शनिवार, ११ जानेवारी, २०१४

प्रेषिताच्या शोधात भारतीय

   भारतीत समाज जीवनात व्यक्तीमहात्म्य खुप महत्वाचे असते, जी व्यक्ती समाजमनाला भुरळ घालू शकते किंवा भारावून टाकू शकते; तिच्यामागे पळण्याची मानसिकता मोठी प्रभावी असते. ती जशी गावात वस्तीमध्ये असते, तशीच प्रादेशिक, भाषिक व राष्ट्रीय पातळीवरही प्रभावशाली आहे. त्यापासून भारतीयांची सुटका नाही. कोणीतरी उद्धारक वा प्रेषित यावा आणि त्याने आपले जीवन उजळून टाकावे, अशी स्थायी मानसिकता या भूमीमध्ये कायम कार्यरत असते. जेव्हा असा कोणी राष्ट्रीय ताकदीचा उद्धारक नसतो, तेव्हा इथली जनता स्थानिक, प्रादेशिक वा वस्तीच्या पातळीवरचे प्रेषित शोधून त्यांच्या मागे धावत सु्टते, असा आपला इतिहास आहे. स्वातंत्र्य चळवळ असो किंवा स्वातंत्र्योत्तर काळातील भारताची वाटचाल असो, त्यात अशी अनेक लहानमोठी व्यक्तीमत्वे उदयास आलेली दिसतील. त्यांनी समाजजीवन वा राजकीय, सांस्कृतिक जीवन व्यापलेले दिसेल. जेव्हा अशा अशा कुणा व्यक्तीमत्वाचा राष्ट्रीय पातळीवर वावर असतो, तेव्हा त्याच्याच भोवती राजकारण किंवा समाजजीवन घुटमळत असते. गांधी नेहरू वा पुढल्या कालखंडात इंदिराजी अशी व्यक्तीमत्वे होती. त्यांनीच कॉग्रेसला कायम सत्ता उपभोगू दिली. त्या व्यक्तीमहात्म्याला आव्हान देऊ शकणारे व्यक्तीमत्व विरोधकांना समोर आणता आले नाही. म्हणूनच कॉग्रेस सातत्याने टिकून राहिली. नेहरूंच्या अस्तानंतर तसे व्यक्तीमत्व नसल्याने कॉग्रेस प्रभावहीन होऊन स्थानिक व प्रादेशिक व्यक्तीमहात्म्यासमोर तिला पराभूत व्हायची वेळ आली. मग कात टाकल्याप्रमाणे १९७० च्या दशकात इंदिराजींचे व्यक्तीमहात्म्य पुढे आले आणि पुन्हा कॉग्रेसची सत्ता कायम राहिली, आणिबाणीच्या निमित्ताने तिला जयप्रकाश नारायण यांच्या व्यक्तीमत्वाने हादरा दिलेला होता. पण त्यांनी सत्तेपासून दूर रहाण्याने पुन्हा इंदिराजींकडे लोकांना वळावे लागले. थोड्याच काळात इंदिराजींच्या हत्येनंतर तीच पोकळी भारतीय राजकीय व समाजजीवनात आली आणि अवघे समाजजीवन भरकटत गेले. कॉग्रेस निकामी प्रभावहीन होत गेली. पण दुसरीकडे ती पोकळी भरून काढणारे देशव्यापी व्यक्तीमत्व अन्य पक्षात उदयास आले नाही. सहाजिकच स्थानिक व प्रादेशिक व्यक्तीमत्वाच्या आश्रयाला जात भारतामध्ये विस्कळीतपणा येत गेला. त्यातून बाहेर पडण्यासाठी कॉग्रेसच्या धुर्त नेत्यांनी आपल्या पक्षाला एकत्रित बांधू शकतील अशा सोनिया गांधींना पुढे आणले. त्यांचे व्यक्तीमहात्म्य उभे केले. पण असे व्यक्तीमत्व नुसतेच व्यक्ती असून भागत नाही, त्याच्यापाशी नेतृत्व करण्याची आणि धाडस करण्याची क्षमता असावी लागते. ती राजीव गांधीमध्ये नव्हती आणि सोनियांमध्येही नाही. म्हणूनच गेल्या तीन दशकात भारतामध्ये समाजजीवन विस्कळीत होत गेले. स्थानिक व प्रादेशिक प्रभावी व्यक्तीमत्वांच्या हाणामारीत राष्ट्रीय एकात्म चेहरा विस्कटून गेला. मोदींच्या रुपाने तसे व्यक्तीमत्व समोर आलेले आहे. त्यामुळेच रमेश त्यांना ‘फ़ॅसिस्ट आव्हान’ म्हणत आहेत. नेमके तसेच इंदिराजींचे रूप नव्हते का? इंदिराजींनी आणिबाणी लादून आणि तमाम विरोधी लोकांना गजाआड डांबून आपल्या एकाधिकारशाहीचा साक्षात्कारच देशाला घडवला होता. मोदींनी अजून तसा कुठला साक्षात्कार तरी घडवलेला नाही. पण तरीही त्याच इंदिराजींचे निष्ठावान भक्त जयराम रमेश मात्र मोदींना फ़ॅसिस्ट आव्हान ठरवत आहेत. त्यातला विखार बाजूला ठेवून म्हणुन त्यांचे विधान तपासणे अगत्याचे होऊन जाते. मोदींमध्ये जयराम रमेश नेमके असे काय बघत आहेत वा त्यांना काय दिसते आहे, की त्यांनी मोदींना कॉग्रेससमोरचे खरे मोठे आव्हान मानावे, त्याचे उत्तर काहीसे गुंतागुंतीचे आहे.

   रमेश यांना इंदिराजींचे व्यक्तीमत्व आठवलेले असावे. १९७० च्या आसपास इंदिराजी ज्याप्रकारे राजकीय क्षितीजावर उगवल्या आणि पुढल्या दोन दशकात त्यांनी जुन्याजाणत्या राजकारण्यांना निकालात काढून भारतीय राजकारणाचा चेहरामोहराच बदलून टाकला, तशीच वाटचाल मोदी करीत आहेत काय? मोदी हे ‘स्वातंत्र्योत्तर काळातले सर्वात मोठे आव्हान’ या शब्दांना म्हणूनच वेगळे महत्व आहे. रमेश वा कुठल्याही कॉग्रेस नेत्याने भाजपाच्या कुठल्या नेत्याचा इतका धसका घेतलेला नव्हता किंवा अन्य कुठल्या बिगर कॉग्रेस नेत्याला लक्ष्य केलेले नव्हते. गेल्या दोनचार वर्षात कॉग्रेसने आपली सगळी ताकद व बुद्धी मोदी विरोधात पणास लावल्यासारखे राजकारण केलेले आहे. त्यातूनच रमेश हे मोदींना आव्हान कशाला म्हणतात, त्याची साक्ष मिळते. ज्या कॉग्रेस पक्षात सोनिया व राहुल गांधींचे एकमुखी नेतृत्व आहे; त्याने विस्कळीत व अनेक आवाजात बोलणार्‍या भाजपाच्या मोदी या नवख्या नेत्याला इतके घाबरावे कशाला? मोदींच्या मागे भाजपा एकमुखी उभा नाही आणि लालकृष्ण अडवाणी व अन्य नेतेही मनपुर्वक मोदींच्या मागे नाहीत. कदाचित मोदींनी आक्रमक पवित्रा घेतला, तर भाजपात दुफ़ळीही माजू शकते. इतके असताना रमेश या व्यक्तीमत्वाबद्दल इतके गडबडून गेल्यासारखे बोलतात व कॉग्रेसही मोंदीबाबत अत्यंत आक्रमक पवित्रा घेते; याचा अर्थ काहीतरी घाबरण्यासारखे नक्कीच आहे. ते कारण मोदींना पक्षापेक्षा व्यक्ती म्हणून मिळणारा प्रतिसाद हेच असावे. कारण गेल्या वर्षभरात मोदींची वाढलेली लोकप्रियता व त्यांना मिळणारा वाढता प्रतिसाद; त्यांचे व्यक्तीमहात्य वाढवण्रारा आहे. दिर्घकाळानंतर भारताच्या राजकीय क्षितीजावर देशव्यापी लोकप्रियता असलेला आणि कुठेही जाऊन जनतेला भारावून टाकणारा, नवा नेता उदयास आलेला आहे. किंबहूना इंदिराजींच्या अस्तानंतर प्रथमच देशात कुणी एक देशव्यापी राजकीय व्यक्तीमत्व उदयास आलेले आहे, याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. रमेश आणि कॉग्रेसला त्याच व्यक्तीमत्वाने भयभीत केलेले आहे. त्याची प्रचिती नित्यनेमाने येत असते. आम्ही मोदींना मोजत सुद्धा नाही, अशी ग्वाही कॉग्रेसचे नेते प्रवक्ते नेहमी देत असतात. पण त्या पक्षाचे सर्व राजकारण मोदींच्या वाटेत अडथळे आणण्यापुरतेच मर्यादित होऊन गेले आहे. आपल्या पक्षाची धोरणे आखून, बदलून त्याच्या अंमलातून लोकांमध्ये आपले स्थान पक्के करण्यापेक्षा सगळा कॉग्रेस पक्ष मोदींची खुसपटे काढण्यात वा त्यांच्यावर हल्ले करण्यातच रममाण झाला आहे. कधी इशरत जहानची खोटी चकमक, तर कधी झाकीया जाफ़रीचा खटला, तर कधी अमित शहाचे पाळत प्रकरण किंवा अशाच कुठल्या प्रकरणात मोदी यांना गुंतवण्याचे व बदनाम करण्याचे डावपेच आखण्यात कॉग्रेसची शक्ती खर्ची घातली जात आहे. हे कशाचे लक्षण आहे?

   गेल्या दोनतीन दशकात भारताच्या राजकारणाचा ज्यांनी अभ्यास केला असेल, त्यांना असे एका व्यक्तीमत्वाच्या विरोधात देशाचे राजकारण घुटमळताना कधी दिसले नसेल. त्याच्या आधी इंदिराजींच्या कारकिर्दीत मात्र तसे सातत्याने होत असे. तमाम विरोधी पक्ष व राजकीय टिकाकारांचे एकमेव लक्ष्य इंदिरा गांधी असायच्या. त्याबद्दल त्यांनीही कधी तक्रार केली नव्हती. उलट आपल्या विरोधकांना व टिकाकारांना तो उद्योग चालवायला पुरेसे खाद्य इंदिराजी अगत्याने पुरवित असत. आपल्याला शिवीगाळ व्हावी व आपला उद्धार सतत होत रहावा, अशी तजवीज जणू इंदिराजी मुद्दाम करायच्या. नेमकी तीच आज मोदींच्या बाबतीतली स्थिती आहे. कुठूनही व कोणतेही कारण नसताना विषय मोदीपर्यंत आणला जातो किंवा येतो. देशातल्या कुठल्याही विषय वा गोष्टीचा संबंध मोदींशी जोडला जातोच. अवघे राजकारण व सार्वजनिक जीवन एका व्यक्तीभोवती घुसळते व घुमते आहे. इंदिराजीच्या राजकीय कारकिर्दीत अशीच स्थिती असायची. कॉग्रेस व विरोधी पक्षाच्या धुसळणीचा मध्यबिंदू इंदिराजी हेच व्यक्तीमत्व असायचे. त्या व्यक्तीमत्वाने देशाच्या समाजजीवनाचे जणू दोन तुकडे पाडलेले होते. एका बाजूला इंदिरा समर्थक व दुसर्‍या बाजूला उर्वरित सगळे; अशी स्थिती असायची. तुम्ही इंदिरेचे समर्थन करा किंवा त्यांचा द्वेष करा, पण तुम्ही त्यांच्याक्डे काणाडोळा वा दुर्लक्ष करू शकत नव्हता. आज मोदींच्या बाबतीत वेगळे म्हणता येईल काय? खरे तर तसेच सोनिया वा राहुल गांधींच्या बाबतीत व्हावे, ही रमेश यांच्यासारख्या रणनितीकारांची अपेक्षा होती आणि असते. पण सर्व अधिकार हाती देऊनही ते दोन्ही नेते त्या कसोटीला उतरू शकलेले नाहीत. पंधरा वर्षापुर्वी सोनियांना राजकारणात आणणार्‍या नेत्यांनी तेच उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून वादग्रस्त सोनियांना कॉग्रेसच्या सर्वेसर्वा म्हणून स्थानापन्न केले होते. आरंभी त्यांनीही तसे वादग्रस्त राहुन आपल्या व्यक्तीमत्वाची छाप चांगली पाडली होती. सत्तेवर असलेला भाजपा व त्याचे सर्व नेते सोनियांना परदेशी वगैरे म्हणून लक्ष्य करीत होते, त्याचा लाभ कॉग्रेसला मिळू शकला होता. तसा नेता भाजपाकडे नव्हता. त्यामुळेच सोनियांचे व्यक्तीमत्व चमकत होते. पण कसोटीच्या प्रसंगी त्यांचा टिकाव लागला नाही. आणि गुजरातच्या दंगलीचे अतिरेकी राजकारण करण्यातून त्यांनीच मोदींना तसे प्रभावी देशव्यापी व्यक्तीमहात्म्य बहाल करण्याची चुक केली. अर्थात मोदी त्याचा लाभ उठवून खरेखुरे राजकीय आव्हान म्हणून समोर उभे ठाकतील, अशी कुणाचीच अपेक्षा नव्हती. मात्र टिकेचे घाव सोसताना त्यातून मोदींनी देव होण्यापर्यंत मजल मारली; तेव्हा त्यांच्या टिकाकारांना भान येते आहे. रमेश आपणच घातलेल्या टिकेच्या घावातून निर्माण झालेला नवा देव आणि त्याच्या भक्तीला लागलेली लोकसंख्या बघून, भयभीत झाले आहेत. कारण दोनतीन वर्षात समोर आलेला मोदी त्यांना जुन्या इंदिरा गांधींच्या व्यक्तीमत्वाची आठवण करून देऊ लागला आहे. आजच्या पिढीतल्या बहुतांश पत्रकार अभ्यासकांना इंदिराजी हे व्यक्तीमत्व वाचून वा ऐकून माहिती आहे. पण त्यांच्या राजकीय घटनाक्रमाचे साक्षीदार नसलेल्यांना त्यातली उर्जा व दाहकता उमगणे अशक्य आहे. इंदिराजी हे व्यक्तीमत्व वाचून वा ऐकून त्याच्या राजकीय प्रभावाचा अंदाज येऊ शकत नाही. तो त्या काळाच्या अनुभूतीमध्ये जाऊन उलगडावा, असाच विषय आहे. रमेश यांना म्हणूनच मोदींमध्ये आव्हान दिसते आहे. त्यांना मोदींमध्ये इंदिरा गांधी दिसत आहेत. पण ते व्यक्तीमत्व कॉग्रेसमध्ये नसून कॉग्रेस संपवायला कटीबद्ध झालेले आहे, म्हणून जयराम रमेश यांच्यासह तमाम कॉग्रेस नेत्यांची गाळण उडालेली आहे.  (अपुर्ण)        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा