शुक्रवार, २८ जून, २०१३

मोदींना सोनिया गांधींकडून शुभेच्छा?



   शुक्रवारी दुपारी मला एका पत्रकार मित्राचा फ़ोन आला. त्याला मिळालेली अतिशय महत्वाची बातमी मला सांगून त्याला त्यावर माझे राजकीय भाष्य हवे होते. बातमी होती गुजरातमध्ये झालेल्या नऊ वर्षापुर्वीच्या इशरत जहान चकमकीच्या संदर्भातली. त्या प्रकरणात सीबीआयने गुजरातचे मुख्यामंत्री नरेंद्र मोदी यांना आरोपी बनवून अटक करण्याची तयारी सुरू केली; असे त्याला कळले होते. मात्र त्याबद्दल त्याला विश्वसनीयता देता येत नव्हती. पण कॉग्रेस पक्षाचे अल्पमतातील दिल्ली सरकार व सोनिया गांधी इतका धाडसी निर्णय घेऊ शकतील काय आणि घेतला तर त्याचे परिणाम काय संभवतात; याबद्दल त्याला माझे मत हवे होते. मी त्याला तात्काळ सांगितले, की कुठलाही दिल्लीतला सत्ताधारी आजघडीला इतका मोठा मुर्खपणा करणार नाही. कारण अशा अटकेचा प्रचंड मोठा राजकीय लाभ मोदींना मिळू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तसे कॉग्रेस करणार असेल; तर ती त्यांच्यासाठी राजकीय आत्महत्या ठरेल. कारण अशा अटकेची कारणे काहीही असोत; आजघडीला त्यात लोकांना राजकीय सुडबुद्धी दिसणार आहे आणि लोकमत हे नेहमी समजूतीच्या आधाराने चालत असते. अशी अटक कोणत्या तांत्रिक मुद्दे वा नियमाच्या कसोटीवर करण्यात आली, त्याचा उहापोह सामान्य माणसे करीत नसतात. तो वाहिन्यांवरच्या व माध्यमातल्या विद्वानांसाठी टाईमपासचा खेळ असतो. सामान्य माणसाला त्यात कॉग्रेसची सूडबुद्धीच दिसणार आहे आणि जेव्हा अशा सूडबुद्धीसाठी सत्तेचा उपयोग केला जातो; तेव्हा आपोआप त्यात बळी पडणार्‍याकडे लोकांची सहानुभूती वळत असते. मग त्याच्यावरले आरोप किती का गंभीर असेनात. त्यामुळेच आज भाजपाचे पंतप्रधान पदाचे अघोषित उमेदवार मोदी यांच्याविषयी जी हवा तयार झालेली आहे; तिला सामोरे जाण्याची क्षमता उरली नसल्यानेच कॉग्रेस सीबीआयचा असा दुरूपयोग करते आहे, असेच लोकमत होऊन जाईल. त्यासाठी भाजपाला प्रचार सुद्धा करायची गरज असणार नाही. याचे पहिले कारण मोदींचा ताकद व यश हे नेहमी त्यांच्या विरोधातल्या अपप्रचार व कारवायांनीचे निर्माण केलेले आहे. शाहीद सिद्दीकी नावाचे माजी खासदार व अभ्यासू पत्रकार दिर्घकाळ मोदींचे टिकाकार राहिले आहेत. त्यांनी मोदींच्या यशाचे नेमके विश्लेषण केले आहे. सिद्धीकी म्हणतात, ‘मोदी आपली उर्जा आपल्या दुष्मनांकडूनच मिळवत असतात. जितके तुम्ही मोदींच्या विरोधात कारवाया व अपप्रचार करीत रहाणार आहात; तितके मोदी सहानुभूतीवर स्वार होऊन यशस्वी होत जाणार आहेत. मोदींशी लांडीलबाडीने लढता येणार नाही, त्यांच्या तोडीचे राजकारण व चोख प्रशासनातूनच मोदींना पराभूत काता येईल.’

   गेली दहा वर्षाहून अधिक काळ दंगली व अन्य हिंसाचाराच्या विविध आरोपात मोदींना व त्यांच्या निकतवर्तियांना गुंतवण्याचे सर्वांगिण प्रयास झालेले आहेत. पण अजून तरी मोदींना गुंतवू शकेल, असा एकही पुरावा कोणी समोर आणु शकलेला नाही. उलट प्रत्येक आरोप खोटा पडून त्यातून सहानुभूती मात्र मोदी मिळवत राहिले आहेत. परिणामी मोदी फ़सल्याच्या ज्या देशव्यापी बातम्या सातत्याने येत व प्रसिद्ध होत राहिल्या; त्यातून त्यांच्याकडे देशवासियांचे लक्ष नियमित वेधले गेले. त्यातूनच मोदींविषयी देशभरच्या जनमानसात कुतूहल निर्माण होत गेले व वाढतच गेले. पुढे लागोपाठ तीन निवडणूका मोठ्या संख्येने जिंकून मोदी यशस्वी झाले, तसे त्यांच्याभोवती एक वलय तयार झाले आणि त्याच्याच बरोबर गुजरातमध्ये मोदींनी केलेल्या प्रशासकीय, राजकीय, आर्थिक व औद्योगिक कार्याची माहिती विविध मार्गाने लोकांपर्यंत जाऊ लागली. तसे त्यांच्याविषयीच्या उत्सुकतेचे रुपांतर आकर्षणात होत गेले. परिणामी मोदी हे थेट भाजपाचे सर्वाधिक लोकप्रिय नेता होऊन पंतप्रधान पदाचे दावेदार झाले. त्याचे बहूतांश श्रेय म्हणूनच त्यांच्या विरोधकांना व त्यांची सातत्याने बदनामी करणार्‍यांना द्यावे लागेल. राजकारणात ती आघाडी कॉग्रेस पक्षाने चालविली होती. आधी भाजपाला बदनाम करण्यासाठी मोदींच्या नावाचा शिवीप्रमाणे वापर झाला. पण त्यातून मोदी संपणे राहिले बाजूला; तेच थेट पंतप्रधान पदाचे उमेदवार होऊन सामोरे आलेले आहेत आणि कॉग्रेसला इतके मोठे राजकीय आव्हान यापुर्वी कोणीच उभे केलेले नव्हते, याची कबुली कॉग्रेसचेच एक विचारवंत अभ्यासू नेते जयराम रमेश यांनीच दिली आहे. पण आता मोदींना थोपवायचे कसे; तेच कॉग्रेसला समजेनासे झाले आहे. जितके मोदींना रोखायचे व गोत्यात आणायचे डाव खेळावे, तितके त्यांनाच लाभ मिळत आहेत. त्यामुळे आता सीबीआयचा सापळा लावून त्यात मोदींना गुंतवायचा अत्यंत घातक डाव खेळला जातो आहे आणि त्यासाठी देशाच्या गुप्तचर खाते व तपास यंत्रणांचाही वापर केला जातो आहे. परिणामी त्या दोन सरकारी यंत्रणातच हेवेदावे सुरू झालेले आहेत. त्यामुळे देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे. मात्र देश खड्ड्यात गेला तरी चालेल, पण कोणत्याही मार्गाने मोदींना गोत्यात आणायला कॉग्रेस उतावळी झालेली आहे. म्हणूनच तो सत्ताधारी पक्ष मोदींच्या उमेदवारीने किती भयभीत झाला आहे, त्याची साक्ष मिळते. त्यातूनच मग इशरत जहान चकमक प्रकरणात गोवून मोदींना गजाआड ढकलण्याचा जुगार खेळला जात आहे. त्याचा तपशील नंतर बघू. आधी असा जुगार कॉग्रेसच्या राजकारणाला किती लाभदायक वा हानीकारक असू शकतो, ते बघूया.

   इशरत जहान ही मुस्लिम तरूणी होती आणि म्हणूनच त्या प्रकरणात मोदींना अटक केली, तरी देशभरच्या मुस्लिमांची मते हमखास कॉग्रेस पक्षालाच मिळतील, असा त्यामागचा हेतू आहे. म्हणजे मायावती, लालू, मुलायम किंवा तमाम सेक्युलर पक्षांकडे जाणार्‍या मुस्लिम मतांना आपल्याच पारड्यात आणायचा सगळा डाव आहे. त्यात किती यश मिळेल, ते प्रत्यक्ष मतदान व मोजणी यानंतरच कळू शकते. पण सध्यातरी मतदान व्हायला खुप अवधी आहे आणि अजून तरी मोदींना सीबीआयने अटक केलेली नाही. पण जेव्हा जेव्हा असे सुडबुद्धीच्या राजकारणाचे जुगार खेळले जातात; तेव्हा त्याचा जुगार्‍याला किती लाभ मिळाला; त्याचे लहानमोठे ऐतिहासिक दाखले खुप आहेत. अलिकडचा व छोटा दाखला अण्णा हजारे यांच्या दोन वर्षापुर्वीच्या रामलीला मैदानावरील उपोषणाचा आहे. लोकपालच्या मागणीसाठी १६ ऑगस्ट २०११ रोजी अण्णा आपल्या सहकार्‍यांसह त्या मैदानावर उपोषणाला बसणार होते. त्यांना अगोदर ते मैदान नाकारण्यात आले आणि तरीही अण्णांनी तिथेच बसायचा निर्धार केल्यावर त्यांना भल्या सकाळी घरातूनच अटक करण्यात आली होती, कारण दिले होते कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता. पण अण्णांच्या अटकेची बातमी आगीसारखी देशभर पसरली आणि हजारो लोकांनी अण्णांना ठेवलेल्या तिहार तुरूंगाच्या परिसरात धाव घेतली. त्या प्रतिबंधित क्षेत्रातून त्या गर्दीला हटवणे शक्य नसल्याने हजारो लोकांची धरपकड करून त्यांना कुठल्या तरी स्टेडीयममध्ये कोंडण्यात आले. तरीही तिहारच्या दिशेने येणारा लोंढा थांबत नव्हता. अखेरीस अण्णांना मुक्त करून त्यांना हव्या असलेल्या रामलीला मैदानात उपोषणाला बसण्याची परवानगी नाक घासून सरकारला द्यावी लागली. मात्र इतका तमाशा चालू असताना सरकारचे तमाम मंत्री तोंड लपवून बसले होते. ती गर्दी कशाला लोटलेली होती? ते सगळे अण्णा समर्थक नव्हते, की अण्णांचे कार्यकर्तेही नव्हते. पण सरकार सुडबुद्धीने व अन्यायाने वागते आहे, असे दिसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर येऊन सरकारची मस्ती उतरवण्याचा घेतलेला तो पवित्रा होता. ती सहानुभूती असते. त्यातली तांत्रिकता वा मुद्दे लोकांना कळत नसतात किंवा समजून घेण्याची गरज वाटत नसते. सरकार आपल्याला मिळालेल्या न्यायासाठीच्या अधिकाराचा वापर अन्याय करण्यासाठी अतिरेकाने करीत असल्याचे समजूतीने अण्णांना प्रचंड पाठींबा मिळून गेला. तो सगळा सहानुभूतीचा चमत्कार होता. आणि जितके अण्णांच्या प्रचार व सहकार्‍यांनी काम केले नव्हते, त्यापेक्षा मोठे काम सरकारच्या मुर्खपणाने अण्णांसाठी त्यावेळी केले होते. ज्याच्यावर कायदा सुव्यवस्थेला धोका असा आरोप कॉग्रेसनेते करीत होते, त्याला बिनतक्रार सोडावे लागलेच. पण अखेर त्याचे उपोषण स्थगीत करण्यासाठी सरकारसह संसदेला एकमताने ठराव करण्याची वेळ आलेली होती. ती सहानुभूती सरकारच्या आततायीपणाने अण्णांना देणगीदाखल बहाल केली होती. अण्णांनी एक भूमिका घेतली होती, पण त्यासाठी त्यांनी केलेल्या आंदोलन उपोषणाला कॉग्रेसच्या शुभेच्छांनी खरे यशस्वी केले होते. मग तोच जुगार मोदींच्या बाबतीत कोणते परिणाम घडवू शकतो? लोकपालच्या आंदोलनाची, अण्णांच्या अटकेची व मोदींच्या अटकेची तुलना होऊ शकते काय? अण्णा एक नि:स्वार्थी समाजसेवक आहेत आणि मोदी हे तर राजकारणी नेता आहेत. मग अण्णांसारखा लाभ मोदींना मिळून लोकमत त्यांच्यामागे जाऊ शकते काय? नक्कीच जाऊ शकते. नुसता राजकीय लाभ नव्हेतर एकूणच राजकारणाची उलथापालथ त्यातून होऊ शकते. म्हणूनच त्या अटकेच्या जुगाराला मी शुभेच्छा म्हणतो. कॉग्रेसने अण्णांना शुभेच्छा दिल्या होत्या, तेव्हा सोनिया गांधी परदेशी होत्या. आज युपीए सरकारचे असे निर्णय पडद्याआडून सोनियाच घेत आहेत. त्यामुळेच सीबीआयने मोदींच्या अटकेची तयारी केलेली असेल, तर त्यातून मोदींच्या राजकीय महत्वाकांक्षेला सोनिय शुभेच्छाच देत आहेत असे म्हणावे लागेल. त्या शुभेच्छा कशा ठरू शकतात? इतिहासच त्याची साक्ष देतो ना?  (क्रमश:)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा