शुक्रवार, १० जानेवारी, २०१४

जयराम रमेश काय म्हणाले?



  गेल्या जुन महिन्यात भाजपाने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची देशव्यापी लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांना आगामी लोकसभा निवडणूकीच्या प्रचार समोतीचे प्रमुख म्हणून नेमले. त्यांची नेमणूक जाहिर होताच सर्वत्र एकच गदारोळ सुरू झाला. कारण गेल्या दहा वर्षात गुजरात दंगलीचे निमित्त करून मोदींना सातत्याने बदनाम करण्यात आलेले होते. त्या बदनामीच्या मागे कॉग्रेसची प्रेरणा होती, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळेच बदनामीची अतिशयोक्ती होऊन मोदींबद्दल जगभर कुतूहल वाढत जाऊन त्यांचे रुपांतर क्रमाक्रमाने लोकप्रियतेत झाले. परिणामी मोदींचेच नाव पंतप्रधान पदासाठी घेतले जाऊ लागले. आधी काही उद्योगपती व नंतर माध्यमांनी भाजपाला खिजवण्यातून ती चर्चा वाढतच गेली. पुढे भाजपाने मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार करणे म्हणजे साक्षात आत्महत्याच असल्याचा सिद्धांत मांडला जाऊ लागला. पण अशा अनावश्यक चर्चेतून लोकांसमोर मोदी देशाचे भावी पंतप्रधान होण्याची कल्पना अनवधानाने मांडली गेली. सततच्या चर्चेने त्या कल्पनेला वजन प्राप्त होत गेले आणि गुजरातच्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर लोकांनाही असा पंतप्रधान असावा, असेच वाटू लागले. थोडक्यात मोदींच्या आडोशाने भाजपाला बागुलबुवा दाखवण्याच्या नादात मोदी विरोधकांनीच लोकांच्या मनात मोदींना पंतप्रधान पदी बसवायची कल्पना रुजवली. त्यातून उदासिन व निराश भाजपा कार्यकर्त्यांना उभारी येत गेली आणि परिणामी भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्याकडून मोदींनाच भावी पंतप्रधान बनवण्याची मागणी वाढू लागली. खरे तर त्या कालखंडात मोदी गुजरातमध्ये तिसर्‍यांदा विधानसभा निवडणूक लढवण्यात गर्क होते. परंतु त्यांचा डोळा ती लढाई जिंकून पंतप्रधान पदावर खुलेआम दावा करण्याचाच होता. वर्षभरापुर्वी ती लढाई जिंकल्यापासून मग मोदींनी दिल्लीवर स्वारी करण्याचा चंग बांधला. खरे तर त्यांच्या विरोधकांनी तिथेच हा बागुलबुवा दाखवण्याचे थांबवले असते; तर मोदींना इतक्या लौकर त्या उमेदवारीपर्यंत मजल मारणे शक्य झाले नसते. पण त्यांना हवी तशीच खेळी त्यांचे विरोधक करत गेले आणि मोदींचे काम सोपे होत गेले. आपल्याच पक्षातून व दिल्लीच्या पक्षीय श्रेष्ठींकडून आपल्याला सुखासुखी मान्यता मिळणार नाही; याची मोदींनाही खात्री होती. पण माध्यमातील अपप्रचार व कार्यकर्त्यातील उत्साह, यांचा नेमका उपयोग करीत मोदींनी आपली वाटचाल योग्य दिशेने चालू ठेवली होती. सतत मोदी व त्यांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीच्या चर्चेने त्यांचे काम अतिशय सोपे करून टाकले होते. एका बाजूला त्याचे दडपण पक्षातील व पक्षाबाहेरील विरोधकांवर वाढत होते. तर दुसरीकडे पक्षाच्या विजयासाठी उतावळा झालेला तळागाळातला कार्यकर्ता अधिकच निष्ठेने मोदींच्या मागे गोळा होत गेला.

   ज्यांना राजकारणाचा अभ्यास आहे आणि जनमानसाचा अंदाज आहे, अशा कॉग्रेस नेत्यांमध्ये केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री जयराम रमेश यांचा समावेश होतो. पक्षाच्या निवडणूक रणनिती व प्रचाराचे मुद्दे शोधण्यात तेच पुढे असतात आणि राहुल गांधी यांची भाषणे तेच लिहून देतात, असे म्हटले जाते. कॉग्रेस समोर असलेली राजकीय आव्हाने व त्याच्यावरचे उपाय शोधण्यासाठी असलेल्या अभ्यासगटात, त्यांचे स्थान प्रमुख आहे. सहाजिकच अशा माणसाला पक्षासमोर असलेले सर्वात भीषण आव्हान सर्वात आधी उमगणार हे वेगळे सांगायला नको. मोदींच्या बाबतीत बाकीचे कॉग्रेस नेते नाके मुरडत असताना, रमेश यांनी मात्र अकस्मात २०१३ च्या मध्यास मोदी हे कॉग्रेस समोरचे स्वातंत्र्योत्तर काळातले सर्वात मोठे आव्हान असल्याची कबुली देऊन टाकली. त्यामुळे पक्षातच इतके वादळ उठले. ते रमेश यांचे व्यक्तीगत मत असल्याचे अधिकृत प्रवक्त्याला जाहिरपणे सांगावे लागले. दुसरे एक ज्येष्ठ कॉग्रेसनेते सत्यव्रत चतुर्वेदी तर कमालीचे संतापले आणि त्यांनी रमेश यांना मोदींचे नेतृत्व इतकेच आवडत असेल, तर त्यांनी भाजपात निघून जावे; इथपर्यंत टोकाची टिका केलेली होती. रमेश यांनी खरे तर मोदींचे अजिबात कौतुक केलेले नव्हते. उलट विषारी भाषेत टिका करताना मोदी हे भस्मासूर असल्याचीही मल्लीनाथी केलेली होती. मग अवघा कॉग्रेस पक्ष विचलीत होण्याचे कारण काय असावे? तर रमेश यांनी मोदी हे पक्षासमोरचे आजपर्यंतचे सर्वात मोठे व खरे आव्हान असल्याची कबुली दिलेली होती. ती कबुली त्यांचे खरेच व्यक्तीगत मत असते, तर त्यावर इतके काहूर माजले नसते. प्रवक्त्याने झटकून टाकण्यावर विषय संपवला गेला असता. पण ते रमेश यांचे व्यक्तीगत मत नव्हते. तर कॉग्रेसच्या धोरणात्मक बैठकीत झालेल्या चर्चेचा सूर त्यातून अनवधानाने बाहेर आला. त्यासाठी तमाम पक्षनेते संतापले होते. जे पक्षाने व्यवहारी सत्य म्हणून स्विकारले आहे, त्याची जाहिर वाच्यता केल्याने बाकीचे नेते चिडले होते. शिवाय रमेश हा नेता असे म्हणतो, म्हणजे भाजपालाही मोदी हेच आव्हान असल्याचा संकेत कॉग्रेसने द्यावा, असा त्याचा अर्थ झाला होता. म्हणूनच रमेश यांच्या विधानावर इतका कल्लोळ कॉग्रेसमध्ये झाला. अर्थात रमेश यांची गळचेपी केल्याने व्हायचे परिणाम बदलता आलेले नाहीत. अवघ्या सहा महिन्यातच त्याची प्रचिती चार विधानसभा निकालातून समोर आलेली आहे. चार राज्यात कॉग्रेसचा पुरता सफ़ाया झाला आणि भाजपाला सगळीकडे निर्णायक यश मिळालेले आहे. या सर्वच निवडणूकीत मोदींनी आघाडीवर राहुन पक्षाचा प्रचार केला आणि अनेक राज्यात त्यांनी घेतलेल्या सभांना अफ़ाट प्रतिसाद जनतेकडून मिळतो आहे. सहाजिकच आगामी राजकारणात कॉग्रेस समोरचे मोदी हेच ऐतिहासिक आव्हान असल्याची साक्ष घटनाक्रमच देतो आहे.

   यातला निकाल बाजूला ठेवून रमेश यांनी मोदींविषयी असे भाकित कशाला करावे, त्याची मिमांसा मोठी उदबोधक ठरावी. रमेश हे इंदिरा गांधीच्या काळात कॉग्रेसमध्ये आलेले आणि राजीव गांधींच्या काळात पक्षाच्या कामात सहभागी झालेले बुद्धीमान नेते आहेत. त्यांनी इंदिराजी व राजीव गांधींनी प्रचंड जागा जिंकताना व लाटेवर स्वार होऊन सत्ता संपादन करताना जवळून अनुभवले आहे. त्यामुळेच लाटेवर स्वार होणारा किंवा लाट उभी करणारा नेता जवळून बघितला आहे. लाटेचे राजकारण कसे हेलकावे घेते आणि लाटेवर स्वार होणारा नेता कसा असावा लागतो; त्याचाही अभ्यास रमेश यांनी केलेला आहे. मोदी जर त्याच चौकटीत वा साच्यात बसत असतील, तर दुबळ्या विस्कळीत कॉग्रेसचा ते धुव्वा उडवणार; हे बघायची डोळस नजर रमेश यांच्याकडेच असू शकते. म्हणूनच त्यांनी मोदींना भस्मासूर म्हणावे किंवा बकासूर म्हणावे. त्यापेक्षा त्यांनी कॉग्रेस समोरचे स्वातंत्र्योत्तर काळातले सर्वात मोठे आव्हान संबोधणे, खुप महत्वाचे व सूचक आहे. एका राज्याचा वादग्रस्त मुख्यमंत्री यापेक्षा नरेंद्र मोदी यांची देशातील राजकारणाची अन्य़ कुठली कारकिर्द नाही. दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात वा सत्तेच्या आखाड्यात मोदी यापुर्वी कधीच नव्हते. पक्षानेही त्यांना तशी कधी संधी दिलेली नाही. मग सहा महिन्यापुर्वी जुन २०१३ मध्ये रमेश यांनी मोदींबद्दल असे भाकित कशाला करावे? कॉग्रेस सारख्या बलाढ्य देशव्यापी व शतायुषी पक्षाला भाजपाच्या जुन्याजाणत्या अनुभवी नेत्यांचे असे भय कधी वाटले नाही. वाजपेयी यांच्यासारखा लोकप्रिय नेताही आव्हान वाटला नाही. मग मोदींचे भय कशाला? भय मोदी या व्यक्तीविषयी असावे, की त्याच्या लोकप्रियतेची भिती? भाजपातील कार्यकर्त्याला उत्साहीत करण्याच्या मोदींच्या क्षमतेला रमेश घाबरले, की जनमानसात जाणवणार्‍या मोदीविषयक आकर्षणाने रमेश यांची झोप उडवली असेल? यातले शेवटचे कारण खरे आहे. व्यक्तीकेंद्री राजकारण झाल्यावर पक्षाच्या संघटनात्मक व प्रभावक्षेत्राच्याही पलिकडे जाऊन यश मिळते; हा निवडणूकांचा इतिहास आहे. मोदींच्या लोकप्रियतेमध्ये त्याचेच संकेत पाहुन रमेश यांना भिती वाटलेली आहे. इंदिराजींच्या व्यक्तीमत्वाने जसे भारतीय राजकारण मंतरले होते, त्याची चाहुल मोदींच्या आगमनाने लागलेली आहे. चाणाक्ष राजकीय अभ्यासकाला व डोळसपणे राजकारणाचे आकलन करणार्‍यांनाच त्याच्या सुगावा लागू शकतो. रमेश तशा मोजक्या नेत्यांपैकी व अभ्यासकांपैकी आहेत. म्हणुनच त्यांनी मोदीविषयक केलेल्या विधानाला महत्व आहे. म्हणूनच कॉग्रेसमध्ये त्यांच्या त्या जाहिर विधानाबद्दल कमालीच्या नाराजीचा सूर उमटला. (अपुर्ण) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा