शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१३

मोदींपेक्षा राहुल ‘भारी’



  अलिकडल्या काही दिवसात राहुल गांधींनी जाहिरसभा घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यातून त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जबरदस्त धक्का दिल्याच्या फ़ेसबुकवरील प्रतिक्रिया आणि एकूणच वाहिन्यांवरील चर्चा ऐकल्यावर मनापासून हसू आले. पहिली गोष्ट अशी, की समोर दिसते म्हणून आपण बघतोच असे नसते आणि कानावर पडलेला प्रत्येक आवाज आपण ऐकतोच असेही अजिबात नसते. त्यातले आपल्याला हवे तेच आपण बघत असतो आणि हवे तेच ऐकत असतो. पुन्हा त्यातून आपल्याला हवे तसेच अर्थ लावत असतो. राहुलने आपल्या आक्रमक भाषणातून मोदींना दणका दिल्याची प्रतिक्रिया म्हणूनच नवलाईची आहे. काहीजणांना तर मनमोहन देसाईच्या ‘अमर अकबर अंथोनी’ चित्रपटातला अमिताभही आठवला. त्यात विनोद खन्नाकडून जबर मार खाल्ल्यावर पोलिस कोठडीत जाऊन पडलेला अमिताभ उर्फ़ अंथोनी म्हणतो, ‘तुमने हमको बहुत मारा. हमने तुमको एकही मारा. लेकीन सॉलिड मारा; है की नही?’ लोकांच्या लक्षात राहिलेले ते वाक्य जरूर आहे. पण त्यानंतर अंथोनी गजाआड जाऊन पडलेला असतो. तर त्याला गजाआड टाकणारा विनोद खन्ना उर्फ़ अमर शिरजोर ठरलेला असतो. तेव्हा त्यातला अंथोनी विनोदी नव्हेतर निर्लज्ज व हास्यास्पद ठरलेला असतो. मग अशा उदाहरणातून आपण राहुल गांधींचे कौतुक करतोय, की टवाळी करतोय; हे त्यांच्या चहात्यांच्या लक्षात कधी यायचे? कसे येणार? त्यांना समोर दिसते आहे, त्यापेक्षा भलतेच बघायचे व ऐकायचे असेल, तर सत्य दाखवणार तरी कसे? अलिकडल्या काळात अंथोनीचे हे वाक्य अनेक राजकीय अभ्यासकांच्या लक्षात राहिले, कारण मागल्या लोकसभा निवडणूकांचे निकाल लागल्यावर साडेचार वर्षापुर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यातले व्यंग दाखवण्यासाठी ते उच्चारले होते. ते शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना खिजवण्यासाठी. त्यात विजयी सूर नव्हता, तर आपण आपटलो, तरी तुम्हाला भूईसपाट करीत आपटलो; असा त्याचा मतितार्थ होता. त्याही अर्थाने राहुलच्या हल्लीच्या सभेचे वर्णन वा विश्लेषण होऊ शकते काय? होणार असेल तर मोदींना संपवताना राहुल कॉग्रेसच संपवायला निघालेत असा घ्यायचा काय?

   मागल्या काही महिन्यांपासून मोदी देशाच्या विविध राज्यामध्ये जाहिरसभा घेत आहेत. भव्यदिव्य विराट सभा बघून खुद्द भाजपातल्याच जाणत्यांना नवल वाटत असेल, तर मोदी व भाजपा विरोधकांच्या पोटात गोळा येणे स्वाभाविकच आहे. कारण मोदींना गुजरातबाहेर कोणी ओळखतसुद्धा नाही, असाच त्यांच्या विरोधकांना मागली दोनतीन वर्षे दावा राहिलेला आहे. मोदींच्या पंतप्रधानकीच्या दाव्याची गोष्ट निघाल्यावर, त्यामुळे भाजपाचे नुकसान होईल; असेही वारंवार सांगितले जात होते. पण आपल्या नावाची पंतप्रधान पदासाठी घोषणा झाल्यापासून मोदींनी देशाच्या कानाकोपर्‍यात सभांचा सपाटा लावला आहे. त्यासाठी जमणारी गर्दी अचंबित करणारी असली, तरी त्या गर्दीकडून मोदींच्या विधाने व वक्तव्यांना मिळणारा प्रतिसाद विरोधकांना अस्वस्थ करून सोडणारा असल्यास नवल नाही. ज्याच्या विरोधात अखंड अकरा वर्षे बदनामीच्या मोहिमा चालवल्या गेल्या; तोच देशातला सर्वाधिक लोकप्रिय नेता होताना बघायला कुठल्या बुद्धीमंताला आवडू शकेल? आपले सिद्धांत व आग्रह खोटे पडताना बघणे, कुणाही विद्वानाला आवडणे शक्यच नसते. सहाजिकच मोदींच्या गाजणार्‍या मोठमोठ्या सभा सेक्युलर लोकांना पोटदुखी झाल्यास नवल नव्हते. अशावेळी मग मोदींच्या या घोडदौडीला कोणी रोखू पहात असेल किंवा त्यात पुढाकार घेत असेल; तर त्याचे मोदी विरोधकांना कौतुक नक्कीच वाटणार आणि त्यात गैर काहीच नाही. त्यामुळेच मागल्या काही दिवसात कॉग्रेसचे अननुभवी उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लागोपाठ सभा घेऊन भाजपाच्या नावाने व मोदींचे नाव न घेताच केलेल्या हल्ल्याने अशी माणसे सुखावली तर आश्चर्य नाही. बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, तशीच ही स्थिती असते. बुडणार्‍याला काडी कधीच वाचवू शकत नाही, हे सत्यच आहे. पण तरंगणारी काडी बुडणार्‍याला आशा तर दाखवते ना? त्यापेक्षा राहुलची भाषणे फ़ारशी उपयोगी वा परिणामकारक नाहीत.

   सभेत आवेशपुर्ण व चढ्या आवाजात बोलले, मग भाषण आक्रमक झाले; अशी अनेकांची समजूत आहे. खुद्द राहुलचीही अशीच कोणीतरी समजूत करून दिलेली दिसते. अन्यथा त्यांनी कुठल्याही अनावश्यक शब्दांवर जोर देत असा आक्रस्ताळेपणा केला नसता. आपल्या आजी व पित्याची दहशतवादी हल्ल्यात हत्या झाली आणि आपल्याला त्याचा घुस्सा येतो; असे राहुलनी म्हणायला काहीच हरकत नाही. पण जो आवेश त्यांनी इतक्या वर्षांनी दाखवला, तो नाट्यमय होता. त्याच्या बुमरॅंग होण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. अन्य कोणी त्यांना त्यातले धोके दाखवण्याचे धाडसही केले नाही. त्यापेक्षा त्यांच्या चहात्यांनी टाळ्या पिटून कौतुकच केल्यावर राहुल भरकटत गेल्यास नवल नव्हते. शेफ़ारलेल्या पोराप्रमाणे त्यांनी मुक्ताफ़ळे अधिकच उधळण्यास सुरूवात केली आणि त्यांची अवस्था मग खरोखरच सिनेमातल्या त्या अंथोनी सारखी होऊन गेली. राजस्थानातील सभेत ‘दादी को मारा, पापा को मारा’ असल्या पोरकटपणाचे पुढले पाऊल मग इंदूरच्या सभेत पडले. आधीच्या सभेत भाजपा जातीय धार्मिक द्वेष फ़ैलावतो आणि ती आग आम्हाला विझवावी लागते, असे सांगितले होते. इतकेच नव्हेतर आग लागली तेव्हा भाजपावाले कुठे होते; असाही सवाल केला होता. पंतप्रधानांसमवेत गेल्याने मुझफ़्फ़रनगरच्या दंगलग्रस्त परिसराला भेट द्यायला गेलेल्या मम्मी पप्पूला तिथे प्रवेश मिळाला. पण त्याच परिसराला भेट द्यायला राहुलच्याही आधी भाजपाचे राज्यसभेतील उपनेते व अध्यक्ष गेलेले असताना, त्यांना मात्र राज्य पोलिसांनी विमानतळावरूनच परत पाठवले होते. म्हणजेच भाजपाच्या नेत्यांची मम्मी युपीएची अध्यक्ष नाही आणि तिच्याच रिमोटवर चालणारा पंतप्रधान नाही; तो भाजपावाल्यांचा गुन्हा असतो काय? गेलेल्यांना रोखायचे आणि मग वर तोंड करून विचारायचे, हे भाजपावाले आग लागली तेव्हा मुझफ़्फ़रनगरात का गेले नाहीत? याला सत्यवचन म्हणतात? इतके असत्य बोलू शकत नसेल तो फ़ेकू असतो. यात फ़ेकू कोण, ते सामान्य जनतेला नेमके कळते. पण बुद्धीमंत सेक्युलर असल्यावर ते कळू शकत नाही. मग मोदीला कसे घेरले, याचा आनंदोत्सव सुरू व्हायचाच. व्हायलाही हरकत नसावी. कोणाला मुर्खाच्या नंदनवनातून बाहेर खेचायला अधिकार आपल्याला राज्यघटना देत नाही ना?

   पण अशा चहात्यांच्या टाळ्या गुंजत असतील व कडकडाट करीत असतील; तर हा आधुनिक राजकारणातला अंथोनी आपल्या हास्यास्पद मुर्खपणाच्या कृती लगेच कशाला थांबवणार? तो अधिकच पोरकटपणा करणार ना? मुझफ़्फ़रनगरच्या स्थानिक पोलिसांनी दंगल कोणी पेटवली, त्यात पोलिसांना काम करण्यात कोणी अडथळे आणले, त्याचे छुपे चित्रण वाहिन्यांवरून लोकांनी बघितले आहे. त्यांना सत्य चांगले ठाऊक आहे. तरीही राहुल गांधी बेधडक खोटे बोलणार असतील; तर त्यांचे तोंड कोणी बांधायचे? ते मोकाटच सुटणार ना? त्यामुळेच मग राहुलनी इंदूरच्या सभेत आणखी एक लोणकढी थाप हाणली. म्हणे त्यांना कुणा गुप्तचर अधिकार्‍याने येऊन सांगितले, की मुझफ़्फ़रनगर दंगलीतल्या पिडीत मुस्लिम तरूणांना पाकिस्तानी गुप्तहेरसंस्था हाताशी धरते आहे. थोडक्यात आता दंगलीनंतर तिथले पिडीत मुस्लिम पाकिस्तानचे हस्तक बनू लागले आहेत, असाच आरोप राहुलने केला. म्हणजे ज्यांचे आप्तस्वकीय त्या दंगलीत मारले गेले, त्यांच्या जखमांवर फ़ुंकर घालणे दुर राहिले. त्यांचे पुनर्वसन मागे पडले. त्याच मुस्लिमांना पाकिस्तानचे हस्तक ठरवण्याचा अव्यापारेषू व्यापार आधुनिक अंथोनी करून बसले. प्रत्येक दंगल व घातपातानंतर आपल्या देशात पालिस्तानी हस्तक व आयएसआय यांच्यावर संशय घेतला जातो. मग त्यांचे हस्तक म्हणून काही मुस्लिम संशयितही पकडले जातात. त्यामुळे सर्वच मुस्लिमांकडे पाकिस्तानचे हस्तक म्हणून बघितले जाते, असा मुस्लिम समाज व नेत्यांचा आक्षेप आहे. त्यावर फ़ुंकर घालण्याचे प्रयास कॉग्रेस व अन्य सेक्युलर पक्ष नित्यनेमाने करीत असतात. इतकेच नव्हेतर मुस्लिमांविषयी असला संशय भाजपावालेच पसरवतात, हा सेक्युलर लोकांचा व मोदीविरोधकांचा कायमचा आक्षेप राहिला आहे. पण नेमका तोच बिनबुडाचा आरोप आता त्याच गोटातील हिरो असलेल्या राहुल गांधींनी उत्साहाच्या भरात केलेला आहे. त्यांचा हेतू तसा नाही, हे मान्यच करायला लागेल.

   मुझफ़्फ़रनगरचे मुस्लिम पाकिस्तानचे हस्तक आहेत किंवा तिथले तरूण पाकिस्तानला फ़ितूर आहेत; असे राहुलना अजिबात म्हणायचे नव्हते. उलट भाजपाने पेटवलेल्या दंगलीतून दुखावलेले मुस्लिम तरूण पाकिस्तानच्या आहारी जातात व तिथल्या गुप्तहेर खात्याच्या जाळ्यात अडकतात; असेच सुचवून राहुल यांना भाजपाविषयी मुस्लिमात द्वेष निर्माण करायचा होता. पण शब्द किंवा मुद्दे कसे योजावेत, केव्हा फ़िरवावेत आणि कुठे कशावर भर द्यावा; याचे कुठलेही भान नाही की जाण नाही. त्यामुळेच त्यांनी एकामागून एका सभेत तावातावाने आवेशपुर्ण बोलताना स्वपक्षाला अधिकाधिक अडचणीत आणण्याचा सपाटा लावलेला आहे. पण त्यांचा आवेश बघूनच खुश झालेल्यांना त्यातून बुडत्याला काडीचा आधार मिळावा, तसा आनंद झालेला आहे. आता इंदुरच्या भाषणानंतर राहुलना मुस्लिमांवर आळ घ्यायचा नव्हता किंवा त्यांचा मुद्दा वेगळाच होता; असले खुलासे देत बसायची वेळ पक्ष प्रक्त्यांवर आलेली आहे. दुसरीकडे भाजपा सोडून अन्य सेक्युलर पक्षांनाही राहुलवर टिकेचे आसूड ओढण्याची पाळी आली आहे. तिकडे कॉग्रेसच्याच गृहमंत्र्याला मुझफ़्फ़रनगरात पाक हेरसंस्थेचे जाळे असल्यास कुठे व कसे; त्याचे स्पष्टीकरण देण्याची नामुष्की आलेली आहे. तेवढेच नाही तर भारत सरकारच्या गुप्तचर विभागाचे नाक कापले गेले आहे. ज्याने राहुलना अशी माहिती दिली, त्या अधिकार्‍याला समोर आणायची मागणी पुढे आली आहे. थोडक्यात एकाच दगडात राहुलनी स्वपक्षाच्या अनेक हितसंबंधांचा फ़टाफ़ट बळी घेऊन चमत्कारच घडवला आहे. त्यामुळे एक गोष्ट नक्कीच मान्य करावी लागेल. मोदींनी जे काम आरंभले किंवा हाती घेतले आहे, त्यातही राहुलच मोदींना ‘भारी’ पडले आहेत. मोदींनी कॉग्रेसला देशाभर पराभूत करण्याचे आव्हान स्विकारले आहे, त्याच कॉग्रेसला नामोहरम व नामशेष करण्याच्या कामात मोदींपेक्षा राहुलचे प्रयास अधिक परिणामकारक ठरत असतील, तर मोदींपेक्षा राहुलच ‘भारी’ काम करतात हे नाकारता येईल काय?

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१३

मतचाचण्यांचा थोडासा इतिहास



  आता देशात मतचाचण्य़ांचे जणू पेवच फ़ुटले आहे. पण विविध संस्थांच्या मदतीने जनमताची चाचणी घेऊन त्यावर कुठला पक्ष जिंकणार किंवा कोणा मित्रपक्षाला सोबत घेऊन सरकार बनवणार; अशा चर्चा रंगवणार्‍यांना त्यातले शास्त्र कितीसे कळते, याची मला दाट शंका आहे. कारण जेव्हा ह्या तंत्राचा भारतात प्रथमच अवलंब झाला, तेव्हा तमाम वृत्तपत्रे व पत्रकार आणि राजकीय अभ्यासक त्याविषयी कमालीचे साशंक होते. नुसते साशंकच नव्हते तर अशा अंदाजांची खिल्ली उडवण्यातही आघाडीवर होते. कारण जनमानस आपल्यालाच नेमके कळते, असा एक टोकाचा अहंकार भारतीय पत्रकारांमध्ये होता. सहाजिकच त्यांच्या अभ्यास व अनुभवाच्या पलिकडला कोणी त्याविषयी भाष्य करीत असेल; तर या ढुढ्ढाचार्यांना ते रुचणार तरी कसे? पण आज त्यांचेच वंशज किंवा वारस त्याच शास्त्राचा किंवा चाचणी अहवालाचा आधार घेऊन, असे काही छातीठोक राजकीय भाष्य करीत असतात, की त्या तंत्राचा भारतातील आद्यपुरूष मानला जाणारा डॉ. प्रणय रॉय सुद्धा त्यापासून चार हात दूर राहू लागला आहे. अर्थात ते स्वाभाविकही आहे. कारण जेव्हा अशा मतचाचण्या घेऊन निवडणूकीचे अंदाज वर्तवण्याचा उद्योग इथे भारतात सुरू झाला; तेव्हा आजच्या वाहिन्यांवरील बहुतांश पत्रकारांपासून वृत्तपत्रांचे बहुतांश संपादक नाकाचा शेंबुडही पुसायच्या अकलेचे नव्हते. तर त्यांच्याकडून ते शास्त्र समजून बोलण्याची वा त्याचे नेमके आकलन करण्याची तरी अपेक्षा कशी बाळगता येईल. त्यामुळेच सर्व्हे म्हणजे नमुना मतचाचण्या करून घेतल्या जातात आणि मग महागड्या खेळण्याचा लाडावलेल्या पोराने चुराडा करावा; तसा त्या आकड्यांचा विचका केला जातो. म्हणूनच अशा मतचाचण्यांचा थोडा इतिहास मांडणे मला आवश्यक वाटते. विशेषत: आज गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची लोकात दिसणारी व आकड्यातही आढळणारी लोकप्रियता, माध्यमातील मुखंडांना उलगडता येत नसल्याने; तो इतिहास समजून घेणे अगत्याचे आहे. गुजरातच्या दहाबारा वर्षापुर्वीच्या दंगलीच्या कलंकातून बाहेर पडून मोदींना देशभर आवश्यक तेवढी बहुमतापर्यंत पोहोचणारी मते मिळतील किंवा नाही; त्याचे उत्तर त्याच इतिहासात दडलेले आहे. म्हणूनच त्या इतिहासाच्या आठवणी थोड्या चाळवणे मला अगत्याचे वाटते.

   मतचाचण्यांचा भारतातील इतिहास वा कालखंड अवघा तेहतीस वर्षांचा आहे. त्याच्याआधी भारतात कधी मतचाचण्य़ा घेतल्या जात नव्हत्या. अर्थात भारतात नाही म्हणून जगातही होत नव्हत्या, असे अजिबात नाही. पुढारलेल्या पाश्चात्य जगात तर निवडणूकच नव्हेतर सातत्याने अशा नेत्यांच्या व राजकीय पक्षाच्या लोकप्रियतेचे अंदाज व्यक्त केले जात होते. पण तसा प्रयोग भारतात करायला कोणी धजावत नव्हता. कारण पाश्चात्य देशाप्रमाणे इथेही लोकशाही व संसदीय लोकशाहीची प्रणाली असली तरी; तिथल्याप्रमाणे इथे द्विपक्षीय लोकशाही लढत नव्हती. देशव्यापी एकमेव कॉग्रेस पक्ष आणि लहानमोठ्या अन्य पक्षांच्या सोबत प्रभावी प्रादेशिक पक्षांचे कडबोळे असल्याने; जनमत कौल शोधणे जिकीरीचे काम होते. त्यामुळेच १९८० पुर्वीच्या काळात निवडणूका असल्या मग गुप्तचर खात्याचा अंदाज बहुतेक वृत्तपत्रात ग्राह्य मानला जायचा. तो क्वचितच खरा ठरायचा. उदाहरणार्थ १९७५ सालात आणिबाणी लादून देशातल्या लोकशाहीचा गळा घोटलेल्या इंदिराजींनी अकस्मात आणिबाणी उठवून १९७७ सालात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका जाहिर केल्या; त्याच मुळात गुप्तचर खात्याच्या खास अंदाजावर. तेव्हा लोकांमध्ये इंदिराजींची लोकप्रियता प्रचंड असल्याने त्या नक्कीच मोठे यश मिळवतील, असा तो अंदाज होता. म्हणून त्यांनी निवडणूकांची अकस्मात घोषणा केली आणि तुरूंगात डांबून ठेवलेल्या विरोधी राजकीय नेत्यांची सुटका करून राजकीय आव्हान स्विकारले. पण दबलेल्या जनमताचा अंदाज गुप्तचर खात्याला आला नव्हता आणि त्याच निवडणुकीत इंदिराजींसह त्यांच्या सत्ताधारी पक्षाचा इतिहासातील सर्वात दारूण पराभव झाला. राजस्थान पंजाबपासून बंगालपर्यंतच्या गंगाप्रदेशात म्हणजे संपुर्ण उत्तर भारतात कॉग्रेसचे नामोनिशाण शिल्लक उरले नाही, इतका तो नामुष्कीचा पराभव होता. चार प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन घाईगर्दीने स्थापन केलेल्या जनता पक्षाला मतदाराने बहुमत दिले होते. आधी त्या पक्षाने निवडणूका जिंकल्या आणि पुढे त्या पक्षाची औपचारिक स्थापना झाली होती. असे गुप्तचर खात्याचे निवडणूक अंदाज बेभरवशी असायचे. बाकी मग राजकीय अभ्यासक आपापल्या वार्ताहर व पत्रकारांच्या मदतीने हवेतले अंदाज बांधायचे, किंवा भविष्यवेत्ते आपल्या ग्रहमानाचे समिकरण मांडून अंदाज व्यक्त करायचे. त्यापैकी कुठलाच अंदाज खरा ठरण्याची कुठलीही हमी नसायची.

   पण त्या निवडणूकीनंतर तसा पहिला प्रयोग तेव्हा पाक्षिक स्वरूपात प्रसिद्ध होणार्‍या ‘इंडीयाटुडे’च्या संपादकांनी केला होता. प्रणय रॉय नामक एका होतकरू आकडेशास्त्रज्ञाने त्यात पुढाकार घेतला होता. त्याने भारतीय निवडणूकांचेही शास्त्रीय पद्धतीने अंदाज चाचणीतून बांधता येतील, असा दावा करीत ठोकताळे तयार केले. त्याला ‘इंडीयाटुडे’ने सहकार्य केले तरी त्यावर अजिबात विश्वास दाखवला नव्हता. कारण प्रणय रॉयने आपल्या पद्धतीने नमूना मतांची चाचणी घेऊन जे अंदाज तयार केले. त्याला ‘इंडियाटुडे’ने प्रसिद्धी जरूर दिली. पण तिथेच संपादकांनी पुस्तीही जोडली होती. या चाचणी व अंदाजाची संपुर्ण जबाबदारी लेखकाची व चाचणीकर्त्याची आहे आणि त्याविषयी खुद्द संपादकही साशंक असल्याचे स्पष्ट केलेले होते. कारण त्या पहिल्यावहिल्या मतचाचणीने काढलेले अंदाज कुठल्याही पत्रपंडीत, संपादक, राजकीय अभ्यासकाला चक्रावून सोडणारे होते. आज ‘दंगलखोर’ नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचे आकडे बघून जसे राजकीय अभ्यासक, जाणकार संपादक अविश्वास दाखवतात, तितकाच अविश्वास तेव्हा प्रणय रॉयच्या त्या पहिल्या निवडणूक अंदाजावर नेमका त्याच कारणास्तव दाखवला गेला होता. कारण अडीच वर्षापुर्वी ज्या इंदिरा गांधींना त्यांचा सुपुत्र संजय गांधी याच्यासह आपापल्या मतदारसंघात पराभूत करून मतदाराने नवा इतिहास घडवला होता; तोच मतदार इतक्या अल्पावधीत इंदिराजींचे आणिबाणीतले गुन्हे माफ़ करून त्यांना प्रचंड बहूमताने सत्ता देईल, असा रॉयचा अंदाज होता. म्हणजे त्याची मतचाचणी त्याला तसे सांगत होती. त्यावर अभ्यासक पत्रकारांनी अविश्वास दाखवण्याला आणखी एक कारणही होते. आधीच्या निवडणूकीत कॉग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर इंदिराजींनी त्या पराभूत कॉग्रेस पक्षातही फ़ुट पाडली होती आणि त्यांच्या जोडीला कोणी मान्यवर कॉग्रेस नेते शिल्लक उरलेले नव्हते. पक्षाची संघटना नेत्यांच्या हाती आणि कार्यकर्ते व लोकप्रियता इंदिराजींच्या हाती. इतक्याच बळावर आणिबाणीच्या अत्याचारांनी बदनाम असलेल्या इंदिराजी १९८०च्या मध्यावधी निवडणुकीला सामोर्‍या गेलेल्या होत्या. विस्कळीत दुबळी पक्ष संघटना व कलंकित इतिहास, यामुळे इंदिराजींना पुन्हा मतदार कौल देईल; यावर कुठला राजकीय अभ्यासक विश्वास ठेवणार? दंगलीनंतरही गुजरातच्या मतदाराने तिसर्‍यांदा मोदींना मोठे बहूमत दिले; म्हणून आजच्या राजकीय अभ्यासक पत्रकारांना तो मोदींचा विजय वाटला आहे काय? नेमकी तीच मानसिकता तेव्हाच्या पत्रकार अभ्यासकांनी दाखवलेली होती. मग त्यांना नव्याने निवडणूक अंदाजशास्त्र प्रस्तुत करणारा प्रणय रॉय मुर्ख वाटला, तर नवल कुठले? अगदी त्याचे अंदाज छापणार्‍या ‘इंडियाटुडे’च्या संपादक मंडळानेही त्याच्यावर विश्वास दाखवला नव्हता. मग बाकीच्या वृत्तपत्रे वा पत्रकारांनी त्याची दखल घेण्याचा विषयच कुठे येतो?

   पण या तमाम राजकीय पंडितांना निवडणूक निकाल लागले, तेव्हा तोंडात बोट घालायची पाळी आली. कारण प्रणय रॉयचे अंदाज नुसते बरोबर ठरले नाहीत; तर अगदी तंतोतंत खरे ठरले. ज्या इंदिरा गांधी आणिबाणीने बदनाम झाल्या होत्या आणि तोच ठपका ठेवून त्यांच्याच कॉग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्याच्यासह संजय गांधींची पक्षातून हाकालपट्टी केली होती; त्यालाच सोबत घेऊन इंदिराजी लोकांना सामोर्‍या गेल्या होत्या. तरीही त्यांना नुसते बहूमत नव्हेतर दोन तृतियांश बहूमत मिळण्याचा अंदाज रॉयने व्यक्त केला होता. आणि झालेही नेमके तसेच. अडिच वर्षे आधी ज्या जनता पक्षाला लोकांनी भरपूर मते देऊन डोक्यावर घेतले होते; त्याच्यासह इंदिराजींना हाकलणार्‍या कॉग्रेस पक्षाची धुळधाण मतदाराने उडवली होती. इंदिराजींनी ज्याला कोणाला आपल्या पक्षाचा उमेदवार म्हणून समोर उभे केले; त्याला लोकांनी भरभरून मते दिली होती. त्यांचे निवडणूक चिन्हही बदलले होते. गायवासरू निशाणी बाजूला पडून हाताचा पंजा ही नवी निशाणी घेऊन इंदिराजी जनतेसमोर गेल्या होत्या. त्यासाठी एक आटोपशीर घोषणाही तेव्हा लोकप्रिय ठरली होती. ‘ना जातपर ना पातपर, इंदिराजीकी बातपर, मुहर लगावो हातपर’. आणि लोकांनी खरोखरच हातावर पसंतीची मोहर उठवून इंदिराजींना लोकसभेत अफ़ाट बहुमताने सत्ता बहाल केली. त्यामागचे राजकारण नंतर बघता येईल. मुद्दा आहे, तो देशातल्या पहिल्यावहिल्या मतचाचणीचा अंदाज खरा ठरण्याचा. मात्र त्याची दखल कोणी फ़ारशी घेतली नाही. प्रणय रॉयचे अंदाज नशीबाने खरे ठरले, म्हणून राजकीय पंडीतांनी त्याकडे साफ़ काणाडोळा केला होता. त्याने हे अंदाज कसे काढले किंवा त्यामागचे तंत्र काय आहे, याचाही कोणी उहापोह केला नाही, की कुठे दखलपात्र चर्चाही झाल्या नाहीत. अशी ती पहिली मतचाचणी ‘इंडियाटुडे’च्या त्या अंकातच दफ़न केली गेली. पण ज्यांना इंदिराजी इतके मोठे यश मिळवू शकणार नाहीतच अशी ठाम खात्री होती; तेच राजकीय पंडीत अभ्यासक निकालानंतर त्याची मिमांसा मात्र करीत होते. आपल्या दिवाळखोर राजकीय भाकितावर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयास तावातावाने करीत होते. पण लोकमताचा अंदाज काढण्यासाठी हाताशी एक नवे विश्वासार्ह तंत्र आले आहे; त्याची दखल घ्यायची बुद्धी त्यापैकी कोणा शहाण्याला झाली नाही. हीच आपल्या देशातील राजकीय अभ्यासक, जाणकार, पत्रकार वा संपादक विश्लेषकांची दुर्दैवी शोकांतिका आहे. त्यांना आपल्या पुर्वग्रहातून बाहेर पडून सत्य दिसत असले, तरी बघता येत नाही, की समजून घेता येत नाही. वास्तवापेक्षा आपल्या मनातल्या समजुतीला व भ्रमाला घट्ट चिकटून रहाण्याची मनोवृत्ती त्याला कारण आहे. आणि आज इतक्या वर्षानंतरही त्यातून नव्या पिढीचे पत्रकार अभ्यासक मुक्त झालेले दिसत नाहीत. कालपरवाच्या मतचाचणीवरील चर्चेत त्याचीच प्रचिती येत होती. म्हणूनच हा इतिहास नव्याने व थोडा सविस्तर सांगणे अगत्याचे झाले आहे. (क्रमश:)

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

कुंभकर्ण जागवायचा कसा?

   दिल्लीच्या घटनेनंतर देशभर प्रक्षोभ उसळला होता. सरकारने नवा कायदा केला. म्हणून मुंबईत झालेला सामुहिक बलात्कार थांबू शकला नाही. त्यानंतरही देशाच्या विविध शहरात, वस्त्यांमध्ये होणारे बलात्कार थांबलेले नाहीत. बलात्कार करणार्‍यांना कायद्याचे किंवा शिक्षेचे भय उरलेले नाही. कारण बलात्कार करणार्‍यांना आपण काही अमानुष कृत्य करतोय असे वाटलेलेच नाही. इतर कुठला सामान्य गुन्हा करावा किंवा कायदा मोडावा, इतक्या सहजतेने आजकाल आपल्या देशात बलात्काराच्या घटना घडत असतात. दिवसेदिवस ती अमानुष प्रवृत्ती बळावतेच आहे. अर्थात त्याला कायदा किंवा सामाजिक या बाबतीतले गैरसमज कारणीभूत आहेत. मानवी संबंधांमधली ही एक भीषण विकृती आहे आणि म्हणूनच त्याकडे गुन्हा म्हणून बघण्यानेच अधिक नुकसान केले आहे. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा महिलांचे अधिकार, स्वातंत्र्य किंवा पुरूषी अहंकार अशा विविध पैलूंवर उहापोह केला जातो. पण त्यामागची वर्चस्ववादी विकृत मानसिकता उलगडण्याचा प्रयासच होत नाही. म्हणूनच त्यावरचा नेमका उपाय कुठेच सापडू शकलेला नाही. महिलांना अबला किंवा दुर्बळ दुय्यम मानण्य़ाच्या मानसिकतेचा हा एक दुष्परिणाम आहे. महिलेकडे मालमत्ता किंवा प्रतिष्ठेचे प्रतिक म्हणून बघण्यातल्या पुरूषी वर्चस्ववादातून ही विकृती उदयास आलेली आहे. तिचे नेमके योग्य विश्लेषण होऊ शकलेले नाही. दोनतीन वर्षापुर्वी सुदान या देशातील डारफ़ोर प्रदेशामध्ये बलात्काराचा हत्याराप्रमाणे वापर झालेला होता. त्याकडे मानवी संकट म्हणून बघितले गेले. पण ती वास्तविकता नव्हती. जगातल्या रानटीपणाचा पुर्वेतिहास बघितला, तर जेत्याने पराभूत समाजातील महिलांना पळवून नेणे किंवा त्यांच्यावर बलात्कार करण्य़ाच्या घटनांचे शेकडो दाखले मिळतील. अगदी काही वर्षापुर्वी बिहारसारख्या अराजक माजलेल्या राज्यात एखाद्या वस्तीवर हल्ला करून महिलांवर सामुहिक बलात्काराचे प्रकार घडलेले आहेत. त्यापेक्षा नेहमीच्या बलात्कारामागची मानसिकता वेगळी नसते. दोन्हीकडे आपले वर्चस्व किंवा प्राबल्य सिद्ध करण्यासाठी केलेला तो लैंगिक अत्याचार असल्याचे दिसून येईल.

   बलात्कार म्हणजे नेमके काय असते? तो एक शारिरीक अत्याचार असतो. पण तो निव्वळ लैंगिक गुन्हा नसतो. त्यात त्या महिलेच्या माणूस असण्याला नाकारून तिच्या देहाचा तिच्या इच्छेविरुद्ध एखाद्या उपभोग्य वस्तूप्रमाणे सक्तीने केलेला वापर असतो. म्हणजेच तिच्या एक स्वतंत्र माणूस म्हणून असलेल्या व्यक्तीमत्वावरचा प्राणघातक हल्लाच असतो. तिच्यातल्या स्वाभिमान वा अस्मितेची ती हत्याच असते. त्यातल्या शारिरीक जखमा जितक्या यातनामय नसतात, तितका तिच्या अस्मिता, स्वाभिमान व व्यक्तीमत्व मानल्या जाणार्‍या मनाला होणार्‍या जखमा खोल व जिव्हारी लागणार्‍या असतात. शरीरावरच्या जखमा उपचाराने भरून येणार्‍या असतात. पण मनाला, समजुतीला व अभिमानाला झालेल्या जखमा कधीच भरून येणार्‍या नसतात. कारण व्यक्ती म्हणून ज्या देहाचा ती अभिमान बाळगत असते; त्याविषयीच तिच्या मनात कमालीची घृणाच त्या अनुभवातून निर्माण होत असते. आपण स्त्री आहोत म्हणून खुप सुंदर आहोत, असा जो स्त्रीला उपजत अभिमान असतो; त्यालाच अशा प्रसंगातून पायदळी तुडवले जात असते, ठार मारले जात असते. आपला देह एक वापरायची बाजारू वस्तू आहे, अशी हीन धारणा त्यातून तिच्या मनात रुजवली जात असते. ती उपटून टाकणेही तिच्या हाती मग उरत नाही. तिला स्वत:चाच तिरस्कार वाटावा अशी जी स्थिती त्या पिडीतेमध्ये त्या एकाच प्रसंगातून बाणवली जाते; तिथे तिच्या स्वयंभू व्यक्तीमत्वाचीच हत्या केली जात असते. मजेसाठी वापरून फ़ेकून द्यायची वस्तू; इतकेच तिच्या देहाचे मूल्यमापन त्या अनुभवातून येते आणि ते झटकूनही टाकता येत नाही, ही कधीही भरून न येणारी हानी एका बलात्काराने होत असते. हे त्यातले गांभिर्य आहे. म्हणूनच तो खुनापेक्षाही भीषण स्वरूपाचा गुन्हा असतो. कारण त्यात व्यक्ती जिवंत असते; पण तिच्यातली जगण्याची जी इच्छाशक्ती असते, तीच मारून टाकली जात असते. आपल्या अस्तित्वाविषयीच तिच्यावर न्युनगंड लादला जात असतो. म्हणूनच बलात्कार हा सामान्य फ़ौजदारी गुन्हा नव्हे; तर तो हत्याकांडापेक्षाही भयंकर अमानुष गुन्हा असतो. कारण तो जीव न घेणारा खुन असतो. ज्याला नरभक्षकी कृत्य म्हणावे, इतके ते अमानवी कृत्य असते. कारण त्यातला गुन्हेगार समोरच्या महिलेचे अस्तित्वच खावून फ़स्त करीत असतो.

   एका बाजूला ती त्या महिलेच्या अस्तित्वाची व स्वाभिमानाची हत्या असते आणि दुसरीकडे तिने ज्यांच्याकडे सहानुभूतीच्या अपेक्षेने बघावे; त्यांच्या नजराही त्या घटनेतून मारून टाकल्या जातात. बलात्कारिता ही गुन्ह्याची बळी असते आणि तरीही तीच नकळत गुन्हेगारही मानली जात असते. म्हणजे तिच्याकडे बघणार्‍या नजरा तिला जगणे अशक्य करून सोडत असतात. अगदी सहानुभूतीच्या नजराही धीर देण्यापेक्षा कींव करणार्‍या असतात. ही तीच आपली परिचित महिला असते. पण कालपर्यंत होती, त्यापेक्षा आपली तिच्याकडे बघणारी नजर बदलून गेलेली असते. ती आपली नजर तिला अधिक बेजार करत असते. तिच्या जखमांवरची खपली काढत असते. तू वापरली गेलीस, अशा जाणीवा तिच्यात निष्पन्न व्हाव्यात, अशी आपली सहानुभूती त्या बलात्काराच्या वेदना अधिक जिव्हारी झोंबणार्‍या करीत असतात. एखाद्या बलात्कारी गुन्हेगाराचे आप्तस्वकीय त्याच्याशी जितके अलिप्तपणे वागणार नाहीत, त्यापेक्षा बलात्कारितेचे परिचित या बळी महिलेशी अत्यंत चमत्कातिक वर्तन करीत असतात. म्हणजेच ती दोन्हीकडून बळीच होत असते. म्हणूनही असा गुन्हा सामान्य नाही तर असामान्य असतो. खुनापेक्षा भीषण असतो. ज्या देहाला व्यक्ती म्हणून जग ओळखत असते, त्याच आपल्या देहाविषयी किळस निर्माण झाल्यावर त्याच देहात वास्तव्य करणे किती यातनामय असेल; याची कल्पना एक पिडीताच करू शकते. म्हणूनच अगदी दोषी गुन्हेगाराला फ़ाशी देऊन त्या वेदनांची यातनांची भरपाई होऊ शकणार नाही. अशा गुन्ह्यासाठी कठोर कायदा वा शिक्षा पुरेशी नाही. असा गुन्हा होताच कामा नये, यासाठीची पावले उचलणे अगत्याचे व आवश्यक आहे. कारण त्याची भरपाई कशानेच होऊ शकत नसते. दुसर्‍याच्या गुन्ह्याची शिक्षा नकोशा झालेल्या देहात वास्तव्य करून त्या महिलेने उर्वरित जीवनात भोगायची असते. त्याची भरपाई फ़ाशीने होऊ शकत नाही.

   कितीही कठोर कायदे केले वा शिक्षा कठोर केल्या, म्हणून शेकडो वर्षे बलात्काराच्या कल्पनेमुळे पिडीत महिलेला आपल्याच देहाविषयी जाणवणार्‍या तिटकारा वा किळसातून तिची मुक्तता शक्य नसेल, तर मग बलात्काराची शक्यता संपवणेच अपरिहार्य आहे. कायद्याने महिलांना समान हक्क, अधिकार देऊन किंवा विविध प्रकारचे संरक्षण, आरक्षण देऊन भागणार नाही. महिलाविषयक पुरूषी मानसिकता आमुलाग्र बदलावी लागेल. भाषेपासून वर्तनापर्यंत अनेक बाबतीत असे बदल प्रयत्नपुर्वक घडवून आणावे लागतील. त्यासाठी महिलाविषयक गुन्हे करणार्‍यांना तुरुंगात कठोर शिक्षा देण्यापेक्षा त्यांना समाजाने बहिष्कृत केल्याचे लाजिरवाणे जीवन सक्तीने कंठण्याची शिक्षा द्यायला हवी. ज्या पुरूषार्थाचा किंवा नरवृत्तीचा अवास्तव गर्व अशा गुन्ह्याला चिथावणी देत असतो; त्याची पदोपदी हेटाळणी होईल, असे काही उपाय व शिक्षा असायला हवी. जेणे करून बलात्काराच्या नुसत्या कल्पनेनेच पुरूषाच्या मनाचा थरकाप उडाला पाहिजे. असे काही केल्यास आपल्या पौरुष्याची सार्वत्रिक होणारी अवहेलना किंवा पायमल्ली बघून माणसाच्या मनात भयगंड निर्माण करणे; हाच त्यावरचा सर्वोत्तम परिणामकारक उपाय असू शकतो. विनयभंग, छेडछाड याप्रकारचे गुन्हे करणार्‍यांना नंपुसक बनवणारे वैद्यकीय उपाय योजल्यास, ती दहशत निर्माण करता येईल. कारण जेव्हा समाजात असे मोजकेच दोषी दिसतील; तेव्हा त्यांची हेटाळणी व टवाळी होईल आणि नुसत्या त्या दृष्यानेच हजारो लाखो टपोरी शहाणे होऊ शकतील. शिक्षा जितकी भयकारी नसते, त्यापेक्षा अधिक शिक्षेची नुसती कल्पना परिणामकारक असते. ती दहशत निर्माण केली तरच अशा गुन्ह्याला पायबंद घालता येईल. बलात्कारामागच्या अमानुष वृत्तीला वेसण घालण्यासाठी तितक्याच अमानुष शिक्षेचे भय असायला हवे. एक महिला जसे बलात्काराच्या अनुभवानंतर आपले व्यक्तीमत्व गमावून बसते; तसा त्या स्वरूपाचे गुन्हे करणार्‍याला वा तसे विचार करणार्‍यांना अनुभव येऊ लागला, तरच बलात्काराला रोखता येईल.

   अमुक एक गोष्ट वा कृती पाप आहे आणि त्याची भीषण फ़ळे आपल्याला चाखायला लागतील, याचे भयच त्या अमानुषतेतून समाजाला मुक्ती देऊ शकेल. मानवी समाजात अमानुषतेला जर माणूसकीने आपण वागवू लागलो, तर माणूसकीवर अमानुषता शिरजोर होणारच. आज नेमके तेच झालेले आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. शेवटी कायद्यापेक्षा समाजात रुजवलेली नितीमूल्ये व जीवनमूल्येच प्रभावी ठरताना दिसतात. हजारो वर्षे विविध समाजात असलेली बंधने जितकी काटेकोरपणे पाळली जातात, तितके कायद्याचे पालन होताना दिसत नाही. जातपंचायती वा खापपंचायतीवर बुद्धीमंतांकडुन खुप टिका होते. पण ज्याला कायद्याचे बळ नाही, अशा त्याच पंचायतींच्या आदेश व फ़तव्याला त्यांचे अनुयायी वचकून असतात. कारण त्यांनी फ़तवे काढल्यावर आपले आप्तस्वकीयही पाठीशी उभे रहात नाहीत; असा धाक असतो. कायद्याच्या राज्यात तोच धाक उरलेला नाही. सामाजिक बहिष्काराचे हत्यार जितके प्रभावी आहे व असते; तितके कायदे प्रभावी नाहीत. पंचायतीचे कालबाह्य निवाडे जरूर नाकारावेत. पण त्यांच्या आदेशातील परिणामकारकता उचलायला काय हरकत आहे? कालपरवा उत्तरप्रदेशच्या मुझफ़्फ़रपुर येथील दंगलीचे कारण काय होते? मुलीची छेड काढल्यावर हिंसेपर्यंत मामला गेला आणि एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत प्रसंग ओढवला. त्यात आसपासची गावे, वस्त्या ओढल्या गेल्या. एका मुलीची छेड काढण्याच्या गुन्ह्याचे गांभिर्य पोलिस व कायद्याने वेळीच ओळखले असते व हातपाय हलवले असते; तर पुढली भीषण दंगल टाळता आली असती. पण आजचा कायदा मुली व स्त्रीयांच्या प्रतिष्ठेसाठी उभा रहात नाही; अशा धारणेने लोकांनी कायदा आपल्या हाती घेऊन थेट न्यायनिवाडा करण्यापर्यंत मजल मारली. पंचायतीचा धाक आहे तेवढा कायद्याने व शासनाने आपला धाक निर्माण केला तरी खुप होईल. आपल्या घरातील, जाती वा वस्तीतील मुलीची छेड काढली जाते, विनयभंग होतो, त्यासाठी तिथल्या लोकांनी जी संवेदनशीलता दाखवली, ती आपले शासन व कायदा दाखवू शकला तरी खुप मोठी मजल मारता येईल. पण कुंभकर्ण होऊन घोरत पडलेल्या शासनाला जागे करायचे कोणी? आपापल्या तात्विक व बौद्धिक विवेचनाच्या धुंदीत मशगुल असलेल्या विचारवंताना त्यांच्या भ्रामक जगातून जागवायचे कोणी व कसे? हे कुंभकर्ण जागे होत नाहीत, तोपर्यंत बलात्कारापासून महिलांची मुक्ती अशक्य आहे. दीडशे वर्षे मागल्या कालखंडात झोपी गेलेल्या कायदा नावाच्या कुंभकर्णाची झोपमोड कशी करणार बोला?