मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१२

शंका संशयाचे निरसन कधी होणार?

    कोणाला वाटेल एवढ्य़ाशा दाढी राखण्याच्या विषयाचे मी किती अवडंबर माजवतो आहे. पण मी काय सांगतो आहे व का सांगतो आहे; त्याचा मुस्लिम समाजाने गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. कारण हे दिसते इवले प्रकरण, पण त्याच धागेदोरे कुठवर जाऊन पोहोचले आहेत; त्याचा शोध घेतला तर मुस्लिम समाज आज जगभर प्रत्येक देशात व एकूणच जगात एकाकी कशामुळे पडत चालला आहे त्याचे उत्तर सापडू शकेल. आणि मुस्लिमांनी त्याचा गंभीरपणे विचार करावा असे मी का म्हणतो आहे? तर जे अन्य म्हणजे बिगर मुस्लिम आहेत, त्यांच्या लेखी सर्वच मुस्लिम असतात. पण त्यातले विविध पंथ किंवा मुस्लिमातले भेदभाव इतरांना फ़ारसे ठाऊक नाहीत. उदाहरणार्थ शिया-सुन्नी असे पंथ लोकांना ठाऊक आहेत. पण अहमदिया, बोहरा, खोजा असे बारकावे फ़ारसे माहित नसतात. त्याच्याही पलिकडे देवबंदी, बरेलवी किंवा वहाबी असे पोटभेद लोकांना कळत नाहीत. कदाचित बहुसंख्य भारतीय मुस्लिमांनाही यातले अनेक पंथ किंवा त्यांच्या विचारधारा ठाऊक नसतील. मग इतर सामान्य बिगर मुस्लिमांना तरी त्याची जाण कशी असेल? पण मग समस्या अशी असते, की मुस्लिमेतर सर्वांना एकाच मापाने मोजत असतात व त्याचे सार्वत्रिक परिणाम सर्वच मुस्लिमांना सारखेच भोगावे लागत असतात. आणि म्हणुनच यातले फ़रक व भेदभाव मुस्लिम विचारवंत व अभ्यासकांनी सामान्य मुस्लिमांना शिकवणे आणि इतरेजनांना समजावणे; मला अगत्याचे वाटते. उदाहरणार्थ वहाबी हा सर्वात कटटर पंथ आहे आणि आज जगभर जे दहशतवादाचे धमाके चालु आहेत, त्याची प्रेरणा त्याच वहाबी पंथातून आलेली आहे. आज देशाच्या अनेक भागात मशिदींवर कब्जा मिळवण्य़ाचे जे झगडे चालू असतात, त्यातले विविध गट कोण आहेत आणि त्या कब्जातून काय साधायची रणनिती राबवली जाते; याचे कितीसे ज्ञान वाहिन्यांवर पोपटपंची करणार्‍यांना असते? मग सामान्य नागरिकांपर्यंत काय पोहोचणार?

   मुस्लिम आपल्या धर्माविषयी व धर्मश्रद्धेविषयी कमालीचे आग्रही व हळवे असतात. म्हणूनच अत्यंत कडवे धर्मनिष्ठ असतात, अशी एकूणच हिंदूत्ववाद्यांची तक्रार किंवा आक्षेप असतो. माझी त्याबद्दलही तक्रार नाही. मला मुस्लिमांचे हळवे किंवा आग्रही असणेही मान्य आहे. हिंदू आपल्या धर्मश्रद्धेबद्दल आग्रही नसतील म्हणून मुस्लिमांनीही कडवे असू नये; असे म्हणायचे कारण नाही. तो प्रत्येक व्यक्तीचा व धर्मसमुहाचा प्रश्न आहे. हिंदूंनी कडवे असण्य़ाला मुस्लिमांनी कधी आक्षेप घेतलेला नाही. मग मुस्लिमांच्या कडवेपणाला हिंदूना आक्षेप घेण्याचे कारणच काय? सवाल कडवेपणाचा नसून त्याचे इतरांवर काय परिणाम होतात त्याचा आहे. ११ ऑगस्ट रोजी मुस्लिमांचा मोर्चा मुंबईत रझा अकादमीने योजला होता. त्याला कुणा हिंदूने विरोध केला नव्हता. पोलिसांनी त्याला परवानगी दिली होती. मग तिथे जे काही घडले त्याचे काय कारण होते? त्याला धर्मस्वातंत्र्य म्हणता येईल काय? पत्रकार वा पोलिसांवर हल्ला करण्याचे कारणच काय होते? महिला पोलिसांशी असे असभ्य वागायचे कारण काय होते? त्यात कुठला कडवेपणा किंवा हळवेपणा आहे? आणि असे इथेच घडत नाही. असेच लखनौमध्ये घडले. श्रीनगरमध्ये रोजच असे होत असते. त्याचा नेमका धार्मिक हळवेपणाशी काय संबंध आहे? आणि धार्मिक कडवेपणाचा असाच अविष्कार असतो का? पहिली गोष्ट आसाममध्ये जे काही झाले त्यासाठी इथे हिंसाचार होण्याचे कारण काय? म्यानमारमध्ये मुस्लिमांवर अत्याचार झाले, म्हणुन इथे मुंबईत पोलिसांवर हल्ले करण्यामागे काय हेतू आहे? पत्रकारांवर हल्ले कशाला? एकूणच जे घडले वा अशा घटना जिथे कुठे मुस्लिम जमावाकडून घडतात, त्याचा धार्मिक कडव्या श्रद्धेशी काय नेमका संबंध असतो? कोणी शहाणा त्याचे उत्तर देणार आहे काय? की आपल्या धार्मिक श्रद्धा इतरांना त्रास दिल्यानेच सिद्ध होतात, असे त्यातून दाखवायचे असते? असे शेकडो प्रश्न विचारता येतील आणि विचारले गेले पाहिजेत. त्याची उत्तरे द्यायला मुस्लिम विचारवंत व सुशिक्षितांनी पुढाकर घेतला पाहिजे.

   पण असे प्रश्न कधी विचारले जात नाहीत आणि कधी चुकून विचारले गेले, मग काही मोजक्या मस्तीखोरांनी, समाजकंटकांनी धुडगूस घातला, असेच उत्तर असते. पण ते उत्तरच नसते. त्या दिवशी पोलिसांनी शांतता व संयम पाळला म्हणून अनेक सेक्युलर लोकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे. याचा अर्थ काय घ्यायचा? पोलिसांनी संयम का पाळयला हवा होता? गोळ्या घातल्या तर अधिक दंगा पसरेल म्हणुन पोलिस घाबरले होते, की सरकार घाबरले होते? पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये शेतकर्‍यांच्या मोर्चात छातीवर नेम धरून पोलिसांना गोळ्या घालताना भिती वाटत नाही. पळणार्‍या लोकांवर गोळ्या घालायला भिती वाटत नाही. पोलिस तिथे संयम दाखवत नाहीत. मग इथे संयम कशाला? गुंडांना गोळ्या घालण्याला घाबरणे म्हणजे संयम असतो का? त्या दंगलीवर गोळ्या झाडल्या आणि त्यात मुस्लिम गुंड मारले गेले, तर कुणाला चिंता करण्याचे कारण नव्हते. गोळीबारात ते गुंड मारले गेले असते तर मुस्लिम समाजाला वाईटही वाटायचे कारण नव्हते. जर नंतर प्रतिक्रिया एअताना त्या दंगेखोरांना सर्वच मुस्लिम नेते समाजकंटक म्हणतात, तर तेच मारले गेल्याने कुणाच्या भावना दुखावतील म्हणुन पोलिसांना फ़िकीर का होती? अजून कुणा सेक्युलर वा मुस्लिम नेत्याने गोळीबार का केला नाही, असा जाब पोलिसांना विचारलेला नाही. पण तेच सर्व लोक दहा वर्षे उलटून गेल्यावरही मोदींनी गुजरातच्या दंगलीत गोळ्या झाडल्या नाहीत, म्हणून दोष देतात. मग तेच सर्व लोक मुंबईत तोच प्रश्न पोलिसांना व गृहमंत्र्यांना का विचारत नाहीत? की जो दंगा झाला तो मुस्लिम धार्मिक कडवेपण होता, म्हणुन त्यावर गोळीबार नको असा त्याचा अर्थ लावायचा? तसाच अर्थ असेल तर मग मुस्लिम धर्मप्रेम इतर लोकांसाठी चिंतेचा विषय होऊन जातो. कारण प्रत्येकवेळी ज्यांनी दंगा केला, हिंसा केली ते समाजकंटक होते असा नंतर दावा केला जात असतो. पण प्रत्यक्ष दंगल होते, त्यात कोणी मारला गेला मग काय भूमिका असते? ११ ऑगस्टच्या घटनेत जे दोघेजण मारले गेले, त्यांच्या कुटुंबियांन अबु आझमी यांनी काही लाखाची मदत केली आहे. म्हणजे निदान दंगा करणारे किवा त्यात मारले गेले ते गुंड नव्हते अशीच आझमी यांची भूमिका आहे ना? कोणा मुस्लिम नेत्याने अजून तरी त्याबद्दल आझमी यांचा निषेध केल्याचे माझ्या ऐकिवात नाही.

   तेही बाजूला ठेवा. त्या दिवशी जे झाले ते मुस्लिम गुंडांनी केले, त्या मुस्लिम जमावातून आलेल्या समाजकंटकांनी केले, दावा मान्य करू आणि त्याबद्दल मुस्लिम समाजात संताप आहे याची काही खुण सापडते का बघूया. कुठे दिसते का त्याची खुण? ज्या महिला पोलिसांचा विनयभंग झाला, किंवा पन्नास पोलिस जखमी झाले, त्यांचे सांत्वन करायला कोणी मुस्लिम नेता किंवा संस्था गेल्याची बातमी कुणाच्या वाचनात आली आहे काय? नसेल तर ज्यांनी तो अभद्र प्रकार व वर्तन केले, ते समाजकंटक आहेत असे मुस्लिमांना खरोखरच वाटते याचा पुरावा काय? वाहिन्यांवर होणारी पोपटपंची हा पुरावा असतो काय? नबाब मलिक किंवा तत्सम मुस्लिम नेते अथवा हुसेन दलवाई यांच्यासारखा खासदार कुणा जखमी भयभीत महिला पोलिसाला जाऊन अगत्याने भेटला व त्यांचे सांत्वन केल्याची बातमी कोणी ऐकली वा वाचली आहे काय? नसेल तर त्या गुंडांना समाजकंटक मानायचे कसे? कारण त्यात मारले गेले, त्यांना आर्थिक मदत देणारा मुस्लिम नेता आपल्यासमोर आहे. पण त्यात जे खरे बळी म्हणजे महिला पोलिस वा जखमी पोलिस आहेत, त्यांचे सांत्वन करणारा कोणी मुस्लिम मान्यवर आहे काय? जे शांततेचे प्रवचन सतत देतात, त्यातल्या कुणालाच ही साधी गोष्ट का सुचली नाही?

आझाद मैदानच्या घटनेनंतर जी परिस्थिती निर्माण झाली, त्यानंतर बिगर मुस्लिमांना विश्वासात घेण्याची कुठल्याही मुस्लिम नेत्याला गरज वाटत नाही, ही कसली खुण मानायची? जे दंगा करतात ते समाजकंटक आणि त्यांच्याबद्दल अवाक्षर न बोलणारे शांततावादी, असे मानायचे काय? एक चित्र शंभर शब्दांपेक्षा अधिक प्रभावी असते म्हणतात. त्याचप्रमाणे मुस्लिम शांतताप्रेमी असतात, असे शंभरवेळ सांगण्यापेक्षा मुस्लिम नेत्यांनी व संस्थांनी एकदा तरी कृतीमधून त्या शांततापुर्ण प्रवृत्तीची साक्ष द्यायला नको काय? की सगळाच बोलाची कढी आणि बोलाचा भात? हे प्रश्न मी विचारतो आहे, कारण हे इथल्या सामान्य माणसाच्या मनातले प्रश्न आहेत. ते वातानुकुलीत केबिनमध्ये बसणार्‍या वा स्टुडीओमध्ये बसून चर्चा रंगवणार्‍या वाहिन्यांच्या दिवट्या संपादकांना माहित सुद्धा नसतात. कारण ते माणसांना सामोरे जात नाहीत तर कॅमेराशीच बोलत असतात. लोकांच्या मनाचा थांग त्यांना कधीच लागत नसतो. पण म्हणुन हे प्रश्न संपत नसतात. ते मनात घर करून बसतात. मनात शंका व संशयाचे काहुर माजवतात. आणि त्याचे परिणाम गुजरातसारखे भयंकर होण्याचा धोका असतो. म्हणूनच मुस्लिम समाजाने  या प्रश्नांची उत्तरे गंभीरपणे शोधण्याची गरज आहे. ते प्रश्न आवडणारे नसतील कदचित, पण म्हणुन ते संपत नाहीत हे विसरता कामा नये.     ( क्रमश:)
  भाग  ( २८ )   १२/९/१२ 

२ टिप्पण्या:

  1. मी आणखीन पुढच विचारतो, "इतर कुठल्याही समाजात तरी संताप आहे का? हिंदू समाजहि गप्पच" हे "कठिण वज्रास भेदू" वगैरे सगळं खोट आहे. आपले मराठी बाणा, मराठी बाणा, म्हणणारेही बिळात शिरून बसले होतेच की. खर तर मराठी माणूस आणि त्यांचे नेते हे सगळे अगदी बुळचट आणि घाबरट झालेले आहेत, हेच खरं. मराठी बाणा म्हणजे फक्त मेहनत आणि काम न करणे आणि आपल्या गरीबीसाठी इतर लोकांना शिव्या देणे, बस्स.

    उत्तर द्याहटवा
  2. I agree with the views expressed in this blog. Mr. Bhau Torsekar has expressed the thoughts of millions of people.

    उत्तर द्याहटवा