शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२

दिडशे वर्षापुर्वी मुंबईतली दंगल कोणी कशाला केली?


   जी गोष्ट आपल्या सोयीची असेल ती माणुस लगेच स्विकारत असतो. त्याच गोष्टीचा आधार घेत असतो. लोकशाहीने सामान्य माणसाला अधिकार दिले आहे, असे म्हटल्यावर अनेकजण केव्हाही देशात लोकशाही आहे की नाही; असा सवाल अधूनधून करत असतात. पण त्याच लोकशाहीने व राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराबरोबर काही जबाबदार्‍याही दिलेल्या आहेत. त्याची पुर्तता कोणी करायची? तिकडे माणुस सोयिस्कररित्या पाठ फ़िरवत असतो. त्यातून मग समस्या निर्माण होतात. सध्या अरब जगतामध्ये मोठीच रणधुमाळी माजली आहे. त्याचे कारण तिकडे दुर अमेरिकेत कोणीतरी प्रेषित महंमद यांच्यासंबंधी एक माहितीपट निर्माण केला असून त्यात प्रेषिताची बदनामी केली असा दावा आहे. त्यामुळे तो अमेरिकेतला निर्माताही त्याच्या मायदेशात घाबरून भूमिगत झाल्याची बातमी आहे. पण नुसत्या त्या बातमीने अरब मुस्लिम जगात खळबळ माजली आहे. मंगळवारी लिबिया नामक देशातल्या अमेरिकन वकिलातीवर जमावाने हिंसक हल्ला चढवला आणि ती पेट्वून दिली तर त्या वकिलातीचे काही कर्मचारी व मुत्सद्दी घेऊन चाललेल्या गाडीवर रॉकेट सोडून त्यांची हत्या करण्यात आली. त्याच दिवशी इजिप्तमध्ये कैरोच्या प्रसिद्ध तहरीर चौकाजवळ असलेल्या अमेरिकन दूतावासावर हिंसक हल्ला चढवण्यात आला. गुरूवारी त्याची पुनरावृत्ती येमेन या देशात झाली. कडवा किंवा ईमानी मुस्लिम आपल्या प्रेषिताची बदनामी सहन करू शकत नाही, ही इतिहासप्रसिद्ध गोष्ट आहे. त्यामुळे जे आज अरब जगात घडते आहे, त्यात नवे काहीच नाही. जुन्याच इतिहासाची पुनरावृत्ती आहे. असे काही वाचले मग बिगर मुस्लिम वाचकांना थोडेसे आश्चर्य वाटते. पण त्यात नवलाईचे काहीच नाही. असे कित्येक शतके व दशकांपासून चालू आहे त्यात नवे काहीच नाही. अगदी मुंबईच्या इतिहासात पहिली दंगल नोंदली गेली, तिचे कारणही नेमके हेच होते असे सांगितले तर आजच्या पिढीला आश्चर्य वाटेल.

   ही लेखमाला लिहायला लागल्यापासून काही नाराज मुस्लिमांनी माझ्यावर एका विचारधारेचा म्हणजे हिंदूत्ववादाचा आरोप केला. आता त्यात नवे काहीच राहिलेले नाही. मुस्लिमांच्या चुका दाखवायला गेले, मग त्याच्यावर संघपरिवाराशी संबंधित असल्याचा आरोप करणे ही सेक्युलर फ़ॅशन झाली आहे. पण ज्यांना असे आरोप करायचे असतात, त्यांना सत्याशी वा वास्तवाशी कुठलेही कर्तव्य नसते. तेव्हा माझ्या हेतूबद्दल शंका घेताना असे आरोप होणे स्वाभाविक आहे. पण म्हणून इतिहास किंवा वास्तव बदलत नसते. भारतातल्या कुठल्याही दंगलीसाठी आजकाल असा बिनबुडाचा आरोप होतच असतो. पण ज्या संघावर आरोप होतो किंवा हिंदूत्ववाद्यांवर आरोप होतो, त्यांचा उदय झाला नव्हता, त्यावेळी मुंबईत दंगल का व्हावी? ती दंगल तब्बल दिडशे वर्षापुर्वीची आहे. आणि अजून संघाच्या स्थापनेला किंवा तत्पुर्वीच्या हिंदू महासभेच्या स्थापनेलाही दिडशे वर्षे झालेली नाहीत. मग त्या दिडशे वर्षे जुन्या मुंबईतील दंगलीचे खापर कोणाच्या डोक्यावर फ़ोडायचे? गंमत वाटली ना? दि्डशे वर्षापुर्वीची मुंबईतील दंगल म्हटल्यावर?

   अजून मुंबईत पोलिस खातेसुद्धा निर्माण झाले नव्हते किंवा भारतीय दंडविधान अस्तित्वात आलेले नव्हते, तेव्हा मुंबईत पहिली दंगल माहीम येथे मुस्लिमांच्या दोन गटात १८५० सालात झाली होती. हे दोन्ही गट खोजा मुस्लिमांचेच होते. पण त्याला जातीय दंगा किंवा आजच्या स्वरूपातला दंगा म्हणता येणार नाही. ते दोन गटातले भांडण विकोपास गेले त्या्तून उद्भवलेली हाणामारी होती. ज्याला आजच्याही व्याख्येत दंगल म्हणता येईल, अशी मुंबईची पहिली दंगल पुढल्या वर्षी म्हणजे १८५१ साली झाली. तिच्या बंदोबस्तासाठी थेट लष्कराला पाचारण करावे लागले होते. हे लष्कर भायखळ्यापासून गिरगावपर्यंतच्या पट्ट्यात खडे ठेवण्यात आलेले होते. त्या दंगलीचे कारण काय असेल? ती दंगल कोणत्या समाज घटकात झाली होती? आज कोणाला ते ऐकूनही खरे वाटणार नाही. पण ती मुंबईची पहिली भीषण दंगल मुस्लिम व पारशी समाज घटकात झाली होती. आणि तिचे कारण आजच्या इतकेच ताजेतवाने होते. ज्या कारणास्तव आज इजिप्त, लिबिया व येमेन आदी देशात हिंसाचार माजला आहे, त्याच कारणास्तव एकशेसाठ वर्षापुर्वी मुंबईची पहिली दंगल झाली होती. एका पारशाने चालविलेल्या "चित्रज्ञान दर्पण" नामक एका नियतकालिकात प्रेषित महंमद यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर छापून आला, म्हणून मुस्लिम खवळले आणि ती दंगल उसळली होती. ते नियतकालिक गुजराती भाषेतले होते.

   हा सगळा इतिहास एवढ्य़ासाठी सांगायचा, की मुंबईच्या पहिल्या दंगलीत हिंदू नव्हते. आणि मुस्लिम आजसुद्धा त्याच मानसिकतेमध्ये आहेत. धर्मविषयक हळवेपणा हा मुस्लिमांचा स्वभाव असा आहे, की ते तात्काळ रस्त्यावर येतात. ही वस्तुस्थिती किती लोक मान्य करतील? आणि ठिक आहे. जर त्यांना आपल्या धर्माविषयी इतकी आस्था असेल व त्याची कुठलीही विटंबना किंवा अवहेलना सहन होत नसेल, तर अन्य धर्मांचाही तेवढाच सन्मान राखण्याची सहिष्णूता त्यांनी दाखवली पाहिजे. अशी अपेक्षा करणे गैर ठरेल काय? आपल्या भावना इतक्या नाजूक ज्या कारणास्तव आहेत, त्याच कारणास्तव दुसर्‍या धर्मियांच्या भावना आपल्याकडून दुखावणार नाहीत, याची काळजी त्यांनी घ्यायला नको काय? आणि तशी काळजी घेतली जाणार नसेल तर त्या दुसर्‍या धर्माच्या लोकांनी काय करावे, अशी अपेक्षा आहे? जो निकष व नियम लावून मुस्लिम जमाव सरसकट संपुर्ण अमेरिका किंवा तिथल्या नागरिकांना शासन करायला पुढे सरसावतो; त्याच न्यायाने इतर धर्मियांनी वागायचे काय? उदाहरणार्थ हिंदू किंवा जैन किंवा बौद्ध धर्मियांच्या धर्मश्रद्धांना कुणा मुस्लिमाने दुखावले, तर त्या धर्मातील अनुयायांनी सरसकट मुस्लिम समाजाला त्यासाठी जबाबदार धरून सजा द्यायला पुढे यायचे काय? आज जे काही येमेन, इजिप्त वा लिबियामध्ये चालले आहे, तोच नियम अन्यत्र लावून चालेल काय? कोणा एका अमेरिकन नागरिकाने प्रेषिताची अवहेलना केली म्हणुन सगळे अमेरिकन गुन्हेगार आहेत काय? असतील तर तोच न्याय दुसर्‍या बाजूला एम. एफ़. हुसेन यांच्या चित्रासाठी सर्व मुस्लिम बांधवांना लावावा लागेल. नसेल तर मुस्लिमांनी आज अमेरिकन नागरिकांच्या विरोधात सुरू केलेल्या हिंसेचे समर्थन होऊ शकते काय?

   जगप्रसिद्ध चित्रकार हुसेन यांनी हिंदू देवदेवतांच्या विटंबनेवर आधारित चित्रे काढली होती. त्यावर न्यायलयात दाद मागितल्यावर अटक होईल म्हणुन त्यांनी देश सोडून पळ काढला. ते परत मायदेशी परतलेच नाहीत. त्या एका माणसासाठी इथले तमाम मुस्लिम गुन्हेगार ठरवता येतील काय? कुणा हिंदू संघटनेने तसे केले आहे काय? त्यासाठी दंगा केला आहे काय? अगदी ज्या संघ परिवार व अन्य हिंदू संस्थांवर आरोप होतो, त्यापैकी कोणी हुसेनच्या कृत्यासाठी मुस्लिमांच्या विरोधात दंगा केल्याचे कोणाच्या वाचनात आहे काय? काही हिंदू धर्मवाद्यांनी त्यासाठी हुसेन विरोधात न्यायालयात दाद मागितली. याला धार्मिक उन्माद म्हणायचा, की कायद्याचे पालन म्हणायचे? पण नेहमी त्याच हिंदू संस्थावर आरोप होत असतो. आजही मी मुस्लिमांचे दोष दाखवतो तर माझ्यावर तसाच आरोप करण्याचा प्रयत्न झाला. पण ज्या पद्धतीने अरबी देशात हिंसा चालू आहे, त्याबद्दल कोणी किती तक्रारी केल्या आहेत? यात ज्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या त्याला शिक्षा देण्यासाठी न्यायालयात धाव घेण्याचा समंजसपणा हिंदू संघटनांनी दाखवलेला नाही काय? त्याचे कोणी कधी कौतुक केले आहे काय? उलट त्याच संघटनांनी कायदेशीर मार्ग चोखा्ळला तरी त्यांची माध्यमात निंदाच झालेली आहे. त्यांच्यामुळे एक चांगला चित्रकार देश सोडुन गेला म्हणुन सेक्युलर माध्यमांनी त्याच संघटनांची हेटाळणी केली आहे. हा भेदभाव नाही काय? सेक्युलर विचार वा भुमिका अशी भेदभाव करणारी व पक्षपाती असू शकते काय? नसेल तर त्या भूमिकेला धर्मनिरपेक्ष म्हणता येईल काय? माझी स्मृती दगा देत नसेल तर त्यावेळी हुसेन मुस्लिम असला तरी हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या म्हणून रझा अकादमी मात्र हुसेन याच्या विरोधात उभी राहिली होती. त्यांनी हुसेनच्या चित्राचे समर्थन केले नव्हते तर निषेधच केला होता. ज्या हिंदू संघटनांनी हुसेन विरोधी निदर्शेने केली त्यांना रझा अकादमीने पाठींबा दिल्याची बातमी मी वाचली होती असे अस्पष्ट आठवते.

   पण मुद्दा आहे तो कायदा हाती घेण्याचा. मुस्लिम संघटना कायद्यानुसार कोणावर कारवाई करण्याचा मार्ग चोखाळतील तर खुप मोठे शांततामय वातावरण तयार होऊ शकेल. दुसरीकडे मुस्लिमातील जे कोणी अन्य धर्मियांच्या भावना व श्रद्धांना धक्का लावतात, त्यांना पायबंद घालण्यात मुस्लिम संघटनांनी पुढाकार घेतला तर विश्वासाचे वातावरण निर्माण होऊ शकेल. पण तसे क्वचितच होताना दिसते. डॉ. झाकीर नाईक ज्याप्रकारे हिंदू धर्मियांच्या श्रद्धा व समजुती यावर तार्किक विवेचन व टवाळी करतात, तसे अन्य धर्मियांनी इस्लाम व त्यांच्या धार्मिक समजुतींबद्दल करणे मुस्लिमांना मानवणार आहे काय? आज अमेरिकेत कोणी चित्रपट काढला त्यातून प्रेषिताबद्दल व्यक्त केलेले मत मुस्लिमांना आवडत नाही. मग त्याच पद्धतीने झाकीर नाईक हिंदू देवदेवतांच्या बाबतीत मतप्रदर्शन करतात, त्याचे हिंदू धर्मानुयायांनी काय करावे? रस्त्यावर यावे काय?   ( क्रमश:)
भाग   ( ३२ )  १६/९/१२

1 टिप्पणी:

  1. माझ्या मते मुंबईतील पहिली दंगल ही १८३२ साली हिंदू-पारसी समुदायामधे झाली होती. कुत्र्याला मारण्यावरून वाद उद्भवला होता. पारसी-मुस्लिम दंगल ही १८५१ साली झाली, तेव्हा प्रेषिताविषयीचा वाद उद्भवला होता. याच दंगलीचे परिणाम म्हणून पुन्हा १८७४ मधे मुस्लिम-पारसी दंगल झाली होती. विकिपिडीयावरदेखील असाच उल्लेख आढळतो.

    उत्तर द्याहटवा