सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

ज्यांचा स्वत:वर विश्वास असतो, इतिहास त्यांचा असतो


काही दिवसापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंटरनेटवर व्यक्त केलेली ही प्रतिक्रीया आहे. गुजरात दंगलीला आता दहा वर्षाचा कालावधी उलटून जाण्याची वेळ आली आहे. २७ फ़ेब्रुवारी २००२ रोजी अयोध्येहून माघारी अहमदाबादला येणार्‍या ५९ कारसेवकांची जाळून हत्त्या करण्यात आली होती. सकाळच्या सुमारास गोध्रा रेल्वे स्थानकात आलेल्या या गाडीला, नंतर तिथून सुटल्यावर सिग्नलपाशी अडवून तिच्या ठराविक डब्यावर नेमका हल्ला जमावाने केला होता. हजारोंच्या मुस्लिम जमावाने नेमक्या त्याच डब्यावर हल्ला चढवावा हा योगायोग म्हणता येणार नाही. तरीही त्यावर फ़रशी प्रतिक्रिया उमटली नव्हती.

   दुसर्‍या दिवशी संसदेत देशाचा अर्थसंकल्प मांडण्याचे काम सुरू झाले होते. त्यात सगळे पक्ष शांतपणे सहभागी झाले होते. अगदी भाजपासुद्धा त्यात होता. कोणालाच ५९ लोकांना जिवंत जाळले जाण्याविषयी काहीही वाटले नव्हते का? असेल तर त्याबद्दल इतकी अलिप्तता का असावी? मात्र माध्यमे भलतीच खुशीत होती. निदान वृत्तवाहिन्या तरी खुश दिसत होत्या. कारण त्यांनीच ही घटना देशाच्या कानाकोपर्‍यात दिवसभर नेण्याचे महत्वपूर्ण कार्य पार पाडले होते. जळलेले, कोळसा झालेले कारसेवकांचे मृतदेह थेट प्रक्षेपणातून दाखवले जात होते. सामान्यजनात अस्वस्थता पसरली होती आणि वाढत सुद्धा होती. मात्र राजकीय क्षेत्रात शांतता होती. जळीतकांड घडून २४ नव्हे तर २८ तासांचा अवधी उलटून जाईपर्यंत, गुजरातमध्ये कुठेही काही अनुचित प्रकार घडल्याची बातमी नव्हती. पण कोळसा झालेले मृतदेह दिसल्यावर आणि राजकीय तटस्थता अनुभवल्यावर, त्या दबलेल्या भावनांचा कडेलोट सुरू झाला. हळुहळू गुजरातमध्ये दंगली पेटु लागल्याची एक एक बातमी येऊ लागली. आणि जसजशा या बातम्या झळकू लागल्या तसतसा दंगलीचा वणवा गुजरातभर पसरत गेला. पोलिसांना तो आवरणे शक्यच नव्हते. एका पोलिसामागे शंभर दंगलखोर असतील तर काय शक्य होते? दोन दिवसानंतर बातम्यांचा सुर एकदम बदलला.

   गोध्रा विषय मागे पडला आणि ही दंगल हिंदू परिषद, संघ, आणि मुख्यमंत्री मोदी यांनी संगनमताने, मुस्लिमांचे शिरकाण करण्यासाठीच घडवून आणली, असा प्रचार वाहिन्यांवरून सरसकट चालू झाला. त्याचा जोर इतका होता, की त्याआधी गोध्रा घडले हे कोणी बातमीदार सांगायलाही तयार नव्हता. प्रतिक्रिया सुद्धा तशाच होत्या. कोणी गोध्राचा उल्लेख केला तरी ’ठीक आहे त्याचाही आम्ही निषेध करतो, पण हा नरसंहार मोदीचेच कारस्थान आहे. त्यानी राजिनामा द्यायला हवा’ असा प्रचारच अहोरात्र चालू झाला. तो आजपर्यंत थांबलेला नाही. दहा वर्षाचा काळ कमी नसतो. म्हणूनच कालपरवा आदल्या दिवशी हायकोर्टाने मोदी सरकारला दंगलीत उध्वस्त झालेल्या धार्मिक स्थळांच्या उभारणीला मदत देण्याचा आदेश दिल्यावर, मोदींना चपराक अशा बातम्या ताबडतोब झळकल्या होत्या. आणि दुसर्‍याच दिवशी त्याच मोदींना कारस्थान वा दंगल प्रकरणी अडकवू शकेल असा एकही पुरावा नाही, असा निर्वाळा देणारा अहवाल एसआयटीने दिल्यावर याच माध्यमांचा हिरमोड झाला. आणि ही पहिलीच वेळ नाही. सुप्रिम कोर्टाच्या आदेशावरून झालेली ही तिसरी चौकशी आहे, ज्यात मोदी विरोधात एकही पुरावा नसल्याचा निष्कर्ष निघाला आहे. मग त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणार्‍यांचे नाक कापले जाणे स्वाभाविकच नाही का? त्यानंतरच मोदी यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एसआयटीच्या अहवालाचा निष्कर्ष त्यांना कळल्यावर, मोदी यांनी आपल्या खास शैलीत माध्यमे आणि त्यांच्या विरोधकांना थप्पड मारली आहे. ’ज्या मुठभर थोड्या लोकांचा स्वत:वर पूर्ण विश्वास असतो त्यांचा इतिहासच जगाचा इतिहास आहे.’ अर्थात त्यातले मर्म कळण्यासाठी डोके ठिकाणावर असायला हवे. जे लोक आपापल्या भ्रामक विश्वातच जगत असतात आणि ज्यांचा वास्तविक जगाशी संबंधच उरलेला नाही, त्यांना यातले काही कळणे शक्यच नसते. कारण जग व त्याच्या घडामोडी, कुणाच्या भ्रामक विश्वात घडत नसतात तर वास्तविक जगात घडत असतात.

फ़रक लक्षात घेण्यासारखा आहे. मागल्या आठवड्यात याचप्रकारची उत्सुकता सीबीआय कोर्टातील निकालाबद्दल होती. सुब्रमण्यम स्वामी यांनी जी याचिका सुप्रिम कोर्टापर्यंत नेली आणि त्यातून स्पेक्ट्रम घोटाळा चव्हाट्यावर आला, त्यांनीच गृहमंत्री पी. चिदंबरम यांना त्यात सहआरोपी करून घेण्य़ा्साठी अर्ज दिला होता. त्यासाठीचे पुरावे सुद्धा सादर केले होते. पण ते नाकारले गेल्यावर तो अंतिम निर्णय असल्याप्रमाणे बातम्या दिल्या जात होत्या. पण तोच निकष मोदी यांना मात्र लावला जात नाही. वास्तविक आतापर्यंत तीनदा त्यांच्या विरुद्धचे दावे आणि अर्ज फ़ेटाळले गेले आहेत. पण दहा वर्षापासून त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात माध्यमांनीच उभे केले असल्याने, ते कोर्टात कितीही निर्दोष ठरोत; त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप चालूच आहेत. दहा वर्षे कसलाही पुरावा समोर आलेला नसताना मोदी यांना माध्यमांच्या न्यायालयात गुन्हेगार ठरवून टाकलेले आहे. जोपर्यंत आरोपीवर कायदेशीर कोर्टात साक्षी पुराव्यानिशी गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला निरपराध मानावे, ही कायदेशीर सभ्यता आहे. ती कोणी पाळतो आहे का? आणि तीच सभ्यता पायदळी तुडवणारे स्वत:ला सभ्यतेचे महामेरू म्हणवून घेत असतात.

शेवटी कायद्याचे राज्य म्हणजे काय असते? कोर्टामध्ये जे सिद्ध होईल ते मान्य करणे यालाच. कायद्याचे राज्य म्हणतात ना? मग ज्या माणसाविरुद्ध तीनदा कोर्टाच्या नियंत्रणाखाली चौकशा होऊनही कुठला काडीमात्र पुरावा समोर आलेला नाही, त्याच्यावर परत परत आरोप करीत रहाणे, असंस्कृतपणाचे लक्षण नाही काय? शेकडो आरोप, तक्रारी, खटले, संशय आणि एकही पुरावा नसेल, तर काय खरे मानायचे? म्हणे मोदी यांनी माफ़ी मागितली पाहिजे. कशासाठी? जो गुन्हा केलेला नाही त्याबद्दल माफ़ी मागायचा संबंधच कुठे येतो? मोदी यांनी त्याबद्दल योग्य स्पष्टीकरण दिलेले आहे. ’माफ़ी कशाला? ज्याला तुम्ही खुनी, कसाई म्हणता, त्याने माफ़ी मागून न्याय कसा होईल? तो गुन्हेगार असेल तर त्याला फ़ाशी व्हायलाच हवी. माफ़ी मागून त्याला सोडायचे कशाला? मोदी गुन्हेगार असेल तर त्यालाही फ़ाशी व्हायलाच हवी.’ असे हा माणूस का म्हणू शकतो? कारण त्याचा स्वत:वर विश्वास आहे. आपण गुन्हा केलेला नाही याची खात्री आहे, म्हणूनच तो इतका आत्मविश्वासाने बोलू शकतो. तसे नसते तर त्याने माफ़ी मागून पळवाट शोधली असती. पण वस्तुस्थिती नेमकी उलटी आहे. त्याच मोदीला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणारे पळवाट शोधत आहेत. माफ़ी मागून मामला मिटवावा, असा त्यांचा आग्रह आहे. पण तो सापळासुद्धा आहे. माफ़ी मागणे म्हाणजे गुन्हा कबुल केल्यसारखे आहे.

समजा मोदीनी माफ़ी मागितली, तर हेच लोक बोंबाबोंब करणार बघा, हा माफ़ी मागतो म्हणजे तो दंगा घडवल्याचे मान्य करतो आहे. हे ओळखण्याइतका मोदी हा हुशार माणूस आहे म्हणूनच तो सापळ्यात न अडकता या भामट्यांना तो पुरून उरला आहे. गुन्हेगारी तपासकामात यालाच मोडस ऑपरेंडी असे म्हणतात. गुन्हेगाराची स्वत:ची अशी एक खास शैली असते. मोदी विरोधकांची सुद्धा तशी आहे. आधी बिनबुडाचे आरोप करायचे आणि मग निदान माफ़ी मागायचा आग्रह धरायचा. त्यांना गप्प करण्यासाठी माफ़ी मागितली, मग तोच पुरावा म्हणून बोंब ठोकायची. मोदी यांनी तो सापळा उध्वस्त केला आहे. कारण हा माणूस स्वत:वर विश्वास ठेवणारा आहे. आणि म्हणुनच त्याने ठामपणे माध्यमातील अतिशहाण्याना जगाचा इतिहास समजून घेण्याचा उपदेश केला आहे. दहा वर्षे सगळीकडून टिका, आरोप, विरोध, कोंडी, अपप्रचार, खटले अशा प्रतिकुल परिस्थितीत इतका खमक्या आणि आत्मविश्वास नसलेला माणूस सत्तेवर टिकून राहिला नसता, की गुजरातला इतक्या प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकला नसता. (क्रमश:)
(भाग-१७९) १६/२/१२

४ टिप्पण्या:

  1. Bhau Aapan khup Autkrusta Lihata

    hi pratek gost chan puravyanishi aslyamule

    samjayla mast aahe

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम लिखाण आहे आपले, अभ्यासपूर्ण व लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणून मिरवणाऱ्या मिडिया ची आज जी वेश्याप्रमाणे जी अवस्था केलीय त्या लोकांना सणसणीत चपराक आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. Bhau, aplya blogs cha fan jhalo ahe...far achuk ani rokthok lihita apan...ya psudo secular patrakarancha veet alay...

    उत्तर द्याहटवा
  4. BJP che kendratil sarkar 2004 chya election madhe padanyasathi tasech bjp govt la Dag laun va kalankit karun , tyans tondghasi padun tyanchi lokpriyata rasatalala javi mhanun , congress va pak chi isi ne milun rachlele sarvat mothe karasthan / shadyantra hote

    उत्तर द्याहटवा