शनिवार, ३१ मे, २०१४

दिवाळखोरीत गेलेली मुस्लिम व्होटबॅन्क

 

   नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणूकीची मिमांसा अजून चालू आहे आणि निदान वर्षभर तरी तशीच चालू राहिल. कारण राजकीय मिमांसा करणार्‍यांना अजून लोकसभेचे लागलेले निकाल समजू शकलेले नाहीत. त्यांना अजून तरी आपल्या समजुती व भ्रमातून बाहेर पडणेच शक्य झालेले नसेल, तर समोरचे ढळढळीत सत्य बघता येणार कसे आणि सत्यच हाताशी नसेल तर त्याची वास्तविक मिमांसा तरी करणे कसे शक्य आहे? या निवडणूकीने नुसत्या कॉग्रेसी वा पाखंडी सेक्युलर राजकारणाला उध्वस्त केलेले नाही, तर अर्धशतकापासून प्रस्थापित झालेल्या अनेक राजकीय पुर्वग्रहांना भूईसपाट करून टाकले आहे. त्यापैकी एक म्हणजे व्होटबॅन्केचे राजकारण होय. जातीपातीच्या गणिते व समिकरणांच्या मांडणीशिवाय भारताची सत्ता मिळवता येत नाही, ही त्यापैकी एक भ्रामक समजूत होती. तशीच मुस्लिम मतांशिवाय कुणाला सत्तेपर्यंत पोहोचताच येणार नाही, हा पोसलेला भ्रम होता. या दोन्ही भ्रमांचा बुद्धीजिवी वर्गावर इतका घट्ट पगडा होता, की भाजपाचे नव्हेतर रा. स्व. संघाचे विचारवंतही त्यात फ़सले होते. म्हणूनच गुजरातच्या दंगलीसाठी बदनाम असलेल्या मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार बनवण्याची हिंमत संघाच्या लोकांना सुद्धा करायला खुप अवधी लागला. एकटा नरेंद्र मोदी नावाचा माणूस व त्याचे मोजके सवंगडी त्याविषयी अजिबात भ्रमात नव्हते. किंबहूना त्यांनीच हे दोन्ही सेक्युलर भ्रम जमिनदोस्त करण्याचा विडा उचालल्याप्रमाणे लोकसभा निवडणूकीच्या आखाड्यात उडी घेतली होती. तिथेच सर्वांची फ़सगत झाली.

   पहिली गोष्ट म्हणजे भाजपाने आपल्या कार्यकर्त्यांच्या दडपणाखाली येऊन मोदींना उमेदवार केले, तेव्हा बहुतेक सेक्युलर विद्वान व राजकीय पक्ष खुश झाले होते. कारण त्यांना मग आपापल्या परीने मुस्लिम व्होटबॅन्केवर डल्ला मारण्याची सोय आयती झाली होती. मोदींचे भय दाखवायची खोटी, की मुस्लिम मते आपल्याच खात्यात आपोआप जमा होणार, याची प्रत्येकाला खात्री होती. या राजकीय पक्षांच्या पलिकडे राजकीय विद्वानही तितक्याच छातीठोकपणे भाजपाने पायवर धोंडा मारून घेतला, अशी भूमिका मांडत होते. पण मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने त्याच्याकडे नसलेल्या मुस्लिम उमेदवारांना तिकीटेही देण्याचा आटापिटा केला नाही. सहाजिकच भाजपा मुस्लिम विरोधी असल्याचा डंका पिटायला आणखी एक कारण मिळाले होते. शिवाय अजून मोदी गुजरातच्या दंगलीसाठी साधी माफ़ीही मागत नाहीत, हे कोलीत होतेच. पण त्याचा कुठलाही उपयोग झाला नाही आणि असल्याच बोगस सेक्युलॅरिझमच्या आहारी गेलेल्या मुस्लिमांचे या निवडणूकीत सर्वाधिक नुकसान झालेले आहे. कारण भाजपाने संपुर्ण उत्तर व पश्चिम भारतात अफ़ाट विजय मिळवला आहे आणि त्याच्या परिणामी सेक्युलर पक्षांबरोबर मुस्लिमांचे संसदेत असलेले प्रतिनिधीत्व मात्र पुरते घसरले आहे. एकच उदाहरण पुरेसे ठरावे. अवघ्या अडीच वर्षापुर्वी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या होत्या. त्यात सर्व पक्षाचे मिळून ६९ मुस्लिम आमदार निवडून आलेले होते. जवळपास सहापैकी एक मुस्लिम आमदार तिथे आहे आणि त्याच राज्यात आता ८० पैकी एकही मुस्लिम खासदार लोकसभेत पोहोचू शकलेला नाही. याचे कारण निव्वळ पाखंडी सेक्युलॅरिझम वगळता दुसरे देता येणार नाही. असे का म्हणावे लागते, तेही समजून घ्यावे लागेल.

   भाजपा हा हिंदूचा पक्ष आहे, म्हणूनच तो मुस्लिमांचा शत्रू आहे; अशी जी समजूत सातत्याने अल्पसंख्यांकांच्या डोक्यात भरवून देण्यात आलेली आहे, तिच्या परिणामी त्या पक्षात मुस्लिम वा अन्य धर्मिय लोकांची संख्या जवळपास नगण्य आहे. जिथे पुरेसे कार्यकर्तेच नाहीत व समर्थ मुस्लिम नेत्यांचा अभावच आहे; तिथे मुस्लिमांना भाजपात उमेदवारी मिळणार कशी? आणि जिथे उमेदवारच नाहीत, तिथे भाजपातर्फ़े मुस्लिम लोकप्रतिनिधी निवडून यायचे कसे? हे आजवर ठिक असायचे. कारण भाजपा हा दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष होता. मध्यप्रदेश वा गुजरात अशा राज्याच्या विधानसभेत त्याने मोठे यश मिळवल्यावर तिथे मुस्लिम उमेदवारांची संख्या आपोआप घटत गेली. जशी ती घटत गेली, तसे इतर पक्षही मुस्लिम निवडूनच येत नाहीत, म्हणून मुस्लिमांना उमेदवारी देईनासे झाले. त्याचा परिणाम मागल्या दहापंधरा वर्षात अनेक राज्यात मुस्लिमांची संख्या विधानसभातून घटत गेली. पण तितके मोठे यश भाजपा संसदेत मिळवूच शकणार नाही, याची जाणत्या सेक्युलरांना खात्री होती आणि म्हणूनच त्यांच्या आहारी गेलेल्या मुस्लिम जाणत्यांना होती. म्हणूनच मुस्लिमातील जाणते अकारण भाजपाशी फ़टकून वागत राहिले. या निवडणूकीने त्यालाच हादरा दिल्याने त्याचा सर्वाधिक फ़टका मुस्लिम समाजाला बसला आहे. ८० खासदार निवडून देणार्‍या उत्तरप्रदेशाला भाजपाने धुवून काढल्यावर तिथे मुस्लिम खासदाराचे नामोनिशाण उरले नाही. आपोआप लोकसभेतही त्याचेच प्रतिबिंब पडले आहे. त्यासाठी भाजपाला दोष देता येणार नाही. मुस्लिम त्याला मते देणार नाहीत आणि मुस्लिम नेते त्याच्याशी फ़टकूनच वागणार असतील, तर यापेक्षा वेगळे काही घडण्याची शक्यताच उरत नाही.

   आजच्या या राजकीय विषमतेला सर्वाधिक कोणी जबाबदार असेल, तर ते तमाम सेक्युलर लोक कारणीभूत आहेत. कारण त्यांनीच मुस्लिम लोकांना भाजपाशी अस्पृष्यतेने वागायचे धडे दिलेले आहेत. तसे नसते तर आज भाजपाच्या विजयी उमेदवारात तितक्याच प्रमाणात मुस्लिम खासदारांची संख्या बघायला मिळाली असती. ही झाली व्होटबॅन्क राजकारणाची एक बाजू. दुसरी बाजू आहे हिंदू व्होटबॅन्केची. मुस्लिम व्होटबॅन्केचे राजकारण निकालात काढण्यासाठी मोदींनी आपल्या कडव्या हिंदू समर्थकांची एक व्होटबॅन्क बनवली हे कोणी नाकारू शकत नाही. पण त्याचे श्रेय एकट्या मोदींना देता येणार नाही. नुसती माफ़ी न मागण्याचे भांडवल मोदींनी त्यासाठी गुंतवले होते. पण त्या इवल्या भांडवलाच्या ठेवीवर इतके अफ़ाट व्याज मिळवून देण्य़ाची किमया मात्र सेक्युलर शहाण्यांनी व राजकारण्यांनी केलेली आहे. मुस्लिम मतदारांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी सतत मोदींचा बागुलबुवा करणार्‍यांनी, दुसरीकडे मुस्लिमांविषयी हिंदू मानसिकतेत शंका, संशय व आकस वाढवण्याचे काम अथक केले, हे कोणी नाकारू शकणार नाही. त्यातूनच मग देशाच्या कानाकोपर्‍यात मोदींची हिंदू व्होटबॅन्क फ़ोफ़ावत गेली. तितकी मुस्लिम व्होटबॅन्क दिवाळखोर होत गेली. कारण संख्येने हिंदु अधिक असतील, तर तीच बॅन्क वाढण्याला संधी होती. मुस्लिमांची लोकसंख्याच मर्यादित असेल, तर होती त्यापेक्षा मुस्लिम व्होटबॅन्क वाढण्याची शक्यता केव्हाच संपलेली होती. पण सेक्युलर थोतांडामुळे बाकीचे सगळेच पक्ष त्या इवल्या मुस्लिम व्होटबॅन्केवर डल्ला मारायला टपलेले होते. उलट सतत विस्तारत जाणार्‍या हिंदू व्होटबॅन्केला मोदी वगळता कोणी भागिदारच नव्हता. या निवडणूक निकालांनी त्याचाच ताळेबंद सादर केला आहे. नुसते मुस्लिम मतांसाठी लाचार झालेले सेक्युलर राजकीय पक्षच जमीनदोस्त झालेले नाहीत, तर त्यांच्याबरोबर मुस्लिम समाजाला मिळू शकणार्‍या न्याय्य प्रतिनिधीत्वाचाही त्यात हकनाक बळी पडला आहे. यातून काय परिस्थिती उदभवू शकते याचा विचार करणे व कारणे शोधणे, हीच खरेतर या लोकसभा निवडणूकीची वास्तविक मिमांसा ठरू शकेल. पण तिकडे अजून तरी कुणा तथाकथित जाणकाराचे विश्लेषकाचे लक्ष गेलेले नाही. मग योग्य विश्लेषण व्हायचे कसे?

   मुस्लिम व्होटबॅन्क सेक्युलर दिवाळखोरीने कशी बुडाली, तेही आकड्यांनी समजून घ्यावे लागेल. साधारण १७-१८ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे आणि त्यातले १५ टक्के तरी नक्की मतदान करतात, असे समजूया. त्यापैकी १२ टक्के तरी गठ्ठा मतदान करत असतील आणि तेच ठरवून भाजपाला पराभूत करायला गठ्ठा मते जिंकू शकणार्‍या बिगर भाजपा उमेदवाराच्या झोळीत मते टाकतात, हे मान्य करू. म्हणजे असे सेक्युलर विश्लेषकांचे मत आहे. त्याला ते टॅक्टीकल मुस्लिम मते असे म्हणतात. त्यांच्यापुढे भाजपा मार खात होता. म्हणजे भाजपाच्या पारड्यात आणखी १२ टक्के मतांची जास्तीची भर पडली, तर त्यांचे पारडे आपोआप जड होऊन विजय सोपा होऊन जातो ना? ही वाढीव मते मुस्लिम गठ्ठा मतांचे वजन निरूपयोगी करून टाकतात आणि नेहमी भाजपाला मिळू शकणार्‍या मतांच्या बळावर विजय खात्रीचा होऊन जातो ना? मोदी विरोधातल्या सततच्या अपप्रचाराने तेच काम केले. शिवाय मतदान वाढवायची मोहिम संघाने मेहनत घेऊन राबवली. तिथे प्रत्येक मतदारसंघात मतदान वाढवण्यातून मुस्लिम मतगठ्ठा हलका होत गेला. मग मुस्लिमांनी कुठल्याही विरोधी उमेदवाराला गठ्ठा मते दिली; तरी भाजपाचेच पारडे जड राहिले. तिथे तिथे विजय सहज होऊन गेला. गठ्ठा मतदान मुस्लिम करतात, तर हिंदूही करणार नाहीत, हे सेक्युलर गणित उध्वस्त झाले. तिथेच सगळ्या निवडणूकीचे अंदाज व सेक्युलर समजूती उध्वस्त होऊन गेल्या. त्यात बळी मात्र मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधीत्वाचा पडलेला आहे. परिणामी आता ज्यांना निवडणूका जिंकायच्या आहेत, त्यांना सेक्युलर मुखवटे लावून भागणार नाही, की मुस्लिम व्होटबॅन्केच्या भरवशावर राहुन भागणार नाही. त्यासाठी त्यांना मुस्लिम मतांपेक्षा प्रभावी अशा दुसर्‍या व्होटबॅन्केत खाती काढावी लागणार आहेत. अशी एकमेव व्होटबॅन्क असू शकते किंवा असल्याचे मोदींनी आपल्या विजयातून सिद्ध केले आहे. पण तिथे खाते काढायचे किंवा त्यातले क्रेडीट कार्ड मिळवायचे, तर बोगस सेक्युलर नाटक थांबवावे लागेल किंवा थेट हिंदुत्ववादीच व्हावे लागेल. जसे आजवर मतांसाठी मुस्लिमांचे लांगुलचालन केले तसेच ते हिंदूंचे करावे लागेल. थोडक्यात आणखी एकदोन वर्षात बहुतेक राजकीय पक्ष आपला सेक्युलर टोपीवाद उतरून ठेवून थेट नाही तर आडोशाने, हिंदूत्ववादाकडे झुकण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. कारण अशा राजकीय पक्षांची धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्युलॅरिझम जितका दिखावू होता, तितकाच हिंदूत्ववादही पाखंडच असणार आहे. कारण हे तमाम पक्ष कधी मुस्लिम न्यायाचे पक्षपाती नव्हते, की मुस्लिमांच्या कल्याणासाठी उत्सुक नव्हते. मतांसाठी हावर्‍यांना कुठल्याही धर्मशी कर्तव्य नसते, तसेच ते कुणाच्या न्यायाचे अगत्य नसते. त्यामुळेच नजिकच्या काळात लालू, मुलायम व कॉग्रेसपर्यंत तमाम पक्ष हिंदूत्ववादी झाल्यास कोणी चकीत व्हायचे कारण नाही. पण सवाल त्या पक्षांचा नसून, ज्या मुस्लिम समाजाच्या वाट्याला ही विषमतेची फ़ळे आलेली आहेत त्यांचे काय? त्याची उत्तरे आपण पुढल्या लेखामधून शोधूया.  (अपुर्ण)

४ टिप्पण्या:

  1. उत्तम लेख ! आपण म्हणता तसे हिंदूंचे ध्रुवीकरण नक्कीच झाले आहे. परंतु हे धर्मनिरिपेक्षवादी पक्ष त्यातून काही बोध घेतील असे वाटत नाही. त्यांचे मुस्लिम लान्गुल चालन चालूच राहिल. आपण पाहिले असेल की सोनिया गांधींनी लोकसभा हरल्यानंतर पत्रकार परिषदेत काय सांगितले. ' हम आपने सिंधान्तोसे कोई समझोता नहीं करेंगे' असा कोणता सिन्धांत त्यांना म्हणायचा होता. यावर आपलं भाष्य आवश्यक आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. भाऊ याचा पुढचा भाग कधी ? आम्ही वाट पाहतोय.

    उत्तर द्याहटवा
  3. Muslimansathi kahi hi kele tari te modi na vot denar nahit ki pakistani pana sodnar nahit....tya peksha modina vot denarya hindu sathi kam karAyla have

    उत्तर द्याहटवा