मंगळवार, ३१ जुलै, २०१२

असमर्थांच्या ‘बाळ’बोधावर ‘प्रकाश’झोत


   नशा ही चमत्कारिक बाब असते. जेव्हा आरंभी माणुस नशा करतो तेव्हा नशा करणे त्याच्या आवाक्यातली गोष्ट असते. पण जसजसा माणुस नशेच्या आहारी जातो, तसतशी नशाच त्याच्यावर आधिपत्य गाजवू लागते. नशेतून बाहेर पडणेच त्याला अशक्य होऊन जाते. कारण अशा अतिरेकी नशा करणार्‍यासाठी नशेत रहाणेच एक सामान्य बाब बनून जाते. नशा उतरली मग त्याचा जीव घाबराघुबरा होऊ लागतो. त्याला अस्वस्थ वाटू लागते. दारूची नशा करणार्‍याची अशी स्थिती झाली, मग त्याला अल्कोहोलिक म्हणतात. म्हणजे त्याने नशा केली आहे, की नाही तेच तुम्ही समजू शकत नाही. त्याचे कारण मोठेच विचित्र आहे. जेव्हा असा माणुस खरेच नशेत असतो; तेव्हा त्याने नशा केली आहे ते तुमच्या लक्षातही येऊ शकत नाही, इतका तो शहाण्यासारखा वागत असतो. पण त्याच्या तोंडाला तर दारुचा वास येत असतो. मग तुम्हाला आश्चर्य वाटते की याच्या तोंडाला तर वास येतोय. मग हा शुद्धीत कसा? कारण भरपुर नशा केल्याशिवाय तो जगूच शकत नाही. कायम नशेत रहाणे हेच त्याच्यासाठी सामान्य जीवन होऊन जाते. नशा उतरली मग त्याचे हातपाय थरथरू लागतात, त्याचा तोल जाऊ लागतो. कारण दारूमुळे नशा होण्याच्या तो पलिकडे गेलेला असतो. नशेत असणे हीच त्याच्यासाठी शुद्धीत असण्यासारखी सामान्य स्थिती असते. आणि अशी स्थिती दारू किंवा अन्य कुठल्या नशेच्या आहारी गेलेल्यांची अवस्था असते असेही समजण्याचे कारण नाही. अगदी शहाणी वा विचारी माणसे देखिल अशी "असामान्य" असू शकतात. त्यांना कुठली नशा असेल व कुठल्या नशेच्या आहारी ती माणसे गेली आहेत, त्यावर परिणाम अवलंबून असतात. ज्येष्ठ पत्रकार किंवा जाणकार म्हणुन आपण टिव्ही वाहिन्यांवर बघतो, त्यातही अशी अनेक माणसे मी सांगू शकेन. किंबहूना व्यसनाधीनता या विषयावर लिहित असताना विरंगुळा म्हणुन संध्याकाळचा टिव्ही बघताना, मला त्याची प्रथमच जाणीव झाली म्हणायला हरकत नाही.

   मागल्या आठवड्यात मी व्यसनावर सलग लेखन करत होतो, तेव्हाच अण्णा टिमचे नवे आंदोलन दिल्लीत जंतरमंतर येथे चालू झाले. त्यावर मग वाहिन्यांवर चर्चा होणे अपरिहार्यच होते. त्यात मग नेहमीचेच विशेष पाहुणे आणणेही भागच होते. त्याप्रमाणे आजचा सवालमध्ये एक आपल्याच वैचारिक नशेत वावरणारे गृहस्थ मला बघावे लागले. त्यांचे नाव प्रकाश बाळ. समोरचा माणुस नशेत असला मग आपण नेहमी त्याच्याशी सावध बोलतो किंवा वागतो, तशीच गलका चुपकर त्या दिवशी स्वत:च चुप होती. न जाणो नशेत बाळाने तिथेच कॅमेरासमोर फ़टकावले तर?

   विषय होता अण्णांच्या आंदोलनाला कॉग्रेसकडुन मिळणारी वागणूक. पण तिथेही कॉग्रेस कॉग्रेस कशाला म्हणता असाच प्रतिप्रश्न प्रकाश बाळ एन्कर असलेल्या गलका चुपकर यांना पुन्हा पुन्हा विचारत होते. पण नेहमी अन्य पाहुण्य़ांचा गलका गप्प किंवा चुप्प करणार्‍या धुपकर त्या दिवशी मात्र बाळासमोर स्वत:च चुप होताना दिसल्या. विषयच जर कॉग्रेसने अण्णांच्या उपोषणाला दिलेली वागणूक असेल, तर चर्चेत कॉग्रेसबद्दलच बोलले जाणार ना? पण कायम भाजपा व संघपरिवाराला शिव्याशाप देण्याच्या नशेत रममाण होणार्‍या बाळाला ते कळावे कसे? ते आपल्याच नशेत तिथे भाजपा व संघाच्या नावाने शिव्यांची लाखोली वहात होते. पण गलका चुपकर भयभीत होऊन त्यांना चुप करू शकत नव्हत्या. मला त्या दिवशी प्रथमच तिचे नाव अलका धुपकर आहे याची ग्वाही मिळाली. त्याबद्दल मी मनोमन प्रकाश बाळ यांचे आभार मानले. ‘अण्णांचं आंदोलन हाताळण्यात काँग्रेस पुन्हा चूक करतंय का ?’ हा चर्चेचा विषय असेल तर त्यात कॉग्रेस किंवा भाजपाच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा कसा येऊ शकतो? आणि समजा कॉग्रेसवर अन्याय होतच असेल त्या चर्चेत तर त्याचा बचाव मांडायला त्याच चर्चेत त्या पक्षाचे प्रवक्ते अनंत गाडगीळ हजर होते. पण त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ पत्रकार म्हणून हजेरी लावणारे प्रकाश बाळ चर्चा भाजपाच्या अंगावर ढकलायला उतावळे झालेले होते. सवाल भ्रष्टाचाराचा नव्हता किंवा कुठल्याही पक्षाशी संबंधित नव्हता. अण्णांच्या आंदोलनाची सरकार चालवणार्‍या कॉग्रेसकडून कशी हाताळणी होते आहे, असा विषय होता. त्यात भाजपाला आणायचे वा ओढायचे काहीच कारण नव्हते. अगदी कॉग्रेस प्रवक्ते असून अनंत गाडगीळसुद्धा भाजपावर बोलत नव्हते. पण बाळ यांना कसली शुद्ध नव्हती ना? त्यांच्यासारख्यांना भाजपा किंवा संघ परिवाराच्या द्वेषाची इतकी नशा चढलेली असते, की कुठल्याही विषयात ते भाजपा-संघाला ओढून आणणारच. आणि त्यांना तुम्ही थांबवायचा प्रयत्न केला तर अट्टल दारुड्याप्रमाणे ते तुमच्यावर हल्ला सुद्धा करू शकतात. कारण ती त्यांची नशा असते आणि नशाबाज माणसाला अडवले, की तो चवताळतो. त्यामुळेच असेल, त्यांनी अलका धुपकर या एन्करलाच दमदाटी केली, तरी ती बिचारी गप्प राहिली.

   नुसती गप्प राहिली नाही तर बाळ काय बोलतात वा सांगतात, त्याकडे शहाण्यासारखे  दुर्लक्ष करून तिने चर्चा पुढे ढकलण्याचे प्रसंगावधान राखले. ज्यांना अजून त्याची खातरजमा करायची असेल, त्यांनी कायबीइन लोकमतच्या वेबसाईटवर जाऊन तो कार्यक्रम प्रत्यक्ष बघायला व ऐकायला हरकत नाही. छान मनोरंजन होऊ शकेल. व्यसनाधीनता व नशाबाजी यातून मी थेट अशा बौद्धिक चर्चेमध्ये कुठे घुसलो; असे कोणाला वाटू शकेल. तर नशा ही अनेक प्रकारची असते. नशा ही माणसाला वेडगळ वागायला व बोलायलाही भाग पाडत असते. आणि विशेष म्हणजे जेव्हा माणूस नशेत धूंद व मग्न असतो तेव्हा, त्याला आपणच जगातले एकमेव शहाणे आहोत असे भास होत असतात. ते व्हायला हरकत नाही. पण ते भास तो स्वत:पुरते ठेवील तर काहीच बिघडत नसते. पण तसे कधीच होत नाही. नशा चढलेली माणसे आपल्या मुर्खपणाला शहाणपण सिद्ध करण्यासाठी खुप आसुसलेली असतात. मग ते मोठ्या तावातावाने आपला मुर्खपणा टाहो फ़ोडून जगाला सांगू पहातात. प्रकाश बाळ त्यापैकीच एक वैचारिक नशाबाज आहेत. मग कायबीइन लोकमतवर थेट प्रक्षेपण चालू असतांनाची संधी ते कशाला सोडतील? मला तेव्हा बिचार्‍या अलका धुपकरची दया आली. आपला पाहुणा बेताल व बेभान होतोय याची जाणिव झाल्याने तिने आधी बाळकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयास केला. मग त्यांना कमीतकमी बोलण्याची संधी दिली. पण बाळ तर पुर्ण धुंदीत होते. त्यांनी धुमशान घालण्याचा चंगच बांधला होता. म्हणुनच त्यांनी थेट अण्णांवरच तोफ़ डागली. अण्णांचा अनुभव कसला? एका गावापुरते त्यांचे काम आहे, देशाचे प्रश्न त्यांना कधी समजलेलेच नाहीत. वगैरे वगैरे मुक्ताफ़ळे ते उधळत राहिले.

   अण्णांचा अनुभव व काम एका गावापुरतेच आहे, यात शंकाच नाही. पण ते गाव याच पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे, तिथे घडलेले बदल आपण डोळ्य़ांनी बघू शकतो, त्याचे अनुकरण अनेक गावांनी, संस्थांनी केलेसुद्धा आहे आणि तसेच परिणाम दिसून आले आहेत. पण असमर्थ प्रकाश बाळ यांचे काय? देशाच्या व्यापक समस्या. प्रश्नावर ते अनेक वर्षे भाष्य करत आहेत, उपाय सुचवत आहेत. त्यांच्या प्रत्येक उत्तर व उपायाचा बोजवारा उडालेला जग बघते आहे. कारण प्रकाश बाळ किंव त्यांच्यासारखे समाजवादी, सेक्युलॅरिझमचे नशाबाज जे उपाय, उत्तरे सांगत असतात, ते केवळ त्यांना नशेत झालेले भास आहेत. संपुर्ण पृथ्वीतलावर ते उपाय वा उत्तरे यशस्वी झाल्याचे एकही उदाहरण नाही. अण्णा जे बोलतात ते त्यांनी एका गावात तरी करून दाखवले आहे. प्रकाश बाळ वा त्यांच्यासारखेच जे धुंदीत पांडीत्य झाडणारे वाहिन्यांवर आमंत्रित केले जातात, त्यांनी त्यांच्या विद्वत्तेचा एकतरी प्रत्यक्ष प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे काय? आज आंदोलनात अण्णांचा अनुभव कमी असेल किंवा अण्णा त्यात नवे असतील. पण जे काही करत आहेत ते त्यांच्या स्वत:च्या बुद्धीने व अनुभवाने करीत आहेत. त्यांना कुठल्या पुस्तकातून वा ग्रंथातून बुद्धीची उसनवारी करावी लागलेली नाही. जे काही अण्णांचे सामर्थ्य आहे ते त्यांचे स्वत:चे आहे. म्हणूनच त्यांचा दासबोध हा त्यांची स्वत:ची कमाई आहे. प्रकाश बाळ यांचा बाळबोध हा त्यांच्या बौद्धिक व बोलघेवड्या असमर्थतेतून आलेला आहे. जेव्हा त्यांची समाजवादी चळवळ त्यांच्यासारख्या पोपटपंची करणार्‍या कर्तृत्वशून्य लोकांनी संपवली, तेव्हा त्यातले अनेकजण कॉग्रेस वा अन्य पक्षांमध्ये जाऊन बांडगुळाप्रमाणे जगत आहेत. नशाबाज जसा आपल्याला चढलेली नाही असे विचारले नसताना सांगतो, तसेच मग प्रकाश बाळ व त्यांचे जुने सहकारी बौद्धिक आव आणून बोलत असतात.    ( क्रमश:)
भाग  ( ३४२ )  ३१/७/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा