बुधवार, २९ जानेवारी, २०१४

आम आदमी पार्टी हा संघटित पक्ष आहे काय?

(झुंडीचे राजकारण -१)


   गेल्या तीन वर्षापासून देशाची राजधानी दिल्लीत, जनलोकपाल आंदोलनाच्या निमित्ताने जी एक विशिष्ठ मानसिक लोकसंख्या एकवटलेली दिसते आणि तिचे वर्तनही एकाच ठाशीव पद्धतीने होताना दिसते आहे. त्याला आपण आम आदमी पक्ष असे संबोधतो आहोत. या तीन वर्षाच्या काळात त्यापैकी अनेकजण त्यापासून दुर झाले, तर काही नवे लोक त्यात सहभागी झाले. आधी विविध संस्था व संघटनांच्या स्वरूपात कार्यरत असलेल्या काही नेत्यांनी पुढाकार घेऊन ‘इंडीया अगेंस्ट करप्शन’ नावाची एक तात्कालीन संघटना निर्माण केली. आपापले अस्तीत्व कायम ठेवून त्यात बाकीच्या संस्था संघटना सहभागी झाल्या. त्यातून काही चेहरे पुढे आले आणि त्यामुळेच सहभागी संघटनांच्या बाहेरचे अनेक अस्वस्थ लोक त्यात सह्भागी होत गेले. अखेरीस त्यातल्या काही परिचित व लोकप्रिय झालेल्या चेहर्‍यांनी आंदोलनाचा वारसा पुढे चालवण्यासाठी एका राजकीय पक्षाचे स्वरूप धारण केले. त्यांनी निवडणूका लढवल्या व सत्ताही प्राप्त केली. मग अशा यशस्वी व्यक्ती वा संघटनेकडे सामान्य लोकांचा ओढा असणे स्वाभाविक असते. निवडणूका लढवून सत्तेपर्यंत मजल मारली, तर आपण त्यांच्याकडे एक राजकीय पक्ष म्हणून बघत असतो आणि त्याचे विश्लेषण वा मूल्यांकनही राजकीय पक्ष म्हणूनच करू बघतो. पण कुठल्याही प्रकारे तपासायला वा अभ्यासायला गेल्यास आम आदमी पक्षाचे स्वरूप राजकीय पक्ष व संघटनेच्या ढाच्यात बसवता येत नाही. त्यामुळेच मग त्याचे आकलन वा विश्लेषण गडबडून जाते. त्याचप्रमाणे या पक्षाच्या नेत्यांची भाषणे, वक्तव्ये, विधाने, विचार वा कृती, कारवाया आपल्या आवाक्यात यायला तयार नसतात. त्याबद्दल विचारणा केल्यास त्या पक्षाचे नेते वा सदस्य ते काही नवेच करीत आहेत आणि त्यामुळे त्याबद्दलचे आकलन इतक्यात कोणाला होणार नाही, अशी फ़ुशारकीही मारत असतात. त्यांचा हा दावा योग्यही आहे. कारण त्यांनी स्वत:ला कायद्याच्या तरतुदी पुरती राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करून घेतलेली असली, तरी त्यांचे वर्तन वा कार्यशैली कुठल्याही कारणास्तव राजकीय पक्षासारखी होत नसते. मग सक्तीने त्यांना राजकीय पक्ष ठरवून केलेली त्यांची चिकित्सा चुकत असेल तर त्यांना दोष देऊन कसे चालेल? चुक त्यांची नाही. त्यांना आपल्या व्याख्येत कोंबून त्यांचे मूल्यांकन करणार्‍यांची चुक होते आहे. कारण आम आदमी पक्ष हा जसा राजकीय पक्ष नाही, तशीच ती राजकीय संघटनाही नाही. ते एक आंदोलन नाही किंवा तो नुसताच एका मागणी वा कारणासाठी लढायला जमलेला जमाव सुद्धा नाही. ती एक प्रकारची झुंड आहे. म्हणूनच त्यांचे वर्तन वा कृती या सार्वथैव झुंडीसारख्या असतात. म्हणूनच त्यातली झुंडीची मानसिकता शोधावी व समजून घ्यावी लागेल. किंबहूना त्यासाठी आधी झुंडीचे मानसशास्त्रही उलगडावे लागेल.

   आधी म्हणजे अण्णा हजारे यानी जंतरमंतर येथे जनलोकपाल आंदोलनाची तुतारी फ़ुंकण्याच्या पुर्वी हे अरविंद केजरीवाल कोण होते? आज त्यांच्या भोवती दिसणारे त्यांचे सवंगडी कोण होते व काय करीत होते? अकस्मात त्यांच्याभोवती ही झुंड कशी जमा झाली? ज्यांनी अण्णा हजारे यांच्या चेहर्‍याआड राहून त्या आंदोलनात पुढाकार घेतला, तेच आज अण्णांना झुगारून राजकारण करू लागले, तरी भोवतालची झुंड त्यांच्या भोवती कशाला टिकून राहिली आहे? अण्णांनी साथ सोडल्यावर झुंडीने केजरीवाल यांना डोक्यावर कशाला घ्यावे? दुसरीकडे दिवसेदिवस या झुंडीच्या मागे धावलेल्या काही लोकांचा भ्रमनिरास कशामुळे होत आहे? प्रामुख्याने केजरीवाल व त्यांच्या पक्षाच्या कौतुकात रममाण झालेल्या बुद्धीमंत पत्रकारांवर आता पश्चात्ताप करायचा प्रसंग कशामुळे आलेला आहे? इत्यादी प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज आहे. कारण आज ज्याप्रकारे व ज्या समजूतीवर आधारीत आम आदमी पक्षाची चिकित्सा होत आहे; ते निकषच चुकलेले आहेत. म्हणून मग एका बाजूला केजरीवाल यांचे पाठीराखे अधिक चिवटपणे नेत्याचे समर्थन करीत आहेत, तर दुसरीकडे गेले काही महिने केजरीवाल यांच्या कर्तृत्वाने भारावलेला मध्यमवर्ग व बुद्धीजिवी वर्ग गडबडून, गोंधळून गेला आहे. शंका व्यक्त करू लागला आहे किंवा संशयीत नजरेने या पक्षाकडे बघू लागला आहे. पण कोणीही घडल्या प्रकाराकडे झुंड म्हणून बघायला तयार नाही. तिथेच त्यांची गफ़लत झालेली आहे. जितकी ही गफ़लत केजरीवाल यांच्या निष्ठावंत पाठीराख्यांची झालेली आहे, तितकीच ती त्यांच्या विरोधकांचीही झालेली आहे. जितक्या लौकर सामान्य माणूस म्हणजे आम आदमी केजरीवाल यांच्यापासून दुरावेल, तितका बुद्धीवादी वर्ग त्यांच्यापासून दुरावणार नाही. याचे कारण आपण झुंडीच्या आहारी जाऊन फ़सलो, हे बुद्धीजिवी वर्गाला कबुल करणे सोपे नसते. पण आम आदम व्यवहारवादी असतो. त्याला कल्पनाविश्वात रमायची चैन परवडणारी नसते. वास्तवाचे चटके सोसतच त्याला प्रत्येक क्षणाला सामोरे जावे लागत असते. म्हणूनच आम आदमी लौकर भ्रमातून बाहेर पडू शकतो आणि बुद्धीमंत दिर्घकाळ भ्रमनिरास व्हायची प्रतिक्षा करीत रहातो. दिल्लीची जनता म्हणूनच आता डोळस होऊन केजरीवाल सरकारकडे बघू लागली आहे आणि देशातले पत्रकार बुद्धीमंत मात्र मिमांसा करण्यातच गर्क आहेत. असो, इथे आजच्या राजकारणाचा वा समिकरणाचा उहापोह करायचा नसून आम आदमी पक्षाची निर्मिती उदय व वर्तनशैली; यांची कारणमिमांसा करायची आहे. म्हणूनच अन्य तमाम प्रस्थापित राजकीय पक्षांपेक्षा हा पक्ष, त्याचे सरकार व त्याचे नेतृत्व भिन्न कशाला भासते; त्याकडे बारकाईने बघावे लागेल. अभ्यासावे लागेल.

   एक विशिष्ठ कारणास्तव वा मागणीसाठी विभिन्न विचारांचे वा भूमिकेतले ठराविक लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यात वैचारिक साम्य वा साधर्म्य असू शकत नाही. सार्वजनिक वा सामाजिक जाणीवांच्या बाबतीत त्यांची वेगवेगळ्या विषयावरील मते टोकाची भिन्न असू शकतात. ज्या कारण वा मागणीसाठी ही मंडळी एकत्र आलेली असतात, तोच त्यांना जोडणारा धागा असतो. तो धागा जोपर्यंत आणि जितका मजबूत असतो, तोपर्यंतच त्यांच्यात एकसुत्रीपणा आढळून येतो. त्यात सैलसरपणा आला किंवा तो धागा तुटला; मग त्यांच्यात कमालीची मतभिन्नता दिसू लागते. कधीकधी असे लोक एकामेकांच्या विरुद्ध अत्यंत कडवी भाषा बोलू लागतात. परस्परांच्या विरोधात दंड थोपटून उभे ठाकलेलेही दिसू लागतात. म्हणूनच त्यांना एक संघटना वा एक राजकीय पक्ष समजून त्यांची कृती वा वर्तन तपासता येत नाही. कारण त्यांच्यात समान तत्वज्ञान वा विचारसरणीचा कुठलाही धागा नसतो. अधिक सोपे करून सांगायचे, तर एकाच आगगाडी वा वाहनातून प्रवासाला दूरच्या प्रवासाला पर्यटनाला निघालेल्या लोकांमध्ये अल्पावधीतच एकप्रकारचे सौहार्दाचे व आपुलकीचे नाते निर्माण होते. तितक्या पर्यटन वा प्रवासात दिर्घकालीन मैत्रीसारखे हे लोक वागत असतात. नंतरही पुन्हा भेटण्य़ाचे कबुल करतात, एकमेकांचे पत्ते घेतात. प्रवासात गंभीर प्रसंग ओढवला तर परस्परांच्या मदतीला धावून जातात. पण तितका प्रवास आवरला, मग काही काळ त्यातल्या गंमती वा मजा आठवतात. संपर्कात रहातात. पण हा सगळा मामला अल्पायुषी असतो. थोड्याच दिवसात सर्वकाही काळाच्या पडद्याआड जाते. पण कुटुंब वा नात्याच्या गोतावळा, अन्य संस्थात असलेल्या माणसांची मैत्री दिर्घकालीन असते. एकमेकांच्या सुखदु:खात त्यांचा कायम सहभाग असतो. हा जो वेगळेपणा आपल्याला प्रवासीमैत्री व नातेसंबंधात आढळतो; तसाच फ़रक आंदोलनासाठी जमलेली गर्दी व वैचारिक आधारे बांधलेली संघटना यांच्यातही असतो. वैचारिक तात्वज्ञानावर आधारलेल्या संघटना व पक्ष दिर्घकाळ टिकणारे असतात आणि त्यांचे सर्वव्यापी विषयांवरचे मत तयार असते. त्यांचे व्यवहार प्रासंगिक नसतात. आम आदमी पक्षाची उभारणी मुळात एका आंदोलनासाठी जमलेल्या जमावातून झालेली आहे. एका मागणीसाठी जमलेल्या गर्दीने स्वत:ला पक्ष म्हणून घोषित केले. पण त्यांना कुठल्या वैचारिक सुत्राने बांधलेले नव्हते. त्यामुळेच मूळ मागणी व विषय बाजूला पडत गेला; तसे त्यातले दुवे निखळत गेले. लोक पांगत गेले आणि नव्या मतलबासाठी नवे लोक त्यात समाविष्ट होत गेले. पण यातला कोणीही एका विचारसरणीसाठी तिथे आलेला नाही. तो आपापली मागणी व हेतू साधण्य़ासाठी त्या जमावात, झुंडीच्या मानसिकतेने सहभागी होत गेलेला आहे. त्यामुळेच त्याची पक्ष म्हणून नोंदणी झालेली असली व त्याने निवडणूका लढवून जिंकलेल्या असल्या; तरी त्याचे स्वरूप आजही झुंडीसारखेच आहे. मात्र माध्यमातून व विचारवंत विश्लेषकांकडून त्याची चिकित्सा राजकीय संघटित पक्ष म्हणून होते आहे.

  अनेकांना प्रश्न पडेल, की झुंड वा राजकीय संघटित पक्ष यात नेमका काय फ़रक असतो? आपण आजवर अनेक राजकीय पक्ष बघितले व बघत असतो. त्यापेक्षा झुंड किंवा आम आदमी पक्ष नावाचा प्रकार कसा व का वेगळा आहे? अशा प्रश्नांची उत्तरे हवी असतील, तर आधी झुंड म्हणजे काय आणि झुंडीचे मानसशास्त्र कसे असते? झुंडी कशा बनतात आणि झुंडी कोणत्या परिस्थितीत उदयाला येतात? झुंडींचे भवितव्य काय असते वा झुंडीचे नेतृत्व कसे उदयास येते, इत्यादी प्रश्नांची उत्तरे बघावी लागतील. पुढील काही लेखातून तीच कारणमिमांसा करण्याचा माझा प्रयास आहे. (अपुर्ण)

शनिवार, २५ जानेवारी, २०१४

सोशल मीडियाचे आजारपण



  केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर हे आधीपासूनच सोशल मीडियामुळे वादात फ़सलेले राजकारणी होते. एकप्रकारे आपण असेही म्हणू शकतो, की आज दिल्लीत जो राजकारणाचा तमाशा मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरिवाल सादर करीत आहेत, त्याची नांदी सर्वप्रथम थरूर यांनीच केली होती. देशाचा एक जबाबदार मंत्री असताना त्यांनी आपले मनोगत जाहिरपणे मांडण्यावर मर्यादा येतात, याचे भान ठेवले नव्हते. सोशल मीडिया म्हणून मागल्या काही वर्षात इंटरनेटच्या माध्यमातून ज्या विविध सुविधा लोकांना उपलब्ध झाल्या आहेत, त्यातून समाजजीवनात नवनव्या समस्या उभ्या रहात आहेत. पण दुसरीकडे याच माध्यमात कुणाचे किती अनुयायी; अशीही स्पर्धा सुरू झालेली आहे. मग या माध्यमांचा वापर करणार्‍यांना आपण त्यावर काय भूमिका मांडतो वा काय काय जाहिर करतो, त्याचेही ताळतंत्र राहिलेले नाही. आपोआपच त्याचे बरेवाईट व्हायचे ते परिणाम होतच असतात. अशाच एका प्रकरणात थरूर यांना मंत्रीपद गमवावे लागले होते. कारण त्यांच्याच एका विधानाचा खुप गवगवा झाला आणि त्यांनी आपल्या अधिकार पदाचा आयपीएल या स्पर्धेत गैरवापर केल्याचा आरोप झाला होता. तेवढेच नाही तर त्यांचे व्यक्तीगत खाजगी जीवन त्यातून चव्हाट्यावर आलेले होते. मग त्यातूनच त्यांच्या छुप्या प्रेमसंबंधांना व्यवहारी स्वरूप देण्याची पाळी त्यांच्यावर आलेली होती. तरीही हा माणूस शहाणा झालेला नव्हता. उलट आपल्या प्रेयसीवर आपण दहा मंत्रीपदे ओवाळून टाकतो, अशी दर्पोक्ती त्यांनी केलेली होती आणि ती सुद्धा त्याच सोशल मीडियातून केली होती. योगायोग बघा, आता त्यांच्या त्याच प्रेमसंबंध व खाजगी जीवनाची लक्तरे त्याच माध्यमाच्या वेशीवर टांगली गेली आहेत. पण त्यातून या नव्या मुक्त अनिर्बंध माध्यमाचा सामाजिक व खाजगी जीवनावर होणारा परिणाम गंभीर विषय असल्याकडे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. 

   शशी थरूर व त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर हे जोडपे तसे कायम प्रसिद्धीच्या झोतात राहिलेले आहे. किंबहूना त्यांना त्याचा हव्यासच होता म्हणायला हरकत नाही. पार्ट्या वा समारंभात जाऊन लोकांचे लक्ष वेधून घेताना आपल्या खाजगी आयुष्यावर अनेक मर्यादा येतात आणि त्यात डोकावण्याची इतरांना मुभा मिळते; याचेही भान त्यांना नव्हते. त्यामुळेच मग नुसत्या प्रसार माध्यमांच्याच नव्हेतर सोशल मीडियाच्याही मंचावर हे दोघे आपले मनोगत मोकळेपणाने मांडून त्याबद्दलच्या चर्चेला जणू प्रोत्साहनच देत होते. सहाजिकच त्यांनीच आपले खाजगी जीवन व त्यातल्या नाजूक गोष्टींना सार्वजनिक विषय बनवून टाकले होते. कारण काय जाहिर बोलावे किंवा टाळावे, याचा धरबंद त्यांनाच उरलेला नव्हता. म्हणूनच मग त्यांच्यातला विसंवाद, धुसफ़ुस त्यांनी उघडपणे कुठे सांगितली नाही, तरी अशा माध्यमातून कुजबुज करण्याचे निमित्त म्हणून त्यांनीच चव्हाट्यावर आणली होती. पण त्याची परिणती सुनंदाच्या मृत्यूमध्ये होईल; अशी कोणीच अपेक्षा केलेली नव्हती. तसे झाले आणि हा विषय एकदम ऐरणीवर आला. दोघांमध्ये धुसफ़ुस चालू असल्याची कुजबुज त्यांच्या अत्यंत निकटवर्ती वर्तुळात चालू होती. पण कोणी उघड बोलत नव्हता. मग एके दिवशी सुनंदा यांनीच आपल्या ट्विटरवर त्याची वाच्यता केली. पण त्यातून त्यांनी अत्यंत गंभीर राजकीय, राष्ट्रीय विषयाला तोंड फ़ोडले होते. त्यांनी पतीविषयी मतप्रदर्शन केलेले असले, तरी त्यांचा पती कोणी सामान्य नागरिक नाही की त्यासंबंधात आरोप केलेली महिला सामान्य नव्हती. 

   मेहर तर्रार नावाची पाकिस्तानी महिला लाहोर येथे इंग्रजी वृत्तपत्रातली मान्यवर स्तंभलेखिका आहे. ती आपल्या पतीभोवती प्रेमाचे जाळे विणत असून शशी थरूर यांच्यावर पाकिस्तानी हेरसंस्थेने सोडलेला हा हस्तक आह; असा गौप्यस्फ़ोट सुनंदा यांनी केला होता. मेहर यांनी तात्काळ त्याचा इन्कार केला आणि थरूर यांनीही सुनंदाला विश्वासात घेऊन त्यावर पांघरूण घालण्याचा खटाटोप पुन्हा खुल्या माध्यमातून केला. सुनंदाने दरम्यान एका वृत्तपत्राला मुलाखत देऊन आणखी काही गंभीर आरोप पतीवर केले. यावर मग उघड कुजबुज सुरू झाली आणि त्याची गंमत लोक अनुभवत असताना अकस्मात राजधानीच्या एका पंचतारांकित हॉटेलात सुनंदाचा मृतदेह आढळल्याच्या बातमीने खळबळ उडवून दिली. त्या दिवशी कॉग्रेस महासमितीचे अधिवेशन दिल्लीत चालू होते आणि थरूर तिथेच दिवसभर होते. संध्याकाळी ते हॉटेलवर परतले, तर हा प्रकार घडलेला. आता ती आत्महत्या नसून विषप्रयोग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचा तपास चालू आहे. तो यथावकाश पुर्ण होईल. त्यातून हत्येविषयीचे रहस्य उलगडू शकेल किंवा नाही, त्याबद्दल शंकाच आहे. पण या निमित्ताने सोशल मीडियाच्या खाजगी जीवनावरील आक्रमणाचे गांभीर्य समोर आलेले आहे. आधुनिक जीवनशैलीचा अविभाज्य भाग झालेले मोबाईल, संपर्कसाधने, यांनी माणसाच्या जीवनातील एकांत संपुष्टात आणला आहे, की माणसाला घोळक्यात असतानाही एकांतिक आत्मकेंद्री बनवले आहे? यासारखा प्रश्न मोलाचा बनवला आहे. एका आभासी जगात माणसाला पुरता गुरफ़टून टाकले आहे काय? मग अशा माणसाला वास्तव जग आणि आभासी जग यातला फ़रक समजेनासा झाला आहे काय? त्यातून होणारी ओढाताण अशा घटनांचे कारण होत असावी काय, इत्यादी प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण सुनंदा पुष्कर यांनी पतीवर जे काही आरोप केलेत वा शंका घेतल्यात; त्याला वास्तव जीवनातले कुठले आधार नाहीत. कारण ज्या महिलेविषयी त्यांनी शंकासंशय घेतला, ती वास्तविक जगात असली तरी तिचा थरूर यांच्याशी असलेला वा येणारा संबंध सोशल मीडियाच्या आभासी जगातला होता. मग सुनंदा यांनी त्या आभासाला वास्तविक जगातला समजून किती मनाला लावून घ्यावे? 

   हा विषय केवळ याच एका जोडप्या पुरता नाही. मध्यंतरी त्याच दरम्यान गुजरातच्या एका तरूण मुलीचाही असाच मामला पुढे आलेला होता. याच माध्यमात मैत्री झालेल्या कुणा तरूणाला भेटण्यासाठी ही मुलगी खोटा पासपोर्ट घेऊन थेट दुबईमार्गे पाकिस्तानात पोहोचली आणि तिथल्या विमानतळावर योग्य कागदपत्रे नसल्याने तिला माघारी पाठवून देण्यात आले. मुद्दा इतकाच, की एकाकी वा आत्मकेंद्री व्यक्तीला समाजापासून तोडण्याच्या प्रक्रियेला अशी माध्यमे हातभार लावत आहेत काय? वास्तव जीवनात व्यक्तीगत मैत्री साधता येत नाही, अशी माणसे या आभासी माध्यमातून संगतीत येणार्‍या काल्पनिक लोकांच्या आहारी जाऊन आपले एकाकी जीवन विसरू बघतात. त्यातून अशा समस्या उभ्या रहात आहेत काय? ज्या गोष्टी आमनेसामने बोलायचे धाडस नाही, त्या बेधडक करण्याची हिंमत या माध्यमाने निर्माण केल्याने हे प्रकार घडत असतील काय? संपर्कसाधने वेगाने वाढली आणि विस्तारली, त्यातून जग खुप जवळ आले, असे म्हटले जाते. पण वास्तवात त्याच जगातली माणसे किती एकमेकांपासून दूर गेली; त्याचा कधी विचार तरी होतो आहे काय? नेहमी भेटणारे मित्र, मनसोक्त गप्पा छाटण्यात काही काळ रमणारे सगेसोयरे; आता अशा माध्यमातून संदेश सोडतात. फ़ारच असेल तर फ़ोनवर बोलतात. पण प्रत्यक्षात व्यक्तीगत पातळीवर भेटगाठ संपर्क किती घटला आहे? त्यातून मग निव्वळ आवाज किंवा याप्रकारे संदेशाची होणारी देवाणघेवाण; यावरच नाती विसंबून राहू लागली आहेत. एकीकडे व्यक्तीगत संपर्कातून होणारी जवळीक मागे पडून, निव्वळ संदेश वा आवडणार्‍या शब्दाच्या पुरवठ्यातून येणारी जवळीक नात्याचे रूप घेऊ लागली आहे. परिणामी जितक्या लौकर अशी मैत्री आकार घेते; तितक्याच वेगाने ती तुटण्य़ाचेही प्रमाण भयंकर आहे. एकूणच वास्तवापासून माणूस या साधनांनी दूर नेला आहे. वास्तवातल्या मित्राची, मैत्रीणीची जागा हळुहळू काल्पनिक वा आभासी व्यक्ती घेत चालल्या आहेत आणि वास्तवात अशी माणसे समोर आल्यावर होणारा भ्रमनिरास नैराश्याचे, वैफ़ल्याचे कारण होऊ लागला आहे. 

   माणूस ही एक भावनांची असाध्य गुंतागुंत असते. त्यामुळेच एकच व्यक्ती प्रत्येक परिचितासाठी भिन्न भिन्न असते. एकासाठी तो जिव्हाळ्याचा मित्र असतो, तर दुसर्‍यासाठी निव्वळ व्यवहारी परिचित असतो. कुणासाठी आप्तस्वकी्य इतका निकटवर्ती असतो, तर आणखी कोणासाठी केवळ मौजमजेचा विषय असू शकतो. अशा सर्वांना आपण व्यक्तीगत जीवनात त्या त्या अंतरावरून हाताळत असतो. त्या सर्वांसाठी समान वागणूक नसते. पण आभासी जगातल्या मित्र यादीत जाणारा संदेश सर्वांसाठी समानच असतो. मात्र त्याचा संभवणारा परिणाम समान असू श्कत नाही. तुम्ही जे शब्द वापरता आणि ज्या अर्थाने वापरता; तेच अर्थ वा हेतू समोर पोहोचतील अशी कोणी हमी देऊ शकत नाही. त्यामुळे कोणासाठी तुमचा संदेश मजेशीर वा गमतीचा असू शकतो. तर अन्य कुणासाठी तोच संदेश इजा पोहोचवणारा असू शकतो. त्यामुळेच सर्वच संदेश वा शब्द सर्वाना समान हेतूने पाठवण्यात धोका असतो आणि अशा माध्यमात आपण बिनधास्त वावरत असलो, तर आपण तोच धोका पत्करत असतो. मग अशा संदेशाचे परिणाम भोगण्याचीही क्षमता आपल्यात असली पाहिजे. त्याचे परिणाम मनाला लावून घेण्य़ाइतके संवेदनाशील असता कामा नये. पण सर्वच माणसे इतकी प्रगल्भ किंवा धाडसाची नसतात. मग त्यांच्यावर दुखावण्य़ाची वेळ येते. अनेकदा तर आपण पाठवतो, त्या संदेशाचे आपल्यालाच दुष्परिणाम भोगावे लागतील याचेही भान उरत नाही. आजकालची तरूण पिढी अशा माध्यमांच्या इतकी आहारी गेलेली आहे, की या माध्यमांचा बेभान व बेताल सरसकट वापर होत चालला आहे. त्यातून मग नवनव्या समस्या समोर येऊ लागल्या आहेत. सुनंदा पुष्कर त्याचे एक विदारक उदाहरण आहे. जितक्या सहजपणे त्यांनी आपल्या खाजगी जीवनातील गोष्टी अशा चव्हाट्यावर मांडल्या, तितक्या सहजपण त्यांनी व्यक्तीगत जीवनातील कुणा मित्रमैत्रीणीकडे मांडल्या नव्हत्या, हे विसरता कामा नये. 

   आता ही भीषण घटना घडून गेल्यावर त्या संशयास्पद मृत्यूचे धागेदोरे शोधून काढताना पोलिसांना सुनंदाच्या परिचितांना शोधावे लागत आहे. पण त्यापैकी कोणीही अशा गंभीर विषयावर नेमका प्रकाश पाडू शकलेला नाही. याचा अर्थ इतकाच, की शेकडो जीवाभावाचे मित्र व मैत्रीणी असूनही सुनंदा हिने आपल्या जीवनातली दुखरी वेदना त्यापैकी कोणाकडेही मनमोकळेपणाने मांडायचा प्रयत्नही केला नव्हता. कोणाकडे मन मोकळे करून मनसोक्त रडले तरीही अशा वेदनेतून मुक्ती मिळवता येईल, असे तिच्या मनाला शिवलेही नाही. ह्याला काय म्हणायचे? खर्‍या वास्तविक जीवनातील जित्याजागत्या शुभेच्छूकांकडे मन व्यक्त करायला टाळणारी ही महिला, त्या आभासी जगातल्या मित्रांकडे मात्र बिनधास्त मन खुले करीत होती. या मृत्यूकांडानंतर तिच्या आठवणी सांगत नलिनी सिंग यांच्यासारखी संवेदनशील पत्रकार महिलाही डोळे ओले करून बोलत होती. याचा अर्थच सुनंदाची ती जीवाभावाची मैत्रीण होती, मग आपल्या मनातली यातना तिच्याकडे व्यक्त करायची मोकळीक सुनंदाला होती. नव्हे तशा मैत्रीणी त्यासाठीच असतात, याचेही भान या महिलेला उरले नाही. याचा अर्थच तिची वा तिच्यासारख्या लोकांची मानसिकता आजारी झालेली नाही काय? सोशल मीडियाच्या आहारी गेल्यावर वास्तवाचे भान किती सुटते त्याचा यापेक्षा दुसरा मोठा पुरावा देण्याची गरज आहे काय? एक प्रकारचा हा म्हणूनच मनोरोगच म्हणायला हवा. ज्याच्या बाधेने वास्तव जगाशी असलेले नाते तुटत जाते आणि पुढे तर त्या़च आभासाला वास्तव समजून माणूस भरकटत जातो, असेच म्हणावे लागेल. हे मोठे मान्यवर जगातले व प्रसिद्धीच्या झोतातले प्रकरण असल्याने त्याची इतकी चर्चा होते आहे. पण अशी शेकडो प्रकरणे बारीक बातम्या होऊन काळाच्या पडद्याआड गडप होऊन जातात. त्याची कुठे गंभीर दखलही घेतली जात नाही. त्यामुळेच एक सुविधा व साधन म्हणून हाती आलेल्या तंत्रज्ञान व उपकरणाने आज गंभीर आजाराचे रौद्ररूप धारण केले असावे, असेच वाटू लागते. त्याचे निराकरण कायद्याने वा प्रतिबंध घालून होणार नाही. कारण ती सामाजिक, मानसिक व सांस्कृतिक समस्या आहे आणि त्याबद्दलचे उपाय त्याच मार्गाने शोधावे लागतील. आपल्या वेगाने बदलत्या जीवनशैलीतून उलगडावे लागतील.

बुधवार, २२ जानेवारी, २०१४

दिल्लीतल्या लंकादहनाची गोष्ट




  जगातल्या कुठल्याही देशात वा समाजात, युगात गेलात, तरी तिथे घडलेल्या वा घडणार्‍या घटनांमध्ये प्रत्येकजण आपापला मतलब शोधत असतो. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव स्वार्थीच असतो. त्यामुळे ज्या घटना प्रसंग समोर येतात; त्यामध्ये आपापला स्वार्थ शोधणे सर्वांसाठी स्वाभाविक कृती असते. त्याचाच परिणाम मग भिन्न भिन्न स्वरूपाच्या प्रतिक्रियांमध्ये दिसत असतो. वास्तविक घडलेली घटना वा कृती एकच असते. मग लोक असे भिन्न अर्थाने तिथे का बघतात? किंवा अशा भिन्न प्रतिक्रिया कशाला देतात; असा प्रश्न त्यापासून अलिप्त असलेल्या इतरांच्या मनात उभा रहातो. असा प्रश्न आपल्याही मनात उभा राहतो. कारण आपण त्या घटनेपासून स्वत:ला अलिप्त ठेवत असतो. पण जर का त्याच घटनेत आपला स्वार्थ असेल वा आपण तसा विचार जरी करू लागलो, तर आपणही तात्काळ त्यापैकी एका बाजूचे समर्थन वा विरोध सुरू करतो. याचा अर्थ आपण त्या व्यक्ती वा कृतीचे समर्थक असतोच असे नाही. अनेकदा आपल्याला त्या घटना वा कृती व्यक्तीशी काडीमात्र कर्तव्यही नसते. कारण त्यात आपल्याला सुखावणारेही काहीच नसते. पण त्याचवेळी जर त्यात आपला ज्याच्यावर राग आहे, तो दुखावत असेल; तरी आपण त्या कृती, घटनेचे समर्थक होऊन जातो. कारण आपल्या शत्रू वा विरोधकाच्या वेदनेत आपण आपला आनंद शोधत असतो. जगातल्या बहुतांश घटनांचे कृतीचे असेच समर्थन वा विरोध होत असतात. फ़ार थोडे लोक प्रामाणिक राहून अलिप्तपणे त्याकडे बघू शकत असतात. त्यामुळेच मग समोर घडणार्‍या घटनांचा नेमका अर्थ वा परिणाम सांगू शकत असतात. उलट दुसरीकडे आपापले मतलब शोधून त्याबद्दल भूमिका घेणार्‍यांची पुढल्या परिणामांतून तारांबळ उडत असते. कधीकधी अशा समर्थक विरोधकांनाच अकारण तोंडघशी पडायची वेळ येत असते. नुकत्याच संपलेल्या चार विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यापासून त्याचाच अनुभव राजकीय विश्लेषणाच्या बाबतीत येतो आहे.

   मागल्या वर्षाच्या अखेरीस देशात पाच विधानसभांच्या निवडणूकांची रणधुमाळी माजलेली होती. त्यात ईशान्येकडील नागालॅन्ड राज्याचे राजकारण राजधानी दिल्लीला प्रभावित करणारे नसल्याने त्याची फ़ारशी दखल घेतली जात नाही. पण उर्वरित चार राज्यांचे निकाल लागल्यावर त्यात तीन विधानसभा निर्णायक व प्रचंड बहूमताने भाजपाने जिंकल्या होत्या. पण पुढल्या दीड महिन्यात माध्यमे व राजकीय क्षेत्रातील प्रतिक्रिया बघितल्या, तर दिल्ली वगळता राजस्थान, मध्यप्रदेश वा छत्तीसगड राज्यात निवडणूका झाल्या होत्या किंवा नाही; अशी शंका येऊ शकेल. या तीन राज्यात कोण मुक्यमंत्री झाला, त्याचे मंत्रीमंडळ कसे आहे किंवा त्यांचा शपथविधी तरी झाला काय? असेल, तर त्याविषयीच्या बातम्या सुद्धा कशाला येऊ नयेत? दिल्लीत विधानसभा त्रिशंकू झाली आणि तिथे तीन आठवडे नवे सरकार सत्तेवर येऊ शकले नाही; तरी तिथल्याच राजकीय घडामोडींनी माध्यमांना व्यापून टाकलेले होते. कारण तिथे आम आदमी पक्ष नावाच्या नव्या पक्ष व नेतृत्वाचा उदय झालेला होता. मग त्याचा इतका गाजावाजा चालू होता, की जणू अन्य कुठे निवडणूका झाल्या नाहीत की नवी सरकारे आलीच नाहीत. या गदारोळाचा मग परिणामही दिसू लागला. दिल्लीत दुसर्‍या क्रमांकाची मते व जागा जिंकून अल्पमताचे सरकार कॉग्रेसच्या पाठींब्याने बनवणार्‍या मुख्यमंत्री केजरीवाल यांना अकस्मात देशाच्या भावी पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आणले गेले. त्यांच्यासह त्यांच्या पक्षानेही ती बाब गंभीरपणे मनावर घेतली आणि विनाविलंब अखिल भारतीय पक्ष होण्याची मोहिम आरंभली. देशातले एकाहून एक मान्यवर आणि आपापल्या क्षेत्रातील यशस्वी लोक कामधंदा सोडून त्या पक्षात दाखल होऊ लागले. महिनाभरात पन्नास लाखाच्या आसपास लोक त्या पक्षात सदस्य होऊन गेले. नेत्यांनीही अनुयायांसाठी सदस्यत्वाचा मार्ग सोपा करून टाकला. मोबाईल फ़ोनवर संदेश पाठवून किंवा नुसताच मिसकॉल देऊन कोणीही तात्काळ त्या पक्षात परस्पर दाखल होऊ लागला. भ्रष्ट व्यवस्थेतून मुक्त करणारा नवा प्रेषित देशाला लाभला होता.

   हा सगळा गदारोळ म्हणजे प्रचार चालू असताना कोणाला वास्तवाकडे बघायची गरजही वाटली नव्हती. राजकीय पक्षाची संघटना अशी उभी राहू शकते काय? इतक्या वेगाने उभी राहिलेली फ़ोनवरची संघटना देशव्यापी निवडणूका लढवू शकते काय? आणि नुसते उमेदवार उभे केले, म्हणून त्यांना निवडून आणू शकते काय? असले कुठलेही प्रश्न विचारायची कुणाची बिशाद नव्हती. कारण अशा शंका काढणाराच गुन्हेगार, बेईमान वा भ्रष्ट ठरण्याचे भय होते. अशी काय जादू त्या पक्षापाशी वा त्याच्या नेत्यांपाशी होती? आणि असेल तर मग मतमोजणी संपेपर्यंत तिचा साक्षात्कार देशातल्या माध्यमांना व सर्व राजकीय अभ्यासकांना कशाला घडला नव्हता? तीन राज्ये मोठ्या ताकदीने जिंकणार्‍या भाजपा किंवा नरेंद्र मोदींचे अफ़ाट यश दिल्लीत दुय्यम जागा मिळवणार्‍या केजरीवाल यांच्यापेक्षा मोठे कशामुळे होते? त्याचे उत्तर आपल्याला ‘बुडत्याला काडीचा आधार’ या उक्तीमध्ये सापडू शकते. मागल्या दोन वर्षात नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी ताज्या निवडणूकीत आघाडीवर राहून प्रचार केला, तर त्यांना यश मिळू शकत नाही, असा बहुतेक जाणकार अभ्यासकांचा दावा होता. पण घडले उलटेच. तीन राज्यात भाजपाने अभूतपुर्व यश संपादन केले. तर त्यामुळे सर्वच राजकीय अभ्यासक तोंडघशी पडले होते. मग आपले फ़सलेले अंदाज झाकण्यासाठी दिल्लीतील भाजपाच्या हुकलेल्या बहूमताचा बागुलबुवा करण्यात आला आणि त्यासाठीच केजरीवालांचे दुय्यम यश हे मोदी व भाजपाला रोखणारे असल्याचा सिद्धांत उभा करण्यात आला. मोदींची लोकप्रियता अफ़ाट असेल तर दिल्लीत भाजपा बहूमत कशाला मिळवू शकला नाही? कारण केजरीवाल यांच्या लोकप्रियतेने मोदींचा विजयरथ रोखला. एकदा असा सिद्धांत मांडला गेला, मग दिल्लीचीच पुनरावृत्ती देशात सर्वत्र होणार, हा पुढला सिद्धांत सोपा होऊन जातो. ज्यांना मोदी जिंकले नाहीत हा आपला ‘मतलब’ साधायचा होता, त्यांनी केजरीवाल यांचा फ़ुगा फ़ुगवण्य़ाचा उद्योग अहोरात्र हाती घेतला. त्यातून मग दिल्लीत एक अभूतपुर्व परिस्थिती निर्माण झाली. मुठभर नवख्या कार्यकर्त्यांची हुकूमी झुंड हाताशी असलेले आम आदमी पक्षाचे नेते मोकाट होऊन गेले.

   प्रथम लोकसभा निवडणूकीवर डोळा असलेला कॉग्रेस पक्ष असल्या सिद्धांताला बळी पडला आणि त्याने भाजपाला सत्तेबाहेर ठेवायचा अट्टाहास करीत ‘आप’ला बिनशर्त पाठींबा देऊन टाकला. मग केजरीवाल यांनी सरकार बनवण्यापासून शपथविधीपर्यंत अनेक बाबतीत प्रचलीत राजकीय संकेतांना धक्के द्यायचे तंत्र अवलंबले. व्यवहारी बाबतीत तो निव्वळ पोरकटपणा होता. पण मोदींना झाकण्य़ाच्या हव्यासाने अशा प्रत्येक पोरकटपणाला परिवर्तन व क्रांती ठरवण्याची कसरत सुरू झाली होती. केजरीवाल वा त्यांचे सहकारी जे काही करीत होते, त्याची वास्तव मिमांसा होत नसल्याने त्यांनाही आपण परिवर्तनच घडवतो; अशी नशा चढली तर नवल नव्हते. त्यामुळेच त्यांच्याकडून अधिकाधिक अतिरेक होणे अपरिहार्य होते. प्रस्थापित संकेत, प्रथा, परंपरा, नियम कायदे यांना अर्थच उरला नाही. आपण करू तो कायदा व आपण ठरवू तेच सत्य; अशा मानसिकतेला जोजवले गेल्यावर यापेक्षा दुसरे काही अपेक्षितच नव्हते. आपणच जगातले एकमेव इमानदार व पवित्र पुण्यवंत आहोत आणि अन्य अवघे जग पापात बुडाले आहे; अशी धारणा झाली मग प्रेषित असल्याप्रमाणे जग शुचिर्भूत करण्याचा मोह संपत नाही. पुर्वापार होत आलेले सर्वकाही पाप वाटू लागते. केजरीवाल यांची तीच अवस्था झाली. लाडावलेले शेफ़ारलेले पोर जसे वागते, त्यापेक्षा राजकारणासह सार्वजनिक जीवनातील त्यांचे वर्तन वेगळे नव्हते. कारण लाडावलेल्या पोराच्या पालकाप्रमाणे त्यांचे बुद्धीवादी कौतुक चालूच होते. दुसर्‍याच्या घरात धिंगाणा करणार्‍या पोराचे कौतुक त्याचे परिणाम आपल्या वाट्याला आल्यावर संपते. मागल्या दिड महिन्यात असेच केजरीवालांचे कौतुक चालले होते. कारण त्याचे परिणाम ‘शेजार्‍याला’ भोगावे लागत होते. गेल्या आठवड्यात या लाडावलेल्या पोराने ‘घरातच’ धुमाकुळ व धुडगुस घालायला आरंभ केला. आजवर शिवसेना, मनसे, अन्य कोणा संस्था संघटनांच्या आक्रमकतेला झुंडशाही संबोधणार्‍यांनी त्याच दिशेने वाटचाल करणार्‍या आम आदमी पक्षाला क्रांतीकरक म्हणून मांडीवर घेतले होते. आता तेच पोर मांडीवरून उतरून घरभर आणि रस्त्यावर येऊन धिंगाणा करू लागले. तिथून मग पळापळ सुरू झाली. कालपर्यंत कौतुक करणारे गडबडून गेले.

   पण हेच व्हायचे होते. पहिल्या दिवसापासून त्याची लक्षणे दिसत होती. कॉग्रेसच्या पाठींब्याने बहूमत होत असताना आणि त्या पक्षाने बिनशर्त पाठींबा दिला असताना; गल्लीबोळात जनमत आजमावण्याच्या नाटकाची गरज नव्हती. लालबत्तीच्या गाड्य़ा वा सरकारी बंगले नाकारण्यात कुठला पुरूषार्थ नव्हता. अशा सर्व गोष्टी निव्वळ दिखावू व नाटकी होत्या. पण त्यालाच परिवर्तनाची वस्त्रे चढवित कौतुकाच्या आरत्या ओवाळायला सुरूवात झाल्यावर केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्‍यांची जनहिताच्या कामापेक्षा असली नाटके करणे म्हणजेच राजकारण असल्याची समजूत झाली तर दोष देता येईल काय? नित्यनेमाने टिव्हीच्या कॅमेरासमोर वा वृत्तपत्राच्या मथळ्यात रहाण्याला कार्य समजले, मग त्याच दिशेने वाटचाल सुरू होते. ‘आप’ची स्थिती तशीच झाली. पण पुन्हा पुन्हा त्याच नाटकाने मजा येत नाही म्हटल्यावर नवनवे खेळ व प्रयोग करावे लागतात. लोकांना थक्क करून टाकण्यासाठीच आपला अवतार झालेला आहे, असाही भ्रम होतो. त्याचेच परिणाम मागल्या आठवड्यात समोर आलेले आहेत. मात्र जेव्हा कौतुक करणारेही संशयाने बघू लागले व शंका विचारू लागले, तेव्हा हे शेफ़ारलेले पोर बिथरले. त्याने त्याच माध्यमांवर उलटे बेईमानीचे आरोप करायला मागेपुढे बघितले नाही. अर्धी माध्यमे मोदींना विकली गेलीत आणि अर्धे पत्रकार कॉग्रेसचे दलाल आहेत; असे म्हणण्यापर्यंत केजरीवाल यांची मजल गेली. त्यांच्या अनुयायांनी दिल्लीत झुंडशाही करण्याला कोणाची आडकाठी असता कामा नये आणि जो कोणी आडकाठी करील, तो भ्रष्टाचार व गुन्हेगारीला संरक्षण देणारा; अशी सोपी सरळ व्याख्या तयार झाली. परिवर्तनाची चळवळ बाजूला राहिली आणि केजरीवाल यांनी व्याख्या व शब्दार्थांच्या परिवर्तनाचे काम हाती घेतले. त्यांच्यावर अराजक माजवल्याचा आक्षेप घेतला गेला, तर ते अराजक म्हणजेच खरी लोकशाही असल्याचा मोलाचा साक्षात्कारी संदेश त्यांनी जनतेला देऊन टाकला. थोडक्यात जे कोणी विद्वान बुद्धीमंत परिवर्तनाची यात्रा म्हणून या प्रेषिताचे कौतुक करण्यात दंग झालेले होते, त्यांनाच केजरीवालांनी सणसणित चपराक हाणली. तेव्हा कुठे सहा सात दिवसांपुर्वी या मंडळींना जाग आलेली आहे. त्यातून मग दिल्लीत चालू असलेला धुडगुस व धिंगाणा समोर येऊ लागला आहे.

   त्याचा तपशील आता हळूहळू समोर येत आहे. धरण्यामुळे मोडले गेलेले संकेत, परंपरा व कायदे बाजूला ठेवा. या साधूपुरूषाच्या धरण्यात सहभागी झालेल्या क्रांतिकारी झुंडीने तिथे मद्यप्राशन करून टाकलेल्या बाटल्या किंवा महिलांशी केलेल्या अश्लिल वर्तनाचे चित्रित पुरावे समोर येत आहेत. पावित्र्याच्या नावावर कसले प्रकार चालतात, किंवा आम आदमी पक्षाच्या मुख्यालयाच्या परिसरात वास्तव्य करणार्‍या नागरिकांनी कथन केलेले अनुभव अंगावर शहारे आणणारे आहेत. सवाल इतकाच, की यातले काहीही आजवर वाहिन्यांनी कशाला दाखवले नव्हते वा सांगितले नव्हते? याच केजरीवाल सरकारकडून आश्वासन पुर्तीसाठी धरणे धरून बसलेल्या हजारभर हंगामी शिक्षकांना साधे भेटायला कोणी ‘आप’नेता वा मंत्री फ़िरकलेला नाही. त्या धरणेकर्‍यांकडे कुठल्या वाहिनी वा वृत्तपत्राचा बातमीदार कशाला फ़िरकलेला नाही? त्या शिक्षकांना कॉग्रेस-भाजपाचे नेते जाऊन भेटतात, पण सत्तेवर येताच ‘आप’ने तिकडे पाठ फ़िरवली, तर त्यांच्यात व जुन्या पक्षांच्या वर्तनात किंचित तरी फ़रक आहे काय? नसेल तर मग कसले परिवर्तन आणि कुठली क्रांती? चालले आहे तो निव्वळ बिगबॉस सारखा एक टिव्हीवरला रियालिटी शो नाही काय? पण हे सत्य बोलायचे कोणी? कालपर्यंत आपणच क्रांतीचे कौतुक केले मग आज त्यालाच राजकीय झुंडशाही म्हणायचे कसे? या समस्येने बुद्धीमान वर्गाला ग्रासले. त्यामुळेच केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांच्या उचापतींवर पांघरूण घालण्यात धन्यता मानली गेली. पण गेल्या आठवड्यात त्याच कौतुककर्त्यांच्या नाकातोंडात पाणी जायची वेळ आली. घटनाक्रमातला ‘मतलब’ संपला आणि तोंडघशी पडायची पाळी आली, तेव्हा आम आदमी पक्षाचा खरा चेहरा समोर येऊ लागला आहे. आपापले स्वार्थ व मतलब शोधून प्रतिक्रिया देण्याच्या मानवी प्रवृत्तीमुळेच अशी दारूण परिस्थिती माध्यमे व बुद्धीजिवी वर्गावर आलेली आहे. मात्र त्याची मिमांसा कुठेही होत नाही की होणार नाही.

   दिल्लीत ‘आप’चे यश हे लोकपाल वा भ्रष्टाचाराच्या विरोधामुळे मिळालेले नव्हते. सहाशे लिटर मोफ़त पाणी, विजेचे दर निम्मे करणे आणि साडेतीन लाख हंगामी कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी नोकरी, या आश्वासनांना भुलून दिल्लीकर या पक्षामागे धावला होता. सत्ता मिळणार नाही, म्हणून केजरीवाल यांनी अशी खोटी आश्वासने दिली होती. पण पुर्तता करण्याची जबाबदारी आल्यावर त्यांना घाम फ़ुटला आहे. त्यामुळेच स्थापनेआधीपासून त्यांनी आपले सरकार पाडले जावे, यासाठी आटापिटा चालविला आहे. राजकीय डावपेचातून फ़ोडाफ़ोडी करून भाजपा पाडणार नसेल, तर वैतागून कॉग्रेसने ‘आप’ सरकार पाडावे यासाठी केजरीवाल उतावळे झाले आहेत. कारण तसे झाल्यास आपल्याला काम करू दिले नाही, आश्वासने पुर्ण करू दिली नाहीत असे खापर त्यांना प्रस्थापित पक्ष व राजकारणावर फ़ोडून हुतात्मा व्हायचे आहे. पण कॉग्रेस वा भाजपा त्यांना तशी संधी द्यायला राजी नाहीत. त्यातूनच मग बेभान होऊन केजरीवाल यांनी केंद्राने घटनात्मक बडगा उचलावा, अशा कारवाया सुरू केल्या आहेत. सामान्य माणसाला कायद्याची गुंतागुंत कळत नाही. त्यामुळेच घटनात्मक कारणासाठी सरकार बरखास्त केले तरी कांगावा करून हौतात्म्य मिळवता येईल असा डाव होता. गेल्या आठवडाभरातल्या केजरीवाल यांच्या सर्व माकडचेष्टा त्यातूनच उदभवल्या आहेत. पण आता त्याचे चटके त्यांना ‘प्रायोजित’ करणार्‍या बुद्धीवादी वर्गाला बसू लागल्याने आणि त्याच वर्गाच्या प्रस्थापित संकल्पनांना हादरे बसू लागल्याने वास्तव समोर आणायची अपरिहार्यता निर्माण झाली आहे. रेलभवन समोरचे धरणे किंवा त्यातून उभे राहिलेले अराजक त्याचाच परिणाम आहे. पण पहिल्यापासून केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांनी चालवलेल्या पोरकटपणाचे अवास्तव कौतुक झालेच नसते, तर त्यांना इतके मोकाट रान मिळाले नसते. म्हणूनच घडले त्याला राजकीय पक्षांपासून बुद्धीजिवी वर्गाचा मतलबी स्वार्थही तितकाच जबाबदार आहे.

   भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा अवास्तव अट्टाहास कॉग्रेसला अगतिक बनवून पाठींब्यापर्यंत घेऊन गेला. त्यामुळे तोच पक्ष दोन्हीकडून फ़सला आहे. तर भाजपाने सत्ता हुकल्यामुळे निराशाग्रस्त होऊन पहिल्या दिवसापासून केलेल्या तक्रारींमुळे त्यांच्या विरोधकांना ‘आप’च्या चुकांचे समर्थन करण्याची वेळ आली. बाकी मोदी विरोधक व तथाकथित सेक्युलर यांच्या दिशाहिन भूमिकेने केजरीवाल व त्यांच्या झुंडीला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे पाप केले. त्यातला प्रत्येकजण आजच्या परिस्थितीला सारखाच जबाबदार आहे. दया येते, ती अकारण केजरीवाल व त्यांच्या नाटकाचे उथळ समर्थन करायला धावलेल्या माध्यमे व जाणत्या अभ्यासकांची. कारण त्यांनीच उभ्या केलेल्या या भुतावळीपासून सुटका करून घेण्य़ाची दयनीय बौद्धीक कसरत आता या मंडळींना करावी लागते आहे. या गडबडीत गेला महिनाभर ‘आप’कडे धावत सुटलेल्या लोकांना मात्र आता जाग आली आहे. कारण महिन्याभरात चाळीस पन्नास लाख नवे सदस्य पक्षाला मिळाले, असा दावा करणार्‍यांकडे धावणार्‍या अनेक नामवंतांनी आता त्यापासून काढता पाय घेतल्या्चे दिसते आहे. काही असे नवसदस्य नामवंत त्या झुंडशाहीवर सवालही विचारू लागले आहेत. वादळ जितक्या वेगाने येते तितक्याच वेगाने विरूनही जाते. वादळ हा तात्कालीत उलथापालथीचा मामला असतो. केजरीवाल व त्यांचे दिल्लीतील यश तसेच आहे. त्यातून कुणा राजकीय पक्षाचे कमीअधिक नुकसान होईल. वादळे काही नवी उभारणी करीत नसतात, हे विसरता कामा नये. मग वादळ नैसर्गिक असो किंवा राजकीय असो. एक पुराणकथा सांगून विषय संपवतो.

   सीतामातेला श्रीरामाचा संदेश द्यायला गेलेल्या पवनपुत्र हनुनामाला पकडून त्याच्या शेपटीला चिंध्या लपेटून पेटवणार्‍यांना परिणामांचे भान उरलेले नव्हते. मग हनुमान सोन्याच्या लंकेत एका इमारतीवरून दुसर्‍या इमारतीवर उड्या मारत बागडला आणि अवघी लंकाच पेटली. तेव्हा त्याची शेपटी पेटवणार्‍यांनाच पळता भूई थोडी झालेली होती. केजरीवाल किंवा त्यांच्या आम आदमी पक्षाच्या दिल्लीपुरत्या यशाचे शेपूट पेटवून त्याचीच देशव्यापी क्रांतीची मशाल बनवायचा उद्योग करणार्‍यांची अवस्था आज किंचितभर तरी वेगळी आहे काय? ‘आप’च्या यशानंतर कॉग्रेस व भाजपा खिजवण्य़ात धन्यता मानणार्‍यांनीच या माकडाच्या शेपटीला आग लावून दिल्लीत हा वणवा पेटवलेला नव्हता काय? मग आज लोकशाहीच जळून खाक होते अशी बोंब ठोकणार्‍यांची बुद्धी तेव्हा कुठे झोपा काढत होती? रामलिला मैदानावर तीन वर्षापुर्वी सुरू झालेला खेळ आणि रामलिलेतला लंकादहनाचा अध्याय यात कितीसा फ़रक होता?

शनिवार, १८ जानेवारी, २०१४

नामदेव नावाचा ‘इसम’



  १९७० च्या आसपासची गोष्ट असेल. प्लाझा सिनेमाच्या समोर खांडके बिल्डींगच्या परिसरात तेव्हा समर्थ विद्यामंदीर नावाची माध्यमिक शाळा होती. तिच्याच एका वर्गामध्ये एक छोटासा समारंभ होता. माझा रुपारेल कॉलेजमधला मित्र शशिकांत लोखंडे याने लिटल मॅगझिन चळवळीत उडी घेतली होती. त्याने काही मित्रांसमवेत छापलेले पुस्तिकावजा ‘गारुडी’ नामक अनियतकालिक तिथे प्रकाशित व्हायचे होते. महर्षी दयानंद कॉलेजातील मराठीचे प्राध्यापक केशव मेश्राम यांच्या हस्ते तो प्रकाशन समारंभ व्हायचा होता. मोजून अठरा वीस लोक तिथे उपस्थित होते. शाळकरी मुलांसाठी असलेल्या बाकावर आम्ही मंडळी कशीबशी सामावलो होतो. त्यात एक अजिबात वेगळा वाटणारा इसम होता. कारण तो बाकीच्या विद्यार्थी वा तरूणांपेक्षा भिन्न दिसणाराही होता. कुठल्या इराणी हॉटेलातला वेटर वा टॅक्सी ड्रायव्हर दिसणारा हा कोण, असा प्रश्न मला सतावत होता. पण लौकरच त्याची ओळख झाली, म्हणजे करून घ्यावी लागली. कारण प्रकाशनाच्या निमित्ताने मेश्राम बोलू लागले आणि याने त्यात अडथळे आणायला सुरूवात केली. मुद्दे काय होते, ते मला आज आठवत सुद्धा नाहीत. पण मेश्राम यांच्यासारख्या विद्वान प्राध्यापकाशी हुज्जत करू शकतो असा हा ‘आम आदमी’ मला तत्क्षणी भावला होता. मग कसाबसा त्याला गप्प करून समारंभ उरकला आणि आम्ही सगळेच पांगलो. ती माझी आणि नामदेव ढसाळ याच्याशी झालेली पहिली भेट. नुसती नावाची देवाणघेवाण यापेक्षा जास्त काहीच नाही.

   मग दोनचार महिन्यांनी ताडदेवच्या जनता केंद्रात एक कविसंमेलन योजलेले होते. तिथे मी पत्रकार म्हणून हजेरी लावली. त्यात राजा ढाले, सतीश काळसेकर, तुळशी परब, गुरूनाथ सामंत, चंद्रकांत खोत अशी त्या काळातली बंडखोर कवी मंडळी उपस्थित होती. त्यातही हा ‘इसम’ म्हणजे नामदेव ढसाळ होताच. किंबहूना त्या नवकवींच्या गोतावळ्यात तेवढाच एक माझ्या परिचयाचा चेहरा होता. तेव्हा मी ‘मराठा’ दैनिकात नव्याने उमेदवारी करीत होतो. त्या कवीसंमेलनाची बातमी दिली मग विषय संपला असता. पण त्याच विषयावर ‘मराठा’च्या रविवार पुरवणीचे संपादक आत्माराम सावंत यांच्याशी बातचित झाली. अधिक ज्येष्ठ सहकारी नारायण पेडणेकर याच्याशी हुज्जतही झाली. तेव्हा सावंतांच्या आग्रहाखातर मी त्याच कवीसंमेलनावर एक छोटेखानी लेख लिहिला होता. त्याचे शिर्षक आजही नेमके आठवते. ‘प्रस्थापिताविरुद्ध प्रस्थापित होण्यासाठी नवकवींनी पुकारलेल्या बंडाची एक रात्र’. या लेखाने अनेक नवकवींचे भाऊ तोरसेकर या व्यक्तीकडे लक्ष गेले. त्यापैकी उत्साहात मला भेटायला आलेला कवी म्हणजे नामदेव ढसाळ. नारायण पेडणेकरला माझ्या कामाची वेळ विचारून नामदेव ‘मराठा’ कार्यालयात भेटायला आला. आणि पहिल्या भेटीतच थेट अरेतुरे करून त्याने मैत्री पार जुनीपुराणी करून टाकली. आजही तो दिवस तितकाच आठवतो. कारण तो बेकार आणि मी तेव्हा नवशिका. त्यामुळे त्याने गळी पडून नारायण पेडणेकरला आमच्या भेटीसाठी हॉटेलचा भुर्दंड दिलेला होता. अंगावर व अंगभर कपडे घातलेला नामदेव कायम असाच पारदर्शक होता. साडेचार दशकात मग अधूनमधून आम्ही किती भेटलो वा नाही भेटलो. म्हणून कुठलाही फ़रक पडला नाही. त्याच्यातला नितळ माणूस कधी बदलला नाही.

   त्यानंतर नामदेवशी त्या तरूण वयात सतत संपर्क होत राहिला. कारण तो कायम अस्वस्थ आत्मा असल्यासारखाच जगत होता. दलित पॅन्थर ही संघटना त्याने स्थापन केली, तरी तो कधी संघटनात्मक बंधनात अडकून पडणारा नव्हता. संघटनेत एकांडी शिलेदारी चालत नाही. दहा पंधरा लोकांच्या सहमताने गोष्टी घडत असतात वा घडवल्या जात असतात. पण नामदेव कवीमनाचा नव्हता, तर तो साक्षात स्वत:चे एक काव्य होता. ते एक कल्पनारम्य व्यक्तीमत्व होते. त्यामुळेच त्याला शब्दात, धोरणात वा विचारात बंदिस्त होणेच शक्य नव्हते. त्यामुळेच राजकारण, समाजकारण वा साहित्य अशा प्रस्थापित चौकटीत अडकणे त्याला शक्यच नव्हते. ते त्यालाही ठाऊक होते. पण त्याला अशा बंधनात अडकण्याची हौस होती. पण अल्पावधीतच त्याचा त्यातून भ्रमनिरास व्हायचा. जितक्या गतीने जग बदलावे, असा त्याचा अट्टाहास असायचा, तेवढ्या वेगाने जग धावत नाही, ही वेदना त्याच्या बोलण्यातून प्रक्षोभातून नेहमी व्यक्त व्हायची. त्या काळात मला आठवते आम्ही विविध संघटनांनी व्हिएटनामवरील अमेरिकन बॉम्बहल्ल्याच्या निषेधार्थ एक मोर्चा काढला होता. त्यानंतर मोर्चा यशस्वी झाल्याने आमचे सगळे मित्र खुश होते. पण सगळे पांगले आणि आम्ही दोघेतिघेच म्हणजे नामदेव, कमलाकर सुभेदार आणि मी राहिलो. तेव्हा त्याचा वैताग उफ़ाळून आला. तो म्हणाला, ‘साला काय घंटा मिळाले? आपली खाज भागली मोर्चा काढायची. पुढे काय? भावड्या आपल्या देशात महात्मे खुप झाले रे, पण हो चि मिन्ह जन्माला आला नाही.’ कमलाकर आणि मी; आम्ही दोघे त्याच्याकडे बघतच राहिलो.

   एका बाजूला कवी म्हणून अविष्कृत व्हायला उतावळा असलेला नामदेव राजकीय व्यवस्थाही उलथून पाडायला तितकाच उतावळा असायचा. नुसत्या शब्दापुरता तो जगावेगळा नव्हता. स्वभावानेही तो वेगळाच होता. त्याच्या कविता वा शब्दातून त्याला दलित कवी, साहित्यिक असे का म्हटले जाते; त्याचे मला नेहमी आश्चर्य वाटत राहिलेले आहे. त्याला जितके बाबासाहेबांचे आकर्षण होते, तितकेच जगभरच्या प्रत्येक क्रांतीकारकांचे अप्रुप होते. त्याच्या शब्द व अविष्कारातून वर्णवर्चस्ववाद, जातीभेदाविषयीचा संताप व्यक्त व्हायचा; त्यापलिकडे त्याचा आवेश विषमतेच्या विरोधातला असायचा. जन्माधिष्ठीत अन्यायाच्या विरोधातला त्याचा आवाज कुठल्याही अन्यायाच्या विरोधात तितकाच बुलंद असायचा. पण त्या राग प्रक्षोभात कुठलीही वैरभावना वा द्वेष नसायचा. कुठल्या व्यक्ती वा जातीपंथाच्या विरुद्ध त्याने कधीच शत्रूत्व केले नाही. त्याच्या वागण्यातून सतत जाणवायचे, की नामदेव कुणाही व्यक्ती वा संघटना पक्षाकडेही प्रवृत्ती म्हणूनच बघायचा. त्या व्यक्ती वा संघटनेला त्याचा विरोध त्या प्रवृत्तीपुरता असायचा. एकदा त्या भूमिका बाजूला ठेवल्या, मग तीच व्यक्ती नामदेवसाठी मित्र असू शकायची. त्यासाठी आपले आग्रह वा हट्ट नामदेवला सोडावे लागायचे नाहीत. क्रांती वा बंडखोरीचा चेहरा म्हणून जसे आपण नामदेवकडे बघू शकतो; तितकाच तो निष्पाप निरागसतेचा चेहराही होता. त्याची प्रचिती नामदेवच्या बोलण्यात, लिहिण्यात वा कवितेतल्या अपशब्दातून येते. अन्यथा जे शब्द आपण गैरलागू वा अपशब्द म्हणून टाळतो, तेच शब्द नामदेवने बोलावेत किंवा लिहावेत, त्यांचा नूर बदलून जातो. ज्या ओघात ते शब्द नामदेवच्या रचनेत वा मांडणीत यायचे, त्यांची जागा इतकी नेमकी व आशयपुर्ण असते, की त्यात तुम्ही काहीही गैर शोधूही शकत नाही.

   एकदा मी आक्रमक वा भडक बोलणार्‍या लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यात नामदेवचाही समावेश होता. त्यात त्याने दिलेले स्पष्टीकरण सर्वात अप्रतिम होते. जी भाषा माझ्या आईकडून शिकलो वा माझ्या गोतावळ्यात सहजगत्या वापरली जाते, ती अश्लिल कशी? त्याचा हा सवालच निरूत्तर करणारा होता. पण पुढे एकदा गहन बोलताना त्याने मला अपशब्द वा सभ्य शब्द यातला फ़रक उलगडून सांगितला, शब्द निर्जीव असतात, त्यांच्यातला आशय ओळखता आला नाही, तर शब्द व भाषाच निरूपयोगी होऊन जाते. शब्दांना हेतू नसेल, तर त्यांना अर्थच नसतो. शिवी वा अपशब्दामागचा हेतू इजा करण्याचा नसेल, तर त्यांना अपशब्द कोणी कशाला म्हणावे? माय पोराला लबाड म्हणते, तिच्या मायेकडे काणाडोळा केला, तर तिने वापरलेला शब्दच निरर्थक होतो. कारण त्या शब्दातली माया ती प्रकट करत असते. भावड्या जन्मदातीची माया बघायची नसेल, तर तिचे शब्द ऐकायचे तरी कशाला? 

   अनेकांना प्रश्न पडतो, की असा हा नामदेव ढसाळ मस्त पैसे मिळवायचा, ऐष करायचा, चैनीचेही जीवन जगला, तर त्यावेळी त्याच्यातला क्रांतीकारक कसा बहकला? मलाही आरंभीच्या काळात तसेच वाटलेले आहे. काही लब्धप्रतिष्ठीतांच्या नादी लागलेला व ऐषोरामाच्या गुंत्यात अडकलेला नामदेव आपल्यातला बंडखोराचा गळा घोटून मोकळा झाला, असेच मलाही अनेकदा वाटलेले आहे. त्याने केलेल्या राजकीय कसरती वा तडजोडी, उलथापालथी सौदेबाजीसारख्या होत्या, हे कोणी नाकारू शकणार नाही. माझे असे प्रामाणिक मत आहे, की त्यासाठी नामदेवने स्वत:ला बदलण्याचा खुप कसोशीने प्रयासही केला. त्यानेही सुखवस्तू सुरक्षित जीवनाच्या वळचणीला जाण्य़ाचा प्रयास केला, यात शंका नाही. पण नामदेव त्यात कितीसा रमला? चार दशकांपुर्वी मला भेटलेला तो सामान्य ‘इसम’ वरवर बघता कुठल्या कुठे बेपत्ता झाला असेच वाटू शकते आणि मलाही अनेकदा तसेच वाटले सुद्धा. पण त्यानंतर जेव्हा केव्हा अकस्मात तो भेटायचा, तेव्हा आलीशान गाडीतून उतरणारा वा त्यात बसलेला नामदेव असा सामोरा यायचा, की तो तसूभरही बदललेला नाही, याची खात्री व्हायची. २००४ सालातली गोष्ट त्यातला शेवटचा अनुभव होता.

   शिवसेनेशी त्याची दोस्ती होती. त्या विधानसभा निवडणूकीत त्याला सेनेने दोन जागा सोडल्या होत्या. त्यापैकी नागपाडा मतदारसंघात नामदेव स्वत:च उभा रहाणार होता. मात्र दक्षीण कराडमध्ये त्याला कोणी उमेदवार सापडत नव्हता. अपरात्री त्याने मला फ़ोन केला. म्हणाला तिथे कोणी उमेदवार मिळेल काय? मी पण थक्क झालो. इतक्या दिर्घकाळानंतर याला माझी अशा अजब कामासाठी कुठून आठवण झाली? मग त्याला मी एका जुन्या मित्राचे नाव सुचवले. पण हा सेक्युलर मित्र मान्य करील काय, याबद्दल तो साशंक होता. पण ती समस्या मी निकालात काढून दिली. पण त्या उमेदवारीचे अधिकारपत्र घेण्य़ासाठी त्या उमेदावारासह नामदेव व मी मातोश्रीवर गेलेलो असताना; याला कुठून तरी खबर मिळाली जॉर्ज फ़र्नांडीस मुंबईत आलेले आहेत. तात्काळ मातोश्रीचे काम तसेच सोडून नामदेव म्हणाला ‘चला जॉर्जला भेटू.’ माहिमला येताना मी त्याला घरातली एक गोष्ट सांगितली. वाजपेयी सरकारच्या विश्वास प्रस्तावावर जॉर्जच्या जोरदार भाषणावर माझी मुलगी कशी बेहद्द खुश होती. अर्थात ती सहा वर्षे जुनी बाब होती. पण तिथे जॉर्जची भेट होताच. या महाभागाने विनाविलंब ती कहाणी जॉर्जच्या कानी घातली आणि त्या मुलीशी तुम्ही बोललेच पाहिजे असा आग्रहही धरला. वास्तविक ते व्हायला एक अडचण होती. कारण तेव्हा माझी मुलगी उच्चशिक्षण घ्यायला अमेरिकेत गेलेली होती. पण ह्या हट्टी माणसापुढे कोणाचे चालणार? त्याने मला पळता भूई थोडी करून मुलीचा तिथला नंबर काढायला लावला आणि आपल्या मोबाईलवरून थेट अमेरिकेत संपर्क साधून जॉर्जना तिच्याशी संवाद करायला भागच पाडले.

   वास्तविक माझी मुलगी सोडा, माझ्या पत्नीचीही नामदेवशी कधी ओळखपाळख झालेली नाही. तसा प्रसंगच कधी आला नाही. मुलीचेही तेच. नामदेवने तिला कधी काळीगोरी बघितली नाही. पण आपल्या पोराचे कौतुक करायला नको, अशा हट्टापायी त्याने त्या गडबडीत हा सगळा प्रकार घडवला होता. त्यात नवे असे काहीच नव्हते. पस्तीस वर्षापुर्वी नामदेव तसाच होता. तेव्हा कमलाकर सुभेदार विवाहित आणि आम्ही उपटसुंभ होतो. पण ताडदेवच्या रुसी मेहता हॉल या व्यायामशाळेचे नामदेवच्या गोलपिठा या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन व्हायचे होते. तर तिथे कमलाकरने आपल्या पत्नी मुलासह यायलाच हवे असा हट्ट नामदेवने पुर्ण करून घेतला होता. ती लेकुरवाळी स्त्री तिथे अवघडून बसली होती. पण वहिनी अगत्याने आली म्हणून नामदेव आनंदला होता. त्याच्यातले हे निष्पाप, निरागस मुल, निर्व्याज उत्साह आणि विशुद्ध माणुसकी क्वचितच बघायला मिळते. खरे सांगायचे तर कितीही सभ्य सुसंस्कृत माणसांकडे माणसातला माणूस शोधून त्याची गळाभेट करण्याची क्षमता नसेल, ती अपुर्व कुवत नामदेवपाशी उपजतच होती. समतेच्या गमजा व वल्गना आजवर अनेकांकडून ऐकल्या असतील. पण स्वत:च्या जीवनात समतेने वागण्याची कुवत फ़ार थोड्या लोकांपाशी असते. नुसते इतरांना समभावाने वागवणे नाही, तर आपणही इतरांशी समतेच्या धारणेने वागणे खुप अवघड काम आहे. अनेकदा आपल्याला आपल्या अहंगंडातून बाहेर पडणे अशक्य असते, तितकेच स्वत:च्या न्युनगंडातून बाहेर पडता येत नाही. या दोन्ही जोखडातून बाहेर पडलेली दोनच माणसे मला आयुष्यात भेटली त्यातला एक नामदेव ढसाळ होय, असे मी छातीठोकपणे सांगू शकतो. समोर शिवसेनाप्रमुख असो किंवा कोणी सामान्य पॅन्थर कार्यकर्ता असो, नामदेव दोघांशी समान पातळीवर बोलू वागू शकला. ही त्याची शक्ती, कुवत वा उपजत क्षमता त्याची एकमेव ओळख होती. त्या नामदेवला कितीजण ओळखतात, ते मला माहिती नाही. कोणी त्याला दलितकवी म्हणून, कोणी दलित नेता वा अन्य काही म्हणून ओळखत असतील. पण मला भेटलेला नामदेव हा असा होता. त्याचे जितके पैलू उलगडावे तितका तो अधिकच भारावून टाकत राहिल.

शनिवार, ११ जानेवारी, २०१४

प्रेषिताच्या शोधात भारतीय

   भारतीत समाज जीवनात व्यक्तीमहात्म्य खुप महत्वाचे असते, जी व्यक्ती समाजमनाला भुरळ घालू शकते किंवा भारावून टाकू शकते; तिच्यामागे पळण्याची मानसिकता मोठी प्रभावी असते. ती जशी गावात वस्तीमध्ये असते, तशीच प्रादेशिक, भाषिक व राष्ट्रीय पातळीवरही प्रभावशाली आहे. त्यापासून भारतीयांची सुटका नाही. कोणीतरी उद्धारक वा प्रेषित यावा आणि त्याने आपले जीवन उजळून टाकावे, अशी स्थायी मानसिकता या भूमीमध्ये कायम कार्यरत असते. जेव्हा असा कोणी राष्ट्रीय ताकदीचा उद्धारक नसतो, तेव्हा इथली जनता स्थानिक, प्रादेशिक वा वस्तीच्या पातळीवरचे प्रेषित शोधून त्यांच्या मागे धावत सु्टते, असा आपला इतिहास आहे. स्वातंत्र्य चळवळ असो किंवा स्वातंत्र्योत्तर काळातील भारताची वाटचाल असो, त्यात अशी अनेक लहानमोठी व्यक्तीमत्वे उदयास आलेली दिसतील. त्यांनी समाजजीवन वा राजकीय, सांस्कृतिक जीवन व्यापलेले दिसेल. जेव्हा अशा अशा कुणा व्यक्तीमत्वाचा राष्ट्रीय पातळीवर वावर असतो, तेव्हा त्याच्याच भोवती राजकारण किंवा समाजजीवन घुटमळत असते. गांधी नेहरू वा पुढल्या कालखंडात इंदिराजी अशी व्यक्तीमत्वे होती. त्यांनीच कॉग्रेसला कायम सत्ता उपभोगू दिली. त्या व्यक्तीमहात्म्याला आव्हान देऊ शकणारे व्यक्तीमत्व विरोधकांना समोर आणता आले नाही. म्हणूनच कॉग्रेस सातत्याने टिकून राहिली. नेहरूंच्या अस्तानंतर तसे व्यक्तीमत्व नसल्याने कॉग्रेस प्रभावहीन होऊन स्थानिक व प्रादेशिक व्यक्तीमहात्म्यासमोर तिला पराभूत व्हायची वेळ आली. मग कात टाकल्याप्रमाणे १९७० च्या दशकात इंदिराजींचे व्यक्तीमहात्म्य पुढे आले आणि पुन्हा कॉग्रेसची सत्ता कायम राहिली, आणिबाणीच्या निमित्ताने तिला जयप्रकाश नारायण यांच्या व्यक्तीमत्वाने हादरा दिलेला होता. पण त्यांनी सत्तेपासून दूर रहाण्याने पुन्हा इंदिराजींकडे लोकांना वळावे लागले. थोड्याच काळात इंदिराजींच्या हत्येनंतर तीच पोकळी भारतीय राजकीय व समाजजीवनात आली आणि अवघे समाजजीवन भरकटत गेले. कॉग्रेस निकामी प्रभावहीन होत गेली. पण दुसरीकडे ती पोकळी भरून काढणारे देशव्यापी व्यक्तीमत्व अन्य पक्षात उदयास आले नाही. सहाजिकच स्थानिक व प्रादेशिक व्यक्तीमत्वाच्या आश्रयाला जात भारतामध्ये विस्कळीतपणा येत गेला. त्यातून बाहेर पडण्यासाठी कॉग्रेसच्या धुर्त नेत्यांनी आपल्या पक्षाला एकत्रित बांधू शकतील अशा सोनिया गांधींना पुढे आणले. त्यांचे व्यक्तीमहात्म्य उभे केले. पण असे व्यक्तीमत्व नुसतेच व्यक्ती असून भागत नाही, त्याच्यापाशी नेतृत्व करण्याची आणि धाडस करण्याची क्षमता असावी लागते. ती राजीव गांधीमध्ये नव्हती आणि सोनियांमध्येही नाही. म्हणूनच गेल्या तीन दशकात भारतामध्ये समाजजीवन विस्कळीत होत गेले. स्थानिक व प्रादेशिक प्रभावी व्यक्तीमत्वांच्या हाणामारीत राष्ट्रीय एकात्म चेहरा विस्कटून गेला. मोदींच्या रुपाने तसे व्यक्तीमत्व समोर आलेले आहे. त्यामुळेच रमेश त्यांना ‘फ़ॅसिस्ट आव्हान’ म्हणत आहेत. नेमके तसेच इंदिराजींचे रूप नव्हते का? इंदिराजींनी आणिबाणी लादून आणि तमाम विरोधी लोकांना गजाआड डांबून आपल्या एकाधिकारशाहीचा साक्षात्कारच देशाला घडवला होता. मोदींनी अजून तसा कुठला साक्षात्कार तरी घडवलेला नाही. पण तरीही त्याच इंदिराजींचे निष्ठावान भक्त जयराम रमेश मात्र मोदींना फ़ॅसिस्ट आव्हान ठरवत आहेत. त्यातला विखार बाजूला ठेवून म्हणुन त्यांचे विधान तपासणे अगत्याचे होऊन जाते. मोदींमध्ये जयराम रमेश नेमके असे काय बघत आहेत वा त्यांना काय दिसते आहे, की त्यांनी मोदींना कॉग्रेससमोरचे खरे मोठे आव्हान मानावे, त्याचे उत्तर काहीसे गुंतागुंतीचे आहे.

   रमेश यांना इंदिराजींचे व्यक्तीमत्व आठवलेले असावे. १९७० च्या आसपास इंदिराजी ज्याप्रकारे राजकीय क्षितीजावर उगवल्या आणि पुढल्या दोन दशकात त्यांनी जुन्याजाणत्या राजकारण्यांना निकालात काढून भारतीय राजकारणाचा चेहरामोहराच बदलून टाकला, तशीच वाटचाल मोदी करीत आहेत काय? मोदी हे ‘स्वातंत्र्योत्तर काळातले सर्वात मोठे आव्हान’ या शब्दांना म्हणूनच वेगळे महत्व आहे. रमेश वा कुठल्याही कॉग्रेस नेत्याने भाजपाच्या कुठल्या नेत्याचा इतका धसका घेतलेला नव्हता किंवा अन्य कुठल्या बिगर कॉग्रेस नेत्याला लक्ष्य केलेले नव्हते. गेल्या दोनचार वर्षात कॉग्रेसने आपली सगळी ताकद व बुद्धी मोदी विरोधात पणास लावल्यासारखे राजकारण केलेले आहे. त्यातूनच रमेश हे मोदींना आव्हान कशाला म्हणतात, त्याची साक्ष मिळते. ज्या कॉग्रेस पक्षात सोनिया व राहुल गांधींचे एकमुखी नेतृत्व आहे; त्याने विस्कळीत व अनेक आवाजात बोलणार्‍या भाजपाच्या मोदी या नवख्या नेत्याला इतके घाबरावे कशाला? मोदींच्या मागे भाजपा एकमुखी उभा नाही आणि लालकृष्ण अडवाणी व अन्य नेतेही मनपुर्वक मोदींच्या मागे नाहीत. कदाचित मोदींनी आक्रमक पवित्रा घेतला, तर भाजपात दुफ़ळीही माजू शकते. इतके असताना रमेश या व्यक्तीमत्वाबद्दल इतके गडबडून गेल्यासारखे बोलतात व कॉग्रेसही मोंदीबाबत अत्यंत आक्रमक पवित्रा घेते; याचा अर्थ काहीतरी घाबरण्यासारखे नक्कीच आहे. ते कारण मोदींना पक्षापेक्षा व्यक्ती म्हणून मिळणारा प्रतिसाद हेच असावे. कारण गेल्या वर्षभरात मोदींची वाढलेली लोकप्रियता व त्यांना मिळणारा वाढता प्रतिसाद; त्यांचे व्यक्तीमहात्य वाढवण्रारा आहे. दिर्घकाळानंतर भारताच्या राजकीय क्षितीजावर देशव्यापी लोकप्रियता असलेला आणि कुठेही जाऊन जनतेला भारावून टाकणारा, नवा नेता उदयास आलेला आहे. किंबहूना इंदिराजींच्या अस्तानंतर प्रथमच देशात कुणी एक देशव्यापी राजकीय व्यक्तीमत्व उदयास आलेले आहे, याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. रमेश आणि कॉग्रेसला त्याच व्यक्तीमत्वाने भयभीत केलेले आहे. त्याची प्रचिती नित्यनेमाने येत असते. आम्ही मोदींना मोजत सुद्धा नाही, अशी ग्वाही कॉग्रेसचे नेते प्रवक्ते नेहमी देत असतात. पण त्या पक्षाचे सर्व राजकारण मोदींच्या वाटेत अडथळे आणण्यापुरतेच मर्यादित होऊन गेले आहे. आपल्या पक्षाची धोरणे आखून, बदलून त्याच्या अंमलातून लोकांमध्ये आपले स्थान पक्के करण्यापेक्षा सगळा कॉग्रेस पक्ष मोदींची खुसपटे काढण्यात वा त्यांच्यावर हल्ले करण्यातच रममाण झाला आहे. कधी इशरत जहानची खोटी चकमक, तर कधी झाकीया जाफ़रीचा खटला, तर कधी अमित शहाचे पाळत प्रकरण किंवा अशाच कुठल्या प्रकरणात मोदी यांना गुंतवण्याचे व बदनाम करण्याचे डावपेच आखण्यात कॉग्रेसची शक्ती खर्ची घातली जात आहे. हे कशाचे लक्षण आहे?

   गेल्या दोनतीन दशकात भारताच्या राजकारणाचा ज्यांनी अभ्यास केला असेल, त्यांना असे एका व्यक्तीमत्वाच्या विरोधात देशाचे राजकारण घुटमळताना कधी दिसले नसेल. त्याच्या आधी इंदिराजींच्या कारकिर्दीत मात्र तसे सातत्याने होत असे. तमाम विरोधी पक्ष व राजकीय टिकाकारांचे एकमेव लक्ष्य इंदिरा गांधी असायच्या. त्याबद्दल त्यांनीही कधी तक्रार केली नव्हती. उलट आपल्या विरोधकांना व टिकाकारांना तो उद्योग चालवायला पुरेसे खाद्य इंदिराजी अगत्याने पुरवित असत. आपल्याला शिवीगाळ व्हावी व आपला उद्धार सतत होत रहावा, अशी तजवीज जणू इंदिराजी मुद्दाम करायच्या. नेमकी तीच आज मोदींच्या बाबतीतली स्थिती आहे. कुठूनही व कोणतेही कारण नसताना विषय मोदीपर्यंत आणला जातो किंवा येतो. देशातल्या कुठल्याही विषय वा गोष्टीचा संबंध मोदींशी जोडला जातोच. अवघे राजकारण व सार्वजनिक जीवन एका व्यक्तीभोवती घुसळते व घुमते आहे. इंदिराजीच्या राजकीय कारकिर्दीत अशीच स्थिती असायची. कॉग्रेस व विरोधी पक्षाच्या धुसळणीचा मध्यबिंदू इंदिराजी हेच व्यक्तीमत्व असायचे. त्या व्यक्तीमत्वाने देशाच्या समाजजीवनाचे जणू दोन तुकडे पाडलेले होते. एका बाजूला इंदिरा समर्थक व दुसर्‍या बाजूला उर्वरित सगळे; अशी स्थिती असायची. तुम्ही इंदिरेचे समर्थन करा किंवा त्यांचा द्वेष करा, पण तुम्ही त्यांच्याक्डे काणाडोळा वा दुर्लक्ष करू शकत नव्हता. आज मोदींच्या बाबतीत वेगळे म्हणता येईल काय? खरे तर तसेच सोनिया वा राहुल गांधींच्या बाबतीत व्हावे, ही रमेश यांच्यासारख्या रणनितीकारांची अपेक्षा होती आणि असते. पण सर्व अधिकार हाती देऊनही ते दोन्ही नेते त्या कसोटीला उतरू शकलेले नाहीत. पंधरा वर्षापुर्वी सोनियांना राजकारणात आणणार्‍या नेत्यांनी तेच उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून वादग्रस्त सोनियांना कॉग्रेसच्या सर्वेसर्वा म्हणून स्थानापन्न केले होते. आरंभी त्यांनीही तसे वादग्रस्त राहुन आपल्या व्यक्तीमत्वाची छाप चांगली पाडली होती. सत्तेवर असलेला भाजपा व त्याचे सर्व नेते सोनियांना परदेशी वगैरे म्हणून लक्ष्य करीत होते, त्याचा लाभ कॉग्रेसला मिळू शकला होता. तसा नेता भाजपाकडे नव्हता. त्यामुळेच सोनियांचे व्यक्तीमत्व चमकत होते. पण कसोटीच्या प्रसंगी त्यांचा टिकाव लागला नाही. आणि गुजरातच्या दंगलीचे अतिरेकी राजकारण करण्यातून त्यांनीच मोदींना तसे प्रभावी देशव्यापी व्यक्तीमहात्म्य बहाल करण्याची चुक केली. अर्थात मोदी त्याचा लाभ उठवून खरेखुरे राजकीय आव्हान म्हणून समोर उभे ठाकतील, अशी कुणाचीच अपेक्षा नव्हती. मात्र टिकेचे घाव सोसताना त्यातून मोदींनी देव होण्यापर्यंत मजल मारली; तेव्हा त्यांच्या टिकाकारांना भान येते आहे. रमेश आपणच घातलेल्या टिकेच्या घावातून निर्माण झालेला नवा देव आणि त्याच्या भक्तीला लागलेली लोकसंख्या बघून, भयभीत झाले आहेत. कारण दोनतीन वर्षात समोर आलेला मोदी त्यांना जुन्या इंदिरा गांधींच्या व्यक्तीमत्वाची आठवण करून देऊ लागला आहे. आजच्या पिढीतल्या बहुतांश पत्रकार अभ्यासकांना इंदिराजी हे व्यक्तीमत्व वाचून वा ऐकून माहिती आहे. पण त्यांच्या राजकीय घटनाक्रमाचे साक्षीदार नसलेल्यांना त्यातली उर्जा व दाहकता उमगणे अशक्य आहे. इंदिराजी हे व्यक्तीमत्व वाचून वा ऐकून त्याच्या राजकीय प्रभावाचा अंदाज येऊ शकत नाही. तो त्या काळाच्या अनुभूतीमध्ये जाऊन उलगडावा, असाच विषय आहे. रमेश यांना म्हणूनच मोदींमध्ये आव्हान दिसते आहे. त्यांना मोदींमध्ये इंदिरा गांधी दिसत आहेत. पण ते व्यक्तीमत्व कॉग्रेसमध्ये नसून कॉग्रेस संपवायला कटीबद्ध झालेले आहे, म्हणून जयराम रमेश यांच्यासह तमाम कॉग्रेस नेत्यांची गाळण उडालेली आहे.  (अपुर्ण)        

शुक्रवार, १० जानेवारी, २०१४

जयराम रमेश काय म्हणाले?



  गेल्या जुन महिन्यात भाजपाने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची देशव्यापी लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांना आगामी लोकसभा निवडणूकीच्या प्रचार समोतीचे प्रमुख म्हणून नेमले. त्यांची नेमणूक जाहिर होताच सर्वत्र एकच गदारोळ सुरू झाला. कारण गेल्या दहा वर्षात गुजरात दंगलीचे निमित्त करून मोदींना सातत्याने बदनाम करण्यात आलेले होते. त्या बदनामीच्या मागे कॉग्रेसची प्रेरणा होती, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळेच बदनामीची अतिशयोक्ती होऊन मोदींबद्दल जगभर कुतूहल वाढत जाऊन त्यांचे रुपांतर क्रमाक्रमाने लोकप्रियतेत झाले. परिणामी मोदींचेच नाव पंतप्रधान पदासाठी घेतले जाऊ लागले. आधी काही उद्योगपती व नंतर माध्यमांनी भाजपाला खिजवण्यातून ती चर्चा वाढतच गेली. पुढे भाजपाने मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार करणे म्हणजे साक्षात आत्महत्याच असल्याचा सिद्धांत मांडला जाऊ लागला. पण अशा अनावश्यक चर्चेतून लोकांसमोर मोदी देशाचे भावी पंतप्रधान होण्याची कल्पना अनवधानाने मांडली गेली. सततच्या चर्चेने त्या कल्पनेला वजन प्राप्त होत गेले आणि गुजरातच्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर लोकांनाही असा पंतप्रधान असावा, असेच वाटू लागले. थोडक्यात मोदींच्या आडोशाने भाजपाला बागुलबुवा दाखवण्याच्या नादात मोदी विरोधकांनीच लोकांच्या मनात मोदींना पंतप्रधान पदी बसवायची कल्पना रुजवली. त्यातून उदासिन व निराश भाजपा कार्यकर्त्यांना उभारी येत गेली आणि परिणामी भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्याकडून मोदींनाच भावी पंतप्रधान बनवण्याची मागणी वाढू लागली. खरे तर त्या कालखंडात मोदी गुजरातमध्ये तिसर्‍यांदा विधानसभा निवडणूक लढवण्यात गर्क होते. परंतु त्यांचा डोळा ती लढाई जिंकून पंतप्रधान पदावर खुलेआम दावा करण्याचाच होता. वर्षभरापुर्वी ती लढाई जिंकल्यापासून मग मोदींनी दिल्लीवर स्वारी करण्याचा चंग बांधला. खरे तर त्यांच्या विरोधकांनी तिथेच हा बागुलबुवा दाखवण्याचे थांबवले असते; तर मोदींना इतक्या लौकर त्या उमेदवारीपर्यंत मजल मारणे शक्य झाले नसते. पण त्यांना हवी तशीच खेळी त्यांचे विरोधक करत गेले आणि मोदींचे काम सोपे होत गेले. आपल्याच पक्षातून व दिल्लीच्या पक्षीय श्रेष्ठींकडून आपल्याला सुखासुखी मान्यता मिळणार नाही; याची मोदींनाही खात्री होती. पण माध्यमातील अपप्रचार व कार्यकर्त्यातील उत्साह, यांचा नेमका उपयोग करीत मोदींनी आपली वाटचाल योग्य दिशेने चालू ठेवली होती. सतत मोदी व त्यांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीच्या चर्चेने त्यांचे काम अतिशय सोपे करून टाकले होते. एका बाजूला त्याचे दडपण पक्षातील व पक्षाबाहेरील विरोधकांवर वाढत होते. तर दुसरीकडे पक्षाच्या विजयासाठी उतावळा झालेला तळागाळातला कार्यकर्ता अधिकच निष्ठेने मोदींच्या मागे गोळा होत गेला.

   ज्यांना राजकारणाचा अभ्यास आहे आणि जनमानसाचा अंदाज आहे, अशा कॉग्रेस नेत्यांमध्ये केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री जयराम रमेश यांचा समावेश होतो. पक्षाच्या निवडणूक रणनिती व प्रचाराचे मुद्दे शोधण्यात तेच पुढे असतात आणि राहुल गांधी यांची भाषणे तेच लिहून देतात, असे म्हटले जाते. कॉग्रेस समोर असलेली राजकीय आव्हाने व त्याच्यावरचे उपाय शोधण्यासाठी असलेल्या अभ्यासगटात, त्यांचे स्थान प्रमुख आहे. सहाजिकच अशा माणसाला पक्षासमोर असलेले सर्वात भीषण आव्हान सर्वात आधी उमगणार हे वेगळे सांगायला नको. मोदींच्या बाबतीत बाकीचे कॉग्रेस नेते नाके मुरडत असताना, रमेश यांनी मात्र अकस्मात २०१३ च्या मध्यास मोदी हे कॉग्रेस समोरचे स्वातंत्र्योत्तर काळातले सर्वात मोठे आव्हान असल्याची कबुली देऊन टाकली. त्यामुळे पक्षातच इतके वादळ उठले. ते रमेश यांचे व्यक्तीगत मत असल्याचे अधिकृत प्रवक्त्याला जाहिरपणे सांगावे लागले. दुसरे एक ज्येष्ठ कॉग्रेसनेते सत्यव्रत चतुर्वेदी तर कमालीचे संतापले आणि त्यांनी रमेश यांना मोदींचे नेतृत्व इतकेच आवडत असेल, तर त्यांनी भाजपात निघून जावे; इथपर्यंत टोकाची टिका केलेली होती. रमेश यांनी खरे तर मोदींचे अजिबात कौतुक केलेले नव्हते. उलट विषारी भाषेत टिका करताना मोदी हे भस्मासूर असल्याचीही मल्लीनाथी केलेली होती. मग अवघा कॉग्रेस पक्ष विचलीत होण्याचे कारण काय असावे? तर रमेश यांनी मोदी हे पक्षासमोरचे आजपर्यंतचे सर्वात मोठे व खरे आव्हान असल्याची कबुली दिलेली होती. ती कबुली त्यांचे खरेच व्यक्तीगत मत असते, तर त्यावर इतके काहूर माजले नसते. प्रवक्त्याने झटकून टाकण्यावर विषय संपवला गेला असता. पण ते रमेश यांचे व्यक्तीगत मत नव्हते. तर कॉग्रेसच्या धोरणात्मक बैठकीत झालेल्या चर्चेचा सूर त्यातून अनवधानाने बाहेर आला. त्यासाठी तमाम पक्षनेते संतापले होते. जे पक्षाने व्यवहारी सत्य म्हणून स्विकारले आहे, त्याची जाहिर वाच्यता केल्याने बाकीचे नेते चिडले होते. शिवाय रमेश हा नेता असे म्हणतो, म्हणजे भाजपालाही मोदी हेच आव्हान असल्याचा संकेत कॉग्रेसने द्यावा, असा त्याचा अर्थ झाला होता. म्हणूनच रमेश यांच्या विधानावर इतका कल्लोळ कॉग्रेसमध्ये झाला. अर्थात रमेश यांची गळचेपी केल्याने व्हायचे परिणाम बदलता आलेले नाहीत. अवघ्या सहा महिन्यातच त्याची प्रचिती चार विधानसभा निकालातून समोर आलेली आहे. चार राज्यात कॉग्रेसचा पुरता सफ़ाया झाला आणि भाजपाला सगळीकडे निर्णायक यश मिळालेले आहे. या सर्वच निवडणूकीत मोदींनी आघाडीवर राहुन पक्षाचा प्रचार केला आणि अनेक राज्यात त्यांनी घेतलेल्या सभांना अफ़ाट प्रतिसाद जनतेकडून मिळतो आहे. सहाजिकच आगामी राजकारणात कॉग्रेस समोरचे मोदी हेच ऐतिहासिक आव्हान असल्याची साक्ष घटनाक्रमच देतो आहे.

   यातला निकाल बाजूला ठेवून रमेश यांनी मोदींविषयी असे भाकित कशाला करावे, त्याची मिमांसा मोठी उदबोधक ठरावी. रमेश हे इंदिरा गांधीच्या काळात कॉग्रेसमध्ये आलेले आणि राजीव गांधींच्या काळात पक्षाच्या कामात सहभागी झालेले बुद्धीमान नेते आहेत. त्यांनी इंदिराजी व राजीव गांधींनी प्रचंड जागा जिंकताना व लाटेवर स्वार होऊन सत्ता संपादन करताना जवळून अनुभवले आहे. त्यामुळेच लाटेवर स्वार होणारा किंवा लाट उभी करणारा नेता जवळून बघितला आहे. लाटेचे राजकारण कसे हेलकावे घेते आणि लाटेवर स्वार होणारा नेता कसा असावा लागतो; त्याचाही अभ्यास रमेश यांनी केलेला आहे. मोदी जर त्याच चौकटीत वा साच्यात बसत असतील, तर दुबळ्या विस्कळीत कॉग्रेसचा ते धुव्वा उडवणार; हे बघायची डोळस नजर रमेश यांच्याकडेच असू शकते. म्हणूनच त्यांनी मोदींना भस्मासूर म्हणावे किंवा बकासूर म्हणावे. त्यापेक्षा त्यांनी कॉग्रेस समोरचे स्वातंत्र्योत्तर काळातले सर्वात मोठे आव्हान संबोधणे, खुप महत्वाचे व सूचक आहे. एका राज्याचा वादग्रस्त मुख्यमंत्री यापेक्षा नरेंद्र मोदी यांची देशातील राजकारणाची अन्य़ कुठली कारकिर्द नाही. दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात वा सत्तेच्या आखाड्यात मोदी यापुर्वी कधीच नव्हते. पक्षानेही त्यांना तशी कधी संधी दिलेली नाही. मग सहा महिन्यापुर्वी जुन २०१३ मध्ये रमेश यांनी मोदींबद्दल असे भाकित कशाला करावे? कॉग्रेस सारख्या बलाढ्य देशव्यापी व शतायुषी पक्षाला भाजपाच्या जुन्याजाणत्या अनुभवी नेत्यांचे असे भय कधी वाटले नाही. वाजपेयी यांच्यासारखा लोकप्रिय नेताही आव्हान वाटला नाही. मग मोदींचे भय कशाला? भय मोदी या व्यक्तीविषयी असावे, की त्याच्या लोकप्रियतेची भिती? भाजपातील कार्यकर्त्याला उत्साहीत करण्याच्या मोदींच्या क्षमतेला रमेश घाबरले, की जनमानसात जाणवणार्‍या मोदीविषयक आकर्षणाने रमेश यांची झोप उडवली असेल? यातले शेवटचे कारण खरे आहे. व्यक्तीकेंद्री राजकारण झाल्यावर पक्षाच्या संघटनात्मक व प्रभावक्षेत्राच्याही पलिकडे जाऊन यश मिळते; हा निवडणूकांचा इतिहास आहे. मोदींच्या लोकप्रियतेमध्ये त्याचेच संकेत पाहुन रमेश यांना भिती वाटलेली आहे. इंदिराजींच्या व्यक्तीमत्वाने जसे भारतीय राजकारण मंतरले होते, त्याची चाहुल मोदींच्या आगमनाने लागलेली आहे. चाणाक्ष राजकीय अभ्यासकाला व डोळसपणे राजकारणाचे आकलन करणार्‍यांनाच त्याच्या सुगावा लागू शकतो. रमेश तशा मोजक्या नेत्यांपैकी व अभ्यासकांपैकी आहेत. म्हणुनच त्यांनी मोदीविषयक केलेल्या विधानाला महत्व आहे. म्हणूनच कॉग्रेसमध्ये त्यांच्या त्या जाहिर विधानाबद्दल कमालीच्या नाराजीचा सूर उमटला. (अपुर्ण) 

सोमवार, ६ जानेवारी, २०१४

आपापले स्वार्थ आणि हितसंबंध

  १९८५च्या त्याच मुंबई महापालिका निवडणूकीतले काही किस्से इथे मुद्दाम सांगायला हवे. आपल्या सर्वच शाखाप्रमुखांना उमेदवार करायच्या बाळासाहेब ठाकरेंच्या हट्टाबद्दल त्यांचेच नेते साशंक होते, तसेच अनेक शाखाप्रमुखही साशंक होते. दादर प्रभादेवीचा शाखाप्रमुख आपल्याला उमेदवारी अर्ज भरावा लागू नये, म्हणून गायब झाला होता. तर तिथे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेल्या मोतीराम तांडेल नावाच्या जुन्या वयस्क शिवसैनिकाला अर्ज भरायची मुदत संपल्यावर शोधून सेनेचा उमेदवार घोषित करण्यात आले. पुढे तो निवडून आल्यावर हा शाखाप्रमुख पाच वर्षे आपल्या नशीबाला दोष देत होता. चोवीस वर्षानंतर २००९ सालात त्यानेच आमदारकी टिकवण्यासाठी कॉग्रेसची उमेदवारी मिळवताना पक्षांतर केले होते. दुसरा किस्सा सांताक्रुज विमानतळ परिसरातला आहे. तिथे शाखाप्रमुखासह उपशाखाप्रमुखही उमेदवार व्हायला राजी नव्हते, तेव्हा लेऑफ़मुळे बेकार असलेला एक गटप्रमुख आपले डिपॉझीट कोणी भरणार असेल, तर निवडणूक लढवायला सिद्ध झाला. वर्गणी काढून त्याचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला आणि तोही निवडून आलेला होता. मुद्दा इतकाच, की चार महिन्यापुर्वी जी सेना आपल्या गिरणगावाच्या बालेकिल्ल्यातून संपली म्हणून माध्यमातले सेक्युलर आनंदोत्सव करीत होते; त्यांना थक्क करीत १९८५ सालच्या मे महिन्यात सेनेने मुंबई महापालिकेवर प्रथमच स्वबळाने भगवा फ़डकवला. तिथून मग सेनेची महाराष्ट्रात धोडदौड सुरू झाली. नंतर अवघ्या पाच वर्षात दत्ता सामंत व कामगार आघाडी इतिहासजमा होऊन गेले होते. हा सगळा इतिहास एवढ्यासाठी कथन करायचा, की तेव्हा मी सुद्धा डॉ. दत्ता सामंतांच्या यशाने भारावून गेलो होतो आणि आता शिवसेनेचे दिवस संपले, असे मानू लागलो होतो. योगायोगाने त्याच कालखंडात शिवसेनाप्रमुखांनी सेनेचे मुखपत्र असलेल्या ‘मार्मिक’ साप्ताहिकाचे पुनरुज्जीवन करून नव्या स्वरूपात त्याचे प्रकाशन सुरू करण्याचे योजले होते. त्याची जबाबदारी व्यावसायिक पत्रकार म्हणून माझ्याकडे आली. त्याच्या धोरणात्मक बाजूचा उहापोह करण्यासाठी बाळासाहेबांशी माझा सतत संपर्क येऊ लागला होता. पक्षाचे मुखपत्र हे अनुयायांना मार्गदर्शक व अन्य पक्षांसाठी पक्षाची भूमिका स्पष्ट करणारे असते. त्यामुळेच ‘मार्मिक’मध्ये प्रसिद्ध करायच्या मजकुराची दिशा ठरवण्यासाठी बाळासाहेबांशी मी अनेक मुद्दे व विषयांवर चर्चा करीत असे. आरंभी माझ्या राजकीय आकलनानुसार सेनेसमोर दत्ता सामंत व त्यांची कामगार आघाडी हेच स्थानिक व प्रभावी आव्हान आहे; अशी माझी ठाम समजूत होती. पण त्याविषयी साहेब अजिबात गंभीर नव्हते. वारंवार त्याबद्दल मी बोलत असे, त्यामुळे एके दिवशी त्यांनी मला सामंत हा कसा तात्कालीन बुडबुडा आहे आणि त्याची दखल घेण्य़ात आपली शक्ती खर्च करू नये, याबद्दल सविस्तर स्पष्टीकरण दिले. अर्थात तेव्हा मला ते पुर्णपणे पटलेले नव्हते. पण १९८९ सालात डॉ. सामंत त्याच गिरणगावात चारीमुंड्या चित झाले; तेव्हाच मला साहेबांचे भाकित पटले. कारण त्यानंतर कामगार आघाडी व सामंत यांचे नामोनिशाण शिल्लक उरलेले नाही.

   राजकारणातील घडामोडींचे आकलन होण्यासाठी व वस्तुनिष्ठ मिमांसा करण्यासाठी किती वास्तववादी असावे लागते; त्याचे धडे अशा विविध अनुभवातून मला गिरवता आलेले आहेत. अनेकदा आपण घडणार्‍या घडामोडी व घटनांकडे आपापल्या स्वार्थ व हितसंबंधांच्या चष्म्यातून बघत असतो. त्यामुळेच आपले स्वार्थ व समजूती वास्तवाचे चित्रच विकृत करतात. सहाजिकच आपल्या हाती आलेली वा उमगलेली माहितीच नासलेली असते. मग त्यावर आधारीत केलेली मिमांसा वा त्यानुसारचे आकलन वास्तववादी कसे असेल? आपण प्रत्येक घटना वा गोष्टीकडे आपल्या आवडीनिवडीनुसारच बघत असतो आणि हवे असलेले अर्थच त्यातून शोधायचा प्रयास करीत असतो. त्यामुळेच समान माहिती वा तपशील समोर असूनही भिन्न व्यक्ती, वेगवेगळे निष्कर्ष काढत असतात. राजू श्रीवास्तव नावाचा एक नकलाकार आहे. त्याने टिव्हीवर रंगवलेली एक नक्कल आठवते. त्याने कथन केलेल्या त्या विनोदातून राजकीय मिमांसेत येणारा फ़रक स्पष्ट होऊ शकेल. उत्तरप्रदेशात तेव्हाच्या सरकारने प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याचे धोरण आखले होते आणि त्यावर जोरदार चर्चा चालू होत्या. त्याच संदर्भात राजूने मोठा मस्त किस्सा तयार केला व रंगवला होता.

   एका गावात चौकात गोळा झालेल्या डझनभर कुत्र्यांमध्ये चर्चा चालू असते. आपल्याही गावात वीज येणार म्हणून कुत्रे सुखावलेले असतात आणि कधी वीज येणार यापेक्षा रस्त्यावर खांब टाकले कधी जाणार, यावर तावातावाने बकवास चालू असते. त्यातला एक अतिउत्साही कुत्रा वीज कधी यायची ती येवो, आणि खांबावर दिवे लागायचे तेव्हा लागोत; पण निदान ताबडतोब गावागावात दिव्याचे खांव तर विनाविलंब उभारले गेलेच पाहिजेत, असे ठासून सांगत असतो. तितकेच नाही, तर काही कुत्रे त्यासाठी सभा मोर्चे काढायचीही भाषा अगत्याने बोलत असतात. तेव्हा इतका वेळ गप्प बसलेला एक तुलनेने अननुभवी कुत्रा शंका विचारतो, तुम्हाला कशाला या गावोगावी येऊ घातलेल्या वीजपुरवठ्याची पंचाईत? तुम्ही टिव्ही बघणार आहात, की कॉम्प्युटर चालवणार आहात? नसेल तर असल्या बाष्कळ चर्चा हव्यात कशाला? बाकीचेही त्या प्रश्नाने वरमतात. पण मग त्यातला वयोवृद्ध कुत्रा पुढाकार घेतो आणि त्या चिकित्सक कुत्र्याला म्हणतो, ‘इथे कोणाला वीज येण्याची चिंता आहे? आपल्याला गावात वीज येण्याशी कर्तव्य नाही बाबा. आपला स्वार्थ फ़क्त वीजेच्या खांबाशी आहे, गावोगाव चौकाचौकात खांब असले, मग आपली टांग वर करण्याची सोय होते ना? ते खांब प्रत्येक ठिकाणी नसले, मग आपली किती गैरसोय होते? वीजेच्या निमित्ताने असे अधिक खांब लागले, तर केवढी मोठी समस्या निकालात निघेल त्याचा विचार कर.’ तात्काळ तोही कुत्रा विनाविलंब वीजेचे खांब घालण्याच्या प्रस्तावाला मान्यता देऊन टाकतो.

   यातला विनोद बाजूला ठेवला, तर घटना व गोष्टीकडे आपापल्या मतलबानुसार कसे बघितले जाते, त्याचे उत्तर मिळते. दिल्लीच्या मतदाराने केजरीवाल वा त्यांच्या पक्षाला आपल्या हेतूने मतदान केले असेल, कोणी पाणी, वीजेच्या दरात कपात किंवा कोणी झोपडीला मान्यता, नोकरीत कायम होण्याच्या आशेवर ‘आप’ला मतदान केले असेल. रिक्षावाल्यांनी आपली अरेरावी कायम रहावी आणि वाहतुक पोलिसांचा ससेमिरा संपावा, म्हणून मते दिली असतील तर कोणी भ्रष्टाचारातून मुक्ती म्हणून कौल दिला असेल. पण निकालानंतर त्याची मिमांसा करणारे आपापल्या स्वार्थानुसार त्याचा अर्थ लावत नाहीत काय? देशातून भ्रष्टाचार हटावा म्हणून, किंवा भाजपासह नरेंद्र मोदींचा विजयरथ रोखला जावा म्हणून, दिल्लीकरांनी केजरीवाल यांना कौल दिला आहे काय? नसेल तर मग त्याचा तसा अर्थ लावणारे आणि राजू श्रीवास्तवच्या विनोदातील खांबासाठी आग्रही असलेले कुत्रे; यांच्यात नेमका किती फ़रक मानायचा? कुणाला दिल्लीच्या निकालाचा अर्थ लावणार्‍यांची कुत्रा म्हणून केलेली ही अवहेलना वाटेल. पण तसा अजिबात हेतू नाही. पण दोन्हीकडल्या हेतूतले साम्य अधिक ठळकपणे समोर यावे; म्हणून काहीसा भडक वाटणारा हा किस्सा इथे मांडला. तितके नेमक्या शब्दात या दोन्हीतले साम्य दाखवणारे दुसरे उदाहरण नाही. केजरीवाल यांचे दिल्लीच्या निकालानंतरचे अवास्तव कौतुक आणि अतिशयोक्ती मांडण्यासाठी हा थोडा जुना इतिहास व तुलना केली इतकेच. कारण त्याच निकालाचा आधार घेऊन २०१४ च्या लोकसभा निवडणूकीचे आडाखे बांधण्याचा उद्योग सुरू झालेला आहे. एकूण दिल्लीच्या निकालाची मिमांसा नेमकी करण्यापेक्षा तिचा विपरित अर्थ लावला जात आहे. त्यातला विपर्यास व दिशाभूल करण्याचा हेतू स्पष्ट व्हावा, म्हणुनच हा विषय इतका सविस्तर मांडला आहे. तसे निवडणूक इतिहासाचे कित्येक दाखले देता येतील, केजरीवाल यांच्या यशासारखे हंगामी, तात्कालीन व प्रासंगिक यश अनेकांनी अनेकदा संपादन केलेले आहे. मात्र नंतरच्या राजकारणात त्यांचा मागमूसही शिल्लक उरलेला नाही. पण तात्कालीन राजकारणाला व घटनाक्रमाला कलाटणी देण्यासाठी अशा घटनांचा कसा विपर्यास केला जातो, त्याचे आधीच स्पष्टीकरण व्हावे म्हणून हा सगळा उहापोह.

   मुद्दा इतकाच, की केजरीवाल यांच्या यशाचा देशव्यापी मोठाच परिणाम होईल अशी जी हवा निर्माण केली जाते आहे; त्यातले सत्य समोर यावे आणि डोळसपणे उपांत्य फ़ेरी मानल्या गेलेल्या ताज्या विधानसभा निवडणूकांच्या निकालाची वास्तववादी कारणमिमांसा करता यावी. जितका हा झंजावात देशभर पसरण्याचा गाजावाजा चालू आहे, तितका तो झंजावात नसून दिल्लीपुरता त्याचा प्रभाव असेल. उलट दिल्लीपलिकडे असलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या निकालांनी लोकसभेच्या निवडणूकीबद्दल बरेच काही सांगून ठेवले आहे. ते काय आहे हे तपासण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे आजवरच्या निवडणूकीच्या ऐतिहासिक निकालांच्या कसोटीवर हे ताजे निकाल तपासून बघण्याची गरज आहे. लोक मते देतात म्हणजे काय? लोकांचे मत मुळात तयार कसे होते? लोक मते बनवतात कसे? कुठलाही परस्पर संपर्क वा बौद्धिक देवाणघेवाण होत नसताना जनमत वळण घेतेच कसे? त्याचे निकष काय असतात? वेळोवेळी निकष कसे बदलतात? पक्ष, उमेदवार, परिस्थिती, अपेक्षा, गरजा, समस्या यानुसार मत कसे घडत जाते? हे मत सार्वत्रिक कशामुळे होते? कुणाच्या बाजूने वा विरोधात झुकाव उदयास कसा येतो? असे अनेक मुद्दे तपासावे लागतात. तेव्हाच येऊ घातलेल्या निवडणूकीविषयी नेमके अंदाज बांधणे शक्य असते. यापैकी काहीही न करता आपापल्या मतलबाचे युक्तीवाद सिद्ध करण्यासाठी सोयीस्कर मुद्दे व तपशील वापरले; मग दिशाभूल करता येते. पण अंदाज मात्र पुरते फ़सतात. तोच धोका टाळण्यासाठी आधी नमनाला घडाभर तेल म्हणतात, तशी ही प्रदिर्घ प्रस्तावना करावी लागली. आगामी निवडणूकीत नरेंद्र मोदी हे कॉग्रेस समोरचे सर्वात मोठे व ऐतिहासिक आव्हान असल्याचे त्याच पक्षाचे बुद्धीमान नेते जयराम रमेश का म्हणतात, तेच कोडे उलगडण्याचा हा एकूण प्रयास आहे. (अपुर्ण)

शनिवार, ४ जानेवारी, २०१४

दिल्लीतली ‘आप’त्ती


   आज जसा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या यशावर कौतुकाचा वर्षाव चालू आहे, तसाच अठ्ठावीस वर्षापुर्वी डॉ. दत्ता सामंत यांच्या कामगार आघाडी पक्षाचा मुंबईत कौतुक सोहळा चालू होता. त्यांच्या यशाची जी कारणे होती; त्याचा कोणी शोध घेतला नाही, की त्यांच्या संघटनात्मक बळाचा कोणी विचार करायला तयार नव्हते. तेव्हा वाहिन्यांचा सुळसुळाट आजच्यासारखा नव्हता. पण जी छापील माध्यमे होती, त्यांनी आजच्या केजरीवाल यांच्याप्रमाणेच सामंतांना डोक्यावर घेतलेले होते. त्याला अर्थातच सामंतांचे यश कारण नव्हते, किंवा त्यांनी ज्या कॉग्रेसप्रणीत राजीव लाटेला रोखले, त्यालाही महत्व नव्हते. पत्रकारांना भावले होते ते वेगळेच काही होते. सामंत यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या लागोपाठच्या निवडणूकीत शिवसेनेला तिच्या बालेकिल्ल्यातच गारद करून टाकले होते. त्यामुळेच तात्कालीन सेक्युलर पत्रकार माध्यमांना आनंदाच्या उकळ्या फ़ुटल्या होत्या. सामंतांच्या त्या झंजावातामध्ये शिवसेना कशी वाहून गेली, त्याचा आनंद त्या पत्रकार विश्लेषकांच्या पोटात मावत नव्हता. म्हणूनच तो वृत्तपत्रातून दुथडी भरून वाहत होता. ज्या गिरणगावात दोन दशकांपुर्वी शिवसेनेचा उदय झाला आणि पुढल्या काळात तिथून तथाकथित डाव्या विचारांच्या पक्षाचे उच्चाटन झाले. गिरणगाव शिवसेनेचा बालेकिल्ला झाला, त्याने विचलित झालेल्यांना तिथे तितक्याच हाणामारीची कुवत दाखवणार्‍या सामंतप्रणित कामगार आघाडीच्या विजयाने उकळ्या फ़ुटलेल्या होत्या. त्यात डिसेंबर १९८४ अखेरीस सामंतांनी मध्य दक्षीण मुंबई मतदारसंघातून लोकसभेपर्यंत मजल मारली होती आणि दोनच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्याच भागातून त्यांचे तीन आमदार विधानसभेत निवडून आलेले होते. शिवाय अनेक मतदारसंघात त्यांनी शिवसेनेला मागे टाकून दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवली होती. सहाजिकच शिवसेना संपली; याचाच माध्यमातील अनेकांना आनंद झालेला होता. थोडक्यात या पत्रकार विश्लेषकांचा आनंद वा त्यांचे मतप्रदर्शन वस्तुस्थितीचे वर्णन करणारे नव्हते, तर त्यांच्या आकसाचे प्रतिबिंब त्यात पडलेले होते. याचा साधा अर्थ इतकाच होता, की पत्रकार व सामंतांचे कौतुक करणारी माध्यमे तेव्हा मिमांसा करण्यापेक्षा दिशाभूल करीत होती. लागोपाठ दोन निवडणूकात शिवसेनेचा दारूण पराभव करून सामंतांच्या कामगार आघाडीने सेनेच्या बालेकिल्ल्यातच मोठे यश मिळवले असेल, तर त्याला दिशाभूल का म्हणायचे? हा पत्रकार विश्लेषकांवर अन्यायच नाही काय?

   आधी आपण त्या अठ्ठावीस वर्षापुर्वीच्या राजकीय विश्लेषणाचे तथ्य तपासून बघुया. तेव्हाची लोकसभा निवडणूक झाली, ती इंदिरा हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर झाली होती. ३१ आक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधी यांना त्यांच्या पंतप्रधान निवासातच त्यांच्याच दोन विश्वासू शीख अंगरक्षकांनी अगदी जवळून गोळ्या घालून ठार मारलेले होते. त्या भयंकर घटनेने अवघा देश हबकला होता. सहाजिकच विनाविलंब त्यांच्या जागी त्यांचेच पुत्र राजीव गांधी यांना राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनी शपथ देऊन पंतप्रधान पदावर बसवले होते. दिल्लीत तर भीषण दंगल उसळली होती. कॉग्रेसच्या नेत्यांच्याच पुढाकाराने वस्तीवस्तीत शीखांचा राजरोस नरसंहार सलग तीन दिवस चालू होता. राजीव गांधी त्यावर म्हणाले, की मोठा जुना वृक्ष उन्मळून पडला मग धरणीला हादरे बसतातच. पण त्यांच्या त्या भयंकर चिथावणीखोर विधानातील हिंसेचे प्रोत्साहन कोणाला दिसले नाही. त्यांनी तात्काळ लोकसभेच्या निवडणूकांची घोषणा केली आणि त्याच सहानुभूतीवर स्वार होऊन चारशे जागा जिंकल्या होत्या. पुढली निदान दोनचार वर्षे तरी कोणी त्या नरसंहार वा दंगलीबद्दल अवाक्षर काढले नाही. ती लाट तशीच महाराष्ट्रातही दिसली होती आणि त्यात सर्वच कॉग्रेस विरोधक वाहून गेलेले होते. पण त्याच लाटेवर मात करून मुंबईत दत्ता सामंत लोकसभेत निवडून आलेले होते. ४८ पैकी राज्यातल्या ४३ जागा कॉग्रेसने जिंकल्या होत्या. अपवाद होता मुंबईत डॉ. सामंत, कोकणात मधू दंडवते, बारामतीमध्ये शरद पवार आणि औरंगाबादेत डोणगावकर पाटिल इतकाच. एक जागी उमेदवाराच्या मृत्यूमुळे मतदान रोखले गेले होते. त्यापैकी सामंतांचे यश त्यांच्या दिर्घकालीन गिरणी संपाचे होते. १९८२ सालात त्यांनी आरंभलेल्या गिरणी संपाने अवघा गिरणगाव देशोधडीला लागला होता. त्याला कॉग्रेसचे सरकार जबाबदार असल्याच्या भावनेने इंदिरा हत्येनंतरही इथला मतदार सामंतांच्याच मागे राहिला आणि मुंबईच्या अन्य जागीही सामंतांचे उमेदवार चांगली टक्कर देऊ शकले. त्यांच्या तुलनेत अन्य विरोधी पक्ष खुपच मागे पडले होते. त्याच गिरणगावात असलेल्या मध्य दक्षीण व उत्तर अशा दोन्ही जागी भाजपाच्या मदतीने उभे असलेले शिवसेनेचे वामनराव महाडीक व मनोहर जोशी कुठल्या कुठे फ़ेकले गेले होते. त्यात दत्ता सामंत यांचे कर्तृत्व नगण्य आणि गिरणी कामगारांचा कॉग्रेसवरचा राग प्रभावी ठरला होता. शिवसेनेचा पारंपारिक मतदारही सामंतांच्या मागे गेला होता. कारण तेव्हा राजकीय भूमिका बाजूला पडून गिरणगावाच्या अस्मितेचा विषय पटलावर पुढे होता. मग दोनच महिन्यात विधानसभेची निवडणूक आली आणि तिथेही गिरणी कारगाराच्या न्याय हक्काची लढाई सुरू झाली. त्यात सामंतांकडे स्थानिक उमेदवारही नव्हते. त्यांना बाहेरचे उमेदवार आयात करून गिरणगावात उभे करावे लागले. कुर्ल्यातले शरद खातू व विक्रोळी घाटकोपरच्या कॉग्रेस नगरसेविका विनिता सामंत यांना परळ व वरळीतून कामगार आघाडीच्या उमेदवार म्हणून उभे करण्यात आले. शिवडी मतदारसंघात लालनिशाण पक्षाचे कार्यकर्ते दादू अत्याळकर आघाडीचे उमेदवार झाले आणि विधानसभेत जाऊन पोहोचले. ती सुद्धा राजकारणापेक्षा जनक्षोभाची किमया होती. पण या दोन्ही लढतीमध्ये तिथल्या पारंपारिक बालेकिल्ल्यात शिवसेना भूईसपाट झाली होती.

   लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे गिरणगावात सामंतांनी घडवलेला चमत्कार स्थानिक उमेदवार नसतानाचा होता. त्याची मिमांसा म्हणूनच गिरणीसंपाच्या पार्श्वभूमीवर करण्याची गरज होती. तो शिवसेनेचा पराभव असण्यापेक्षा कॉग्रेसला धडा शिकवण्याच्या नादात व्यक्त झालेल्या प्रक्षोभाचे परिणाम होते. पण त्याची मिमांसा शिवसेना संपली, अशीच करण्यात आली. अशा प्रचाराला खुद्द सेनेतीलच काही जुनेजाणते कार्यकर्ते व दुय्यम नेतेही बळी पडले होते. त्यांनी आपल्या जागा व बालेकिल्ले जपण्य़ासाठी पक्षांतर करण्याची मजल मारली होती. १९६८च्या पहिल्या फ़ेरीतील सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक घाटकोपरचे पां. रा. कदम यांनी कॉग्रेसची वाट धरली; तर भांडुपचे नगरसेवक रा. वि. पडवळ यांनी सामंतांच्या आघाडीचा झेंडा खांद्यावर घेतला होता. सेनेचे बहुतांश नेतेही गडबडले होते. कारण पुढल्या दोन महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणूका होऊ घातल्या होत्या. त्यात सेनेचा फ़ज्जा उडाला, तर सेना खरोखरच संपणार होती. पण १९७७च्या जनता लाटेला झेलूनही टिकलेल्या शिवसेनाप्रमुखांना सामंत लाटेची फ़िकीर नव्हती. सेनेच्या अनेक नेत्यांनी पालिकेसाठी अन्य पक्षांशी जागावाटपाचा प्रयास चालविला होता. अन्य पक्षांशी बोलणी करून बघितली होती. ती फ़िसकटली आणि अनेक सेनानेते अस्वस्थ होते. अशावेळी सेनाप्रमुखांनी पालिकेच्या सर्वच जागा स्वबळावर लढवायचा पवित्रा घेतला. प्रत्येक वॉर्डातले शाखाप्रमुख थेट उमेदवार म्हणून घोषित करून टाकले. दुसरीकडे गिरणी कामगारांच्या न्यायासाठी पालिका निवडणूकीत उडी घेतलेल्या सामंतांच्या कामगार आघाडीकडे अवघ्या मुंबईतून उमेदवारी मिळवण्यासाठी झुंबड उडाली होती. थोडक्यात सेना संपली याबद्दल कुणाही राजकीय अभ्यासक वा पत्रकारांच्या मनात शंका उरलेली नव्हती. सामंतांनी आपल्या दंडेलीने सेनेचा काटा काढल्याने सेनेचे छुपे शत्रू आणि विरोधक कमालीचे सुखावले होते. आज दिल्लीच्या निकालांनंतर जशी भाजपा मोदींच्या अपयशाची ग्वाही दिली जाते आहे, त्यापेक्षा तेव्हाचा गवगवा थोडाही वेगळा नव्हता. पण अवघ्या चार महिन्यात डॉ, दत्ता सामंतांच्या गिरणी कामगार न्यायाची हवा निघाली होती. कारण महापालिकेत गिरणीसंपाला न्याय कसा मिळू शकतो, असा प्रश्न कामगारांनाही पडू लागला होता. तितकेच नाही, इंदिरा हत्येची सहानुभूतीही संपली होती. तेव्हाचे मुंबई कॉग्रेसचे अध्यक्ष मुरली देवरा यांनी तर तमाम विरोधी पक्षांना कचरा कुंडीत फ़ेकून द्यायचे आवाहन मतदाराला करणारी पोस्टर्स, मुंबईभर लावली होती. पण प्रत्यक्षात त्याच महापालिका निवडणूकीने शिवसेनला राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष बनवण्याची प्रक्रिया सुरू केली. (अपुर्ण)