गुरुवार, १७ जानेवारी, २०१३

माध्यमांच्या नैतिकतेचा फ़ाटत चाललेला बुरखा


   अण्णा हजारे असोत की शिवसेना असो, अन्य कुठली चळवळ असो, त्यांच्या काही ठराविक भूमिका असतात. तुम्हाला त्या मान्य करण्याची सक्ती नसते. ज्यांना मान्य असतील ते त्यांच्यासोबत जातील व ज्यांना पटणारे नसेल त्यांना त्याकडे पाठ फ़िरवण्याची मोकळीक असते. अगदी त्याच्या विरोधात आपले मत मांडण्याची व त्या मताशी सहमत असणार्‍यांना संघटित करण्याचाही अधिकार घटनेने दिलेला आहे. त्यालाच विचार स्वातंत्र्य म्हणतात. त्यालाच आविष्कार, संघटना वगैरे नागरी स्वातंत्र्ये म्हणतात. पण विरोध व मतभेद म्हणजे दुसर्‍याचा विचार वा भूमिका नष्ट करण्यासाठी त्याची गळचेपी करायचा अधिकार मात्र कोणी कोणाला दिलेला नाही. आता गळचेपी कशाला म्हणायचे ते प्रत्येकाने आपापल्या व्याख्या करून चालणार नाही, त्याची सर्वमान्य अशी व्याख्या असली पाहिजे. म्हणजे असे, की वृत्तपत्रात वा माध्यमात एखाद्या अशा संघटना व राजकीय व्यक्तीच्या विरोधात तुम्ही आरोप केले, तर त्याची बाजू मांडण्याची तेवढीच संधी त्यालाही मिळाली पाहिजे आणि मूळ आरोप तुम्ही केलेला आहे, त्यामुळे ती संधी तुम्हीच दिली पाहिजे. म्हणजे असे, की मी इथे ‘पुण्यनगरी’मध्ये ज्यांच्याविषयी लिहितो वा आरोप करतो, तेव्हा एखाद्या वाचक समुहासमोर माझे लिखाण जात असते. मग माझा लेख वाचून त्यांचे मत बनत असते. पण त्याचा अर्थ असा असतो, की माझे लिखाण ज्याला मनापासुन आवडते, असे वाचक मग माझे आरोप व आक्षेप मान्य करून बसतात व त्यानुसार ती संघटना व व्यक्तीकडे बघू लागतात. मग माझ्या लिहिण्यात असत्य वा खोटेपणा असेल, तर व्यवहारात मी त्या वाचकाचे त्या संघटना किंवा व्यक्तीची प्रतिमा त्या वाचकाच्या मनात मलीन करीत असतो. असा कोणताही अधिकार मला कायद्याने वा घटनेने दिलेला नाही. म्हणून मला व प्रत्येक भारतीयाला जो अविष्कार स्वातंत्र्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे, तो सत्य कथनासाठी व सत्य सिद्धतेसाठी वापरला जाईल असेच त्यात गृहीत आहे. पण तसे होत नसेल तर मग तो त्या अधिकार व कायद्याचा गैरवापर असतो.

   असे समजा, की वारंवार मी कायबीइन लोकमत, निखिल वागळे, कुमार केतकर, राजदीप सरदेसाई अशा अनेक पत्रकार वा अन्य नेते, पक्ष यांचा उल्लेख करतो, त्यांच्यावर आरोप करतो, आक्षेप घेतो, तेव्हा त्याची दुसरी बाजू कोणी समोर आणली; तर मी लपवून वा दडपून ठेवता कामा नये. माझा जो वाचक आहे, त्याच्यासमोर ती बाजू सुद्धा सादर केली पाहिजे. ती बाजू वा दावे मी मान्य करण्याचे कारण नाही. पण वाचकांपासून लपवायचा मला अधिकार नाही. अर्थात त्या खुलासा वा प्रतिसादामध्येही मला खोटेपणा व चुक दिसली, तर त्याचा समाचार मी जरूर घेऊ शकतो. पण सहसा असे झालेले नाही. मग जे आरोप मी करतो, त्याला उत्तर दिले जात नाही; याचा अर्थ ते आरोप ज्यांच्यावर आहेत, त्यांना ते मान्यच आहेत असाही होतो. म्हणजे त्यामुळे माझ्या व ‘पुण्यनगरी’च्या वाचकांची मी दिशाभूल केली असा आक्षेप माझ्यावर घेता येणार नाही. आणि माध्यमांनी तेच करायला हवे. ज्यांच्यावर आरोप करता, त्या व्यक्ती वा संघटनेला खुलासा तेवढाच स्पष्ट व ठळकपणे दिला गेला पाहिजे. दोनतीन महिन्यांपुर्वी मी मुस्लिम समाजाच्या वर्तनासंबंधी पन्नासहू्न अधिक लेख लिहिले होते, त्याचा प्रतिवाद नौशाद उस्मान व अन्य एकदोघांनी केला होता. मी शक्य तेवढे त्यांचे मत शब्दश: माझ्याच सदरातून प्रकाशित केले होते. मग त्यांवर प्रतिवादही केला होता. पण त्यांचे मत दडपले वा लपवून ठेवले नाही. पण दुर्दैव असे आहे, की आजकाल बहुतांश वृत्तपत्रे बेछुट आरोप करतात व मतप्रदर्शन वा अविष्कार स्वातंत्र्याचा जो अधिकार मिळाला आहे, त्याचा गैरवापर करून लोकांच्या प्रतिष्ठेशी खेळत असतात. जेव्हा असा खेळ होतो, तेव्हा त्यातल्या व्यक्तीला होणारी इजा कशी भरून काढायची? म्हणजे एका बातमीत प्रतिष्ठीत व्यक्तीवर बलात्कार वा विनयभंगाचा आरोप छापला जातो. त्यासाठी त्याच्या विरोधात नोंदल्या गेलेल्या तक्रारीचा आधार घेतलेला असतो. पण तो नुसताच आरोप असतो, सिद्ध झालेला गुन्हा नसतो. पुढे त्याबद्दल तपास होऊन गुन्हा फ़ेटाळला गेला व आरोपी कोर्टात निर्दोष सुटला, तर त्याची कुठेच बातमी येत नाही. म्हणजे नुसत्या आरोपाच्या तक्रारीचा आधार घेऊन प्रसिद्ध झालेल्या त्या बातमीने उडवलेले शिंतोडे; त्या व्यक्तीच्या आयुष्यावर कायमचे चिकटून बसतात. कधीच धुतले जात नाहीत. हा त्या व्यक्तीच्या जिवाशीच खेळ होत नाही काय? मोठी व प्रतिष्ठीत माणसे खुप खपून, राबून आपली प्रतिष्ठा संपादन करीत असतात. पंधरा वीस वर्षात मिळवलेली अब्रू मग अशी एक बातमीमुळे क्षणात धुळीस मिळवली जाते. त्याची भारपाई कोणी कशी करायची?

   पुर्वी अमेरिकेतील हाणामारीचे काऊबॉय वेस्टर्न चित्रपट नियमित यायचे. त्यात एखादा मुजोर पोलिस वा लष्करी अधिकारी दाखवलेला असायचा. तो केवळ बंदूकीच्या नेमबाजीसाठी स्थानिक आदिवासींना पळायला लावून ठार मारायचा, जखमी करायचा, असे दाखवलेले असायचे. त्याच्यासाठी नेमबाजीचा खेळ असे. पण जाणार्‍याचा हकनाक जीवच जात असे. आज माध्यमातून त्यापेक्षा काही वेगळे चालले आहे काय? अनेक व्यासपिठावर ज्या एकतर्फ़ी बदनामीच्या मोहिमा चालवल्या जातात, त्याचा दुसरा अर्थ लावता येईल काय? जाणीवपुर्वक खोटे बोलायचे व लिहायचे आणि जाब विचारला; मग राज्यघटनेने अविष्कार स्वातंत्र्य दिलेले आहे, असा दावा करायचा. ही म्हणूनच फ़सवणूक आहे. पोलिसाच्या हाती पिस्तूल वा बंदुक कायद्यानेच सोपवलेली असते. पण म्हणून त्याने कोणावरही अकारण बंदूक रोखणे वा त्याला जखमी करणे वा त्याचा जीव घेण्याची परवानगी कायदा देत नसतो. अशा हत्या वा गोळीबाराला कायदा मान्यता देत नाही. त्याला अतिरेक म्हणून निलंबन केले जाते व चौकशी करून योग्य ती शिक्षा ठोठावली जाते. मग त्याच कायद्याच्या नैतिकतेमधून अन्य कोणी पत्रकार आहे म्हणून सुटू शकतो काय? असे म्हणायचा अवकाश, की लगेच ‘ज्याची तक्रार आहे, त्याने कोर्टात जाऊन दाद मागावी’ असाही साळसूद दावा केला जातो. ऐकायला तो खुप बरा व प्रामाणिक वाटतो. पण त्यातली हिडीस फ़सवणूक लक्षात येत नाही. ही भाषा नितीमत्तेच्या गप्पा मारणार्‍या पत्रकाराची आहे, की संघटीत गुन्हेगारी करणार्‍या माफ़ियाची आहे? कारण गुन्हेगार तरी तुम्हाला पोलिसात व कोर्टात जायची बंदी कुठे घालतात? गेलात तर पोलिस व कायदा काही करू शकत नाही, याची पिडीताला खात्री असते. म्हणून तोच बिचारा निमूटपणे गुन्हेगाराला शरण जात असतो. मग यातल्या एकाला गुंड म्हणायचे आणि दुसर्‍या नितीमान कसा म्हणायचे? दोघांचे वर्तन व परिणाम सारखेच असतील, तर दोघे एकाच माळेचे मणी नाहीत काय?

   मुद्दा इतकाच, की बातमी देणार्‍याने वा काही मजकूर छापणार्‍याने दुसरी बाजूही आपल्या वाचकांसमोर मांडलीच पाहिजे. त्याने नाही तर अन्य पत्रकार किंवा वृत्तपत्राने त्या व्यक्तीची बाजू समोर आणायला हातभार लावला पाहिजे. एखाद्या पोलिसावर खोट्या चकमकीचा वा अन्य कुठला आरोप असेल तर पोलिस खाते त्याच्या समर्थनाला उभे रहात नाही. उलट त्याच खात्यातले दुसरे कर्मचारी वा अधिकारी आरोपी असलेल्या पोलिसाला अटक करून तपास घेतात व पुरावे शोधून खटले भारतात. आपल्याकडे माध्यमांच्या गुन्हेगारीवर असा नैतिक वचक कोणाचा आहे काय? उलट जो खोटेपणा करतो, त्याचा खोटेपणा उघडकीस आणुनही तो दाद देत नाही आणि कोर्टात जाण्याचे प्रतिआव्हान देतो, त्याचा अर्थ इतकाच, की त्याचा खोटारडेपणा सिद्ध करण्यासाठी पिडिताने आपले काम व धंदे सोडून कोर्टकचेर्‍या करीत बसायचे. म्हणजे भुर्दंड पिडितालाच. हा सुसंस्कृतपणा नाहीच तर निव्वळ बदमाशी आहे. तुम्हाला जर समोरच्या व्यक्तीचे दोष दाखवायचे आहेत, तर त्याचा खुलासाही तितकाच ठळक छापा आणि पुन्हा त्याचे वाभाडे काढा. खोटाच असेल तर त्याच्याकडे बचाव नसतो, म्हणूनच त्याने दिलेल्या खुलाशातही अनेक चुका व दोष सापडतीलच. पण आपण आधी लिहिणारे वा छापणारे खोटे असू, तर त्याच्या खुलाशात आपण उघडे पडायचा धोका असतो. आणि म्हणूनच बहुतांश वृत्तपत्रे व पत्रकार खुलासे वा दुसरी बाजू प्रसिद्ध करायचे टाळतात. कारण त्यांना स्वत:चा खोटेपणा लपवायचा असतो. मग हे अविष्कार स्वातंत्र्य गुन्हेगारीसाठी वापरणे होत नाही काय? त्यामुळेच पत्रकारांवरचे हल्ले दिवसेदिवस वाढले आहेत व वाढतच जाणार आहेत. पत्रकार व माध्यमांनी वेळीच शहाणे होऊन मार्ग शोधणे म्हणूनच आवश्यक आहे. कारण त्यांच्या नैतिकतेचा बुरखा फ़ाटत चालला आहे.    ( क्रमश:)
भाग   ( ५९)    १८/१/१३

बुधवार, १६ जानेवारी, २०१३

हनुमंत आणि बुद्धीमंत यांच्यात फ़रक किती?


    असे म्हणतात, की एकदा हनुमंत म्हणजे रामभक्त मारुतीच्या हाती मोत्यांचा कंठहार लागला होता. त्यातले एक एक मोती अत्यंत मूल्यवान होते. पण त्याला त्यात ‘राम’ सापडला नाही. त्याने एक एक मोती हारातून मोकळा केला व दाताने चावून, तुकडे पाडून आत राम दिसतो का ते तपासले. पण कुठल्याच मोत्यामध्ये त्याला राम आढळला नाही. तेव्हा त्याने ते नासाडी केलेले मोती फ़ेकून दिले. आता जे देवभक्त व श्रद्धाळू आहेत, ते कौतुकाने अशा गोष्टी भक्तीभावाने ऐकत असतात. त्यांना त्यातले तर्कशास्त्र शोधण्याची गरज वाटत नाही. पण ज्यांची बुद्धी मोठी कुशाग्र असते, असे लोक शेवटी हनुमंत म्हणजे काय माकडच ना, असे म्हणून त्या कथेची टवाळी करतात. त्यांना मग आपली बुद्धी किती तर्कशुद्ध व शाबूत आहे; त्याचा मोठाच आनंद मिळत असतो. तेवढेच नाही. अशा बुद्धीमंतांना आपण जे कोणी धर्म देव करणारे आहोत, त्यांची खिल्ली उडवल्याचेही बौद्धिक समाधान आपोआपच मिळत असते. कारण आपण माणूस आहोत आणि आपल्याला विकसित मेंदू मिळालेला आहे; तर त्याचा वापर करण्याऐवजी माकडावर श्रद्धा ठेवणे, त्यांना आपल्या माणूस असण्याचा कमीपणा वाटत असतो. मग अशा देवभक्तांची खिल्ली उडवली तर आपला मेंदू जागच्या आगी शाबूत असल्याचा हवालाही स्वत:च घेता येत असतो. मग त्यांनी का खुश होऊ नये? पण असे जे कोणी महान कुशाग्र बुद्धीमत्तेचे लोक असतात. त्यांची लायकी तरी त्या माकडापेक्षा वेगळी असते का? सामान्य जे भक्त असतात, ते भक्तीभावाने गोष्ट ऐकतात आणि आपल्या नित्यनेमाच्या कामाला लागतात. हनुमंताला देव मानत असले तरी त्याचे अनुकरण त्याचे कोणी भक्त करीत नाहीत. कारण ते अजब काम देवाला शक्य आहे, आपण सामान्य माणसे आहोत, म्हणूनच देवाचे अनुकरण करू नये इतकी व्यवहारी विवेकबुद्धी त्या सामान्य भक्ताकडे असते. मात्र त्याच पुराणकथेची टिंगल उडवणारे असतात, त्यांना त्याच माकडाचे अनुकरण करताना आपली बुद्धी लयास जाते आहे; याचे भान रहात नाही. मग त्यांची अवस्था भक्त, श्रद्धाळू माणसापेक्षाही दयनीय होऊन जाते. कारण हनुमंताला माकड ठरवतांना असे काही बुद्धीमंत स्वत:च त्याच्यासारख्या मर्कटलिला कधी करू लागतात, त्याचे त्यांनाच स्मरण उरत नाही.

   आता या भाकडकथेकडे थोडे बघू. त्यातला तो हनूमंत काय करतो? पक्का रामभक्त असल्याने प्रत्येक गोष्टीत राम असलाच पाहिजे असा त्याचा अट्टाहास असतो. आणि ज्यात राम नाही त्या गोष्टी कितीही मुल्यवान असल्या; तरी तो मोडूनतोडून टाकतो. जी काही गोष्ट असेल त्यात राम असला तरच त्याला काही अर्थ व उपयुक्तता आहे, हेच त्या हनुमंताचे तर्कशास्त्र आहे ना? मग आजच्या विद्वानांचे तर्कशास्त्र तरी कुठे वेगळे आहे? काही हिंदूत्ववादी, काही सेक्युलर, कोणी इस्लामवादी, असे अनेक विचारवंताचे गट व घटक आहेत. त्यांचे आपले आपले तत्वज्ञान आहे आणि जे काही जग आहे व चालले आहे, ते त्याच तत्वज्ञानानुसार चालले पाहिजे असा त्यांचा कायम आग्रह असतो. तसे नसेल तर मग अशी माणसे त्यात अडथळे निर्माण करू आगतात, त्यात व्यत्यय आणतात, मोडतोड सुरू करतात. मग तो कार्यक्रम, ती संस्था, ती संघटना वा योजना; किती का चांगली वा उपयुक्त असेना. त्यात या बुद्धीमंतांना त्यांचा ‘राम’ दिसावा लागतो. नसेल तर त्यांनी त्या मूल्यवान मोत्याचे चावून तुकडे केलेच म्हणून समजा. गेल्या काही वर्षात अखील भारतिय साहित्य संमेलनाचा बोजवारा अत्यंत इमानेइतबारे उडवणारे; कोणी गुंड दंगलबाज आहेत का? त्यात एकाहून एक बुद्धीमान व तर्कशुद्ध युक्तिवाद करणार्‍यांचा भरणा दिसेल. अमूकतमूक नाही, मग साहित्य संमेलन उधळून लावू; अशा धमक्यांनीच सामान्य माणसाला साहित्य संमेलन जवळ आल्याची चाहूल लागत असते. कधी त्यात राजकारणी नकोत असा आग्रह असतो, कधी त्यात अमूकतमुक जातीचे वर्चस्व नको अशी मागणी असते तर कधी आमंत्रण पत्रिकेवर कोणाचे चित्र वा नाव आहे, त्यावरूनही खडाजंगी उडते. एकूण काय, अशा प्रत्येक शहाण्याला त्याचा त्याचा ‘राम’ त्या संमेलनात दिसावा असा आग्रह असतो. अर्थात अशी स्थिती फ़क्त साहित्य संमेलनापुरती मर्यादित नाही. ती कुठल्या सिनेमातल्या गाण्यासाठी, त्यातल्या कुठल्या वाक्यासाठी, प्रसंग वा पात्राच्या रूप वा वस्त्रासाठी असू शकते. कधी कोणाला आपला ‘राम’ त्या समारंभ, आयोजन वा कलाकृतीमध्ये दिसायची उबळ येईल; त्याचा कुठला भरवसा देता येणार नाही, इतके हनुमंती विद्वान आता आपल्या देशात निर्माण झालेले आहेत. मग बिचारा खराखुरा हनुमंत त्यांच्याकडे अचंबित होऊन आपले राम शोधण्याचे कामही विसरून गेला तर नवल कुठले?

  ही गंमत नाही. तुम्ही आज सगळ्या क्षेत्रातल्या विद्वान बुद्धीमंतांकडे बघा. त्यातल्या बहुतेकांना वास्तवाचे वर्तमानाचे भान उरलेले नाही. मग दिल्लीतल्या सामुहिक बलात्काराचा विषय असो, सीमेवरील जवानाचे मुंडके कापुन नेण्याचा गंभीर मामला असो किंवा साहित्य संमेलनाचा सांस्कृतिक विषय असो, त्यात परिस्थितीची गरज विसरून हे लोक भलत्याच दिशेने बकवास करताना दिसतील. देशाला भेडसावणार्‍या अनेक प्रश्नांसाठी लाखो हजारो लोक कामधंदा सोडून रस्त्यावर उतरत आहेत, कारण त्यांच्या जगण्यातली शाश्वती संपली आहे. त्यांचा कायदा व्यवस्था व सुरक्षित जीवनावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे एकूणच देशातील राज्यव्यवस्था व लोकशाही यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पण हे विविध गटात विभागलेले हनुमंती विद्वान; त्यात आपले तत्वज्ञान वा भूमिका शोधत बसलेले दिसतील. बलात्काराचा गंभीर मामला असताना, त्यासाठी रस्त्यावर आलेल्यांमध्ये कुठल्या पक्षाचे वा जातीचे लोक होते? भ्रष्टाचार निर्मूलन वा लोकपाल आंदोलनात कोणत्या संघटनेचा संबंध आहे, यावर तावातावाने बोलले जात होते. मूळ ज्या विषयावरून लोक अस्वस्थ आहेत, त्याची कोणाला फ़िकीरच नाही. साहित्य संमेलन कशासाठी असते; त्याचा थांगपत्ता नाही. आमचा परशूराम हवा किंवा तुमचा परशूराम नको, यावरून हमरातुमरी. पण साहित्य जीवनाला संमृद्ध करणारे उरले आहे, काय त्याची जाणिव कुठेच नाही. मोत्याचा कंठा किंमती असतो आणि शोभा वाढवण्यासाठी असतो, त्यात राम दिसायची गरज नाही, हे माकडाला कळत नसेल, म्हणून त्याची टिंगल करणार्‍यांना; बाकीच्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनांमध्ये आपापले तत्वज्ञान शोधायचा ध्यास काय वेगळा आहे? निदर्शकांमध्ये केजरिवाल वा भाजपाचे लोक आल्याने बलात्काराच्या वेदना, यातना क्षुल्लक होतात काय? अशा आंदोलनात लोकभावना व मागणी काय आहे, त्याकडे बघायचे असते आणि आपल्या तत्वज्ञानाचा शोध घ्यायचा नसतो, याचे भान किती विद्वान दाखवतात?

   संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचे आंदोलन उभारण्याचे प्रयत्न चालू होते; तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबोधनकारांना दिले्ला सल्ला बहूमोलाचा होता. सर्वच पक्षात बेदिली आहे, त्यांच्यातून विस्तव जात नाही. त्यांना खरेच महाराष्ट्र हवा असेल तर सर्वांनी आपापल्या विचार व भूमिकांचे गाठोडे बांधून मराठी राज्य मिळेपर्यंत खुंटीला टांगून ठेवावे; असेच बाबासाहेबांनी सांगितले होते. तसे सर्व कॉग्रेसेतर पक्ष वागले, म्हणूनच तो लढा यशस्वी झाला व संयुक्त महाराष्ट्राचे राज्य पदरात पडू शकले होते. मग तसा सल्ला देणारे व त्यात आपल्या पक्षाला सहभागी व्हायला सांगणारे बाबासाहेब; विचाराला तिलांजली देणारे होते काय? अजिबात नाही. ती वेळ व ती मागणी, पक्षीय व वैचारिक तत्वज्ञानापलिकडची आहे, याचे भान त्यांनाच होते. त्यांच्या सल्ल्याने बाकीचे पक्ष भानावर आले म्हणून महाराष्ट्र मिळू शकला होता. मग तेव्हा एकत्र येण्यासाठी एका पक्षाने दुसर्‍याला त्याचे तत्वज्ञान वा विचारसरणी सोडून द्यायला अटी घातल्या नव्हत्या. किमान समान कार्यक्रमावर विविध पक्षांनी एकत्र येण्याचा तो पहिला प्रयोग होता. म्हणजे बाबासाहेबांनी कोणता सल्ला दिलेला होता? तर प्रत्येक गोष्टीत व घटनेत, परिस्थितीत आपापल्या भूमिका व तत्वज्ञानाचा ‘राम’ शोधणारे हनूमान होऊ नका. जरा भानावर या आणि व्यवहारी माणसे व्हा. आणि तो सल्लाच लाभदायक ठरला होता. त्यांच्यापेक्षा आजचा कुठला संपादक, पत्रकार विश्लेषक, नेता किंवा बुद्धीमंत अधिक व्यवहारी विचारवंत असू शकतो? आज देशाला भेडसावणार्‍या डझनावारी प्रश्न व समस्यांवर उपाययोजना करायची असेल; तर आपापल्या तत्वज्ञानाची गाठोडी बांधून खुंटीला टांगायची वेळ आलेली आहे. एकजुटीने त्या समस्यांवर लढायची व उपाय अंमलात आणायची गरज आहे. पण दुर्दैव इतकेच की आज नेमका या वैचारिक हनुमंतांचा कान पकडू शकणारे बाबासाहेबांसारखे उत्तुंग व्यक्तीमत्व आपल्यात नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपापला ‘राम’ शोधणार्‍यांची झुंबडगर्दी झालेली असून त्यात मूल्यवान म्हणावा अशा देशाची नासाडी मात्र खुलेआम चालू आहे.  ( क्रमश:)
भाग   ( ५८)    १७/१/१३

मंगळवार, १५ जानेवारी, २०१३

सेक्युलर खोटेपणा आणि दांभिकपणाचा पर्दाफ़ाश


  माझ्या लिखाणातून नेहमी सेक्युलर व बुद्धीमंत यांच्यावर कडवी टिका असते. त्याचे कारण मला दांभिकतेचा खुप राग येतो. आणि आपल्या देशात हल्ली सेक्युलर असणे म्हणजे अंगात पुरेपुर खोटेपणा व दांभिकता भिनलेली असावीच लागते. त्याचे अनुभव अधुनमधून येतच असतात. मागे मी एका लेखात ‘मशाल’ सिनेमातील दिलीपकुमारचे अमरीश पुरी या खलनायकाला उद्देशून बोललेले वाक्य सांगितले होते. सामान्य गुन्हेगार निर्बुद्ध असतो. म्हणूनच त्याचा समाजाला फ़ारसा धोका नसतो. पण बुद्धीमान माणसाने गुन्हेगारी पत्करली; तर मात्र समाजाचा र्‍हास झालाच म्हणून समजा. कारण तो आपली कुशाग्र बुद्धी विनाशक व विध्वंसक दिशेने कामाला लावत असतो. आपले सेक्युलर बुद्धीमंत बहुतांश त्याच मार्गाला लागलेले आहेत. ते बेधडक खोटेपणा करू शकतात आणि दांभिकता हा तर त्यांच्या स्थायीभाव बनून बसला आहे. कुठल्याही बुवा-भगताला लाजवील इतका बेशरमपणा या सेक्युलर शहाण्यांमध्ये आढळून येतो. त्याचा अनुभव मला अनेक वर्षापासूनचा आहे. म्हणूनच कधीकधी अशा भंपक भोंदूंचे बुरखे फ़ाडणे अगत्याचे होऊन जाते. कालपरवा कोकणात चिपळू्ण येथे जे मराठी साहित्य संमेलन झाले; त्या निमित्ताने त्याच सेक्युलर दांभिकतेचे मोठेच प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्याकडे मी दुर्लक्षच केले होते. पण अतिरेक झाला, मग हस्तक्षेप करावा लागतो. म्हणून त्या संबंधात मी फ़ेसबुकवर एक प्रतिक्रिया टाकलेली होती. पण शक्य असूनही ‘पुण्यनगरी’मध्ये लिहायचे टाळले होते. पण तिथेही काही भोंदू भेटलेच. त्यांना खोटेपणा करायची खुमखुमी आली. पण खोटेपणाचे एक वैशिष्ट्य असते. मुद्दे नसले, मग ते फ़ाटे फ़ोडले जातात आणि तरीही खोटे पडायची वेळ आली; मग आपण खालच्या पातळीवर उतरत नाही’ म्हणून पळ काढतात. आपले लंघडेपण लपवायला उच्च पातळीवर आल्याचे नाटक कसे रंगवले जाते, त्याचा उत्तम दाखला म्हणून या वादाकडे बघता येईल.

   चिपळूणच्या साहित्य संमेलनात दोन वाद उफ़ाळून आलेले होते. एक होता परशूरामाच्या उल्लेख व गौरवाचा. तो संभाजी ब्रिगेडने काढला होता. त्याबाबतीत उहापोह होऊन संयोजकांनी माघार घेतली व परशूरामाचे चित्र मागे घेण्यात आले. दुसरा बाद तसा फ़ारसा रंगला नाही. पण ज्यांना गरळ ओकायची होती; त्यांनी हे निमित्त साधून आपला पोटशूळ मोकळा करून घेतला. संमेलनाच्या व्यासपीठाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावरून झालेला हा वाद होता. त्याची फ़ारशी दखल कोणी घेतली नाही. पण स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेणारे जे मूठभर लोक माध्यमात मोक्याच्या जागा अडवून बसले आहेत; त्यांनी शिळ्या कढीला ऊत आणायची संधी साधून घेतली. त्यात पुष्पा भावे व प्रज्ञा पवार या दोन महिला पुढे होत्या. साहित्यिकांचा अवमान करणार्‍या ठाकरे यांचे नाव संमेलनाच्या व्यासपीठाला देऊ नये; म्हणुन त्यांनी निषेधात्मक भूमिका जाहिर केली होती. यातल्या पुष्पा भावे यांना साहित्यिक वा त्यांचे व्यवहार; याच्याशी काहीचे कर्तव्य कधीच नसते व नव्हते. ठाकरेद्वेष हा त्यांचा आवडता छंद आहे. त्यासाठीच त्या तिथे घुसल्या होत्या. मुंबईच्या संमेलनात तेरा वर्षापुर्वी त्यांनी असाच तमाशा मांडला होता. त्यानंतरच्या संमेलनात कुठे ठाकरे हा उल्लेख नसल्याने भाव्यांचे नाव कुठे ऐकू आले नाही. आता अचानक इतक्या वर्षांनी त्या उपटल्या आणि विरोधाची भाषा बोलू लागल्या. त्यांच्या सोबत दिवंगत दया पवारांच्या कन्या प्रज्ञा पवार यांना बघून मला थोडे आश्चर्य वाटले. कारण त्यांच्या वैयक्तीक जीवनातील एक (शिवसेनेच्या सरकार संबंधातील) घटना मला ठाऊक होती आणि ती प्रसिद्ध दलित साहित्यिक नामदेव ढसाळ यांनी जाहिरपणे लिहिलेली होती. म्हणूनच पुष्पा भावेंसोबत प्रज्ञा पवार यांनी ठाकरे विरोधात शड्डू ठोकलेला बघून नवल वाटले. तरी मी त्याबद्दल लिहायचे टाळले होते. पण माझ्याच एका समाजवादी सेक्युलर मित्राला तो किस्सा सांगितल्यावर; त्याला भयंकर संताप आला. त्यानेच खुप आग्रह केला म्हणून मी तो किस्सा माझ्या फ़ेसबुक खात्यावर लिहिला. तो जसाच्या तसा वाचकांनीव वाचावा, म्हणजे त्यांना स्वत:चे मत बनवणे सोपे होईल. बाळासाहेब ठाकरे वा शिवसेना यांच्याबद्दल अनेक आक्षेप वा आरोप होऊ शकतात, पण मरणोत्तर त्यांच्या नावाला आक्षेप घेणारे किती संभ्य वा असंस्कृत आहेत; त्याचा निवाडा प्रत्येकाने स्वत:शीच करावा. त्यावरून झालेल्या वादाचे तपशील मी पुढे देईनच. तो फ़ेसबुकवरील माझा छोटेखानी लेख पुढीलप्रमाणे होता.

   पद्मश्री पुरस्कार मिळवलेले कवी व दलित पॅन्थरचे संस्थापक नेते नामदेव ढसाळ, दैनिक ‘सामना’मध्ये ‘समष्टीसाठी सर्वकाही’ असे साप्ताहिक सदर दिर्घकाळ लिहित होते. त्यात त्यांनी आपण शिवसेनेकडे कशामुळे आलो; त्याचा अनुभव लिहिलेला आठवतो. त्यांचेच समकालीन दलित लेखक व फ़ोर्ड फ़ाऊंडेशन पुरस्कार मिळवलेले व त्याच पुरस्कारामुळे ग्रंथाली या प्रकाशन संस्थेला (बलुतं) प्रतिष्ठा मिळवून देणारे दया पवार; एका सेमिनार निमित्त दिल्लीला असगर अली इंजिनीयर यांच्या सोबत गेलेले होते. तिथे समारंभातच त्यांना हृदय विकाराचा झटका आला. मग त्यांना इस्पितळात दाखल करून इंजिनीयर निघून गेले. पवारांचे त्यातच प्राणोत्क्रमण झाले होते आणि त्यांचे शव दिल्लीच्या अनोळखी शहरात बेवारस पडून होते. त्याचे करायचे काय याची तारांबळ त्यांच्या मुंबईतील कुटुंबात उडाली होती. काहीच साधेना तेव्हा त्यांच्या कन्येने आपल्याशी संपर्क साधला; असे नामदेव यांनी त्यात लिहिले होते. सतत सेक्युलर पुरोगामी चळवळीत वावरलेल्या ढसाळांनी मग दिल्लीत वास्तव्य करणार्‍या माजी अर्थमंत्री मधू दंडवते यांच्याशी संपर्क साधून पवारांचा मृतदेह मुंबईस आणण्यासंबंधी खटपट करायची विनंती केली. पण त्यांनी शक्य नसल्याचे सांगत झटकून टाकले. नामदेवनी अनेक ठिकाणी आपल्या पुरोगामी ओळखी काढून प्रयास केले. पण सगळे वाया गेले. अखेरचा प्रयत्न म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. त्याने फ़क्त इस्पितळ कुठले तेवढे विचारले आणि सरकारी यंत्रणा कामाला लावली. दिल्लीतल्या महाराष्ट्राच्या आयुक्ताला सूचना दिल्या आणि मुंबईतून राज्य सरकारच्या मालकीचे विमान एका मंत्र्यासह दिल्लीला पाठवून दिले. त्यातून दया पवारांचे शव मुंबईस पोहोचले

   योगायोग असा, की तेव्हा विमानतळावर ग्रंथालीचे म्होरके दिनकर गांगल व कुमार केतकर आदी मंडळी उपस्थित होती. पण ते पवारांचा मृतदेह स्विकारण्यासाठी आलेली नव्हती. तर शिकागो येथे लता मंगेशकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा जंगी कार्यक्रम योजला होता. त्यासाठी अमेरिकेला जायला ग्रंथालीकर विमानतळावर आलेले होते. नामदेवने त्यांना मृतदेहाचे दर्शन घेण्याची विनंती केली; तर फ़्लाईट चुकेल म्हणून त्यांनी नकार दिला. याच पवारांच्या ‘बलुतं’मुळे ‘ग्रंथालीचे प्रथम नाव झाले होते. पण त्या पुरोगामी संस्थेच्या म्होरक्यांना दया पवारचे अखेरचे दर्शन घेण्यापेक्षा अमेरिकेला जाणारी फ़्लाईट मोलाची वाटली. असो, मुद्दा इतकाच, की त्या मुख्यमंत्र्याचे नाव आहे मनोहरपंत जोशी आणि तो जातियवादी शिवसेना भाजपाच्या युती सरकारचा मुख्यमंत्री होता. दया पवारांचे शव मुंबईत घेऊन येण्यासाठी दिल्लीला रवाना झालेल्या मंत्र्याचे नाव होते रविंद्र माने, तोही शिवसेनेचा जातियवादीच होता. ज्यांना आयुष्यभर प्रतिगामी व जातीयवादी म्हणून हिणवले, विरोध केला, ते कसोटीच्या प्रसंगी धावून आले आणि ज्यांच्या नादाला लागून पुरोगामी दांभिकपणाची पालखी आयुष्यभर उचलली, त्यांनी दगा दिला; याबद्दलचा पश्चात्ताप नामदेवने त्या लेखामधून व्यक्त केलेला आठवतो. परवा चिपळूणच्या साहित्य संमेलनात शिवसेनाप्रमुखांचे नाव व्यासपीठाला देण्यात विरोध करणार्‍यांमध्ये दया पवारांची कन्या प्रज्ञा पवार आघाडीवर होती, हे बघितले आणि ती आठवण जागी झाली. 

   शिवसेनाप्रमुख वा त्यांच्या विचारांनी कुठली संस्कृती जपली, जोपासली; असे विचारले गेले आणि जात असते. त्याचे उत्तर इथे आलेले आहे. कारण पुरोगामित्वाचे चटके बसलेला व जातियवादी मायेची फ़ुंकर अंगावर घेतलेल्या नामदेव ढसाळनेच ती आठवण सांगितलेली आहे. मधू दंडवते माजी अर्थमंत्री असून त्यांनी हात झटकले तरी ते सुसंस्कृत असतात. पण ज्यांच्या शिव्याच खाल्ल्या तरी साहित्यिक म्हणून त्यांचा सन्मान करते, ती शिवसेना व तिचा प्रमुख मात्र असंस्कृत असतो. काय व्याख्या असते या संस्कृतीची? व्यक्तीगत द्वेषाला तत्वज्ञानाचा मुलामा फ़ासण्यला संस्कृती म्हणतात का?   ( क्रमश:)
भाग   ( ५७)    १६/१/१३

सोमवार, १४ जानेवारी, २०१३

आभासाच्या जगातले भ्रमिष्ट विचारवंत पत्रकार




  ‘पुण्यबगरी’चा वाचक एक सव्वा कोटीपेक्षा अधिक आहे. माझा लेख ‘पुण्यबगरी’च्या बहुतेक आवृत्तीमध्ये प्रकाशित होतो. म्हणून तो प्रत्येक वाचक माझा लेख वाचतोच, असे मी गृहीत धरत नाही. त्यातले अनेकजण मला सातत्याने फ़ोन करून वा अन्य मार्गाने त्यांच्या प्रतिक्रिया कळवत असतात. काही लोकांना खुपच आवडते, काही लोक आक्षेप घेतात, काही लोकांना खुपच विचारप्रवर्तक वाटते. काही लोकांना रागही येत असतो. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. त्यामुळे त्या सर्वांचे मी स्वागतच करतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की मी लिहितो म्हणून सगळे डोळे मिटून ते सत्यच आहे म्हणून स्विकारत नाहीत; याचे मला खरेच समाधान वाटते. कारण वृत्तपत्राने व माध्यमांनी लोकांना विचार करायला भाग पाडले पाहिजे, हेच पत्रकारितेचे खरे उद्दिष्ट आहे. पण असे असूनही मी कधीच ‘पुण्यनगरी’चा तमाम वाचक वाचतो आहे, अशी भाषा वापरत नाही. कारण तमाम वाचक माझा लेख वाचत असेल, हे गृहीत आहे, ते सत्य व वास्तव असू शकत नाही. पण अनेक संपादक, पत्रकार अशी भाषा वापरतात. मला त्यांची कींव येते. कारण दहा अकरा कोटी एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे आणि आपल्या वृत्तपत्राचा खप जास्तीत जास्त काही लाखात असतो. मग तमाम वाचक वा महाराष्ट्राच्या वतीने बोलण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? पण असे लिहिणारे किंवा बोलणारे असतात, त्यांचा आवेश बघितला, तर ते मनापासून तेच सत्य समजून बोलतात, असेच दिसते. मग जे वास्तव नाही, त्या भ्रमात माणूस बोलत असेल, तर त्याच्याकडून कुठल्या शहाणपणाची अपेक्षा बाळगता येईल? आपण कुठे आहोत वा आपले स्थान काय; त्याचाच पत्ता नसलेल्या व्यक्तीने तुम्हाला त्याच्याकडे येण्याचे आमंत्रण दिले, तर तुम्ही कुठे जाऊ शकता? कुठेच नाही ना? मग या अशी भाषा वापरणार्‍यांचा मुर्खपणा तुमच्या सहज लक्षात येईल.

   तुम्ही रोज किंवा अधूनमधून टिव्ही बघत असाल, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, की तिथे बोलणारे सहसा निर्विकार असतात. त्यांची भाषा कशी असते? अवघा महाराष्ट्र तुमच्याकडे बघतो आहे. देशाचे तुमच्यावर लक्ष आहे. देश तुम्हाला विचारतो आहे, असे हे टिव्हीवरचे लोक का बोलतात? त्यांना देश कुठे व कसा आहे, त्याचा तरी पत्ता आहे काय? खरा देश बघायला मिळाला, तर त्यांची काय घबराट होईल, याची नुसती कल्पना केलेली बरी. आपल्याला कुठेही दिसणारा एक अनुभव सांगतो. हल्ली मोबाईल फ़ोनचे खुळ खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेले आहे. मग जुने झालेले फ़ोन खेळण्यासारखे पोरांना दिले जातात आणि मुले कानाला लावून एकटीच बडबड करीत मोठ्यांची नक्कल करीत असतात. इथून तिथे फ़िरत काहीतरी बडबडतात. त्यातही मोठ्यांच्या शब्दांचीच नक्कल असते. फ़ोनवर पलिकडून आवाज येतो, तेव्हा आपण उत्तर द्यायचे असते; याची त्या कोवळ्या जीवांना जाणीव नसते. त्यामुळे एकतर्फ़ी बडबड चालू असते. माझ्या भाचीची दीड वर्षाची मुलगी होती, त्यांच्याकडे मी वास्तव्याला होतो, तेव्हा हा खेळ मी बघितला होता. मग मी तिथून माझ्या घरी परतलो आणि कधीतरी त्यांना फ़ोन करून बोलत असताना; त्या मुलीची बडबड ऐकू आली. म्हणून म्हटले जरा फ़ोन आर्याकडे द्या. तिनेही कौतुकाने फ़ोन घेतला. हॅलो वगैरे बडबड केली. मग मी तिच्या नावाने बोललो, ‘कोण आर्या बोलतेय का?’ पुढे धमाका ऐकू आला. तिने फ़ोन एकून दिला होता. काही सेकंदात पलिकडली गडबड कानी आली. तिचे आईबाप तिला आजोबा बोलतात म्हणून समजावत होते. पण ती पोरगी फ़ोन काही हातात घ्यायला तयार नव्हती. ती खर्‍या ऐकू येणार्‍या फ़ोनला भुताटकी सारखी घाबरली होती. तिचा फ़ोन पलिकडून ऐकू येणारा नव्हता. स्वत:शी बड्बड करायचा होता. दोन्हीकडे आवाजाची नेआण करणारा फ़ोन तिला माहितच नव्हता. म्हणूनच कानाला लावला, तर त्यातून आवाज येणार्‍या फ़ोनला घाबरून तिने हातातला मोबाईल फ़ेकून दिला होता. अखेर मी त्यांना स्पिकर चालू करायला सांगितले आणि आर्या माझ्याशी मस्तपैकी बोलली. कारण सगळेच एकत्रित माझ्याशी संवाद करत होते.

   आजच्या वाहिन्या, वृत्तपत्रे बघितली वा वाचली; मग मला तो प्रसंग आठवतो. आजच्या माध्यमात एकतर्फ़ी संवाद चालू असतो. आपण लिहायचे, बोलायचे आणि समोरचा काय म्हणतो, ते न ऐकताच गृहीत धरून बोलतच राहायचे; अशी एकूण स्थिती असते. समोरच्या निर्जीव कॅमेरासमोर बोलताना ऐकणारा कोणी असायची गरज नसते. मग निर्जीव मुक्या भिंतीशी बोलावे, तसे हे लोक बडबड करीत असतात. त्यांचा खर्‍या माणसांशी, खर्‍या जगाशी संबंधच उरलेला नाही. त्यामुळेच मग वास्तवात काय घडते आहे, त्याचीही फ़िकीर नसते. कुठे काही घडले असे कळले, मग हे लोक अंदाज करतात, तर्क लढवतात आणि त्यावर बडबड सुरू करतात. अगदी घटनेचे चित्रण दाखवले जात असते. त्यातही बघणार्‍याला जे दिसत असते, त्यापेक्षा सांगणारा काही भलतेच वर्णन करत असतो; असा अनुभव अनेकदा येतो. त्यामुळेच मग समोरचा काय करतो आहे, काय बोलतो आहे, याच्याशी माध्यमातल्या लोकांना काही कर्तव्यच उरलेले नाही. त्यांना होणारे आभास वा त्यांनी लढवलेले तर्क; म्हणजेच वास्तव अशा भ्रमात ही मंडळी अनेकदा जगताना दिसतात. सहाजिकच जे घडते आहे, ते का घडते आहे व त्याचा कार्यकारणभाव काय आहे; त्याचा त्यांना थांगपत्ता नसतो. त्यातून मग अनेक विनोदही निर्माण होतात. महाराष्ट्राचे माजी मुखमंत्री विलासराव देशमुख यांचे गंभीर आजारामुळे आकस्मिक निधन झाले, त्या दिवसाचा प्रसंग मला आठवतो. विलासराव व गोपिनाथ मुंडे विरोधी पक्षातले असले; तरी तरूणपणा पासूनचे पक्के मित्र. त्यामुळे कायबीईन लोकमत वाहिनीवर गोपिनाथरावांच्या आठवणी चाळवण्याचा प्रयास निखिल वागळे करीत होते. त्यात त्यांनी एक प्रश्न इतका मुर्खासारखा विचारला, की मुंडेही गडबडून गेले. त्यांच्या जीवलग मित्राचे आकस्मिक निधन झाले आहे आणि त्या प्रसंगी आप्ण मुलाखत घेतो आहोत; याचे भान असायला नको का? निखिलने जणू विलासरावांच्या एकसष्टीनिमित्त मुलाखत घेत असल्याप्तमाणे मुंडे यांना विचारले, एकाच कॉलेजमध्ये होतात, तर एकाच मुलीवर लाईन मारत होतात का?’

   खास विनोद पुढेच आहे. ज्याला इतकेही प्रसंगावधान नाही, त्या मुर्खाला पुढल्या दोनतीन दिवसात मुंबई मराठी पत्रकार संघाकडून आचार्य अत्रे पुरस्कार देण्यात आल्याचे वृत्त मला वाचायला मिळाले, तेव्हा मी थक्क झालो. कारण अत्रे हे प्रसंगावधानासाठी कमालीचे प्रसिद्ध होते. एका अनाथाश्रमाच्या कार्यक्रमात त्यांना प्रमुख पाहूणे म्हणुन आमंत्रित केलेले होते. तिथे नेहमीप्रमाणे अत्र्यांनी जबरदस्त भाषण केले. मात्र त्या अप्रतिम भाषणाचा शेवट त्यांनी इतके प्रसंगावधान राखून केला, की उपस्थितांना त्यांचा मुद्दा समजायलाही काही मिनिटे लागली होती. भाषणाची अखेर करताना अत्रे म्हणाले. ‘शेवटी या संस्थेने जे महान व उत्तम कार्य चालविले आहे, ती संस्था लौकरात लौकर बंद पडायची वेळ यावी अशा शुभेच्छा मी देतो.’ एकदम समोरच्या श्रोतृवर्गात शांतता पसरली. कोणाला काय करावे तेच कळेना. संस्था बंद पडावी याला शुभेच्छा कसे म्हणता येईल? हा तर शाप झाला. आपल्या विधानाचे गांभिर्य अत्र्यांना ठाऊक होते. मग बुचकळ्यात पडलेल्या श्रोत्यांना भ्रमातून बहेर काढण्यासाठी त्यांनी खुलासा केला. संस्थेचे काम चांगलेच आहे. पण अशा संस्थेची भरभराट म्हणजे समाजात अनाथांची संख्या वाढणेच आहे ना? मग संस्थेची भरभराट असा आशिर्वाद देऊन मी समाजाल शाप देऊ का? संस्था समाजाच्या निरोगी नैतिक कल्याणासाठी असतात. ते साध्य झाले, मग त्या बंदच पडायला हव्यात. या संस्थेचे कार्य अनाथांना संभाळणे असले, तरी तिच्या भरभराटीसाठी समाजात अनाथांची पैदास व्हावी हा शाप असेल. म्हणुन ती शुभेच्छा होऊ शकत नाही, संस्थेला दुसरी खुप चांगली कामे करता येतील. म्हणून संस्थेचा अनाथाश्रम बंद पडायची वेळ यावी याच शुभेच्छा असतात. इतके प्रसंगावधान राखणार्‍या अत्र्यांच्या नावाचा पुरस्कार निखिलला मुर्खपणाने बडबड करण्याबद्दल पत्रकार संघानेच अवघ्या दोनतीन दिवसात द्यावा; यातच एकूण माध्यमांची बुद्धीमत्ता किती रसातळाला गेलेली आहे, त्याची प्रचिती येते. असे निखिल एकटाच बडबडतो मानायचे कारण नाही, एकूणच वाहिन्यांची बकवास व वृत्तपत्रातून खरडले जाणारे चराट वाचल्यास; त्याची सातत्याने प्रचिती येत असते. मग त्यांच्याकडुन समाजा्ला भेडसावणार्‍या समस्यांची उकल वा उहापोह कसा व्हायचा? जे स्वत:च भ्रामक जगातल्या भ्रमात वावरत असतात, त्यांच्याकडून वास्तव जगातल्या समस्यांची कारणमिमांसा होऊ शकत नाही, किंवा त्यांच्याच बुद्धीमत्तेवर विसंबलेल्या समाजाचा बौद्धिक व व्यावहारिक र्‍हास होत जाणे अपरिहार्यच नाही काय?    ( क्रमश:)
भाग   ( ५६)    १५/१/१३

रविवार, १३ जानेवारी, २०१३

पाकला धडा शिकवायला कोणाचा विरोध आहे?


   कुठल्याही समाजातले किंवा देशातले बुद्धीवादी आणि सामान्य माणसे; यांच्यात मोठीच दरी असते. कारण बुद्धीवादी हा नेहमी अभ्यासकाच्या अभिनिवेशात असतो. त्यामुळे त्याला समोर जे वास्तव साध्या डोळ्यांना दिसू शकते, ते तो बघूच शकत नसतो. आणि त्यात नवल असे काहीच नसते. आपणही त्याच अनुभवातून अनेकदा जातच असतो. बघा आठवून; जेव्हा आपण घरातली एखादी वस्तू शोधत असतो, तेव्हा ती सापडतच नाही. अगदी समोर तर असते; पण सापडत नाही. कारण आपण शोधत असतो. ही शोधण्याची झिंग किंवा नशा डोक्यात व डोळ्यात चढलेली असते, की नेहमी सहज दिसू शकणारेही डोळ्यांना दिसत नाही. मग अन्य कोणीतरी आपले लक्ष तिकडे वेधतो आणि आपल्यालाच आश्चर्य वाटते, की आपण इतके विसरभोळे कसे झालो? पण तो विसरभोळेपणा नसतोच. शोधायच्या आवेशात आपले डोळे व बुद्धी भरकटलेली असते. पण दुसर्‍या कुणाची नजर तशी झिंग चढलेली नसते. म्हणूनच त्याला आपल्याच समोरची वस्तू सहज दिसते आणि आपल्याला मात्र तिथेच असुन दिसत नाही. नेमकी अशीच स्थिती समाजातल्या बुद्धीवादी वर्गाची असते. त्यांना आपल्या बुद्धीची व शहाणपणाची कायम झिंग चढलेली असते. मग त्यांना सहज दिसणार्‍या व समोर असणार्‍या किंवा साध्या डोळ्यांना दिसणार्‍या गोष्टी; समोर असून दिसत नाहीत. किंबहूना अन्य सामान्य माणसांना जे साध्या डोळ्यांनी दिसते आहे, तेच आपल्या बुद्धीवादी नजरेला दिसत असेल, तर आपली बुद्धीच काम करीनाशी झाली काय; अशी त्यांना शंका येते. म्हणूनच असे बुद्धीवादी नेहमी समोरच्या साध्या गोष्टीतही विशेष काही शोधू बघतात. ही सगळ्याच बुद्धीवाद्यांची शोकांतिका असते. पण त्यामुळेच त्यांची व उर्वरित समाजाची फ़ारकत होत असते. विचारात, वर्तनात व परिणामात फ़रक होतच असतो. त्यामुळेच मग या मुठभर बुद्धीवादी व बाकीचा सामान्य समाज यांच्यात दरी निर्माण होत असते.

   आता हेच बघा, तिकडे काश्मिरच्या सीमेवर दोघा भारतीय सैनिकांची हत्या पाकिस्तान्यांनी केली, त्यांचा शिरच्छेद करून विटंबना करण्यात आली. त्यामुळे अवघा भारतीय समाज कमालीचा अस्वस्थ झालेला आहे. पाकिस्तानवर हल्ला करा, इथपासून पाकिस्तानला धडा शिकवा; असे म्हणण्यापर्यंत विविध प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. पण त्या प्रक्षोभाचा मागमूस आपल्याला वाहिन्यांवर मस्तपैकी चर्चा करणार्‍या विद्वान व लेख लिहिणार्‍या अभ्यासू पत्रकारांमध्ये दिसत नाही. उलट असे काही अभ्यासक, युद्ध म्हणजे चणेफ़ुटाणे नाहीत; असे इशारे देत पाकिस्तानशी मैत्री करण्याचे उपाय सुचवताना दिसतील. भारतीयच असूनही, त्यांना आपल्याच जवानांची झालेली हत्या वा विटंबना यांना संताप का येत नसावा? जशी सामान्य माणसाची प्रक्षुब्ध प्रतिक्रिया आहे; तशी विद्वान लोकांची भावना का नसावी? त्याचे उत्तर साधेसरळ आहे. आपण शहाणे आहोत आणि म्हणूनच सामान्य माणसाप्रमाणे रागावणे वा सुडाची भाषा बोलणे; आपल्याला शोभत नाही, अशी या लोकांची समजूत असते. मग आपण सामान्य माणसांपेक्षा वेगळे असल्याचे भासवण्यासाठी ते युद्धाचा उपाय योग्य असला; तरी त्यात समस्या असल्याचा शोध लावतात. त्यातला एक शोध असा, की आता दोन देशात पारंपारिक पद्धतीचे युद्ध होऊ शकत नाही. दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे आहेत. त्यामुळे त्यांच्यात संघर्ष पेटलाच, तर अणुयुद्धाचा धोका संभवतो. गेले दहा बारा वर्षे हेच सांगून पाकिस्तानच्या कुरापतखोरीला चुचकारण्यात भारतीय बुद्धीमंत आपली बुद्धीमत्ता खर्ची घालत आहेत. जणू अण्वस्त्रांची सज्जता करून भारताने स्वत:ला पंगूच करून घेतले; असाच समज त्यांनी करून घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यात व युक्तीवादात तथ्य नाही असे कोणी म्हणू शकत नाही. पण तथ्य किती आणि सत्य किती, याचाही विचार आवश्यक असतो.

   थापा मारणारा माणूस एक काळजी घेतो, ती म्हणजे तो संपुर्ण असत्य कधीच बोलत नसतो. त्याच्या बोलण्य़ात सत्य व असत्य, यांची सफ़ाईदार सरमिसळ असते. म्हणजे त्यातला काही भाग खरा असतो, तसाच काही भाग बेधडक खोटा असतो. पण काहीअंशी सत्य असल्याने ऐकणार्‍याचा मानसिक गोंधळ उडत असतो. त्यालाच खरी थापेबाजी म्हणतात. खोटा माल आकर्षक खर्‍या वेस्टनात गुंडाळून विकणे म्हणजे थापेबाजी असते. भारताला पाकिस्तानशी युद्ध परवडणारे नाही; असे पटवण्यासाठी अणूयुद्धाच्या शक्यतेची भिती घालणे वास्तवाचे विकृतीकरण आहे. याचे कारण युद्ध दोन देशात होऊ शकते, पण अणुयुद्ध दोन देशातले असू शकत नाही. ते कोणात पेटले याला महत्व नाही. ते पेटलेच तर सर्वव्यापी होणार असते व त्यात अवघे जग ओढले जाण्याचा धोका असतो. म्हणूनच अणू संशोधन व अण्वस्त्रांचा विकास, याबद्दल बडे देश कायम सा्वध असतात. मग असे देश कुठल्याही दोन देशातला संघर्ष अणुयुद्धाच्या थराला जाऊ देतील काय? नसतील तर अणुयुद्धाचे भय भारत-पाक यांच्यापुरते कसे काय असू शकते? तो दोन देशातला विषयच नाही, तर त्याबद्दलच्या धोक्याला एकट्या भारताने भयभीत होण्याचे कारणच काय? अवघ्या जगाने भयभीत व्हायला हवे. म्हणजेच तशी पाळी येऊ नये; यासाठी एकट्या भारताने झीज सोसण्याचे कारण नाही. त्यात तमाम पुढारलेल्या व विकसित देशांना पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यात भारत पाक यांच्यापेक्षा युरोप, रशीया अमेरिका व चीन अशा बड्या व श्रीमंत देशांचे हितसंबंध अधिक गुंतलेले आहेत. म्हणूनच पाकिस्तानशी युद्ध झाल्यास अणुयुद्धाचा धोका असल्याचे वास्तव अल्प प्रमाणात खरे असले तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये तसा धोका संभवत नाही. त्यासाठी भयभीत होऊन भारताने पाकिस्तानच्या कुरापती सहन करण्याचे काही कारण नाही. पारंपारिक युद्धाचा पवित्रा घेऊन पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे. त्यात गडबडून जाण्याचे काही कारण नाही.

   हे व्यवहारी सामान्य लोकांना कळते. कारण अणुयुद्धाच्या भितीपोटी गेल्या सहा सात दशकांचे राजकारण खेळले जाते आहे. पण जपानवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला, त्यानंतर आजवर कितीही युद्धे झाली, तरी दुसरा तसा बॉम्ब कोणी वापरलेला नाही. कितीही हमारतुमरी झाली, तरी तसा प्रसंग येऊ दिलेला नाही. पण त्याच वेळी पारंपारिक पद्धतीचे सशस्त्र संघर्ष कायम पेटत राहिलेले आहेत. रशिया वा अमेरिकेने अफ़गाण व व्हिएतनाम अशा घणाघाती युद्धातही अण्वस्त्रांचा वापर केलेला नाही. मग पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करील, या भयगंडाने पछाडलेल्या मानसिकतेमध्ये भारताने जगण्याची काय गरज आहे? तशी शक्यता असेल तरी अमेरिका व रशियासह चीनला त्यात हस्तक्षेप करावाच लागणार आहे. त्यात चीन व अमेरिकन सेनेकडे पाकिस्तानी अण्वस्त्रे कुठे व कशी आहेत, त्याची परिपुर्ण माहिती आहे. तसा धोका उभा राहिला, तर आहेत तिथेच त्यांना निकामी करण्याची पावले, उचलण्याची सज्जत त्यांनी ठेवलेली आहे. मग भारताविरूद्ध पाक अण्वस्त्रे वापरील असे भय दाखवण्याचे कारणच काय? वापर कोणीही कोणाचाही विरोधात केला तरी त्याचे परिणाम सभोवतालच्या देशांना भोगावे लागणार असतील तर ते देश पाकिस्तानला तसा वापर निमूट राहून करू देतील काय? नसतील तर पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करील अशी भिती घालण्यात काय अर्थ आहे?

   पण युद्ध म्हटले, की अनेक असुविधा आल्या. अनंत अडचणी येऊन त्यांनी जगण्यात व्यत्यय निर्माण होतात. त्यामुळे आधीच कष्टाचे जीवन कंठणार्‍या सामान्य लोकांच्या जगण्यात फ़ारसा फ़रक पडत नसतो. पण सुखवस्तू जगणार्‍यांच्या अनेक सुविधा युद्ध काळात रद्दबातल होतात. त्यांच्या ऐषाराम व चैनीला वेसण घातली जात असते. त्यालाच हा सुखवस्तू वर्ग घाबरत असतो. म्हणूनच त्याला युद्ध नको असते. युद्धातला विध्वंस व हानीकडे लक्ष वेधून तो वर्ग सामान्य माणसाला भयभीत करत असतो. आजही म्हणूनच पाकिस्तानने कितीही आगळीक केली, तरी नेमका बुद्धीवादी वर्गच युद्धाचे धोके सांगून भारत सरकारला युद्ध टाळण्याचे सल्ले जाहिरपणे देत आहे. त्यांना देशाच्या हानीची फ़िकीर नसून आपल्या सुखवस्तू जीवनाच्या हानीची फ़िकीर लागली आहे. तोच प्रकार पाकिस्तानातील बुद्धीवादी वर्गातही दिसून येईल. अन्य वेळी पाकच्या जिहादी अतिरेकाचे समर्थन करणारा तिथला बुद्धीवादी व पत्रकार वर्ग युद्धाच्या मात्र विरोधात बोलताना दिसेल. याचे कारण एकच असते. सामान्य जनता व सुखवस्तू बुद्धीवादी यांच्यातली दरी. इतर वेळी सामान्य माणसाचे जीवन असह्य झाले आहे, कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, पाकिस्तानला मस्ती चढली आहे, अशी भाषा वापरणरा हाच वर्ग आंदोलनाचा भडका उडाला, सीमेवरील युद्धाचे ढग जमू लागले, मग भाषा बदलताना दिसेल. कारण त्यांना वास्तवाशी कर्तव्य नसते तर शब्दांचा खेळ करायचा असतो आणि सामान्यांचे जीवन हे त्यांना खेळाच्या पटावरील सोंगट्यांच्या चाली वाटत असतात.     ( क्रमश:)
भाग   ( ५५)    १४/१/१३

शनिवार, १२ जानेवारी, २०१३

असंतोषाला चूड लावणारा क्रांतीकारक नसतो


   एक गंमत कशी आहे बघा. गावातल्या शेतात जेव्हा कुठलेच पीक वगैरे नसते, तेव्हा तिथे कीड किटक असतातच असे नाही. आणि असले तरी त्याची कोणाला फ़िकीर नसते. पण जे शेत पीकाखाली असते, तिथे मात्र असे प्रश्न सतावत असतात. कुठली किड लागेल, कसला रोग पिकावर पडेल; अशा काळजीत शेतकरी असतो. ती फ़िकीर येणार्‍य़ा अपेक्षित पिकाची नासाडी होण्याची असते. त्याला विध्वंसाची क्षमता म्हणतात. आजवर जगाचा इतिहास बघितला; तर विध्वंसाच्या ताकदीवर साम्राज्ये उभी राहिलेली दिसतील. आधीचा जो कोणी राजा वा सम्राट असेल, त्याला आपल्या हुकूमत असलेल्या प्रदेशात जोवर अशा विध्वंसक प्रवृत्तीला वेसण घालणे शक्य झाले आहे; तोवरच त्याची सत्ता टिकून राहिलेली दिसेल. पण त्याला वेसण घालण्याची क्षमता म्हणजे प्रतिस्पर्धी म्हणून जो समोर येईल त्याचा विध्वंस करण्याची ताकद. उलट त्याची सत्ता विध्वंसक कारवायांनी उलथून पाडणार्‍यांनी सत्ता काबीज केली, की प्रथम ते विध्वंसाची भूमिका सोडून संरक्षणाची भूमिका घेतात, अर्थात ज्यांचे आक्रमण हे लूट करण्यापुरतेच असते, ते कधी संरक्षणाची भूमिका घेत नाहीत. लूट केली, की निघून जातात. पण ज्यांना आपली नवी सत्ता प्रस्थापित करायची असते; असे लोक जुन्या सत्ता प्रशासनाची डागडूजी करून नवे राज्य निर्माण करताना दिसतील. पण कधीच लाडीगोडीने सत्ता बदलत नाही. लोकशाहीने ती सुविधा निर्माण करून दिली. त्यात लोकांच्या मताने शांततापुर्ण सत्तांतर होते.; म्हणजे तसे मानले जाते. पण म्हणून सामान्य माणसाच्या आयुष्यात मोठे स्थित्यंतर होत नाही. सहाजिकच लोकशाहीतील सत्ताधीशांनी विश्वस्ताप्रमाणे वागावे; ही सुद्धा अपेक्षा आहे. पण दुर्दैवाने अलिकडल्या काळात लोकशाहीने सत्तांतर होते, तेव्हा सत्तेवर येऊन बसणार्‍यांना आपण युद्धातून सत्ता मिळवली असे वाटते आणि ते आपल्या विरोधकांना संपवण्याचे डावपेच खेळू लागतात. सहाजिकच लोकांच्या ज्या रागातून वा असंतोषातून सत्ता त्यांना मिळालेली असते; त्या रागाचे वा असंतोषाचे निवारण करण्याचा विचारही नव्या सत्ताधीशांच्या मनाला शिवत नाही. परिणामी अल्पावधीतच या नव्या  सत्ताधीशाबद्दल जनमानसात राग व असंतोष खदखदू लागतो. मग होते असे, की प्रशासन व्यवस्था कायम असते, तिचे निर्णय घेणारे बदलत रहातात. जो सत्तेवर होता, त्याला खाली खेचल्याचे फ़सवे समाधान लोकांना जरूर मिळते. पण ज्यासाठी बदलले, तो हेतू मात्र साध्य होत नाही. याची जाणिव होते, तेव्हा लोक कालच्या सत्ताधीशाकडे पुन्हा वळू लागतात. त्यातून मग लोकशाही हे एक दुष्टचक्र बनून जाते आणि हळुहळू त्यात सामान्य जनतेचा लोकशाहीबद्दल भ्रमनिरास होऊन जातो.

   या नव्या लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये एका बाजूला सुखवस्तू राजकारणी व दुसर्‍या बाजूला कसलेही उत्तरदायित्व नसलेली नोकरशाही, असे दोन गट मस्त मजेत असतात, कारण कुठल्याही बाजूने सत्तेचे पारडे झुकले तरी त्यांच्या ऐषारामात फ़रक पडणार नसतो. सत्ता वा राज्याच्या अस्थिरतेशी त्याच्या जीवनातील अस्थिरतेचा संबंध नसतो. त्यात नोकरशहा, राजकारणी नेते व बुद्धीवादी यांचा समावेश होतो. म्हणूनच अशी मंडळी नेहमी लोकशाहीतील स्थैर्याचे आग्रही असतात. सोंगट्यांचा डाव खेळावा; तसे हे लोक सत्ताधारी बदलण्याच्या डावपेचात सामान्य जनतेच्या भावनांशी खेळ करत असतात. जनतेला चिथावणे, तिच्या भावना प्रक्षुब्ध करणे व रागाचे रुपांतर असंतोष व वैफ़ल्यात करणे; असे त्यांचे उद्योग चालू असतात. सामान्य जनता ही अत्यंत सोशिक व संयमी असते. कितीही अन्याय व अत्याचार सोसण्याची क्षमता जनतेमध्ये असते. किंबहूना  बुद्धीजीवी वर्गाने आपल्या पोपटपंचीतून नागरिकांना सोशिक बनवलेले असते. त्यामुळेच कितीही अन्यायग्रस्त मोठी लोकसंख्या बंडाला प्रवृत्त होत नाही. घुसमटत असलेला समाजही सत्ता वा राजकीय व्यवस्था उलथून पाडायला सज्ज नसतो. त्याला त्यासाठी चिथावण्या द्यायला लागतात, चिडवावे व फ़ितवावे लागते. त्याच्या बधीर व संवेदनाहीन बनलेल्या मनाला खर्‍या जखमांच्या वेदना शब्दातून टोचून जाणवाव्या; असे काही करावे लागते. ते काम समाजातील बुद्धीमंत व भाषाप्रभू करत असतात. आपल्या शब्दांनी, प्रचाराच्या माध्यमातून हा विचारशील वर्ग सामान्याच्या सुकलेल्या जखमेवरची खपली काढून त्यावर मीठ चोळण्याचे काम करू लागतो, तेव्हाच जनतेत वैफ़ल्याची लाट धुमसू लागतो, ज्याचा पुढे क्रांतीकारी वणवा होऊ शकत असतो.

   इथे एक लक्षात घेतले पाहिजे, की लोकांच्या दुखण्याने कोणी विचारवंत, बुद्धीवादी दु:खी वगैरे होत नाही. त्याची स्वत:ची नाराजी वा सत्तेवरला, व्यवस्थेवर असलेला राग जसा धुमसू लागतो; तसा तो आपल्या वैफ़ल्याला सामाजिक परिमाण जोडू लागतो. तुम्ही वाहिन्यांची चर्चा मुलाखती ऐकत असाल तर त्यातली भाषा बारकाईने ऐका. संपादकीय अग्रलेख वाचत असाल, तर ती भाषा तपासून बघा. ‘अवघा महाराष्ट्र तुमच्याकडे अपेक्षेने बघतो आहे. देशाची जनता चिडलेली आहे. लोकांना हे जाणून घेण्याचा हक्क आहे. इथली जनता हे सहन करणार नाही. सुशिक्षित, सुसंस्कृत महाराष्ट्राला हे कधीच मंजूर होणार नाही.’ असली विधाने तुमच्या वाचनात व ऐकण्यात नित्यनेमाने येतील. यातला देश, महाराष्ट्र, जनता, म्हणजे नेमका कोण असतो? कॉग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी वा भाजपा इत्यादी पक्षांना, त्यांच्या नेत्यांना निदान काही कोटी, लाखो लोकांनी मते दिलेली असतात. पण वाहिन्यांवर, वर्तमानपत्रातून बाष्कळ बडबड करणार्‍यांना ऐकणारे व वाचणारे किती असतात? महाराष्ट्र वा देशाने आपले मत वा दु:ख या शहाण्यांना कधी व कुठे कानात येऊन सांगितलेले असते? नसेल तर हे कशाच्या आधारावर असली भाषा बोलत असतात? तर ते तुमचे आमचे सामान्य माणचाचे मन बोलल्याचा आव आणून त्यांच्याच मनातले वा अपेक्षांचे बोल ऐकवत असतात. जनतेच्या नावावर खपवत असतात. पण इतक्या सफ़ाईदारपणे हे शब्द बोलले जात असतात, की वाचणारा व ऐकणार्‍याला उगाच तेच आपल्या मनातले आहे, असे आभास होऊ लागतात. निखिल वागळेच्या सवाल कार्यक्रमात बघितले, तर तो नेमका उलट्या टोकाचे बोलत असतो, असेच तिथल्या तिथे दिसते. कारण त्याच्या सवाल दरम्यान चाललेल्या चर्चेत बहूसंख्य लोक निखिलच्या दाव्याच्या नेमके उलट कौल देत असतात. भले असे कौल देणार्‍यांची संख्या नगण्य वा शेकड्यात असेल. पण त्यातही सिद्ध होते की करोडो वा लाखो भारतीय वा मराठी जनतेच्या वतीने बोलत असल्याचा तो आव निव्वळ सोंग असते.

   हे त्यांना कळत नाही असेही नाही. त्यांना त्यांचा खोटेपणा नेमका ठाऊक असतो. पण सतत असेच खोटे व आभासात्मक बोलत राहिले; मग सामुहिक मनावर त्याचा ठसा आपोआप उमटत असतो, असे मानसशास्त्र सांगते. हिटलरचा प्रचारमंत्री गोबेल्स म्हणायचा; सतत खोटे लोकांच्या कानीकपाळी ओरडत रहा. हळुहळू लोकांना तेच खरे वाटू लागते. त्यात तसूभर सत्य असायची गरज नाही. एकच पुरावा इथे पुरेसा ठरेल. मागल्या दहा वर्षात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी गोत्यात; अशी बातमी किमान हजार वेळातरी प्रत्येक वाहिनीने दाखवून झाली असेल. पण अजून एकदाही मोदी व्यक्तीगतरित्या कायद्याच्या कुठल्या कचाट्यात सापडू शकलेले नाहीत. पण त्यांच्यावर दंगल माजवल्याचा एकही पुरावा नसतानाही, सर्वसाधारणपणे त्यांना गुन्हेगार मानले जातेच आहे की नाही? गुजरात वा अन्य देशभरच्या चाचण्या व मतदानात मोदींना अधिक लोक कौल देतात. पण माध्यमातले मुखंड मात्र त्यांच्या विरोधातल्या बातम्या थांबू देत नाहीत. कारण त्यांना मोदी गुन्हेगार वाटतो आणि म्हणूनच ते बोलत असतात, मोदींनी देशाची माफ़ी मागितली पाहिजे. मग त्यातला देश म्हणजे कोण असतो? तर हेच माध्यमातले मुठभर लोक, ज्यांचा सामान्य जनतेशी फ़ारसा संबंध नसतो. आपल्या मनातल्या गोष्टी किंवा वैफ़ल्य, राग वा असंतोष ते जनतेच्या नावावर खपवत असतात. त्यातून देशभरच्या मुस्लिमांना मोदींच्या विरोधी उभे करण्यात तर ही माध्यमे यशस्वी झाली आहेत की नाही? तर माध्यमांचे व बुद्धीमंतांचे काम लोकशाहीत असे चालते. समाजाला वा लोकसंख्येला डिवचण्याचे व चिथावण्याचे काम हा वर्ग करत असतो. त्याच्या मनातली मळमळ, क्षोभ जनतेच्या गळी उतरवण्याचे काम हा वर्ग कुशलतेने पार पाडत असतो. साध्या  शब्दात सांगायचे तर जळावू सरपणाला अग्नी देण्याचे कार्य समाजातला बुद्धीवादी वर्ग करत असतो, सरपण जसे ज्वलनशील असते, पण आपोआप पेट घेत नाही, तसे हे लोक समाजातील अस्वस्थतेचा कुशलतेने वापर करून लोकशाही वा आधुनिक सत्तेला आव्हान निर्माण करतात. अस्वस्थ लोकसंख्येतील विध्वंसक शक्ती पेटवण्याचे काम बुद्धीवादी करत असतो. मात्र त्याने कितीही क्रांतीचा आव आणला म्हणून तो क्रांतीकारक नसतो वा क्रांतीचा समर्थक सुद्धा नसतो. तो कमालीचा मतलबी, स्वार्थी व संधीसाधू असतो.       ( क्रमश:)
भाग   ( ५४)    १३/१/१३

शुक्रवार, ११ जानेवारी, २०१३

चिथावण्या देणारेच जमावाला आरोपी का ठरवतात?


   लोक इतके अस्वस्थ का आहेत? जगात किंवा आपल्या देशात काही प्रथमच बलात्कार झालेला नाही. अगदी स्पष्ट बोलायचे तर जेव्हापासून माणसाला आपल्या शरीराच्या नग्नतेची लाज वाटू लागली, तेव्हापासून बलात्कार सुरू झाला असे म्हणता येईल. असो, तो खुप वेगळा विषय आहे. आजच्या बलात्काराबद्दल आपण बोलू. आजचा बलात्कार नवा नाही, हा मुद्दा आहे. इस्लामी आक्रमण झाले तेव्हा म्हणे महिला युद्धातल्या पराभवानंतर जोहार किंवा अन्य मार्गाने आत्महत्या करायच्या. कारण जिंकणारे येऊन आपल्यावर बलात्कार करणार हे गृहीत होते. तेव्हा बलात्कार ही किती जुनी बाब आहे ते लक्षात येऊ शकेल. अगदी त्यानंतरही ब्रिटिशांची सत्ता आल्यावर लिखीत कायदे व आधुनिक न्यायालये, पोलिस प्रशासन सुरू झाले; त्यानंतरही बलात्कार थांबलेले नाहीत. तसे कुठलेच कायदे गुन्हे थांबवू शकालेले नाहीत. तरीही नवनवे कायदे मागितले जात असतात व केलेही जात असतात. त्यासाठी प्रचंड प्रमाणात वैचारिक उहापोह चालू असतो. उर्वरित जग व जनता मुर्ख आहे, अशाच समजुतीमध्ये प्रत्येक काळातील शहाणे बुद्धीमंत नवनव्या सूचना देत असतात, शिफ़ारशी व सल्ले देत असतात. पण गुन्ह्यांना आळा बसलेला नाही. गेल्या शतकामध्ये इतके अफ़ाट संशोधन होऊन आणि वैद्यकीय वैज्ञानिक सोयीसुविधा वाढल्याने रोगराई संपलेली नाही. तीच अवस्था आपल्याला कायदे व गुन्ह्यांच्या बाबतीत दिसेल. मग एका सामुहिक बलात्काराने समाज इतका बेफ़ाम व उतावळा कशाला झाला आहे? त्याचा कायदा व न्यायावरचा विश्वास उडाला असे कोणाला वाटत असेल तर तो शहाणा मुर्खाच्या नंदनवनात वावरतो, असेच मानावे लागेल. लोकांचा आज सुखरूप जगण्यावरचा विश्वास उडाला आहे. त्यालाच अराजक म्हणतात. आपला कुणी वाली उरलेला नाही; अशी अगतिकतेची ती धारणा आहे. त्याचे प्रमुख कारण सत्ता, राजकारण, नेत्यांचा भ्रष्टाचार किंवा सरकारी अनागोंदी हे नसून बौद्धिक दिवाळखोरीने लोकांचा सुस्थिरतेवरला विश्वास उडाला आहे.

   जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात वा समाजात काही मूठभर शहाणे असतात, आणि बाकीचा पोटभरू समाज म्हणजे तिथली लोकसंख्या त्याच्या बौद्धीक क्षमतेवर विसंबून असते. असे जे मुठभर शहाणे आहेत, ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील आणि अडचणी संकटावर मात करता येईल; या विश्वासावर मोठी लोकसंख्या म्हणजे माणसांचे कळप शांततापुर्ण जीवन जगत असतात. पण जेव्हा अशा शहाण्यांच्या प्रत्येक उपाय व उत्तरातील फ़ोलपणा समोर येऊ लागतो; तेव्हाच त्या लोकसंख्येचा धीर सुटत असतो. खरे तर त्या लोकसंख्येचा प्रस्थापितावरचा विश्वास डळमळीत करण्यात हेच शहाणे पुढाकार घेत असतात. प्रस्थापित व्यवस्था, मग ती राजकीय असो किंवा सामाजिक असो, तिच्याशी सुसुत्र राहून मोठी लोकसंख्या गुण्यागोविंदाने नांदत असते. त्यामध्ये सगळे मनासारखे होतच असते असे अजिबात नाही. इकडेतिकडे होतच असते. त्यातल्या काहीसाठी पक्षपात होत असतो, तर काहीजणांवर अन्याय अत्याचार होतच असतो. तरीही कोणी ती व्यवस्था उलथून पाडायला पुढे सरसावत नाही. लोकसंख्येतील बहूतांश लोकांना ती व्यवस्था उपकारक नसली; तरी अपायकारक नाही, याचेच समाधान असते. त्यामुळेच समाधानी व सुखी नसतानाही एवढी मोठी लोकसंख्या गुण्यागोविंदाने नांदत असते. पण त्यातले काही मुठभर असे असतात, की त्यांच्या कल्पनेतील परिपुर्ण उपकारक व्यवस्था त्यांच्या अनुभवास येत नसल्याने प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात ते आवाज उठवू लागतात. त्या व्यवस्थेतले दोष दाखवून किंवा त्रुटी दाखवून लोकांना भडकवायचे व चिथावण्याचे काम ही मंडळी करीत असतात. त्यासाठी कधीकधी अतिशयोक्ती सुद्धा होत असते. पण हे असे मुठभर असंतुष्ट बुद्धीमान असल्याने सोशिक समाजाला भडकवण्याचे शब्द सामर्थ्य त्यांच्यापाशी असते. त्यातूनच सामाजिक असंतोषाचा भडका उडत असतो.  कोणाला हे ऐकून चमत्कारिक वाटेल. आपण उदाहरण घेऊन तपासू या.

   गेल्या दहा वर्षात देशातली महागाई व दरवाढ कितीपटीने झाली आहे ना? तरीही लोक जमेल तसे त्या महागाईशी जुळवून वागत जगत आहेत. माध्यमातून मात्र त्यावर अहोरात्र कल्लोळ माजवला जात असतो. लोकांच्या घरगुती बजेटचे दिवाळे वाजले, गरीबाचे कंबरडे मोडले, अशा बातम्या आपण मागल्या दहा वर्षात कितीदा वाचल्या आहेत? पेट्रोल वा इंधनाचीच गोष्ट घ्या. दुप्पट वा तिप्पट किमती वाढल्या. म्हणून कुठे दंगली उसळलेल्या नाहीत. पण बातम्या अशा येतात, की देश अख्खा धुमसतो आहे असेच कोणाला वाटेल. पण प्रत्यक्षात दोनतीन दिवस गेल्यावर सर्वत्र महागाईचा विषय संपलेला असतो. ज्या वृत्तपत्रातून आपण महागाईच्या बातम्या वाचतो, त्यांच्या महागाईचे काय? दहा वर्षात देशातील वृत्तपत्रे व माध्यमे ही एकच बाब शी आहे, की तिच्या किंमती वाढलेल्या नाहीत. त्या कशाला वाढत नाहीत? इंधनाच्या किंमती वाढल्या मग भाजी, वाहतूक, प्रवास अशा सर्वांच्या किंमतीत वाढ होते, तर वर्तमानपत्राच्या किंमतीत वाढ का होत नाही? याचा अर्थच तोट्यात वृत्तपत्रे चालविली जात असणार ना? तेवढ्यावर विषय संपत नाही. नव्याने सुरू होणारी वृत्तपत्रे दोनतीन वर्षे अर्ध्या वा पाव किंमतीत मिळण्याची हमी दिली जाते. हा काय प्रकार आहे? आपल्याला रोजच्या रोज महागाईची भिती घालणार्‍या त्याच वृत्तपत्रांना महागाई का जाणवत नाही? त्यात बसलेल्या शहाण्यांना त्यांनी काढलेले उत्पादन बाजारात महाग का होत नाही, याचा खुलासा देण्याची गरज का वाटत नाही? तर मुद्दा असा, की आपण काय वाचावे यासाठी कोणी तरी करोडो रुपये बुडवून वर्तमानपत्रे किंवा वाहिन्या चालवत असतो. त्यामध्ये असे करोडो रुपये बुडवून त्याला काय मिळणार असते? अशा तोट्यात त्याचा काय फ़ायदा असतो?

   त्यातून मग त्याला जनमानसावर प्रभूत्व गाजवता येत असते. आपण लोकांना भडकावू शकतो आणि प्रस्थापित व्यवस्थेला हादरे देऊ शकतो; अशी चटकन नजरेत न भरणारी ताकद त्या गुंतवणूकीतून कमावता येत असते. त्यासाठी अब्जावधी रुपये गुंतवून माध्यमांवर कब्जा केला जात असतो. मग अशा माध्यमात बसलेल्या शहाण्यांना मोठे पगार, गाड्या व अन्य चैनीच्या बाबी पुरवून माध्यमातले गुंतवणूकदार लोकमतावर हुकूमत निर्माण करत असतात आणि त्यात त्यांना मुठभर शहाणे सहाय्य करत असतात. तो प्रभाव निर्माण करण्यासाठी अत्यंत कुशल व कुशाग्र बुद्धीने लोकांना आधी त्यांच्यावर अन्याय होतो आहे, अशी बोचणी निर्माण करावी लागते. ती झाली मग त्याच जखमेवर मीठ चोळून त्याला भडकवणे सोपे असते. जेव्हा असा संतप्त जमाव निर्माण होतो, तेव्हा प्रस्थापित सत्ता व राजकारण भयभीत होते. मग ती सत्ता त्या जनमताला आटोक्यात आणायचे उपाय शोधू लागते. तो उपाय म्हणून मग तीच माध्यमे पुढे येतात. आम्ही लोकांना भडकावले आम्हीच त्यांना खच्ची करू शकतो, अशी मग सौदेबाजी होत असते. सहाजिकच जी माध्यमे सर्वसामान्य लोकांना अन्याय झाला म्हणून चिथावण्या देतात, तीच मग लोक रस्त्यावर उतरले तर, त्याच जमावावर अराजक वा दंगलखोर असाही आरोप करण्यात पुढे दिसतील. अण्णा हजारे असोत, की रामदेव असोत, केजरिवाल असोत की परवाच्या दिल्लीतील बलात्कारानंतर उमटलेली प्रतिक्रिया असो. त्यात माध्यमे व पत्रकारांची भूमिका तपासून बघण्यासारखी आहे.

   आरंभी तो सामुहिक बलात्कार म्हणजे दिल्लीत कोणाचे जगणे सुखरूप राहिले नाही, असा ओरडा करणारी माध्यमेच होती. लाखो लोकांचा धीर सुटावा अशा बातम्या कोणी दिल्या होत्या? त्या वाचून वा ऐकून लोकांनी सत्तेला व पोलिसांना धन्यवाद द्यावेत, अशी कुठल्या संपादकाची अपेक्षा होती काय? नसेल तर मग इतक्या भडक बातम्या देण्याची व लोकांना चिथावण्या देण्याची गरज काय होती? पण ती दिली गेली आणि लोक रस्त्यावर उतरले, तेव्हा भयभीत सरकारने त्याच माध्यमांचा धावा केला आणि तीच माध्यमे आता निदर्शने पु्रे झाली; अशी भाषा बोलू लागली. कारण शहाण्य़ांना सत्तेला भयभीत करायचे असते. पण सत्ता उलथून मात्र पाडायची नसते. कारण त्याच सत्तेमध्ये व प्रस्थापित व्यवस्थेमध्ये शहाण्य़ांचे हितसंबंध, स्वार्थ गुंतलेले असतात. त्या गरीबाचे जिणे असह्य झालेले असले, तरी शहाण्यांचे जीवन सुखवस्तू व सुखरूप असते. व्यवस्थाच उलथून पाडली गेली तर सत्ताधार्‍यांसोबत प्रस्थापित शहाण्यांचे प्रभूत्वही धोक्यात येणार असते. म्हणूनच चिथावणी देऊन जनतेला रस्त्यावर यायला भाग पाडणारेच मग मतलब साधला की त्याच जमावाला अराजक म्हणून त्याची निर्भत्सना करू लागतात. कारण बुद्धीजिवी बहुतांशी आश्रीत मनोवृत्तीचा असतो, क्रांतीकारी नसतो, तो शब्दवीर असतो, क्रांतीवीर नसतो. जेव्हा क्रांती दिसू लागते तेव्हा शब्दवीर सर्वात अधिक भयभीत होतो. बुद्धीवाद्यांना पुस्तकातली क्रांती हवी असते. जनजीवनात आमुलाग्र बदल घडवून आणणारी क्रांती बुद्धीवादी वर्गाला कधीच नको असते. गेल्या काही वर्षात बुद्धीवाद्यांचा तो मुखवटा आंदोलनांनी फ़ाडला आहे.  ( क्रमश:)
भाग   ( ५३)    १२/१/१३