शनिवारी अखेरीस दिल्लीला ‘आप’ले सरकार मिळाले. अण्णांच्या लोकपाल आंदोलनातून उदयास आलेल्या अरविंद केजरीवाल व अन्य तरूण नेत्यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पार्टी या पक्षाने अवघ्या सव्वा वर्षात लोकात मिसळू्न काम केले आणि दुसर्या क्रमांकाची मते व जागा मिळवून सत्ताही काबीज केली. अर्थात त्यांच्या हाती आलेली सत्ता निर्विवाद नाही. कारण त्यांना बहूमत मिळालेले नाही आणि पहिल्या क्रमांकावरच्या भाजपालाही बहुमत हुकलेले आहे. पण परिस्थितीने केजरीवाल यांना पाठींबा द्यायची नामुष्की कॉग्रेस पक्षावर आली. परिणामी पाठींबा न घेताच केजरीवाल यांनी अल्पमताचे सरकार स्थापन केलेले आहे. मात्र संख्येसाठी त्यांनी कॉग्रेसवर दुगाण्या झाडायचे थांबवलेले नाही किंवा सरकार टिकवण्यासाठी आटापिटा चालविलेला नाही. सहाजिकच अनेक सेक्युलर विचारवंतांना आता केजरीवाल यांच्यात मोदी लाटेवर मात करू शकणारा महान पराक्रमी योद्धा दिसू लागला आहे. परिणामी त्याच केजरीवालाचे अतोनात कौतुक सुरू झाले आहे. शपथविधीनंतर सर्वच वाहिन्यांवर ‘आप’क्रांतीचे कौतुक दुथडी भरून वहात होते. त्यापासून मराठी वाहिन्यांना अलिप्त कसे रहाता येईल? त्यांनीही त्या वहात्या यमुनेत आपापल्या वाहिन्या धुवून पवित्र करून घेण्याची संधी साधली. पण चर्चा कुठलीही असली तरी पॅनेलचे कलाकार नेहमीचेच यशस्वी. त्यापैकी एबीपी माझा नावाच्या वाहिनीकडे बघताना नेहमी लोकांचे कान बंद असतात आणि डोळेही झाकलेले असतात. सहाजिकच तिथे काय होते, दाखवले जाते, बोलले जा्ते त्याचा ऐकणार्यांना थांगपत्ता नसतो. आयोजनच असे असल्यावर वाहिनीवर बोलणार्या व ते प्रक्षेपित करणार्यांना तरी त्यातले काही समजण्याचा संबंध कशाला येईल? त्यामुळेच मग अधूनमधून कोणीतरी संपादक राजीव खांडेकर व ‘नांगर’ प्रसन्ना जोशींना ‘उघडा कान एका नीट’ असे ओरडून सांगावे लागत असते. कारण त्यांच्या चर्चा बघण्यासाठी योजतात व ऐकायच्या नसतात, असेच वाटते. तसे नसते तर शनिवारी केजरीवालांच्या आरत्या ओवाळताना त्या दोघांनी आपल्या चर्चेत आमंत्रित केलेल्या डॉ. कुमार सप्तर्षी व प्रताप आसबे यांनी आजवर केजरीवालांच्या संघर्षाबद्दल जी मुक्ताफ़ळे उधळली होती; त्याचा निदान जाब तरी विचारला असता. नेमक्या दोन वर्षापुर्वी आम आदमी पक्षाची स्थापना झालेली नव्हती आणि केजरीवाल अण्णांच्या सोबत लोकपालचे आंदोलन चालवित होते, तेव्हा याच सेक्युलर ॠषीमुनींनी कोणती भाकिते केली होती?
आज सप्तर्षी व आसबे यांना केजरीवाल व त्यांची सहकारी मंडळी मोदींची रथयात्रा कशी अडवणार, त्याचे कौतुक आहे आणि त्यामध्ये त्यांना १९७७च्या आणिबाणी विरोधात उठलेल्या वादळाची आठवण झालेली आहे. पण जेव्हा याच राजकारणाचा पाया केजरीवाल घालत होते, तेव्हा त्यांच्यावर हीच मंडळी काय काय आरोप करीत होती? बरोबर दोन वर्षापुर्वी म्हणजे २०१२ च्या जानेवारी महिन्याच्या ‘सत्याग्रही विचारधारा’ नामक आपल्या मासिकात लिहिलेल्या संपादकीय लेखात समाजवादी विचारवंत ( त्यात कुमारचा काही दोष नाही. समाजवाद्यांमध्ये जो माणूस कामाचा राहिला नाही व अडगळीत फ़ेकून दिलेला असतो, त्याला ज्येष्ठ विचारवंत म्हणायची प्रथा परंपरा आहे. हल्ली भाजपाही त्याच परंपरेत जाऊन अडवाणींना ‘मार्गदर्शक’ म्हणत असतो) डॉ. कुमार सप्तर्षी काय म्हणत होते? आज ‘लोकपाल’ केजरीवाल आम आदमी पक्षाच्या माध्यमातून मोदींना अडचण होणार म्हणूनच सुखावलेले सप्तर्षी, दोन वर्षापुर्वी कोणती भिती व्यक्त करत होते? त्यांच्याच नेमक्या शब्दात बघा.....
भाजप, व्यापारी व अण्णाः
भाजप सातत्याने काहीतरी खुसपट काढून संसदेतून बाहेर निघून जातो. सतत सभात्याग करणे म्हणजे संसदेवर थुंकण्यासारखे आहे. संसदेविषयी इतकी तुच्छता यापूर्वी देशात कधीही दिसली नव्हती. ‘सत्तेवर आम्ही येवू शकलो नाही, तर आम्ही संसदीय लोकशाहीचा डावच मोडून टाकू‘ असा पण भाजपने केलेला दिसतो. विरोधी पक्षाने सरकारच्या चुकीच्या धोरणांना अवश्य विरोध करावा, ते त्यांचे कर्तव्यच आहे; पण संसदेमधील कामकाजात सतत अडथळे आणणे हे त्यांना शोभत नाही. अण्णांचे आंदोलन, किरकोळ व्यापारात परकीय गुंतवणूक करायला झालेला बनियांचा जबर विरोध आणि भाजपने संसदेला तमाशा बनवून टाकणे या तिन्ही बाबींमध्ये काहीतरी आंतरिक धागा आहे असा आम्हाला रास्त संशय येऊ लागला.
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाची तुतारी फुंकून हा योग्य विषय अण्णांनी हाती घेतला होता. त्यामुळे प्रारंभीच्या काळात आमचा त्यांच्या उद्दिष्टांना पाठिंबा होता. फक्त अण्णांच्या कार्यपध्दतीमध्ये सुधारणा झाली पाहिजे असे वाटत असे. ते मी वाहिन्यांवर जेव्हा संधी मिळेल तेव्हा बोलून दाखवत असे. उदा. ‘‘अण्णा, आपण सत्याग्रही आहोत. आपण कुणाशी वैरत्व राखू नये. आपल्या मनात क्रोध नसावा‘’ वगैरे गोष्टी बोललो. सत्याग्रही पध्दतीच्या जनआंदोलनात फक्त ‘प्रतिपक्षी’ असतो; वैरी कधीच नसतो हे सांगितले. सत्याग्रही जनआंदोलनात वैराला स्थान नाही ही आमची पक्की धारणा आहे. आयुष्यभर अनेक जनआंदोलने केल्यामुळे, तो अनुभव गाठीशी असल्यामुळे कोणत्याही जनआंदोलनाच्या नेत्याच्या वाणी व कृतीमधून जे व्यक्त होते, त्यावरून ते सत्याग्रही आंदोलन यशस्वी होणार की नाही; याचा अंदाज आम्हाला येतो. अण्णा हजारे यांच्या आंदोलनात मला काही दोष दिसू लागले. म्हणून मी जाहीररीत्या, हळुवारपणे काही सूचना केल्या. कशाचाही उपयोग झाला नाही. अण्णांच्या डोक्यातील भ्रमाचा फुगा हवेत उंच जाऊ लागला. अखेरीस आमची खात्री झाली की अण्णांना भ्रष्टाचार मुक्तीसाठी लोकपाल नकोय, तर कॉंग्रेसविरोधी जनमत तयार करण्याकरिता लोकपाल हे निमित्त त्यांना वापरायचे आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात काम करण्याचा प्रत्येकाला मुलभूत हक्क आहे. याबद्दल आमच्या मनात दुमत नाही. तथापि ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा प्रकार सत्याग्रही चारित्र्यात बसत नाही. नंतर एकेक गोष्टी उलगडू लागल्या.
अण्णा-टीम प्रत्येक वेळी सरकारविषयी द्वेष पसरविण्याच्या हेतूने बोलणी फिसकटवित आहेत, हे लक्षात आले. अण्णा कॉंग्रेस पक्षावर व त्यांच्या नेत्यांवर खालच्या पातळीवरील टीका करून आपली प्रतिष्ठा कमी करून घेऊ लागले. कधी पंतप्रधानांवर टीकेचा आसूड ओढ, तर राहुल गांधींना शिव्या दे, तर कधी सोनिया गांधींना दूषण दे असा प्रकार त्यांनी सुरू केला. अण्णांजवळ वैचारिक श्रीमंती नसल्याने थोड्याच वेळात त्यांचे विचार संपतात. मग ते पुनरूक्ती करीत राहतात किंवा मूळ प्रकृतीनुसार एकेरीवर उतरतात. हे मला फार पूर्वीपासून ठाऊक होते. वयोमानानुसार त्यांच्यामध्ये मानसिक शांती आली असेल असा माझा उगाचच समज होता. भाजप केवळ परिस्थितीचा लाभ उठवित आहे. अण्णा नावाचे अस्त्र कॉंग्रेसवर फेकणे एवढाच त्यांचा हेतू दिसतो. त्यांना अँटीकॉंग्रेसिझम नावाच्या तत्त्वज्ञानाचे आदर्श (आयकॉन) म्हणून अण्णांचा हुतात्मा करावयाचा आहे, त्यांनतर अण्णांची जागोजागी देवळे बांधायची आणि तिथून हिंदूराष्ट्राचा प्रसाद वाटायचा हा भाजपचा डावपेच लक्षात येऊ लागला. अण्णांमध्ये ग्रामीण शहाणपण ओतप्रोत भरले आहे. त्यामुळे ते भाजपच्या अखेरच्या डावाला कधीच बळी पडणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. तथापि पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये अण्णांचा कॉंग्रेस विरोधासाठी मुक्त वापर करायचा भाजपचा डाव यशस्वी होत आहे हे लक्षात आले. अण्णांचे दोन दोष भाजपने नेमके हेरले आहेत. अण्णांच्या मनाची कवाडे त्यांच्या पायावर डोके ठेवले तरच खुली होतात, हा पहिला दोष. कॅमेरा पाहिला की अण्णा कितीही भडक विधान करू शकतात हा दुसरा दोष या दोन दोन दोषांवर भाजपचा खेळ उभा आहे.
दोन वर्षापुर्वी या सेक्युलर समाजवादी डॉक्टरांचे निदान होते, की अण्णाटीमचे केजरीवाल हे भाजपाचे एजंट वा हस्तक आहेत आणि म्हणूनच त्यांच्यापासून भारताच्या संविधानाला व घटनात्मक राजकीय व्यवस्थेला धोका निर्माण झालेला आहे. आज दोन वर्षे पुर्ण होत असताना तेच डॉक्टर छातीठोकपणे देशाला भाजपाच्या जातीयवादाला मोदीप्रणीत भाजपाच्या जातियवादापासून वाचण्याचा ‘रामबाण’ उपाय म्हणून केजरीवालांची जडीबुट्टी उपयुक्त असल्याची ग्वाही देत आहेत. ह्याला समाजवाद्यांची सेक्युलर शोकांतिका म्हणायचे की दिवाळखोरी, हे ज्याचे त्याने ठरवावे. अर्थात सामान्य जनतेला अशा निर्बुद्धांच्या विद्वत्तेशी कधीच कर्तव्य नसते. सामान्य माणूस व्यवहारी जीवन जगत असतो आणि अनुभवाने आपले तत्वज्ञान निर्माण करीत असतो, वापरत असतो. विचारवंतांना मग सामान्य माणसाच्या कृतीशी आपले फ़सले्ले तत्त्वज्ञान जुळवून घ्यावे लागत असते. कारण आपण शहाणे आहोत व मुर्ख नाही; हेच बुद्धीमंतांना सतत सिद्ध करण्याची खाज असते. परिणामी लोकांच्या दुर्बळ स्मरणशक्तीचा लाभ उठवून हे बुद्धीमंत, आपलीच थुंकी गिळत असतात किंवा या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचा जादूटोणा करून आपल्या बुद्धीमत्तेचे प्रमाणपत्र पुन्हापुन्हा स्वत:लाच देत असतात. म्हणूनच शनिवारी आसबे, खांडेकर, सप्तर्षी यांच्या चर्चेची कींव करावीशी वाटली.
दीड दोन वर्षापुर्वी आपापल्या लेखातून व वाहिन्यांच्या चर्चेतून हीच मंडळी किमान डझनभर वेळा तरी ‘अण्णा टिमची विश्वासार्हता घसरते आहे’ अशा विषयावर सांगोपांग चर्चा करून केजरीवाल व अण्णांच्या लोकपाल आंदोलनावर दुगाण्य़ा झाडत होती. जोपर्यंत केजरीवाल यांनी दिल्लीत सातत्याने चालविलेल्या लढे व आंदोलनातून तिथल्या निवडणुकीत यश मिळवून दाखवले नव्हते, तोपर्यंत यांना केजरीवालची महत्ता कळली नव्हती. आणि आजही कळलेली नाही. त्यामुळेच आपली आधीची फ़सलेली विधाने व निदाने झाकण्यासाठी आता त्याच दिल्लीपुरत्या केजरीवालांचे देशव्यापी चित्र रंगवण्याचा अतिरेक त्यांच्याकडून चाललेला आहे. केजरीवाल व ‘आप’चा देशाभरचा प्रभाव यांना आज दिसत असेल व जाणवत असेल; तर मग त्यांनाच गेल्या दोन वर्षात केजरीवाल यांच्या दिल्लीत वाढत गेलेल्या प्रभावाचा थांगपत्ता कशाला लागला नव्हता? त्यांनी सत्तेवर येण्याची गोष्ट सोडून द्या. पण दिल्लीतला केजरीवाल यांचा लढा जनतेचा लढा आहे, एवढेही या विद्वानांच्या लक्षात कशाला आलेले नव्हते? अण्णा वा केजरीवाल यांच्या विश्वासार्हतेवर हे शहाणे प्रश्नचिन्ह कशाला लावत होते? कारण अशा विद्वानांना कशातलेच काही कळत नसते आणि जनभावनेशी त्यांचा काडीमात्र संबंध नसतो. हाती प्रसार माध्यमे व साधने आहेत म्हणून रेटून व सातत्याने बिनबुडाचे खोटे बोलायचे आणि उलटले मग आपण त्या गावचेच नाही, असला शहाजोगपणा करण्याची आत्मसात केलेली कला, हेच त्याच्या विद्वत्तेचे एकमेव व्यवच्छेदक लक्षण मानता येईल.
(ज्यांना डॉ. सप्तर्षी यांच्या त्या प्रदिर्घ लेखाचे तेव्हाच मी केलेले पोस्टमार्टेम तपासण्याचे अगत्य असेल, त्यांनी मार्चे-एप्रिल २०१२ काळात माझ्या उलटतपासणी ब्लॉगवरील अर्धा डझन लेख बघावेत)
http://bhautorsekar.blogspot.in/

