सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

चोरांच्या भागिदारांवर विसंबून चालणार नाही


सगळेच पक्ष चोर आहेत, भ्रष्ट आहेत असा फ़क्त अण्णांचाच आरोप नाही. अलिकडे सगळेच सामान्य लोक प्रत्येकाकडे संशयाने बघू लागले आहेत. सगळे साले चोर, असे आपण अगदी सहज बोलत असतो. पण त्यातले गांभिर्य कोणी विचारात घ्यायला तयार नसतो. चोर सगळे असल्याने त्यांचे काही बिघडत नसते. या सार्वत्रिक भ्रष्टाचाराने आपले आयुष्य पुर्णपणे वेढलेले आहे. त्यात ज्यांच्यावर आपला रोष असतो, ते सहीसलामत बाजूला असतात. त्या भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम त्यांच्यापेक्षा आपल्यालाच भोगावे लागत असतात. आणि म्हणूनच त्यावर उपाय शोधण्यात आपणच पुढाकार घेण्याची गरज आहे. ज्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत नसतात त्यांना त्यावर उपाय शोधण्याची गरज नसते. फ़ार कशाला ज्यांना त्यापासून फ़ायदा संभवतो त्यांनी त्यावर उपाय शोधण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

    आता दुर्दैवाची गोष्ट अशी की आपण त्या दुष्परिणामाने भंडावलेले लोक मात्र त्याच भ्रष्ट लोकांकडून उपाय शोधला जाण्याची, अंमलात आणला जाण्याची अपेक्षा करत असतो. सगळी गडबड तिथेच होत असते. गेली पाच दशके तरी मी महागाई, भ्रष्टाचाराच्या गोष्टी ऐकत आलो आहे. त्या विरुद्धचे लढे, चळवळी बघत आलो आहे. मात्र त्यातून समाजाला भेडसावणार्‍या या समस्या संपण्याऐवजी त्यांचे अक्राळविक्राळ स्वरूप अधिकच भयानक होत गेले आहे. तेवढेच नाही तर जे अशा लढाईचे नेतृत्व करायला पुढे येतात, तेच कालांतराने त्याच भ्रष्टाचार्‍यांचे भागिदार झालेले पहायची वेळ माझ्यावर आलेली आहे. माझ्यावरच कशाला तुमच्यावर सुद्धा आलेली आहे. आज ज्यांना आपण छोट्या पडद्यावर भ्रष्टाचारा संबंधी प्रवचन झाडताना बघत असतो, त्यातले डझनभर जाणकार, ज्येष्ठ नेते, राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते कसे भ्रष्टाचाराला शरणागत झालेत, हे मी छातीठोकपणे सांगू शकतो. त्यांचे जुने शब्द, त्यांचे सदाचारविषयक आधीचे आग्रह, शिष्टाचाराचे त्यांचे नियम, सभ्यतेचे त्यांचे पुर्वीचे निकष, त्यांनी आज लिलावात विकून टाकलेले आहेत. मिळालेल्या किमतीच्या बदल्यात त्यांनी भ्रष्टाचाराशी सौदेबाजी व भागिदारी केली आहे. यापुर्वीच्या काही लेखातून मी त्याचे दाखले नावानिशी दिलेले आहेतच. त्यांनी व्यक्तीगत स्वार्थासाठी फ़ायद्यासाठी आपले आग्रह सोडायला माझी अजिबात हरकत नाही. पण स्वार्थासाठी त्यांनी सामान्यजनांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी बुद्धी खर्ची घालावी याचा संताप येतो. कारण ही मंडळीच आजच्या चोरीमारीला खरे जबाबदार झालेली आहेत.

   कालपरवाच जिल्हा परिषद महापालिका निवडणुकीचे निकाल लागले. जेव्हा अशी पर्वणी येते तेव्हा सगळीकडे विजयी उमेदवाराच्या धुमधडाक्यात मिरवणूका निघत असतात. मग ते मुंबईत असो की दिल्ली, कोलकाता, चेन्नई असो. या मिरवणूकी आजकाल टीव्हीमुळे आपण घरबसल्या बघू शकत असतो. कधी तुम्ही बारकाईने त्या मिरवणुकांचे निरिक्षण केले आहे का? अशा मिरवणूकीत विजयी उमेदवार किंवा पक्ष बदलतात. पण त्यात उत्साहात नाचणारे, वाद्ये वाजवणारे तेच तेच असतात. त्यांना कोण जिंकला याच्याशी कर्तव्य नसते. कोणीही जिंकला तरी त्यांना फ़रक पडत नसतो. ते जिंकणार्‍याचे नवे साथीदार असतात. लढाईपुर्वी ते कोणाची बाजू घेऊन मैदानात उतरले याला फ़ारसे मह्त्व नसते. त्याच्याबरोबर ते अखेरच्या क्षणापर्यंत असतात. अगदी तसेच चित्र आपल्याला बुद्धीमंत म्हणून मिरवणार्‍यांचे दिसेल. त्यांना जिंकणार्‍यांशी कर्तव्य असते.

    मुंबईत मतदानाआधी उद्धव ठाकरे यांच्या ’करून दाखवले’ प्रचाराची टवाळी करण्यात तमाम चॅनेल्स आघाडीवर होती. त्यासाठी त्यावर विपरीत बोलणार्‍या, त्याची टिंगल करणार्‍या कुणाही नेत्याला प्रसिद्धी मिळत होती. पण उद्धवने मुंबईत बाजी मारल्यावर त्याच प्रचार मोहिमेचे तोंड फ़ाटेपर्यंत कौतुक करायला तिच मंडळी आघाडीवर दिसली. मतदानाचे निकाल येईपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यातले दुर्गुण, दोष अगत्याने सांगणार्‍यांना निकालानंतर त्यातच गुणाची खाण सापडली होती ना? दोन्ही कॉग्रेस पक्ष एकत्र न येऊन सेना भाजपाला मदत करत असल्याचा आरोप करणारे जाणकारच, निकालानंतर एकत्र येण्याचे तोटे तावातावाने सांगू ला्गले. हे लोकच आजकाल भ्रष्टाचाराचे साथीदार भागिदार झाले आहेत. सर्व पक्ष भ्रष्ट आहेत, पण त्यांना आपल्या भ्रष्टाचारात या भ्रष्ट बुद्धीच्या लोकांशिवाय राजरोस भ्रष्टाचार करणे व पचवणे शक्य नाही. आता निवडणूक आणि भ्रष्टाचारात इथल्या बुद्धीवादी वर्गाचे हितसंबंध तयार करण्यात आलेले आहेत. कारण त्यांच्या मदतीशिवाय लोकांना लुबाडणे आता सोपे राहिलेले नाही. सामान्य माणसाला त्याच्या मनातील समजुतींवर खेळवता येत असते. ते काम बुद्धीमान लोक करू शकतात. नव्या समजुती निर्माण करणे, जुन्या समजुती कालबाह्य बनवणे, त्यांच्या आधारे समाजावर नियंत्रण राखता येते. त्याची दिशाभूल करता येत असते. कुठल्याही देशात समाजात बुद्धीमान वर्गाला सोबत घेतल्याशिवाय तिथल्या सामान्य जनतेचे शोषण करता येत नसते. जेवढा हा बुद्धीवादी वर्ग शोषणकर्त्यांचा निकटवर्ति व भागिदार असतो, तेवढे सहजपणे त्या समाजाचे निश्चिंतपणे शोषण करता येत असते.

   लोकशाही म्हणजे निवडणुका आणि त्यातून निवडून येणारे राजे, असा जो गैरसमज जनमानसात ठामपणे ठसवण्यात आला आहे, त्यातूनच आजचा भ्रष्टाचार शिरजोर झाला आहे. आजकालच्या महाभारतामध्ये पांडव जिंकत नसतात तर जिंकणार्‍याला पांडव म्हटले जाते. त्यामुळेच कौरव देखील जिंकून पांडव होऊ शकतात. कारण हरणारा कौरव अशी सोपी व्याख्या आता प्रचलीत करण्याता आलेली आहे. आजच्या युपीए सरकार इतका भयानक भ्रष्टाचार आजवरच्या कुठल्याही सत्तधीशांनी केलेला नाही. पण मनमोहन सिंग हा स्वच्छ असल्याचे हवाले का दिले जातात? ज्याने चोरांना पकडायचे आहे, रोखायचे आहे, तो स्वत: चोर नाही असे सांगणे ही शुद्ध दिशाभुल नाही काय? त्याने चोराला पाठीशी घालणे अधिक भयंकर नाही काय? अण्णांच्या सहकार्‍यांचे पावित्र्य तपासणार्‍यांनी कधी तेवढ्याच उत्साहाने सहकार्‍यांच्या पापासाठी मनमोहन सिंग यांच्यावर तोफ़ा डागल्या काय? हेच तर भागिदाराचे काम असते. चोरांना सामील असलेला बुद्धीमंत असा एकूण समाजाच्या बुद्धीला किड लावत असतो. समोर कॉंग्रेसचा विषय चालू असताना अकारण भाजपाच्या भ्रष्टाचाराकडे चर्चा वळवण्याचा हेतू तोच असतो ना?

     थोडक्यात समाजाचे बौद्धिक नेतृत्व करू शकणार्‍या वर्गालाच आता पद्धतशीररित्या भ्रष्ट करण्यात आलेले आहे. त्याच्यावर विसंबून कुठलाही चांगला बदल घडून येणे शक्य राहीलेले नाही. तेवढेच नाही याच वर्गाला हाताशी धरून समाजातल्या आंदोलने, चळवळी लढे खच्ची करायचे कारस्थान यशस्वीपणे राबवण्यात आलेले आहे. ज्याच्यात लोकांचा सहभाग असेल, ज्यामुळे सत्तेला व प्रस्थापिताला धक्का बसू शकेल अशा; चळवळी, लढे मोडून काढण्याचे किंवा नामोहरम करण्याचे काम पार पाडले जात असते. त्यासाठी आता माध्यमे हे मोठे प्रभावी साधन झाले आहे. त्यातून मुठभर बुद्धीमंत म्हणजे समाजमनाचा आरसा, आवाज असे चित्र तयार केले जात असते. त्यामुळेच तिस्ता सेटलवाड, मेधा पाटकर, स्वामी अग्नीवेश, अशा जनाधार नसलेल्या लुदबुड्यांचे अखंड कौतुक चाललेले दिसेल. पण दुसरीकडे ज्यांना मोठा जनाधार असेल त्यांना समाजशत्रू म्हाणून रंगवण्याचा उद्योग चाललेला दिसेल. स्वामी रामदेव, अण्णा हजारे, नरेंद्र मोदी, राज ठाकरे अशा लोकप्रिय व्यक्तींचे चारित्र्यहनन चाललेले दिसेल. त्यातून सामान्यजनांना हिणवण्याचा उद्योग चालू असतो. ह्यावर मात केल्याशिवाय भ्रष्टाचार निर्मूलनच काय, कुठलीही लोकचळवळ यशाच्या दिशेने वाटचाल करू शकणार नाही. लोकशाही खर्‍्या अर्थाने निर्माण होऊ शकत नाही तर तिची वाटचाल तरी होणार कशी? या प्रस्थापित साधने व सुविधांवर विसंबून त्यांच्यावर मात करता येणार नाही. त्यांना पर्याय अशी संघटना, भूमिका, चळवळ, धोरण, आखणी व उपाय शोधावे लागणार आहेत.  (क्रमश:)
(भाग-१८४) २२/२/१२

1 टिप्पणी:

  1. आपल्या मताशी १००% सहमत भाऊ! समाजाची दिशाभूल करणारे आता मिडियात आहेत. चांगल्या माणसांना संपवण्याचे काम मिडिया ईमाने इतबारे करत आहे.

    उत्तर द्याहटवा