दिसणे आणि बघणे यात खुप मोठा फ़रक असतो. दिसणे आपोआप होत असते. पण बघणे खुपच वेगळी गोष्ट आहे, ज्याला आपण लक्ष देणे म्हणतो. बोलताना अनेकदा ‘लक्ष कुठे आहे’ असे आपण एकमेकांना म्हणतो; किंवा माझे लक्ष नव्हते अशी कबुली देतो. त्याचा अर्थ इतकाच, की समोर घडत असते आणि दिसतही असते पण आपले तिथे लक्ष नसते. सगळी फ़सगत तिथेच होते. बघण्यासाठी नजर लागते किंवा इच्छा असावी लागते. अन्यथा दिसणे शक्य असले तरी बघणे अशक्य असते. आपोआपच प्रत्येकाला वेगवेगळे दिसू शकते; वेगवेगळे जाणवू शकते. बुधवारी दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले; तेव्हा त्यांनीही त्यासंबंधात एक चांगले उदाहरण दिले. भाषण करताना मध्येच तहान लागली तर घसा ओला करायला तिथे जे पाण्याचे ग्लास ठेवलेले होते. ते उचलून त्यांनी श्रोत्यांना दाखवले आणि म्हटले जो सकारात्मक विचार करील तो म्हणेल यात अर्धे पाणी आहे तर नकारात्मक विचार करणारा अर्धे रिकामी आहे असे म्हणेल. पण मी (म्हणजे मोदी) तिसर्या प्रकारचा माणूस आहे. मी म्हणतो हे ग्लास संपुर्ण भरलेले आहे. त्यात अर्धे पाणी व अर्धी हवा आहे. इथे बघण्यातला व दिसण्यातला फ़रक पडतो. अर्धे ग्लास रिकामे असू शकत नाही; हे वैज्ञानिक सत्यच आहे. पण ते किती लोक डोळसपणे बघू शकतात. आता कोणी म्हणेल, अर्धी हवा आहे म्हणजे काय मोठे? तशी आसमंतामध्येही हवा आहेच की सर्वदूर. मग अर्ध्या ग्लासात हवा असण्यात कुठली सकारात्मकता आली? तर त्याचे उत्तर असे, की त्या हवेचाही उपयोग होऊ शकतो का, याचा विचार ती आहे; असे डोक्यात असेल तरच होऊ शकतो. जिथे आपण फ़क्त अर्ध्या ग्लास पाण्याचाच साधन सामग्री म्हणून विचार करतो; तिथे मोदी अर्धा ग्लास हवेचाही उपयोग करून घेता येईल काय याचा विचार करतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि तो विचार नुसता तात्विक मानायचे कारण नाही. त्यामागची मानसिकता व भूमिका महत्वाची आहे. चटकन न दिसणारी वा ठाऊक नसलेली, तरीही उपलब्ध असलेली साधने शोधून त्यांचा वापर करण्याची शोधक वृत्ती त्यातून दिसून येते. मोदी यांच्या विकासाचे कौतुक फ़ार होते व झाले आहे. पण त्यामागच्या मानसिकतेचा शोध कोणी व कितीजणांनी घेतला आहे? श्रीराम कॉलेजमधील त्या भाषणातून त्यांनी आपल्या त्या विकासशील मानसिकतेचा सकारात्मक उलगडा करून दाखवला. त्यांच्या त्या भाषणानंतर त्यावरच्या वाहिन्यांवरील चर्चेचा आढावा मी घेतला; तर कोणालाही त्या मानसिकतेमध्ये रस दिसून आला नाही. प्रत्येकाने उपस्थित मुले, श्रोते व इतरांवर झालेल्या परिणामांचा आढावा घेतला होता. पण सांगितले काय त्याचा मात्र आशय समजून घेण्याची मनोवृत्तीच नव्हती.
आपण गुजरातमध्ये काय केले, याची उदाहरणे देताना मोदी यांनी आपल्याला एकविसाव्या शतकातील जगातील घडामोडींचे किती भान आहे, त्याचा दाखलाच त्या भाषणातून दिला. युरोप म्हातारा होऊन गेला आहे आणि चीन म्हातारा होतोय; या पार्श्वभूमीवर जगातल्या सर्वाधिक तरुणांची मोठी लोकसंख्या असलेला देश, म्हणून भारत आज जगातला सर्वात तरूण देश व समाज आहे. आणि नुसताच वयाने तरूण नाही तर त्याच्याकडे गुणवत्तेसह असलेली कार्यक्षमता; हेच देशाचे सर्वात मोठे भांडवल आहे, ज्या बळावर आपला समाज जगातली महासत्ता बनू शकतो, असा त्यांच्या प्रतिपादनाचा आशय होता. तीच राज्यघटना आहे, तेच कायदे आहेत, तेच नियमांचे जंजाळ आहे, तेच (आळशी) कर्मचारी अधिकारी आहेत, तेच मंत्रालय कचेर्या आहेत, पण गुजरात बदलू शकला, कारण तिथे बदल घडवणारी प्रशासकीय इच्छाशक्ती कार्यरत झाली, असा त्यांच्या एकूण भाषणाचा आशय होता. या सगळ्या भाषणात मोदी यांनी कुठेही अडचणी, त्रुटी, टंचाई, तुटवडा यांचा उल्लेख केला नाही. आपल्या देशात कुठे काय कमी आहे, यापेक्षा कुठे काय बघायला आपण विसरून गेल्यामुळे अभावाची भावना आहे, त्यावर त्यांनी बोट ठेवले. एकीकडे महाराष्ट्रात अपुर्या पावसाने दुष्काळाची स्थिती आहे, भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेदिवस खाली जाते आहे आणि दुसरीकडे देशात गुजरात एकच असे राज्य आहे की तिथली पाण्याची पातळी वाढते आहे. मग हे साधणार्या मोदीकडे जादूची कांडी नाही तर सकारात्मक बघायची दृष्टी आहे, असेच त्याने त्या भाषणातून सांगितले. पण समोर ऐकणार्यांना ते दिसले व बघता आले, तेच बाकी अभ्यासकांना का दिसू नये? बघायचेच नसेल तर दिसणार कसे? म
पाऊण तासाच्या भाषणात मोदी यांनी कुठेही राजकारण येऊ दिले नाही. पक्षीय वा राजकीय संदर्भ त्यांनी कटाक्षाने टाळले. पण मजा अशी, की त्यांचे संपुर्ण भाषण मात्र राजकीय हेतूने भारलेले होते. म्हणूनच संपुर्ण भाषणच राजकीय होते. आपल्याला देशाचे नेतृत्व सोपवले तर आपल्यासमोर देशाच्या विकासाचे कसे परिपुर्ण व्यापक स्वप्न आधीच तयार आहे, त्याची पेशकश मोदी यांनी त्या भाषणातून मोठ्या खुबीने करून दाखवली. संपुर्ण भाषणातले एकच राजकीय म्हणता येईल असे वाक्य म्हणजे मतांचे राजकारण करून देशाची प्रगती करता येणार नाही आणि विकासाच्या राजकारणाला अन्य कुठला पर्यायच नाही. हे एकमेव वाक्य राजकीय म्हणता येईल असे आहे. पण त्या एका वाक्याला अर्थपुर्ण बनवण्यासाठी मोदी यांनी एकूण भाषणात केलेली विकास, आर्थिक व्याप व समस्यांची मांडणी अतिशय मूलभूत स्वरूपाची होती. जी तिथल्या हुशार तरूण मुलांना भुरळ घालणारी होती; तशीच या देशातील अतिशय सामान्य अशा जनतेला सुद्धा भुरळ घालणारी असू शकते. दिल्लीतले लोक चहात गुजरातचे दूध घालतात. युरोपात कुठेही भेंडी खाल्लीत तर ती गुजरातमध्ये पिकलेली असते. सिंगापूर हॉंगकॉंगमध्ये मस्का गुजरातचा असतो आणि अफ़गाणीस्तानात टोमॅटो गुजरातचे असतात, असे सांगताना त्यांनी आपण जगाला बाजारपेठ बनवू शकतो असे सुचवले. जग आपल्याकडे बाजारपेठ म्हणून बघते. पण विकास व प्रगती करायची तर आपण जगाला बाजारपेठ बनवले पाहिजे आणि ते शक्य आहे. त्यातूनच गरीबीवर मात करता येईल व आली; असेही त्यांनी आपल्या अनुभवातून सांगितले. मोदींचे दावे खोटे पाडायला अनेकजण नेहमी उत्सुक असतात. पण दुर्दैव इतकेच, की केंद्रातील युपीएच्या अनेक योजना गुजरातमध्ये यशस्वी झाल्याचे दावे केंद्रालाच करावे लागत आहेत. मग मोदीकडे बघायचे कसे? सामान्य माणूस त्याच्याकडे बघणार कसा? कशासाठी बघेल? सामान्य मतदार म्हणजे जनता आपली निवड कशी करत असते? वाहिन्यांच्या वा वृत्तपत्रांच्या वातानुकुलीत केबीनमध्ये बसून जनमताचा कानोसा घेता येत नसतो. मोदींना देशभरच्या चाचण्यांमध्ये इतका कौल का मिळतो, ते जाणून घ्यायचे असेल तर आधी सामान्य माणुस विचार कसा करतो व मत कसे बनवतो, त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. अभ्यास याचा अर्थ तिथे जाऊन सामान्य माणसाला समजून घ्यावे लागेल. आपले मत बनवून त्यात सामान्य माणसाला कोंबता येणार नाही. आपले मत बाजूला ठेवून सामान्यांच्या मनात घुसावे लागेल व त्याच्या आवडीनिवडीचा अभ्यास करावा लागेल.
शहाणे व बुद्धीमंत आणि सामान्य माणुस यात एक मोठा फ़रक असतो, तो म्हणजे जे दिसते ते बघण्याची सामान्य माणसाची क्षमता. नेमकी उलट स्थिती बुद्धीमंत लोकांची असते. जे साध्या डोळ्यांनीही दिसू शकते, त्याच्यासाठीही शहाण्यांना चष्मा लावूनच बघायची सवय असते. सहाजिकच त्यांना असलेले दिसत नाही आणि नसलेले दिसत असते. परिणामी शहाण्यांना व्यवहारी निर्णय घेता येत नाहीत; तर सामान्य माणसे त्वरेने व्यवहारी निर्णय घेउ शकत असतात. मागल्या किंवा यावेळच्या उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत मतदाराने एकाच पक्षाला बहूमत देत सत्तांतर घडवले. पण दोन्ही वे्ळी या विषयतले जाणकार मात्र त्रिशंकू विधानसभेची गणिते मांडत होते. इतकी तफ़ावत का होते? तेव्हा मायावती किंवा यावेळी मुलायमनाही बहूमताच खात्री नव्हती. मग त्या मतदाराने कधी व कसे निर्णय घेऊन सत्तांतर घडवले? असा सामुहिक निर्णय त्या मतदारामध्ये होतोच कसा? कुठून ही मताची लाट तयार होते? ज्याची उत्तरे अभ्यास करून जाणकारांना मिळत नाहीत त्याची उत्तरे सामान्य जनता शोधते कशी व कोणत्या निकषावर हे म्हणूनच जाणून घेण्याची गरज आहे. लोकमत बनते कसे व घडते-बिघडते कसे? इतक्य वेगाने लोकमत फ़िरते कसे? जाहिरात व प्रचार करून राहूलची कॉग्रेस उत्तरप्रदेशचा मतदार नाकारतो कशाला आणि प्रसिद्धीपासून दूर असूनही अखिलेश वा मायावती बाजी मारतात कसे? भ्रष्टाचाराचे आरोप असून मायावती वा हत्याकांडाचे दंगलीचे आरोप मोदींना पराभूत का करू शकत नाहीत? हे लोकमत बनतेच कसे? लोक कोणात काय बघतात की जे जाणकार अभ्यासकांना बघता येत नाही?
( क्रमश:)
भाग ( ७९ ) ८/२/१३
