मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१२

११ जुलै २००६ ची सैतानी संध्याकाळ


   ज्याप्रकारे ५ जुलै २००६ पासून भिवंडी ते मुंबई गोधळ घातला गेला होता, तो कुठल्या निषेध वा प्रक्षोभासाठी होता, की पोलिसांना त्यांच्या कामापासून तोडण्यासाठी केलेला डाव होता? ५ जुलै ते ९ जुलै अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली, की मुंबई महानगर प्रदेश ज्याला म्हणतात, त्या संपुर्ण भागामध्ये अराजकाची स्थिती पद्धतशीर निर्माण करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना त्यांचे नेहमीचे काम व्यवस्थित पार पाडता येणार नव्हते. बराच फ़ौजफ़ाटा भिवंडीत तैनात करण्यात आलेला होता आणि उरलसुरला शिवसेनेच्या शाखांभोवती उभा करण्यात आला होता. मग नेहमीच्या गस्ती, खबर काढणे, पहारे देणे किंवा संशयितांवर पाळत ठेवणे; अशा गोष्टी पोलिस करूच शकत नव्हते. मग अशा परिस्थितीचा कोणाला लाभ घेता येतो? की ज्यांना त्याचाच लाभ उठवायचा होता त्यांच्यासाठी अशी स्थिती मुद्दाम निर्माण करण्यात आली होती? कारण त्या स्थितीचा अत्यंत भयंकर फ़ायदा घेतला गेला. मुंबईत मीनाताई यांच्या अर्धपुतळ्याची विटंबना झाल्याचे उघडकीस आल्यानंतर अवघ्या ३६ तासात मुंबई हादरून गेली. कारण ३६ तास उलटले तेव्हा ११ जुलै २००६ चा सुर्य मावळत होता. तेव्हा कामाधंद्याला सकाळी घराबाहेर पडलेला मुंबईकर दाटीवाटीने आपापल्या घरी परतू लागला होता. त्यसाठी त्याची पश्चिम व मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये झुंबड उडालेली होती. आणि नेमक्या त्याच मुहूर्तावर पश्चिम रेल्वेच्या वेगवेगळ्या लोकल गाडयांमध्ये बॉम्ब फ़ुटत गेले. काय होते हे कळायच्या आत; म्हणजे अवघ्या तासाभरातच सात बॉम्बचे स्फ़ोट झाले आणि त्यात २०९ मुंबईकरांची आहुती पडली. सातशेहून अधिक लोक जखमी व जायबंदी झाले. आज मुंबईतल्या आझाद मैदानाच्या दंगलीविषयी बोलताना कुणाला तरी त्याचे किंचित स्मरण आहे काय?

   भिवंडीची दंगल आणि तिला आठवडा उलटण्यापुर्वी झालेले हे लागोपाठचे पश्चिम रेल्वेतले ब बॉम्बस्फ़ोट यांची कोणी कधी सलग चौकशी केली आहे काय? त्यांचा परस्पर काहीच संबंध नव्हता काय? तसा संबंध असावा अशी माझी खात्री आहे. म्हणूनच मी दुर अमेरिकेत होतो, तरी मी तशी आशंका व्यक्त करणारा लेख लिहून पाठवला होता. त्यात बॉम्बस्फ़ोट होतील अशी माझी भविष्यवाणी नव्हती. पण काही तरी मो्ठी घटना दोनतीन दिवसात घडावी अशी माझी अटकळ होती. त्याचेही कारण होते. मला भिवंडीपासून मुंबईत शिवाजीपार्कच्या पुतळ्याच्या विटंबनेचे तार्किक कारण सापडत नव्हते. दोन्ही घटना या पुर्णपणे विनाकारण घडवलेल्या होत्या आणि त्यातून निष्कारण मुंबई परिसरातल्या संपुर्ण पोलिस खात्याला गुंतवून ठेवण्यात आलेले होते. जेव्हा पोलिस असे गुंतून पडतात, तेव्हा घातपात्यांना स्फ़ोटके, बॉम्ब कुठूनही कुठेही उजळमाथ्याने घेऊन जाण्याची मुभा मिळत आसते. कारण पोलिसांचा ससेमिरा त्यांच्या मागे असत नाही. पोलिसांचे आपल्याकडे लक्षच नाही म्हटल्यावर अशा घातपात्यांना मोकळे रान मिळत असते. ज्यांच्याकडून इतका मोठा धोका नव्हता त्या  शिवसैनिकांमागे पोलिस पाठवून दिले; मग घातपात्यांना मैदान मोकळे होणार ना? की ते मैदान मोकळे व्हावे म्हणुनच आधीची व्युहरचना करण्यात आली होती? म्हणजे आधीच्या किरकोळ घटना मुद्दाम घडवण्यात आल्या होत्या? ज्यांना बॉम्ब ठेवायचे व स्फ़ोट करायचे होते, त्यांचे काम व हालचाली सुकर करण्यासाठी आधीच्या घटना पद्धतशीर रितीने घडवण्यात आल्या नव्हत्या; याचा काही पुरावा आहे काय? नसतील तर ५ जुलै ते ११ जुलै २००६ दरम्यान जे काही घडले त्यांचा एकत्रित तपास व शोध व्हायला पाहिजे. पण ते काम कधीच झाले नाही. भिवंडीची दंगल असो किंवा शिवा्जीपार्कचा पुतळा असो आणि पश्चिम रेल्वेतले स्फ़ोट असो. प्रत्येक घटनेचा वेगवेगळा शोध घेतला गेला. त्याचेच परिणाम मग पुढे दिसून आले, जेव्हा तुम्ही इतके गाफ़ील व बेफ़िकीर असता तेव्हा लपूनछपून जिहादी घातपात्यांना इथे येण्याची गरज उरत नाही. ते सरळ समुद्रमार्गे कराची ते मुंबई येऊन पोहोचले. त्यांनी आणखी चारपाचशे लोकांचे मुंबईत राजरोस मुडदे पाडले. ज्यांना आपण कसाबची टोळी म्हणून ओळखतो.

   हे सर्व घडले कारण कोणीही भिवंडीत गांगुर्डे व जगतापची आहूती का पडली; त्याचा कधीच गांभिर्याने विचारच केला नाही. रझा अकादमी नावाची संस्था नेमके काय सामाजिक कार्य करते; त्याचाही शोध घेतला गेला नाही. अकादमी नावाची कुठली संस्था आजवर अशा गुन्हेगारी व हिंसक कामात गुंतलेली आपण ऐकले आहे काय? नसेल तर सहा वर्षापुर्वीच रझा अकादमीच्या कारभाराची चौकशी व्हायला हवी होती. ज्या संस्थेच्या भिवंडीतील मेळाव्याने दोन निरपराध पोलिसांची कत्तल केली व त्यांना जाळून भस्मसात केले; त्यांच्या बाबतीत सरकारने कोणती माहिती आजवर जमवली आहे? ज्या संस्थेच्या भिवंडीतील रक्तरंजित नाटकानंतर मुंबईत स्मारक विटंबनेचे प्रकार घडतात आणि नंतर लगेच स्फ़ोट मालिका होऊन शेकडो लोकांचे बळी जातात, त्या संस्थेकडे पोलिस वा सरकार संशयाने बघू शकत नसेल; तर त्यांना पोलिसकार्य किंवा तपासकाम म्हणजे काय ते तरी समजते काय असा प्रश्न आहे. त्या्ची तेव्हापासून गंभीर दखल घेतली गेली असती तर आझाद मैदानवर रझा अकादमी निषेध मेळावा घेणार म्हणजे काय; त्याचा स्पष्ट अंदाज येऊ शकला असता. रझा अकादमीचा निषेध मोर्चा म्हणजे हिंसाचार आणि थेट पोलिसांवरच हल्ला, हे समिकरण आधीच पोलिसांना माहित असू शकले असते. कारण पोलिस भिवंडीमुळे त्या अनुभवातून गेलेले होते. मला त्याचेच आश्चर्य वाटते. दहा वर्षे उलटून गेल्यावरही मुंबईच्या सर्वांना गुजरातची दंगल आठवते आहे. पण ज्यात गांगुर्डे व जगताप असे दोन पोलिस मारले व जाळले गेले; ती भिवंडीची दंगल का आठवत नाही? की आठवते पण त्याबद्दल बोलायचेच नाही?

   इथे आपल्या देशातील सेक्युलर थोतांडाची प्रचिती येते. वीस वर्षापुर्वीच्या बाबरी कांडतल्या घटना आठवणीने सांगितल्या जातात आणि दहा वर्षापुर्वीच्या गुजरात दंगलीच्या आठवणी उकरून काढल्या जातात. पण त्याच आठवणी खाजवणारे सेक्युलर विचारवंत विश्लेषक; भिवंडीची दंगल व पोलिसांची झालेली हत्या विसरून जातात. अगदी तीच रझा अकादमी दोन्हीकडे असते आणि दोन्हीकडे थेट पोलिसांवरच हल्ला होतो, तरी कोणाही वृत्तपत्राला वा वाहिनीला भिवंडीची दंगल आठवलेली नाही. गांगुर्डे वा जगताप हकनाक मारले गेल्याचे स्मरण होत नाही. हा सेक्युलर कारभार आहे, की बहुसंख्य हिंदूच्या भावनांशी चाललेला खेळ आहे? की हिंदूच्या भावना दुखावतात असे म्हणायचीही आता आमच्या सेक्युलर माध्यमांनी भितीव वाटू लागली आहे? नसती तर त्यांनी ठामपणे भिवंडीच्या आठ्वणी चा्ळवल्या असत्या. आमच्या माध्यमांना त्यांच्यावरही पोलिसांबरोबरच हल्ला झाला, त्याची खंत नाही, अविष्कार स्वातंत्र्य पायदळी तुडवले गेल्याची फ़िकीर नाही. अमर जवान ज्योती स्मारक उध्वस्त करण्यात आल्याचे वैषम्य वाटलेले नाही. हा कसला सेक्युलॅरिझम आहे? ज्यांना हिंदुत्ववादी पोरांनी चार दगड मारले तर आभाळ कोसळल्याचा भास होतो. पण मुस्लिम गुंडांनी व झुंडीने धुडगुस घातला तर झालेली हिंसाही दिसत नाही. आणि दिसली तरी त्याबद्दल बोलायची भिती वाटते. हे कसले स्वातंत्र्य आहे? हा कसला सेक्युलॅरिझम आहे?

   मालेगावच्या स्फ़ोट प्रकरणात जुने नवे सर्व धागेदोरे शोधण्यात आपली सर्व बुद्धी खर्ची घालणार्‍या आमच्या तमाम सेक्युलर पत्रकार व जाणकारांना भिवंडी, रझा अकादमी व आझाद मैदानाजवळ झालेल्या दंगलीतले धागेदोरे दिसत असतांनाही अशी डोळ्य़ासमोर अंधारी का येते? त्या अंधारीचेच नाव सेक्युलॅरिझम आहे काय? त्या कायबीइन लोकमतवर पाल्हाळ लावणार्‍या निखिल नामक मुर्खाला तर कोणी काय अफ़वा पसरवल्यात, त्याची चिंता लागून राहिली आहे. पण समोर चित्रणात जी हिंसा साध्या डोळ्यांना दिसते, त्या्ची फ़िकीर नाही. संघाच्या कोणा सुनील देवधरच्या अंगावर अफ़वांसाठी ओरडण्यात पुरूषार्थ दाखवणार्‍या निखिलला आझाद मैदान किंवा परिसरात महिलांच्या इज्जतीशी झालेल्या खेळाची वेदना कधी कळली आहे काय? त्याला किंवा तत्सम लोकांना गांगुर्डे व जगताप यांच्या कुटुंबियांचे अश्रू कधी कळले आहेत काय? दिसले आहेत काय? २००६ च्या पश्चिम रेल्वे स्फ़ोटात मेलेल्या २०९ आणि जखमी झालेल्या सातशे लोकांच्या वेदना या सेक्युलर गेंड्यांना कधी कळणार आहेत काय? ज्यांना त्या वेदना व त्यानंतरच्या यातना कळतच नाहीत वा दिसत नाहीत; त्यांच्याकडून कुठल्या दंगली वा हिंसाचाराचे विश्लेषण काय होऊ शकणार? ते तमाशातल्या सवाल जबाबाच्या मनोरंजक जुगलबंद्या रंगवू शकतात. शब्दांचे बुदबुडे उडवू शकतात. विश्लेषण किंवा चिरफ़ाड हे त्यांचे काम नाही. ते घातपात्यांपेक्षा अधिक धोकादायक असतात. कारण असे लोक आपल्याला गाफ़िल ठेवून हल्लेखोरांच्या अक्राळविक्राळ जबड्यात ढकलून देत असतात. भिवंडीचे वेळीच योग्य विश्लेषण झाले नाही, किंवा केले नाही; म्हणुन रेल्वेस्फ़ोटात २०९ निष्पापांचा हकनाक बळी गेला. कारण याच सेक्युलर भामट्यांच्या नादाला लागून सामान्य लोक बेसावध शांततेच्या आहारी गेले आणि मृत्यूच्या दाढेत ढकलले गेले.                   ( क्रमश:)
भाग  ( ७ ) २२/८/१२

२ टिप्पण्या:

  1. खरंय तुमचं म्हणणं. एखादी मोठी राष्ट्रविघातक घटना घडवून आणण्यासाठी जसा हिंसक निदर्शने आणि पुतळे विटंबनांचा आधार घेतला जातो त्याचप्रमाणे भ्र्ष्टाचाराची मोठी प्रकरणे दुर्लक्षित करण्यासाठी देखिल याच घटनांचा वापर केला जातो. सगळीकडे साम्य एकच आहे आणि ते म्हणजे दंगेखोरांवर कोणतीही कारवाई होत नाही. म्हणजेच हे सगळे शासन पुरस्कृतच असते.

    उत्तर द्याहटवा
  2. घटनांचा ,त्यांच्या मागच्या पार्श्वभूमिंचा इतका खोलवर अभ्यास खरतर भविष्यातील घातपात रोखण्यासाठी उपयोगाचा असतो … विवादास्पद घटनांमागची कारणमीमांसा करणे हेच तर सुरक्षा यंत्रणांचे मुख्य काम असते…तुमचा हा ब्लॉग फार उशिरा वाचनात आलाय पण प्रत्येक लेख अभ्यासपूर्ण आहे ,आणि तो जास्तीत जास्त निपक्ष होईल असा तुमचा प्रयत्न हि स्तुत्य आहे ….

    स्वप्नील पाथरे
    लालबाग ,मुंबई

    उत्तर द्याहटवा