शुक्रवार, १४ मार्च, २०१४

एनीवे, थॅन्क्यू मिस्टर केजरीवाल



केजरीवाल यांनी जे काही केले त्यापेक्षा त्यांना हरभर्‍याच्या झाडावर चढवणार्‍या माध्यमे, पत्रकार व जाणत्या विश्लेषकांनी मागल्या तीन महिन्यात काय केले याला अधिक महत्व आहे. सोबतच्या चित्रात आपल्या कारट्याचे उपदव्याप कौतुकाने बघत बसलेली माता आणि आज केजरीवालच्या हल्ल्यानंतर खडबडून जाग आलेल्या माध्यमांची कथा वेगळी आहे काय?

एनीवे, थॅन्क्यू मिस्टर केजरीवाल

   शेजार्‍याच्या दारात जाऊन हगूमुतू करणार्‍या आपल्या लाडक्याचे कौतुक करणार्‍या आईबापांची स्थिती अनेकदा त्याच अनुभवातून गेल्यावर जशी होते? तशीच अवस्था आज आपल्या वाहिन्यांची व त्यावरील बहुतांश सेक्युलर पत्रकारांची झाली आहे. ज्यांचे स्मरण पक्के असेल त्यांना आठवेल, की ८ डिसेंबर २०१३ रोजी चार विधानसभांचे निकाल लागले आणि त्यात तीन विधानसभेत भाजपाने मोठाच विजय संपादन केला होता. जिथे ६५ लोकसभा जागा निवडून दिल्या जातात, तिथे भाजपासाठी मोदींनी प्रचार केला होता आणि तिथेच मतदानाची टक्केवारी वाढून भाजपाला दैदिप्यमान यश मिळाले होते. अपवाद होता दिल्ली नावाच्या एका इवल्या नगरराज्याचा. तिथे भाजपा सर्वात मोठा पक्ष झाला, तरी त्याला बहूमताचा पल्ला गाठता आला नाही. तिथे कॉग्रेसवरील नाराजीची मते नव्या आम आदमी पक्षाने मिळवून भाजपाच्या यशाला गालबोट लावले होते. पण म्हणून त्याचा देशव्यापी परिणाम होऊ शकणार नव्हता आणि आता त्याचेच प्रतिबिंब बहुतेक मतचाचण्यांमध्ये पडलेले दिसते आहे. पण वाहिन्यांसह माध्यमातील सेक्युलर पत्रकारांना त्यातले कॉग्रेस व राहुलचे अपयश झाकायचे होते, म्हणून आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील दुय्यम यशालाच त्या निवडणूकीतील यशाचा सेहरा बांधण्याच्या कसरती ९ डिसेंबरपासून सुरू झाल्या. त्याच कसरती कालपर्यंत चालू होत्या. त्यासाठी मग अरविंद केजरीवाल नावाच्या माकडाच्या हाती कोलीत देण्यात आले. जोपर्यंत ते ‘सेक्युलर पत्रकारां’चे लाडके बाळ भाजपाच्या दारात जाऊन हगूमुतू करीत होते; तोपर्यंत ‘हाऊ स्वीट’ असे कौतुकाचे बोल मागले तीनचार महिने नित्यनेमाने कानावर पडत होते. सहाजिकच घरातले उनाड पोर जसे शेफ़ारल्याने बेताल होते; तेच केजरीवाल यांचे झाले. असे उनाड पोर मग त्याला कोणी हटकले तर संतापते चिडते. नेमके तेच आता झाले आहे. त्याने मांडलेला उच्छाद जगाच्या नजरेतून सुटेनासा झाला आणि सेक्युलर पत्रकारांसह माध्यमांनाही शंका व प्रश्न विचारणे भाग झाले. पण अशा प्रश्नांची सवय नसली, मग उनाड पोरही अस्वस्थ होते आणि आईबापांनाही ब्लॅकमेल करू लागते. केजरीवाल त्याचाच नमूना होता. म्हणूनच मुंबईत त्यांनी जो धिंगाणा घातला, त्याबद्दल शंका विचारल्या गेल्यावर त्यांनी थेट माध्यमांच्याच तोंडावर टांग वर केली. आता आपल्याच या लाडक्या पोराच्या उचापतींनी सेक्युलर माध्यमे विचलीत झाली आहेत.

   पहिल्या दिवसापासून भाजपाचे नेते हर्षवर्धन यांनी केजरीवाल नौटंकी करतात, असे म्हटलेले होते. पण हेच पत्रकार तेव्हा हर्षवर्धनची हेटाळणी करीत म्हणायचे, ‘तुमची खुर्ची हुकली म्हणून रडकुंडीला आलाय’. आता कोण रडकुंडीला आलाय आणि कशाला? स्टंट, नौटंकी, बेजबादार वक्तव्ये, बिनबुडाचे आरोप, बेताल विधाने, बेछूट भाषा हे सगळे आरोप भाजपाने पहिल्यापासून केलेले होते. आज तेच शब्द पत्रकार व माध्यमे बोलू लागली असतील, तर मग केजरीवाल यांचा आरोप खराच मानायला हवा. कारण हेच शब्द माध्यमांपेक्षा आधी भाजपा नेते प्रवक्ते वापरत आहेत आणि पत्रकारांनी तिथूनच उसनवारी केलेली आहे. तेव्हा नुसता केजरीवाल किंवा आम आदमी पक्षाने खुलासा देऊन भागणार नाही. किंबहूना त्या पक्षाने कुठलाही खुलासा देण्याची गरजच नाही. पत्रकार आणि माध्यमांनी आजवर दिल्लीतल्या अनेक वास्तविक बातम्या कशासाठी लपवल्या; त्याचा खुलासा देण्याची गरज आहे. दिल्लीत जेव्हा दहाबारा दिवस प्राथमिक शिक्षक केजरीवाल यांच्या दारात उपोषणाला बसले होते, त्याला किती वाहिन्यांनी प्रसारीत केले? नसेल तर का नाही? याच पक्षाच्या दोन आमदारांना पाणीपुरवठा होत नाही, म्हणून त्याच्या मतदारसंघात महिला रहिवाशांनी मारहाण केली. ही बातमी कुठल्या नामवंत वाहिनीने दाखवली होती? वीजदरात कपात करण्याचे आश्वासन देऊन मते घेतलेल्या केजरीवालांनी तीन महिन्यासाठी अनुदानाने वीज बिले कमी करून मतदाराची व्यवहारी फ़सवणूक केली; त्याचा जाब कुठल्या वाहिनीने विचारला? ४९ दिवसात आपण जितके काम करून दाखवले तितके काम कुठल्या सरकारने मागल्या ६५ वर्षात केलेले नाही, अशी शुद्ध थापेबाजी केजरीवाल कॅमेरासमोर नित्यनेमाने करीत होते, तेव्हा त्यांना नेमकी कुठली कामे केलीत, असा सवाल कुणा पत्रकार वा वाहिनीने कशाला केला नव्हता? मोदी वा राहुल यांच्या भाषणातील एखाद्या शब्दावरून तासभर पिसे काढणार्‍यांनी कधीतरी केजरीवाल किंवा आम आदमी पक्षाच्या थापेबाजीचे पोस्टमार्टेम केल्याचे आपण मागल्या तीन महिन्यात ऐकले होते काय?


   इतके दूर जाण्याची गरज नाही, दिल्लीत केजरीवाल इतकी प्रचंड मते मिळवू शकले, त्यात ज्या अनेक समाजघटकांचा सहभाग होता, त्यात रिक्षावाले सर्वात महत्वाचा गट होता. त्यांनी आपल्या रिक्षाच्या मागे ‘आप’चे फ़लक लावून केलेल्या प्रचारामुळे ह्या पक्षाला दिल्लीत एक चेहरा मिळू शकला. आज त्यांचीच काय अवस्था आहे? गेले दोनतीन दिवस हे रिक्षावाले गाडीच्या त्याच भागावर ‘केजरीवालने दगा दिला’ असल्या घोषणांचे फ़लक लावून फ़िरत आहेत. कोणा वाहिनीने त्याची दोन मिनीटाची तरी बातमी दाखवली आहे काय? नसेल तर कशाला दाखवू नये? मागल्या तीन महिन्यात अत्यंत खळबळजनक ठरू शकतील अशा काही डझन घटना आहेत, त्यांना ब्रेकिंग न्युज म्हणून प्राधान्य मिळायला हवे होते. पण त्यातून केजरीवाल व आम आदमी पक्षाच्या पापांचा पाढाच वाचला गेला असता. त्याबद्दल माध्यमांनी व प्रामुख्याने बहुतांश नावाजलेल्या वाहिन्यांनी मौन कशाला धारण केलेले होते? आजच एका वाहिनीवर तेव्हाचे या पक्षाचे कायदामंत्री सोमनाथ भारती तिरंगी पतंग उडवून राष्ट्रध्वजाचा अवमान करीत असल्याचे चित्रण दाखवण्यात आले. ती घटना जानेवारीच्या मध्याची आहे. म्हणजे तीन महिने जुनी. आता त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्यावर ते चित्रण दाखवण्यात आले व वृत्त प्रक्षेपित झाले. तीन महिने अशा किती बातम्या माध्यमांनी का झाकून ठेवल्या आहेत? आणि केजरीवाल यांनी पत्रकारांवरच टांग वर केल्यानंतरच कशाला त्यांचे प्रसारण व पारायण सुरू झाले आहे?

   ‘सारा का सारा मीडिया खरीदा गया है, इनको जेल भेजेंगे’ असे केजरीवाल यांनी म्हटल्यावर पत्रकारांना स्वाभिमान आठवला? त्यात विकले गेल्याचा आरोप या संतापाचे कारण आहे, की आपण इतकी इमानेइतबारे आम आदमी पक्षाची पाठराखण केल्यावरही लाथा झाडल्याचा आक्षेप आहे? पत्रकारांचा राग नेमका कोणत्या कारणास्तव आहे? न्य़ुज नेशन, इंडिया न्युज, झी, लाईव्ह इंडीया, न्युज एक्सप्रेस असा दिल्लीकेंद्रीत वाहिन्या सोडल्या, तर आम आदमी पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांनी दिल्लीत घातलेल्या धुमाकुळाबद्दल बहुतेक मान्यवर वाहिन्या व वृत्तपत्रांनी साळसूद मौन पाळलेले होते. त्याचे कारण कोणते? की त्यांना तेव्हा कौतुकाच्याच बातम्या देण्यासाठी केजरीवाल पैसे मोजत होते? त्यासाठी मग त्यांच्या पापाचा पाढा वाचायची पत्रकारांची तयारी नव्हती का?  आता त्या सगळ्या दडवलेल्या बातम्या चव्हाट्यावर आणल्या जातील याची मला पुर्ण खात्री आहे. आणि तशा थोड्याथोडक्या बातम्या व घटना नाहीत. केजरीवालच्या नादाला लागून आपण फ़सल्याचे सांगणारे काही लाख मतदार दिल्लीत सापडतील. पण त्यांच्याकडे आजवर पत्रकार व कॅमेरे जात नव्हते. आता तिकडे रीघ लागेल. आजवर उलट्या बाजूचे चित्रण व विधाने दाखवण्याची कसरत चालली होती. त्यासाठी केजरीवाल यांनी पैसे दिले असतील असेही नाही. तो वैचारीक अगतिकतेचा भाग होता. ज्या सेक्युलर पत्रकारांचे व विचारवंतांचे राजधानीतील माध्यमांवर वर्चस्व आहे, त्यांना मोदीचे वावडे आहे. मग त्यांनी दिल्लीच्या नगण्य यशाचा फ़ुगा इतका फ़ुगवला, की त्यासमोर अन्य तीन राज्यातील मोदींच्या लोकप्रियतेला, भाजपाच्या यशाला माध्यमातून झाकून टाकले जावे. साधे आकडे या बदमाशीची साक्ष देऊ शकतील.

   केजरीवाल व आपचे यश किती मोठे असावे? चार राज्यात निवडणूका झाल्या, तिथे ७२ लोकसभेच्या जागा आहेत. त्यापैकी ६५ जागी मोदींनी व भाजपाने बाजी मारली आहे. केजरीवालांनी दुसरा क्रमांक मिळवला त्या दिल्लीत त्यापैकी अवघ्या ७ जागा आहेत. पण मागल्या तीन महिन्यात त्यांचे इतके कौतुक चालू आहे, की छत्तीसगड, मध्यप्रदेश व राजस्थान या तीन मोठ्या राज्यात आमदारांची बैठक झाली, त्यांनी आपला नेता निवडला, त्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला किंवा त्याने मंत्रीमंडळ बनवल्याची बातमी तरी प्रसारीत झाली काय? त्याबद्दल कुठली चर्चा तरी झाली काय? जणू सात लोकसभा जागांची दिल्ली म्हणजे अवघा भारत असल्याच्या थाटामध्ये देशातल्या राजकारणाचे चित्र कोणी रंगवले? तो भूलभुलैया केजरीवाल यांनी निर्माण केला नाही. आपणच आता मोदींचा विजयरथ रोखणार ही आम आदमी पक्षाच्या कुणा नेत्याने केलेली भाषा नव्हती. ती भाषा तमाम वाहिन्या व त्यावरील सेक्युलर पत्रकार वा जाणत्यांची होती. त्यांच्या असल्या विश्लेषणातून केजरीवालसह त्यांच्या पक्षाला लोकसभा लढवून देशाची सत्ता मिळवण्याची झिंग चढली तर दोष कुणाचा? ज्यांनी त्या बाळाला असले बाळकडू भरवले, त्यांचाच गुन्हा नाही काय? शेफ़ारलेल्या पोराने तोंडाला येईल ते बरळावे आणि वडीलधार्‍याने त्याला रोखायचे सोडून लहान आहे म्हणत त्याचे कौतुक करायचा पवित्रा घेतल्यावर दुसरे काय व्हायचे?

   मागल्या तीन महिन्यापासून सतत एक पोरकटपणा सातत्याने विविध वाहिन्यांवर ऐकायला मिळाला. ‘हम राजनिती नही करने आये, राजनिती सुधारने आये है. इन पार्टीयोंको राजनिती सिखाने आये है. गव्हर्नेन्स सिखाने आये है’. लहान पोराचे बालीश व फ़ुलीश शब्द जसे प्रौढांनी झेलावेत, तशीच माध्यमे असली विधाने झेलत नव्हती काय? ती पचली म्हणून आता तेच सोकावलेले बाळ आईबापांनाच सांगू लागले आहे, ‘पोर जन्माला कसे घालतात ते तुम्हाला शिकवतो’. ज्यांनी या पक्षाला जन्माला घातले त्यांच्यावरच तो उलटले आहे. ज्या माध्यमांनी पत्रकारांनी व जाणत्या, अभ्यासकांनी त्याचे अवास्तव लाड केले, त्यांनाच आता गुरूची विद्या फ़ळायची वेळ आलेली आहे. कारण हे शेफ़ारलेले पोर त्यांना सांगतेय, ‘पत्रकारीता करने नही आये, तुम्हे पत्रकारीता सिखाने आये है’. केजरीवाल यांच्या वादग्रस्त विधानानंतर खुलासे द्यायला समोर आलेल्या तीन प्रवक्त्यांपैकी दोघे होते आशुतोष व आशिष खेतान. यांनी मागल्या दहा वर्षात सतत मोदी विरोधात कंड्या पिकवण्याची मोहिम माध्यमातून चालवली होती आणि त्यांनाही माध्यमांनी प्रोसाहनच दिलेले होते ना? मग त्याच शेफ़ारलेल्या पोरांनी आता वाढलेल्या पंगतीच्या ताटामध्येच लघूशंका केली; तर इतका आरडाओरडा कशाला? याचा विचार आपले पोर शेजार्‍याच्या दारात वा घरात जाऊन धुमाकुळ घालते, तेव्हाच करायचा असतो. लाडकौतुकाचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगायची वेळ येऊ नये, याची तरी शहाणा काळजी घेतो. इथे अतिशहाणेच सगळे. मग दुसरे काय व्हायचे? माध्यमांच्या या दांभिकतेचा बुरखा फ़ाडल्याबद्दल केजरीवालांचे मनपुर्वक अभिनंदन.

एनीवे, थॅन्क्यू मिस्टर केजरीवाल

३ टिप्पण्या:

  1. भाऊ,

    लेख वाचून जुनं संस्कृत सुभाषित आठवलं :

    घटं भिन्द्यात्, पटं छिन्द्यात्, कुर्यात् रासभारोहणं ।
    येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषो भवेत् ॥

    अर्थ : मडके फोडा, कपडे फाडा वा गाढवावर बसा. काहीही करा पण प्रसिद्ध व्हा!

    अरविंद केजरीवाल यांना हे सुभाषित चपखलपणे लागू पडतं, नाहीका?

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    उत्तर द्याहटवा
  2. बहुत क्रांतीकारी...बहुत हि क्रांतीकारी... :D

    उत्तर द्याहटवा