सोमवार, १७ डिसेंबर, २०१२

शिवसेना शाखाप्रमुखाचा माझ्यावरचा हल्ला


   येत्या ६ जानेवारीला पत्रकारदिन आहे. अनेकांचे मला फ़ोन त्यानिमित्ताने आले. तसे दरवर्षी येतात. त्या दिवशी अनेक पत्रकार संघटनांना पत्रकारितेवर भाषण करू शकेल असा वक्ता हवा असतो. पण मला घरगुती अडचणीमुळे या वर्षी कुठे जाणे शक्य नाही. पण गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी पत्रकारदिनाच्या निमित्ताने वा अन्य दिवशी मी या विषयावर व्याख्याने दिलेली आहेत. अशावेळी माझी पत्रकारितेविषयीची भूमिका अनेकांना चकित करून जाते, कारण पत्रकारांवरील हल्ल्याचे समर्थन करणारा बहुतेक मी एकमेव पत्रकार असावा. त्यामुळेच जिथे व्याख्यान, भाषणाला जातो; तिथे मला त्याविषयी अगत्याने प्रश्न विचारला जातोच. मी पत्रकार असून पत्रकारांवरील हल्ल्याचे समर्थन का करतो; असा तो प्रश्न आहे. आणि माझे उत्तर दरवेळी सोपे व साधेसरळ आहे. मी त्रेचाळीस वर्षे पत्रकार आहे आणि एक अपवाद करता माझ्यावर कोणी कधी हल्ला केला नाही, की मला धमक्या दिलेल्या नाहीत. आणि ज्यांच्यावर असे हल्ले झालेत, त्यांनी पत्रकारितेच्या मर्यादा पाळलेल्या नाहीत; असे मला स्पष्टपणे माहित आहे. मग तुम्हाला कशाला संरक्षण पाहिजे असा माझा सरळ साधा सवाल आहे. कोणीही अगदी कोणत्याही कारणास्तव उगाच कोणावर हल्ला करीत नाही, असा माझा अनुभव आहे. गुंडाला गुंड म्हटले किंवा भ्रष्ट असतो त्याला भ्रष्ट म्हटले म्हणून तो तुमच्यावर कधी हल्ला करत नाही. मग पत्रकारावर त्याच्या अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासाठी कोण कशाला हल्ला करील? याचा दुसरा अर्थ असा, की तुमच्यावर हल्ला झाला आणि तुम्ही पत्रकार आहात; म्हणून तो अविष्कार स्वातंत्र्यावरचा हल्ला होत नाही. तसा तर माझ्यावरही हल्ला झालेला होता आणि एका शिवसेना शाखाप्रमुखाने हल्ला केलेला होता. पण मी त्याच्याविरुद्ध व्यक्तीगत तक्रार केली होती. अगदी पत्रकार संघाने त्यात हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला; तो मी स्पष्ट शब्दात नाकारला होता. त्याचे कारण माझ्यावर जिथे हल्ला झाला; तिथे मी खाजगी कामासाठी गेलो होतो आणि ज्याने हल्ला केला तो शाखाप्रमुख मला परिचित होता. हल्ला एका बातमीसाठीच त्याने केला होता. तरीही त्याला मी पत्रकारितेवरचा हल्ला मानला नाही. बातमी होती ‘बंडूचे बंड’.

   १९७४ सालात मध्यमुंबईचे खासदार रा. धो. भंडारे यांची बिहारचे राज्यपाल म्हणुन नेमणूक झाली. त्यामुळे तिथे पोटनिवडणूक लागली होती. शिवसेनेचे वर्चस्व असलेला हा बालेकिल्ला. त्यामुळे ती पोटनिवडणूक लढवावी अशी शिवसैनिकांची अपेक्षा होती. पण कॉग्रेसने तिथे रामराव आदिक यांना उमेदवारी दिली आणि शिवसेनेकडून कुठलीच हालचाल नव्हती. दुसरीकडे गिरणी संप जोरात होता. त्याचे नेतृत्व कम्युनिस्ट पक्षाचे वयोवृद्ध नेते कॉम्रेड डांगे करत होते. त्यांनी संपाचा लाभ उठवण्यासाठी तिथे आपली कन्या रोझा देशपांडे यांना उभे केले. तरीही शिवसेनेच्या गोटात शांतता होती. अखेर उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपण्याचा दिवस जवळ येत गेला; तसा काही शिवसैनिकांचा धीर सुटत गेला. त्यात कम्युनिस्टांशी लालबागमध्ये दोन हात करणार्‍या शाखाप्रमुख बंडू शिंगरे याचा समावेश होता. त्यांनी उमेदवारासाठी अट्टाहास सुरू केला. तेव्हा शिवसेनाप्रमुखांना मौन सोडून स्पष्ट नकार देण्याची वेळ आली. मग कृष्णा देसाई खटल्यातले आरोपी सो्डवण्याचा सौदा झाल्याच्या बातम्या आल्या आणि बदल्यात सेनेने कॉग्रेसच्या रामराव आदिक यांना पाठींबा दिल्याच्या बातम्या होत्या. त्यातून बरीच खळबळ उडाली. तेव्हा शिंगरे याने बंड पुकारून लालबागची शाखा बरखास्त केली आणि हिंदूसभेतर्फ़े विक्रम सावरकर यांची उमेदवारी जाहिर केली. त्याच संदर्भात मी ‘बंडूचे बंड’ अशी बातमी दै. ‘मराठा’मध्ये दिली होती. त्यानंतर दोन दिवसांनी मी नायगाव दादर येथे मित्राला भेटायला गेलो असताना; तिथला शाखाप्रमुख प्रभाकर भूमकर येऊन त्या बातमीवरून माझ्याशी हुज्जत करू लागला. मी त्याला समर्पक उत्तरेही दिली. पण तो कमालीच चिडला होता. त्याने दोन लाफ़ा मारल्या आणि अन्य लोक मध्ये पडल्याने विषय तिथेच थांबला. मी त्याच्या विरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्याला अटक झाली आणि परिसरात त्याची बोंब झाली. बहुतांशी तिथले शिवसैनिक मला ओळखत होते. त्यांनाही ही बातमी कळली व ते नाराज झाले. त्यांनी आपली नाराजी लपवली नाही. मी त्या शिवसैनिकांना भेटलो नव्हतो किंवा त्यांना माझी बाजू समजावली सुद्धा नव्हती. पण त्यांनीच शाखेत बैठक घेऊन या हल्ल्याचा निषेध केला आणि त्यानंतर शाखाप्रमुख बदलण्याची प्रक्रिया झाली. त्याचा माझ्या तक्रारीशी काही संबंध नव्हता. भूमकरनेही नंतर शरमिंदा होऊन माझी माफ़ी मागितली.

   माझ्या तक्रारीबद्दल मी कोणाला सांगितले नव्हते. पण एक छोटीसी बातमी ‘मराठा’मध्ये छापली होती. त्यावरून पत्रकार संघाने शरद पवार यांची भेट घेण्याबद्दल मला पत्र पाठवले होते. तेव्हा पवार गृहखात्याचे तरूण  राज्यमंत्री होते. माझा मित्र कुमार कदम पत्रकार संघात कार्यरत होता. मी त्याला सांगून तशी भेट घेण्याचे व त्यावरून राजकारण करण्याचे कारण नसल्याच स्पष्ट केले. तो विषय तिथेच संपला होता. डोके शांत झाल्यावर भूमकरनेही माफ़ी मागितली होती. मग मी त्याचे भांडवल करणे हा शुद्ध बनवेगिरीचा प्रकार झाला असता. त्याच्या पक्षनिष्ठेच्या अतिरेकामुळे त्याच्याकडून मुर्खपणा झालेला असेल. पण म्हणून त्याला कायद्याच्या कचाट्यात अडकवणे, ही सूडबुद्धी झाली आणि अशा सूडबुद्धीच्या आहारी जाण्याला मी बुद्धीवाद मानत नाही. शिवाय शिवसैनिकांनीच थेट कारवाई केली होती. इथे एक विषय वा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. चुक करणार्‍याला सुधारण्याची संधी देण्यात बुद्धीवाद असतो आणि चुकला वा कचाट्यात सापडला; म्हणून त्याला गोत्यात घालण्याची सूडबुद्धीला पेटलेली इर्षा कुठल्या नामचिन गुंड गुन्हेगारापेक्षा वेगळी नसते. भावनेच्या भरात भूमकरसारखा शिवसैनिक अतिरेक करतो, तेवढीच संधी घेऊन मी सुद्धा सुडाने वागणार असेन; तर त्याच्या बेभानपणात आणि माझ्या सूडभावनेत काय फ़रक राहिला? तो आपल्या शारिरिक वा मनगटी बळावर गुंडगिरी करतो आणि मी पोलिस व कायद्याच्या बळावर दादागिरीच करत असतो ना? सुडबुद्धी कुठल्याही स्वरूपाची असो, तो बुद्धीवाद नसतो; तर गुंडगिरीच असते. मला ती गुंडगिरी करण्यात रस नव्हता आणि कधीच नसतो. म्हणूनच मी पत्रकारांवर हल्ले होतात वा माझ्यावर हल्ला झाला; त्याने अजिबात विचलित झालेला नव्हतो. कारण तो विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला वगैरे काहीही नसतो. तेवढ्यापुरता चिडलेल्या व्यक्तीची ती संतप्त प्रतिक्रिया असते. ती ओळखून तेवढ्याच प्रगल्भ संयमाने त्याला सामोरे जाण्याची हिंमत व सामंजस्य तुमच्यापाशी असले पाहिजे. अन्यथा बुद्धीवादी वा वैचारिक लढाईची भाषा पोकळ व भंपक असते.

   त्यानंतर वा आजपर्यंत मी अनेकदा शिवसेनेसह कुठल्याही राजकीय पक्ष व नेत्यांवर कडवट टिका केलेली आहे. पण कोणी माझ्यावर हल्ला केलेला नाही, की कुणी धमकी सुद्धा दिलेली नाही. त्याचे कारण वेगळे आहे. मी पक्षांवर किंवा नेत्यांवर अत्यंत कडवट टिका जरूर करतो, पण त्यातून त्याची शिकार करण्याचा माझा दुष्ट हेतू कधीच नसतो. खुनशी भाषा व इजा करण्याचा हेतू, कुणालाही सहज कळतो. त्यामुळेच टिका आणि बदनामी यातला फ़रक ज्यांना कळतो, ते टिका असेल तर तुमच्यावर कधी हल्ला करणार नाहीत. मात्र तुम्ही बदनामीच्या मोहिमा चालवणार असाल, तर तुम्ही दुसर्‍याला इजा करत असता आणि त्याचा कुठल्याही अविष्कार स्वातंत्र्याशी संबंध नसतो. तुम्ही लेखणीची ताकद कोणाच्या राजकीय व्यक्तीमत्वाला इजा करण्यासाठी वापरणार असाल; तर त्यालाही त्याची असेल ती ताकद तुम्हाला इजा करण्यासाठी वापरण्याची मुभा असली पाहिजे; असे माझे स्पष्ट मत आहे. आणि म्हणूनच पत्रकार म्हणून खास कुठले संरक्षण देणे किंवा मागणे मला मान्य नाही. बोचरी टिका आणि डिवचण्याचा किंवा कळ काढण्याचा प्रयास; यात जमीन अस्मानाचा फ़रक असतो. जो कोणी कळ काढायचा उद्योग करील; त्याला कोणी प्रतिक्रिया म्हणून मारहाण केली, तर तो सुद्धा मी अविष्कारच मानतो. आणि ज्याला दुखले आहे, त्याला जे साधन व माध्यम उपलब्ध आहे; त्यातूनच तो अविष्कार करणार ना? मग त्याच्या विरुद्ध बोंब ठोकणारे स्वत:च अविष्कार स्वातंत्र्याने दुष्मन नाहीत का? माझ्या हातात लेखणी आहे म्हणून मी ते साधन खुनशी पद्धतीने वापरत असेन आणि ज्याच्या हातात दगड आहे, त्याने त्याचाही त्याच्या अविष्कारासाठी वापरण्याचे स्वातंत्र्य त्याला का नसावे?      (क्रमश:)
भाग   ( २९ )    १८/१२/१२

रविवार, १६ डिसेंबर, २०१२

निखिल ‘वागळेच्या दुनियेतील’ खरकटी पंगत



     माझ्या लेखात आणि लिखाणात नेहमी विद्वान, विचारवंत किंवा विश्लेषकांचा उद्धार असतो, असा एक आक्षेप आहे. तो रास्तही आहे. कारण मला अशी माणसे समाजाचे प्रबोधन करणारी असावित असे वाटते. आणि खरे विचारवंत, बुद्धीमंत ते काम नेहमीच करत आलेले आहेत. पण त्यांना तसा आव आणून मिरवण्याची कधी गरज भासत नाही. आपण हिरो आहोत असा आभास निर्माण करण्यासाठी कुणाकडे व्हीलन म्हणजे खलनायक; म्हणून बोट दाखवावे लागत नाही. ज्यांना तसेच करावे लागते, त्यांना वास्तव सांगायचे नसते; तर कथाकथन करायचे असते. आणि कथानकामध्ये मग स्वत:ला किंवा कोणाला हिरो वा नायक म्हणून उभे करायचे असेल; तर खलनायकही आवश्यक असतो. तसा ही मंडळी विचार सांगणे सोडून खलनायकाची कथा सांगू लागतात आणि त्यातून स्वत:ला नायक म्हणून पेश करतात. मात्र काळाच्या ओघात असे नायक टिकत नाहीत. उलट त्यांनीच रंगवलेले खलनायक इतिहासाच्या कसोटीवर नायक म्हणून जगाने स्विकारलेले असतात. बाळासाहेब ठाकरे हा असाच एक सेक्युलर माध्यमांनी व विचारवंतांनी रंगवलेला खलनायक होता. मात्र प्रत्यक्षात आयुष्याच्या अखेरीस तोच नायक म्हणून समोर आल्यावर; अनेक समकालीत विचारवंताची तारांबळ उडालेली आहे. डाव्या सेक्युलर विचारवंत व नेत्यांच्या नाकर्तेपणाने शिवसेनेला जन्म दिला किंवा पोषक परिस्थिती निर्माण केली; हे सत्य आजवर त्यापैकी कोणी कधी बोलायची हिंमत केली नाही. पण आता ते सविस्तर सांगायचा उद्योग मी नव्याने करू लागल्यावर; काही शहाणे त्यातले खरकटे उचलून ताव मारू लागले आहेत. कायबीइन लोकमतचे ‘दर्डा’वणारे संपादक निखिल वागळे, त्याच खरकट्या पंगतीतले असल्याचे एका वाचकाने मला लक्षात आणून दिले. म्हणुन त्याची दखल घेणे भाग आहे.

   बाळासाहेबांना जाऊन आज एक महिना पुर्ण झाला. मध्यंतरी त्यांच्या संबंधाने खुप काही लिहिले व बोलले गेले आहे. त्यात निखिल व कायबीइन लोकमतचा वाटा देखिल होता व आहे. १८ नोव्हेंबरला तर संपुर्ण दिवस त्याने चराट लावलेले होते. पण अंत्ययात्रा संपल्यावर; आपल्या मनातले गरळ ट्विटरवर ओकले आणि लोकांनी शिव्या घातल्यावर ते पुसूनही टाकले. असो, मुद्दा इतकाच, की ती गरळ आपल्या वहात्या वाहिनीवर ओकायची हिंमत का नव्हती? की कोणी तरी ‘दर्डा’वेल आणि बाहेरचा रस्ता दाखवेल या भितीपोटी निखिलने आपल्या आविष्कार स्वातंत्र्याचा गळा स्वत:च दाबला आणि मालक व टीआरपीला शरण गेला होता? नसेल तर ट्विटरवर लिहिले, तेच वाहिनीवर बोलायची हिंमत का केली नाही? कारण त्याच्यात कधीच खरी हिंमत नव्हती. रोडरोमियो जेसे गर्दीचा फ़ायदा घेऊन मुलींची छेड काढण्यात पुरुषार्थ शोधतात, तशी निखिलची हिंमत. त्यामुळे खरेच मार खावा लागेल, अशी शक्यता असली; मग त्याने प्रत्येकवेळी शेपुट घालून पळ काढलेला आहे. अंत्ययात्रेच्या दिवशी ती गरळ जाहिरपणे ओकली असती, तर तोच लक्षावधीचा जनसागर स्टुडीओवर चाल करून आला असता आणि वाचवायला पोलिसही मोकळे नव्हते. त्यामुळेच ‘लागलेली दाबून’ ठेवावी, तशी त्याने गरळ दाबून ठेवली आणि मोकळी सवड मिळताच ट्विटरवर स्वत:ला ‘मोकळे’ करून घेतले. त्याच्याबद्दल इंटरनेटवर बर्‍याच लोकांचे मेसेज फ़िरत होते. मी त्याची दखल घेतली नाही. पण आता महिनाभर उलटल्यावर त्याने ब्लॉग लिहिला असून; बाळासाहेबांबद्दल मुक्त चिंतन केल्यासारखे काही लिहिले आहे. त्याचे ते मत असायला कोणाची हरकत नाही. पण त्यात जे पांडित्य शिवसेनेच्या स्थापनेबद्दल त्याने सांगायचा प्रयत्न केला आहे; ते माझ्या ‘उलटतपासणी’तून उचलेले खरकटे असल्याचे एका चाणाक्ष वाचकाने नजरेस आणून दिल्याने, त्याची दखल घेणे मला भाग आहे. शिवसेनेची स्थापना व राडासंस्कृतीसह तात्कालीन राजकीय घडमोडीचा मी जो उहापोह केला आहे, त्याकडे आजवर कोणा राजकीय सेक्युलर विचारवंताने डोळसपणे बघायचे कष्ट घेतलेले नाहीत. निखिलपाशी तेवढी अभ्यासू वृत्तीच नाही. असे असताना त्याने सेनेच्या स्थापने वेळचा डाव्या राजकारणाचा संदर्भ अचानक कुठून द्यावा? आणि तेवढे त्याचेच निरिक्षण होते, तर १७/१८ नोव्हेंबरला जे चराट अखंड चालू होते, त्यात त्याचा उल्लेख कशाला येऊ शकला नाही? आधी निखिल ब्लॉगवर काय लिहितो वाचा....

   ‘राज्याच्या राजधानीत आपली कोंडी होत असल्याची भावना मराठी समाजाच्या मनात निर्माण झाली. याला सत्ताधारी काँग्रेसकडेही उत्तर नव्हतं आणि डाव्या पक्षांकडेही. वास्तविक संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचं नेतृत्व या डाव्या पक्षांकडेच होतं. त्यांनी मराठी माणसाला अशाप्रकारे कळत नकळत वार्‍यावर सोडायला नको होतं. पण राष्ट्रीय राजकारणाच्या रेट्यात मराठी अस्मितेचा मुद्दा मागे पडला. काँग्रेसला तर सोयरसूतकच नव्हतं. ‘मार्मिक’चे संपादक असलेल्या बाळ ठाकरेंनी नेमका हाच मुद्दा उचलला. त्यावेळी ‘मार्मिक’मध्ये टेलिफोन डिरेक्टरीतल्या याद्या प्रसिद्ध व्हायच्या. त्यातील अमराठी माणसांची बहुसंख्या मराठी तरुणांना चकित करून सोडायची. ‘वाचा आणि थंड बसा’ असा सुरुवातीला या मालिकेचा मथळा होता. मालिका लोकप्रिय झाल्यावर तो ‘वाचा आणि पेटून उठा’ असा झाला. त्याला मराठी तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. हळूहळू बाळ ठाकरे नावाच्या व्यंगचित्रकाराच्या सभांनाही गर्दी होऊ लागली.’

   आजवर त्याने कधी हे ‘मराठी तरूणाला वार्‍यावर डाव्यांनी सो्डण्याची’ भाषा वापरली आहे काय? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे नेतृत्वच डाव्यांकडे होते आणि त्यांनीच मराठी तरूणांचा व मराठी माणसांचा राज्यस्थापने नंतर पुरता भ्रमनिरास केला, हे आजवर कुठल्या सेक्युलर डाव्या लेखक, विचारवंत, पत्रकार वा विश्लेषकाने सांगितले आहे काय? कुठे लिहिले तरी आहे काय? पहिल्या दिवसापासून शिवसेना ही कॉग्रेसची बटीक व वसंतराव नाईकांनी कम्युनिस्ट पक्ष व कामगार चळवळीची आक्रमकता मोडण्यासाठी काढलेली वसंतसेना; अशी्च डाव्या पक्ष व लेखकांकडून झालेली टवाळी व चिंतन आहे. आपल्या दोनतीन दशकांच्या पत्रकारीतेत अनेकदा शिवसेनेवर लिहितांना, निखिलने तरी कधी शिवसेनेत आलेल्या त्या आरंभीच्या तरूणांचा डावे पक्ष व समितीने भ्रमनिरास केला; असे का सांगितले नव्हते? कारण त्याला त्यातले काही माहितीच नव्हते. आणि पत्रकार म्हणून जन्माला आल्यापासून शिवसेनेच्या विरोधात मिळेल ते शब्द, वाक्ये, खरकटे पक्वान्न म्हणून ताव मारण्यातच पत्रकारिता; अशी त्याने समजूत करून घेतलेली. मग प्रथम दाक्षिणात्यांचा द्वेष, मग भय्यांचा किंवा मुस्लिमांचा द्वेष ठाकरेंनी रुजवला; अशी तोंडपाठ वाक्ये रट्टा मारून लिहायची ‘सवय लागली, जडली वेडी प्रीत’ तशी निखिलची पत्रकारीता. इथेही सत्य बोलायची तयारी नाही. ज्या मराठी तरूणाला डाव्यांनी वार्‍यावर सोडले असा दावा आहे, तो काय सभ्य, साळसूद वा सुसंस्कृत होता काय? ज्याला निखिल वा तत्सम मंडळी आयुष्यभर राडासंस्कृती म्हणत आले, त्यात पारंगत असाच तो (डाव्यांनी वार्‍यावर सोडलेला) तरूण होता. म्हणजे ज्याच्यासाठी बाळासाहेबांवर आरोप होतात, त्या राडासंस्कृतीचे जनक मुळात डावे पक्षच होते. त्याबद्दल मात्र निखिल मौन पाळणार. एवढ्यासाठी मी विचारवंत म्हणून मिरवणार्‍या खोटारड्यांवर चिडतो. मुर्खांना धड खोटेही बोलता येत नाही.

   डाव्यांनी वार्‍यावर सोडलेल्या मराठी तरूणांना शिवसेनेच्या रुपाने पर्याय मिळाला. म्हणून त्यांना दगड मारायला वा मोडतोड करायला शिवसेनाप्रमुखांनी काही शिबीरे घेऊन प्रशिक्षण दिलेले नव्हते. त्या तरूणांना त्याचे प्रशिक्षण डाव्यांच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतच मिळालेले होते. आपल्या विरोधकांची तोंडे बंद करायला शिवसेनाप्रमुखांनी ते प्रशिक्षित तरूण वापरले. आणि त्याचा सर्वोत्तम साक्षिदार कोणी मराठी माणुस नाही; तर कृष्णा देसाईचा खुन झाल्यानंतर शिवसेनेत आलेला एक समाजवादी झुंजार कार्यकर्ता होता. मात्र योगायोगाने तो निखिल वागळे यांना प्यार असलेल्या समाजवादी पक्षातला खंदा कार्यकर्ता होता आणि पारशी होता. त्याचे नाव दादी गोवाडीया असे होते. त्याने तर मधू दंडवते यांच्यापासून तमाम समाजवादी नेत्यांची त्यावेळी जाहीर सभांमधून अब्रूच काढली होती. आणि त्याच्याही पलिकडली गोष्ट म्हणजे समाजवादी असूनही हा पारशी शिवसेनेत आला, तो तिच्या राडासंस्कृतीसाठी. पण यातले काही निखिल किंवा त्याच्या खरकट्य़ा पंगतीमध्ये येऊन बसणार्‍यांना माहितच नसेल; मग त्यांनी बिनबुडाच्या गोष्टी सांगितल्या तर नवल कुठले?    (क्रमश:)
भाग   ( २८ )    १७/१२/१२

पुराणमतवादी आणि उदारमतवादी


    ठाण्यात शिवसेनेने पहिली निवडणुक यशस्वीरित्या जिंकली आणि त्यांना मुंबईतील महापालिकेचे वेध लागले होते. ह्या निवडणूका विधानसभा लोकसभेच्या नंतर साधारण आठदहा महिन्यांनी झालेल्या असाव्यात. मला आता नेमके आठवत नाही. पण दोन निवडणूकांच्या निकालातली तफ़ावत बदलत्या काळाची चाहूल होती. ज्या गिरणगावातून कम्युनिस्ट पक्षाचा एक खासदार लोकसभेत व तीन आमदार विधानसभेत जाऊन पोहोचले होते, तिथेच त्या पक्षाचे आणि एकूण मुंबईत संपुर्ण महाराष्ट्र समितीचे पानिपत होऊन गेले. हा इतका बदल झटपट का झाला; याचा विचार शिवसेनेने करायची गरज नव्हती. कारण तमाम पत्रकार, जाणकारांसह विचाराधिष्ठीत पक्षांच्या दृष्टीने शिवसेना ही विचारशून्य संघटना होती ना? मग तिने वा तिच्या नेतृत्वाने यश वा अपयशाचा विचार तरी कसा करायचा? पण ज्यांना आपण महान विचारांचे अनुयायी आहोत व आपला अवतारच समाजाचा उद्धार करण्यासाठी झाला आहे असे भ्रम कायम झालेले असतात; त्यांनी त्या निकालांचा विचार करायला नको होता काय? ज्यांच्याकडे कुठला कार्यक्रम नाही, वैचारिक बैठक नाही किंवा वि्चारसरणी नाही; त्या शिवसेनेकडे अवघ्या काही महिन्यात तोच मतदार का वळला होता? ज्याने सार्वत्रिक निवडणुकीत डाव्यांना साथ दिली होती, कम्युनिस्ट आमदार व खासदार निवडून दिले होते, तो गिरणगावातला डाव्यांचा बालेकिल्ला असा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे का ढासळावा? पण तसे झालेच नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने डाव्यांच्या डोक्यात हवा गेली होती आणि वास्तुस्थिती बघण्यापेक्षा ते आपल्या सिद्धांतामध्ये इतके मशगुल होते, की त्यांना लोकमत बदलते आहे; याची जाणिवच होत नव्हती.

   शिवसेना म्हणजे वसंतसेना, कॉग्रेसची बटीक असे शेलके शब्द वापरले, मग त्यांचे वैचारिक विश्लेषण संपत होते. आणि गंमत बघा, आज त्याला पंचेचाळीस वर्षे उलटून गेली, तरी तिसर्‍या पिढीतल डावे तेवढ्याच उत्साहात त्यावेळच्या घडामोडींचे तसेच आकलन सांगत असतात. त्याचे कारणही आहे. पुराणमतवादी आणि क्रांतीकारक डाव्या विचारांचे लोक; यांच्यात एक समान सुत्र बघायला मिळते. पुराणमतवादी असतात, त्यांच्या मते धर्मग्रंथामध्ये जे सांगितलेले आहे, त्याप्रमाणेच विश्वातल्या सर्व घडामोडी घडत असतात. तो इश्वरी संकेत असतो. त्यात माणूस कसली ढवळाढवळ, हस्तक्षेप करू शकत नाही. ईश्वरेच्छा बलियसी. सर्वकाही ठरलेले आहे. याला डावे विचारवंत पोथीनिष्ठा किंवा भाकडकथा असे म्हणतात. पुराणमतवाद म्हणून हिणवतात. पण म्हणुन डाव्यांचे तरी आकलन वा विश्लेषण वेगळे असते का? त्यांचा पोथ्यापुराण वा धर्मग्रंथावर विश्वास अजिबात नाही. पण त्यांच्या स्वत:च्या काही पोथ्या पुराणे आहेत आणि जगात घडणारी प्रत्येक गोष्ट त्यातील सिद्धांतानुसारच घडते; यावर त्यांची एखाद्या भाविकासारखी नितांत श्रद्धा असते. धर्ममार्तड व श्रद्धाळू हजार बाराशे वर्षे जुन्या पोथ्यांचे हवाले देत असतात, तर डावे विचारवंत दिडदोनशे वर्षे जुन्या पोथ्यांचे हवाले देत असतात. इतकाच काय तो फ़रक आहे. बाकी दोघांचा आव आणि आवेश सारखाच असतो. डाव्यांच्या अभ्यासू मतानुसार जायचे; तर मार्क्सच्या विश्लेषण आकलनापुर्वी जग अस्तित्वातच नव्हते. आणि समजा अस्तित्वात असेलच; तर त्यातली प्रत्येक घटना मार्क्सने सांगितली त्याप्रमाणेच घडलेली असणार. त्याबद्दल शंका घेणार्‍याला डाव्या चळवळीत स्थान असू शकत नाही. ‘हे जगभरच्या कामगारांनो’ असे आवाहन मार्क्स करतो. तर धर्मांचा प्रेषित, ‘हे श्रद्धावंतानो’ असे आवाहन करतो. मार्क्सचे आवाहन काय वेगळे आहे? जितके धर्म तत्वज्ञान व आडाखे दोनचार हजार वर्षात फ़सलेले आहेत, तेवढेच डाव्या उदारमतवाद व क्रांतीविषयक तत्वज्ञानाचे आडाखे चुकलेले आहेत. पण दोन्ही बाजू सारख्याच ‘आपणच खरे’ ठरल्याचे दावे करताना दिसतील. शिवसेनेच्या बाबतीत डाव्यांची तीच फ़सगत तेव्हा झाली आणि अजून ते त्यातून बाहेर पडू शकलेले नाहीत.

   आपला बालेकिल्ला असलेल्या गिरणगावात शिवसेना नावाचे वादळ घोंगावते आहे, तर त्याचे कारण काय; अशी मिमांसा डाव्यांना करावीशीच वाटली नाही. मार्क्सने लुंपेन क्लासची व्याख्या दिलेली आहे किंवा अन्य काही सांगितलेले आहे; त्यातच त्यांनी शिवसेनेला बसवण्याचा सोपा मार्ग अनुसरला. सत्याला तुम्ही नाकारू शकता, पण टाळू शकत नाही. म्हणूनच सत्याला सामोरे जाण्याखेरीज काही पर्याय नसतो. म्हणूनच आपल्या जवळपासची मुले अचानक शिवसेनेच्या प्रेमात का पडली; हे रहस्य डाव्यांनी शोधण्याची गरज होती. कारण सावळाराम पाटकर किंवा गुलाबराव गणाचार्य असे कम्युनिस्ट आमदार हे सामान्य घरातले कार्यकर्ते होते. आर्थररोड नाक्यावर असलेल्या केरमानी मॅन्शन या चाळीच्या एका छोट्या खोलीत वास्तव्य करणारे गुलाबराव; सतत त्या मुलांच्याच सहवासात होते. त्याच इमारतीमधली मुले पुढे तरूण झाल्यावर विद्यार्थी उत्कर्ष मंडळ चालवायची. त्या मुलांना वळण लागावे, त्यांच्यावर संस्कार व्हावेत; म्हणुन त्यांना संघ शाखेवर पाठवण्याचे काम कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य नावाच्या कम्युनिस्ट आमदाराने केले, यावर आज कोणी विश्वास ठेवील काय? मुलांना संस्कार मिळावेत, शिस्त लागावी अशी इच्छा असल्यानेच त्यांनी असे केले असेल. म्हणून संघाच्या शाखेत गेलेली सगळीच मुले काही पुढे हिंदूत्ववादी झाली नाहीत. पण मुद्दा इतकाच, की राजकीय मतभेद असूनही दुसर्‍या संघटनातले चांगले गुण वा उपयुक्तता यांचा आदर करण्याची भावना सर्वात होती. तत्वत: एकमेकांचे विरोध केले जायचे. पण द्वेषभावना त्यात नसायची. अशी ही आपल्याच सहवासातील मुले अचानक शिवसेनेच्या नादाला का लागली; त्याचा शोध घेण्याची गरज डाव्यांना वाटली नाही. तिथेच त्यांची मतदाराशी असलेली नाळ तुटत गेली. पण जुनी पिढी मात्र त्यांच्याबरोबर टिकून होती आणि त्यांच्यातही हळूहळू बदल होत चालला होता.

   तेव्हा मतदाराचे वयसुद्धा तरूण झालेले नव्हते. आज अठराव्या वर्षी मतदान करता येते. पण त्यावेळी एकविसाव्या वर्षी माणूस मतदानाला पात्र व्हायचा. त्यामुळे शिवसेनेमध्ये असलेल्या बहुतांश तरूणांना मुळात मतदानाचा अधिकार मिळालेला नव्हता. तरीही त्यांच्यातला ओसंडून जाणारा उत्साह प्रचारापासून प्रत्येक बाबतीत दिसायचा. भिंती रंगवण्यापासून प्रचारफ़ेर्‍या काढण्यापर्यंत धमाल असायची. संख्येची ताकद दाखवण्यात शिवसेना आघाडीवर असायची. घरातले कार्य असल्यासारखी ही मुले का राबतात, हे शहाण्यांनी शोधणे आवश्यक नव्हते का? लोकसभा निवड्णूकीत इशान्य मुंबईत गेलेला तरूण आता त्याच्या भागात निवडणुकीला सज्ज झाला होता. मात्र उमेदवार कोणी व्हायचे अशी समस्या होती. वक्ते ही सेनेची मो्ठी समस्या होती. ठाण्याची स्वतंत्र निवडणुक लढवताना, काही नवखे वक्ते तयार झाले होते. त्यात मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, दत्ताजी साळवी असे वक्ते ठाण्याच्या निवडणुकीने पुढे आणले. त्यांना हाताशी धरून बाळासाहेबांनी मैदान लढवायची तयारी केली होती. मग त्यातून उत्साही शिवसैनिकांनी आपल्या तेव्हाचे वक्ते आणि भविष्यातल्या नेत्यांची विशेषणे तयार केली होती. दत्ताजी साळवी अत्यंत रांगडे बोलणारे, त्यांना कमांडर दत्ताजी साळवी; तर नेमकी शेरेबाजी करणार्‍या प्रमोद नवलकर यांना मशीनगन अशी विशेषणे त्याच काळात चिकटली. ती अगदी विसाव्या शतकाची अखेर होईपर्यंत कायम होती. निवडणूका खुप पुढे होत्या. पण त्याची चाहुल लागल्यापासून शिवसेनेचे तरूण कामाला लागले होते. त्यात भिंती रंगवण्यापासून छोट्यामोठ्य़ा सभा बैठका घेण्यापर्यंत धावपळ चालू होती. आपल्या बालेकिल्ल्यात चाललेली ही लगबग डाव्यांना कळलीच नाही; असे म्हणत येईल काय? झुंडशाही, गुंडगिरी असे आरोप केले म्हणजे काम सम्पले अशीच एकूण स्थिती होती. शिवाय आपले रस्त्यावरचे बळ संपले आहे किंवा संपते आहे, त्याचेही भान डाव्यांनी ठेवले नाही. एकवेळ अशी आली होती, की कम्युनिस्टांच्या खेरीज ज्या गिरणगावात दुसर्‍या कोणची सभाच होऊ शकत नव्हती; त्याच गिरणगावात पोलिसांच्या कडक बंदोबस्ताशिवाय डाव्यांना सभा घेणे अशक्य होऊन गेले. आपल्या पक्ष कचेरीत येजा करायला त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते घाबरू लागले. मात्र तरीही ह्या बदलाची कारणे शोधून त्यावर उपाय योजण्याची सदबुद्धी काही डाव्यांना वा कम्युनिस्टांना सुचली नाही. त्यांची जणू मराठी मनाशी असलेली नाळच तुटली होती. शिवसेनेला तेच हवे होते आणि कॉग्रेसला दुसरे काय हवे होते?  (क्रमश:)
भाग   ( २७ )    १६/१२/१२

शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१२

तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत



 
   अलिकडेच शिवसेनेचा दसरा मेळवा शिवाजीपार्क मैदानावर पार पडला. खरे तर तिथे सभा मेळाव्यांना न्यायालयाने बंदी घातलेली आहे. पण खास बाब म्हणून काही अटी घालून हायकोर्टानेही शिवसेनेच्या या मेळाव्याला परवानगी दिली. मोठी उत्सुकता लोकांमध्ये होती, की बर्‍याच काळानंतर शिवसेनाप्रमुख दर्शन देतील. मात्र त्याबद्दल अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणून ठेवण्यात आली आणि शेवटी त्यांचे व्हिडीओ चित्रण दाखवण्यात आले. शेहेचाळिस वर्षापुर्वी जिथे त्यांनी पहिले भाषण केले, तिथे बिघडल्या प्रकृतीमुळे शेवटची सभा इच्छा असूनही त्यांना घेता आली नाही. पण याच जागी त्यांनी काही वर्षापुर्वी आपला नातू आदित्य याला लोकांच्या पदरात टाकले होते. शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्यात प्रबोधनकारांनीही आपला पुत्र आता महाराष्ट्राला अर्पण केला, असेच सांगितले होते. त्या चित्रित भाषणामध्येही बाळासाहेबांनी उद्धव आणि आदित्यला संभाळून घ्या; असे आवाहन मराठी माणसाला केले. या निमित्ताने त्यांनी प्रतिकात्मक म्हणून नातवाला तलवार दिली. आदित्यने ती तलवार उपसून दाखवली होती. अर्थात त्यात आता काही नवे राहिलेले नाही. अलिकडल्या दोन दशकात अनेक नेत्यांना मोठ्या समारंभात अशा तलवारी देण्याचे नाट्य रंगवले जाते. त्याने तलवारीसारखे तळपावे, असे त्यातून सूचित करायचे असते. देखावा सोडल्यास त्यातून अधिक काही बोध घेता येत नाही. म्हणूनच साहेबांनी आदित्यला तिथे प्रतिकात्मक रुपाने तलवार दिली होती. पण मुंबई महाराष्ट्रामध्ये हे तलवार बहाल वा भेट करण्याचे तंत्र सर्वात प्रथम शिवसेनेच्या व्यासपिठावरच सुरू झाले होते, हे किती लोकांना आठवते? एका अशाच शिवाजी पार्कच्या मेळाव्यात बाळासाहेबांना सन्मान म्हणून तलवार भेट देण्यात आलेली होती. ती देणार्‍या माणसाचे नाव होते सरदार लाभसिंग चढ्ढा.

   शिवसेनेची सुरूवात झाल्यावर आणि सेनेने निवडणुकीत उडी घेतल्यावर; मतांच्या विजयाने तिला विविध समाजघटकातून मान्यता मिळत गेली. आरंभी मराठी माणसे व पुर्वाश्रमीच्या कार्यकर्त्यांची असलेली शिवसेना, हळूहळू एकुणच मुंबईकरांची संघटना बनत गेली. त्यात कल्याणचा मुस्लिम शिवसैनिक शब्बीर शेख होता; तसाच दादरच्या गंगाधर निवासमध्ये वास्तव्य करणार्‍या शीख कुटुंबातला अस्खलीत मराठी बोलणारा कोहली नावाचा शीख तरूणही होता. पण त्याला शिख पंजाबी म्हणणे हा त्याच्यासहित शिखांवरही अन्याय होता. कारण त्याचा वेश व पगडी शिखाची असली, तरी तो अस्सल मराठी होता. दिलोजानसे मराठी तरूण होता. त्यावेळी त्याची योगायोगाने ओळख झाली, तेव्हा त्याचे नाव कोळी असेच मला सांगण्यात आले होते. कोळ्यांमध्ये शीख धर्माचा प्रसार कधी झाला, असे तेव्हा मला पडलेले कोडे होते. पुढे त्याच गंगाधर निवास इमारतीमध्ये माझे लालबागचे जुने शेजारी व पुढे दैनिक ‘मराठा’तले सहकारी आत्माराम सावंत वास्तव्याला गेले. तेव्हा तो कोळी नसून कोहली असल्याचा शोध लागला. असे अनेक भाषिक व प्रांतिय शिवसेनेत आरंभीपासून होते. ज्यांना मराठी अस्खलित बोलता येत नव्हते; पण दिर्घकाळ मुंबईचे रहिवासी होते, त्यांचाही त्यात भरणा होता. हा दादरचा कोहली त्यापैकीच एक होता. पण जसजशी शिवसेना निवडणूका जिंकून प्रस्थापित होऊ लागली; तसे अन्य भाषिक मुंबईकरही सेनेत सहभागी होऊ लागले होते. त्यातच लाभसिंग चढ्ढा यांचा समावेश होता. त्या काळात एकदा लोकप्रिय अभिनेत्री वैजयंतीमालाही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सहभागी झाली होती. अगदी व्यासपिठावर येऊन बसलेली होती. त्या सभेत ऐन भाषणे चालू असताना मोठा जोरदार पाऊसही पडलेला आठवतो. अशा मेळाव्यात लाभसिंग चढ्ढा असायचा, तसाच एक भय्या अभिनेताही असायचाच.  हिंदी चित्रपटात तेव्हा खलनायकाच्या भूमिका करणारा तिवारी नावाचा नट होता. त्याचेही हिंदी भाषण अनेक मेळाव्यात झालेले होते. प्रत्येकवेळी हा तिवारी शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीचे खास कौतुक करायचा. अर्जुनाचे गांडीव धनुष्य, असे त्याचे शब्द असायचे. पहिल्या तीनचार वर्षातच शिवसेनेने अमराठी लोकांना आपल्या जवळ करायला सुरुवात केली होती. लाभसिंग चढ्ढा त्यापैकीच एक.

   त्यातूनच शिवसेनेच्या जवळ एक शीख समाजाचा गट येऊन पोहोचला. पहिल्या मेळाव्यात हे लोक नव्हते. पण तीनचार वर्षानंतर हे अमराठी लोक शिवसेनेत दिसू लागले. अमराठी म्हणजे ज्यांना मराठी बोलता येत नव्हते. पण जे आपण मुंबईकर आहोत, म्हणून स्वत:ला महाराष्ट्राचे भूमीपुत्र मानत होते, असेच लोक शिवसेनेत येऊ लागले. त्यात लाभसिंग चढ्ढा आघाडीवरचा माणूस होता. त्याने प्रथम शिवसेनाप्रमुखांना शिख समाजातर्फ़े सन्मान चिन्ह म्हणून शिवाजी पार्कच्या व्यासपीठावर तलवार दिली होती. नुसती दिली नाही तर बाळासाहेबांना ती म्यानातून काढून उंचावून समोरच्या समुदायाला दाखवायलाही भाग पाडले. साहे्बांना अशा गोष्टी सहसा आवडत नसत. पण त्यांनी एक समाज घटकाचा सन्मान म्हणून ते सहन केले असे म्हणता येईल. पुढे काही वर्षे लाभसिंग चढ्ढाचा हा शिरस्ताच झाला होता. शिवाय त्याचे पंजाबी हिंदीतले भाषणही सेनेच्या व्यासपिठावरून व्हायचे. असा प्रकार महाराष्ट्रात सहसा कधी कुठे होत नसे. मराठी प्रथेनुसार फ़ेटा बांधणे हा सन्मान होता. अलिकडे मात्र त्या तलवार भेटीचे फ़ॅड खुप बोकाळले आहे. पण त्याचीही सुरूवात अशी शिवसेनेच्या व्यासपिठावरून झाली. लाभसिंग चढ्ढाच्या शिवसेनेतील वावरण्याने शिवसेना म्हणजे तमाम अमराठी लोकांची शत्रुच आहे; या अपप्रचाराला तडा गेला. हळूहळू अन्य भाषिक व परप्रांतिय, पण मराठीद्वेष न करणारे शिवसेनेत येऊ लागले व सेनेत दिसू लागले. त्याची सुरूवात लाभसिंग चढ्ढा याच्यापासून झाली होती. ती विसरता कामा नये.

   पण ह्या सगळ्या गोष्टी शिवसेनेने मुंबई महापालिकेत मोठे यश मिळवल्यानंतरच्या आहेत. बर्वे आणि सप्रे यांच्या दोन लोकसभा निवडणुका आणि ठाणे कल्याण येथील पालिका निवडणुकानंतर शिवसेनेकडे लोक गंभीरपणे बघू लागले होते. तेव्हा मुंबईच्या डाव्यांच्या विरोधात शिवसेनेचा कॉग्रेसने वापर केला असे म्हटले जात होते. पण लौकरच ती शिवसेना कॉग्रेसच्याही विरोधात दंड थोपटू लागली होती. त्यात मुंबई शहरासाठी कॉग्रेसमध्ये वेगळी संघटना असण्यावर ‘मार्मिक’मधून झोड उठवली जात होती. अन्य सगळ्या राज्यात प्रदेश कॉग्रेस असते, इथे महाराष्ट्र प्रदेश व मुंबई प्रदेश अशा दोन वेगळ्या कॉग्रेस समित्या होत्या. मुंबईच्या कॉग्रेसला बीपीसीसी असे म्हटले जात असे. त्या पदावर जाणिवपुर्वक अमराठी माणुस नेमला जायचा. ठाण्यावर भगवा फ़डकवला आणि सेनेने मुंबई कॉग्रेसवर हल्लाबोल सुरू केला. त्याला महाराष्ट्र कॉग्रेसची फ़ुस असू शकते. कारण मुख्यमंत्री व अन्य मंत्री यांना बीपीसीसीचा अध्यक्ष दाद देत नसे. त्यांना या सवत्यासुभ्याची पोटदुखी असल्यास गैर काहीच नव्हते. त्यांनी शिवसेनेला मदत केली वा फ़ुस दिली असेल; यात शंकाच नाही. पण त्याचा लाभ उठवताना सेनेने आपले बस्तान मुंबईत बसवले, म्हणूनच मुंबईचे मराठीपण टिकून राहिले हे कोणी आज अर्धशतकानंतरही नाकारू शकणार नाही. त्या काळात स. का. पाटील हा कोकणी मराठी माणुसच मुंबई कॉग्रेसचा दिग्गज होता. पण त्याला मराठीप्रेम नव्हतेच. अगदी संयुक्त महारष्त्र समितीच्या लढ्यात देखील आवेशात मराठीपणाच्या विरोधात बोलणारा मराठी नेता; अशीच पाटिल यांची ख्याती होती. त्यांनी सेनेच्या काळात मुद्दाम हफ़ीज खान नावाच्या नगण्य माणसाला बीपीसीसीचा अध्यक्ष म्हणुन आणून बसवले होते. ‘मार्मिक’चे तेव्हाचे अंक काढले तर निदान दोनतीन डझन या हफ़ीज खानची व्यंगचित्रे आढळतील. मार्मिकमध्ये आलेली व्यंगचित्रे तात्काळ मोठ्या भिंतीवर रंगवून काढणार्‍या उत्साही हौशी चित्रकारांचा भरणा सेनेमध्ये होता. त्यामुळेच वर्षभरात येऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली होती. खरे तर त्या निवडणुका वॉर्डाच्या पुनर्रचनेमुळे खुप लांबलेल्या होत्या. पण ठाणे जिंकल्यावर मुंबईत सेनेची चाचपणी सुरू झाली. त्यात सेनेला प्रजा समाजवादी पक्षाची खुप मदत झाली असे म्हणायला हरकत नाही. कारण ठाण्याच्या निवडणुका छोट्या होत्या. त्याच्या तुलनेत मुंबईचे मतदारसंघ आकाराने व संख्येनेही मोठे होते. आणि त्यापेक्षाही विभाग व वॉर्ड अशी सेनेची संघटनात्मक बांधणी तेव्हा अजिबात झालेली नव्हती. ज्याला मराठी बाणा वा अस्मिता म्हणून काही वाटायचे व जो त्यासाठी काहीतरी करायला उत्सुक होता, तो स्वत:ला शिवसैनिक म्हणवून घ्यायचा. सहाजिकच दाट वस्तीच्या मध्य व दक्षिण मुंबईत सेनेचा दबदबा तयार झाला होता, तसा उपनगरात नव्हता. पण लाभसिंग चढ्ढाने देण्याआधीच सेनेची तलवार तळपू लागली होती. त्यातूनच मुंबई पालिका लढवायचे सेनेला वेध लागले.(क्रमश:)
भाग   ( २६ )    १५/१२/१२

गुरुवार, १३ डिसेंबर, २०१२

नगरपित्याला नगरसेवक बनवला कोणी?


   
   १९६७ सालात शिवसेना ठाण्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरली हे सगळे सांगतील. पण त्याच निवडणुकीतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक मोठी भेट राजकीय क्षेत्राला दिली; ते कधी कोणी आठवणीने सांगतो काय? कसे सांगणार? माहित असेल तर सांगेल ना? आज कुठलेही वर्तमानपत्र उघडा किंवा कुठल्या वाहिनीच्या बातमीमध्ये नगरपालिका किंवा महापालिकेची बातमी असेल; तर तिच्या सदस्याचा उल्लेख कसा केला जातो? कॉग्रेसचा नगरसेवक, भाजपाचा नगरसेवक असाच उल्लेख होतो ना? हा नगरसेवक शब्द कोणी आणला? त्याच्या आधी नगरपालिकेच्या सदस्याला कोणत्या नावाने संबोधले जात होते? आमच्या लालबागचा कृष्णा देसाई कम्युनिस्ट पक्षातर्फ़े विधानसभेचा आमदार होण्याआधी तिथूनच मुंबई महापालिकेचा सदस्य म्हणून निवडून आलेला होता. प्रजासमाजवादी पक्षाच्या भास्कर देसाईचा पराभव करून कृष्णा देसाई महापालिकेचा सदस्य झाला. तोपर्यंत त्या सदस्यांना सीटीफ़ादर्स म्हणजे नगरपिता म्हटले जात होते. अगदी १९६७ पुर्वीच्या वृत्तपत्रातल्या बातम्या काढून बघा. त्यात तुम्हाला नगरपिता असाच उल्लेख सापडेल. जेव्हा शिवसेना ठाण्याच्या निमित्ताने पलिका निवडणुकीत उतरली; तेव्हा बाळासाहेबांनी जी भूमिका त्यासंदर्भात मांडली, त्यात ही भूमिका मोलाची होती. ‘निवडून येणारा पालिकेचा सदस्य तुमचा बाप नाही, तुम्ही मतदार व नागरिक त्याचे बाप आहात. म्हणूनच बाप निवडू नका, तुमचे सेवक निवडा’ असे आवाहन बाळासाहेबांनी केले होते. शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील, ते तुमचे बाप नातील, शहराचे पिते नसतील तर सेवक असतील. म्हणूनच त्यांना ‘नगरसेवक’ संबोधले जाईल; असे बाळासाहेब प्रत्येक प्रचारसभेतून सांगायचे. तेव्हा त्यांची यथेच्छ टवाळीही झाली. पण आज कुणाला तो जुना नगरपिता शब्द आठवतो तरी काय? महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आणि सरसकट वापरातून नगरपिता हा शब्दच हद्दपार झाला आहे. प्रत्येकजण नगरसेवक हाच शब्द वापरत असतो. राजकारणाला गजकरण म्हणणारी शिवसेना शेवटी त्याच राजकारणात उतरली आणि पालिका निवडणुकीपासून त्याची सुरूवात झाली; हे अगत्याने सांगणार्‍यांना, त्याच निवडणुकीने केलेले हे आमुलाग्र परिवर्तन का लक्षात नाही? शिवसेना व बाळासाहेब यांनी राजकीय भाषेला दिलेली ही एक अमूल्य देणगी नाही काय? त्यांनी नगरपित्याला नगरसेवक बनवला.

   अर्थात अशा गोष्टी माहित असायला, शिवसेना घडताना बघण्याची गरज आहे. त्यावेळच्या आख्यायिका सांगणार्‍याच्या पोपटपंचीवर आधारित मत बनवायचे आणि त्यावरच निष्कर्ष काढायचे असतील; तर बट्ट्याबोळच व्हायचा. आणि म्हणूनच शिवसेना निवडणुकीत कशी व का उतरली? तिच्यासाठी पोषकभूमी कोणी कशी तयार करून दिली; तेही समजून घेणे अगत्याचे होते. ठाणे, कल्याणमध्ये लागोपाठ दोन निवडणूका लोकसभेसाठी झाल्या नसत्या आणि त्यात डाव्यांनी बदनाम मेनन उभा केलाच नसता; तर सेनेच्या संघटित ताकदीचा अंदाज तिलाही आला नसता. पण त्याच आधीच्या निवडणुकीतील एक घटक तेवढाच महत्वाचा आहे. शिवसेनेची त्यावेळची कुवत ओळखून एका पक्षाने सेनेशी जवळीक केली होती. त्या पक्षाचे नाव होते, प्रजा समाजवादी पक्ष. मधू दंडवते, त्याचे मुंबईतील नेता होते. त्यांच्या दादरमधील विधानसभा उमेदवारीला सेनेने पाठींबा दिल्याने बाळसाहेबांशी त्यांचे सौहार्द निर्माण झाले होते. सहाजिकच लगेच आलेल्या ठाण्याच्या नगरपालिका निवडणुकीत प्रसपने शिवसेनेशी युती केली. म्हणजेच पहिली निवडणुकही सेनेने स्वबळावर लढवली नव्हती. त्यात त्यांच्यासोबत सानेगुरुजींचा वारसा सांगणार्‍या राष्ट्र सेवा दलीय लोकांचा भरणा असलेल्या समाजवाद्यांचा पक्ष होता. या दोघांनी ठाण्यातील जागांचे आपसात वाटप करून घेतले आणि त्या पहिल्या प्रयत्नातच त्या युतीला तिथे बहूमत मिळाले. त्यामुळे युतीतील मोठा पक्ष म्हणून शिवसेनेचे वसंतराव मराठे नगराध्यक्ष झाले तर प्रसपला उपनगराध्यक्षाचे पद देण्यात आलेले होते. मला नक्की आठवत नाही, पण कोणी पेंड्से नावाचे समाजवादी गृहस्थ त्या पदावर निवडून आले होते. आणि आज सेवादलीय म्हणुन सेनेची टवाळी करण्यात धन्यता मानणारे निखिल वागळे तेव्हा धड चड्डी देखिल परिधान करण्याच्या वयात नव्हते. तर त्यांना समाजवादी इतिहास तरी कुठे माहित असणार? म्हणुन तर दहा महिन्यांपुर्वी ठाणे, मुंबई वगैरे पालिका निवडणुकीत कायबीइन लोकमतवर बोलताना, त्या मुर्खाने सतीश प्रधान यांना त्या पहिल्या निवडणुकीत ठाण्याचे सेनेचे नगराध्यक्षही करून टाकले होते. तर ठाण्यातलेच उदय निरगुडकर तेव्हा विश्लेषक म्हणुन निखिल सोबत होते आणि त्यांनीही नंदीबैलासारखी मान डोलावली होती. आज ते झी २४तासचे संपादक झाले आहेत.

   सतीश प्रधान हा त्यावेळचा तरूण उमदा नगरसेवक होता. आनंद दिघे व गणेश नाईक तेव्हाचे युवा सेनावाले म्हणता येतील इतके कोवळे होते. शब्बीर शेख, अशोक शाईवाले असे वरिष्ठ म्हणता येतील ते शिवसैनिक ठाण्यातल्या सेनेची धुरा चालवत होते. तेव्हा शिवसेनेत नेता वगैरे भानगडी नव्हत्या. शिवसेनाप्रमुख असे एकच पद होते. बाकी सारे शिवसैनिक किंवा शाखाप्रमुख असायचे. पण पहिला नगराध्यक्ष म्हणुन वसंतराव मराठे यांना मोठा मान सेनेच्या व्यासपीठावर मिळत असे. आणखी एक मजा सांगायला हवी. आपले नगरसेवक जनतेची सेवा करतील आणि राजकारणापासून दूर असतील असे आश्वासन बाळा्साहेबांनी दिलेले होते. पण आपला वेगळेपणा दाखवण्यासाठी त्यांनी आपली संघटना एकजीव असल्याचे सांगताना; कोणी नगरसेवक सेनेतून फ़ुटला तर त्याची ठाण्यात गाढवावरून धिंड काढली जाईल, असेही सांगून टाकलेले होते. इतके बेधडक व आक्रमक बोलणेच मुळात राजकारणात नवे होते. सहाजिकच त्याची पत्रकार विचारवंतांकडून टवाळीही होत असे. पण तेवढीच वाक्ये शोधून त्याला वारेमाप प्रसिद्धीही मिळत असे. सहाजिकच या गाढवावरच्या धिंडीलाही प्रचंड प्रसिद्धी मिळाली. आणि मग शंकर पाटलांच्या ‘धिंड’ या गोष्टीसारखा प्रसंग ओढवला. मंत्रीपदाच्या मोहात सापडून कॉग्रेसमध्ये छगन भुजबळ गेले, त्याचा वारंवार उल्लेख होतो. पण तशा गोष्टी शिवसेनेत पहिल्यांदाच घडलेल्या नाहीत. ठाण्यात असेच मारोतराव शिंदे प्रकरण घडले. नगराध्यक्षपदासाठी या शिवसेनेच्या नगरसेवकाने शिवसेनेला जयमहाराष्ट्र केला. आता त्याची धिंड काढून शब्द पाळण्याची वेळ शिवसेनेवर आली. ‘मार्मिक’ या मुखपत्राने मारोतराव शिंदे यांच्याविरोधात झोड उठवली होती. आणि ठाण्यात एकूणच वातावरण तंग होऊन गेले. शिवसैनिक म्हणजे झुंड; ती केव्हा जमेल आणि केव्हा येऊन तुटून पडेल; याचा भरवसा नव्हता. त्यामुळेच शिंदे यांना पक्षांतराला प्रोत्साहन देणार्‍या कॉग्रेस पक्ष व त्याच्या सरकारवर शिंदे यांना संरक्षण देण्याची पाळी आली. त्यात मग पदावर निवडून येणे वगैरे दुय्यम झाले होते. फ़ुटणार्‍याला धडा शिकवण्याला महत्व आले होते. मारोतराव शिंदे हा बहूधा ठाण्याच्या इतिहासात पोलिस संरक्षणात वावरलेला पहिलाच राजकीय नेता, कार्यकर्ता असावा. त्याचे कारण हे असे धिंड होते.

   अर्थात मारोतराव शिंदे हा शिवसेनेतून बाहेर पडलेला ठाण्यातला एकमेव शिवसैनिक वा नगरसेवक नव्हता. पुढल्या काळात अनेकजण फ़ुटले. अगदी आज अगत्याने उल्लेख केला जातो, त्या खोपकरपर्यंत. महापालिका होऊन सतीश प्रधान ठाण्यातील सेनेचे पहिले महापौर झाले. पण दुसर्‍या वर्षीच्या निवडणुकीत वसंत डावखरे यांनी बाजी मारताना शिवसेनेची मते फ़ुटली होती. त्यात श्रीधर खोपकर असावा हा संशय होता. त्यात त्याचा बळी पडला. त्याची मुंबईच्या उपनगरात हत्या झाली, ती शिवसैनिकांनीच केली असा आरोप होता. मग काय पुढल्या काळात कोणीही सेनेतुन फ़ुटणार अशी बातमी असली, मग त्याचा खोपकर होणार असे बातमीत अगत्याने लिहिले जात असे. पण इतकी वर्षे उलटून गेली आणि ठाण्यासारख्या टुमदार नगराचे महापालिकेत रुपांतर झाले; तरी अजून शिवसेनेची ठाण्यावरची पकड ढिली झालेली नाही. दरम्यान तेव्हाचा शिवसेनेचा पहिला मित्रपक्ष प्रजा समाजवादी पक्षाचे आज नामोनिशाण उरलेले नाही. पण त्यांचे जे कोणी वंशज आज पांगलेले व विखुरलेले आहेत, त्यांना आपली अशी अवस्था कशामुळे झाली असा विचारही करावेसे वाटत नाही. ही केवढी शोकांतिका आहे ना? जो पक्ष वा त्याचे वारस, स्वत:ला विचारवंत म्हणतात किंवा वैचारिक टेंभा सातत्याने मिरवत असतात, त्यांना आपण इतके नामोहरम का झालो व ज्यांच्याकडे विचारच नाही म्हणतो, ती शिवसेना अजून का टिकली आहे, त्याचा विचारही करावासा वाटू नये? यापेक्षा वैचारिक दिवाळखोरी कोणती असू शकते? पण तेच आजच्या वैचारिकतेचे व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. ज्यांना धड विचार करता येत नाही, ज्यांचे विचार सुस्पष्ट नाहीत किंवा ज्यांच्यात निव्वळ वैचारिक गोंधळच आहे; त्यांना आजकाल विचारवंत म्हटले जाते. मग समाजवाद्यांना तरी दोष देऊन काय उपयोग? (क्रमश:)
भाग   ( २५ )    १४/१२/१२

बुधवार, १२ डिसेंबर, २०१२

आचार्य अत्र्यांनाही शिवसेनेचा प्रसाद मिळाला


   शिवसेनेने पहिली आघाडी उघडली होती ती दाक्षिणात्यांच्या विरोधात हे स्पष्टच आहे. त्यात पुन्हा मराठी राजकीय नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेतलेल्या व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा वारसा सांगणार्‍या संपुर्ण महाराष्ट्र समितीने; मेनन यांना उभे करण्याची गरज नव्हती. पण शिवसेनेला खिजवण्यासाठी मेनन यांना इशान्य मुंबईत अपक्ष उमेदवार बनवण्यात आले होते. याचे कारण त्यांचा कम्युनिस्ट चळवळीकडे ओढा होता आणि समितीवर डाव्यांचाच वरचष्मा होता. त्यामुळेच बाजूच्या म्हणजे पश्चिम उपनगरात डाव्यांचेच सहप्रवासी मानले जाणारे निवृत्त हायकोर्ट न्यायाधीश हरीभाऊ गोखले यांनाही अपक्ष उभे करण्यात आले होते, तेच गोखले नंतर १९९७१ सालात कॉग्रेस उमेदवार म्हणून तिथूनच लढले आणि केंद्रात कायदामंत्रीही झाले होते. पण तो वेगळा इतिहास आहे. मेनन हा कळीचा मुद्दा बनला होता किंवा जाणीवपुर्वक बनवण्यात आला होता. त्यातून शिवसैनिक व कम्युनिस्ट यांच्यात खटके उडायला लागले होते. मध्य दक्षिण मुंबईतून शिवसैनिकांचे घोळके बर्वे या मराठी कॉग्रेस उमेदवाराच्या प्रचाराला ठाणे कल्याणपर्यंत जायचे, त्यामुळे सगळी हाणामारी तिथेच चालली होती. त्याचा प्रभाव ठाणे, कल्याण भागात दिसून आला होता आणि त्यामुळेच तिथे शिवसेनेचा मतदार असल्याचे त्यातून स्पष्ट होत चालले होते. त्याच काळात घाटकोपर ठाण्याकडे चाललेले शिवसैनिक व कृष्णा देशाई यांच्यात सायन येथे हाणामारी झाल्याची बातमी वाचलेली आठवते. असो, शिवसैनिकांना जीव ओतून मुंबईत एका मोठ्या लुंगीवाल्याला पाणी पाजायची संधी अशी दिली गेली; त्याची काय गरज होती? मेनन समितीच्या राजकारणात कुठे कशाला आवश्यक होते? पण समितीकडून ती चुक झाली. तरी मध्य दक्षिण मुंबईत मात्र समितीचा वरचष्मा निवडणुकीतही कायम राहिला. त्याचे कारण तरूण मंडळी शिवसेनेत दाखल झाली व होत असली तरी घरातले बुजूर्ग अजून समितीच्या मस्तीत व धुंदीत होते. शिवसेनेतल्या बहूतांश तरूणांना मताचा अधिकारच नव्हता. सहाजिकच त्या १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत समितीने मुंबईत मोठीच बाजी मारली. दक्षिण मुंबईतून नगरसेवक असलेले अगदी तरूण कामगार नेते जॉर्ज फ़र्नांडीस आणि मध्य दक्षिण मुंबईमधून कम्युनिस्ट नेते कॉ. श्री. अ. डांगे लोकसभे्वर निवडून आले. मध्य उत्तर मतदारसंघात दलित मागास मतांवर डोळा ठेवून कॉगेसने माजी रिपब्लिकन आमदार आर. डी. भंडारे यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात आचार्य अत्रे समितीचे उमेदवार होते. त्यांना मात्र दणका बसला आणि त्याचे कारण शिवसेनाच अधिक होती. कारण डाव्यांनी अत्र्यांना अकारण शिवसेनेच्या विरोधात भाषणांमध्ये जुंपले होते आणि त्यामुळे मराठी मते मोठ्या प्रमाणात अत्र्यांच्या विरोधात गेली. खरे तर या मराठी भाषेच्या सम्राटाला मराठी अस्मितेला वाहिलेल्या संघटनेकडूनच विरोध व्हावा, हे विचित्र होते. पण त्याला पर्यायच नव्हता. अत्रे आपला मराठी बाणा विसरून डाव्यांच्या आहारी गेले होते.

   मेनन यांना समितीने उभे केले आणि तो माणूस खुप विद्वान असला तरी जाहिरसभेत बोलून सभा गाजवणे त्याला अशक्य होते. ज्या मराठीबहूल भागातून मते मिळवायची; तिथे त्याची वाचा चालणारी नव्हती. त्यामुळेच समितीच्या मराठी नेत्यांना मेनन यांचा किल्ला लढवावा लागत होता. सहाजिकच तिथे समितीचा मुलूखमैदान वक्ता म्हणून अत्रे यांनाच जाणे भाग होते. पण आता संयुक्त महाराष्ट्राचा काळ मागे पडला होता. ज्या तरुणांच्या ताकदीवर त्या काळात कॉग्रेसला समितीने सभा घेण्याची मुभा ठेवलेली नव्हती; तीच ताकद आता ओसरली होती व तिच्यात दुफ़ळी माजली होती. त्यातला मोठा हिस्सा शिवसैनिक म्हणून समितीच्या विरोधात उभा ठाकला होता. त्यामुळेच अत्र्यांना सभा गाजवायची तर कॉग्रेस विरोधात भाषण करण्यापेक्षा (त्यांच्या प्रचाराची धुरा संभाळणार्‍या) शिवसेना व बाळासाहेब यांचयवर तोफ़ा डागण्याची वेळ आलेली होती. मग शिवसैनिक अशा सभा उधळून लावायचे. त्या सभेत श्रोते म्हणून दबा धरून बसलेला तरूणांचा घोळका अचानक उठून धुमाकूळ घालायला सुरूवात करायचा. सभा उधळण्याचा उद्योग सर्वप्रथम शिवसेनेने सुरू केला हे मान्यच करायला हवे. अशा रितीने मुंबईच्या परिसरात समिती व डाव्यांशी सेनेची हाणामारी सुरू झाल्यापासून समितीला प्रचारसभा घेणेच अवघड होऊन गेले, कारण सभा उधळण्यामध्ये वक्त्यांवरही हल्ला होऊ लागला होता.

   ठाण्याच्या अशाच एका सभेमध्ये आचार्य अत्रे यांनी शिवसेना व बाळासाहेब यांच्यावर बोचरी टिका केली आणि त्यांची सभाच उधळली गेली. शिवसैनिकांनी नुसती सभाच उधळली नाही तर सभेतील वक्त्यांना जीव मुठीत धरून पळायची वेळ आली. ज्याने आघाडीवर राहून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे निधड्या छातीने नेतृत्व केले होते, त्याच सेनानी आचार्य अत्र्यांना ठाण्याच्या त्या सभेतून जीव वाचवायला पळ काढावा लागला आणि त्यांनी शिवसेनेचा जणू धसकाच घेतला. त्याचेही कारण आहे. मुंबईत त्यावेळी इंपाला नावाची अत्याधुनिक गाडी त्यांच्याकडे होती. तिचे अत्र्यांना खुप कौतुक होते. आणि ठाण्याच्या सभेतून पळ काढताना शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवरही हल्ला केला. तिची मोडतोड केली. त्यानंतर निवडणुकीचा विचारही बाळासाहेबांच्या मनाला शिवला नसताना ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाऊ लागला. त्याचे प्रतिबिंब मतदानातूनही दिसले होते. स. गो. बर्वे प्रचंड मतधिक्याने लोकसभेवर निवडून आले. ती शिवसेनेचीच किमया मानली गेली. योगायोग असा, की विजयी झाल्यावर काही दिवसातच बर्वे यांचे निधन झाले आणि इशान्य मुंबईत पोटनिवडणुक लागली. त्यात पुन्हा समितीने मेनन यांनाच उभे करून शिवसेनेला जणू आव्हानच दिले. त्यामुळे काही महिन्यातच कुर्ला ते कल्याण शिवसेनेच्या आवाजाचे ध्वनी प्रतिध्वनी दुमदुमत राहिले. त्यातून ठाणे कल्याणमध्ये आपण शिवसेनेची मते तयार केली आहेत, असा साक्षात्कार सेनेला झाला होता.

  अशा रितीने उर्वरित मुंबईत शिवसेनेने आपला वरचष्मा दाखवला असला, तरी जिथे शिवसेनेने आपल्या शाखा चांगल्या कार्यरत केल्या होत्या; तिथे मात्र त्याच सार्वत्रिक निवडणूकीत तिला प्रभाव पाडता आला नव्हता. कारण त्याच गिरणगावात कम्युनिस्टांचे तीन आमदार सलग निवडून आले होते. परेलमध्ये क्रुष्णा देसाई, चिंचपोकळीमधून गुलाबराव गणाचार्य आणि भायखळामधून सावळाराम पाटकर विधानसभेवर निवडले गेले होते. त्याचे कारण स्पष्ट होते, अजून गिरणगावात समितीची जादू संपलेली नव्हती. मात्र समितीला उतरती कळा लागली होती. याचा अर्थ शिवसेना कॉग्रेसची दलाल वा हस्तक झाली होती, असा लावला गेला. पण त्याचवेळी सेनेने त्याच निवडणुकीमध्ये दादर विधानसभेसाठी प्रसपचे प्रा. मधू दंडवते व नायगावमध्ये राम महाडीक यांना पाठींबा दिला होता. त्यापैकी नायगावातून प्रसपचे राम महाडीक निवडून आले होते. पण त्यात शिवसेनेपेक्षा त्यांना पुर्वीच्या समितीमधील वारशाचा अधिक लाभ झाला होता. असो तो मुद्दा नाही. मुद्दा आहे तो शिवसेनेचे प्रभावक्षेत्र तयार होण्याचा. बर्वे यांच्या निधनाने झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या भगिनी तारा सप्रे यांना कॉग्रेसने उमेदवारी दिली आणि पुन्हा कुर्ला ते कल्याण हा किल्ला शिवसेनेने लढवला आणि त्यातूनच मग शिवसेनेचा राजकारण प्रवेश मोकळा होत गेला. सार्वत्रिक निवडणुका संपल्यावर लगेच कल्याण, ठाण्याच्या स्थानिक पालिका निवडणुकांची घोषणा झाली, तेव्हा शिवसेनेने त्यात पडायचा धाडसी निर्णय घेतला. पण जे बाळासाहेब राजकारण म्हणजे गजरकण असे हेटाळणी करून सांगायचे; त्यांनीच पालिका निवडणुकीतून राजकारण प्रवेशाबाबत काय खुलासा केला असेल? आम्ही लोकांचे नागरी प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणात जाणार आहोत. ते सुद्धा २० टक्के. बाकी आमचे ८० टक्के समाजकारणच चालू राहिल. ठाण्यात शिवसेनेची लोकप्रियता बर्वे आणि सप्रे यांच्य मतदानातून समोर आली होती. त्यामुळे खरे तर मतदान केंद्रानुसार सज्जता शिवसेनेकडे होती. त्याचा लाभ उठवला गेला. नुसती ठाण्याची नव्हेतर कल्याणचीही नगरपालिका लढवली गेली आणि तेव्हा राजकीय पक्षांचे डोळे उघडले.

   शिवसेनेने प्रसप सोबत युती करून या दोन्ही ठिकाणच्या निवडणुका लढवल्या आणि आपण कॉग्रेसचे हस्तक नव्हेतर आपल्या पायावर कॉग्रेस विरोधात उभे राहू शकतो, असेही दाखवून दिले. ठाण्यात सेनेने प्रसपच्या मदतीने आपला पहिला नगराध्यक्ष बसवला. वसंतराव मराठे हे सेनेचे पहिले नगराध्यक्ष किंवा निवडून आलेला पहिला पदाधिकारी होता. पण याचे खरे श्रेय डाव्यांच्या आक्रमक सेना विरोधाला द्यावे लागेल. कारण शिवसेनेशी दोन हात करताना सेनेला राजकीय आखाड्यात आणायचा मार्गच त्यांनीच आखून दिला म्हणायचा. पण सेनेचा प्रभाव वाढत होता. जिथला तरूण सेनेकडे आकर्षित व्हायला लागला होता आणि जिथे खरी हमरातुमरी डावे व सेनेत चालू होती, तिथे गिरणगावात सध्यातरी तीन कम्युनिस्ट आमदार निवडून आले होते. मग समितीला सेनेची फ़िकीर करण्याचे कारणच काय होते?       ( क्रमश:)  
भाग   ( २४ )    १३/१२/१२

मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२

शिवसेनेचा मतदारसंघ डाव्यांनी उभा केला




   १९६२ च्या युद्धात चीनकडून भारताचा दारूण पराभव झाला हा इतिहास सर्वश्रुत आहे, त्यासाठी आजही पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्यावर दोषारोप होत असतात. पण त्यावेळी संरक्षणमंत्री असलेल्या कृष्ण मेनन यांच्याबद्दल लोकांमध्ये कमालीची चीड होती. कारण या माणसाने जाणीवपुर्वक भारतीय सैनिक व जवानांना अपुर्‍या साहित्यानिशी लढाईला सामोरे जाण्याची वेळ आणली, असेही मानले जाते. सहाजिकच नेहरूंना आपल्या या लाडक्या मेननला डच्चू देण्य़ाची वेळ आली. शिवाय आपल्या शांतीदूत या मुखवट्यातून खुद्द नेहरूंना बाहेर पडावे लागले होते. आपली जागतिक नेता अशी उदात्त प्रतिमा निर्माण करण्यासाठी नेहरूंनी जे परराष्ट्र धोरण राबवले होते, त्याचे आजही गुणगान करणारी बरीच मंडळी आहेत. पण त्याच धोरणाने चीन शिरजोर झाला आणि त्या पहिल्याच लढाईत स्वतंत्र भारताला नामोहरम होण्याची वेळ आली. त्यावर मात करण्यासाठी अखेर वादावर पडदा टाकू शकणारा नवा चेहरा नेहरूंना संरक्षण मंत्रीपदावर आणावा लागला होता. त्यामुळेच यशवंतराव चव्हाण यांना मुंबई सोडून दिल्लील जाण्याची वेळ आली होती. त्यांच्याच गळ्यात संरक्षण मंत्रीपदाची माळ पडली. मग ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला’ असेही कौतुकाने महाराष्ट्रात म्हटले गेले. पण आपल्या नेतृत्वावर यशवंतरावांचा इतका विश्वास होता, की त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात दिल्लीतून लुडबुड करावी लागत नसे. असो, तो वेगळा विषय आहे. पण त्यानंतर कृष्ण मेनन हा माणूस इतका बदनाम झालेला होता, की त्याला देशद्रोहीच मानले जायचे. सहाजिकच पुढल्या सार्वत्रिक निवडणूकीत त्याला कॉग्रेसचे तिकीट मिळू शकले नाही. मध्यंतरी पाकिस्तानशी युद्ध होऊन त्यात भारताने गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवली होती. पण दिल्लीत नेहरू जाऊन पंतप्रधान झालेले लालबहादूर शास्त्री पाकला हरवून विजयीवीर झाले, तरी यमराजाने त्यांच्यावर झडप घातली आणि दिल्लीत सत्ता बदल झाला होता. नेहरूंची कन्या इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या होत्या. शिवसेनेची स्थापना आणि इंदिराजींची कारकिर्द एकाचवेळी सुरू झाली म्हणायची.

   अशा पार्श्वभूमीवर चौथ्या सार्वत्रिक निवडणुका आलेल्या होत्या. कॉग्रेस पक्षाकडे सत्ता होती, पण खंबीर प्रभावी नेता नव्हता. चव्हाण, कामराज, अतुल्य घोष, चंद्रभानू गुप्ता अशा प्रादेशिक बलवान नेत्यांनी मोरारजी देसाई यांना शह देण्यासाठी, अननुभवी नेहरूकन्या इंदिराजींना सर्वोच्चपदी आणून बसवण्याचा डाव खेळला होता. खरे तर तीच नेहरूंची इच्छा होती. पण या नेत्यांनी त्यांची इच्छा पुर्ण करण्यासाठी इंदिराजींना पंतप्रधान केले नव्हते. नवख्या इंदिराजी ज्येष्ठ नेत्यांच्या मुठीत रहातील व मोरारजी शिरजोर होणार नाहीत; असा त्या मागचा डाव होता. त्याचवेळी एकजुटीने विरोधक मतविभागणीवर मात करू शकले, तर कॉग्रेसला पराभूत करणे अशक्य नाही; असा सिद्धांत समाजवादी विचारवंत व नेते डॉ. राममनोहर लोहिया यांनी मांडला होता. त्यामुळे दहा वर्षापुर्वी महाराष्ट्रामध्ये जो संयुक्त महाराष्ट्र समितीचा प्रयोग यशस्वी झाला होता, त्याचू पुनरावृत्ती देशा्तील अनेक राज्यात १९६७ सालात सुरू झालेली होती. महाराष्ट्रात संपुर्ण महाराष्ट्र समिती म्हणजे त्याचेच प्रतिबिंब होते. मात्र इथे त्यात डाव्या पक्षांचाच भरणा होता. चिनी युद्ध काळात ज्या कम्युनिस्ट नेत्यांनी चिनचे समर्थ केले होते, त्यांची तुरुंगातून सुट्का झाली होती आणि त्यांचा वेगळा मार्क्सवादी गट स्थापन झाला होता. त्यानेही या समितीमध्ये सहभागी व्हायचे ठरवले होते. रिपब्लिकन, कम्युनिस्ट, मार्क्सवादी, शेतकरी कामगार पक्ष आणि लोहियांचा संयुक्त समाजवादी पक्ष; असे लोक त्या समितीमध्ये सहभागी होते. त्यांनी त्याच बदनाम कृष्ण मेननला मुंबईत अपक्ष उमेदवार म्हणून पाठींबा दिला. एक तर त्या माणसाबद्दल लोकांच्या मनात संताप होता आणि दुसरीकडे तो लुंगीवाला दाक्षिणात्य, म्हणजे नव्या समितीने शिवसेनेच्या हातात कोलितच दिले म्हणायचे. देशद्रोही आणि लुंगीवाला असे समिकरण समितीने दिल्यावर शिवसेनेने काय करावे? सेना निवडणुकीत उतरली नव्हती किंवा तिचा तसा मानस नव्हता वा ताकदही नव्हती. पण तरूणांच्या उसळत्या उर्जेला त्यापासून दूर ठेवणेही शक्य नव्हते. म्हणजे त्या काळात काय करायचे; ही शिवसेनेसाठी समस्याच होती. पण ती एकप्रकारे समितीने सोडवली.

   त्याच निवडणुकीत कॉग्रेस म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी चतुराई करून त्याच इशान्य मुंबई मतदारसंघात अस्सल मराठी उमेदवार मेमन विरोधात उभा केला. अस्सल मराठी अशासाठी म्हणायचे, की स. गो. बर्वे असे त्या उमेदवाराचे नाव होते. त्यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून काम केलेले होतेच. पण पुण्यात पानशेत धरण फ़ुटल्यावर जो हाहा:कार माजला, तेव्हा पुनर्वसनाचे काम एकहाती करून दाखवल्याने बर्वे यांचे नाव झालेले होते. मग काय, शिवसेनेने कॉग्रेसच्या बर्व्यांना जणू दत्तकच घेतले. पार गिरगावपासून अंधेरी दादरपर्यंतचे शिवसैनिक आपले भाग सोडून इशान्य मुंबईत बर्वे यांना विजयी करण्यासाठी धडपडू लागले. बर्वे यांना निवडून आणायचे म्हणजे प्रत्यक्षात मेननला पाडायचे, शिवधनुष्य शिवसेनेने अंगावर घेतले होते. ज्यांना शक्य होते, ते तरूण आपला भाग सोडून नित्यनेमाने कुर्ला ते कल्याण असा प्रचार करायला जायचे. त्यांच्यासाठीचा खर्च अर्थातच कॉग्रेसकडून केला जात असे. पण प्रचारापेक्षा त्या भागातील डाव्या पक्षाचे जे आक्रमक कार्यकर्ते होते; त्यांच्याशी झुंजायचे काम शिवसेनेवर सोपवण्यात आलेले होते, म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मुंबईच्या पूर्व उपनगराचा हा भाग प्रामुख्याने विविध कारखाने व उद्योगांचा होता. त्याच्या आसपासची वस्ती व चाळी कामगारांच्याच होत्या. त्यामुळे तिथल्या कंपन्यांमध्ये कामगार संघटना चालवणार्‍या पक्षांचेच तिथे वर्चस्व होते. म्हणजेच डाव्यांचा तिकडे वरचष्मा होता. त्याला शह देण्यासाठी कॉग्रेसला शिवसेना उपयोगी ठरली. कारण डाव्यांच्या गुंडगिरीशी दोन हात करणारी फ़ौज कॉग्रेसपाशी नव्हती. तिथूनच मग डावे आणि शिवसेना यांचा थेट सामाना सुरू झाला. शिवसेनेच्या त्या आक्रमक झुंडशाहीचा प्रतिकार करणे किंवा तेवढ्य़ाच हिंसक रितीने सेनेला उत्तर देण्याचा विडा डाव्या पक्षांनी उचलला होता. त्यात समितीचे लोकसभा उमेदवार म्हणून आचार्य अत्रेही सहभागी झाले होते. त्या निवडणुकीत उत्तरमध्य मुंबईत समितीच्या तिकीटावर रिपब्लिकन उमेदवार म्हणून आचार्य अत्रे, दक्षिणमध्य मुंबईत कम्युनिस्ट पक्षाचे समिती उमेदवार कॉम्रेड डांगे व दक्षिण मुंबईत संसोपाचे समिती उमेदवार जॉर्ज फ़र्नांडीस उभे होते. विधानसभा व लोकसभा निवडणुका तोपर्यंत तरी एकाचवेळी होत असत.

   आधीच समिती व तिच्यातल्या पक्षांवर मराठीच्या हिताचा बळी देणारे असा आरोप बाळासाहेब व शिवसेना करीत होती. त्यातच त्यांनी इशान्य मुंबईत कृष्ण मेनन यांना समितीचे उमेदवार करणे; म्हणजे सेनेच्या हातात कोलितच देणे नव्हते का? बदनाम मेननला मुंबईत आणून ‘महाराष्ट्र’ समितीच्या नावाने उमेदवार म्हणून उभे करण्याचे कारणच काय होते? अर्थात तिथे जनसंघाचे (पूर्वाश्रमीचा भाजपा) डॉ. मुकुंदराव आगासकर सुद्धा मैदानात होते. पण सेनेने त्यांच्याऐवजी बर्वे यांचा कॉग्रेस उमेदवार असूनही पुरस्कार का करावा? मराठीच पाहिजे तर सेनेला आगास्कर यांनाही पाठींबा देता आलाच असता. पण प्रश्न नुसता पाठींब्याचा नव्हता; तर मेनन याला हुकूमी पराभूत करणारा उमेदवार आगास्कर नव्हते. कारण त्या पक्षाची तेवढी ताकद त्या भागामध्ये नव्हती. तेव्हा इशान्य मुंबईचा लोकसभा मतदारसंघ कुर्ल्यापासून थेट कल्याणपर्यंत पसरला होता. आज तेवढ्याच भागातून साडेतीन खासदार लोकसभेवर निवडून येतात. कुर्ला, घाटकोपर, चेंबूर मुलूंड हे मुबईतले चार, तर ठाणे व कल्याण असे दोन मुंबई बाहेरचे मिळून सहा विधानसभा मतदारसंघ इशान्य मुंबई म्हणून ओळखले जात असत. याच मेनन-बर्वे लढतीने मग शिवसेनेचे लोण मुंबईच्या सीमेबाहेर ठाणे कल्याणमध्ये जाऊन पोहोचले. थोडीफ़ार सेनेची हवा तिथेही होतीच. पण त्या निवडणुकीच्या रणधुमाळीत दोन तीन महिने शिवसेनेच्या तरूणांनी तिथे जो धुमाकुळ घातला; त्यातून डाव्यांच्या दादागिरीला कंटाळलेल्या लोकांचे लक्ष शिवसेनेने वेधून घेतले. स्वत: बाळासाहेबांनी बर्वे यांच्या व्यासपीठावर न जाता शिवसेनेच्या वतीने अनेक सभा घेतल्या. त्यात त्यांनी लुंगीवाला मेनन व देशद्रोही मेनन यांच्यावर असे जबरदस्त शरसंधान केले, की बर्वे यांना मते देण्यासाठी आवाहन करताना त्यांनी जणू स्वत:चा मतदारच तयार करण्याचे काम हाती घेतले होते. मेननला उभा करून अशी संधी शिवसेनेला कॉग्रेसने नव्हे; तर डाव्यांच्या संपुर्ण महाराष्ट्र समितीने दिली हे नाकारता येईल काय? पंचेचाळीस वर्षापुर्वी डाव्यांनी मेनन तिथे उभा केलाच नसता, तर पुढला घटनाक्रम तसाच घडला असता काय? त्या संधीचा लाभ सेनेने उठवला. कसा उठवला, तोही इतिहास मोठा मनोरंजक आहे.    ( क्रमश:)  
भाग   ( २३ )    १२/१२/१२