रविवार, २९ जुलै, २०१२

कल्याणकारी सरका्र, की दारूचा गुत्तेवाला


   सत्यमेव जयते या आपल्या मालिकेत आमिरखान याने मद्यपानाचाही विषय घेतला होता. त्यातले अनेक गंभीर मुद्दे त्याने मांडले नसले तरी निदान त्याने ह्या विषयाला हात घातला हेसुद्धा कमी नाही. त्यात त्याने अनेकांना त्यांचे अनुभव कथन करायला बोलावले होते. त्यामध्ये प्रसिद्ध पटकथाकार व कवि जावेद अख्तर यांचाही समावेश होता. त्यांनी आपले अनुभव सांगताना व्यसनासंबंधी जे चिंतन व्यक्त केले ते खरेच कौतुकास्पद होते. स्वत: जावेद अख्तर अनेक वर्षे स्वत: नशाबाज होते. आज त्यांनी त्या व्यसनापासून मुक्ती मिळवली आहे. पण त्यापासून मुक्त होणे एक गोष्ट आहे आणि त्याबद्दल चिंतन करणे वेगळा विषय आहे. आपण केवढे पाप करत होतो असे त्यांनी भाबडेपणाने सांगितलेले नाही. केवळ पश्चात्ताप झाला म्हणून त्यांनी दारू सोडली असे नाही. माणुस त्यात कसा ओढला जातो आणि त्यासाठी विविध भ्रम कसे कारणीभूत होतात, त्याचेही अख्तर यांनी आपल्या त्या अल्पशा मुलाखतीमध्ये छानपैकी विवेचनही केले. आपल्या व्यसनाधीनतेचा कुठलाही बचाव न मांडता त्यांनी जणू गुन्ह्याचा कबुलीजबाबच प्रेक्षकांसमोर सादर केला. ज्या सहजतेने त्यांनी विषय मांडला आणि नशेविषयीच्य भ्रमाचा भोपळा फ़ोडला, ते काम कौतुकास्पदच होते. लोकांना नशेपासून परावृत्त करू बघणार्‍या कुठल्याही समाजसुधारकापेक्षा जावेद अख्तर यांचे ते आत्मकथन अधिक प्रभावी होते.

   आज जावेद अख्तर मोठा अमणुस आहे. यशस्वी कथाकार व गीतलेखक आहे. सामाजिक घडामोडीमध्ये सहभागी होणारा संवेदनशील कार्यकर्ताही आहे. त्यांना प्रतिभावान कवि लेखक म्हणूनही ओळखले जाते. बुद्धीमंत म्हणुनही त्यांची ओळख आहे. पण आपल्या त्याच प्रतिष्ठेची टिंगल करत जावेद अख्तर म्हणाले, खरेच का मी इतका बुद्धीमान व हुशार आहे? असतो तर दारू भयंकर वाईट असते, ही साधी बाब मला समजायला तब्बल सत्ताविस वर्षे का लागावीत? माणुस हुशार असेल तर त्याला लगेच अशा गोष्टी कळायला हव्यात. हे हसत हसत सांगताना त्यांनी व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्या माणसाची बुद्धी कशी काम करेनाशी होते, त्याचाच साक्षात्कार लोकांना घडवला. कळत असते, समजत असते, पटतही असते. पण बुद्धी व्यसनापुढे शरणागत होते. व्यसनाधीन झालेला माणुस आपले माणूसपणही विसरून जातो. अशा व्यसनाकडे नव्याने माणुस कसा आकर्षित होतो, तेही त्यांच्याकडुनच समजून घेण्यासारखे आहे. चित्रपटातला नायक हिरो कुठल्याही निराशेतून बाहेर पडण्यासाठी नशेच्या आहारी जाताना दाखवलेला असतो. मग तो त्या नशेत मोठे अर्थपुर्ण डायलॉग बोलतो. पण वास्तवात नशापान केलेला माणुस कधीच तसा छान छान संवाद व शब्द बोलत नाही. दारूडा नेहमी अत्यंत घाणेरडी भाषा बोलतो, अत्यंत गलिच्छ वर्तन करतो. जे कधी चित्रपट वा कथेमध्ये दाखवले जात नसते. त्यामुळे त्या नशेचा आणि वास्तवाचा काडीमात्र संबंध नसतो. दारू माणसाला पशू बनवते, त्याच्यातले माणूसपण हिरावून घेते. हा अख्तर यांचा अनुभव महत्वाचा आहे.

   नशा माणुस करतोच कशाला? कोणी म्हणतात, शिणवटा, थकवा घालवण्यासाठी वा मजेसाठी माणूस नशा करतो. पण खरेच त्यातून थकवा जातो का? अंगात आलेली मरगळ नशा केल्याने कमी होत नाही, की संपत नाही. पण नशेची झिंग आली, मग त्या थकव्याचा विसर पडत असतो. मग नशा अंगात उसने अवसान आणत असते. त्यामुळे शरीरात त्राण नसले तरी माणुस त्या अवसानामुळे शरीराला न पेलवणारे काहीबाही करत असतो. म्हणजेच थकवा संपणे राहिले बाजूला, उलट थकलेल्या शरीराला आधिक कष्टात लोटून दिले जात असते. अनेकजण नशापान म्हणजे बॅटरी रिचार्ज करतो असे म्हणतात व समजतात. पण वास्तवात ते संपत आलेल्या बॅटरीची अधिकच नासाडी करत असतात. ही नशापानाची एक बाजू झाली. दुसरी बाजू आहे ती मजा किंवा ऐष म्हणुन होणारे नशापान. ज्यांच्या अंगात हिंमत किंवा क्षमता नसते, असे न्युनगंडाने पछाडलेले लोक अंगात नसलेला आवेश दाखवण्यासाठी नशेचा आधार घेत असतात. जे बोलायही हिंमत नसते, करायचे धाडस नसते, ते करायचे तर त्यांना नशा करावी लागते. म्हणजेच आपण जे आहोत त्यापेक्षा वेगळेच कोणी आहोत, असे दाखवण्यासाठीही नशेचा आश्रय घेतला जात असतो. मात्र त्यामुळे येणारा आवेश किंवा धाडस दिखावू किंवा तात्पुरते असते. नशा उतरली, मग ते शौर्य कुठल्या कुठे गायब होते आणि आपण जे काही केले ते दारूच्या नशेत केले अशा गयावया तोच नशाबाज करू लागतो. त्यामुळे मग त्याच्यात कायमचा न्युनगंड घर करून रहातो.

   कुठल्याही कारणाने माणुस नशा करू लागला मग त्याचे व्यसन होते. कारण तुम्ही कोणत्या कारणाने नशा करता त्याच्याशी तुमच्या शरीरातील पेशींना कर्तव्य नसते. त्यांना जी रसायने किंवा द्रव्ये सेवनासाठी पुरवली जातात, त्याची त्यांना सवय लागत असते. आणि त्यांना त्याची सवय लागली, मग दारू किंवा नशा पचवण्याची कुवत नसली, तरी ती नशा करावीच लागत असते. तिथे तुमची बुद्धी वा कारणमिमांसा काम करत नाही. त्या नशाबाज पेशींची हुकूमत तुमच्या मनावर आणि पर्यायाने तुमच्या बुद्धीवर चालू होते. अन्य वेळी लोकांशी शांतपणे समजूतदारपणे बोलणारा व्यसनी माणूस त्याच्या नशेची वे्ळ झाली मग तर्कहीन बोलू लागतो, आक्रमक होतो. अगदी वेडसर वागू लागतो. मग अशा नशा किंवा व्यसनाची माणसाला गरजच काय. शेकडो अशी माणसे आपण आपल्या आसपास बघू शकतो, की त्यांना कुठलेही व्यसन नसते. म्हणजेच संपुर्ण आयुष्य त्यांनी निर्व्यसनी म्हणुन निरोगी जगलेले असते. मग इतरांना व्यसनाची गरजच काय असते? तर अकारण कुठ्ल्यातरी मोहात सापडून वा कुणाच्या आग्रहाला बळी पडून अथवा गंमत म्हणुन केलेल्या धाडसातून व्यसनाच्या सापळ्य़ात माणुस गुरफ़टत जात असतो. आणि गुरफ़टत जातो, तसतसा त्याच्यातले माणुसपण गमावत असतो. अशा मस्तीची एक मजेशीर गोष्ट जावेद अख्तर यांनी कथन केली. इतर बाबतीत ज्याला पोरकट म्हणता येईल अशा गोष्टी नशाबाज फ़ुशारकी मारताना आपला पुरूषार्थ म्हणुन अभिमानाने सांगत असतो.

   नुकताच नशापान करू लागलेला एखादा प्याला दारू पित असेल तर चारपाच वर्षांनी भेटल्यावर संपुर्ण बाटली दारू पचवतो असे अभिमानाने सांगतो. पण त्याचा हा दावा किती हास्यास्पद असतो? आज दुध प्यायला लागलेला कोणी चार वर्षांनी भेटला तर दहा वीस प्याले दुध पितो असे सांगणार नाही, मग दारूच्याच बाबतीत असे का व्हावे? एका मर्यादेपर्यंत मद्यप्राशन झाले, मग त्याची अधिक नशा होत नाही. पण तरीही पिणारा अधिकच पीत रहातो. कारण त्याला काय करतो त्याची शुद्धच राहत नाही. तो मुर्ख व वेडगळपणाने वागू लागतो. आपण जगासमोर वेडगळ ठरावे किंवा गलिच्छ ठरावे, असे त्यालाही वाटत नसते. पण तसे होणार हे माहित असूनही तो स्वत:ला आवरू शकत नाही. माणसाने स्वत:ला असे पशू का बनवून घ्यावे? खरे पहिल्यास नशेमागचा हेतू आपले खोटे मोठेपण दाखवण्याचा असतो. पण होते नेहमी उलटेच. फ़ुशारकी बाजूला पदते आणि लोकांसमोर तो नशाबाज हास्यास्पद ठरतो. त्याची गरज काय? त्यात कसली प्रतिष्ठा असते? आपण असे पशू का बनतो? तर आपण व्यसनाच्या आहारी गेलेलो असतो. नशेचे गुलाम बनत असतो. आणि मग पर्यायाने आपण मानवी समाजात वागायला व जगायलाही नालायक बनून जातो. स्वत:ला त्रास करून घेतच असतो, पण त्याचवेळी इतरांनाही त्रास देऊ लागतो. अवतिभोवतीच्या लोकांसाठी आपण एक त्रास किंवा समस्या बनून जातो.

   म्हणूनच मद्यपान किंवा दारू ही समाजातील एक विकृती आहे. सरकारने सुसंस्कृत व सुदृढ समाज निर्माण करताना अशा विकृतीला पायबंद घालण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पण त्याऐवजी तेच सरकार त्याच विषाच्या उत्पादन व विक्रीतून मि्ळणार्‍या उत्पन्नाकडे आशाळभूतपणे बघत असेल तर त्याला समाज कल्याणकारी सरकार म्हणता येईल काय? गुटख्याचे उत्पादक धारिवाल जसे ‘माझा धंदा आहे’ म्हणुन व्यसनाधीनतेकडे पाठ फ़िरवतात, त्याच्यापेक्षा आजचे सरकार दारूच्या बाबतीत वेगळे काही करते आहे काय? लोक मरतात मरू देत, लोकांचे आरोग्य बिघडते तर बिघडू देत, लोकांचे संसार उध्वस्त होतात, तर होऊ देत. आम्हाला तिजोरीत जमणार्‍या पैशाशी कर्तव्य आहे, असे कुठले कल्याणकारी सरकार म्हणू शकते का? आणि म्हणत असेल तर त्याला कल्याणकारी सरकार म्हणता येईल काय? गुटखाबंदीचे ढोल वाजवणार्‍या सरकारची नियत खरी व चांगली नाही, हेच मला सांगायचे आहे. तेवढ्य़ासाठीच हा व्यसनमुक्तीचा विषय थोडा तपशीलाने मांडावा लागला. माणुस रोगी होऊ नये म्हणत गुटखाबंदी करणार्‍या सरकारला माणसाचा पशू करणार्‍या नशेवर बंदी घालायची इच्छा होत नाही, मग दारूचा गुत्तेवाला, हातभट्टी विकणारा आणि मंत्रालयात बसून मद्यातून मिळणारे उत्पन्न मोजणारा यात कुठला फ़रक उरला?     ( क्रमश:)
भाग  ( ३४० )     २९/७/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा