वा किंमत नव्हती. असे मतदान होते. त्याला लाट म्हणतात. मतदार असे का वागतो? (अपुर्ण)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा