बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

भूमिकेतला अभिनय आणि अभिनिवेश


   मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी एनडीटीव्ही या इंग्रजी वाहिनीवर बक स्टॉ्प्स हिअर या चर्चेत बरखा दत्त हिने दोन मुस्लिम नेत्यांना आमंत्रित केलेले होते. त्यातले एक होते गुजरातचे मोदी समर्थक जाफ़रभाई सारेशवाला आणि दुसरे कोणी दिल्लीतले मुस्लिम नेता होते. त्यांनी नेहमीप्रमाणे गुजरातच्या दंगलीत ग्रासलेले मुस्लिम अजून निर्वासित छावण्यात खितपत पडलेत, मग मोदींच्या विकासाच्या गप्पा कशाला; असा सवाल केला. जाफ़रभाईंनी त्यांना तिथल्या तिथे आव्हान दिले. दिल्लीत बसून वाटेल त्या अफ़वा पसरवू नका. जरा गुजरातला या आणि वास्तव आपल्या डोळ्यांनी बघा, असे बजावले. गुजरात वा अहमदाबादेत कुठे अशी एक तरी दंगलग्रस्त छावणी आहे ते दाखवा; हे आव्हान तो मुस्लिम नेता स्विकारू शकला नाही. पण मुद्दा तो नाहीच. चर्चेचे आयोजन करणारी बरखा स्वत: पत्रकार आहे आणि तिला अशा छावण्या नाहीत हे ठाऊक असायला हवे. निदान ठाऊक नसेल तर तिने तात्काळ तोच प्रश्न पकडून त्या मुस्लिम नेत्याला फ़ैलावर घ्यायला हवे होते. पण तसे घडले नाही. घडत सुद्धा नाही. जेव्हा असे खोटेपण उघड होते, तेव्हा सेक्युलर मुखवटा लावलेले पत्रकार लगेच सारवासारव करतात आणि त्या खोटेपणावर पांघरूण घालू बघतात. त्यासाठी केविलवाणी बौद्धिक कसरत करतात. ती बाब लोकांच्या लक्षात आलेली आहे. बुद्धीमान असून बरखा असे का वागते? सेक्युलर असे का वागतात? त्यालाच भूमिका घेणे म्हणतात. भूमिका म्हणजे तरी काय असते? भूमिका घेतली, घ्यायला हवी, असा शब्दप्रयोग काय सुचवतो? या भूमिका म्हणजे अमिताभ बच्चन वा शाहरुख खान यांच्या अभिनयासारखा मामला आहे काय? सेक्युलर वा हिंदूत्ववादी, पुरोगामी प्रतिगामी भूमिका म्हणजे निव्वळ अभिनय असतो काय? काही काळासाठी तसा अभिनय करणे म्हणजे भूमिका घेणे असते काय? 

   आपल्या वेगवेगळ्या भूमिका पार पाडताना अभिनेता वा अभिनेत्री, जसे त्या पात्रा व्यक्तीमत्वाशी तर्कसुसंगत वागतात आणि त्यांच्या प्रत्यक्ष जीवनाशी त्या तर्कशास्त्राचा काहीही संबंध नसतो, तसाच काहीसा हा ‘भूमिका घेण्याचा’ प्रकार आहे काय? ज्याचा वास्तव जीवनाशी वा वर्तनाशी, सत्याशी काडीमात्र संबंध नसावा? एकदा ‘ती भूमिका’ घेतली मग माणूस ‘तसा’ वागत जातो आणि तसे करताना त्याला वास्तविकतेची जोडलेले प्रश्न विचारायचे नसतात. कुठल्या चित्रपटात अमिताभने केलेल्या भूमिकेत तो जसा वागला किंवा त्याने जे केले; त्याचा वास्तवाशी किती संबंध आहे, असे त्याला विचारण्याची सोय नसते, तसाच हा प्रकार असावा. सामाजिक वा सार्वजनिक जीवनात वागणार्‍या अनेकांची अशीच स्थिती आपल्या अनुभवास येत असते. अन्य बाबतीत अत्यंत तर्कसंगत व योग्य वर्तन असलेली ही माणसे; ‘तशा’ भूमिकेचा प्रसंग आला, मग वास्तवाशी तर्कविसंगत वागताना दिसतात. आणि हे ठराविक लोकांचेच होते असेही मानायचे कारण नाही. कुठल्याही ‘भूमिकेत’ जाणार्‍याची तीच स्थिती असते. इथे कालच्या चर्चेत बरखा सेक्युलर ‘भूमिकेत’ होती सहाजिकच तिला दिल्लीच्या त्या मुस्लिम नेत्याच्या थापा व अफ़वाबद्दल जाब विचारण्याची गरज वाटली नाही. कारण ज्या भूमिकेत ती होती, त्या भूमिकेत तिला तसेच बोललेले ऐकायचे व आपल्या श्रोत्यांना ऐकवायचे होते. सहाजिकच खरेखोटे दुय्यम होऊन जाते. सार्वजनिक जीवनात वावरणार्‍या व त्यात ठराविक भूमिका घेणार्‍यांची तशीच स्थिती असते. त्यांना ‘भूमिकेत’ गेल्यावर तारतम्य बाळगण्याचे स्वातंत्र्य शिल्लक उरत नाही. तर त्या ‘भूमिकेशी’ जुळणारे खोटेही चालू शकते, त्याचे समर्थन करावे लागते. त्यासाठी कुठला सज्जड पुरावा किंवा तपशील आवश्यक वाटत नाही. 

   आधीच्या माझ्या लेखात मी धोंडोपंत यांच्या एका वाक्याची मिमांसा केलेली आहे. तिथे त्यांची पाकिस्तान विषयीची भूमिका ठरलेली आहे. कुठल्याही रितीने वा पद्धतीने पाकिस्तानचा पराभव बघितलेला त्यांना आवडतो. ही त्यांची ठाशीव भूमिका आहे. नेमकी अशीच स्थिती सेक्युलर वा पुरोगाम्यांची असते. त्यांच्या मनात मोदी वा संघ परिवार, हिंदुत्ववादी मंडळीविषयी एक ठाम भूमिका आहे. एकदा ती भूमिका स्विकारली, अंगीकारली; मग त्याबाबतीतले तारतम्य बाळगण्याचे सोयरसुतक उरत नाही. त्याचे प्रतिक असलेल्या कुठल्याही गोष्टी नामशेष झालेल्या वा पराभूत होताना बघण्यात त्यांच्या मनाला खुप आनंद होत असतो. त्यात त्यांचा कुठला वैयक्तीक नफ़ातोटा असतोच असेही नाही. उदाहरणार्थ गुजरातच्या दंगली व देशात आजवर झालेल्या दंगलीचे घेऊ. त्यात तसा फ़ारसा फ़रक नाही. पण गुजरातमधली कुठलीही गडबड गोंधळ घ्या, ताबडतोब मोदी त्याला जबाबदार असतात. पण अन्य राज्यातील तशाच प्रकारची घटना असली, मग मात्र त्यातला राज्यकर्ता दोषी धरायची त्यांची तयारी नसते. पंतप्रधान कार्यालयातून कोळसा खाणीच्या फ़ायली गायब झाल्या वा तिथेच अनेक घोटाळ्यांचे धागेदोरे जाऊन पोहोचतात. त्यांच्या अनेक मंत्र्यांवर थेट कोर्टाकडून ठपका आलेला आहे. पण त्याचा मनमोहन सिंग यांच्याशी काडीमात्र संबंध नाही; असे सांगायला हेच सेक्युलर पत्रकार हिरीरीने पुढे येतात. पण गुजरातमध्ये कुपोषण असो, पोलिस चकमक असो, दंगल असो, सामान्य पोलिस शिपायाने केलेले पाप असो. त्याचा थेट मुख्यमंत्र्याशी संबंध जोडायला ही मंडळी केविलवाणी बौद्धिक कसरत करताना दिसतील. त्याला भूमिकाच जबाबदार असते. तसे वागण्याचा त्यांच्या बुद्धीशी संबंध नसतो, तर त्यांच्या भूमिकेशी तसे वागणे निगडीत असते. उमा भारती वा काही लोकांनी आसाराम बापू यांच्या समर्थनाला जाण्याचा मुर्खपणा तशाच भूमिकेतून केलेला आहे. हा सगळा भूमिका घेण्याचा परिणाम असतो. एकदा भूमिका घेतली, मग आपल्या बुद्धीला तिलांजली देऊन भरकटणे भागच असते. भूमिका व अंधानुकरण यात काहीच फ़रक नसतो. 

   आपण अत्यंत शास्त्रशुद्ध तार्किक राजकीय विचार करून भूमिका घेतो, असे सतत अभिमानाने सांगणार्‍या कम्युनिस्टांची अशीच शोकांतिका आहे. कोणातरी एका विचारवंत पत्रकाराने कम्युनिस्टांबद्दल पुर्वी केलेले एक विधान आठवते. त्यांच्या डाव्यानिष्ठा इतक्या सोवियत युनियनशी जोडलेल्या होत्या, की मास्कोत मुसळधार पाऊस पडत असेल आणि दिल्लीत झक्क ऊन पडलेले असेल; तरी कम्युनिस्ट डोक्यावर छत्री घेऊनच चालेल. याला भूमिका घेणे म्हणतात. जिथे वास्तवाशी बुद्धीला झगडावे लागते. बुद्धीला पटत नसले तरी भूमिका म्हणून चुकीचे समर्थन करावे लागते. जसे आज आसारामचे भक्त त्याच्या पापकर्माचेही समर्थन करतात, तसेच काही हिंदूत्ववादीही त्यात गुंतलेले दिसतील. तितक्याच उत्साहात दिल्लीतल्या शीख कत्तलीला पाठीशी घालून गुजरातच्या दंगलीचे अवडंबर माजवताना कडवे सेक्युलर सुद्धा दिसतील. दोन्हीकडे ठरलेल्या भूमिकेमुळे येणारी अगतिकता साफ़ दिसू शकते. याचीच दुसरी बाजूही आहे. जेव्हा कोणी एक भूमिका घेऊन उभा ठाकतो, तेव्हा त्याच्या विरोधात असलेला दुसर्‍या टोकाला जाऊन संबंध नसताना विरुद्ध मुर्खपणाचेही समर्थन करताना दिसेल. जयललितांनी वाजपेयी सरकारचा पाठींबा काढून घेताच करूणानिधी एनडीएमध्ये सहभागी झालेले होतेच ना? अणूकरार विषयावरून डाव्यांनी युपीए सरकारचा पाठींबा काढून घेताच, ममता त्याच्या समर्थनाला पुढे सरसावल्याच की नाही? अशा दोन परस्पर विरोधी गोटात वाटल्या गेलेल्यांना आपली अशी कुठली ठाम भूमिका नसतेच. अन्य कुणाचे कडवे विरोधक वा शत्रू म्हणुन त्यांच्या भूमिका प्रसंगानुसार बदलत असतात. आणि त्याबद्दल त्यांना छेडायला गेलात, तर त्याचेही लंगडे बौद्धिक समर्थन मोठ्या हिरीरीने ही मंडळी करताना दिसतील. दोष त्यांचा नसतो किंवा त्यांच्या वास्तविक विचारांचाही नसतो. तर त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना स्वतंत्रपणे आपली बुद्धी वापरता येत नसते. कॉम्प्युटरच्या भाषेत ज्याला डिसेबल करणे म्हणतात, तशी भूमिका घेतल्यावर विचारशक्ती ठराविक बाबतीत आपोआप डिसेबल होत असते. 

   समोर घडणार्‍या घटना कुठल्याही असोत, कशाही असोत; त्यात आपल्या भूमिकेला साजेसे जेवढे असेल, तेवढेच उचलून त्यावर आपली प्रतिक्रिया उमटत असते. आपला प्रतिसाद वास्तवाला सोडून असू शकतो. म्हणूनच गुजरातची दंगल म्हटले, की तावातावाने बोलणारे त्या दहा वर्षापुर्वीच्या घटनेबद्दल जितके संवेदनाशील होतात, तितके वर्षभरापुर्वीच्या आसामच्या हिंसाचाराबाबतीत एकदम सौजन्यशील होऊन जातात. भूमिका हा एकप्रकारे अभिनय वा अभिनिवेशच असतो. तसे त्या त्या व्यक्तीचे मत असतेच असेही नाही. एका विशिष्ठ विषयात भूमिका स्विकारली; मग त्याला तिच्यामागून फ़रफ़टत जावे लागत असते आणि त्यासाठी आपल्याच बुद्धी व विवेकाला गुंडाळून ठेवावे लागत असते. जसजशी त्याची सवय अंगवळणी पडते, तसा मग प्रतिसाद व प्रतिक्रिया आपोआप दिल्या जातात. त्या उत्स्फ़ुर्तही वाटतात. गुजरात बाहेरचे मोदी विरोधक व मोदी समर्थक अशाच गटात विभागले गेलेले आहेत. त्यांचे आपापले हेवेदावे आहेत वा असतात आणि त्यासाठी निमित्त म्हणून मग मोदी वा गुजरातच्या दंगलीचे विषय वापरले जात असतात. तसे वागणे ही त्या ‘भूमिके"ची मागणी असते. काही अभिनेत्री मोठा आव आणून भूमिकेची आवश्यकता असेल तर आपणही ‘देहप्रदर्शन’ करू असे सांगतात, त्यापेक्षा सार्वजनिक क्षेत्रातील भूमिका व तिच्या आवश्यकता भिन्न नसतात. त्याला आपापले पुर्वग्रह व समजुतीही तितक्याच जबाबदार असतात. एकदा त्या भूमिका निश्चित झाल्या, मग त्यावर तत्वांची वस्त्रेप्रावरणे चढवली जातात. बाकी दोन्हीकडल्या प्रतिक्रिया सारख्याच असतात. तिथे तर्कशास्त्र वा विवेकबुद्धीला स्थान नसते. त्यामुळेच घटना एकच असते, प्रसंग एकच असतो; पण अशा भूमिकेतल्या लोकांच्या प्रतिक्रिया नित्यनेमाने परस्पर विरोधी टोकांना झोकांड्या खाताना आपण पाहू व अनुभवू शकत असतो. 


३ टिप्पण्या:

  1. एकदा आपण भूमिका घेतली की काही लोक गुजरात दंगलीचे अवडंबर करतात तर त्यानंतर त्या विरूंध्द भूमिका घेणारे नाटकी पूरोगामीच ठरतात. हे असे का बरे होत गेले. आपल्या मुंबईला 92-93 मध्ये झालेल्या दंगलीनंतर सुधाकरराव नाईक याना पाय उतार व्हावे लागले. ते गैर होते का? समाज जिवनात मला जे बरोबर वाटते तिच भूमिका घेतली तर ठीक नाही तर तुम्ही देशद्रोही. कांग्रेसचे पाठीराखे असे लेबल द्यायचे अन् आपल्या agenda प्रमाणे काम करायचे. सर्व सामान्यानां राजकरणाच्या घाण्यातुन पिचून काढत आहेत. बाकी काही नाही.

    उत्तर द्याहटवा
  2. भाऊ तुमच्या सडेतोड पानामुळेच कदाचित तुम्हाला हे टी वी वाले चर्चेला कमी बोलावतात, पण त्या भंकस टी वी चर्चे पेक्षा तुमचे लिखाण १०० पटीने सरस

    उत्तर द्याहटवा
  3. मेरी चेतावनी सही साबित होती नज़र आ रही है --
    कांग्रेस का षड़यंत्र हो सकता है -
    फाइलों का लटकना छोटी बात नही है --
    मोदी सरकार बनने के बाद मैंने एक लेख में चेतावनी
    दी थी कि कांग्रेस ने दशकों तक सत्ता में रहते हुए
    कार्यपालिका (Bureaucracy) में मजबूत जड़ें बना
    ली हैं और वो कार्यपालिका में बैठे अपने लोगों के
    जरिये मोदी सरकार को पंगु करने की कोशिश कर
    सकती है --
    और ऐसा लगता है ये हो रहा है --क्यूंकि पिछले सप्ताह
    ये खबर आई थी कि विदेशी सरकारों और अन्य संस्थाओं
    के साथ समझौतों की फाइलें मंत्रालयों में लटकने से
    प्रधान मंत्री नरेंद्र मोदी नाराज़ हैं -और उन्होंने एक माह
    के भीतर समझौता पत्रों को मंजूरी के लिए मंत्रिमंडल
    के पास भेजने को कहा है --अभी देखा जा रहा है कि
    समझौते पर दस्तखत होने के काफी समय बाद उसे
    मंत्रिमंडल के सामने लाया जा रहा है --
    संसद में सरकार को पंगु करने के बाद अब ये फाइलों
    की लेटलतीफी सामने आना किसी षड्यंत्र की आशंका
    को जन्म देता है --खासतौर पर जब कांग्रेस मोदी की
    विदेश यात्राओं से और वहां होने वाले समझौतों से जले
    भुने रहते है --इसका इलाज़ उनके पास कार्यपालिका
    के जरिये टांग अडाना है --
    ऐसा कोई षड़यंत्र है तो उसका पता लगाया जाना चाहिए
    और ये पता लगाया जा सकता है --वैसे 2 उच्च स्तर के
    सचिवों का रिटायरमेंट ले लेना इंगित करता है कि सरकार
    इस विषय में कार्यरत है --
    कांग्रेस का लक्ष्य किसी तरह भी और किसी से भी मिल
    कर सरकार को रोकना है - इसी सन्दर्भ में अभी 2 दिन
    पहले वामपंथियों के साथ मिलकर उनकी श्रमिक
    संगठनो के साथ मिल कर देश व्यापी हड़ताल की ताकि
    देश की अर्थव्यवस्था को चोट पहुंचाई जा सके --जो बड़ी
    मुश्किल से कुछ हद तक पटरी पर आती नज़र आ रही
    है --
    अतः मोदी सरकार को इन बिन्दुओं पर ध्यान कर सतर्क
    रहना होगा -
    (सुभाष चन्द्र)
    04/09/2015

    उत्तर द्याहटवा