मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२

लोकशाहीचा गळा कसा घोटते नोकरशाही?

 प्रतिनिधीशाही व नोकरशाहीने मिळून प्रजासत्ताक लोकशाहीचा गळा घोटला, असे मी नेहमी म्हणतो. ते कसे झाले, कसे होऊ शकले, कोणी केले, या प्रश्नांची उत्तरे समजून घेतली तर सोपी आहेत. शोधली तर सहज सापडू शकतात. मात्र त्यासाठी डोळस वृत्ती असायला हवी. म्हणुनच मला मृणालताई व इंदुमती पटेल यांच्या त्या मुलाखतीमध्ये ती उत्तरे सापडू शकली. पण ज्यांनी मुलाखती घेतल्या, त्यांना त्यातले सार समजू सुद्धा शकले नाही. बारकाईने त्या दोघांचे अनुभव तपासले, तर 1970-80 पासून क्रमाक्रमाने सार्वजनिक जीवन भ्रष्ट करण्याची प्रक्रिया कशी सुरू झाली. त्याची साक्ष मिळू शकते. इंदुमती स्थायी समितीच्या टेंडर पास करण्यातले गांभीर्य सांगतात. मृणालताईनी लहानसहान बाबतीत नोकरशाही कशी लोकप्रतिनिधीला आपल्या मुठीत आणण्यासाठी भ्रष्ट करते, ती पद्धत सांगितली आहे. लोकशाहीत लोकांची सत्ता असते आणि त्यांच्या वतीने सत्तेवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी, निवडून आलेल्या प्रतिनिधीने पार पाडायची असते. नोकरशाहीने जनतेचा कारभारी म्हणून काम करायचे, तर त्याच्या कारभाराला दिशा, धोरण देण्याचे व त्यावर नियंत्रण ठेवायचे काम लोकप्रतिनिधीने करायचे असते. बॅंकेचे कर्मचारी व तिथला सुरक्षा कर्मचारी यांच्यावर खातेदार विसंबून असतात. त्यांनीच संगनमताने दरोडा घातला तर? आज तेच होत असते. तीस चाळीस वर्षापुर्वी तसे होत नव्हते. का होत नव्हते? त्याचेच रहस्य या दोन्ही महिला कार्यकर्त्यांनी उलगडले आहे. पण ते समजण्याची दृष्टी असायला हवी. त्यासाठीच त्यांनी काय नेमके सांगितले ते समजून घ्यावे लागेल.

स्थायी समितीच्या बैठकीला जाण्यापुर्वी आपण दोन दोन दिवस अजेंडाचा अभ्यास करायचो, असे इंदुमती म्हणतात. कारण अशा करोडो रुपयांचा खर्च आपल्या संमतीने होणार, पण ती संमती आपली नाही तर आपण लाखो नागरिकांच्या वतीने देणार आहोत. त्या नागरिकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे. आपल्या हलगर्जीपणाने त्या विश्वासाला तडा जाता कामा नये, याची त्यांना फ़िकीर होती. म्हणुनच संकल्पित खर्च दाखवला आहे, तो खरोखरच योग्य आहे काय, याची खातरजमा इंदुमती यांच्यासारखे नगरसेवक करीत होते. जनतेचा पैसा म्हणजे आपलाच, पण आपला म्हणून तो व्यक्तीगत पैसा नाही, याची जाणिव त्यामागे होती. आपलाच म्हणजे आपल्या वॉर्ड, शहर, नागरी कुटुंबाचा पैसा, अशी त्यांची धारणा होती. आपला म्हणजे एकट्याचा नव्हे तर सगळ्या शहरवासियांचा, म्हणुनच तो त्यांच्या भल्यासाठीच खर्च व्हावा, अशी त्यांची मनोभूमिका होती. आणि त्यांच्या जगण्यातच त्यांच्या स्वच्छ कारभाराचे प्रतिबिंब  पडलेले दिसायचे. जाणकार, तज्ञ, अधिकारी आपल्याला फ़सवू शकतील, पर्यायाने जनतेची फ़सवणूक होईल; याची चिंता त्यामागे होती. त्याला मी कार्यकर्ता मनोवृत्ती म्हणतो. ती कमीअधिक सगळ्या पक्षात, संघटनेत, संस्थांमध्ये होती.

आता मृणालताईंची गोष्ट घ्या. वस्तीतला सार्वजनिक नळ, त्यांच्या घराजवळ लागला असता, तर फ़ार बिघडले नसते. त्यांच्यासाठी ती सुविधा बनली असती. पण सुविधा ही वस्तीसाठी होती आणि ती सर्वांना सोयीची असावी, यावर त्यांनी भर दिला होता. वस्तीतल्या रहिवाश्यांनी त्याबद्दल तक्रारसुद्धा केली नसती. शेवटी सुविधा मृणालताईंमुळे आलेली होती. मग त्यावर त्यांचा अधिकार कोण नाकारू शकत होता? पण मुद्दा लोकांच्या अधिकाराचा होता. ती सुविधा हा रहिवाश्यांचा अधिकार होता. मृणालताईंनी त्यासाठी प्रयास केले हे खरेच होते. पण सुविधा ही लोकप्रतिनिधी म्हणुन त्यांची नव्हे, तर तिथल्या जनतेची मालमत्ता होती. त्या रहिवाश्यांना त्याचा थांगपत्ता नव्हता. तरीही मृणालताईंनी त्यांच्या अज्ञानाचा फ़ायदा घेतला नाही. तसे करू बघणार्‍याला त्यांनी जुमानले नव्हते. लोकप्रतिनिधीला भ्रष्ट करु पहाणार्‍या नोकरशहाला त्यांनी, जनतेच्या हक्कावर कुरघोडी करू दिली नव्हती. तसे झाले तर आपली व्यक्तीगत सोय होईल, पण लोकशाहीचा गळा घोटला जाईल, याची जाणिव त्यामागे होती. लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांच्या मालमत्तेचे, लोकांच्या अधिकारचे विश्वस्त असतात, ही धारणा त्याचे कारण होती. आपण मालक नाही तर जनतेच्या मालमत्तेचे, अधिकाराचे रखवालदार आहोत, याची ती प्रखर जाणिवच कार्यरत होती. पण त्यामुळेच लोकशाहीतल्या कारभार्‍याला म्हणजेच नोकरशाहीला एक एक पाऊल जपुन टाकावे लागत होते. ज्या जनतेचा नोकरशहा सेवक होता, तिच्याशी अदबीने वागून त्याला कामे करावी लागत होती. थोडक्यात समाजसेवा ही आजच्यासारखी चैन नव्हती, तर लष्कराच्या भाकर्‍या भाजण्याचा उद्योग होता. त्यामुळेच त्यात स्वत:ची तुंबडी भरायला जागा नव्हती. मग जिथे स्वार्थी, मतलबी लोकांना जागाच नव्हती तर भ्रष्टाचार होणारच कसा? आपल्या प्रतिनिधीवर पाळत ठेवणारा कार्यकर्ता आणि त्यामुळे डोळ्यात तेल घालून नोकरशाहीला कामाला जुंपणारे लोकप्रतिनिधी, अशी सार्वजनिक जीवनाची साखळी होती. त्यात कार्यकर्ता नसेल त्याला शिरकाव करायला जागाच नव्हती.

अशा कार्यकर्त्यांचा जेव्हा सार्वजनिक जीवनात दबदबा होता, तेव्हा भ्रष्टाचार सोपा नव्ह्ता, तशीच निवडणूक खर्चीक नव्हती. विधानसभेत दोनशे सव्वा दोनशे कॉग्रेस आमदारांच्या तुलनेत, विरोधकांचे पन्नास साठ आमदार असायचे. पण त्यांचा दबदबा प्रचंड असायचा. त्यातला कोणी मंत्रिपदावर बसायला उतावळा झालेला नसायचा. उलट मंत्र्याला दमात घेण्यात असे कार्यकर्ते धन्यता मानायचे. वडखळ नाक्यावर मंत्री अब्दुल रहमान अंतुले यांची गाडी अडवल्याच्या प्रकरणात, त्यांना मुठभर विरोधी आमदारांनी घामाघुम केले होते. दुधाच्या बाटलीची किंमत दहा पैशाने वाढल्यावर तेवढ्याच आमदारांनी, दोनशे आमदार पाठीशी असलेल्या कॉग्रेस सरकारला पळता भुई थोडी केली होती. असे हे कार्यकर्ते होते. त्यातले कोणी नगरसेवक, आमदार व्हायचे. बाकीच्यांना त्याचे कधी वैषम्य वाटले नाही. हेवा वाटला नाही. कोण निवडून येतो, त्यापेक्षा आपल्या पक्षाचा प्रतिनिधी निवडून येण्याला प्राधान्य असायचे. कारण निवडून आल्यावर मिळणारे पद लाभाचे नव्हते तर जबाबदारीचे होते. समाजसेवा, लोकप्रतिनिधी असणे तोट्याचे असे. पोटापाणासाठी दुसरा कामधंदा केला नाही तर कुटुंबियांवर उपासमारीची पाळी येत असे. मित्र परिचितांच्या आर्थिक मदतीने संसाराचे गाडे चालावावे लागत असे. कार्यकर्ता मित्रांना साधा चहा पाजू शकत नसे. त्यालाच मित्रांनी चहा, नाश्ता द्यावा लागत असे. ही कार्यकर्त्याची व्याख्या होती. आज अशा कार्यकर्त्याचा मागमुस कुठे दिसतो का? तिथेच सगळी गडबड झाली आहे. दत्ता पाटिल. मृणालताई, रामभाऊ म्हाळगी, केशवराव धोंडगे, उद्धवराव पाटिल, निहाल अहमद, बापुसाहेब काळदाते असे एकाहुन एक दांडगे आमदार कार्यकर्ते होते. त्यांच्याकडे गाडी नसायची. बस, एसटीने त्याना फ़िरावे लागत होते. पण त्यांचे पावित्र्य चारित्र्य ही त्यांची ताकद होती. सत्ताधारी वा नोकरशहा त्या कार्यकर्त्यांच्या त्या चारित्र्य, प्रामाणिकपणाला वचकून असायचे. कारण त्यांच्या पाठीशी तेवढेच निष्ठावान बांधील सामान्य कार्यकर्ते असायचे. आज त्याचाच दुष्काळ पडला आहे. कारण आजच्या पिढीसमोरचे आदर्शच भ्रष्ट आहेत. सत्तापिपासा, स्वार्थ, लालसा ही उद्दीष्टे झाली आहेत. त्यामुळे मग त्याच जुन्या वर्णनात बसणारा एखादा अण्णा हजारे दिसला तर आजच्या पिढीचे डोळे दिपून जातात.

याचा अर्थ सगळेच नष्ट झाले आणि आशेला जागाच उरली नाही असे मी मानत नाही. आजही तेवढ्याच उत्साहात, समाजासाठी आपला वेळ खर्चु इच्छिणारा, काहीतरी करू पहाणारा तरूण व नागरिक अस्तित्वात नक्कीच आहे. पण तो निराश हताश आहे. त्याच्या समोर चांगले आदर्श नाहीत, उदाहरणे नाहीत, म्हणुन तो वैफ़ल्यग्रस्त झाला आहे. ती त्याच्या इच्छाशक्तीवर चढलेली धुळ किंवा साचलेली राख आहे. त्याखाली अजुन निखार्‍याची धगघग कायम आहे याची मला खात्री वाटते. गेल्या आठ महिन्यात लेखमाला वाचून दहा हजारापेक्षा अधिक लोकांनी मला फ़ोन केले. त्यांच्याशी झालेला संवाद मला आशावादी बनवणारा आहे. त्याच जुन्या क्षमतेचे कार्यकर्ते नव्या पिढीतून उभे राहू शकतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. म्हणुनच त्यांच्या समोर त्या आदर्श कार्यकर्त्याचा चेहरा मांडणे मला अगत्याचे वाटले. एक बांधील, निष्ठावान, संयमी, दुरदृष्टीचा, कष्टाळू, नि:स्वार्थी कार्यकर्ता केवढा चमत्कार घडवू शकतो, ते पाहिले तरच त्यावर विश्वास बसू शकेल ना? पण तसे उदाहरण असले तरी ते तुमच्यापासून लपवले तर काय करायचे? ( क्रमश:)
(भाग १९०)  २८/२/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा